romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, October 28, 2010

कॉमेडी शो “दिवाळीचा सीझन”

दिवाळीचा सीझन हा आपल्या मनूच्या दृष्टीने फार मोठा असतो.जवळजवळ महिनाभर मनू त्याच धुंदीत असतो.एखाद्या अट्टल नशेकरय़ासारखा.त्याच्या गोड बोलण्याला यावेळी ऊत येतो.मी सतत त्याच्याबरोबर असूनही मला मधूमेह कसा होत नाही याचंच मला नवल वाटतं.या महिन्याभरात मनू कुठेही केव्हाही दिसतो.परमेश्वरासारखा तो सर्वत्र संचार करत असतो.परमेश्वर सर्वत्र संचार करून नक्की काय करतो हे मी पामर काही जाणू शकत नाही.मनू सर्वत्र संचार करून नक्की काय करतो हे मला पक्कं ठाऊक असतं.तो करतो ते मी करू शकत नाही म्हणून त्याच्या दृष्टीने मी सतत पामर ठरत आलो आहे.
शाळेत असताना मी ’बॉयस्काऊट’ मधे होतो.वर्षातून एकदा आम्ही घरोघर फिरून, पडेल ती कामं करून पैसे कमवत असू.त्याला ’खरी कमाई’ असं नाव होतं.मनू आमच्यात नसे.तो नाक्यावर उभा राहून कुणी कुणी टाकलेली सिगारेटची थोटकं शोधे आणि आम्हाला हसे.खरय़ा कमाईतून आम्ही शाळेसाठी देणगी म्हणून काही वस्तू आणत असू.मनू बापाच्या खिश्यातून चोरलेल्या बिड्यांचा धूर काढत आम्हाला मूर्खात काढत असे.आज तो एकही पैसा खर्च न करता दिवाळी साजरी करतो.वाण्याचे, दुधाचे, विजेचे, गॅसचे, अशी असंख्य बिले इमानदारीत भरून आलेली दिवाळी कधी निघून जाते याचा मला थांगपत्ता असत नाही.दिवाळीत माझ्या पाठीचा काटा ढिला झालेला असतो.मनू मात्र टेचात असतो.रोज रंगीबेरंगी वेष्टन असलेले गिफ्ट बॉक्सेस मिरवत, आपलं सुप्रसिद्ध हास्य फाकवत विजेत्याच्या रूबाबात घरी जात असतो.
मनूला सगळ्या कला अवगत आहेत.अडिअडचणीत असलेला माणूस तो आधीच हेरतो.माझ्यासारखा सदैव आणि सर्वत्र अडचणीत पडलेला कफल्लक माणूस त्याच्या कामाचा नसतो.’हेरतो’ म्हणजे तो नेमकं काय करतो ते आता तुम्हाला कळलं असेलच.त्याच्या भाषेत या प्रकाराला फिल्डिंग लावणं असं म्हणतात.मनूला बरोबर माहित असतं की कामाची माणसं या सीझनमधे स्वत: बाहेर पडत नाहीत.आपल्या नोकरांना, चाकरांना पुढे करतात.समोर आलेल्या या प्रतिनिधींना कसं वेठीला धरायचं हे मनूचं ठरलेलं असतं.माझं काय करणार? (म्हणजेच माझ्यासाठी काय आणणार?) हे मनू वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो.ते पहाणं खूपच गमतीदार असतं.तो कुणाला हात हलवून ओळख दाखवता दाखवता हातानेच ’काय?’ असं विचारतो.कुणासाठी नुसती भुवयांची हालचाल उपयोगी ठरते.मनूचे बोलके डोळे या सीझनमधे बरंच काम करून जातात.रात्री तो ते एका बंद पेटीत काढून ठेवत असावा असा माझा दाट संशय आहे.त्याशिवाय ते दुसरय़ा दिवशी काम करणारच नाहीत.
कुणाला हात मिळवून तो हळूच दाबणं, “याद है ना?” “काय करताय?” असं चक्कं विचारणं, या सगळ्या प्रकारांनी साधलं नाहीच तर गुरकावणं हे मनूचं दिवाळी भेट मिळवण्याचं अस्त्रं असतं.नेहेमी दिवाळी न देणारय़ांना या सीझनमधे तो हाडवैरय़ासारखा वागवतो.नेहेमी देणारे हे त्याच्या दृष्टीने परमेश्वर असतात.ज्याने मूक होकार दिलाय त्याला मनू बरोबर हेरतो.या हेरण्यावरून मला नेहेमी वाटतं की मनू पोलिसात किंवा सीबीआयमधे असायला हवा होता.गुन्हेगार शोधण्याचं मरू द्या हो, मनू एव्हाना करोडपती तरी झाला असता.बिना लाईफ लाईन के! तर अश्या हेरलेल्या सावजाचा माग काढत त्याच्या ऑफिसपर्यंत जाणं आणि दिवाळी पदरात पाडून घेणं ही मग फारशी कठीण गोष्टं रहात नाही.
मनूचं हे सगळं मला अजिबात पटत नाही.माझ्या नेहेमीच्या केविलवाण्या पद्धतीने मी या सगळ्याचा त्याच्याजवळ निषेध व्यक्तं करायचा प्रयत्न करतो. “तुला हे जमत नाही ना म्हणून तुझी जळते!” हे मनूचं त्यावरचं उत्तर.त्यानंतरचं त्याचं ते सुप्रसिद्ध फवारा उडवत कुत्सित खिदळणं.माझी तळपायाची आग मस्तकाला भिडते.मग मी हजारापासून उलटे अंक मोजायला सुरवात करतो.यावेळी मनूने तीही संधी दिली नाही आणि मी उसळलोच, “अरेऽऽ भीकेची लक्षणं आहेत हीऽऽ…” ओरडल्यावर मी नेहेमीप्रमाणे चपापून इकडेतिकडे बघितलं.प्रत्येकजण आपापल्या सावजाला आपल्याला पद्धतीने पटवून दिवाळी गटवण्याच्या खटपटीत असलेला मला दिसला.मग मी मनूकडे पाहिलं.तो हसला.त्याचं हे हसणं भयानक असतं.इथे माझा जीव जात असतो.सात्विक संताप अनावर झालेला असतो.मनू पुन्हा हसतो.मला हसावं की रडावं कळत नाही.माझा हात धरून तो मला खाली बसवतो.कुणाच्या तरी नावावर चहा मागवतो आणि आपल्या अत्यंत मृदू, मुलायम आवाजात प्रवचन सुरू करतो.एव्हाना मला तो कुणी ’बापू’ किंवा ’महाराज’ सारखा दिसायला लागतो. “पोस्टमन काय करतात? पालिकेचे कामगार काय करतात? बेस्टवाले, रेल्वेवाले आणि आणखी कुठलेही वाले काय करतात?- दिवाळी आली की ’बंद’ करतात! आपली जनता वर्षानुवर्षं या ’बंद’ च्या कडीकुलपात अडकलेली अडकते.काय बोलते का ती? तोंड आहे का तिला? करं कोण भरतं? त्या भरलेल्या कराचा फायदा कोणाला? मूकबधीर जनतेला कुठल्या डॉक्टरकडे न्यायचं?”
च्यामारी! मी काही वेगळंच बोललो होतो आणि मनूची गाडी नेहेमीप्रमाणे वेगळ्याच रूळावर? मी पुलावर आणि तो रूळावर? माझा ’आ’ वासलेलाच राहिला.
“यड्याऽऽ यातले दोन बॉक्स तूही घेऊन जा!” असं म्हणून मनूने मला टप्पल मारली तेव्हा जगातला सर्वात मूर्ख माणूस मीच याची पूर्ण खात्री मला पटली!

Saturday, October 23, 2010

नाटक_एकांकिका स्पर्धा!

स्थानिक पातळीवर एकांकिका, नाटक करत असताना त्याचंच कंटिन्युएशन व्हावं, तेच मागील पानावरून पुढच्या अधिक आकर्षक पानावर चालू रहावं अशी स्थिती मी काम करत असलेल्या कार्यालयात निर्माण झाली.माझ्याच शाखेत एक चळवळ्या निघाला.चांगलाच चळवळ्या.स्वस्थं बसला असला तर मोठ्या आवाजात गप्पा, कुणाला तरी सुनावणं.नाहीतर सारखी धावपळ.पक्षकार्य, संघटनाकार्य.नाटकाच्या बाबतीत इतका विरळा की तुम्ही नाटकात काम करा मी बाकीचं बघतो! असं म्हणणारा! अशी माणसं दुर्मिळ!
पण…या त्याच्या कार्यबाहुल्यामुळेच आंतरकार्यालयीन स्पर्धेतली आमची एकांकिका न होण्याची पाळी आली होती.ह्या आंतरकार्यालयीन स्पर्धेला रंगभूमीसंदर्भात खूप मानाचं स्थान होतं.चांगले, वेगवेगळे प्रयोग जसे या स्पर्धेने दिले तसे चमकणारे अनेक तारे ह्या स्पर्धेने पुढे आणले.काही कार्यालयांचे स्पर्धेतले प्रयोग, विशेषत: स्पर्धेची अंतिम फेरी हाऊसफूल्ल होत असे.स्पर्धेला आता टीव्ही मालिकांना असतं त्यापेक्षाही जास्त ग्लॅमर होतं.आमच्या शाखेतला तो चळवळ्या प्रचंड बिझी.लोकसंग्रह खूप.कुणाच्याही अडिअडचणीला धावून जाण्याचा स्वभाव.आमच्या आस्थापनातला प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत असलेला एक रंगकर्मी नुकताच काळाच्या पडद्याआड गेलेला.स्पर्धेत उतरण्यासाठी बाहेरचा चांगला अनुभवी व्यावसायिक दिग्दर्शक पैसे देऊन आणायचा ही आयडिया आमच्या संघटकाच्याच डोक्यातली.त्यानं त्याप्रमाणे फिल्डिंग लावली.सगळं ठरलं.आता दिग्दर्शक येणार, व्यवहाराचं फायनल होणार त्यादिवसात आमचे हे साहेब गायब.नक्की काय झालं हे आमच्या गावीच नाही! आम्ही बाकीचे सगळे जमलो.दिग्दर्शक येणार नाही असा निरोप.दुसरय़ा दिवशी आमचे संघटक जाणार दौरय़ावर.ते रजेवरच.निरोप नाही काही नाही.मग मी जाऊन पोचलो.कसातरी धीर एकवटून.काय बोलायचं असतं अशावेळी काही अनुभव नाही.दिग्दर्शक सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर.माझी हजेरी!
“काल येऊन तासभर वाट बघून गेलो. ×× बनवायचे धंदे कशाला करता? कधी भेटणार तुमचा तो संघटक? आजचा शेवटचा दिवस.आज तो भेटला नाही तर मी करत नाही!” हे ऐकून मी संपलोच.अजीजीने आम्हा सगळ्या नव्या मुलांचा इंटरेस्ट किती आहे ते सांगितलं.संघटक नाही.सगळं जमत आलेलं एवढ्यावरच थांबतं की काय?
पण आमचा संघटक खराच संघटक.म्हटलं तर चतुर.म्हटलं तर सारवासारवीला उत्तम.कसाही त्यावेळी तो वाटला तरी नाटकाबद्दल त्याला प्रचंडच.पडद्यामागे काय झालं माहिती नाही पण आमची एकांकिका पडद्यावर येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.मी त्या दिवशी त्या दिग्दर्शकाला भेटलो नसतो तर मॅटर पुढे सरकलं नसतं असं आपलं मला वाटलं.
वेळेवर काय बरय़ाच वेळा वेळेच्या आधीच येणं या (दुर)गुणापासून मी कधी मुक्त होणार कुणास ठाऊक? आपल्याकडे भारतीय प्रमाणवेळेचंच महत्व अधिक.दिग्दर्शक वेळेचा भोक्ता.दिग्दर्शकासह आम्ही चार-दोन टकली वेळेवर.इतरांची डोळ्यात प्राण आणून वाट बघत.
वेळेवर येण्याबरोबर आपल्याला खरंच जिथे शिकायला मिळतंय असं दिसतं तिथे स्मार्टनेस दाखवायचा नाही.उगाच पुढे पुढे करायचं नाही.हे दोन्ही या क्षेत्रात (दुर)गुणंच! पण यावेळी तरी मला वेळेवर येणं, सांगितलं जाईल ते मन लाऊन करणं यामुळे एका छोट्या सीनचे दोन मोठे सीन्स करायला मिळाले.एक अतिउत्साही नट, आमचा सिनीयर, विनोदाचा बादशहा(?) करत असलेला एक सीन केवळ तो आगाऊ असल्यामुळे आणि वेळेवर न येण्याचा, न सांगता न येण्याचा भोक्ता असल्यामुळे आऊट झाला.दिग्दर्शक शिस्तीचा वाटत होता.करत असलेल्या कामाबाबत चांगलाच गंभीर दिसत होता.या व्यतिरिक्त दिग्दर्शकाला विनोदाची उत्तम जाण दिसत होती.पूर्णपणे नव्या मुलांकडून काम करून घेणं प्रचंड डोकेफोडीचं काम.पण दिग्दर्शक चांगला शिक्षकही दिसत होता.
ही एकांकिका एक समूहनाट्य होतं.एका कारकूनाचा व्यर्थ दिनक्रम उपरोधिक विनोदी पद्धतीनं मांडला होता.लेखक नावाजलेला विनोदी एकांकिकाकार होता पण व्यसनानं घेरलेला.समूहाच्या रचनांनी एक एक प्रवेश बसत होता तसं तसं आम्ही सगळी नवीन मुलं त्यात रंगून जात होतो.विनोदी प्रसंगांची उतरंड होती आणि दिग्दर्शक त्यात आणखी हशे मिळवण्यासाठी सुयोग्य ऍडिशन्स देण्यात मास्टर होता.
एका प्रवेशात मी नायक कारकूनाचा बाप झालो होतो.तोंडासमोर सतत पेपर धरलेला.आपलं ठाम मत लादून झाल्यावर कारकून, कारकूनाची आई यांच्या बोलण्यावर फक्त हां! हूं! अशा रिऍक्शन देणारा.दिग्दर्शकाने या रिऍक्शन्सवर हशे अर्थात लाफ्टर्स योजले होते.तो हे सगळं कसं करायचं हे मला समजावून सांगत होता आणि मला काही केल्या काय करायचं, ते कसं करायचं हे समजत नव्हतं.
हा प्रवेश हातचा निसटून जाईल या भीतीने असेल कधीही स्वत:हून न बोलणारा, विचारणारा मी यावेळी बोललो.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरचं एक नावाजलेलं शोकांत नाटक नुकतंच टीव्हीवर दाखवलं गेलं होतं.म्हातारा, म्हातारी या दोनच पात्रांच्या हलक्याफुलक्या संवादांतून ही शोकांतिका फुलत जाते.त्यात म्हातारय़ाची भूमिका करणारय़ा बुजुर्ग नटाची बोलायची एक लक्षणीय स्टाईल होती.ती मी माझ्या प्रवेशातल्या मी करत असलेल्या बापाच्या भूमिकेत करू का? असं दिग्दर्शकाला धाडस करूनच विचारलं.तो एव्हाना कंटाळला असावा.त्यानं होकार दिला.
माझा तो प्रवेश छोटासाच होता पण दिग्दर्शकानं योजलेल्या माझ्या भूमिकेतल्या त्या सगळ्या जागांना चांगलेच लाफ्टर्स मिळाले.मी खूष! स्पर्धेतल्या विनोदी एकांकिकांना त्यावेळी बहुतेकवेळा पहिल्या तीन नंबरात स्थान मिळत नसे.आमच्या एकांकिकेला ते मिळालं नाही पण कारकूनाची मुख्य भूमिका करणारय़ा आमच्या मित्राला नंबरात स्थान मिळालं.दिग्दर्शकालाही बक्षिस मिळालं.नव्या ग्रुपच्या मानाने हे चांगलंच होतं.
मी माझ्या भूमिकेत चक्कं नक्कल केली होती.आजच्या कॉमेडीच्या जमान्यात ती वर्ज्य मानली जात नाही पण मी त्यावेळी सहज सापडलेला मार्ग अनुसरला होता.मी शोधला असता तर मला आणखी वेगळा आणि चांगला मार्ग सापडला असता.पण मी नवीन होतो.
या सगळ्या घडामोडीतून मलाही माझं बक्षिस मिळालं.पण त्याविषयी पुढच्यावेळी!

Thursday, October 21, 2010

’दीपज्योती’ डिजीटल दिवाळी अंकात माझ्या कथा!

मित्रांनो! जालरंग प्रकाशनचा ’दीपज्योती’ दिवाळी अंक प्रकाशित झालाय.कथा, कविता, अनुभव, पुस्तक परिचय इत्यादी विविध साहित्यप्रकारांनी नटलेल्या या अंकात माझ्या ’डॉक्टर’ आणि ’समशेर’ या दोन कथा सामील झाल्या आहेत.’दीपज्योती’अवश्य वाचा आणि प्रतिक्रिया द्या! दुवा आहे: http://diwaaliank.blogspot.com/search/label/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4

Wednesday, October 20, 2010

मनू, मी आणि दिवाळी अंक!

मनू हा माझा मला न टाळता येणारा सहचर आहे हे वाक्य जेव्हा मला सुचलं तेव्हा मी स्वत:वर जामच खूष झालो.नाहीतरी काळ्यावर पांढ- माफ करा- पांढरय़ावर काळं करणारे किंवा आजच्या जमान्यात हवेतल्या हवेत ब्लॉगपोस्ट्सरूपी बार उडवणारे स्वत:वर खूष असतातच म्हणे!
एरवी जगात इतक्या वेगवेगळ्या नात्यांमधे मनू मला भेटतो की तो म्हणजे कोण याची व्याख्या करणं कठीण.ह्या नात्यांच्या गुंतागुंतीत अडकून माझाच मनू होतोय की काय असं वाटायला लागलं आहे.
मी लिहितो.आपल्या भाषेलाच घरघर लागली आहे असं म्हणताना मी काय तारे तोडतोय ते तुमच्या समोर आहेच.तारे तोडता येईनात आभाळच वाकडं अश्या एका संभ्रमित सर्जनावस्थेत (?) मी एक कादंबरीच लिहिली आहे असा एक दिवस माझा समज झाला.सालं हे एक मोठं धाडसंच होतं.झालं! मला झोप लागेना.
याच दरम्यान कधीतरी मनूची आणि माझी भेट झाली.
“दिवाळी अंकाची तयारी करतोय!” चेहेरा लांबट करून तो तसाच ठेवत, केसांच्या रूपेरी बटांशी खेळत तो म्हणाला आणि टक लाऊन माझ्याकडे पहात राहिला.
“व्वा! व्वा! अरे तू म्हणजे-” भानावर येऊन मी म्हणालो.
“तू नाही! तुम्ही-तुम्ही!!” आख्ख्या डाव्या हाताने बटा कपाळावरून डोक्यावर सरकवत तो आत्मविश्वासाने म्हणाला.हसलाही नाही.
“हो…हो…तुम्ही-तुम्ही...अभिनंदन…आणि-आणि ऑल द बेस्ट!” एवढं बोलून झाल्यावर मनूच्या एकूण अवतारा-अविर्भावाकडे बघून मी गप्पच झालो.तो टक लाऊन बराच वेळ माझ्याकडे पहात राहिला आणि गाल वाकडा करणारं संपादकीय स्माईल करून दिसेनासा झाला.
मजा म्हणजे त्या दिवसांत आम्ही बरय़ाच वेळा भेटलो.वेगवेगळ्या छायाचित्रणस्थळी त्याच त्या संवादांचे प्रसंग सादर व्हावेत तसे तोच तोच सीन सादर होऊ लागला.मनू तसाच करडी टक लाऊन ’दिवाळी अंकाची तयारी करतोय’ असं सांगतोय, त्याच्या टक लावण्याने हैराण होऊन मी गप्पं होतोय, तो दिसेनासा होतोय!
बरय़ाच गोष्टींचे अर्थ मला झोपेतून दचकून जाग आल्याशिवाय कळतंच नाहीत.मनूच्या टकीचा अर्थ असाच लागला. ’मी माझं लिखाण तुला देऊ का?’ असं मी होऊन मनूला विचारायला हवं होतं.मी प्रथितयशच काय एखादा बनचुकाही लेखक झालेला नसल्यामुळे मी गरीबडा बापडा गप बसत होतो.त्यात मी आधीच केलेलं नको ते धाडस.हातातल्या लिखाणाला कादंबरी समजण्याचं.
मनू माझा जिवलग.तो मला थेट का विचारत नव्हता?... याचा अर्थ मला गरज होती!!! हा साक्षात्कार झाल्यावर मात्र मी बैचेन झालो.संधी एकदाच येते व दार ठोठावते हे व अशा अर्थाची देशी मॅनेजमेंट गुरूंची अनेक मुक्ताफळं माझ्याभोवती दिवसरात्र पिंगा घालू लागली.शेवटी मी मनाचा हिय्या केला.मागच्या अनेक वेळच्या तू-तुम्ही मुळे मनूला प्रत्यक्ष भेटण्याचं धाडस म्हणजे आणखी एक नको ते धाडस आणि मी पडलो मध्यमवर्गीय.शेवटी हो-ना करता करता माझी कादंबरीची संहिता कुरियरद्वारे मनूच्या पत्त्यावर पाठवून दिली.अर्थात तू-तुम्हीच्या खेळामुळे हा कोण? असा वाजवी प्रश्न पडून संहिता न वाचताच (केराच्या टोपलीत) पडू नये म्हणून सोबत माझा परिचयही जोडला.
आठ दिवसातच स्वत: मनूचा फोन आला आणि माझा आनंद गगनात मावेना.परिचय जोडण्याचा विक्षिप्तपणा का केलास म्हणून त्याने सर्वप्रथम माझी हजेरी घेतली.मी ते ही वाचलं असं त्यानं मुद्दाम नमूद केल्यासारखं सांगितलं.माझ्या अक्षराचं त्यानं मनापासून कौतुक केलं.हा मनू की डेल कार्नेजी ते मला कळेचना.तो मला चक्कं अहो-जाहो करत होता.मी ताबडतोब हरभरय़ाच्या झाडावर चढलो.
“पण सॉरी… माझं या वर्षीच्या अंकाचं काम झालंय-”
“एवढ्यातच?ऽऽऽ” मी जोरात किंचाळून खजुराच्या झाडावर लटकलो.
“यावेळी काय? नेहेमीच! एक दिवाळी अंक छापून आला की लगेच पुढच्या अंकाची तयारी!”
“सहा महिने आधीच अंकाचं काम पूर्ण?” माझ्या पडण्याला आता बुचकळाही कमी पडत होता.
“माझी पद्धतच आहे तशी! न छापलं गेलेलं चांगलं साहित्य मी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवतो.” मनूचा स्वर अधिकाधिक मृदू, मुलायम होत होता.अशावेळी आवाजात थोडी बायलेपणाची छटाही डोकावते.माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
“मग?” मनूनं जरा चढ्या स्वरात विचारलं.
“…पण…कसं वाटलं तु-तुम्हाला?” मी.
“चांगलंए…वेगळंए…पण कायए…पुढच्या वर्षीचंसुद्धा प्लानिंग झालेलंए त्यामुळे-”
अरे बापरे! मी मनातल्या मनात म्हणालो.मनूच्या अंकाला खरंतर बाजारात कोणी विचारत असण्याची शक्यता कमी होती.खरं तर म्हणूनच मी एवढं मोठं धाडस करायला धजलो होतो.मग मी फोन ठेवण्याच्या बेताला आलो.
“तरीही मला भेटा तुम्ही…संहिता परत घेऊन जा.आणखी कुठे जरूर प्रयत्न करा…संहिता घ्यायला प्रत्यक्षच आलात तर बरं होईल…कायए…दुसरा एक अंक काढतोय…कृषीविषयक…द्या तीन-चार पानी काही.चांगलं लिखाणए तुमचं…अक्षर सुंदरए-”
“कृषीविषयक काहीही लिहिता येणार नाही हो मला! काळ्या आईचा आणि माझा आयुष्यात कधी संबंधच आलेला नाही!” मी केविलवाणा होऊन कळवळून म्हणालो.
“मला भेटा!” आयुर्विमा एजंटच्या अविर्भावात मनू म्हणाला, “सोपं आहे हो मी तुम्हाला ब्रीफ करीन.काही कठीण नाही.तुम्ही सहज लिहाल.” मनूनं मला डायरेक्ट पंखाखालीच घेतलं पण माझं मन मला शंभर पानांवरून एकदम चार पानांवर येऊ देईना.शिवाय मागणीनुसार लेखन अर्थात ऑन डिमांड रायटिंगमधे सापडून डोक्याचं जे भजं होतं त्याच्याशीही मी परिचित होतो.
“केव्हा भेटता?” –मनू
“भेटतो…लवकरच…” –मी
“हं!...एरवी काय करता?”
“नोकरी”
“कुठे?”
“सरकारी खात्यात आहे…कारकूनच…नुकताच जाहिरात आणि प्रसिद्धी विभागात बदलून आलोय…” “तिथे ते हे आहेत का हो अजून…”
मी हो हो म्हटल्यावर मनूने मग ते कसे माझ्या चुलतबहिणीच्या मामेनणंदेचे मावसदीर आहेत, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत वगैरे पद्धतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम मांडला.मला हो ला हो करणं भाग होतं.
“एनी वे…भेटा मला.बोलू आपण.”
“थॅंक्यू व्हेरी मच साहेब! हल्लीच्या साभार पोच इत्यादी सगळं काही नामशेष झाल्याच्या जमान्यात आपण आवर्जून फोन केलात त्याबद्दल!”
मनू मनापासून कौतुकाने हसला.या! असं म्हणून त्याने फोन ठेवला.
नकार पचवणं खूप अवघड असतं.तुम्ही सामान्य असलात तरीही.नैराश्याचं मळभ दाटून रहातं.अश्यावेळी मी अधिक सर्जनशील कामांकडे वळतो.कपड्यांच्या घड्या घालणं, घरातला पसारा आवरणं, मुलाचा अभ्यास आता मी घ्यायलाच पाहिजे असं स्वत:च्या मनाशी म्हणणं…
यावेळी बाहेरगावीच जायचं असल्यामुळे निर्धास्त झालो.त्या आधी मनूच्या घरी माझ्या कादंबरीची संहिता परत घेण्यासाठी फोन केला.मनूच्या कोण्या नातेवाईकाने तो घेतला.चुकतमाकत अमुक वाजता या, भेट होईल, संहिता मिळेल असा निरोप त्याने दिला.घरी गेलो.मनू नाही.दुसरय़ाच दिवशी गावी जायची तयारी बाकी असल्यामुळे अजून अर्धा तास वाट बघणं मला शक्य नाही.मग भ्रमणध्वनीचा सहारा.संहितेची शोधाशोध.संहितेचं सापडणं (एकदाचं!) आणि शोधणारय़ा पात्राचे आभार मानून माझं तिथून निघणं.बाहेरगावी जाणं आणि सगळं विस्मृतीत ढकलणं जाणं…
“हॅलोऽ–”
“हॅलो…”
“हॅलो मी बोलतोय!”
“कोण मी?” बाहेरगावाहून आल्यापासून हा तिसरा प्रथमपुरूषी एकवचनी.दोघांना मी आधीच गारद केलेलं.आता मी हातघाईवर.
“मीच!”
“च्यामारी-”
“कृषीविषयक लिखाणाचं कुठपर्यंत आलंय?” आधी पारा चढू द्यायचा मग त्यावर बायकी शैलीत पाणी- संपादकी हतकंडे- माझ्यातला होतकरू आणि जागरूक लेखक लगेच जागा झाला.
“सा- साहेब- झालाच-झालाच आहे- शेवटचा हात फिरवतोय-” माझी लोणकढी.
“हं…दोनच पानी झाला असता-”
“हो- होईल-” माझ्यातला अगतिक लेखक.
“पण माझं त्या पुढच्या वर्षाचंही काम झालंय…”
आता माझ्यातला होतकरू, जागरूक, अगतिक लेखक इतकंच काय सज्जन माणसाचाही कडेलोट झाला आणि माझ्या मनात फुल्या फुल्या आणि फुल्याच.त्यात मध्यमवर्गी विवेकाचं आगमन.या सगळ्यामुळे माझ्याकडून भला मोठ्ठा पॉज.
“ऑफिस काय म्हणतंय?” मनूचा आवाज आणखी बायकी.आणखी खवचट.
यापुढे मात्र चमत्कार झाला.माझ्यातोंडून दत्तगुरू वदले असतील- नसतील- आमच्या गल्लीतले बापू तरी नक्कीच वदले असणार!
“एक जाहिरातदार भेटले होते ऑफिसात.कुणी दिवाळी अंक काढत असेल-” माझी लोणकढी मला पूर्ण करावीच लागली नाही.
“आहात तिथेच थांबा.मी ताबडतोब येतोय!” खट्ट!- रिसीवर आपटल्याचा आवाज!
पर्वतच महंमदाकडे येत होता.
यशस्वी साहित्यिकाची सगळी बीजं माझ्यात होती तर!
निदान कृषीसाहित्यिकाची तरी!
संमेलनाध्यक्ष होणं आता मला अजिबात कठीण नव्हतं!
मी लगेच स्वत:वर खूष झालो आणि माझ्यातल्या साहित्यधर्माला जागलो!

Tuesday, October 19, 2010

’बुक गंगा’ वर माझी तीन पुस्तकं!

आता बुक गंगा या ऑनलाईन बुक स्टोअरवरही माझी आवर्त (नाटक), पुलाखालून बरंच (कादंबरी), स्मरणशक्ती वाढीसाठी (स्वयंविकास) ही पुस्तकं रूजू झाली आहेत!
पहा: http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5081606839785976727

Sunday, October 17, 2010

बंद...आयुष्य...

झापडबंद आयुष्यांनी
कानात इअरपीस खोचून
स्वत:ला साफच
डबाबंद करून घेतलेलं...

Thursday, October 14, 2010

नाटक आणि मुख्य प्रवाह!

रंगमंचावर भर प्रयोगात ब्लॅंक होणं ही एक शोचनीय अवस्था असते.अभिनेत्यासाठी एक मरणप्राय स्थिती.अचानक वीजेचा प्रवाह खंडित व्हावा आणि डोळ्यासमोर काहीच दिसू नये तसं मेंदूत होतं.भानावर येईपर्यंत स्मृतिभ्रंश म्हणजे काय त्याची प्रचीती येते.पण म्हणून त्याचा ताण घेऊन काहीच होत नाही.ब्लॅंक होणं अभिनेत्याच्या हातात नाही.मग अभिनेत्याच्या हातात काय आहे?
याबाबत थोर अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू एका तत्वाबाबत सांगतात ते आठवतं.थोर बंगाली दिग्दर्शक शंभू मित्रा यांनी हे तत्व डॉक्टरांना सांगितल्याचं डॉक्टर सांगतात.
“अभिनेता हा एकाच वेळी athlete आणि philosopher दोन्ही असायला हवा!” ब्लॅंक होण्याच्या संदर्भात याचा असा अर्थ लागतो की अभिनेत्यानं आपलं शरीर एका खेळाडूसारखं लवचिक ठेवायला हवं आणि त्याचवेळी त्याचं वाचन, चिंतन आणि मनन हे प्रगल्भ होत रहावं.यामुळे अभिनेत्याची एकाग्रता विकसित होऊ लागते आणि रंगमंचावर ब्लॅंक होणं, संवाद न आठवणं, संवादातला एखादा शब्दं न आठवणं किंवा “बघ! कसा घमघमलाय चाफा!” असा एक रोमॅंटिक डायलॉग बोलताना एका प्रयोगाला माझ्या तोंडून “बघ! कसा चमचमलाय गाफा!” असं निघून गेलं, असे अपघात होण्याचं टळतं.अपघात आपल्या हातात नसतात पण ते कमीतकमी व्हावेत यासाठी पूर्वयोजना करता येते.या ही पुढे जाऊन एक सुप्रसिद्ध वचन अभिनयासंदर्भात सांगितलं जातं ते म्हणजे “इतर कलांसारखं वादक वेगळा आणि वाद्य वेगळं असं अभिनयात नसतं.अभिनेता हा स्वत:च वाद्य असतो आणि तो स्वत:च या वाद्याचा वादक असतो!” एखादा तंबोरा लावणं किंवा ट्यून करणं आणि अभिनेत्यानं स्वत:ला ट्यून करणं ही दोन्ही कौशल्य मागणारी काम आहेत.अर्थात स्वत:च स्वत:ला ट्यून करणं हे जास्त कठीण आहे.ती एक सततची प्रक्रिया आहे.
मी त्यावेळी नवा होतो.स्थानिक रंगमंचावर काम करत होतो.वरचं सांगितलेलं सगळं मी वाचलेलंही नव्हतं.विज्ञान आणि जीवनात घडणारय़ा अतार्किक घटना असा झगडा नाटककारानं मांडला होता.पांगळ्या मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो आणि अतार्किक घटनांना अंधश्रद्धा म्हणत होतो.नाटककारांनं या अतार्किक घटनांना वलय दिलंय असं जाणवत होतं.आपल्या पांगळ्या मुलाचे पाय बरे व्हावेत म्हणून अवैज्ञानिक उपाय योजून, मुलाशी खोटं बोलून त्याला बरं करावं हे बापाच्या तत्वात बसत नव्हतं.हॉस्पिटलचा डीन विज्ञानाचा विद्यार्थी असूनही ’रूग्ण बरा करण्याचा उपाय कुठल्या प्रकारचा आहे हे महत्वाचं नसून तो पूर्ण रोगमुक्त होणं जास्त महत्वाचं आहे’ या विचाराचा.तो एका कॅन्सर पेशंटला मुलाचा दिवंगत आजोबा बनवून मुलाला बरं करायचा घाट घालतो.बाप आडकाठी करतो.मुलासमोर पेशंटचं खरं स्वरूप उघड करायचा प्रयत्न करतो.तो पेशंट तिथून निघून जाणार इतक्यात मुलगाच तो जाणार या धक्क्याने धावत ’आजोबा’ म्हणत त्याला बिलगतो.शेवटचा परिणामकारक धक्का.मुलाचे पाय बरे होतात पण ते असे!
प्रयोग जवळ आला आणि पेशंटची महत्वाची भूमिका करणारा मित्र प्रचंड आजारी पडला.त्याला अंथरूणातून उठताच येईना.त्याचा ताप उतरेना.दोन दिवस हॉस्पिटलमधे दाखल करावं लागलं.मी आणि दिग्दर्शक रंगमंचावरची आणि बॅकस्टेजची तयारी करण्यात गुंतलो होतो.दिग्दर्शक एकाच वेळी गणोशोत्सवाच्या डेकोरेशनसकट सगळ्याच गोष्टीत बिझी होता.पेशंटच्या भूमिकेतल्या मित्राच्या प्रकृतीची गंभीर स्थिती बघता नाटक कॅन्सल करावं लागेल असं वाटायला लागलं पण जोपर्यंत ’ती’ वेळ येत नाही तोपर्यंत नाटक रद्द करायचं नाही असं दिग्दर्शकानं ठरवलं.दिग्दर्शकासारख्या नेत्याची अशा आणिबाणिच्या प्रसंगीची भूमिका खूप महत्वाची असते.आमचा दिग्दर्शक त्याच्या या भूमिकेवर ठाम होता.
आमचा तो प्रचंड आजारी मित्र घरच्यांचा विरोधालाही न जुमानून उभा राहिला.त्याचा प्रवेश झाला की रंगमंचामागे जाऊन तिथे ठेवलेल्या कॉटवर तो झोपत होता आणि पुढचा प्रत्येक प्रसंग सादर करत होता.आम्ही सगळेच टेन्शनमधे होतो.आम्हीच काय नाटक वसाहतीतच असल्यामुळे मुख्य नट आजारी आहे हे सगळ्यानाच माहित होतं.नाटकातल्या संघर्षाला, नाटकातल्या पुढे काय होतंय या उत्सुकतेला आमचा हा मित्राच्या आजारामुळे आणखी एक उत्सुकता जोडली गेली.
आमच्या त्या मित्राला हॅट्स ऑफ! शेवटचा महिनाभर रिहर्सल मिळालेली नसताना, प्रचंड आजारपणाचा सामना करावा लागलेला असताना, प्रयोगाच्या आधी इंजक्शन्स आणि प्रयोग चालू असताना गोळ्या औषधांचा मारा चालू असतानासुद्धा आमच्या त्या मित्राने नाटक नुसतं पार पाडलं असं नाही तर आपली भूमिका उत्तम पार पाडली.पर्यायानं नाटक उत्तम झालंच.नाटकातल्या पेशंटचा पार्ट त्याला सोपा गेला असेल असं कुणीतरी विनोदानं म्हणालं पण तसं अजिबात नसतं.माणसाची इच्छाशक्ती त्याला डोंगराएवढं बळ देत असते. मी हे सगळं इतक्या जवळून बघत होतो.
ब्लॅंक होणं हा एक प्रकार आणि प्रचंड इच्छाशक्तीनं असा डोंगर उचलणं हा दुसरा प्रकार.दोन्ही प्रकारातला माणूस सारखाच.ब्लॅंक होणं आपल्या हातात नाही पण इच्छाशक्ती लाऊन आपलं काम चांगलं करण्याचा ध्यास केव्हाही आपल्या हातातलाच!
माझ्या भूमिकेचं काय झालं? या आधी एक एकांकिका (पहिलीच) केली होती त्यावेळसारखाच अनुभव.माझ्याकडून कुणीतरी करून घेतल्यासारखं माझं काम कुठेही न थांबता पार पडलं.माझी वेशभूषा अगदीच नेहेमीची होती ती जरा ग्लॅमरस हवी होती असं एक मत आलं.त्यासाठी आपण स्वत:ही जागरूक असायला हवं असं वाटून गेलं.मी केलेल्या त्या पहिल्या एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणाला “टेन्शन! टेन्शन! सगळ्या बॉडीत टेन्शन जाणवत होतं! उभा असताना! हालचाली करताना!” ते ऐकल्यावर ’हे टेन्शन आता आणि कसं घालवायचं?’ या विचाराचा भुंगा माझ्या मागे लागला.टेन्शन जाणवत होतं म्हणजे नक्की काय होत होतं?...
योगायोग म्हणा, सगळं जमून येतं म्हणा, अमूक एक पिरियड फेवरेबल असतो म्हणा; स्थानिक पातळीवर मी इथपर्यंत आलो असताना याचंच कंटिन्यूएशन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.मी काम करत असलेल्या कार्यालयात एक चळवळ्या निघाला आणि मी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोचलो.तिथपर्यंत पोचायला कुणा कुणाला कशाकशातून जावं लागत असतं हे मला तेव्हा कधीच जाणवलं नाही…

Tuesday, October 12, 2010

कॉमेडी शो ’मतदारराजा!’

या वेळी मी मनूला लगेच ओळखलं.नेहेमी वेगवेगळी सोंगं काढून मला उल्लू बनवणं हे त्याचं कामच झालं होतं.या वेळी पांढरेधोप कपडे घालून तो दारात उभा राहिला.डोक्यावर गांधीटोपी घातलेला.दोन्ही हात जोडून.मला म्हणाला, “मी उभा आहे!” – “ते दिसतंच आहे!” मी म्हणालो आणि खवचट हसलो.त्याचं ते फवारे उडवून हसणं, जिवणी फा-फाकवणं, वा-वाकून कृत्रिम अभिवादन करणं, तोंडावर दुनियेभरची लाचारी आणणं हे सगळं नसतानाही मी त्याला ओळखलं म्हणून मनातल्या मनात मी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.
तो पुन्हा म्हणाला, “मी उभा आहे!” मी म्हणालो, “च्यायला मग बस की! आज काय पहिल्यांदाच आलाएस?” – “मला वेळ नाहिए बसायला, मी उभा आहे!” तो म्हणाला.मी मनूकडे निरखून बघितलं.अजिबात कुत्सितपणा नव्हता त्याच्या बोलण्यात.मीच जरा तिरकस झालो.म्हणालो, “काय? कुठलं घोडं मारायला जायचंय आज?” मनू आणखी गंभीर झाला.म्हणाला, “राज्या, ही चेष्टेची वेळ नाहिए.बरीच कामं पडलीएत.महापालिकेची निवडणूक लढवणं म्हणजे घोडं मारायला जाणं नव्हे.तुझ्यासारखा सुजाण मतदार जर असा बोलायला लागला-” मी उडालोच! म्हणालो, “थांब! थांब! थांब मनू! काय म्हणालास? तुला तिकीट मिळालं शेवटी? कुणी दिलं? कुणी दिलं सांग मनू? सांग!” सिनेमातल्या बालनटानं हिरोच्या हाताला हिसके मारावेत तसे मी मनूच्या हाताला मारू लागलो.सिनेमातल्या निर्विकार ’मनमोहन कृष्ण’ने डोळे आणखी निर्विकार (?) करत नजर वळवत पुटपुटावं तसं मनू पुटपुटला, “कठीण आहे! या महानगरातली जनता प्रौढ झालीए असं मला वाटत होतं.मनूचे ते डोळे माझ्याकडे वळले आणि मनू बोलू लागला, “अरे कुणाकडून तिकीटं घ्यायची? सगळे राजकिय पक्ष कसे आहेत?” मी उदगारलो, “सगळे एकजात एका माळेचे मणी!” मनू म्हणाला, “आहेत ना? त्यांनी काय भलं केलंय?” माझ्यातला मतदारराजा आता चवताळलाच, “गटारीत टाकलं रे महापालिकेच्या.ते ही अंडरग्राऊंड!” मी म्हणालो.मनूनं विचारलं, “पोरांना खेळायला ग्राऊंड्स आहेत?” मी विचारलं, “अंडरग्राऊंड?” मनू समजूतदारपणे म्हणाला, “नाही रे राजा, प्लेग्राऊंड!” माझ्यातली सद्सद का कसली विवेकबुद्धी आता जागृतच झाली.मी तडफडून म्हणालो, “नाही रे सगळी मैदानं बिल्डर्सच्या घश्यात घातली.हेच नगरसेवक.हेच बांधकामव्यावसायिक.आता आमची पोरं सतत त्या टीव्हीच्या डोक्यावर तरी बसतात किंवा आमच्या तरी!” मनूनं विचारलं, “बरं अत्यावश्यक सेवांचं काय?” मी करवादलो, “अरे सेवा कसल्या? मेवा खायला कुठून कुठून जमा झालीएत सगळी!” मनूनं विचारलं, “कुठून?” मी म्हटलं, “उमेदवारांची यादी बघ यावेळची! अर्ध्याच्या वर परप्रांतीय आहेत! अर्धे उमेदवार पूर्वी असलेल्या नगरसेवकांचे पित्ते आहेत.बायका-मुलं, आया, बहिणी आहेत.जवळजवळ सगळ्यांचं विभागातलं कार्य म्हणजे विभागात रहाणं, तिथेच धंदा करणं, आनंदमेळे भरवणं, वेगवेगळ्या उत्सवांना लोकांकडून देणग्या वसूल करून ते प्रायोजित करणं, झेंडे लावणं, मोठमोठी कामं केली म्हणून बोर्डावर लिहून स्वत:चंच अभिनंदन करणं.त्या बोर्डाला शंभर रूपयांच्या नोटांचा हार घालणं, ’आमचं नेतृत्व’ म्हणून दाखलेबाज चेहेरय़ांच्या पिलावळीनं दादा-भाऊ-साहेबांसकट आपलेही फोटो फ्लेक्सबोर्डांवर झळकवणं, भिंती रंगवणं, हॅंडबिलं वाटणं.हे यांचं सामाजिक काम?” मी मनूलाच लांबलचक प्रश्न विचारला.
मनूनं माझ्या थरथरत्या खांद्याला थोपटलं आणि शांतपणे म्हणाला, “कुणी बदलायचं हे चित्रं?” मी पटकन विचारलं, “कुठलं?” मनू म्हणाला, “अरे असं काय करतोस? हे असं नुसतं बोलून पेटून उठणं सोपं असतं राजा.दर निवडणुकीला असा शाब्दिक पेटून उठतोसच तू.पण तुझ्या हातातच खरी शक्ती आहे बाबा!” मी माझ्या दोन्ही हातांकडे बघायला लागलो! मनू म्हणाला, “हे आहे! प्रत्येक शब्दाचा शब्दश: अर्थ घेतोस तू!” मी गोंधळून मनूकडे बघितलं.त्यानं माझा हात हातात घेऊन पालथा केला.पहिल्या बोटाच्या नखावर दाबत म्हणाला, “इथे फक्त एक शाईचा ठिपका उमटून घ्यायचा.हिच तुझी शक्ती!” मी कळवळून म्हणालो, “अरे नेहेमी उमटवलाय रे! लांबलचक लाईनीत उभं राहून.कुठल्याही पक्षाचा चहा, वडापाव, पुरीभाजी न खाता.आपल्याला हवं तसं सत्याचं राज्य यावं म्हणून.या एकाच हक्कानं आपलं आयुष्य आपल्याला बदलता येईल नाही तर काहीच नाही.फक्त अंधार.एवढी जाणीव ठेऊन.पण भलभलतेच निकाल लागतात रे! वडापाव, पुरीभाजीच काय, दारूसकट सगळंच देणारे निवडून येतात.निवडून आले की आम्हा सामान्य माणसांना ते काय लक्षात ठेवतात? अरय़े महापालिकेसारख्या निवडणुकीच्या निकालाला लगेच चाकू-सुरे निघतात.हे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणार काय रे सभागृहात बसून?” मला पुढे बोलवेचना.मनूच्याही डोळ्यात पाणी तरारलं.आज हे सगळं काही नवीनच होतं.
मनूनंच मला धरून खुर्चीवर बसवलं.शेजारी तो बसला.समजूतदार आवाजात म्हणायला लागला, “राजा, झालं ते झालं.अरे आपण, तू आणि मी मिळूनच हे सगळं बदलू शकतो.फक्त आपला विश्वास पाहिजे.स्वत:वर.एकमेकांवर.आणि विश्वास पाहिजे हे सगळं एक दिवस बदलणारच आहे या गोष्टीवर!” माझ्या खांद्यावर हात दाबत तो म्हणाला, “हे बघ! मी अपक्ष म्हणून उभा रहातोय.स्वखर्चानं.माझी निशाणी आहे आकाश.मोकळं आकाश! तेव्हा तू डोळे पूस आणि मला-” मनूचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच माझा आनंद गगनात मावेनासा झाला.मी हाताची मूठ वर करून जोरात ओरडलो, “ताई माई आक्काऽऽ मोकळ्या आभाळावर-” माझी मूठ वरच राहिली.कुणीतरी घट्टं पकडून ठेवलेली.मी हिसके मारायला लागलो.शेवटी जागा झालो.लोकल ट्रेनमधे होतो.कामावरून घरी परतताना झोप लागली होती.शेजारी बसलेला मनू माझी मूठ धरून उठवत मला म्हणत होता, “अशी स्वप्नं बघायची सोडून द्ये राज्या, नायतर येडा होशील!”
मी खरंच येड्यासारखा मनूच्या चेहेरय़ाकडे बघत राहिलो.मला सत्य काय स्वप्नं काय काहीच समजत नव्हतं!

Sunday, October 10, 2010

नाटक आणि ब्लॅंक होणं…

नाटकाची तालिम करताना शब्दोच्चार कसे हवेत, हावभाव कसे हवेत हे मोठे प्रश्न नवोदितासमोर उभे रहातात.शब्दोच्चार स्वच्छ करणं- विशेषत: प, फ, म, भ ही अक्षरं नीट उच्चारणं आवश्यक आहे.जी अक्षरं, व्यंजनं, शब्दं एरवीच्या बोलण्यात हळूवारपणे उच्चारली जातात ती रंगमंचावरून प्रेक्षकांत नीट ऐकू जातील याची काळजी घेणं आवश्यक आहे.आवाज प्रेक्षागृहाच्या शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू जाईल याचा सराव करणं आवश्यक आहे.चेहेरय़ावरचे भाव थोडे जास्त हवेत अर्थात तेही दोन-चार रांगांच्या पलिकडे दिसत नाहीत.जेश्चर्स- अर्थात हातवारे, मान, डोके यांच्या हालचाली ठळक हव्यात, त्या शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकाला जाणवू शकतील अश्या हव्यात आणि तरीही त्या खरय़ा वाटायला हव्यात.
असं सगळं थिअरी म्हणून जरूर मांडता येतं पण अनुभव असा आहे की नवोदितानं दिग्दर्शकाची जास्तीत जास्त मदत घेणं चांगलं.तुम्ही नाट्यविषयक प्रशिक्षण घेत असाल तर उत्तम.ह्या प्रशिक्षणामुळे तुमचा प्राथमिक तयारीचा खूपसा वेळ वाचतो आणि थेट भूमिकेच्या तयारीवर, तिच्या अभ्यासावर आणि ती अंगात मुरवून घेण्यावर भरपूर वेळ देता येतो.एकदा तुमची भूमिका तुम्हाला 'सापडली' की शब्दोच्चार, हावभाव, हालचाली ह्या त्या भूमिकेतूच येतात.त्या तश्या येणं ही सर्वात योग्य गोष्टं आहे.
तुम्ही रंगमंचावर कसे उभे रहाता.तुम्ही प्रेक्षागृहातल्या कानाकोपरय़ातल्या प्रेक्षकाला दिसता का? वळताना तुम्ही कसे वळता? या नवोदिताला तांत्रिकदृष्ट्या सतावणारय़ा महत्वाच्या गोष्टी असू शकतात.मग आमचे तालिममास्तर-दिग्दर्शक आमच्यावर ओरडायचे, “अरय़े लोक काय तुझं ××× बघायला जमणार आहेत?”
मी नवोदित होतो.प्रशिक्षण नव्हतं.दोन अंकी नाटकात महत्वाची भूमिका करत होतो.नाटक स्थानिक पातळीवर होणार होतं पण ते आमच्या गणेशोत्सवात होतंय याचं मला अप्रूप होतं.
नाटकात विज्ञान श्रेष्ठ की आपल्या आयुष्यात घडणारय़ा अतार्किक गोष्टी श्रेष्ठ असा एक झगडा थोर कलंदर प्रतिभेच्या कवी, कादंबरीकार, नाटककाराने मांडला होता.पांगळ्या झालेल्या मुलाला विज्ञानात बसतील त्याच उपायांनी बरं करायचं असं ठामपणे सांगणारय़ा मुलाच्या बापाच्या भूमिकेत मी होतो.हॉस्पिटलचा डीन, हॉस्पिटलमधल्याच एका दुर्धर रोग झालेल्या पेशंटला मुलाच्या आजोबांचा गेटअप देऊन मुलाला बरं करण्याचा निर्णय घेतो.डीनही खरं तर विज्ञानमार्गी पण एखाद्या लहान मुलाचं आयुष्य उभं करण्याचा उपाय कसलाही असो तो करायचाच या विचारांचा.बाप विज्ञानावर आदर्शवादी विश्वास ठेवणारा तर डीन प्रॅक्टीकल.तेव्हा असा आणखी एक उपसंघर्षही या नाटकात होता.
या नाटककाराची भाषा काही ठिकाणी चांगलीच अलंकारिक.ह्यावर आमच्या दिग्दर्शकाचं म्हणणं नाटककारानं लिहिलेली भाषा जड असेल, अलंकारिक असेल तर अशी वाक्य अत्यंत साधेपणानं बोलावीत.वाक्यातच बरंच काही असल्यावर ती शैलीदारपणे उच्चारणं हे अती होतं, भडक दिसतं, खोटं वाटतं.नाटक हे जरी सगळंच थोडं जास्त करून व्यक्त करायचं माध्यम असलं तरी ते वास्तव वाटलं पाहिजे, खोटं वाटता कामा नये.
“’र’ ला ’ट’ लक्षात ठेऊन, ’आणि’ नंतर ’पाणी’ आहे असं पाठ करून कधीही वाक्यं लक्षात ठेऊ नका!” दिग्दर्शक ओरडायचा.एका रिहर्सलला मला याचा चांगलाच अनुभव आला.नाटकातल्या क्लायमेक्स- परमोच्चबिंदू- असलेला प्रवेश होता.बाप, आजोबांचा गेटअप केलेल्या त्या रूग्णाकडून, आपल्या मुलासमोर, तो आजोबा नसून एक पेशंट आहे हे वदवून घेण्याच्या प्रयत्नात आहे.मुलाचा, हेच आपले आजोबा आहेत यावर ठाम विश्वास.मुलाचं वाक्यं होतं, “पण त्याना कुठे आहेत आजोबा, तुमच्यासारख्या पांढरय़ा पांढरय़ा मिश्या?” त्यावर मी, त्याचा बाप त्या आजोबारूपी रूग्णावर “याच्या या मिश्याऽऽ” असं ओरडत धाऊन जातो.एका रिहर्सलला तो मुलगा ’तुमच्या या पांढरय़ा पांढरय़ा मिश्या’ असं म्हणण्याऐवजी ’तुमच्या या पांढरय़ा मिश्या’ एवढंच म्हणाला.त्या गाळलेल्या एका ’पांढरय़ा’ या शब्दाने मी साफ ब्लॅंक झालो! मला पुढचं आठवेचना! नेहेमी व्यवस्थित होणारा सीन.मी विसरलो कसा याचंच इतरांना आश्चर्य वाटलं.मी साफ थांबलेला बघून इतरांनी प्रॉम्प्ट करायला सुरवात केली पण मी ढिम्म! भानावर यायलाच मला वेळ लागला.” हे काय रे?” असं दिग्दर्शकानं विचारल्यावर मला काही सांगताही येईना.घरी गेल्यावर, झोपेनं असहकार पुकारला.काय नक्की झालंय हे कळायला सकाळ उजाडली! “दुसरय़ाचं वाक्यं नीट ऐका! मग तुमचं बोला- प्रत्येकवेळी!” दिग्दर्शक सारखा सांगत होता तेही आठवत राहिलं.फायनल प्रयोगाला असं झालं तर! या विचाराने माझी झोप त्यानंतरही उडत राहिली.
फायनलच्या प्रयोगात माझं तसं काही झालं नाही पण नंतर प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांत ह्या ’ब्लॅंक’ होण्यानं मला सतावलं.
एका सामाजिक समस्येवरच्या नाटकात संगीताचा तुकडा संपल्यावर नायिकेला मर्दानी हाळी देत मी रंगमंचावर प्रवेश केला आणि काय झालं कुणास ठाऊक? पुढे माझी वाक्यं काय आहेत ते मला आठवेचना.अशावेळी सहकलाकार काय प्रॉम्ट करतो, बॅकस्टेजकडून काय प्रॉम्ट केलं जातंय हेही डोक्यात घुसत नाही असा माझा अनुभव आहे.मग आठवत गेलं तरी सीनचा टेंपो पूर्णपणे ढूऽऽस्स! झालेला असतो.
त्याही आधी एका विनोदी नाटकाच्या कॉन्ट्रॅक्ट शोला एका रिहर्सल न दिलेल्या बुजुर्ग विनोदी नटानं पदरची वाक्यं बोलायला सुरवात केली आणि अस्मादिक पुढचं सगळं विसरले ते विसरलेच.बॅकस्टेजवरून ओरडून दिलं गेलेलं प्रॉम्टिंग प्रेक्षकात पोचलं असावं पण मी काही पुढे सरकलो नाही.शेवटी त्या बुजुर्गालाच आणखी काही पदरची वाक्यं बोलून मला यातून सोडवावं लागलं.एका व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाला एका प्रवेशाआधी बॅकस्टेजवाल्यानं सांगितलं, फोन वाजेलच असं सांगता येत नाही, तो वाजला असं समजून उचला आणि प्रयोग पुढे न्या.मी प्रवेश केला टेलिफोन वाजायची वेळ आली.तो चक्कं वाजला आणि मी ब्लॅंक! सहकलाकाराने पुढे ढकल्यावरच अश्यावेळी पुढे जाता आलं.बरय़ाच वेळा सहकलाकारालाही तुमचं पुढचं वाक्यं काय आहे ते आठवत असतंच असं नाही.प्रचंड गोऽऽची होत असते अश्यावेळी.
एका ’स्मार्ट’ व्यावसायिक नटाला तर म्हणे चक्कं माफी मागून पडदा पाडावा लागला होता- पुढचं काही म्हणता काही आठवत नाही म्हणून!

Thursday, October 7, 2010

कॉमेडी शो “तिकीट”

“मला तिकीट हवंय यार! मला तिकीट हवंय!” सकाळपासून मनू पाचव्यांदा म्हणाला.आज कधी नव्हे ते तो नर्वस दिसत होता.बरोबर मी असतानाही स्वत:शीच बडबडत होता.शेवटी त्याला ’लक्ष्मीविलास’ मधे नेलं.भजी मागवली.चहा मागवला.पैसे अर्थात मीच देणार होतो.मनूनं ताव मारायला सुरवात केली. “तिकीट हवॉय यॉर मॉलॉऽ” हादडतानाही तोंडातलं तिकीट, तिकीट सुटत नव्हतं.
मी समजुतदारपणे विचारलं, “कुठलं तिकीट हवंय मनू तुला?” वेड्यानं मानसोपचारतज्ज्ञाकडे बघावं तसं माझ्याकडे बघून तो पुन्हा शून्यात गेला आणि भजी चावायला लागला.मला त्याची दया आली, विचारलं, “पोस्टाचं तिकीट देऊ? स्टॅंप की रेवेन्यू स्टॅंप देऊ? रेल्वेपासच्या मागे ठेवलेले असतात मी.थांब बघतो हं!” - “यडा आहेस यार तू!” भजी गिळत मनू ओरडला, “काय कळतं काय तुला? मला तिकीट हवंय यार! छ्या: तिकीट! तिकीट! तिकीट हवंय!” चहावाल्या भटाच्या बर्नरच्या आवाजाने माझी लाज राखली नाहीतर लोक जमलेच असते भोवती.बघ्यांना काय हव्याच असतात अश्या गोष्टी.मी समजुतदारपणा सोडला नाही.सामान्य मध्यमवर्गीय असल्यामुळे मी तो सहसा सोडत नाहीच.म्हणालो, “मग बसचं देऊ का? शाळेत असताना दहा पैशाचं तिकीट होतं बसचं.ते पण जपून ठेवलंय.पुढे बरं असतं रे पोरा-नातवंडांना महागाईच्या गोष्टी सांगायला.ते देऊ की कालचं आठ रूपयाचं देऊ?”- “मरू दे रे!” मनू पुन्हा खेकसला.डॉक्टरनं वॉर्डबॉयकडे न बघता बोलावं तसं तो म्हणाला, “तुझं म्हणजे नं-” आणि पुन्हा तो शून्यात गेला. “तिकीट हवंय! तिकीट हवंय यार!” हे चालूच होतं.
मी आज समजुतदारपणाची एक एक पायरी चढायचं ठरवलंच होतं.पुन्हा विचारलं, “का रेल्वेची देऊ तिकीटं? पोरानं जमवलीएत खूप! दहा-पंधरा वर्षांपूर्वी हनिमूनला गेलो होतो, ऑफिसमधून पैसे उचलून, ती सुद्धा आहेत तिकीटं जपून ठेवलेली.म्हटलं पुन्हा कधी लांबच्या ठिकाणी जायला जमणार नाही.नुसतं तिकीट बघून समाधान तरी मिळेल.ती देऊ? का पासच देऊ जुना? गेल्या महिन्याचा? तो पण असतो माझ्याकडे.नाही तर असं करतो, कुपन्स काढलीएत बघ रेल्वेनं! दिसायला आणि वापरायला साधी.सोपी.मशिनमधे घालायची.एका स्टेशनवरचं पाचापैकी एक तरी मशिन कधी कधी चालू असतंच बघ.ती देऊ?” आता मनूनं नुसतंच माझ्याकडे बघितलं.कीव, राग संताप, किळस असे अनेक भाव त्याच्या चेहेरय़ावर आले आणि गेले. “हूंऽऽ” असा आवाज काढून तो पुन्हा शून्यात गेला.
मी त्याच्यापुढ्यातला भरलेला चहाचा ग्लास त्याच्या आणखी जवळ सरकवला.मला मनूकडे बघवत नव्हतं.त्याच्या डोक्यात सॉलिड कुरतडत असावं.मला त्याची आणखी काळजी वाटायला लागली.समोरचा चहाचा भरलेला ग्लास तोंडावर बसेल हा धोका पत्करूनही मी आणखी समजुतदार झालो.म्हणालो, “नायतर असं करू का मनू, माझ्या बायकोच्या आतेभावाच्या मावसबहिणीचा चुलत मेव्हणा कलमाडींच्या ऑफिसात आहे, त्याच्या ओळखीने सवलतीत किंवा कदाचित फुकटसुद्धा कॉमनवेल्थचं चालू तिकीट मिळेल.जातोस? त्वरा करावी लागेल.पुढचं बांधकाम कोसळायच्या आत आणि भारताला पदकं मिळणं बंद व्हायच्या आत जावं लागेल! जातोस? –म्हणजे आपण प्रयत्न करायचे.उद्या आणखी पदकं मिळाली की कलमाडी त्याचं श्रेय स्वत: लाटणार किंवा पदकं बंद झाल्यावर राष्ट्रप्रेमाचं काय करायचं असा नवीन प्रश्न निर्माण होणार आणि तेव्हा तिकीट मिळणार नाही! मग काय करू? की थांबूया पुढच्या ऑस्ट्रेलियाबरोबरच्या टेस्टपर्यंत? की पुढच्या आयपीएल पर्यंत थांबायचं? की ट्वेंटीं ट्वेंटीपर्यंत थांबायचं? की एकदम वर्ल्डकपचं हवंय तुला तिकीट?” माझ्या मनूविषयीच्या काळजीने पोटतिडीकीची कमाल मर्यादा ओलांडली होती.मी काय काय करणार होतो माझं मलाच कळत नव्हतं.मनूनं आता गरागरा डोळे फिरवले, खेकसला, “तुज्यायलाऽऽ गप बसायला काय घेशील?” आणि मनूनं चहाचा ग्लास गटागटा घशात रिकामा केला.सिनेमातल्या गममधे असलेल्या हिरोनं रमचा रिकामा करावा तसा.मी गप बसून चहाचा एक एक घोट घेऊ लागलो. “तिकीट हवंय यार! तिकीट हवंय! मला!” मनू पुन्हा संतापाने पुटपुटला.उठला.लक्ष्मीविलास हॉटेलमधून चालू पडला.कसेबसे पैसे देऊन मीही त्याच्यामागे कल्टी खाल्ली आणि माझी ट्यूब पेटली, “मनू तुला निवडणुकीचं तिकीट हवंय का?ऽऽ”
माझ्याकडे कुत्सितपणे बघत, संतापाने लाल होत, डोळे फिरवत त्याने विचारलं, “तू देणार? तू काय स्वत:ला मैद्याचं पोतं समजतोस? का वाघ समजतोस? की वाघाचा छावा? की छाव्याचा चुलतभाऊ? की वाघाच्या गुहेत गुदमरून झाल्यावर घड्याळाच्या गुहेत येऊन गुदमरणारा निळा कोल्हा? की जन्मानं परदेशी आहेस तू? आणिऽऽ ते तिकीट घ्यायला मी काय कुणा मंत्र्याचा, खासदाराचा, आमदाराचा नातेवाईक आहे की लोंबत्या आहे? की आरक्षित वॉर्डमधे उभं रहायला मी स्त्री आहे की रिझर्व कोट्यातला आहे? माझ्याकडे रग्गड पैसा आहे? मी इंडस्ट्रियालिस्ट आहे? अनेकांनी टेकू देऊन उभा केलेला दलित नेता वाटलो काय मी तुला?ऽऽ तू तिकीट देणार आणि मी घेणार!” असं म्हणून मनू भर रस्त्यात डोक्यावर परिणाम झाल्यासारखा हसायला लागला.
माझ्या सहनशक्तीचा, समंजसपणाचा कडेलोट झाला आणि मी रस्त्यातच थयथय नाचत त्याला विचारलं, “अरे मग तुला हवंय तरी कसलं तिकीट?”
मनू म्हणाला, “हां!... मला हवंय तिकीट भरपूर पैसे मिळवून देणारं! खून केले तरी ते पचवून टाकणारं! मला हवी असलेली कुठलीही बाई देऊन टाकणारं! मला हवंय तिकीट शत्रूशी मैत्री आणि मित्राशी शत्रुत्व केलं असं लोकांना भासवणारं!- मला हवंय-” मनू नटसम्राट नाटकातला म्हातारा झाला होता.मी काय करणार होतो? दिवेलागण झाली होती.घरी मुलाला शुभंकरोती शिकवायची होती.मी घरचा रस्ता पकडला.

मित्रांनो! चार ई-बुक्स प्रकाशित झाली!!!

मित्रांनो! माझी संघटन, आवर्त, पुलाखालून बरंच (तीनही नाटकं) , मी झाड संध्याकाळ (कवितासंग्रह), अशी चार ई-बुक्स नुकतीच प्रकाशित झाली आहेत साहित्यसंपदा डॉट कॉम या साईटवर! साहित्यसंपदा डॉट कॉम ही Fuzzysoft Software, Aurangabad यांची साईट आहे.तिला भेट दिल्यावर ही पुस्तके बघायला, वाचायला, खरेदी करायला ...मिळतील! भेट द्या आणि प्रतिक्रियाही! लिंक आहे: http://www.sahityasampada.com/index.jsp

Tuesday, October 5, 2010

नाटकातले धडे

नाटक करताना पहिला धडा शिकलो उच्चारणाचा.आज अनेक विद्यापीठांमधे नाट्यशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे.नाटक आणि पर्यायाने मालिका, चित्रपट यात करियर करू शकतो हे आजच्या तरूणाला ठरवता येतं आणि निश्चित धोरण आखून यश मिळवता येतं.त्यावेळी नाट्यशिक्षणाबद्दल तेवढा अवेअरनेस नव्हता.दिल्लीची राष्ट्रीय नाट्य शाळा सामान्य मुलापासून सगळ्याच अर्थाने दूर होती.आधीच्या पिढीतले आणि बरोबरीचेही पडत धडपडत शिकत होते.आपली जागा तयार करत होते.नाटक आणि पर्यायाने येणारय़ा करियर्स असू शकतात यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती.पुष्कळसे नोकरीचा किनारा पकडून नाटकात पोहायला बघणारे.जे मोजके यात त्यावेळीही पूर्णवेळ झोकून देत होते.त्यांना हॅट्स ऑफ! त्यातल्या काहींनी आपली जागा नक्कीच निर्माण केली.काहींनी जम बसताच नोकरीच्या किनारय़ाला बाय बाय केलं.
नाटक करत असतानाचं शिकणं खरं शिकणं आहे असा जोरदार मतप्रवाह त्यावेळी होता.
मी करत असलेल्या नाटकाच्या तालमींमधे उच्चारणाचे धडे घेत होतो.नाटक मराठीतल्या विलक्षण उत्स्फूर्त प्रतिभा असलेल्या कलंदर कवी, कादंबरीकार, नाटककाराचं होतं.शब्दरचना मोहक.अलंकारिक.लक्षात ठेवायला अवघड.दिग्दर्शक स्वत: चित्रकार, गाणारा, साहित्यप्रेमी त्यानं सगळ्याच पात्रांच्या उच्चारणावर जाणिवपूर्वक मेहेनत घेतली.एका आंतरकार्यालयीन नाट्यस्पर्धेत त्याला हे नाटक बघायला मिळालं.आवडलं. ’स्वीकार’ या शब्दाचा उच्चार नेमका कसा करायचा?... र्हस्वदीर्घ आजपर्यंत शाळेत नुसतं शिकलो होतो.या दिग्दर्शकानं ते नेमकं काय असतं ते सांगितलं.
सुरवातीला वाक्यं हातात आलेली नसताना मी जास्त वेगानं वाक्य बोलत असे.नंतरही बराच काळ या दोषानं सतावलं.वाक्य पाठ नसताना आत्मविश्वास कमी असतो मग उरकून टाकण्याच्या सहज प्रवृत्तीने वाक्य बोलण्याचा वेग नकळत वाढतो असं माझ्या लक्षात आलं.
या नाटकात पाय लुळ्या पडलेल्या मुलाचा विज्ञाननिष्ठ बाप त्याला अवैज्ञानिक वाटणारे उपाय हॉस्पिटलचा डीन अवलंबतोय हे पाहून बरय़ाच प्रसंगात चिडत असतो.वाद घालत असतो.चिडलेल्या स्वरातली वाक्य बोलताना माझा बोलण्याचा वेग वाढायचा.वाक्यांमधून भावना जाणवायला हव्यात पण भावनेच्या भाराखाली वाक्यातले शब्दच प्रेक्षकांना ऐकू आले नाहीत असं होता कामा नये.
वाक्याचा योग्य अर्थ पोचवण्यासाठी वाक्यांमधल्या कुठल्या शब्दावर योग्य जोर द्यायचा.असा योग्य जोर दिल्यामुळे वाक्याच्या शेवटी येणारे हेल कसे काढून टाकता येतात, वाक्यांचा अर्थ समजून ती कशी बोलायची याचा प्राथमिक पाठ या दिग्दर्शकाकडे गिरवला गेला.
या नाटकात मी माझ्या त्यावेळच्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका बापाची भूमिका करत होतो.लहान-मोठी स्वगतं या भूमिकेत होती.दिग्दर्शकानं या स्वगतांची वेगळी तालिम माझ्याकडून करून घेतली.प्रत्येक स्वगत नाटकात केव्हा आहे, त्यावेळचा भाव काय?... इतकं समोरून येत होतं, त्यातलं किती माझ्या त्यावेळच्या बुद्धित शिरत होतं, कुणास ठाऊक? पाया मात्र तयार होत होता.पुढे प्रत्येक दिग्दर्शकानं या गोष्टींवर जोर दिलाच.
सेट, लाईट्स, सेटवरच्या इतर वस्तू- ज्यांना प्रॉपर्टी म्हटलं जातं या सगळ्याची जमवाजमव सुरू झाली आणि मीही त्यात रूजू झालो.दिग्दर्शक कमर्शियल आर्टिस्ट आणि नाटकाचा नेपथ्यकारही.सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्याच्या पद्धतीने समजावून सांगणारा.विनोद करणारा.गोष्टीवेल्हाळ.चांगला संघटक.संघटन करणं आणि त्या संघाचं नेतृत्व करू शकणं हे दिग्दर्शकामधे आवश्यक असे मूलभूत गुण.हे या दिग्दर्शकामधे आणि या आधीच्या दिग्दर्शकामधेही चांगलेच जाणवले.त्यानंतर आपल्याला हवं असलेलं समोरच्याकडून काढून घेणं हा आवश्यक गुण.भूमिका समजवत असताना प्रसंगी ती करून दाखवण्याचीही तयारी त्याच्यामधे हवी.दिग्दर्शकाला नाटकातलं सगळंच यायला हवं.त्यासाठी इतर कला, वाचन, समज हे सगळं हवंच.
सेटचे तराफे, लाईटचे स्पॉट्स, डीमर्स ओळखीतून कुठून कुठून जमवायचे. लोकलट्रेनमधे, ट्रकमधे घालून आणायचे.दिग्दर्शकाच्या ओळखी खूप.नाटक गणेशोत्सवात होणार होतं.दिग्दर्शक स्वत: गणपतीचं डेकोरेशनही करत होता.शिवाय नाटकात डीनची महत्वाची भूमिकाही.एका वेळी एका माणसानं किती कामं करावी? तो इतका बिझी की नंतर नंतर आमच्या दोघांचे सीन्स, इतर कामं करताना, लोकल ट्रेन्समधून जाता येताना आम्हाला बोलून घ्यावे लागायचे.त्यात नाटकात पेशंटचीमहत्वाची भूमिका करणारा आमचा एक मित्र चांगलाच आजारी पडला.अंथरूणातून उठता येत नाही, ताप उतरता उतरत नाही अशी परिस्थिती…
नाटकात शेवटी काय होतं?... आजोबांचं रूप घेतलेला तो रूग्ण आजोबांची भूमिका इतकी बेमालूम वठवतो की पांगळ्या लहान मुलाला तो आजोबा वाटायला तर लागतोच पण रुग्णाला आपल्या दुर्धर आजाराचा विसर पडतो.त्याही पुढे रूग्णाला आजोबाचा आत्मा आपल्या शरीरात शिरून सगळं करून घेतोय असं वाटायला लागतं.तो आजोबा आणि मुलाच्या आयुष्यातले, त्या दोघांनाच माहित असलेले संदर्भ इतके अचूक सांगतो की मुलाची आई आश्चर्यचकीत होते.बापाकडे हे कसं यावर उत्तर नसतं.त्याचा राग आणि सगळ्या प्रकाराबद्दलची घृणा वाढायला लागते.बाप रूग्णावर फसवणुकीचा आरोप करतो.विज्ञान हेच एकमेव सत्य यावर तो कर्मठपणे ठाम आहे.बाप शेवटी मुलासमोर या आजोबांचं खरं स्वरूप उघडं करायला त्यांच्या अंगावर धावून जातो.आजोबाना ते सहन होत नाही.ते तिथून निघतात.मुलगा त्याना अडवायला धावतो… मुलाचे पाय त्याला परत मिळालेले आहेत…

Monday, October 4, 2010

कॉमेडी शो “सहकारी पतपेढी अमर्यादित!”

असं काही असलं की मनू सर्वात आधी माझ्याकडे येतो.आधी न हसता म्हणतो, “तू मला लकी आहेस रे! तुझ्यापासून सुरवात म्हणजे माझी भरभराट!” मग जिवणी फाकवून हसत म्हणतो, “अतिशय साधा आहेस रे तू! सुरवात तुझ्यापासूनच!” अतिशय साधा म्हणजे मनूच्या भाषेत बावळट हे मला पक्कं माहित असतं पण प्रत्येक वेळी तो डाव साधतोच.या वेळीही अतिशय साधा म्हणून त्याने एका अर्जावर माझी सही घेतलीच.
मनूच्या पुढाकाराने गल्लीत सहकारी पतपेढी चालू करायचं ठरलं.ठरलं म्हणजे काय मनूनंच ठरवलं.रोजच्या झकाझकीत असली झेंगटं करायला वेळ कुणाला आहे? असं मी मनातल्या मनात म्हणालो पण मनू मनकवडा आहे.त्यानं माझ्या डोक्यात टप्पल मारली आणि म्हणाला, “झेंगट! पतपेढीला, या सहकारी पतपेढीला झेंगट म्हणतोस?” अशी सुरवात करून मला जांभई येऊन माझी मान सारखी कलायला लागेपर्यंत भलमोठं लेक्चर दिलं.सहकारी चळवळीबद्दलचं.मनूचं बोलणं सुरू झालं की घड्याळाचे काटेही संथ होतात.मला पूर्णपणे पिळल्याशिवाय तो थांबत नाही.फारच थोड्या काळात तो सहकार महर्षी होणार याबद्दल माझ्या काय, गल्लीतल्या कुणाच्याच मनात आता संदेह राहिला नाही.मी सही केल्यावर प्रत्येकानं त्या पतपेढीच्या अर्जावर सही केली.
’चळवळ सहकारी पतपेढी मर्यादित’ असं डॅशिंग नाव मनूनं शोधून काढलं आणि एका बुजुर्ग गल्लेकरय़ाच्या हातून मुहुर्ताचा नारळ फुटला.पटापट प्रत्येकानं खातं उघडलं.मनू पैसे मोजत राहिला.सहा महिने झाले आणि मनूनं प्रत्येक खात्यावर व्याज तर दिलंच पण आम्हा प्रत्येकाला बोलावून, आहेर देतात तसं, एक हात पुसायचा टॉवेल आणि बॉलपेनही दिलं.आम्हा सभासद मंडळींचा आनंद गगनात मावेना.अजूनही आम्ही त्याच टॉवेलनं हात पुसतो.बॉलपेनं आम्ही तेव्हाच शोकेसमधे ठेवली.
वर्षं झालं तेव्हा मनूनं गांधी जयंतीला स्थानिक नगरसेवकाच्या हस्ते सत्यनारायण पूजा घातली.दोन वर्षं झाली तेव्हा विनोबा जयंतीला गृहराज्यमंत्री आणि तीन वर्षं झाली तेव्हा जयप्रकाश नारायण जयंतीला डायरेक्ट महसूल मंत्र्यांनाच बोलावलं.एव्हाना चांगला महसूल गोळा झाल्यामुळं ’चळवळ’चं आणि मनूचं दोघांचंही चांगलंच नाव झालं होतं.
मनू सरकारदरबारी मांडीला मांडी लावून बसायला लागला.त्याच्याबरोबर चार्टर्ड अकाऊंटंट्सचं एक आख्खं पथक असायच.सभासद पतपेढीला खजिना समजायला लागले.व्याजाची मलई खाऊन शांत झोप लागत होती.बाकी झकाझकीचं सगळं मनू बघत होता.सभासदांनी सगळे अधिकार मनूच्या हातात दिले.मनू बोले आणि ’चळवळ’ हाले अशी परिस्थिती होती.
मग मनूनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.’फायनान्स अनलिमिटेड’ नावाची आणखी एक कंपनी काढली.लोकांना घरासाठी कर्ज देणारी.गल्लीतले आम्ही घरात रहातच होतो.कुठल्याही माईच्या लालमधे नवीन जागा घेण्यासाठी ताकद कुठून येणार? कर्ज घेतलं तरी ते फेडावंच लागणार.सामान्य असल्यामुळे आम्हाला ते फेडल्याशिवाय चैन पडणार नाही.मग घ्याच कशाला ते! गल्लीतल्या लोकांसाठी स्थापन झालेल्या पतपेढीतले पैसे या नवीन कंपनीत फिरवले जावेत ही मनूची आयडिया.त्याचा आम्हाला काय फायदा होणार होता? भाजीवाल्याशी एक-दोन रूपयांसाठी घासाघाशी करणारे आम्ही, आमची पतपेढी मनूच्या घशात सारून रिकामे झाले होतो.एवढ्या तेवढ्यावरून एकमेकाशी अरे ला कारे करणारय़ा एकाही शहाण्याने या व्यवहारात काही गैर आहे असं म्हटलंच नाही.मनू तोपर्यंत एका मजबूत राजकारणी पक्षाच्या कमिटीमधे जाऊन बसला.
एके दिवशी अचानक पतपेढीत मरणाची गर्दी झाली.ती बघितल्यावर मग आमची धावाधाव सुरू झाली.लोक पटापट पैसे काढून घेण्याच्या खटपटीत होते.कुणी कुणाला काय झालंय ते सांगत नव्हता.’माझे’ पैसे मिळाल्याशी मतलब.पतपेढी बुडणार हे आता गुपित राहिलं नाही.’कुणाचेही पैसे बुडणार नाहीत’ असा फलक पतपेढीच्या दारात लागला आणि आम्हाला कळलं पतपेढी बुडाली.
एक मात्र झालं.कधी नाही ते आमच्या गल्लीचं नाव पेपरात आलं.कधी नाही ते मनूचा घारय़ा डोळ्याचा, दाढी वाढवलेला फोटो पेपरच्या पहिल्या पानावर झळकला.मनूच्या कारकिर्दीतली ही केवढी मोठी अचिव्हमेंट.जेमतेम गल्लीला माहीत होता तो तो एकदम दिल्लीपासून जागतिक बॅंकेपर्यंत सगळ्याना माहिती झाला.पतपेढी बुडवण्यासाठी त्याने नक्की काय केलं ते आमच्या कुणाच्या नक्की ध्यानात आलं नाही पण त्यानं आमचे पैसे खाल्ले.आम्ही दिवसरात्र डोक्याला हात लावून बसू लागलो.चुकून झोप लागली तर दचकून जागे होऊन आपापसात चर्चा तेवढ्या करत राहिलो.आमच्या हातात आणखी काय होतं? मनूच्या हातात बेड्या पडाव्यात असं मात्र मनापासून वाटत होतं.मनूविरूद्ध साक्ष द्यायला सांगितली असती तर प्रत्येकानं तोंडात मिठाची गुळणी धरली असती.पैसेही नकोत आणि कोर्टाची पायरही चढायला नको!
सगळीकडे बभाल झाल्यावर नाईलाजाने विरूद्ध पक्षाने आमच्या या पतपेढीचा प्रॉब्लेम ताणून धरला.सत्तारूढ पक्षाला नाईलाजाने कृती करणं भाग पडलं.मोठ्या थाटामाटात मनूच्या अटकेचं नाटक पार पडलं.मनूच्या समर्थकांनी यावेळी वाटेत येईल त्याला वार्ताहर, प्रेस फोटोग्राफरपासून रस्त्यावरचा भाजीवाला आणि कामावर चाललेल्या आमच्या गल्लीतल्याच काही जणांना यथेच्छ बुकललं आणि मनूवरची आपली निष्ठा प्रकट केली.
त्यानंतर मग नाटकाचे इतर प्रवेश सुरू झाले.अटकपूर्व जामीन, मनूला प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमधे भरती करणं, मग दोन वर्षांनी खटल्याची तारीख पडणं, साक्षीदारांच्या साक्षी, त्यांचं उलटणं, सत्तारूढ आणि विरोधी यांची ’तू मार मी रडल्यासारखं करतो’ अशी लुटुपुटुची युद्धे, सहकारक्षेत्र बजबजलेले आहे काय? यावर मान्यवरांचे परिसंवाद.आम्ही त्यात इतके गुंतून गेलो की आपले पैसे आता काशीत गेलेत याचं भानही राहिलं नाही.
यथावकाश मनूची ’निर्दोष’ सुटका झाली तेव्हा आमचेच काही गल्लीकर त्याच्या स्वागताला गेले.
आता मनू बाजूच्याच गल्लीत नवी पतपेढी उघडणार आहे.
तो आला की तुम्ही नक्की अर्ज भरणार याची मला खात्री आहे.
पतपेढ्या मर्यादित असल्या तरी आपला त्यांच्यावरचा विश्वास अमर्यादित आहे हे नक्की!

Saturday, October 2, 2010

नाटकं न कळणारी/कळणारी आणि नाटकात गुंतत जाणं…

नाटक हे दृष्यांचं माध्यम आहे.ही दृष्यं जर परिणामकारक असतील तर न कळणारी नाटकंही आपल्याला खिळवून ठेवू शकतात.ती संपेपर्यंत आपण दाखवलेल्या दृष्यांमधे चांगलेच गुंतून रहातो.
चित्रकला, नृत्य या एकट्याने सादर करण्याच्या कला आहेत.बरय़ाचवेळा चित्रप्रदर्शनं, नृत्याचे कार्यक्रम बघताना ते कळतात असं होत नाही.या कला अप्रत्यक्षपणे काही सांगतात.जाणिवेपेक्षा नेणिवेच्या पातळीवर त्या काही सांगतात.बघितल्यानंतर आपल्याला नक्की काय कळलं हे आपण सांगू शकत नाही.पण आपल्याला काहीतरी निश्चित असं भावलेलं असतं.
नाटकातही सबटेक्स्ट आणि बिट्विन द लाईन्स असं काही सांगितलं जातं.हे पूर्णपणे समजणारय़ावर अवलंबून रहातं.ते कळतं किंवा कळत नाही.कळणारय़ा प्रत्येकाला ते वेगवेगळ्या अर्थाने कळलेलं असतं.
लेखक एक नाटक लिहितो आणि बघणारे ते बघत असताना आपापल्या मनात वेगवेगळं नाटक बघत असतात.सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी दिल्लीच्या श्रीराम सेंटरमधे दिलेल्या व्याख्यानांमधे याचं खूप सुंदर विवेचन दिलेलं आहे…
अभिनेत्याला चॉईस असतोच असं नाही.नवोदित असताना बरय़ाचदा तो नसतोच.आपण करत असलेलं काम शिकणं महत्वाचं असतं.त्याचा सराव होणं महत्वाचं असतं.आपण काम करतोय हे क्षेत्रातल्या दिग्दर्शकांना समजावं म्हणून कामं करत रहावी लागतात.पर्यायानं आणखी चांगली कामं मिळावीत आणि आणखी काही शिकायला मिळावं हा हेतू असतो.
मी नवोदित असताना माझ्यापुढे संधी येत गेल्या.मागे म्हटल्याप्रमाणे या क्षेत्रात काही करून दाखवायचंय असं धोरण अर्थातच नव्हतं.माझ्यासारखी बरीच मुलं होती.प्रत्यक्ष रंगमंचावर काही करायला मिळतंय हा आनंद होता.त्यात नेहेमीच्या बघण्यातलं नसलेलं काही करतोय याचं अप्रूप होतं.माझं वाक्य नसतानाही मी एकांकिकेत एकाग्र असतो अशी एक कॉमेंट एका तश्या न कळणारय़ा एकांकिकेच्या तालमीनंतर मला मिळाली.याचा अर्थ मी त्या एकांकिकेत समरस झालो होतो.
पहिली एकांकिका केली ती स्थानिक पातळीवर सादर झाली.शाळेचे माजी विद्यार्थी हे तिचे प्रेक्षक.यातून पुढे आणखी काही होईल असं मला वाटलं नव्हतं.पण ती बघून एका स्थानिक बुजुर्गानं मला एका मोठ्या नाटकाविषयी विचारलं आणि मी तीन ताड उडालो! हे नाटक तो येणारय़ा गणेशोत्सवासाठी बसवणार होता आणि त्या नाटकातल्या मुख्य भूमिकांपैकी एक भूमिका मला करायची होती.ज्यांची गणेशोत्सवातली नाटकं बघून वाढलो त्यातल्या एकाबरोबर गणेशोत्सवाच्या रंगमंचावर काम करायला मिळणार! माझं एक न बघितलेलं स्वप्नं साकार होणार होतं!
एक लहान मुलगा.बिचारय़ाचे पाय लुळे.त्याला त्याच्या आजोबांचा खूप लळा.एका हॉस्पिटलमधे मुलाच्या पायावर ट्रीटमेंट चालू होते आणि त्याचवेळी आजोबांचं निधन होतं.हॉस्पिटलचे डीन म्हणतात, “मुलाला आजोबा गेल्याचं कळलं तर त्या धक्क्याने तो आयुष्यात पुढे कधीच चालू शकणार नाही!”
त्याच हॉस्पिटलमधे कॅन्सरचा एक पेशंट.काही दिवसांचा सोबती.योगायोग म्हणजे हा पेशंट तरूण पण दिसायला अगदी त्या मुलाच्या आजोबांसारखा.मुलगा सारखा ’आजोबा मला भेटायला का येत नाहीएत?’ असा घोषा लावून बसलेला.डीन त्या पेशंटला आजोबा बनवून मुलाच्या समोर नेण्याचं ठरवतात.
मुलाचा बाप या सगळ्या प्रकाराच्या विरूद्ध.विज्ञाननिष्ठ.आपल्या मुलाला खरं काय ते सांगून टाकावंच या मताचा.डीनला फोर्स करणारा.डीनसारख्याने असं करणं म्हणजे गुन्हा आहे असं त्याचं ठाम मत.बाप एखाद्या खलनायकासारखा.एक संघर्ष उभा ठाकतो.
दिग्दर्शकानं बापाच्या भूमिकेसाठी मला निवडलं.मला सर्वप्रथम त्याने नाटकाची सगळी गोष्टं समजाऊन सांगितली.माझी भूमिका सांगितली.माझ्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा असलेला त्या मुलाचा बाप साकारायचा या विचाराने मी अवघडून गेलो.मी सांगतो, तू कर- दिग्दर्शकानं सांगितलं.मी तयार होतोच.
कोणीही आपली भाषणं घोकायची नाहीत.तो सांगत होता.आपण उभे आहोत त्या जागेचं अवधान ठेवणं महत्वाचं.त्या अवधानानं वाक्य लक्षात ठेवायची.आपण कुठे आहोत, तिथे कुठलं वाक्य बोललो, कुठे गेलो, इथून तिथे जाताना कोणतं वाक्यं बोललो, पोहोचल्यावर कुठलं वाक्य अशी हालचालींप्रमाणे वाक्यं लक्षात ठेवायची.मला वेगळा अनुभव आला.दोन-चार रिहर्सलमधे मुवमेंट्स लक्षातही न ठेवता माझी भूमिका पाठ झाली.मला आश्चर्य वाटलं.
रोज वेळेवर रिहर्सलला हजर रहायचं.कलाकारांचे सीन्सप्रमाणे ग्रुप्स केले जातील.ज्याला त्याला ज्या त्या दिवशी हजर रहाता येईल.ज्याला सगळ्या रिहर्सल्सना उपस्थित रहावंसं वाटेल त्याने रहावं.सगळ्यांनी शक्यतो सगळ्याच रिहर्सल्सना हजर रहावं.दिग्दर्शकाला सगळं विस्तारानं सांगायची सवय होती.मी सगळ्याच रिहर्सल्सनाच उपस्थित राहू लागलो.मी ज्यात नव्हतो ते सीन्स बसवत असताना निरीक्षण करू लागलो.व्यवस्थित आणि काटेकोरपणे रिहर्सल्स चालू झाल्या.दिग्दर्शक स्वत:च नेपथ्यकार होता.तो कमर्शियल आर्टिस्ट होता.एरवी रंगमंचावर मांडलेलं घर किंवा घरातला हॉल आपल्याला नैसर्गिक वाटतो.त्यामागे नेपथ्यकारानं काय विचार केलेला असतो हे पहिल्यांदा समजलं.एक अतिशय महत्वाची गोष्टं शिकलो.ते म्हणजे शब्दांचं उच्चारण.उच्चारणाचे धडे मी पहिल्यांदा या दिग्दर्शकाकडे शिकलो.पुढे प्रत्येक दिग्दर्शकाने या उच्चारणाच्या धड्यांवरच जोर दिला…

Friday, October 1, 2010

न कळणारी नाटकं…

प्रत्येक माणूस शंभर टक्के प्रेक्षक असतो.नवोदित म्हणून या माध्यमात सुरवात करताना हाच प्रेक्षक नाट्यकर्मी म्हणून घडू लागतो.सुरवात करणारय़ा या प्रेक्षकाला आपण जे नाटक करतो आहोत ते कळतंय का? आवडतंय का? हे समजलं तर चांगलं.बरय़ाच वेळा समोर आलेलं काम करणं हेच आपल्या हातात असतं.नवोदितालाच काय कित्येक वेळा अनुभवी माणसाला चॉईस असत नाही.
कळणं हे मी इथे रूढार्थानं म्हणतोय.रंगमंचावर काय चाललं आहे हे प्रेक्षक म्हणून कळतंय का? नाटक सहज कळण्यासारखं असू नये का? एखादी गहन गोष्टं सोपी करून सांगावी की ती आणखी अवघड करून सांगावी? मुद्दाम एखादी गोष्टं अवघड किंवा अनाकलनीय, समजायला बोजड करण्याचं कारण काय?
अनेक नवोदितांप्रमाणे त्यावेळी मला हे प्रश्न पडले.फक्त हे प्रश्न आता इतक्या वर्षांनंतर मी हे लिहित असताना मांडू शकतोय.तेव्हा ते जाणवत नक्की होते.
मला पहिली एकांकिका मिळाली त्यात मृत्यू संदर्भातलं काही लेखकाला सांगायचं होतं.लेखक हाच दिग्दर्शक होता.अभिनेत्याला रंगमंचावर काही करायला मिळालं तर नुसता आनंदच असतो.रंगमंचावर येणं हे प्रलोभन नक्कीच आहे.वाक्यं चांगली असली, ती बोलताना मजा आली, सांगितलेल्या कृती वेगळ्या असल्या, या कृतींमधून कुठल्याही वस्तूंचा आधार न घेता काही दाखवण्याचं आव्हान असलं तर अभिनेता या व्यापात गुंतून जातो.पण या सगळ्यातून नक्की काय सांगितलं जातं आहे? हा प्रश्न पिच्छा पुरवतो.
पुढचे प्रश्न असे असतात की नाटकातून जे सांगितलं जातं ते चमच्याने भरवणं अश्या स्वरूपाचं असावं का? प्रेक्षकांची नाटकातून नुसती करमणूक व्हावी की उदबोधन व्हावं? नाटक बघून झाल्यानंतरही ते नाटक प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत रहावं का? प्रेक्षकांनी नाटक बघितल्यानंतर अस्वस्थं व्हावं का? हे अस्वस्थ होणं नुसतच असावं की त्यातून काही कृती करण्यासाठी एखाद्यानं प्रवृत्त व्हावं?
या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे.त्यांची उत्तरं एकसारखी नाहीत.वेगवेगळे मतप्रवाह या प्रश्नांच्या उत्तरांसंबंधात आहेत.
मी नवीन होतो.पहिल्या एकांकिकेत मृत्यूबद्दल लेखक-दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचंय ते मला समजलं नाही.याच लेखक-दिग्दर्शकाचं पूर्ण लांबीचं नाटक मला पहायला मिळालं.जहाजाचा कप्तान आणि रंगमंचावर न दिसणारा देवमासा हा संघर्ष मला समजला.पटला.आवडला.देवमासा म्हणजे नियतीचं रूप असेल हे त्यावेळी कळलं नाही.या नाटकातल्या भावना माझ्या जवळच्या होत्या.यातली माणसं मला माहित असल्यासारखी बोलत वागत होती, भावना व्यक्तं करत होती.हे नाटक रंजक होतं.यातले देखावे, पेहेराव, रंगभूषा आकर्षक होती.तरीही हे नाटक मी त्यावेळी पहात असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं!
यानंतर एका वेगळ्य़ा दिग्दर्शकाकडे मी एक प्रायोगिक एकांकिका केली.माझा पहिला मेन रोल म्हणून मी अत्यंत खूष झालो होतो.एकांकिका त्यावेळी स्पर्धांमधून गाजली होती.ही एकांकिकाच काय तर ही एकांकिका लिहिणारय़ा त्या प्राध्यापक लेखकाची अनेक नाटकं त्यावेळी राज्यनाट्यस्पर्धेत गाजत होती.
एकांकिकेत दोन पात्रं.एक सामान्य पण त्याच्या बोलण्यावरून बुद्धिमान असेल असं वाटणारा माणूस आणि एक विदूषक.त्यांचे संवाद.प्रश्नोत्तरं.नायक कुठलं तरी द्वार उघडण्याच्या मिशनमधे आहे पण आधी ते कुठे आहे ते त्याला समजत नाही.विदूषकाद्वारे त्याचा पत्ता लागल्यावर तो ते उघडण्याचा प्रयत्न करतो.झटतो.सरतेशेवटी धडका मारतो पण ते द्वार काही उघडत नाही!
हा दिग्दर्शकही परिचयाचा.प्रेमळ.सगळं समजाऊन सांगणारा.नाटकाआधी, नाटकानंतर नाटकावर आणि इतरही गोष्टी समंजसपणे बोलणारा.मी हे नाटक केलं.ते करत असताना येत नाही म्हणून शिव्या खाल्ल्या.पण खरंच सांगतो, त्यावेळी मी करतोय ते का करतोय? या सगळ्याचा अर्थ काय? आपण काम करताना जी एनर्जी लावतोय ती बरोबर आहे का? तिची गरज आहे का? या प्रश्नांनी माझा सतत पाठपुरावा केला.आपण ज्या वातावरणातून आलेलो असतो त्यातून आपली समज तयार होत असावी.पुढे अनुभवाने ती घडत असावी.
पुढे एक ग्रीक पद्धतीची एकांकिका करायला मिळाली.यात ग्रीकांसारखे- म्हणजे मुलींच्या स्लिवलेस फ्रॉकसारखे कॉस्च्यूम्स होते.चार सामान्य माणसं आणि एक त्यांचा मुखिया- मीडीया.मीडीयाच्या पोषाख तसाच.रंग वेगळा.चार जण साधारण तरूण.मीडीआ म्हातारा.या एकांकिकेचे चार-पाच एकांकिका स्पर्धेत प्रयोग झाले.ढोल आणि मोठी झांज असं या एकांकिकेला पार्श्वसंगीत होतं.या एकांकिकेत चार जणांपैकी एक अशी भूमिका मी केली.लेखक दिग्दर्शक मीडीया झाला होता.पुढे आणखी एका वेगळ्या अभिनेत्याने हा मीडीआ साकारला.नंतर मलाही एकदा हा मिडीआ करायला मिळाला.माणसाने केलेला निसर्गाचा नाश माणसावरच उलटतो हा या एकांकिकेचा विषय होता.चार जणांचे एकेका ओळीचे एकामागोमाग येणारे यमकबद्ध संवाद.त्यावर मीडीयाचं निरूपण.जंगलातून चाललेला सगळ्यांचा प्रवास.दिवसा.रात्री.संवाद हे या एकांकिकेचं वैशिष्ट्यं.विशेषत: मीडीयाची स्वगतं.ती बोलताना खूप भारावून गेल्यासारखं वाटायचं.हा मिडीआ वेगवेगळ्या मार्गाने मला बघायला मिळाला.एकांकिका करताना खूप एनर्जी लागायची.सगळेच जण आदिमानवासारखे दिसणारे म्हणून की ग्रीक एकांकिकेचं स्वरूप म्हणून, पण हे सगळं लाऊड होतंय हे करताना जाणवायचं. बघायला आलेले मित्रं, लोक एकांकिका संपल्यावर आम्हा सगळ्य़ांकडे आ वासून बघत रहायचे.आम्ही काय सॉलिड करतोय म्हणून हे असे बघताएत की यांना काहीच कळलं नाही म्हणून? की हे सगळं कश्याला करायचं असं यांना वाटतंय? एकांकिका करताना मजा यायची करून झाल्यावर प्रश्नं पडायचे…