romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label निसर्ग. Show all posts
Showing posts with label निसर्ग. Show all posts

Monday, November 7, 2011

मैत्रसंवाद

"तुझं बरंय बाबा
घट्ट उभा असतोस
निश्चल स्थितप्रज्ञासारखा
कुणाच्याही भानगडीत नाहीस
मी सुद्धा जेव्हा तुझ्याशी बोलायला, भेटायला, मस्ती करायला येतो
तेव्हाही तू ढिम्मच!
असा कसा रे तू?..
मी आक्रसलेला असतो तेव्हाही
लांबवर तू दिसतोस, तो ही तसाच
नेहेमीसारखाच. बोल ना रे ढंप्या!
तुला माहितीए त्या पाचजणींना सांभाळताना
त्यांच्याबरोबर खिदळतानाही
मी तुला कधीच विसरत नाही
स्वत:च्या बायका, त्याही, इतक्या, असूनही
मी तुझ्यासारख्या मित्राला विसरत नाही
याचे तुला काहीच वाटत नाही?..
तुला कसं सांगू?
आभाळ कोसळताना मला नाही रहावत रे!
मी दिल्यात तुला धडका किती वेळा
कबूल आहे मला!
तू तेव्हा तुटतोस, कधी कमी, कधी जास्त
कधी मागे मागे जायला लागतोस
पण माझ्या चंचलपणाला आवर तूच घालतोस!
तेव्हा माझ्या वडीलमित्रा
मी काय म्हणतो
तुला भावनाच नाहीत का?
अरे रहाटगाडगं असतंच की
कधी उचंबळायचं, कधी खवळायचं
कधी शांत तर कधी मस्ती करायची
सगळं आवश्यक असतं आयुष्यात!
आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा
आपली कर्तव्य ही तर पार पाडायचीच असतात रे प्रत्येकाला!
आभाळ कोसळताना मला का रहावत नाही
हे मी तुला सांगायला पाहिजे का?
अरे काळे नभ म्हणजे माझीच लेकरं!..
मी तुला मानतो ते यासाठी की
माझा उपसर्ग कुणाला तू पोहोचू देत नाहीस
मी उफाळल्यावर तू मला सांभाळतोस
आणि मी रोडावलो तरी
तू दूर पण ठाम उभा असतोस
माझ्यासाठी, एकटा..
मी तुला हे सगळं आज का सांगतोय माहितीए
मलाही हल्ली महत्व कळायला लागलंय
ठामपणाचं, स्थितप्रज्ञेचं, भावना काबूत ठेवण्याचं
अरे जहाजंसुद्धा केव्हा एकदा
तुझ्याजवळ येतो असं म्हणतात
तेव्हाही- स्पष्टंच सांगतो- मी जळतो तुझ्यावर
अरे, मी यांना वाहून नेतो, सांभाळतो
आणि यांना ओढ मात्र तुझीच!
पण तू आहेसच तसा हे ही मला पटतं
अरे मग व्हाय डोन्च्यू एक्सप्रेस?
तू बोलत का नाहीस? बोल!"
"बोलतो बोलतो बाबा बोलतो
फक्त तु़झ्याशीच बोलावसं वाटतं
कारण तुझ्याशिवाय मी नाही
आणि माझ्याशिवाय तू नाहीस
पण एकेकाचं आयुष्यंच असं असतं बाबा!
नाही नाही.. हा नुसता कडवटपणा नाही
एखाद्याने नुसते वास्तवाचेच चटके सहन करायचे असतात, सतत!
आणि सर्वांगानं फुलणारय़ा
दुसरय़ा एखाद्या जीवनाला बघत रहायचं असतं
जमलंच तर सांभाळायचं, मदत करायची
त्याच्याशी स्पर्धा नाही करायची
शेजारी शेजारी उभ्या असणारय़ा, हे खरं
पण धावमार्ग आणि मर्यादा
वेगवेगळ्या असणारय़ा धावपटूंमधे
असते का स्पर्धा?
आणि सगळ्यांनीच स्पर्धा करायची म्हटल्यावर
बघे कोण? टाळ्या वाजवणारे कोण?
धावून दमलेल्या खेळाडूंना विसावा पुरवणारे कोण?
आणि त्यांना शिकवणारे तरी कोण?..
हा धीरगंभीरपणा, शांतपणा, समंजसपणा, स्थितप्रज्ञा
तुला काय वाटतं, आपोआप आलंय सगळं?
हे असलं नुसतं दिसतं सगळ्यांना
पण त्या मागचं, त्या मागचं नाही बघत कुणी!
शिवाय एकेकाचा स्वभाव असतो
न बोलता आपलं काम करत रहाण्याचा
याचा अर्थ आतून तो ओला नसतो
असं काही नाही!
आतला ओलेपणा, सतत दाखवायला लागलो सगळ्यांना
तर नाही कुणाचे डोळे ओलावत
स्वत: न अनुभवलेल्या गोष्टींनी
कोण ओलावणार सांग!
हे बौद्धिक होतंय मान्य आहे मला
मी तुझा वडीलमित्र आहे म्हणून
चान्स घेतोय असंही नाही
तेव्हा, ऐक!
नशीब म्हण, ईश्वरेच्छा म्हण, दैवी शक्ती म्हण
तुझ्यासारख्यांना त्याचं पूर्ण वरदानच असतं!
तुझा मोठेपणा हाच की
इतकं चांगलं चाललेलं असूनही
तुझं माझ्याकडे लक्ष गेलं
तू मला मुक्याला बोलतं करायला लागलास..
तुझ्यासारखे  रगेल, रंगेल, दुसरय़ाना उपयोगी पडणारं
आणि यशस्वी आयुष्य जगणारे
माझ्यासारख्यांना निगेटीव्ह म्हणतात
ते पहिलं, तू तरी डोक्यातून काढून टाक
कित्येकांना वास्तव कशाशी खातात
हे आयुष्यभर जाणवत नाही-
सुमार बुद्धिमुळे म्हण किंवा बेसुमार नशीबामुळे म्हण!..
तेव्हा, आता तुला माझं रूप हळू हळू
उलगडायला लागेल..
ही लहान लहान गोजिरवाणी रूपडी, ही युगुलं, हे पेन्शनर्स
संध्याकाळी असं हे सगळं जगच
माझ्या अंगाखांद्यावर असतं
सांग ना कुणाला आनंद वाटणार नाही!
हा असा आनंदी असताना
मी काय करतो माहितीए
मी तुझ्यात माझं प्रतिबिंब न्याहाळत असतो
आंगाखांद्यावरच्या जगासकट!
कळलंय तुला हे कधी?..
तू माझ्याशी मस्ती केल्यावर
मी ढासळतो असं तू म्हणतोस
पण अरे मी तुझ्यातच थोडा थोडा
मिसळत असतो, हे नाही तू पाहिलंस!
आणि तू आखडतोस, रोडावतोस तेव्हा
-मला माहितीए, तुझ्या हातात नाहिए ते-
मी ठाम उभा तर असतोच
पण आतल्या आत तू लवकरात लवकर
माझ्याशी खेळायला यावास म्हणून
मनोमन प्रार्थना करत असतो
तुझा विरह मला डागण्या देत असतो
हे तुला समजलंय कधी?..
मला खात्री आहे तुला हे
कधीना कधी जाणवलं असेलच
कारण तुझ्या लक्षात आलंय?
मी हा असा आणि तू तसा
म्हणूनच आपली मैत्री आहे
आणि अशीच मैत्री अखंड टिकते!..
आता तुझ्या आणखीही एक लक्षात येईल
जगात अशाश्वत असं काहीच नसतं
असं म्हणतात
पण मी अभिमानाने म्हणतो आहे!
आमची मैत्री अशाश्वत आहे!
तुझ्याबरोबर फक्त मी आहे
आणि माझ्याबरोबर फक्त तू आहेस!
मैत्री ही अशी असते
हे जगाला सांगणं
मला तुझ्यामुळेच शक्य आहे!!!"

Friday, September 2, 2011

जगावेगळा ’बफेलो बॉय’

डेस्पेरेडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल तुम्ही माझ्या गेल्या नोंदीत वाचलंच आहे.दरवर्षी मुंबईत भरवल्या जाणार्‍या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातल्या लक्षात राहिलेल्या दुसर्‍या आणि जगावेगळ्या वित्रपटाबद्दल इथे लिहितोय.हा चित्रपट म्हणजे ’बफेलो बॉय’!
व्हिएटनामसारख्या देशातून आलेल्या या प्रवेशिकेनं थक्कच केलं.चित्रपट माध्यमाला मर्यादा आहेत का? असा मोठा संभ्रम हा चित्रपट बघत असताना होतो.’पाणी’ या पंचमहाभूताचं विलक्षण दर्शन हा चित्रपट घडवतो आणि तेवढ्यावरच तो थांबत नाही.एका पंधरा वर्षाच्या मुलाला काही महिन्यांच्या अवधीत घडलेलं आयुष्याचं दर्शन केवळ अप्रतिम चित्रप्रतिमांमधे हा चित्रपट सादर करतो.
पंधरा वर्षाचा किम आपल्या वडिलांबरोबर आणि सावत्र आईबरोबर राहतो आहे.तो रहात असलेल्या या भागात, व्हिएटनाममधे, पाऊस म्हणजे अरिष्टंच आहे.तो धुंवाधार बरसताना आपण त्या प्रतिमांबरोबर ओढले जातो.हे शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे दोन म्हशी आहेत.आईवडील अतिवृद्धं झालेले.म्हशी जगवायच्या असतील तर या भूभागातल्या सगळ्यांना त्यांच्या म्हशी एका बेटावर चरण्यासाठी न्याव्या लागतात.प्रचंड पाऊस आणि सर्वत्र भरलेलं प्रलयसदृष्य पाणी यामुळे म्हशींना खायला गवत उरलेलं नाही.
ज्या बीस्ट्स आयलंडवर या म्हशींना न्यायचं तिथपर्यंतचा प्रवासही सुखकर नाहीच.किमचा हा प्रवास सुरू होतो.मुसळधार पावसात, चहुकडे क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्यातून वाट काढत तो चालू पडतो.त्याला काय खायला मिळतं? इतकं पाणी सभोवार असून त्याला प्यायचं पाणी मिळवण्यासाठी काय करावं लागतं? इथपासून चित्रपटाचं डिटेलिंग सुरू होतं.यातली दृष्यं बघून अवाक होणं केवळ बाकी रहातं! आपल्याला मागासलेल्या वाटलेल्या त्या प्रदेशात, पावसाच्या अखंड भडिमारात, प्रलय झालेल्या ठिकाणी हे चित्रिकरण कसं साध्य झालं असेल याचा अचंबा करत आपण किम जगू लागतो.
किमला त्याच्या आयुष्यातलं कुठलं रहस्य या दरम्यान कळतं? त्याची आई कोण? बेटाजवळ पोचल्यावर त्या परिस्थितीतही होणार्‍या इतर लोकांच्या मारामार्‍या, स्त्रियांवरचे अत्त्याचार, स्वत: किमनं त्या सगळ्या जगण्यात सामील होणं असं सगळं जगावेगळं जगणं आपण किमच्या दृष्टिकोनातून कधी अनुभवायला लागलो हे आपलं आपल्यालाच कळत नाही!
यातला किमच्या वडलांच्या शिकार्‍यावरच्या मृत्यूचा सेगमेंट- उपकथानक काटा आणणारं आहे.किमच्या पुन:प्रवासात सभोवतालच्या पाणीच पाणी चहुकडे या अवस्थेत चुकून माकून एखादा शिकारा जवळ आला तरच माणसाची भेट होणार अशी परिस्थिती.यात शिकार्‍यावरच्या म्हातारा म्हातारीमधला म्हातारा मरतो.अशावेळी माणूस मेल्यावर पुढे काय करायचं हा यक्षप्रश्न.प्रवास न संपणारा.संपेपर्यंत त्या शरीराचं काय होणार? मग त्या मृत शरीराला काळजावर दगड ठेऊन जलसमाधी द्यायची! पण ते शरीर पूर्ण बुडायला तर पाहिजे! मग काय करायचं?... हा प्रसंग मुळातूनच पहाण्यासारखा आहे.
आयुष्य हे दु:खानं भरलेलं तर आहेच.माणसानं त्याच्या जगण्यावर आलेल्या अडचणींवर कसा विजय मिळवला किंवा तो आयुष्याशी कसा लढला हे ’बफेलो बॉय’ अप्रतिमपणे दाखवतो.
चित्रपट संपल्यावर केवळ उदासवाणी हुरहूर लागत नाही आणि आपण कधीच अनुभवू शकणार नाही असं आयुष्य आपल्याला लाभल्याचा साक्षात्कार हा चित्रपट प्रेक्षकाला जरूर देतो...
मग करताय न लगेच डाऊनलोड? त्या आधी हा यूट्यूब ट्रेलर पहा!
         माझ्या आशियाई चित्रपट महोत्सवात बघितलेल्या या आधीच्या चित्रपटविषयक नोंदी पुढीलप्रमाणे:
मुतलुलुक-ब्लिस
द सिरियन ब्राईड
डेस्पेरेडो स्क्वेअर

Thursday, July 28, 2011

कळी

फुलणारा गंध मनाचा
मोहरता कोमेजून जावा
पहाटेच ऐन बहरात
मळभून काळोख व्हावा

रूसली कळी ती फुलतच नाही
कारण त्याचे कुणी शोधावे
का कळीवरच उमलण्याआधी
वेलीने उगाच रूसावे

निरागस कोवळे हसणे
गतजन्मीचे पुण्य असावे
दुर्दैवी दैवी जिणे हे
फुलणे त्याचे पाप ठरावे

कोपला निसर्ग म्हणावा
की अज्ञानी जीवांचे खेळणे
कुणालाच कळले नाही
कळीचे चिरशांत झोपणे!