romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, August 30, 2010

“भगवा, हिरवा की लाल?...” कॉमेडी शो!

आठवडाभराचं रूटीन संपलं की माझ्यासारखा माणूस आख्ख्या देशाचं नव्हे तर जगाचं ओझं आपल्या डोक्यावरून उतरल्यासारखा जे तंगड्या वर करतो ते रविवारी रात्री नको तेवढ्या आरामामुळे तंगड्यांची चाळवाचाळव होत राहिली की खरय़ा अर्थाने जागा होतो असा माझा एक समज झालाय.तेव्हा त्याला मग काय काय आठवायला लागतं.काय काय जाणीवा व्हायला लागतात.कसले कसले साक्षात्कार व्हायला लागतात.आपली स्वप्नं साक्षात्कारांसाठीच आंदण दिली गेली आहेत असा काहीतरीही माझा आणखी एक समज त्यावेळी होत असतो.मी तो करून घेत असतो असं म्हणूया.
या वीकएन्ड अर्थात सप्ताहसमाप्तीच्या शेवटच्या चरणांत असंच होऊ लागलं.सप्ताह, चरण वगैरे शब्द इथे आलेत ते अनवधानाने असं समजू नका.लिहिणारा म्हणून शब्दांचा सोस आहे ते तर सोडाच पण एकाच वेळी श्रावण, रमजान आणि येऊ घातलेलं पर्युषणपर्व वगैरे या शब्दयोजनेमागे आहे असा माझा आणखी एक समज होऊ घातला आहे.असो.सांगायचा मुद्दा मी दीड दिवस ढेंगा वर करून करून स्वयंकेंद्रित विचार-आचारांमधे पूर्ण बुडून रविवारच्या उत्तररात्री जरा कुठे जगाचा विचार वगैरेच्या किनारय़ाला लागत होतो बहुतेक आणि तेव्हाच भगवा, हिरवा, राखाडी, काळा, लाल वगैरेंच्या विळख्यात कसा सापडत गेलो त्याची ही गोष्टं.
भगवा वगैरे हे काय नव्याने? असं मी माझ्याच अंतर्मनाला विचारत आढ्याकडे बघत बिछाना जागवू लागलो.कुटुंबियांचे घोरण्याचे आवाज विचारांना पार्श्वसंगीत पुरवत होते.बाहेरचा कुठलातरी इंग्रजीत डिझमल का म्हणतात तसला लाईट प्रकाशयोजना पुरवत होता आणि अचानक एक बायस्कोपवाला दिसायला लागला.
लहानपणी पत्र्याचा पेटारा डोक्यावर घेऊन एक माणूस फिरताना दिसायाचा.खांद्याला लाकडी फोल्डिंगचा स्टॅंड लावलेला.नाक्यावर स्टॅंड उघडून त्यावर तो पेटारा ठेवायचा.त्या पेटारय़ाला दोरय़ा लावलेली पत्र्याच्या डब्यांना त्यावेळी असायची तशी तीन झाकणं शेजारी शेजारी लावलेली असायची.मग तो गोंड्यांची टोपी घालायचा.सॅंटाक्लॉजसारखी किंवा सर्कशीतल्या जोकरसारखी.स्टॅंडवर लावलेल्या पेटारय़ाच्या मागे तो सूत्रधार उभा रहायचा.पेटारय़ावर खिळ्याने ठोकलेला भजनातल्या टाळाचा एक भाग, आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला धाग्याने घट्टं बांधलेल्या दुसरय़ा भागाने बडवायला लागायचा.’बंबई देखो! दिल्ली देखो!’ असं गाणं म्हणून लहान पोरांना गोळा करायचा.पोरं घरी हट्टं करून पैसे मागायची.त्या बायस्कोपवाल्याच्या हातात कोंबायची आणि झाकणं उघडून आत दिसणारय़ा सिनेमात रममाण व्हायची.बायस्कोपवाला पेटारय़ावरचं हॅंडल फिरवून चित्रं दाखवायचा.दात विचकून भोवताली जमलेल्या इतर मुलांकडे बघत हसायचा.त्याचे एकाडएक सोनेरी दात, पान खाऊन खाऊन लाल झालेले.जमलेल्या आणि आशाळभूतपणे त्याच्याकडे बघणारय़ा लहान मुलांच्या तोंडाजवळ आपलं तसलं ते तोंड नेऊन तो टोपीच्या वरच्या टोकाला असलेला लाल गोंडा टोपीभोवती गोल गोल फिरवायचा.त्याचं भयानक तोंड बघून घाबरायचं की गोंड्याची जादू बघून चकीत व्हायचं ते लहान मुलांना समजायचं नाही.भीती दाखवणं, जादूसम चमत्कार करतोय असं भासवणं या गोष्टी मुलांना फसवायला गरजेच्या असतात हे त्या अनाडी, गावंढळ दिसणारय़ा बायस्कोपवाल्याला पक्कं माहित असायचं.तो यशस्वी व्हायचा.दात आणखी विचकत हसून टोपीवरचा गोंडा आणखी गोल गोल फिरवत तो आणखी पोरं आणि पैसे गोळा करायचा.
मला आता दिसत असलेला बायस्कोपवाला तोच होता पण त्याच्याभोवती होती मोठ्या माणसांची हीऽऽ गर्दी! लहान मुलं हल्ली टीव्हीवरच्या विविध वाहिन्यांवर चालणारय़ा त्याच त्या स्त्रीकेंद्रित मालिका बघून मोठी होताएत हे मला माझ्या त्या अवस्थेतही समजत होतं पण ही मोठी माणसं मोबाईलवर किंवा इंटरनेट्वर एमएमएस क्लिप्स बघायच्या सोडून, एसेमेस पाठवून जग जिंकायचं सोडून किंवा छोटीमोठी फिक्सिंग्ज करायची सोडून बायस्कोपवाल्याजवळ का गर्दी करताएत हे न कळून मी चाट पडलो.शिवाय बायस्कोपचंही तिकीट पाचशे रूपये.मल्टिप्लेक्स सुविधा नसतानासुद्धा.बरं, बायस्कोपवाल्याचा तो खेळ बघून उठणारा प्रौढही भारावून जात ’सॉलिऽऽड सॉलिड…’ असं पुढच्याला सांगत आपल्या ’नेक्स्ट फिक्सिंग’ ला मोकळा होतोय!हे बघून मला रहावेना.
मी पुढे होण्याआधी त्या बायस्कोपवाल्यानं पुढे होऊन माझ्या तोंडासमोर तोंड आणून दात विचकले आणि पदोपदी चाट पडण्याचं सामान्य माणसाचं कर्तव्य मी आणखी एकदा पार पाडलं.माझ्या हातून पाचशेची नोट खेचून माझं डोकं त्या झाकणाच्या जागी खुपसणारा तो महाभाग आपला ’मनू’च होता!
पेटारय़ावरची झांज वाजवत मनूचं गाणं सुरू झालं आणि कांडी फिरवणंही- हॅंडलची. ’देखो देखो! इंडिया देखो! पाकिस्तान देखो! एकही देस के दो टुकडे देखो!’ हे गाणं म्हणत असताना मनू हिंदू-मुसलमानांच्या भयानक कत्तली डोळ्यांपुढून सरकवत होता.ही चित्रं जुन्या जमान्यातली काळ्या-पांढरय़ा रंगातली होती पण सगळीकडे सांडलेलं सामान्य माणसाचं रक्त मात्र लालेलाल दिसत होतं.दोन्ही देशांचे नेते खूष कसे दिसत होते? इंग्रजी माणसांनी भरलेली बोट हसत हसत हात दाखवून टाटा करत किनारा सोडत होती.झेंड्यांचे रंग वेगवेगळे होते पण रक्ताचा रंग लाल आणि राखेचा काळा ठिक्कर!
’आयोध्या देखो, मस्जिद देखो, मस्जिद की जगहा मंदिर देखो’ ह्या मनूच्या गाण्यावर माझे पाय थिरकताहेत- नाहीत तोपर्यंत ’दाऊद देखो, बम देखो, बम- बम- बंबई- नही- मुंबई द्येखो, आरडीएक्स देखो, राष्ट्रवादी दाऊद का कमाल द्येखो’ हे गाणं मनूनं सुरू केलं आणि रंगीत चित्रांची मालिका कधी सुरू झाली कळलंच नाही! पेटलेल्या मुंबईचा रंग भगवा होता की हिरवा होता? की लाल होता? मुंबईदर्शनच्या त्या सहलीत मी हरवून जात होतो.महानमाज, महाआरती, राधाबाई चाळ, डोंगरीतला कर्फ्यू… जळजळत राख राख होत चाललेली मुंबई… मग नेत्यांची चित्रं सुरू झाली, हात मिळवणी करणारी.तुझं सरकार.माझं सरकार.तुमचं-आमचं, आपलं-तुपलं चमचमीत युतीचं आणि आघाडीचं सरकार…
’दारासिंग देखो!- पहेलवान नही!!- जलती हुई गाडी द्येखो!’ असा पुकारा मनूनं सुरू केला आणि चित्रांचा नवा अध्याय सुरू झाला.ख्रिश्चन धर्मप्रसारकाच्या गाडीला लावलेली आग.होरपळलेली त्याची मुलं.रडणारी त्याची बायको आणि मुलगी. ’एम पी द्येखो, नन्स द्येखो! देखो देखो द्येखते ज्यावो!’ या गाण्यावर मध्यप्रदेशातल्या नन्स- ख्रिश्चन धर्मसेविका रडत रडत आपल्या कहाण्या सांगणारय़ा…
मनूच्या गाण्याचा जोर वाढला, वेग वाढला, चित्रं आणखी भराभर पुढे पुढे सरकू लागली.सहाजिक होतं.जागतिकीकरणाचा रेटा वाढला होता.कुणी खलिस्तान मागत होतं, कुणी गोरखालॅंड तर कुणी बनत होतं तामिळी वाघ.देशाचे दोन पंतप्रधान कुत्र्याच्या मौतीनं मेल्याचीही चित्रं होती.सगळ्या चित्रांच्या पार्श्वभूमीवर हकनाक मरणारे, जळणारे, राख राख होणारे असंख्य सामान्य…
मनू ओरडत होता.चित्रं दाखवतच होता.माझे झाकणाला लागलेले डोळे या कडेपासून त्या कडेपर्यंत नुसते भिरभिरत होते.एकही चित्र सुटू नये म्हणून धडपडत होते आणि चित्रं धरून ठेवता येत नाहीत म्हणून तडफडत होते.गंमत अशी की इतकी भयाण होत जाणारी भिरभिरणारी चित्रं बघून थकण्याऐवजी त्या बायस्कोपचं गारूड डोळे स्वत:वर स्वार करून घेत होते…
’देखो देखो मॅनहटन का ट्विन टॉवर द्येखो! उस पर घुसती हुई विमाने द्येखो! हजारो लोगों के शव द्येखो! लापता लोगों की लिस्ट द्येखो! दाढीवाला लादेन द्येखो! जल्दी द्येखो!’ मनू दमत नव्हता. ’गोधरा देखो! ट्रेनमें जलती हुये कारसेवक देको! जलता, टूटता गुजरात देको! इशरत देको! जल्दी जल्दी! नई तो सीएसटीसे आपकी गाडी छूट जाएगी! हाऽहाऽहा अजमल द्येखो! बुलेट प्रुफ जॅकेट द्येखो! ये सब चार दिन टीवीपर द्येखा! अब इदरबी द्येको!’ उध्वस्त झालेले असंख्य संसार, माणसं घाबरून हादरलेली, पार्श्वभूमीवर कोसळणारे स्वत:चे अश्रू पुसणारे नेते… माझं डोकं झाकणातून भिरभिरत सुटलंच… पण ते पुरतं सुटलं नाही… मनू आणखी माणसं जमवून, पैसे कमवून बायस्कोप दाखवण्याच्या आपल्या धर्माला जागत होता.
मी मात्रं भगवा? की हिरवा? की राखाडी? की काळा? की सरता शेवटचा लाल!!! या विळख्यात चांगलाच अडकत चाललो होतो…

Sunday, August 29, 2010

“दिग्ददर्शक!”

’वस्त्रहरण’ नाटकात तात्या सरपंच मेटाकुटीला येतो.जोशी मास्तरांनी दिग्दर्शनाच्या नावाखाली घातलेला धुमाकूळ पाहून कपाळाला (स्वत:च्या) हात लावतो.म्हणतो, “मास्तरऽ ह्यां तुमचा दिग्ददर्शन?ऽऽ” तात्या मास्तरांना दिग्ददर्शकच म्हणत असतो, दिग्दर्शक नव्हे! माझ्यावर कधी अशी पाळी येईल, असं मी कुणाला तरी म्हणेन असं तुम्हाला वाटलं असतं?
दरवर्षी गल्लीत सत्यनारायणाची महापूजा असते.मनू- आपला मनू- दरवर्षी मागे लागतो, नाटक लिहून दे! नाटक लिहून दे! मी म्हणतो, “अरे, गल्लीतल्या रहिवाशी संघाची पत्रकं लिहिणं वेगळं, नाटक लिहिणं वेगळं.नाटक लिहिणं म्हणजे काय खाऊ आहे? शिवाय अगदी stratford upon avon इथल्या शेक्सपियरपासून ते कुलुपवाडी, बोरिवलीतल्या आपल्या जयंत पवारांपर्यंत सगळ्यांनी एवढं लिहून ठेवलंय, मी काय नवीन लिहिणार?” मनू माझं ऐकेल त्या दिवशी आपल्या मराठी सिनेमाला नक्की ऑस्कर मिळेल! त्याचा हेका एकच.मला खूप मोठा दिग्दर्शक व्हायचंय, तू नाटक लिहून दे! मनू म्हणजे आपला पंचरंगी, सप्तरंगी की नवरंगी म्हणतात तसला कलाकार.त्याला कोण उभं करणार? शेवटी या वर्षी नाईलाजानं मला तयार व्हावं लागलं.
मनू सुटलाच.म्हणाला, “नाटकाची स्टोरी?” मी म्हणालो, “हे बघ! नवीन नवीन असं काहीही नसतं.जगात असतं, दिसतं, वर्षानुवर्षं जे सांगितलं जातं तेच लिहायचं!” हे मी काय बोलून गेलो ते मलाच कळलं नव्हतं.कदाचित कुणा तृप्त नाटककाराचा आत्मा माझ्यात संचारला असावा.मनूला तर ते कळण्याच्या पलिकडचंच होतं.पण आपल्याला सगळं कळतं असा भाव चेहेरय़ावर आणणं त्याला सहज जमतं.
माझ्या तोंडून स्टोरी सुरू झाली, “एक कासव असतं-” माझं वाक्य पूर्ण व्हायचा आधीच मनू वा! वा! वा! म्हणून ओरडला.म्हणाला, “कोल्हटकर आणि कालेलकरांना मागे टाकलंस! पुढे!” मी लगेच म्हणालो, “एक ससा असतो-” मनू गडबडा लोळायचाच बाकी राहिला.म्हणाला, “कानेटकर आणि तेंडुलकरांच्या तोडीचा नाटककार होणार तू! पुढे!” आता अलिबाग ही काय माझी नेटिव्ह प्लेस नव्हे.मनूला काय आज ओळखत होतो? मनूला म्हणालो, “स्पर्धेत कासव जिंकलेलं आजच्या युगात कुणालाही पटणार नाही.तेव्हा ससा जिंकेल.” झालं.मनूला मोठा दिग्दर्शक व्हायची स्वप्नं पडायला सुरवात झाली.
मी इमानेइतबारे मला जमेल तसं नाटक लिहून दिलं.म्हणालो, “लोकांसमोर वाचतो.” मनूनं तोंड कडवट केलं.वाचनाला फार कुणी येणार नाहीत अशी दक्षता घेतली.नाटक हातात पडल्याबरोबर मनूचं वागणं बदललं.आता तो आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन माझ्याकडे टुकार माणसाकडे बघावं तसं बघायला लागला.पुढे कसं कसं होणार याची माझी उत्सुकता वाढायला लागली तशी तो एकेक गोष्ट माझ्यापासून लपवू लागला.मी काही विचारायला गेलो की तो त्याचा तो सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मख्खं चेहेरा तरी दाखवायचा किंवा पुजेला ज्याम डेकोरेशन करू, झेंडूच्या माळा सोडू, दुधातला शिरा करू म्हणून विषय बदलायचा.जाऊ दे म्हणून मीही सोडून दिलं.नाटक लिहिलं ते कुणीतरी करतंय म्हणून उत्सुकता मात्र ज्याम होती.
लोक जमायला लागले.हे पात्र मिळत नाही, ते नाही करत सगळा संच मिळणं कधीच सोपं नसतं.मी सारखा सारखा काय झालं, काय झालं म्हणून विचारतोय म्हणून शेवटी एके दिवशी मनूनं मला बोलवलं.मनू दिग्दर्शकाच्या खुर्चीवर.मी येताच कुणाला तरी आणखी एक खुर्ची आणण्याचं फर्मान.ओळखीपाळखी न होताच वाचनाला सुरवात.पात्रं बनलेल्या कलाकारांनी माझं नाटक आळीपाळीने वाचायला सुरवात करताच मी भारावलो.त्या सगळ्यात रंगायला लागलो.चुकलं- माकलं सांगायला लागलो.मी समजत होतो लेखक म्हणून मला काय सांगायचं आहे हे कलाकारांपर्यंत पोचणं जरूरी आहे.मला कळेना.वाचणारे सगळे घाबरलेले.त्यांचा एक डोळा मनूकडे.मी सूचना करतोय हे मनूला आवडत नाहिए.मी मनूकडे बघत राहिलो.
खुर्चीवर बैठक मारूनच दिग्दर्शन करणारय़ा दिग्दर्शक घराण्यातली मनू ही कितवी तरी यशस्वी कडी असावी.बसून बसून तो चांगलाच फुगला होता.मला त्या गोष्टीतल्या बेडकीची आठवण झाली.बैलाएवढा आकार व्हावा म्हणून पोरांना आपलं शरीर फुगवून दाखवणारय़ा बेडकीची.मनू खुर्चीत ठाण मांडून बेडकासारखा- म्हणजे झोपलाय की जागाय ते न कळेल असा बसून.तेव्हाच मला सगळी कल्पना यायला हवी होती, पण सामान्य माणूस असलेला लेखक आशावादी असतो.
दरम्यान मनूने नाटकात असंख्य बदल सुचवले.तो लिहिलेलं समजून न घेता सगळं उलटं-पालटं करणं म्हणजेच दिग्दर्शन या घराण्यातलाही दिसत होता.मी त्याला म्हटलं, “यापेक्षा एक नवीनच नाटक लिही!” तो म्हणाला, “मी लिहिलेलं बाजूला टाकून तुझं करतोय हे उपकार समज.” मनू माणसं जमवत होता.तो निर्माताही होता.मी लिहिलेलं रंगमंचावरून पहिल्यांदाच दिसणार होतं.मी गप्प बसायचं ठरवलं.
मी रिहर्सलला गेलो की मनू अगत्याने बसलेल्याला उभं करून मला खुर्ची द्यायचा.मला त्या खुर्चीत मुसक्या बांधल्यासारखा बसवून जाम करायचा.माझ्यात आणि नाटकातल्या कलाकारांत काहीच संपर्क राहू नये याची काळजी घ्यायचा.पुढे पुढे त्याने कलाकारांना दम भरल्याचं माझ्या कानावर आलं, “मी मोठा दिग्दर्शक आहे.मला सगळं कळतं.प्रश्न विचारायचे नाहीत.” नटमंडळी भलतीच आज्ञाधारक.चूपचाप सगळं ऐकणारी.
पूजेची- म्हणजेच नाटकाची तारीख जवळ आली.अजून नाटक उभं रहात नाही.मी ते मनूच्या लक्षात आणून दिलं.तो पुन्हा बेडूक होऊन समाधीत गेला.
अचानक पूजेची तारीख ठरली.मनू नाटकात बदल करण्याची घाई करू लागला.ऐनवेळी नाटकात बदल करून लेखकासमोर दुसरा कुठलाही पर्यायच न ठेवणारय़ा आणि पर्यायाने आपल्याच मनासारखं करणारय़ा दिग्दर्शक घराण्यातलाही तो दिसत होता. “आता अजिबात वेळ नाहिए.बदल करू नकोस.कलाकारांचा गोंधळ उडेल.आहे ते सरळ सोपं आहे.” मी समजावून बघितलं.
नाटक झालं.मी लिहिलेलं त्यात ’काहीही’ नव्हतं. “नाटकातली पात्रं एखाद्या संघर्षात सापडलेली सामान्य माणसं दिसत नाहीत.ती वेड्याच्या हॉस्पिटलातून बोलवून आणली आहेत का?” बघणारय़ा माणसांच्या या सवालाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. “हे काय लिहिलंएस?” या प्रेक्षक वर्गाच्या त्या पुढच्या प्रश्नाला माझ्याकडे काय उत्तर असणार होतं?
पूजेच्या निमित्ताने मनूने किमानपक्षी दोन पक्षी तर मारलेच.साधं, सोपं, सरळ नाटक अतिशय टुकार, न कळणारं, हास्यास्पद, भडक केलं आणि स्वत: फार मोठा ’दिग्ददर्शक’ झाला!

Monday, August 23, 2010

“अनंत कोटीऽऽ ब्रह्मांऽऽडनायक…”

“आपल्या लोकांना तेहेतीस कोटी देव कमी पडायचं कारण काय मला सांग!” मनू तावातावानं मला विचारत होता भर श्रावण महिन्यात.
सुटीचा दिवस.दुपारी भरपेट जेऊन झाल्यावर पानाच्या गादीवर आम्ही भेटलो.माझे डोळे जड झालेले.केव्हा एकदा जाऊन झोपतोय असं मी मनात म्हणतोय आणि मनूचं नेहेमीप्रमाणे भलतंच काहीतरी!
आपल्याला काय करायचंय? आपण बरं आपलं आयुष्य बरं! रोजचा पोटापाण्याचा संघर्ष काय कमी आहे? मनू माझ्या शर्टाची बाही खेचत माझ्या झोपेचं खोबरं करणार या विचाराने माझा चेहेरा वेडावाकडा झाला.मनू म्हणाला, “च्यायला! नेहेमी काही तुला विचारावं तर तुझा चेहेरा आपला धर्मराजासारखा! नरो वा कुंजरो वा! साला सामाजिक जाणीव वगैरे तुला काही नाहीच! सांग ना! तेहेतीस कोटी द्येव-” मी लगेच म्हणालो, “जाऊ दे यार मनू.सुटीच्या दिवशी दुपारचं जागरण मला झेपत नाही मी-” मनूनं लगेच माझा हातच पकडला, “जातोस कुठे? चल! आज ’स्थानावर’ जायचं म्हणजे जायचंच! अरे घरोघरी गुरू तात्यांचे फोटो झळकताएत! जिकडे तिकडे श्री तात्या प्रसन्न! तेहेतीस कोटी अधिक एक! चल! चल!”
मी अगदीच काकुळतीला येतोय असं दिसल्यावर त्यानं झोपायला जायची मुभा दिली.संध्याकाळी मात्र वॉचमनसारखं येऊन त्यानं मला उठवलं.
सुटीचा दिवस.रिक्षा, लोकल सगळीकडे मरणाची गर्दी.एक दिवस लोकलचं थोबाड बघू नये तर ही पाळी!- माझा आत्मसंवाद चालूच राहिला.
आम्ही ’स्थानावर’ एकदाचे पोचलो.शाळेचा हॉल.असंख्य भक्तगण.स्टेजवर लाल मखमली खुर्च्यांमधे पाहुणे.धूप, उदबत्त्या, कापूर, भले मोठे हार.त्यांचा संमिश्र वास.मनू इथेही गप्प नाहीच.सारखा आपला या भक्ताकडे बघ.त्याला मान वेळावत हॅऽलोऽ कर.त्या तिसरय़ाकडे बघून अतिलाचार, कृत्रिम हस.भक्तांचं आपलं बरं.ब्रह्मानंदी टाळी लागलेली.मी परग्रहावर आल्यासारखा.भांबावलेला.मनू कोपरानं ढोसलत कानात सांगतोय, “ते बघ.ते गॅंगस्टरसारखे दिसताहेत ना! स्टेजवर रे! डोळे गांजेकसासारखे दिसताएत ते! ते तात्या! आधी वकील होते, आता गुरू झालेत.बाजूला त्यांची बायको ताती.तिच्या बाजूला ओणवा झालेला आणि तिच्या कानात काहीतरी सांगणारा तात्यांचा लहान भाऊ तातू.राम, लक्ष्मण, सीता! भरत शत्रुघ्न अजून यायचेत.” असं म्हणून मनू ख्यॅं खॅं करून हसला.मी चपापलोच.कुणी भक्त ऐकायचा आणि बेमुदत मार पडायचा.मी, मनू माझ्याबरोबर नाही असं दाखवत इकडे तिकडे बघत एका रिकाम्या खुर्चीत बसलो तर मनूनं लगेच बाजूची खुर्ची बळकावलीच.
एक अप टू डेट पोषाखातला भक्त स्टेजवर गेला.तात्यांना आणि परिवाराला त्यानं साष्टांग लोटांगण घातलं.मनूनं लगेच इकडे मला ढोसललं, “हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.याला तात्यांची सावली मोठी झालेली दिसली!” असं म्हणून मनू पुन्हा ख्यॅंऽ ख्यॅंऽ… मी नकळत विचारलं, “सावली? म्हणजे?”- “तात्यांची कृपाऽऽ” असं म्हणत मनू पुन्हा ख्यॅंऽ ख्यॅंऽ… मी पुन्हा चपापलो.दोन चार भक्तांची तंद्री भंगली.मनू आज मला बहुतेक मार खायला लावणार! मी अंग आक्रसून बसलो.
आता एक बॉयकट केलेली, स्लीवलेस पंजाबी आणि ओठ लालचुटुक असलेली माईकवर आली.बोलायला लागली, “आम्ही सुमोतून चाललेलो स्फीडमधे! समोरून भरधाव टॅंकर! मी डोळे मिटून तात्यांचा धावा केला.डोळे उघडले तर काय? टँकर गायब!” मनूनं आता मला इतक्या जोरात ढकललं की मी शेजारच्या अतिविशाल महिला भक्तिणीच्या मांडीवर पडता पडता वाचलो. “हिचं थोबाड बघून टॅंकरवाल्यानं दरीत उडी मारली! तात्या काय करणार?" असं म्हणून मनू इतक्या जोरात हसला की खुर्चीसकट पडायचाच बाकी राहिला.मला वाटलं आता वातावरण तंग होणार.मनू निसटणार आणि मला पडणार.इतक्यात चार-पाच म्हातारय़ा कोतारय़ा सुवासिनी नथी चाचपत, तोंडातल्या कवळ्या सावरत, दागिने दाखवत; तबकात पेटलेली निरांजनं घेऊन आल्या.ढोलकीवाल्याची थाप काडकन वाजली आणि तात्यांची आरती सुरू झाली.
तात्यांचे डोळे अर्धवट मिटलेले.तातींच्या तोंडावर माफक कृत्रिम हसू.काही तरी सतत शोधणारा तातू उर्फ लक्ष्मण आणि बेरडासारखे उभे भरत आणि शत्रुघ्नं.
’परमेसर परसन…’ या लोकप्रिय लोकगीताच्या चालीवर दुसरी आरती चालू झाली.पोरंटोरं, बायकापुरूष खच्चून बेंबीच्या देठापासून ओरडत होते.आश्चर्य म्हणजे इतका वेळ माझ्या बाजूला उभा असलेला मनू चक्कं कंबर हलवत त्या उडत्या तालावर नाचायलाच लागला.आधी मला वाटलं चेष्टा करतोय पण तो त्या सगळ्यात अक्षरश: रंगून गेला होता.सारखा हलत होता.एक आरती झाली की ’मजा आला मजा आला’ म्हणून टाळ्या पिटत होता.अनेक लोकप्रिय लोकगीतं, कोळीगीतं, सिनेमागीतं त्या आरत्यांमधे सामावलेली आणि तात्यांचा जयजयकार.
’अशी चिक मोत्यांची माळ…’ या चालीवर आरती चालू झाली आणि मनूनं उडीच मारली.अवघं सभागृह भक्तिरसात बुचकळून निघालेलं.कॉलेजमधली पोरं-पोरी धुंद झालेल्या.
शेवटी ’दत्त दर्सनला जायाचं जायाचं… सोबत तात्या येणार’ असा उच्चकोटीचा जयघोष झाला. ’आळंदीच्या ज्ञानाला भेटायला जायचं आणि सोबत तात्या पांडुरंग’ या भावनेनं आख्खा भक्तवर्ग बेहोष झाला.
अनंतकोटीऽऽ ब्रह्मांऽऽडनायक सच्चिदानंद सदगुरू श्री तात्याराव महाऽऽराज कीऽऽ अशी आरोळी माझ्या शेजारूनच आली.मनू खच्चून ओरडत होता.लोक घसा फो-फोडून जयजयकार करत होते.मनूचं तात्यांवरचं लक्ष हटत नव्हतं.चेहेरा भक्तीभावानं ओथंबलेला.हात जोडून त्याने डोळे मिटून घेतले.
जरावेळाने हनुमान उडी घेऊन मनू स्टेजवरही अवतरला असता आणि तात्यांच्या पायाशी बसून ते रामपंचायतन पूर्णही केलं असतं.
तेहेतीस कोटी देवांमधे अनंतकोटींची भर पडणार हे मला तरी पूर्ण कळून चुकलं होतं…

Tuesday, August 17, 2010

मनू आणि मी “कोण जागं आहे?”

स्वातंत्र्याचा आणखी कितवा तरी वर्धापनदिन साजरा झाला आणि आपणही काही निश्चय करावा असं आमच्या मनानं घेतलं.माझ्या आणि मनूच्या.मनूचा आणि माझा दिवस एकदमच सुरू होतो.वजन वाढतं म्हणून आम्ही दोघांनीही कामावर येता-जाता चालत जायचं ठरवलं.अर्थात रेल्वेस्टेशनपर्यंतच.
मनूचं तोंड सतत चालू असतं.झोपेतही ते कितपत बंद रहात असेल कुणास ठाऊक? माझं त्याच्या उलट.काय बोलायचं हेच मला अनेक वेळा कळत नाही.माझ्याशी जो बोलत असतो त्याचं बोलणं मला नेहेमीच खरं वाटतं.मनूसारखा हुशार माणूस असेल तर मी भारावतोच.बहुतेक वेळा मनू सतत माझ्याबरोबर असतोच.चल रे? तेवढाच टाईमपास! असं मनूचं म्हणणं.मनू झटकेबहाद्दर.रोजचा झटका निराळा.
आज कामावर जायला म्हणून आम्ही दोघं बाहेर पडलो, मनू मला विचारतो; “जागा आहेस का?”
मनूसमोर मी माझ्या चेहेरय़ावरचा गोंधळ लपवू शकत नाही. (माझा चेहेराच तसा आहे असं म्हणून मनू नेहेमी फिदीफिदी हसतो.) “जागा म्हणजे? काल सुट्टी होती स्वातंत्र्यदिनाची.रात्री झोप येईना उशिरापर्यंत म्हणून टीव्हीचे चॅनल्स दाबत बसलो होतो म्हणून डोळे लाल झालेत.” मी प्रामाणिकपणे सांगितलं.माझ्या प्रामाणिकपणाला मनू नेहेमीच हसतो तसा आत्ताही तो खिदळत म्हणाला, “डोळ्याला सूज, डोळे लाल म्हणजे काल रात्री भक्त प्रल्हाद!” नवीन काहीतरी काढण्यात मनू उस्ताद.ते काय ते मला कधीच कळत नाही, मनू उलगडून सांगत नाही.भक्त प्रल्हादचंही तसंच.
माझ्या चेहेरय़ावरचा मूर्तिमंत गोंधळ पुसून टाकण्यासाठी मी जोरदार जांभई दिली. “हे जागे आहेत का?” समोरून सकाळचं फिरणं आटपून गप्पाटप्पा करत परत येणारे म्हातारे बघत मनूनं विचारलं.माझा जांभईचा आऽ तसाच राहिला.मनूचं पुराण सुरू झालं.“आयुष्यभर धावत राहिले.पैसा कमवला.संसार केला.आता मुलासुनानातवंडांचं सगळं सहन करताएत.सकाळी मारे गप्पा हाणतात.संध्याकाळी बघितलंस यांना कट्ट्यावर बसलेलं? मावळता सूर्य आणि यांचा चेहेरा दोन्ही सारखेच दीनवाणे दिसत नाहीत?” मी कालच्या त्या जागरणामुळे चालतानाही डुलक्या काढतोय.मनू बहुतेक आता मला आख्खी कादंबरी ऐकवणार असं वाटून मी घाईघाईनं म्हणालो, “चालायचंच.आपलंही असंच होणार आणखी काही वर्षांनी” – “अरे पण जागे आहेत का ते? अजून जाग आली आहे का त्याना?” मनू म्हणाला.
मी हातानेच माझा चेहेरा खसाखसा चोळला.त्रास झाला की स्वत:लाच आणखी त्रास द्यायची ही सवय.साला हा काय सारखी जाग जाग करतोय- मी मनाशी म्हणतोय न म्हणतोय तोपर्यंत नशिबानं स्टेशन आलंच.
लोकल ट्रेनचं बिघडलेलं वेळापत्रक आणि इतस्तत: धावणारी, कामावर जायची घाई असणारी माणसं बघून मनू पुन्हा पुटपुटला- “यांना कधी जाग येणार कुणास ठाऊक?” मी उखडलोच.म्हणालो, “अरे या रेल्वेवाल्यांना जन्मात कधी जाग येणं शक्यं आहे का? काय बोलतोएस खुळ्यासारखा?” मनूनं आता असा चेहेरा केला की माझाच चेहेरा खुळ्यासारखा झाला.
मनू म्हणाला, “मी रेल्वेवाल्यांच बोलत नाहिए रे!” असं म्हणत असताना त्याची नजर समोरच्या बाकड्यावर स्थिरावली.गणवेशातला एक सखाराम डोळे मिटून हातावर गोळी चोळतोय- तंबाखूची.दुसरा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून पाय पसरून निजलाय आरामात.माझी नजर लगेच तिकडे वळून स्थिर होतेय हे बघून मनू म्हणाला, “मी यांनांही म्हणत नाही, हे जागे आहेत का म्हणून.मी या उंदरासारख्या इतस्तत: धावणारय़ांना बघून म्हणतोय हे कधी जागे होणार?”
मला जाम झोप येत होती.मनूच्या सततच्या या जागण्याच्या चर्हाटानं वीट आणला होता.मी गाडीची वाट बघू लागलो.मनू आज विचारमग्नं होता.जरा जास्तच.आज तो हमखास जागा पकडणारय़ा ग्रुपकडे नुसता बघत राहिला.त्यांच्यात मिसळून पुढे गाडीत जागा मिळवायची पूर्वतयारी करायची इच्छा त्याला अजिबात दिसत नव्हती.नेहेमीचा तो ग्रुप लहान मुलांसारखा, याला चिमटे काढ, त्याची कॉलर ओढ, त्याला टपलीत मार, हूऽऽ करून ओरड असे नेहेमीचे उपद्व्याप करत होता.माझ्या कानाशी पुटपुटणं ऐकू आलं- हे जागे कधी होणार?... मी वळूनसुद्धा बघितलं नाही.जागरणाने माझे डोळे आधीच चुरचुरत होते.मी ते घट्ट मिटून घेतले आणि गाडी आली.
नेहेमीप्रमाणे मी ढकलला गेलो आणि मग डोळे उघडले.दोघा दांडग्यांच्या बेचक्यात मी उभा.मनू जागा शोधण्याच्या प्रयत्नात असेल म्हणून आजुबाजूला बघितलं.मनू दिसला नाही.मला काळजी वाटायला लागली तशी माझी नजर भिरभिरायला लागली. “जागा झालाएस का?” मनू माझ्या पुढ्यातच.मला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय.माझं तोंड वाकडं झालेलं बघून तो पुढे म्हणाला, “अरे स्टेशनवर डोळे मिटून उभा होतास बराच वेळ म्हणून विचारलं.गाडी सुरू झाली की दोनपाच मिन्टात पुन्हा उभ्या उभ्या घोरायला लागशील.” मी मनूकडे पाहिलं.तो हसत नव्हता.चेष्टा करत नव्हता नेहेमीसारखा.
आज याला झालंय तरी काय? मला जाम झोप येत होती पण मनूमुळेच मी जागा रहात होतो.हे सगळं भयंकर होतं.मी आतल्याआत चरफडत राहिलो नेहेमीसारखा.माझ्या हातात नेहेमी चरफडण्याव्यतिरिक्त काहीच नसतं पण आज मला सहन होत नव्हतं.मी ओरडलो, “अरे काय काय करायचं माणसानं? किती जागं रहायचं? किती अवधानं सांभाळायची? अरे, आमच्यासारख्या सामान्य माणसानं किती गोष्टीत जागरुकता दाखवायची? सगळं आम्हीच करायचं? मग ही व्यवस्था कशाला? वेगवेगळी खाती कशाला? राजकारणी कशाला? बस, रेल्वेसारखी आस्थापनं कशाला? सेवाभावी संस्था कशाला? महाविद्यालयं कशाला? आणि तो परमेश्वरही कशाला?”
माझ्या या शेवटच्या ’कशाला?’ वर दोन्ही बाजूंच्या दांडग्यांनी मला चेपलं.झोपमोड होतेय म्हणून.
सुरू झालेल्या लोकलमधे सर्वत्र निजानिज झाली होती.मनू आता मात्र माझ्याकडे मिश्कीलपणे पहात, हसत उभा होता…

Friday, August 13, 2010

कॉमेडी शो! मनू आणि मी! “फोटो”

माझा फोटो पेपरमधे आला- आला म्हणजे तसा नव्हे!- त्याचं काय झालं, मी आपला नेहेमीसारखा लेट आणि त्यामुळे घाईघाईत धावत पळत चाललो होतो कामावर.आता रस्त्याने चालताना इकडे तिकडे बघायची काय सोय आहे? मग मला कसं कळणार कोणीतरी माझा फोटो काढतंय ते! अगदी-अगदी फ्लॅश जरी मारला तरी काय लक्षात येणार त्या अशा घाईगर्दीच्या वेळी! मला मनात सारखा दिसत होता आमच्या रिकामटेकड्या साहेबाचा तुळतुळीत डोक्याचा फ्लॅश.लेट येणारय़ांवर पडणारा.कुणीतरी डाव साधला.दुसरय़ा दिवशी वर्तमानपत्रात मी.खाली ओळ, ’मुंबईच्या रस्त्यांची दुर्दशा!’ आहे! म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ.दुर्दशेच्या- रस्त्यांचा- फोटो आणि त्यात नेमका ठळक दिसणारा मी.झालं घरच्यांची बोंबाबोंब सुरू!
मी तसा काही अतिविनम्र वगैरे अजिबात नाही.तसं राहून या जगात भागतं का कुणाचं? पण मला झाल्या प्रकारात काही विशेष वाटत नव्हतं.खरी गोची पुढेच होती.
मनू म्हणजे माझा जीवश्चकंठश्च वगैरे वगैरे.तो कसाही वागला तरी वेळेला तोच समोर.जिवणी आकंठ पसरवत, डोळे बारीक करत.म्हणजेच हसत.मनूला सांगावं फोटो आलाय तरी पंचाईत न सांगावं तरी वर्षभर टोमण्यांचा, कुत्सित हसण्याचा मारा.त्या दिवशी काही मनू भेटला नाही.रात्रभर मला झोप नाही.
दुसरय़ा दिवशी मनू दिसला.नर्व्हसच दिसत होता.नेहेमी तो स्वत:हून पुढे येणारा आज मीच पुढे झालो.रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबाकडे बघून मनू नर्व्हस हसला.मी, जरा चाचरतच, काल फोटो आल्याचं त्याला सांगितलं,त्यानं माझ्याकडे बघितलं.मी सावध झालो.मग तो पुन्हा हसला.काडेचिराईत, कडू कारलं आणि एरंडेल एकत्रित प्यायल्यावर माणसाचा चेहेरा जसा होईल तसं ते हसणं.त्याच्या पोटातलं ढवळणं त्याच्या चेहेरय़ावर स्पष्टं दिसत होतं.तसा तो हसला आणि पुन्हा दिव्याच्या खांबाकडे बघायला लागला.बराच वेळ काही प्रतिक्रिया नाही म्हणून मी नि:श्वास टाकला.चला म्हटलं, स्टेशनकडे चालू पडू.आज पुन्हा उशीर नको, नाहीतर साहेबच फोटो काढायचा आणि ’वर’ पाठवायचा.फोटोला आणि मलासुद्धा.
“वा! वा! वा! वा!” -हा मनूच!- एकदम याला काय झालं म्हणून चालता चालता मी मनूकडे बघितलं.जोरात हसत माझ्या पाठीवर थाप मारत मनू माझ्याबरोबर चालायला लागला. “ मोठे झालात आता! प्रसारमाध्यमांशी सलगी झाली आता तुमची!” मी बावळटासारखा त्याच्याकडे बघत राहिलो. ’प्रसारमाध्यमं’ म्हणजे ’कालचा पेपर’ हे नंतर लक्षात आलं.मनू आता आपलं हे कौतुक करतोय की आपल्याला जोड्यानं मारतोय हे काही लक्षात येईना.ते कधीच कळून द्यायचं नाही ही मनूची खासियत आहे आणि अशावेळी बुचकळ्यात, नुसतं पडणं नव्हे, पडून रहाणं ही माझी.
“मग? काय पार्टी वगैरे केली की नाही काल रात्री? ओली? सुकी?” आणि मनू पुन्हा जोरात हसला.मी आणखी बुचकाळलेला.आता माझ्या चेहेरय़ाकडे बघून मनू खूष! “अरे करायची पार्टी! मला बोलवायचंस. ओळख आहे न माझी?” माझ्या खांद्यावर हात ठेऊन मनू थोपटायला लागला. “चांगलं आहे! चांगलं आहे!” असं म्हणत पुन्हा जोरात हसला.मग नेहेमीसारखं अचानक गंभीर होत त्यानं विचारलं, “मग? प्लॅन्स काय आहेत पुढचे?” आता मला बुचकळ्यात पडून पडून वैताग आला.मी चिडून म्हणालो, “मनू काय यार! कसले प्लॅन्स? पकवायला पण लिमिट असतं यार!” – “वेडा आहेस! इथेच तुमचं चुकतं.तुमचं चुकतं ते इथेच!” मनू माझ्या कानात गरम हवा सोडत म्हणाला.बुचकळ्यात पडून पडून आता माझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. “हेच कॅश करायचं असतं!” मनू म्हणाला. “काऽऽयऽऽ?” मी जोरात ओरडलो.
मनूची म्हणजे कोड्यावर कोडी.त्याच्या खास समजुतदार आवाजात तो म्हणाला, “हे बघ! आज तू बरय़ाच लोकांना माहित झालास!” मी उगाचच इकडेतिकडे टकामका बघत राहिलो.माझ्या शर्टाची कॉलर ओढत मनू म्हणाला, “इकडे बघ! उद्या ते तुला विसरतील.तेव्हा आजच त्या प्रेस फोटोग्राफरला गाठायचं.त्याच्याशी मैत्री करायची.त्यासाठी त्याला खिलवायचं, पिलवायचं!”- “अरय़ेऽ पण कशासाठी?ऽऽ“ मी त्राग्याने विचारलं. “मूऽर्खासारखे प्रश्नं विचारू नकोस आणि आधी नेहेमी बावळटासारखा तोंडाचा आऽऽ वासलेला तुझा हा चेहेरा बदल.तुझा फोटो आलाय काल पेपरात! तर- त्या फोटोग्राफरशी मैत्री कर.त्याला विश्वासात घेऊन त्याच्याबरोबर फीर!” इथे वेळ कुठे आहे- असं मात्रं मी मनात म्हणालो.पण मनूनं ते ओळखलं.
“उद्या आणखी मोठा होणार आहेस तू! मध्यमवर्गीय विचार सोडून द्ये!ऽ त्या फोटोग्राफरला सोडू नकोस.त्याच्या फोटोंमधे या ना त्या कारणाने दिसायला लाग.तुझा चेहेरा ओळखीचा होईल.प्रत्येक फोटोमधे हाच का दिसतो असं लोक विचारणार नाहीत.त्याना तेवढा वेळ नसतो.वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या फोटोंमधे दिसायला लाग!” मनूचं हे म्हणजे फार होतं.पण मी गप बसलो.
मनू आता फूल फार्मात होता, “हळूहळू तुला टीव्ही सिरियल्स मिळायला लागतील!” मनूचा हा दणका मात्र जोरात होता.मी भारावलोच! “हां!ऽऽ असाच चेहेरा ठेऊन फोटो काढून घे! पेपरात, ’देवाशी चिटचॅट’, ’माझी आवड निवड’, ’माझं बालपण’, माझं ’हे’, माझं ’ते’ असं काहीही लिही.फोटोसकट छापून आण.हा मोठेपणाचा पहिला टप्पा! सतत, तुझं हे तुझं ते, छापून यायला लागल्यावर रिकामटेकडे लोक तुला आणखी मोठं करतील.तुझ्यासारख्याच दोघाचौघांना घे, चांगल्याश्या हॉटेलात जेवण घेत असलेले तुमचे फोटो द्येऽऽ छापूऽऽन! मिळाला तुला हिंदी पिच्चर! आहेस कुठे?”
मनू बोलायचा थांबला आणि मी वेडा झालो.किती सोप्पं होतं सगळं! माझी झोप मात्र आजपासून पारच उडणार होती! जय मनू!...

Saturday, August 7, 2010

भवितव्य

शहरात एक दोन दिवसात महाविद्यालयीन प्रवेशाची पहिली यादी लागेल.मग दुसरी, तिसरी आणि मग कोण जाणे कितवी! बेस्ट ऑफ फाईव्ह्चा गोंधळ असेल न लक्षात? या सगळ्याच्या निमित्ताने मला आठवली एक गोष्टं.तशी जुनी पण…
दहावी किंवा बारावी असेल, परिक्षांचा मौसम.अशा वेळी परीक्षाकेंद्र हा किती संवेदनशील भाग असेल! मनूला मी नेहेमी आचरट म्हणतो हे कदाचित तुम्हाला आवडत नसेल पण असंख्य मुलं आणि त्यांचे पालक अतिशय कासावीस अवस्थेत असतील अशावेळी कुणी परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या फूटपाथवर चक्कं आनंदात पत्ते पिसत असलेला दिसला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? बरं, ते पत्ते पिसत उभं रहाणंही असं की जणू बघणारय़ाला आवाहनच करतोय! मी त्याला बघून कपाळाला हात लावला.
जुन्या हिंदी सिनेमात राजेंद्रनाथ असायचा.आचरटांचा बादशहा.इथे मनू.त्याच्यापेक्षा काकणभरही कमी नसणारा.मी हे पुन्हा एकदा ओळखलं आणि तिथून कट मारायच्या प्रयत्नात होतो आणि पत्ते पिसण्याचा जोरदार आवाज करून- खाचखाचखाच असा- मनूनं मला बोलवलंच!
कुणी समोरून बोलावलं तर जायलाच हवं.त्यात हा मनू.इकडे तिकडे बघत मी चाचरत त्याला म्हणालो, अरे हे शोभतं काय तुला? मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भवितव्याची नाजूक वेळ ही! हे काय चाललंय तुझं? मनूचं त्यावरचं उत्तर म्हणजे स्टायलिश हसणं.पत्ते पिसणं चालूच! माझ्या लक्षात आलं मनू आज बोलतही नाहिए! मला बघितल्यावर नेहेमीसारखी आरोळी ठोकली नाही.बरं हसणंही आवाजविरहित.फक्त फवारा.
मी त्याच्या पत्ते असलेल्या हातावर हात मारला आणि प्रवेशकेंद्राच्या त्या प्रवेशद्वारापासून त्याला लांब खेचलं.करवादलो, हे काय नाटक? अरे बोल तरी! मनूनं शूऽ शूऽ करून माझा हात सोडवला.मला गप्पं बसायची खूण केली.पत्त्याच्या जोडामधून एक पत्ता काढला.मला दाखवला.त्या पत्त्यावर एक चित्र होतं.मुलं परिक्षेचा पेपर लिहित असल्याचं.मी मनूकडे बघितलं.त्यानं जादूगारासारखं ते कार्ड उलटं केलं.उलट्या बाजूला आणखी एक चित्र होतं.मुलगा आपलं डोकं गच्च धरून ते पुस्तकात खुपसतोय.वर ढणढणीत दिवा लागलाय.आई त्याला वारा घालतेय.वडील बर्फाची पिशवी घेऊन उभे आहेत.मी पुन्हा मनूकडे बघितलं. तोंडावर बोट धरून त्याने पुन्हा शू:ऽऽ केलं.मला कळलं परिक्षा चालू आहे, शांतता पाळा.ठीक आहे मी म्हटलं, पुढे? मनूनं पुन्हा जादूगार के लालसारखा पत्त्यांवरून हात मारला.आणखी एक पत्ता काढला.माझ्यासमोर धरला.
फाईव्ह स्टार कोचिंग क्लासमधलं चित्र.सरांनी पुस्तकं-वह्या बाजूला सारल्या आहेत आणि कॉम्प्युटरसारख्या यंत्रातून ते नमुना प्रश्नपत्रिका काढताहेत, मुलांना वाटताहेत.हे झालं मोठ्या सरांचं.छोटे सर दुसरय़ा यंत्रातून नमुनेदार उत्तरं काढताहेत, मुलांना वाटताहेत.मुलांच्या चेहेरय़ावर आनंद.तोपर्यंत मनूनं ते कार्ड, तो पत्ता उलटला.या बाजूचं चित्र बघून मला भरून आलं.एक पालक ऑफिसमधे मरमरून ओवरटाईम करतोय.दुसरा मारवाड्याकडे, असलेलं सगळं गहाण टाकतोय.कुणी पालक हातगाडी खेचतोय.कुणी साहेबाचा ओरडा खातोय.कुणी वाणी, वीज, दूध इत्यादी बिलं थकवली आहेत.मी मनूकडे बघितलं.मनूनं जोरात भुवया उडवल्या- काय? या अर्थी.हे चित्र जरा वास्तवाला सोडूनच होतं पण माझी उत्सुकता मात्र आता चाळवली गेली होती.मी कसलेल्या जुगारय़ासारखं म्हटलं, नेक्स्ट? पुढे?
द ग्रेट गँबलरसारखा मनूने पुन्हा पत्त्यांवर हात मारला.आणखी एक पत्ता बाहेर काढला, दाखवला.ही गरीब वस्तीतली पोरं होती.कुणी रस्त्यावर झाडाखाली फाटकं पुस्तक घेऊन बसला होता.कुणी बागेत फिरत पिपाण्या, अनेक लहान मुलं, आजूबाजूची रहदारी यांच्या गोंगाटात लक्ष एकाग्र करायचा प्रयत्न करत होता.एका पोराला त्याचा दारूडा बाप, पैसे कमवून आण म्हणून मारत होता.एक पोरगी शाळेत जायचं सोडून धुणी-भांड्याचा ढीग उपसत होती.पाणी सांडलं म्हणून एक वेटर मुलगा गिर्हाईकाचा मार खात होता.मनूनं ते चित्र उलटलं.मागच्या बाजूला अनेक चित्रांचा कल्लोळ होता.कुणाला ४०-५० फार फार तर ७०-८० टक्के मिळालेले.कुणी नाक्यावर गर्दी करून चेष्टामस्करी करतंय.तर कुणाच्या हातात चाकू, कुणाच्या गन, कोणकोणाच्या उरावर बसलेलं, कोणकुणाची अब्रु लुटणारं.मला पुढे बघवेना.माझा चेहेरा फारच करूण झालेला असावा.खाच खाच पिसून मनूनं रंगीत चकचकीत कार्ड बाहेर काढलं.त्यावर सगळी गोरी गोरी, घारय़ा घारय़ा डोळ्यांची मुलं.सगळी सुटाबुटात.साडे नव्याण्णऊ, पावणे नव्याण्णऊ, सव्वा नव्याण्णऊ, नव्याण्णऊ टक्के मार्क मिळवलेली ही गोजिरवाणी फुलं! मी खूष झालो.
मनूनं लगेच ते कार्ड उलटलं.या बाजूला परदेशी जाणारं विमान.विमानाभोवती जमलेले आनंदित आई-बाप.खिडक्या-खिडक्यांमधून त्यांना अलविदा करून परदेशी जाणारी हुशार मुलं.
मनू मला आता उसंतच देत नव्हता.पुढच्या पिसलेल्या पत्त्यावर एका बाजूला ७० ते ९० टक्के मिळवलेल्या मुलांनी मनासारखं झालं नाही म्हणून केलेल्या आत्महत्त्या.कुणी कुरियर सेवेत दारोदार भटकतंय.गवर्न्मेंट जॉब- नाही.बॅंक जॉब- नाही.कायम नोकरी- नाही.असे बोर्ड लावलेले आणि एका बाजूला परममहासंगणकाचं चित्र.मनूकडे अजून अनेक पत्ते होते पण त्यांच्यावर दोन्ही बाजूला चित्रं होती संगणकांची.वेगवेगळ्या प्रकारच्या संगणकांची.माणसं कुठेच दिसत नव्हती…

Wednesday, August 4, 2010

परप्रांतीय!

गेले पंधरा दिवस मनू गायब.मला मनूची इतकी सवय की तो नाही म्हणजे माझं जगंच संपलं! मी आपला, त्याच्या भाषेत त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर त्याला शोधतोय…
आज ऑफिसमधे अर्जंट कामात बुडालेलो असताना माझ्यासमोर एक भैय्या उभा.चला हो चला!- असं मला त्याच्या भोजपुरी की कसल्या भाषेत सांगतोय.तोंडात पानाचा तोबरा.कपाळावर कुंकवाचा उभा पट्टा.मिशीला पीळ देऊन आकडा केलेला.मी म्हटलं, क्या है पंडितजी? क्या चाहिए? त्यानं माझा दंड धरून मला माझ्या ऑफिसमधल्या बसल्या जागेवरून उठवलंच.तोंडातल्या रसाचे
तुषार उडवत तो पुन्हा म्हणाला, चला हो! घुमत है समुंदर किनारे!- आणि डोळा मारून तो हसला.त्याक्षणी मी उडालोच! मनू! आणि या अशा अवतारात!
तो हसत मला ओढतोय.माझा मद्रासी साहेब रागारागाने आमच्याकडे बघतोय.मनूच्या अंगात आख्खा उत्तरप्रदेश संचारलेला.ऑफिसचा जेमतेम अर्धा दिवस भरलेला.उडुपी सुपरवायझरनं दांडी मारलेली.बाजूचा गुजराती ’मार्केट’ मधे गेलेला.मनू मला सोडत नाही.अशा सगळ्या अवस्थेत आता माझा मद्रासीसाहेब उट्टं काढणार या सगळ्या प्रकाराचं, याची कल्पना असूनही मला भर दुपारी ऑफिसबाहेर पडावं लागलं याचं कारण मनू!
बाहेर आल्यावर मी विचारलं, मनू! हे रे काय? एक पिचकारी टाकत तो म्हणाला, मनू नाही! मनवा बोला हो हमका! मी एकदा म्हणून बघितलं, मनवा!- आणि मला हसूच आलं.तो म्हणाला, हसो नाही! मनवा इ का नाम नाही? मी त्याला म्हटलं, तू बोल बाबा त्या भोजपुरी की कसल्या भाषेतून पण मला आधी सांग पंधरा दिवस होतास कुठे? तो म्हणाला, मुलखवॉं मां गएल रहिन हम.मला वाटलं हा आता दिलीपकुमारसारखं धोतर धरून, नाचून ’नैन लड गई रे’ म्हणणार आणि मनवानं मुलखाच्या गोष्टी सांगायला सुरवात केली.अगदी भिजवलेले चणे, राईचं तेल, टोमॅटो-बटाट्याची रसभाजी सगळं सगळं.
तोपर्यंत मनवाचा तो समुंदर आलाच.त्याच्या कडेकडेने आम्ही चालायला लागलो.मनू ताळ्यावर यायचं काही लक्षण दिसत नव्हतं.आता मला मीच पानाचा तोबरा भरलाय.मलाच भरघोस मिश्या आल्या आहेत.मी माजी शेंडी चापून चोपून वळवली आहे.असे भास व्हायला लागले.
नेहेमीसारखं अतिअसह्य झाल्याशिवाय ब्र काढायचा नाही अश्या माझ्या मराठी बाण्याला जागत मी मनूला काळजीनं विचारलं, अरे भय्ये कमी का आहेत मुंबईत हे तू काय- मनूनं मला पुढे बोलूच दिलं नाही.भय्या नही कहना हमका! हम तौ उत्तरपरदेस रहिबासी संघ के कार्यकर्ता है!- मनवा म्हणाला.आता तो भोजपुरीतून शुद्ध हिंदीकडे वळायला लागला होता.सबेरे तुम्हारा दूध कौन लाता है? तुम्हारे घर पेपर कौन डालता है? तुमको बनारसी पान कौन खिलाता है? तुमको सब्जी कौन बेचता है? पानीपुडी कौन खिलाता है? तुम्हारे घरका फर्निचर किसने बनाया? – हमने! हमारे भाईयोंने! अब ट्रेन में जरासी भीड क्या हो गई, भय्या लोग भय्या लोग करके चिल्लाते हो? इतने साल क्या किया तुम लोगो ने? पहले ’बजाव पुंगी हटाव लुंगी’ का नारा दिया.क्या सब मद्रासी भाग गए? तुम्हारा बनिया कौन है? तुमको कपडा कौन बेचता है? शेअर मार्कीट में किसकी गर्दी है? क्या उन लोगों को भगा सके हो तुम आज तक? उल्टा वो बोलते है ’मुंबई तुमची भांडी घासा आमची!’- मनू उर्फ मनवा आता पूर्णपणे फॉर्मात आला होता.समुद्रावर फिरायला आलेले लोक आमच्याकडे टकामका बघायला लागले होते.मी नेहेमीच्या हतबल चेहेरय़ाने मनू –नव्हे मनवाचं प्रवचन ऐकत होतो.मधे मी काही बोलायला तो जागाच देत नव्हता.
ये समुंदर देख रहे हो? -मनवाजीनी नवा प्रश्न फेकला.मी मगासपासून त्याच्याकडेच- मनूकडेच बघत होतो.हां! मी म्हणालो.कहॉं से आता है ये पानी? मनूनं विचारलं.आता मात्र माझ्या दृष्टीनं हद्द झाली होती.उत्तरपरदेस रहिबासी संघ काय? मनूचं हे वेषांतर काय? हे असंख्य प्रश्नं काय?- कहॉं से आता है ये पानी? काय सांगू? माझा चेहेरा आणखी (?) बावळट झाला.
बोलोऽऽ कहॉं से आता है ये पानी? मनवा दरडावलाच.आमच्या आजूबाजूचे चारजणही दचकले.मी डोक्यावर पालथा हात मारून घ्यायला लागतो.तो माझ्यावर ओरडलाच, अबेऽ×× नदियों से!ऽ सारी नदियॉं आकर समुद्रसे मिलती है! स्सालाऽ दूसरी ’ब’ में सिखाया वो भूल गए? मी तरी काय करणार? मनूसमोर माझं नेहमीच असं होतं आणि मग हसं होतं.मनू मोठी पिचकारी टाकत हसलाच.म्हणाला, उसी तरहा ये महानगर इक समुंदर है! देसभर के लोगभाग इसमें आके मिलते है.क्यों नहीं आऍं? यहॉं क्या नही है? रोजगार है.पैसा है.झोपडपट्टी है.पानी है.नाटक है.तमासा है. पिच्चर है.सबकुछ है!
आता मला रहावेना.अरे बाबा पण हमकू तकलीप होताय ना खालीपिली! हमारे पूर्वज से हम इदर रहता है, जो कोई इदर आए, हमसेही दादागिरी करताय? हमारे नेता लोक को भी तुमने-तुमने- मला ’फितवलंय’ ला हिंदी शब्द सुचेना.
मनवाने तो मौका साधलाच- तुम गिरगाव, दादर, परेल, लालबाग से नालासोपारा, विरार, कलवा, बदलापूर गया, बराबर है? अब तुम्हारे गॉंव जाओ! मालवन, सिंधुदुर्ग, नासिक, सातारा, कोल्हापूर…
आम्ही चौपटीवर पोचलो होतो.मी वर बघितलं.एक पुतळा हाताचं बोट पुढे करून जणू रस्ता दाखवत होता.मला त्याच्या जागी मनू- नव्हे मनवा- दिसायला लागला…