romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, February 11, 2015

आम आदमी करतो सुपडा साफ????

मतदार राजा टोकाचा कौल देऊ लागला आहे...
आदिकाली पर्यायी पक्षच नव्हता... मग विरुद्ध पक्षांमधे प्रत्येकी एखाददुसरं नेतृत्व तयार झालं. आणिबाणीनंतर विरोध्यांना सत्तेची चव कळली. ती लगेच उलटली. पुन्हा मतदारराजानं आणिबाणीवालीचीच लाट आणली... आपल्याकडचा लोलक चांगलाच झुकतो.
राजकीय मृत्यू हे अपघात असतात, कारस्थानांची फलितं असतात, की दहशतवादाची?...
पुन्हा प्रेमाची लाट येते... साऊथला कटाऊटस्, मंदिरं, आत्महत्या असे विशेष मतदारराजा दाखवतो. त्याचीच जराशी पातळ प्रतिमा देशपातळीवर दिसते?...
हे आवर्ती होतंय म्हणून की काय धर्म ह्या मुद्याचे पद्धतशीर आणि संवेदनाहीन राजकारण आणले जाते?... चेहेरा, दाखवण्याचा वेगळा, मुळातला वेगळा... पाडापाड, दंगली, जाळपोळ... अजूनही दंगलीनंतरची छायाचित्रं आठवली, स्त्री, भृणहत्यांच्या बातम्या आठवल्यावर सामान्यातला सामान्य मतदार चरकतो? की 'आपलं' बरोबर आहे, 'त्याना' असंच शासन पाहिजे हे त्याच्या जाणिवरुपी अस्तित्वात मुरुन गेलंय?
राजकारणातलं वेगळं वळण आणि शेजारी शत्रू या दोघांमुळे पराकोटीचा दहशतवाद माजला, की कुणा एकामुळे?... यात सगळ्यात जास्त सर्वतोपरी हानी कुणाची झाली?...
मग पुन्हा जोरदार पलटी... त्या आधीची काही त्रिशंकू मध्यंतरं... कसरती, सारवासारव्या...
मतदारराजानं पुन्हा घराणेशाही, परित्यक्तासमान विधवेबद्दल सहानुभूती अशी जुनीपुराणी मतं कवटाळली? त्या विजयाला सत्ताधारिणीने त्यागाचं कोंदण घालून स्वप्रतिमा उजळवली? वर त्याला मुस्काट दाबलेला, सज्जन विकासाचा चेहेरा दिला? ज्या चेहे-यानं परंपरागत विकसनशील देश विकसित जगात पाय रोवू लागला होता, त्याच चेहेर्‍याला वापरुन घेऊन? अशा प्रतिभा, कर्तृत्ववान चेहेर्‍यानं मंद, निब्बर दगडी कवचाआड स्वत:ला वापरुन देऊन देशाला कुठे आणून ठेवलं?....
सामान्यातला सामान्य राजा सगळंच स्वीकारतो?...
पैसे खा पण आमची कामं करा... हे सगळे येतात ते तुंबडी भरायलाच हो... असं दर राज्यकर्त्याला म्हणतो...
धोरणलकव्याने तरी किंवा दुहीच्या बीजाने तरी आल्टूनपाल्टून रसातळाला दोन बोटं उरताहेत...
लकवा खूपच मारलाय आता जालिम डोस शोधायला लागला मतदार राजा. लकवेकर खूब दिला लकवा म्हणून माजात होते आणि कथित दंगल, जाळपोळीचा कथित सूत्रधार, कथित बनावट चकमककिंग वगैरे बिरुदावली मिळालेला अंडरडाॅग हळूहळू उभा राहिला. आपला मतदार राजा हुशार, चाणाक्ष. त्याने काट्यावर नायट्याचा हिशोब केला. प्रचंड विजयामुळे, त्या विजयाअलिकडच्या पलिकडच्या भल्याभल्यांच्या प्रतिक्रियांपुढे मतदार राजा समूहात काहीशी भांबवाभांबवी झाली का? की नाही? रोगापेक्षा इलाज भयंकर असं वाटून?....
पुढचं तर अगदी अलिकडचं... नमोंकीत सूट इत्यादी... महर्गता, वेतनकरार, सवलती... यात काही अनुकुलता?
मतदार राज्याचं सुपडा साफ करण्याचं व्रत चालूच आहे...
राज्य पातळीवर नवनिर्माणाचंच खळ्ळं खट्याक करत आता तर तो सोन्याचा झाडू हातात घेऊन राजधानीवरच उभा आहे...
'सुसा'ट मतदार राजा आणि अप्पलपोटे राजकारणी यांतला हा विळ्याभोपळ्याचा खेळ केवळ खेळाचा आनंद देत-घेत रहाणार की आपली लोकशाही, पोरखेळातून बाहेर पडून सज्ञान होणार? की सरळ ठोकशाहीच येणार?...
केंद्रात ज्याचं सरकार आहे त्याची शत्रूसरकारं राज्यात आली की प्रगतीच प्रगती, हे पुस्तकी राजकारण अजून मतदार राजाचा कब्जा घेऊन आहे?... सत्ताधीश, त्यांचे कथित स्पाॅट इत्यादी नाना काही वेगळे उजले रंग दाखवणार?....
असा हा सामना दोन राजांमधला...  हे कलगीवाले आणि तुरेवाले दोघेही, तटस्थ निरीक्षकाला सारखेच अनप्रेडिक्टेबल- अनाकलनीय वाटतात?....
मुळात ताटस्थ्य इत्यादी खिजगणतीत आहे?
नाही... एक मॅगसेसे विजेता, भूतपूर्व आदर्श नोकरशहा, सुवर्णपदकविजेता, मुख्यमंत्रीपदी असतानाही चौकात धरणं धरुन बसणारा... राजधानीद्वारी सोनियाचा झाडू धरुन शड्डू मारता झाला आहे... या पार्श्वभूमीवर या सगळ्याच प्रश्नांचं मूल्य काय आहे?...
उद्या महासत्ता होण्याच्या दिशेवरचा सोपान दृगोचर झालाच तर... म्हणून विचारतोय...
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

No comments: