romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, September 19, 2013

उत्सव आणि उन्माद

शहरातल्या सर्वप्रथम स्वयंघोषित ’नवसाला पावणार्‍या राजा’ च्या कार्यकर्त्यांच्या कृतीला उन्माद हे एकच विशेषण लावता येतं. विशेषणं भोंगळपणे  लावण्याची आपली प्रथा आहे. उन्माद ही केवळ एक मनाची अवस्था म्हणून या संदर्भात विचारात न घेता ती एक मानसिक विकृती म्हणून विचारात घेतली पाहिजे.
दुसरं, केवळ 'त्या' एका मंडळाचा जाहीर निषेध वगैरे करुन. आपल्याला मोकळंही होता येणार नाहीए!
बारकाईनं बघितलं तर चातुर्यानं बनवला गेलेला एक सांगाडा दिसतो. जो आता उघडपणे मिरवला जातोय. मंडळं हे एक संघटन असतं. गल्ली पासून दिल्ली पंथावरचा कुणी एक राजकारणी किंवा राजकारणी समूह हे संघटन पध्दतशीरपणे तयार करुन राबवत असतो. तो हे कशासाठी, कुणासाठी करतो? हे आपल्याला चांगलंच माहिती असतं. मग तरीही आपण त्यात सामील का होतो? आपणा सर्वांचेच हितसंबंध इथे गुंतलेले असतात.
तो कुणी एक किंवा तो कुणी समूह आपल्याच जीवाभावाचा 'वाटणारा' कुणी असतो. वाटणारा असं म्हणण्याचं कारण स्वार्थाची घडी आली की आपल्या आपल्यातच आपली कशी लठ्ठालठ्ठी चालते याच्याशीही आपण पूर्ण परिचित असतो. तरीही आपण तिथेच का रहातो? तर माझं काम होतंय ना मग झालं तर! बाकीच्या गोष्टींशी मला काय करायचंय? ही कामं म्हणजे अंत्यविधीला न सापडणारा क्रियाकर्म करणारा मिळवून देण्यापासून कुठलंही असू शकतं. ते ते त्यावेळी नक्कीच खूप महत्वाचं असतं.

आपल्याला आपल्या जमलेल्या समूहापासून दूर व्हायचं नसतं. नवा समूह आपल्याला तयार करता येत नसतो. दुसर्‍या कोणत्याही समुहात आपल्याला सहज सामावून घेतलं जाणार नाही याबद्दल आपले आपणंच ठाम असतो. मग अंतर्विरोध सांभाळत बसणं अपरिहार्य होऊन बसतं. मग आहे ते पटवून घेण्यात आपलं हित आहे हे आपल्याला आपोआप पटतं. नाहीतर सगळं भूमंडळ हादरवून थरकाप करून टाकणार्‍या डिजेंच्या तालावर इतक्या मोठ्या मिरवणुका दिसत्याच ना.
त्या तशा दिसण्याचं आणखी एक कारण म्हणजे तरुणाईला आपल्या ताणांचं विरेचन हवं आहे. कानात खुपसायला एफ एम आहे. प्रवास सुसह्य व्हायला, त्या व्यतिरिक्त जालावरची किंवा हातातल्या आयुधात जतन केलेली चित्रफीत आहे. आख्खं आंतरजाल, मल्टिप्लेक्सेस आहेत. झालंच तर तोंडी लावायला इडियट बॉक्स आहे. तरीही... आयुष्यच इतकं कठीण आहे की...
दुसरं, राजकारणी मग तो कुठल्याही दर्जाचा असो बावा, त्याच्याशी संगनमत पाहिजेच. मागच्या पिढीतल्यांसारखा नसता मूल्यामूल्य विवेक काय कामाचा? मग दारात वर्गणी मागायला, म्हणजे डिमांड करायला येतो तो उंची कपडे घालणारा, उच्चशिक्षित, नवश्रीमंत तरुण. जो इतकेच द्यायचे हं! असा सज्जड पण प्रेमळ दमही देतो. तो आपल्यातल्याच कुणाचातरी भाऊ, मुलगा, जावई इत्यादी असतो. आपण हसतो. देतो. मग कुरकुरतो. तेवढी मोठी रक्कम आपल्याला परवडणारी नसते असं नाही. पण हल्लीच्या ’कुणी उठतो स्पॉन्सर करतो’ च्या जमान्यात वैयक्तिक वर्गणीची गरज काय? ही आर्थिक उलाढाल नक्की काय होते? ती योग्य ठिकाणी की अयोग्य? हे विचारण्याचं धाडस आपल्यात नसतं. असलं तर येऊन ’स्वत्ता हिशोब तपासून घ्या!’चं आव्हान पेलायची ताकद आपल्यात असावी लागते...
'ते' स्वयंघोषित नवस मंडळही नाही का केवढी लोकोपयोगी कामं करतं, देणग्या देतं?... पण मग ढकलाढकली, हमरातुमरी, प्रत्यक्ष पोलिसांना मारहाण आणि इतर निषिद्ध बाजूंचं काय? यालाच मूल्यामूल्य विवेक म्हणता ना? आजच्या या ग्लोबल व्यामिश्र वास्तवात असा विवेक सांभाळत बसणं परवडणारं आहे? तुम्हीच तो सांभाळत बसणार असाल नं तर मग टाकतो तुम्हालाच वाळीत !!!
आणि काय हो, तुम्ही ऐन जोशात होता तेव्हा यातच सामील होतात. या उत्सवात! आणि आज असं बोलताय?...
हो! होतो ना? तेव्हा कळत असून वळवून घेतलं नाही. आता स्वत:पुरता वळलोय. तेव्हा फक्त माझ्या भावनांचं, माझ्या ताणांचं विरेचन म्हणून काही कृती घडल्या. त्याचा पश्चाताप झालाय. तेव्हा सुटा विचार होत होता. आता एकूणात विचार करतोय. त्यामुळेच खरं तर पोटतिडकीने लिहितोय...
हे एक बरं करताय की... झालं तर मग... म्हणजे आता ते त्यांचा गरबा चालू ठेवणार. दुसरे नव्याने ते काय ते छटपूजा की काय ते काढणार आणि आम्ही नववर्षाची शोभायात्राही काढायची नाही असं तुमचं म्हणणं असेल!!! विशेषत: प्रांतीय अस्मितेचा पुरस्कार करणारा तडफदार नेता आपल्याजवळ असताना?...
बघा बुवा! तेव्हा मी सुटा सुटा विचार करत होतो. आता तीच चूक तुम्ही तर करत नाही ना?...
...तर हे असं आहे... एकूणात की काय तो विचार करत रहाण्याचं...
ते कधी कधी करत रहायला हवंच की. एरवी आहेच. आत्मरंजन... आणि जनरंजनही...

No comments: