romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, March 13, 2010

"पुलाखालून बरंच" ही महानगरातल्या एका उड्डाणपुलाची गोष्टं...


“बाळ आणि बाळंतीण आधी जगू द्या!
उड्डाणपूल नंतरच होऊ द्या!!”

“पुलाखालून बरंच” ही महानगरात तयार होत असलेल्या एका उड्डाणपुलाची गोष्टं...
उड्डाणपुलाखाली तयार होणारय़ा अवकाशावर नैसर्गिक हक्क कोणाचा?
आधीच गब्बर झालेल्या यंत्रणेचाच की महानगरातल्या अमाप वंचितांचा?
एक मनोरूग्ण भिकारिणसदृष्य कुरूप अबला आणि तिचं अनौरस मूल यांचा जीव काही दिवस तरी वाचावा म्हणून एक वृद्ध स्वातंत्र्यसैनिक, एक मानसिक अपंग, एक दिशाहिन तरूण अश्या तीन निराधार वंचितांनी छेडलेलं आंदोलन एका बाजूला आणि त्याला समांतर मध्यमवर्गानं छेडलेली तथाकथित मध्यमवर्गीय मूल्याधिष्ठित आंदोलनं दुसरय़ा बाजूला...
हे महानगर भविष्यात कशाकशाला सामोरं जाणार?????...
(मूल्य रू.७०/-, प्रकाशक : अक्षर मानव,९५९,पवनपुत्र,दुसरा मजला,शिवाजी रस्ता,राष्ट्रभूषण चौक,शुक्रवार पेठ,पुणे-४११००२,जुलै २००६, दूरध्वनी (०२०) ६५२२९२७६)

“आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...


“विनायक पंडित नुसतेच नाट्यलेखक नाहीत तर ते एक नटही आहेत.’बेडटाईम स्टोरी’ किंवा ’रानभूल’ अशा नाटकातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत.आणि मुख्य म्हणजे ’आवर्त’मधून त्यांच्या ठायी असणारा दिग्दर्शकही ठायी ठायी दिसतो.एकाच व्यक्तिच्या ठायी असे विविध गुण प्रकट होणं ही आनंदाची गोष्ट.या विविध गुणांचा उपयोग ’आवर्त’ लिहिताना विनायक पंडित यांनी पूरेपूर केल्यानं नाटकाला एक वेगळंच परिमाण लाभलेलं आहे.”...
(ज्येष्ठ नाटककार श्री.प्रेमानंद गज्वी यांनी “आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...
“आवर्त” हे नाटक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत, मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ४११०३९, दूरध्वनी: ७१२०५२६ यांनी वर्षप्रतिपदा १९२३, दि.२६ मार्च, २००१ रोजी प्रकाशित केले.)

Tuesday, February 23, 2010

“सौंदर्योपासना, आरोग्य आणि सौंदर्य”

मैत्रेय प्रकाशनानं या वर्षभरात स्वयंविकासाची जी पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यांत जाणवणारी ठळक गोष्टं म्हणजे या सगळ्या पुस्तकांतून मांडलेल्या प्रत्येक वेगवेगळ्या विषयाचा फोकस नक्की आहे, आपल्याला वाचकाला काय द्यायचं आहे हे नक्की केल्यावर ते मांड्ण्याची दिशा योग्य असावी लागते तशीही ती आहे.ही मांडणी वाचायला सोपी आहे आणि तरीही भरपूर आशय आणि एवढ्याश्या पुस्तकात तो आशयविषय साकल्यानं मांडणं हेही इथं झालेलं आहे.इथेच या पुस्तकांचं वेगळेपण ठसतं आणि मिळतं ते वाचकाला उत्तम ते दिल्याचं समाधान!
“सौंदर्योपासना, आरोग्य आणि सौंदर्य” या डॉ.सौ.विद्या जोशी लिखित पुस्तकाच्या सुरवातीला म्हटल्याप्रमाणे माणसाचं प्रथमदर्शन त्याच्याबद्दलचा पहिला ठसा उमटवणारं असतं, हेही पुस्तक मैत्रेयच्या इतर सर्व पुस्तकाप्रमाणे तसा ठसा उमटवतं.सौंदर्य ही कल्पना आपल्याकडच्या या विषयाच्या अनेक पुस्तकांमधून आजतागायत बहुतेक वेळा बाह्योपचारांवरच भर देणारी राहिली आहे.प्रस्तुत पुस्तकाच्या नावापासूनच आरोग्य हे सौंदर्याच्या नाण्याची दुसरी बाजू आहे या विचारला हात घातला आहे.हा विचार सर्वात महत्वाचा आहे!मग या अनुषंगानं आपल्या सगळ्यांचाच वजन वाढणं किंवा वजन पुरेसं न वाढणं हा महत्वाचा विषय विस्तृतपणे मांडला आहे, इतका की या संदर्भात कुठलाही संदेह हे पुस्तक वाचलं तर वाचकाच्या मनात राहू नये!
डाएट हा आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यात रोज एकदा तरी येणारा शब्द! डाएट म्हणजे उपासमार का? नव्हे, डाएट म्हणजे चौरस आहार.सगळं काही खाणं पण एका मर्यादेतच! मग नुसतं डाएट केलं की झालं का? तर नाही, त्याबरोबर नियमित व्यायाम हवा आणि हे दोन्ही आयुष्यभर सांभाळण्यासाठी हवी इच्छाशक्ती! ही मानसिक ताकद मिळवायची ध्यानधारणेतून आणि योगासनांच्या नियमित सरावातून!
असं सगळं समजावत लेखिका या सगळ्याचं विस्तृत महत्वं आपल्या मनावर बिंबवत जाते.त्यासाठी पुस्तकात येतं समतोल वजनाचं गणिती सूत्र, नक्की काय खावं काय खाऊ नये याबद्दलचा सहज समजणारा, पटणारा उहापोह, वेगवेगळी योगासनं आणि त्यांच्या कृती, त्याही योग्यं त्या आकृतींसह म्हणजेच चित्रांसह!
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण कसं असावं आणि त्यात नियमितता, आपापल्या दिनक्रमाप्रमाणे कशी आणावी हे सोप्या शब्दात जर समजलं तर आणखी काय हवं? हवं ना! तरूणींना हव्या आहेत सौंदर्यस्पर्धांतून यशस्वी होण्यासाठी उपयुक्त टीप्स! या स्पर्धा म्हणजे नुसतं सुंदर दिसण्याच्या नसतात तर स्त्रीचं सर्वोतोपरिनं समृध्दं असणं जोखणारय़ा असतात.या विषयीची प्राथमिक माहिती आणि केस, त्वचा यांची काळजी घेण्यासाठीची मिश्रणं आणि लेप यांच्या कृती असं वाचता वाचता या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या नावाची छोटीशी यादी शेवटच्या पानावर दिसते आणि आपल्याला इतकं “सुंदर” पुस्तक इतक्या लवकर संपल्याची चुटपूट लागून रहाते.मग आपण पुन्हा मागची पानं आधाशीपणानं उलटू लागतो.आपल्या मनावर जे कोरलं गेलंय ते पुन्हा शोधू लागतो.हळूहळू हे पुस्तक आपण आणखी एकदा कधी वाचून काढलं हे आपलं आपल्यालाच समजत नाही!
तुम्हाला असं पुस्तक तुमच्याकडे असल्यावाचून रहावणार नाही असं माझं मत झालंय हे पुस्तक वाचून! तुम्हाला काय वाटतं?...

“बाई म्हणून जगताना”

“बाई म्हणून जगताना” हे मैत्रेय प्रकाशनाचं स्वयंविकास मालिकेतलं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे हे ते पुस्तक हातात घेतल्याघेतल्याच आपल्या लक्षात येतं.पुस्तकाच्या बाह्य स्वरूपाइतकंच त्याचं अंतरंगही प्रभावी असल्याचं ते चाळताना जाणवतं.लेखिका सीमा पाटील या विषयातल्या तज्ज्ञ तर आहेतच पण भरपूर माहिती अतिशय मुद्देसूदपणे आणि तीही लालित्यपूर्ण शब्दात मांडणं त्याना पूरेपूर जमतंय असं पुस्तक वाचत असताना सहज लक्षात येतं.यासाठी मैत्रेयचं मन:पूर्वक अभिनंदन!
स्त्रीचं भागधेय असं की अगदी गर्भावस्थेपासून ते वृध्दावस्थेपर्यंत तिच्यामागचं शुक्लकाष्टं संपता संपत नाही.तिच्या बाजूने मुळी विचारच होत नाही.ती प्रेमळ, ती समजूतदार, ती त्यागाची मूर्ती म्हणून तिला हरभरय़ाच्या झाडावर चढवायचं आणि ती दुय्यम तिय्यम स्थानावर राहिल याची काळजी घ्यायची.हे सगळं कधी संपणार? स्त्रीनं युगानुयुगं असंच खितपत रहायचं का? या प्रश्नांची निश्चित, सकारात्म आणि ठाम उत्तरं हे पुस्तक देतं आणि तिथेच या पुस्तकाचं वेगळेपण सिध्दं होतं!
या पुस्तकात काय नाही? मुलगी वयात येताना तिच्यात नेमकं काय होतं, त्यावेळी तिला कसं मार्गदर्शन करायचं, ती आई झाल्यावर तिचा आहार नेमका कसा असावा की ज्यामुळे ती निरोगी आणि सडसडितही राहिल.अतिरिक्त चरबी जर साठलीच तर तिनं काय करावं, या विषयीचा वजन-उंचीचा तक्ता काय आहे, अन्नं कसं आणि किती खावं, उपासमार करण्यापेक्षा व्यायाम आणि आहार यांची योग्य सांगड कशी घालावी हे मुद्देसूदपणे पण कुठेही क्लीष्टता न आणता इथे वाचता येतं.मेनोपॉज अर्थात मासिक पाळी समाप्ती, मधूमेह या स्त्रियांना ग्रासणारय़ा महत्वाच्या समस्यांसाठी स्वतंत्र प्रकरणं या पुस्तकात समर्पकपणे मांडलेली आहेत.स्त्रीची मानसिकता, ती टिकवण्यासाठी तिनं घ्यायची काळजी, सगळ्या जगाचं करून झाल्यावरही वृध्दावस्थेत दुर्लक्षित, एकाकी झाल्यावरचा तिचा आहार तक्ता तसंच पाकक्रिया देऊन लेखिका आणखी आणखी सकारात्म होत जाते.
हे पुस्तक वाचत जाताना आणखी एक मह्त्वाची गोष्टं लक्षात येते की हे फक्त स्त्रियांनी वाचण्याचं पुस्तक नाही तर समस्त पुरूषांनी वाचण्याचं पुस्तक आहे! यातली आहार, व्यायामाची प्रकरणे त्यांच्यासाठीही माहितीपूर्ण तर होतातच पण विशेषत: शेवटच्या “महिला दिन” या प्रकरणात लेखिका स्त्रीची सद्यस्थिती आणि त्यावर योजले जाणारे, योजले जावेत असे उपाय मांडते आणि आपल्यालाही पटतं की फक्तं ८ मार्च साजरा केला की आपलं कर्तव्य संपत नाही!
या ७१ पानांमधे जो एवढा सगळा महत्वाचा ऐवज फक्तं पन्नास रूपयात आपल्या हाती लागतो तो एकदा वाचून ठेवून देण्यासारखा अजिबात नाही तर त्याची पारायणं करण्यासारखा आणि तो आपल्या कृतीत आणण्यासाठी आहे हे भान कायम ठेवून या मस्तं पुस्तकाला सामोरे जाऊया!

‘पैशाचं स्मार्ट व्यवस्थापन’

पैशाचा अभाव हे अनेक दु:खांचं मूळ आहे असं तुम्हाला वाटतं?
होय! मग तुम्हाला काळाचं चांगलं भान आहे असं समजायला काहीच हरकत नाही!!
मात्र त्यासाठी तुम्हाला मैत्रेय प्रकाशनाचं उदय कुलकर्णी लिखित ‘पैशाचं स्मार्ट व्यवस्थापन’ हे पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही!!!
या सर्वार्थानं स्मार्ट पुस्तकाच्या ७१ पानांमधे असा काय ठेवा दडलाय? आज फक्त ५० रूपयांची गुंतवणूक करून हे पुस्तक घेतलंत तर भविष्यात काय परतावा मिळेल याची कल्पना तुम्ही करू शकता काय? माझं सांगणं आहे, त्वरा करा! वेळ वाया घालवणं म्हणजे पुन्हा एकापरिने पैसाच वाया घालवणं नाही का?
केवढा तरी खजिना या पुस्तकात दडलाय! आणि याची सुरवात पहिल्या पानापासूनच होते.अर्पणपत्रिकेतच लेखक आपल्याला आपल्या डोळ्यावरची झापडं काढून टाकायला सांगतो.आपल्या पारंपारिक वृत्तीमधे बदल करणं इथेच अधारेखित होतं आणि आपण सरसाऊन पुढे वाचू लागतो.गुंतवणूक म्हणजे नुसती बचत नव्हे.ती शिस्तीत “स्मार्ट” पणे करायला हवी.समजून उमजून करायला हवी.तिच्यावर जास्तीत जास्त परतावा मिळेल असं बघणं हा आजच्या युगाचा मंत्र हे पुस्तक आपल्याला देतं.कुणाचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही पण निर्णय तुम्हीच घ्यायचा.त्यासाठी आपलं ज्ञान वाढवायला पाहिजे.या पुस्तकाचा शब्दाशब्दात ते दडलंय असं म्हणणं ही अतिशयोक्ती अजिबात नाही.फक्त ते तुमच्या नजरेत यायला हवं आणि त्यासाठी ते एकदा वाचून भागणार नाही तर हॅंडबुकसारखं ते तुमच्या कायम नजरेच्या टप्प्यात मात्रं तुम्ही कायम ठेवायला हवं आणि त्याचा फायदा नक्की मिळवायला हवा!
दूरध्वनीचा तुमचा प्लान योग्य आहे का हे तुम्ही तपासलंय का? विमा पॉलिसी तुम्ही डोळे झाकून घ्याल का विचारपूर्वक? शेअरबाजारात तुम्ही किती गुंतवणूक कराल आणि म्युच्युअल फंडात? या प्रश्नांची प्राथमिक पण समर्पक उत्तरं लेखक आपल्याला देतो हे या पुस्तकाचं एक प्रमुख वैशिष्ट्य!
कर्ज काढून स्वत:च्या मालकीचं घर घ्याच असा लेखकाचा आणखी एक आग्रह.तो ही स्मार्ट गुंतवणुकीचा भाग कसा हे तो सोदाहरण स्पष्टंही करतो!
...आणि ही स्मार्ट गुंतवणुकीची तत्वं आत्मसात करून तुम्ही विमा प्रतिनिधी ते गुंतवणूक सल्लागार कसे बनू शकता म्हणजेच स्वत:चा व्यवसाय हे अंतिम ध्येय कसे गाठू शकता हे त्यासाठी घ्याव्या लागणारय़ा जागरूकतांसह तो स्पष्टं करतो.
मराठी माणसाचं अंतिम ध्येय हे स्वत:चा व्यवसाय उभारणं हेच असलं पाहिजे नाही का? मग तर हे पुस्तक वाचाच आणि त्याच बरोबर शेअरबाजाराचा चढऊतार, गृहकर्जावर आयकर सवलत पुढेही कायम रहाणार आहे का? अश्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्षपूर्वक बघत रहा! अधिक स्मार्ट व्हा!!

Monday, October 26, 2009

"वसा" दिवाळी अंकातल्या माझ्या दहा कविता

मित्रांनों वसा दिवाळी अंकात माझ्या खालील दहा कविता घेण्यात आल्या आहेत!

वसातलं इतरही साहित्य आपण वाचण्याजोगं आहेच!

कबीर प्रकाशन ९८२०५०७३४२ हे आहेत वसाचे प्रकाशक!

बाप

धुकं

ठिपका

मनोव्यापार

मी...झाड...संध्याकाळ...

मी जागा आहे

ब्रेव्हो मदर!

भर गर्दीतून...

प्रतीक्षेस...

आयुष्य

Saturday, September 5, 2009

कमीने! आणि विशाल भारद्वाज जॉनर...

मित्रांनो, कमीने बघितलात की नाही? मी दुसऱ्य़ाच दिवशी बघितला.त्याचं कारण विशाल भारद्वाज हा माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक! त्याचा "मकबूल" बघितल्यावर मी त्याच्या प्रेमात पडलो! शेक्सपिअरच्या "मॅकबेथ" या नाटकाचं हे बॉलिवूड रुपांतर.विशालने यात त्याच्या पठडीप्रमाणे गुन्हेगारी पाश्वभूमी वापरली आहे. यात भावलेली गोष्टं म्हणजे तब्बू आणि इरफ़ानखान यानी साकारलेल्या पात्रांमधला नात्याचा विकास त्याने अप्रतिम दृष्यांतून केला आहे! सहकुटुंब दर्ग्याला भेट द्यायला जाताना डॉन-पंकज कपूरची पत्नी तब्बू हीनं आपला जुना आणि कायमचा प्रेमवीर, डॉननं आश्रय दिलेला आणि त्यामुळे हतबल असलेला-इरफ़ान याला आपल्या जाळ्यात पूर्ण अडकवणं हे दृष्य खूप भावलं होतं.दुसरं दृष्यं शेवटाचं, इरफ़ानच्या गेमचं! इरफ़ानच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, अप्रतिम कॅमेरावर्कने ते दृष्य संस्मरणीय केलं आहे!
त्याने बनवलेला पहिला चित्रपट "मकडी"ही केबलवर पाहिला तोही आवडला होताच!
"ओंकारा" पुन्हा शेक्सपिअरचा बॉलिवूड अथेल्लो! हा मकबूलपेक्षा जास्त ग्लॉसी, चकचकीत वाटला.विशालचं व्यावसायिक चित्रपटाकडे जाणं! यात प्रचंड भावला सैफ अलि खान! मकबूलमधला इरफान, शेवटी स्वत:चा रक्ताळलेला चेहेरा, तश्याच भिंतीं यांचा भास होऊन संपूर्णपणे खचून जात असलेली लेडी मॅकबेथ तब्बू याना विसरता येतच नाही पण त्यांच्याबरोबर अपरिहार्यपणे दॄष्यंही येतातच.पंकज कपूरलाही आठवा!
ओंकारामधे सैफ अलि खान सगळ्यांच्यावर लक्षात रहातो, अजय देवगण आणि करीना कपूर हे चांगले कलावंत आणि त्यांच्या भूमिका उत्तम लिहिलेल्या असूनही, हे लक्षात घ्या!! आणि तो करीनाच्या हळदीचा सीन! एक तगडं गिमिक विशालनं इथे वापरलं होतं! मकबूलमधे इतक्या उघडपणे त्याने असं केलेलं आढळत नाही! तरीही घारीच्या तोंडातून सुटून अचूक हळद भिजवलेल्या पात्रात आकाशातून पडलेला साप, त्यामुळे सर्वत्र फासली गेलेली हळद यामुळे दष्यात्मक, आशयात्मक आणि सिनेमॅटिक असा उत्तम परिणाम साधला गेलाच.शिवाय बिहारी परंपरावादी पार्श्वभूमीवर तो संयुक्तिक वाटला.पण एवढंच होतं का? विशाल आणि त्याचा सिनेमा त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे हे आम्हाला कळलं! मकबूल तेवढा पोचला नव्हता!!
...मित्रांनो, आणि "कमीने"चं काय झालंय? त्यामुळे विशाल आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचलाय! विशेषत: सर्व तरुण वर्गापर्यंत! "ढँट्नान" ची झिंग तुम्ही चित्रपटगृहात अनुभवली आहे का? सगळ्या वयाच्या लोकांना, एकावर एक आदळून डोळ्यांवर आघात करणाऱ्य़ा प्रतिमा आणि कानांचा पडदा फाडून टाकणारा ताल आणि शब्द (पंच्याहत्तरीतल्या गुलजारचे?) नीट ऐकू येत नसूनही झिंगल्यासारखं होतं! विसर्जनाच्या डीजे आणि जनरेटर, नाशिकबाजाग्रस्त मिरवणुकीला कितीही नावं ठेवली तरी एखाद्या वृध्दालाही आतून झिंग येत असते तसं! वाढत चाललेल्या प्रचंड ताणांमुळे झिंग येत रहावी आणि थोडा काळ का होईना वास्तव विसरावं ही मानसिकता वाढत जाणार आहे मित्रांनो! आणि विशाल भारद्वाजनंही ते बरोबर ओळखलंय!
शाहीद कपूर दोन्ही भूमिकांमधे लक्षात रहातो. प्रियांका ज्या माझ्यासारख्यांना आजवर अजिबात आवडली नाही त्याना ती यात बरी वाटते. तारे जमी पर वाला अमोल गुप्ते अप्रतिम! विशालनं लिहिलेलं पात्र तो तंतोतंत जगलाय.चार्ली-शहीदच्या घरात मिखाईलला वेताच्या झोपाळ्यावर बसवून मारण्याचा सीन विशालचा कमीनेमधला परमोच्च बिंदू वाटतो.विशालचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास गाढा आहे का? अमोल खूपच चांगला अभिनेता आहे!... पुढे काय? पुढे?...
विशालनं सुरवातीच्या मुलाखतीत चित्रपटाचा बेस पुन्हा शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एररचा असे म्हटल्याचं आठवतं.त्याबरहुकुम यात दुहेरी भुमिकांच्या घोळाव्यातिरिक्त काही नाही, असलंच पाहिजे असंही नाही. अमोल गुप्तेच्या भोपे भाऊ या पात्रासंदर्भात वस्तीतला एक लहान मुलगा आणून, मग कधीतरी त्याला गणपतीचा मुखवटा चढवला आणि तो काढून तो भोपेकडे लाच मागतो असं दाखवून विशालला काय सांगायचे आहे ते स्पष्ट होत नाही. गुड्डू-शहीदच्या एंट्रीला एड्सच्या गाण्याचे प्रयोजन कळत नाही.भोपे आणि गुड्डू यांच्यामधल्या शेवटाकडे जाणाऱ्य़ा प्रसंगात परप्रांतीय अस्मिता वगैरे विशाल जास्त ठळकपणे आणतो असं वाटतं. त्याला स्वत:ला बरेच दिवस मनात ठेवलेलं काही म्हणायचं असल्यासारखं. हा पुन्हा जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न?
जुळ्याभावांच्या पूर्वायुष्याचा पट बघताना कधी नव्हे ते कंटाळायला होतं जे विशालच्या सिनेमात सहसा होत नाही.विशेषत: विशाल इथे टिपिकल बॉलिवूडपेक्षा वेगळं काहीच दाखवत नाही आणि असलेलं कंटाळवाणं होतं. त्याला टिपिकल बॉलिवूडी भुतकाळ दाखवायचा होता तर मग सगळे आक्षेप पत्करून स्लमडॉग डॅनी बॉईलचा बॉलिवूड फिल्म्सचा, जॉनरचा, अभ्यास जास्त चांगला होता असं विधान करावसं वाटतं.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ताशी या पात्राचा सगळाच पट कळत नाही, त्याचं प्रयोजन कळत नाही. कस्ट्म किंवा तत्सम ऑफिसर्सचे सीन मार्मिक होतात.
क्लायमेक्स पुन्हा कृत्रिमरित्या घडवून आणवल्या सारखाच वाटतो. पोलिसांबरोबरचा भोपेचा बार्गेनिंगचा प्रयत्न पुन्हा मार्मिक! पुनरुक्ति होईल पण भोपे, लिखाणात आणि अमोल गुप्तेमुळे सगळ्यांच्या वर कमीना वाटतो!
शेवट पुन्हा मार्मिक!
मित्रांनो अनेक गोष्टी निसटत जातात, पुरेश्या स्पष्टं होत नाहीत. एकिकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न आणि एकिकडे अस्पष्टता, जुळ्या भावांच्या भूतकाळाचं नीरस डिटेलिंगही! एड्सच्या गाण्याचं प्रयोजन गुड्डूच्या न दाखवलेल्या गेलेल्या पार्श्वभूमीत होतं? मग ते संकलनात गेलं? विशाल भारद्वाजच्या चित्रपटात संकलनाचा घोळ?
मित्रांनों, चित्रपटातून तुला नक्की काय सांगायचं आहे? असं दिग्दर्शकाला विचारायचा अट्टहास करू नये असं म्हणतात पण विशालला कमीने दाखवण्याव्यतिरिक्त काय म्हणायचं आहे हे समजत नाही अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. आपल्याला सिनेमाची गोष्टं पूर्ण होऊन काही मिळाल्यासारखं वाटावं लागतं तसं वाटत नाही असं सार्वत्रिक मत.
मित्रांनो, जास्तीतजास्त व्यावसायिकतेकडे जाण्यातही गैर काहीच नाही पण विशाल त्याच्यासारखा (त्याच्या आधीच्या सिनेमांसारखा) वेगळा रहावा असंही वाटत रहातं.
मित्रांनो, माझ्यासारख्यांसाठी विशालने, आपला पुढचा प्रवास कसा असणार याबद्दलची उत्कंठा, प्रचंड वाढवून ठेवली आहे हे मात्र निर्विवाद!