Monday, May 19, 2008

तेंडुलकर आपल्या लेखनाविषयी...

“कितीही थकलो असलो,कोणत्याही मनस्थितीत असलो,कुठेही असलो,तरी हातात पेन धरले आणि ते कागदावर चालू लागले की माझ्या वृत्ती तरारतात.नव्याने जन्माला येतो आहोत असे वाटते. अद्न्यात प्रदेशाचे वारे कानाला लागू लागते.सगळ्या चिंता,व्याप-ताप दूर होतात.भोवताली काय चालले आहे याचा विसर पडतो…लिहिण्याच्या खास खोलीत टेबलाशी बसून,भोवतालच्या शांततेचा आस्वाद घेत,सुवासिक उदबत्त्या वगैरे लावून मोहोरेदार कागदावर ठेवणीतल्या पेनने मी कधी लिहिल्याचे मला आठवत नाही.मिळेल ती जागा,असेल ते वातावरण,हाताशी येईल तो कागद आणि पेन हीच माझ्या लेखनाची पध्दत ठरून गेली.
अगदी रूग्णशय्येवरदेखील डॉक्टरांच्या नकळत मी लिहिले आहे.त्यांच्या मते लिहिण्याचा शीण आजारात टाळावा.पण मला कुठे लिहिण्याचा “शीण” होत होता?ते माझे सुख होते.ती माझी चैन होती.”- विजय तेंडुलकर

Labels:

थोर आंतरराष्ट्रीय नाटककार अनंतात विलीन!

थोर नाटककार विजय तेंडुलकर काळाच्या पडद्याआड?

एका युगाचा अस्त झालाय!
खरच असं झालंय?
किती लोकाना जमतं आयुष्यात प्रत्येक पातळीवरचा संघर्ष निभावणं?असा संघर्ष निवडून त्याचा सामना करणं?
अ कॅट ऑन अ हॉट टिन रूफ- दिल्लीच्या श्रीराम सेंटर मधल्या एका व्याख्यानात त्यानी म्हटलंय तसं?-ज्या दोन व्याख्यानांनी अनेक रंगकर्मी बळ घेऊन उभे राहिलेत त्यातल्या व्याख्यानात!तसं?
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो असं म्हणतो नाही एरवी आपण?
त्यांचा आत्मा तर सतत लढत राहिलाय वंचितांना नाकारणाऱ्या सगळ्या व्यवस्थेविरूध्द!
मला नाही वाटत काळाचा पडदा संपवू शकेल हे चिरंतन नाट्य!मराठीतला आद्य वैश्विक नाटककार ह्या बिरूदानं मिरवलं गेलेलं!
निर्माण झालेली भयानक पोकळी भरून काढणारं “तें”चं लिखाण नुसतं उलगडलं तरी पुढच्या पिढ्या भरून पावतील हे सत्य मागे राहिलंय आता!

Labels:

आशा सुटंना देव भेटंना!

माझ्या सेमी-इलिटरेट आजीच्या तोंडून माझ्या लहानपणी ऐकलेली ही एक व्यावहारिक शहाणपणा सांगणारी म्हण…
आशा सुटंना देव भेटंना!
लहानपणीच ऐकलेली एक गोष्ट…
भक्ताला पावलेला देव भक्ताच्या हातात एक डबा देऊन म्हणाला,“थांब! लगेच उघडू नकोस! जेव्हा खरी गरज लागेल तेव्हाच हा डबा उघड!जा!”
भक्त निघाला.माणूसच तो! डबा उघडू नकोस असं बजावल्यामुळे डबा उघडण्याची उत्सुकता प्रचंड वाढली, ताणत गेली आणि शेवटी तुटली!त्यानं डबा उघडला आणि त्यातली एक एक वस्तू गुरूत्वाकर्षणाचा नियम भेदून भराभरा उडून जाऊ लागली!तो उड्या मारून त्या पकडायचा प्रयत्न करायला लागला.एकही वस्तू हाताला लागेना.डबा बंद करण्याचं ध्यानात आलं तेव्हा तो हादरला. घाईघाईत त्यानं डबा बंद केला आणि कपाळाला हात लाऊन रस्त्यातच मटकन खाली बसला…
भक्ताच्या संकटात लगेच धाऊन येणारा तो गोष्टीतला देव पुन्हा प्रकट झाला!
“बघ!तुला नको करूस म्हणून जे सांगितलं नेमकं तेच तू केलंस!”
माणूस म्हणाला,“मग काय करू?शेवटी मी एक माणूसच आहे!”
देव म्हणाला,“आता तो डबा उघड!”
माणूस तो डबा छातीशी आणखी कवटाळून म्हणाला, “नाही!अजिबात नाही!आता आतलं उरलंसुरलेलंही सगळं उडून जाईल!”
देव म्हणाला, “जे मी तुला करायला सांगतो त्याच्या विरूध्दच काहीतरी कर तू नेहमी!अरे माणसा,आता तो डबा खरंच उघड!त्यात एकच वस्तू शिल्लक राहिलीय आणि तू कितीही टाकून दिलीस तरी ती गोष्ट तुला सोडून जाणार नाही!!”
माणूस भांबावला!काय करावं कळेना!बळेबळेच त्याने डबा उघडला आणि देवाकडे पाहिलं.धावून आलेला तो देव आता अंतर्धान पावला होता.
आजतागायत माणसाला सोडून न गेलेली ती गोष्ट म्हणजे आशा!
मनाच्या कोपऱ्यात असलेला समाधानाचा देव सतत भेटत राहिला तरी ती सुटत नाही!
रॅटरेसमधे धावणाऱ्या आपली तर नाहीच नाही,आपल्या आशेचा होतो लोभ,मग होते लालसा. जगायचीच आशा नसणं,आयुष्यच नाकारणं हे मात्र भयंकर.
हेलन किलर,कार्व्हर,मदर थेरेसा,नसीमा हुरजूक यांसारख्यांनी या आशेच्या बळावर काय नाही उभं केलं?
त्या कोवळ्या वयात माऊलींना सुचलेली ती आशा,ते पसायदान,ते इतर कुणाला सुचलं असतं?

Labels:

Wednesday, May 14, 2008

“कन्या” ह्या माझ्या लवकरच सादर होणाऱ्या सेन्सॉरसंमत दीर्घांकातला एक अंश

दोन-चार तरूण विचित्र पध्दतीने खिदळत असल्याचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत. रंगमंचाच्या जराश्या मागच्या भागावर जांभळ्या प्रकाशझोतात एका जुनाट खोलीत एका कॉटवर कुणी व्यक्ति पांघरूण ओढून झोपली असल्याचं दिसतं आहे.आधीच सुरू झालेले ते विचित्र समुहहास्य भयंकर टोकाला जातं,एक स्त्री आवाजातली भयंकर किंकाळी आणि त्याच क्षणी वास्तव प्रकाश (वेळ सकाळची) येऊन त्याबरोबरच कॉटवरची ती व्यक्ती दचकून उठून बसते,कानावर हात ठेऊन,प्रचंड घाबरलेली… ती एक कॉलेजवयीन युवती आहे. आपण कुठे आहोत हे तिला समजलेलं नाही.पार्श्वभागी आघाती ठोकेवजा संगीत.घाबरून भानावर येत ती इकडे तिकडे बघते.भीती जावी म्हणून कशाचातरी आधार घेण्यासाठी तिचे हात आंधळ्यासारखे बसल्याजागीच कॉटवर इतस्तत: फिरतात.काहीतरी हाताला लागते म्हणून ती ते हातात घेते.ती वस्तू म्हणजे तिचीच ओढणी आहे.प्रचंड भीतीमुळे ती पहिल्याप्रथम ओढणीकडेही पाहिलं न पाहिल्यासारखं करते.मग पुन्हा ओढणीकडे पहाते.तिचे डोळे विस्फारतात.ओढणी हातात घेऊन ओढणीकडे बघत असतानाच तिचा कसलातरी निर्णय पक्का होऊ लागतो.मग पुन्हा ती इकडेतिकडे पाहू लागली आहे.तसं करताना अनवधानाने किंवा अर्धवट अवधानाने ती ओढणी लपवल्यासारखी करते.मग ती कानोसा घेते.घेतलेल्या निर्णयामुळे तिला धीर आलेला दिसतो आहे.हळूहळू तिची नजर खोलीच्या आढ्याकडे वळते.खोलीच्या आढ्याच्या दिशेने, दरवाज्याच्या वर बघत ती हातात ओढणी घेऊनच उठते.स्वत:भोवती फिरल्यासारखी हळूहळू सर्व खोलीभर वरच्या दिशेने बघत पण न बघितल्यासारखेही करत- जणू कुणी बघतंय त्याला चोरून वर बघितल्यासारखे करत- फिरते.खोलीच्या खिडकीकडे तोंड करून पाठमोरी होते.बाहेर बघते,खिडकीच्या वरच्या तावदानांकडे,गजांकडे बघत रहाते.पुन्हा बाहेर पहाते. खिडकीचा पडदा ओढून घेते आणि तिला खोली बाहेर कसलीतरी चाहूल लागते.ती स्तब्ध होते.खोलीच्या दाराच्या दिशेने बघत कानोसा घेते.
प्रेक्षकांच्या डाव्या बाजूला असलेल्या विंगेतून एक म्हातारी नऊवारी नेसलेली स्त्री काहीतरी गुणगुणत, अधू झालेल्या नजरेने हातातल्या परातीत असलेले तांदूळ निवडण्याचा प्रयत्न करत प्रवेशते.ती हातातल्या परातीवर उजेड पडावा म्हणून जागा बदलत इथपर्यंत आली आहे.एकदम आठवण झाल्यासारखी मागे वळून डाव्या विंगेत बघत खणखणीत आवाजात साद घालते.
म्हातारी: सुनंदेऽऽ… (डोळ्यांवर हात धरुन आत पहात) एऽऽसुनंदेऽ (चरफडत) ओ देशील तर मरशील!(म्हातारीच्या पहिल्या हाकेसरशीच खोलीतली ती कानोसा घेणारी युवती पाय न वाजवता पटकन्‍ येऊन कॉटवर बसते.मांड्यांवर ओढणीचा बोळा दाबून धरत.कानोसा घेणं चालूच आहे.) जळ्ळ्मेलं!(परातीकडे पहात,तांदूळ निवडायचा प्रयत्न करत) दिसत नाही एकतर! उजेड म्हणून कुठेच… या आश्रमात…(मागे वळून विंगेजवळ येत) ए बाईऽऽअगं परसात कुठे उलथतेस सारखी सारखी,पहिलटकरणीसारखी! बस इथे! बस! त्या कैऱ्या चीर! कैऱ्या चीर लोणच्यासाठी!! कितीवेळा सांगायचं गं तुला!(जास्तच रागावलो आहे हे लक्षात येईन एकदम समजूत घातल्यासारखं करत)असं करू नये पोरी…आसरा मिळालाय तुला-मला इथे- या आश्रमात! अं? हं!(पुन्हा गुणगुणत काहीच न झाल्यासारखी तांदळाकडे लक्ष एकवटते.पुन्हा काहीतरी आठवल्यामुळे वळून विंगेत बघते आणि ओरडतेच) आगं आश्या चिरतात कैऱ्याऽऽ च्यक्‍ च्यक्‍ च्यक्‍(चुकचुकत आत विंगेत धावतेच.खोलीतल्या युवतीचं लक्ष जास्तच एकाग्र झालंय.कानोसा घेत,चाहुल आजमावत ती थोडा वेळ जाऊ देते.मग अधिक आत्मविश्वासाने ओढणीला हलका पीळ देत पक्का निश्चय झाल्यासारखी त्याच खिडकीजवळ जाते.त्याचवेळी प्रेक्षकांच्या उजव्या बाजूच्या विंगेतून,आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून एक चाळीशी उलटलेली रूबाबदार स्त्री घाईघाईत असल्यासारखी प्रवेशते.वाटेत संस्थेचं ऑफिस असल्यासारख्या टेबलावर हातातली बास्केटवजा मोठी पर्स ठेवते. मनगटावरच्या घड्याळात पहाते.उजव्या विंगेजवळ थबकून आत कानोसा घेते.मग त्या मुलीच्या खोलीकडे वळते.दारावर टकटक करते.दरम्यान आतली मुलगी थोडीशी दचकते पण सावध होते आणि ओढणी सावरून खांद्यावरून घेत,खिडकीचा पडदा दूर करून स्तब्ध उभी रहाते.दारावर टकटक करणारी स्त्री जरा वेळाने दार ढकलते.खोलीत प्रवेशते.समोर मुलीला पाहून थांबते.प्रसन्न हसते.)
स्त्री: (प्रसन्न हसत) गूड! व्हेरी गूड! शंभर पैकी शंभर मार्क सांगितलेलं ऐकल्याबद्दल- आतून कडी न लाऊन घेतल्याबद्दल! गूड! आणि आता तुला बरंही वाटायला लागलंय!- सांगितलेलं ऐकून वेळच्यावेळी औषधं घेतल्यामुळे! गूड! (मुलगी स्तब्धंच,बाहेर बघत.स्त्री तिच्याकडे बघत बघत,प्रसन्न हसत तिच्या मागून कॉटजवळ येत)ये!कितीवेळ उभी असशील ये! बस! (मुलगी तशीच) ये अगं! (कॉटवर, आजूबाजूला साफसूफ केल्यासारखे करते. मग मनाशी काहीतरी ठरवून मुलीकडे बघत) सारिका ये! झाल्या प्रकाराबद्दल तू तुझं मन मोकळं करणं खूप आवश्यक आहे आता! गरज आहे ती तुझी! आमची! ये! (मुलगी जागची हालत नाही.स्त्री हळूवार पावलं टाकत मुलीजवळ जाते.तिच्या खांद्याला हळूवार स्पर्श करते)ये! सारिका! चल!(त्याच वेळी उजव्या विंगेतून मगाशी आलेली ती म्हातारी स्त्री पुन्हा त्याच विंगेतून प्रवेश करते.)म्हातारी: (पुटपुटत, परातीत बघून डोळे फाडत) आश्या चिरतात कैऱ्या?(मागे वळून बघत) हिच्या बापानं-जाउदे सोमणबाई! तुम्ही असं काहीतरी बोललेलंच रहातं मागे-शिस्तीचं नाव काढलं-(उजेडासाठी पुढे पुढे येता येता टेबलावरची मोठी पर्स दिसते.) आग्गोबाई!ऽऽ जयाताई आल्या की काय? आतच गेल्या असणार! (लहान मुलीच्या चपळाईने खोलीच्या दाराजवळ जातात.आपण आतल्याना दिसणार नाही असा पवित्रा घेत दाराच्या फटीतून आत कानोसा घेत उभ्या. तोपर्यंत जयाताईंनी सारिकाला कॉटवर आणून बसवलेलं आहे आणि ती काहीतरी बोलण्याची त्या वाट बघत आहेत,प्रसन्नं चेहऱ्याने.) जयाताई: हं बोल सारिका... इथे येऊन तुला आता बरेच दिवस झाले…ही महिला आश्रमशाळा आहे… अनाथ लहान मुली इथे शिकायला असतात… आणि कुठलीही अन्याय झालेली स्त्रीसुध्दा, स्वत:च स्वत:ला मदत करून तिला पाहिजे तितके दिवस इथे राहू शकते. तिचा प्रॉब्लेम, तिच्यावर आलेलं संकट पूर्णपणे कसं निवारता येईल हे मी स्वत: या आश्रमशाळेची संचालिका म्हणून बघते. माझ्या इथल्याच (हसत) तुझ्यासारख्या, आमच्या सोमणबाईंसारख्यांच्या आणि इतर अनेकींच्या मदतीनं… बोल… मोकळी हो… स्वत:ला मदत कर… (इतका वेळ मान खाली घालून बसलेल्या सारिकाने दरम्यानच्या काळात आपली मान वर केली आहे पण कुठल्याही प्रतिसादाविना ती समोर शून्यात बघत बसली आहे.जयाताईंना हे जाणवतं. त्या प्रसन्न हसतात, त्याना अशा प्रकाराची सवय आहे, पण त्यांच्याही चेह्ऱ्यावर आता तिच्या प्रतिसाद न देण्यामुळे काळजी दिसू लागली आहे. त्या एक चाळा म्हणून जवळच्या टेबलावर ठेवलेल्या तिच्या औषधांकडे नजर टाकतात.त्यांच्या काही लक्षात येऊ लागतं. त्या तिच्याकडे पहातात.)तू… डोस घेतलेला नाहीस अजून सकाळ्चा… (अत्यंत काळजीने) असं करू नकोस सारिका… चल! (डोस देण्याची तयारी करत, पुन्हा नव्याने, प्रसन्नपणे) चल डोस घे आणि जेवायची वेळ होईपर्यंत झोप काढ… ती येईलच औषधांमुळे हं!… आता काहीही विचारत नाही मी तुला. घे! (सारिका त्यानी दिलेला डोस, गोळ्या घेते. तोपर्यंत त्या तिची चादर सारखी करतात.तिचं डोस घेणं झाल्यावर त्या तिला झोपण्यासाठी मदत करतात.ती झोपल्यावर आईच्या मायेने त्या तिच्या अंगावरची चादर नीट करतात.तिने डोळे मिटून घेतले आहेत.तिच्याकडे बघत प्रसन्न हसत त्या खोलीच्या दाराजवळ येतात आणि इतक्या वेळ कानोसा घेणाऱ्या सोमणबाई एखाद्या लहान मुलीसारख्या पळत पळत हातातल्या परातीसकट उजव्या विंगेजवळ येतात.तांदूळ निवडण्याचं नाटक चालू करतात.तोपर्यंत जयाताई खोलीबाहेर आल्या आहेत.

Labels:

Sunday, April 20, 2008

साद देती हिमशिखरे!

उमेदवारी म्हणजे फक्त अथक प्रयत्न किंवा संपूर्ण डिव्होशन हे समीकरण आजच्या स्पर्धेच्या युगात बाद ठरलंय! निवडलेल्या क्षेत्राचा अचूक अंदाज पाहिजे! निवडलेल्या क्षेत्रात आपल्याला नक्की काय हवं याचा निर्णय पक्का हवा,
कुठली कळ दाबली की वरची पायरी उघडेल याची समज पाहिजे, नसली तर ती संपादित करता आली पाहिजे! एक प्रकारची आक्रमकता अंगात बाणवता आली पाहिजे! प्रचंड स्पर्धेच्या, दिखाव्याच्या या जगात शर्यतीतला योग्य उंदिर होता आलं पाहिजे!
अन्यथा…
आपल्याला जे आवडतं, पटतं, योग्य आहे असं वाटतं ते प्रचंड संयम ठेवून करत रहाण्याची ताकद कमवता आली पाहिजे!
भावनिक, आर्थिक, लौकीक कशाही प्रकारचं आव्हान झेलता आलं पाहिजे, प्रचंड सोसता आलं पाहिजे आणि तरीही प्रयत्नात सातत्य राखता आलं पाहिजे!

Labels:

Friday, April 11, 2008

ब्रह्मकमळ

ते म्हणे अनेक वर्षांतून एकदा
फक्त रात्रीच उमलतं
त्याचा वास, त्याचं दिसणं
मन धुंद करणारं, वेडावणारं
ते पहाणारासुध्दा भाग्यवान
ज्याच्या बागेत ते डोलतं
तो तर सुखी सदरेवाल्याचा वडिलभाऊच!...
कोपऱ्यावर माझा मित्र परस्थाला सांगत होता-
याच्या बागेत पण ते डोलतं, मी पाहिलंय!
मला कसं माहित नाही म्हणून
मी स्वत:लाच खूप शिव्या दिल्या
सुंदरता, सुवास, भाग्य, सौख्य
साली वेड लागायचीच पाळी!...
…आणि मग सुरू झाली
अनेक धृपदांची आवर्तनं
सुख, दु:ख, अपेक्षा, अपेक्षाभंग,
भय, शरम…
असा कल्लोळ
नि:श्वास, उच्छ्वास, प्रच्छ्वास
श्वासोच्छवास बंद पडावा इथपर्यंतची पाळी
सामान्य भाषेत सरबरीतपणा…
अश्या मग बऱ्याच रात्री चाळवून
बर्फाचे डोंगर, लिंबांच्या राशी रिचवून
हल्ली थंड होत चाललेल्या डोक्यात
प्रकाश पडत चाललाय-
उमलत्या त्या रात्रींमधे
मी माझ्या अस्तित्वाशी झुंजत होतो
माझ्याच तुरूंगात…
कुंपणाचाच फरक होता
त्यानाच काय मलाही वाटत होतं
ती बाग माझीच म्हणून…
शिवाय माझ्या गल्लीला
कोपराच नव्हता……

Labels:

Wednesday, April 9, 2008

वाटबघ्याचं दिवास्वप्न

आता ती येईल
पायांच्या बोटांवर चालत
चवडे उंच करून घसटत घसटत
जागच्या जागेवर पावलं टाकल्यासारखी
पण वेगानं…
पाचांपैकी एक बोट (एकच: नशीब माझं!)
दातांनी सोलत
फणसाच्या उकडलेल्या आठळ्या सोलाव्यात तसं
नजर पाडसासारखी भेदरलेली
मला बघून पुटपुटेल “ऍग्वू न्कोस्न!”…
आज तशी तिची पंचाईतच
माझ्या डोळ्यावर गॉगल
त्यामुळे पारा किती चढलाय
या बाबतीत गोंधळच गोंधळ
मी काहीच बोलणार नाही
काचांच्या आड मिष्कील डोळे
हा आज ऍडवांटेज टू मी असेल
खरोखर न चिडता
अजिबात न चिडता
चिडण्याचं बेअरिंग घेऊन (इति: नाटयकला)
तिची घालमेल मी एंजॉय करत असेन…
आता ती भांबावणे, हवालदील होणे
जीव खालीवर होणे इ. अवस्थांमधून
परमोच्च बिंदूला पोचत असेल…
सफाईसाठी स्वत:जवळच्या कुठल्या
माध्यमाचा आसरा घ्यावा
ह्या संभ्रमात ती जेव्हा
कोंडी फोडायला जाईल
तेव्हा मी उजवा हात वर करून
नाट्य शिक्षण शिबिरात शिकवतात
ते जेश्चर पहिलं करीन
थांबवण्याचं!...
तिला काहीच कळणार नाही
(मला तरी तेव्हा कुठे काय कळलं होतं!)
बॉम्बहल्ल्याच्या आधी
खबरदारीची सूचना करतात तिला अनुसरून
ती मनातल्या मनात-
कानावर हात घेऊन
आडोशाखाली आंग आकसून
थरथरत असेल
आणि मी म्हणेन
“अगंऽ… फक्त तास-दीड तास तर झालाय मला
इथं उभं राहून
तुझी वाट बघत!”…

Labels:

Tuesday, April 8, 2008

आयुष्य

आयुष्य
असंख्य जीवांचे पुंजके
या फलाटावर त्या फलाटावर
कुणाचा चुकलेला
बदललेला
कोण घाईत कुणी संथ
आपल्या आपल्यातच
प्रवेशासाठी तैय्यार…
जीव सगळी भानं, मर्यादा तोडून बेपर्वा
प्रवेशाचा धुमाकूळ!...
आधीच प्रवेशलेल्या हुशारांची स्थानं बळकट
मग नंतरचे कोण कुठे जमेल तसे
भांडून, उपकारावर, आधाराने
एकमेकांच्या पायावर, पुढे जाण्याच्या घाईत
असोशीने दाखल…
जागत, झोपेत प्रवास…
असंख्य स्थानकं आणि येणारे लोंढे लोंबकळत
त्यांचाही समावेश
त्यांची तर इच्छाही बळकट आणि दोरीही
मग सापशिडीतली शिडी गवसल्याचा वेग
स्थानकांवर न थांबता ती मागे टाकल्याचा आनंद…
नेहेमीच नाही तरीही वेळापत्रकाप्रमाणे
वेळेचं अंदाजपत्रक किंवा अंदाजपंचे वेळापत्रक…
पुन्हा कुणाचं सोडून जाणं, कोणाचं आगमन
कुणा भाग्यवंताला मिळालेलं
त्यानं करून घेतलेलं- स्वत:चं स्थान
स्वत:चं म्हणजे प्रवासाच्या अंतापर्यंतचंच…
कुणाला ते अंतीच गवसलेलं
तोपर्यंत चिकटून बसणाऱ्यांबद्दल चरफड…
संवेदी जीवांचं पाश तयार करणं
सुखदु:ख वाटणं, “वरच्याला” शिव्या घालणं
आपापली स्थानं सांभाळत
हिरीरीने, संतापाने, सौम्यपणे, नाईलाजाने, स्थितप्रद्न्य…
तोपर्यंत प्रवास संपत आल्याच्या खुणा
निर्गमनं
एवढा वेळ ताटकळणाऱ्यांना स्थानलाभ
चरफडीतून मुक्तता…
कुणा अध्यात्मी जीवाची मोडलेली
ब्रह्मानंदी टाळी
कुणाचे सुस्कारे, नि:श्वास
पायऊतार…
नीरवता… सुटलेसुटलेपण…
निर्वात पोकळी आणि
“ पुढे काय?”
रेल्वेच्या डब्यासारखंच
आयुष्यही!

Labels:

Sunday, April 6, 2008

मुतलुलुक-ब्लिस

मुतलुलुक- ब्लिस
हे एका तुर्की चित्रपटाचं नाव.परदेशी चित्रपटाचं नाव योग्यवेळी आठवणं, त्याचा योग्य उच्चार समजणं, तो समजल्यावर तो योग्य पध्दतीनं करता येणं हा सगळा नव्याने शाळेत जाण्यासारखा अनुभव असतो.
गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या (आणि दरवर्षी नेमाने होणाऱ्या)थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला उदघाटनाचा मान मिळाला होता.
मुतलुलुक चित्रपटाच्या पहिल्याच चौकटीत दिसतं एका निर्मनुष्य तळ्याच्या काठी कुशीवर पडलेलं एका वयात आलेल्या मुलीचं शरीर.चित्रपटाची नामावळ चालू होते आणि कॅमेरा तिच्यावर आवर्तनं घेत आणखी वर जाऊन दृष्याची पार्श्वभूमी उलगडत असताना, तळ्याचा निर्मनुष्य परिसर दाखवत असताना मुलीच्या ओटीपोटाजवळून बाहेर आलेली लांबलचक आणि सुकत चालेलेली रक्ताची रेघ दिसते.मुलगी जीन्स, ओव्हरकोट, बूट इत्यादी आधुनिक वेषात, संपूर्ण वस्त्रात आहे.
एक वृध्दत्वाकडे झुकलेला मेंढपाळ, आपल्या जनावरांना तिथे घेऊन आलेला तिला पहातो.तो तिला ओळखतो, ती शुध्दीवर असल्याचं त्याच्या लक्षात येतं.शरीर खांद्यावर टाकून तो तिला तिच्या घरी पोचवतो.
मुलीला वडील आहेत, सावत्र आई आहे.तिच्यावर प्रेम करणारी आजी आहे.मुलीला अत्याचाराबद्दल, तो करणाऱ्याबद्दल विचारलं जातं.ती काहीच सांगू शकत नाही.अश्यावेळी मुलीला दोषी ठरवणं, तिला शिक्षा करणं, ती शिक्षाही देहांताची नाहीतर परागंदा होण्याची-पर्यायानं मरणसदृष्य आयुष्य आणि त्याचा शेवट प्रत्यक्ष मरण! हे समाजाचे नियम! मुलीला एका अंधाऱ्या कोठडीत ठेवलं जातं.सावत्र आईला अश्या अवस्थेत मुलीला घरी आणल्याचं आवडलेलं नाही.त्या मुलीवर अत्याचार होऊन तिला घरी आणलंय हे गावाचा सर्वेसर्वा आणि गावातल्या मोठ्या पिठाच्या गिरणीच्या मालकाला कळलं तर त्याचे परिणाम वाईट होतील ह्याची जाणीव सावत्र आई लगेच करून देते.बापाला तो विचार खातोय पण तरीही तो अत्याचारित मुलीला ठेऊन घेतो.असं करणं धोकादायक आहे.
मुलीचे वडील तरीही हे गावच्या त्या सर्वेसर्वाच्या कानी घालतात, ते सर्वेसर्वाचे नोकर आहेत.त्यांचं एकमेकात नातंही आहे.सर्वेसर्वाला हे अजिबात मंजूर नाही.गावकऱ्यांनी बोटं दाखवावित असं कुणी का करावं?ती मुलगी ही तर त्या सर्वेसर्वाच्या जवळच्या नात्यातली आहे!तिनं परागंदा व्हायलाच हवं हे सर्वेसर्वा ठासून सांगतो.तिला दूर कुठेतरी सोडून यायला हवं.हे काम कोण करणार?
सर्वेसर्वाचा मुलगा आर्मीत आहे.नुकताच एक पराक्रम गाजवून तो मानाने गावात परतलाय. तरणाबांड,कोवळा,मजबूत देहयष्टीचा.तो त्या मुलीचा दादा लागतो(पहिला,दुसरा कझीन).या मुलावर त्या मुलीला दूर कुठेतरी सोडून येण्याची जबाबदारी टाकली जाते.सर्वेसर्वाचा तो अत्यंत लाडका मुलगा आहे.तो वडलांचं सगळं ऐकणारा आहे.समाजाचा कायदा म्हणून मुलीला दूर शहरात नेऊन मारून टाकणं आवश्यक आहे असं वडील सांगतात आणि आर्मीतला जवान मुलगा ते ऐकतो.
अंधारकोठडीत मुलीला भल्या पहाटे गरम पाण्यानं स्नान घातलं जातं, सजवलं जातं, बळी देण्याआधी असावा तसा हा विधी! आजी मुलीला समाजातल्या स्त्रीच्या स्थानाबद्दल सांगते.दोघीही आणि इतर कुणीही त्यांच्या अवस्थेत काहीही बदल करू शकत नाही!
सतत सद्‍गदित होणाऱ्या त्या कोवळ्या मुलीच्या ओठावर आणि चेहेऱ्यावर माझ्यावर अत्याचार झाला यात माझी काय चूक हे रास्त भाव आहेत.आपल्यावर अत्याचार कोणी केला हे सांगायला ती अजिबात तयार नाही किंबहुना त्या प्रसंगाच्या उल्लेखानेच ती पूर्णपणे कोसळते.
अत्याचारित मुलीला तिचा लांबचा दादा, सर्वेसर्वाचा आर्मीतला मुलगा शहरात घेऊन आलाय.तो सर्वप्रथम आपल्या सख्ख्या मोठ्या भावाकडे येतो.या भावाचं आणि वडलांचं-सर्वेसर्वाचं वाकडं आहे.मुलीला घेऊन आपला धाकटा भाऊ शहरात का आलाय हे मोठ्या भावाला, वहिनीला समजतं.मोठा धाकट्याला परावृत्त करू पहातो पण धाकटा आपल्या मिशनवर ठाम आहे.
आपल्या नात्यातल्या मामे.मावसबहिणीला (कझीन) मारायचं कसं यावर मात्र त्या आर्मीमेनचं गाडं अडू लागतं.तो तिला गोळी घालू शकत नाही.तिला खूप उंचावर नेऊन उडी मारायला लावणं, ढकलणं त्याला अवघड होऊ लागतं.कुणालाही असं फुकाफुकी मारणं शक्य नाही या निष्कर्षापर्यंत तो येतो.
सर्वेसर्वा कुठलंही रिस्क घ्यायला तयार नाही.त्याची माणसं या दुकलीच्या मागावर आहेत…
एवढ्या विस्तृत स्वरूपात ही गोष्ट सांगायचं एक कारण म्हणजे या चित्रपटाचं अतिशय व्यवस्थित आणि तर्कशुध्द नॅरेशन- दिग्दर्शकाचं गोष्ट सांगणं! पुढे जाऊन कदाचित जाणवेल की अरे, ही गोष्ट हिंदी सिनेमासारखीच आहे, तरीही ती सामान्य हिंदी चित्रपटापेक्षा वेगळी आहे.ती चांगल्या पध्दतीने सांगितली गेली आहे.यात हिंदी सिनेमावर टीका करण्याचा उद्देश नाही अलिकडे बनणारे बरेच हिंदी चित्रपट सर्वार्थाने वेगळे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच…
पुढे मग त्या जवानाची कुतरओढ चालू होते, मुलीला कळतं की आपल्याला इथे का आणलं गेलंय, आपला लांबचा मोठा भाऊ आपलं काय करणार आहे.मुलगा मिशन पार पाडतो की नाही हे पहाण्यासाठी माणसं मागावर आहेत.मुलगा मुलीला वाचवण्याचा निर्णय घेतो.
आता या दोघांना जीव वाचवत रहाणं, निरूद्देश पळत रहाणं भाग आहे.फिशरीजचा धंदा असलेला त्या मुलाचा एक मित्र त्याला आपल्या क्रूझवजा घरात सहारा देतो.त्याचा माग लागून दोघांना तिथूनही पळावं लागतं.मग नवा किनारा.एका उमद्या फिलॉसॉफीच्या प्राध्यापकाच्या क्रूझवर दोघेही नोकर म्हणून रहातात.दोघांनी आपली खरी ओळख कायम लपवून ठेवली आहे.त्या प्राध्यापकाला सहवासाने ते कळतं.प्राध्यापक घटस्फोटीत आहे, आपण कोण आहोत(आयडेंटिटी क्रायसिस) या गहन प्रश्नानं त्याला ग्रासलंय.मुलगी अत्यंत निरागस आहे.प्राध्यापक त्या दुर्लभ निरागसतेच्या प्रेमात पडतो.मुलाला वाटतं या दोघांचं काही चालू झालंय.तो तिच्या तोंडात मारतो, प्राध्यापकावर हल्ला करतो.प्राध्यापक त्याच्या या कृतीच्या अर्थ त्याला समजावून देतो.तू त्या मुलीत आणि तुम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडला आहात ह्या वास्तवाचा स्वीकार करा!…
हा सगळा भाग उपकथानकाचा,मूळ गोष्टीपासून दूर गेल्यासारखं वाटलं ना?पण मजा अशी की याही सगळ्या प्रकारात आपण चांगलेच गुंतले जातो.डिटेलींग हा चित्रपटाच्या संहितेतला अतिशय महत्वाचा भाग आहे.उत्तम दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधे तो नेहमीच दिसतो(उदा.मदर इंडिया-मेहबूब खान).शिवाय आपण मूळ गोष्टीपासून फारकत कधीच घेत नाही.त्या दोन तरूण मुलामुलींच्या चित्रपटातल्या कॅरेक्टरला न्याय देऊन पुढच्या घडामोडी(डेवलपमेंट्स)दाखवणं, योग्य पध्दतीने विशद करणं(डिटेलींग) खूप महत्वाचं आहे.गोष्टीच्या पुढच्या भागाची ती मागणी आहे.
तो प्राध्यापक त्या कोवळ्या जीवांना आधार देतो,धाडस देतो.ती दोघं निर्भयतेने एकमेकांसह पुढचं आयुष्य घालवायचं ठरवतात.किनारा गाठण्यासाठी एका वेगळ्या होडीतून ती दोघं निघतात. प्राध्यापक त्याना निरोप देतो.मुलगा होडी मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याच वेळी त्या उघड्या होडीच्या दुसऱ्याबाजूला बसलेल्या मुलीला मागच्या मागे तिचं तोंड दाबून पळवण्यात येतं! आली तशी ती मोटरबोट मुलीचं अपहरण करून निघून जाते!
प्रेक्षकांनाही हा चांगलाच शॉक आहे.शॉक हे नुसतंच गिमिक आहे का?चित्रपटासाठी आवश्यक गोष्टींपैकी ते एक आहे हे नक्की! योग्य वेळी,प्रेक्षक बेसावध असताना असा योग्य धक्का येणं चित्रपटाच्या रंजकतेत नक्कीच भर घालतं.आणि तसंच भर घालतं परमोच्च बिंदूवर धक्का देऊन उघडणारं रहस्य! ते ही या चित्रपटात आहे…
आता सुरू झालाय चित्रपटाचा उत्कर्षबिंदू- क्लायमॅक्स! मुलीचं अपहरण, अपहरणकर्त्यांचा पिछा करणारा तो मुलगा.हा सगळा जथ्था किनारा गाठतो.किनाऱ्यावरच्या झुडपातून जीव घेऊन धावणारी मुलगी, तिच्या पाठोपाठ तो मुलगा, त्यांच्या मागावर ते अपहरणकर्ते.मुलाच्या असं लक्षात येतं की अपहरणकर्त्यांना त्याला अजिबात धक्का लावायचा नाही, मुलीला मात्र त्याना शिल्लक ठेवायचंच नाहिये!मुलगा आता जीव तोडून मुलीला वाचवायच्या प्रयत्नात आहे.मुलगी जीव तोडून धावत पाण्यात शिरते.तिला गोळी लागू नये म्हणून तिला कव्हर करणारा मुलगा तिच्यापाठोपाठ.मुलगी एका क्षणी कोसळून पडते.तिला वाचवताना तो मुलगा तिच्यावर पडतो. मुलगी घुसमटते आणि ओरडते, “काका!माझ्यावर पुन्हा अत्याचार करू नका!”
हे ऐकून तो मुलगा हादरतो, बघणारे आपणही हादरतो.रहस्य उघड करण्याच्या अचूक बिंदूवर रहस्यभेद झालाय.त्या मुलाचा बाप,तो सर्वेसर्वा हाच तो अत्याचारी आहे! संपूर्ण चित्रपटात जेव्हा जेव्हा अत्याचारी कोण हा प्रश्न मुलीसमोर उपस्थित होतो तेव्हा ती काहीच बोलत नाही.पुढच्या त्या दोघांच्या जवळकीत तो मुलगाही तिला खोदून खोदून विचारतो पण आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही असं ती स्पष्ट करते.ते रहस्य अश्या रितीने उघड झालंय.
यानंतरही चित्रपट तार्किकतेची कास सोडत नाही हे महत्वाचं.मुलगा बापासमोर रिव्हॉल्व्हर रोखून उभा राहतो पण तो गोळी चालवू शकत नाही,ते इतकं सोपं कुठे असतं!
मुलीचा बाप, सर्वेसर्वाचा भावासमान नातेवाईक(त्याचा नोकर-व्यवस्थापक) अत्याचारी सर्वेसर्वाला गोळ्या घालतो.त्याचं कलेवर साचलेल्या पीठाच्या ढीगावर पडून त्यातलंच एक होऊन रहातं…
म्हटलं तर फारशी वेगळी नसलेली ही गोष्ट पण उत्तम पध्दतीने सांगितलेली.खूप चांगल्या अर्थाने सगळी व्यावसायिक मूल्यं असलेला हा चित्रपट आणि तरी सामाजिक वास्तवही परिणामकारकपणे मांडणारा!तुर्की चित्रपटांना फार मोठी परंपरा नाही ही पार्श्वभूमी लक्षात घेता हा चित्रपट महत्वाचा आहे जाणवतं.मुतलुलुकचा दिग्दर्शक- अब्दुल्ला ओगझ.
चित्रविश्वात पुन्हा भेटूच.नववर्ष शुभेच्छा!
गुढीपाडवा, ६ एप्रिल २००८

Labels:

Sunday, March 30, 2008

सांग!

तू सिग्नलजवळ मरून पडला आहेस
हे या कचकड्याच्या जगानं पाहिलं
तेव्हा कुठला सिग्नल होता?-
हिरवा? पिवळा? लाल?...
त्या आधी, त्यांच्याकडे वेंगाडून
तू तुझं पोट मागत होतास
तेव्हा तू त्याना दिसला नाहीस?...
जेव्हा दिसलास
तेव्हा त्यांच्या डोळ्यात कोणता भाव होता?-
घृणेचा? कोरड्या कणवेचा? की शरमेचा?...
तुझा, फिल्मस्‍च्या तुकड्यांचा वाडगा उपडा होता?
की आ वासून तसाच उघडा?-
रंगीबेरंगी? मेलोड्रॅमॅटिक? पार अपारदर्शक?...
तुझ्याकडे असलेलं काहीच तुला सांभाळता नाही आलं?-
पैसा? ग्लॅमर? पत?...
काय सिध्द केलंस तू?-
कलाकार कलंदर असतो?
कला शापित असते?
की मरण अटळ असतं?!...

Labels:

Saturday, March 29, 2008

चिरंजीव हो!

युध्दाची धग
ध्यानस्थं हिमनगसुध्दा वितळतात
असंख्य मरणांचे रतीब घालून
माणसं माणसांना जिंकतात
जिंकायचंय जग
आणि ते अंधारं अवकाशही!
मृत्युचं?...
मग तो कुणी एक
का भीक मागत फिरतोय
युगानंयुगं
भळभळणारी जखम कपाळावर घेऊन…
माणसा! त्याला साथ दे!
खरंच चिरंजीव हो!
मृत्युचं मोल समजायला
तेवढी किंमत मोजायला
हरकत नाही!

Labels:

Friday, March 28, 2008

कवि म्हणे...

पूर्वी होते फक्त सात
कसे झाले त्याचे नऊ
बारा वाजले डब्यांचे
तरी गर्दी म्हणे मैंहुँमैंहुँ

जन अवघे उंदीर
राजकारणी मांजरे
धर्म बडा खूष होई
म्हणे आले दिस बरे

बुश म्हणे त्याचे जग
युध्द लादेन कधीही
क्लोन मेंढ्यांचेच कां ते?
वाढवितो आमुचेही!

कवि म्हणे चंद्र हवा
नसो चंद्रावरी हवा
पृथ्वीवर हेवादावा
स्वर्ग चंद्रावर व्हावा!!

Labels:

Thursday, March 27, 2008

मनोव्यापार

बजबजलेल्या व्यापारी शहरात
फुटपाथवरच्या बेवारशी मुटकुळ्यावर
कोरा मांजरपाट
वर हार आणि पैसे
आजुबाजूला नोटासुध्दा
हा ही पैसे कमवण्याचा धंदा?...
रंगहीन सुरकुतलेला पंजा
फुगलेल्या मांजरपाटातून डोकावणारा
माझ्यासारखे अनेक जातिवंत हळवे
शॉक लागून थबकणारे
काहींचा हात खिशाकडे
मग वेग कमी करून रस्ता पकडणारे…
कुणीतरी अग्नी देऊन नक्कीच
मुक्तं करेल या देहाला
आणि आमचा माणुसकीवरचा विश्वास
कायम राहील!...

Labels:

Wednesday, March 26, 2008

भर गर्दीतून...

असंख्य घोटाळ्यांचा चारा…
श्रीखंडापासून गुवापर्यंत
प्रत्येक गोष्टीत पैसे खाणं…
कामावर स्वेटर विणणं आणि
शिळोप्याच्या कढीला ऊत आणणं…
नाक्यानाक्यावर उभे
मो’बाईक आणि मोबाईलवाले
सुशिक्षित भाई…
आणि एक
बेवारशी सात वर्षाचा भाऊ
लहानग्या बहिणीला वडापाव देऊन
तिच्या डोक्यावर थोपटत
भर गर्दीतून
वाट काढणारा…

Labels:

Sunday, March 23, 2008

ब्रेव्हो मदर!

तुझा घराणी राजदंडुका…
दंडकारण्यात पिचमरत
भौमितिक वाढणारी
लव्हाळी जनावरप्रजा
खुर्च्याखुर्च्यांमधून लादमांडले
लीदबनले अरण्यराज एकासरस एक
आयाळीतल्या चलनी झिरमिळ्या कुरवाळत स्वस्थं
अटकपत्रांचे झेंडे जामीनदांडीवर फलकावत अढळ
एका चक्रावर तीन… तर?...
ब्रेव्हो मदर… ब्रेव्हो!

Labels:

Saturday, March 22, 2008

कुंकू

तुझा झेंडा त्यांनी खांद्यावर मारला तेव्हापासून
डाव्या तर्जनीच्या नखावर
सतत पुढे पुढे सरकणारा
काळ्या शाईचा ठिपका…
असंख्य ठिपके असंख्य तर्जन्या
हवेत तडफडणारे अब्जावधी हात
खुर्च्यांची फक्त अदलाबदल
मुखवटे तेच
जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीऽ
तुझ्या भाळी असंख्य काळे ठिपकेच फक्त
विधवेचं कुंकू…

Labels:

प्रतीक्षेस...

प्रतीक्षाऽ
स्टेशनमधे गाडी शिरण्याआधीच चार तास
मी तयार असतो
आणि माझ्या या तयार असण्याला
उतावीळपणा म्हटलं जातं
म्हणून तुझं फावलंय!
माझा सगळा आत्मकेंद्रितपणा
मी माझ्या सगळ्याच शब्दांमधून मांडतो
आणि माझं हसं होतं
म्हणून तू शेफारलीएस!
अगंऽ आख्खी दिंडी माझ्यामागून
माझ्यापुढे निघून जातेय
आणि मी आहे तिथेच
जळतं लाकूड उराशी घेऊन
तुला वाटतं तू जिंकतेएस!
कुठे कुठे आडवी नाही आलीस?
अगदी माझी आई मला सोडून जात असताना
आणि नंतर मी बाप होऊ घातल्यावरही?
पण लक्षात ठेव!
माझी सगळी गात्रं थकली
आणि हातात आधाराला जरी काठी आली
तरीही मी लढत रहाणारच!
तू माझ्या संपण्याची वाट बघत बस
मला तुझी पर्वा नाही!!!

Labels:

Friday, March 21, 2008

सर

मी नेहमीप्रमाणे
माझ्या उभ्या आडव्या फराट्यात हरवलेला
वेळेआधीच खुराड्यात हजर
आत्ता तू यावीस, इथे आत्ता तू हवी होतीस!
तू म्हणजे रूसून बसलेला पाऊस…
फराट्यांमधे माझं आयुष्याचा कागदबोळा शोधत रहाणं…
मग कधीतरी अचानक
तू घाईघाईत चपला काढून टाकल्याचा आवाज
अकल्पित येणारी पावसाची सर!
तिचा आनंद काही औरच! नाही?

Labels:

Monday, March 17, 2008

ती

ती उत्फुल्ल खळाळत धावते
अनेकांना तृप्त करत, नवीन जीवनं वसवत
राग आला की त्यानाच पोटात खेचत
अनेक सवतींसह आपल्या प्रियकराकडे
एखाद्या शोडषेप्रमाणे
पण सवतीमत्सर न करता…
ती आता प्रियकराबरोबरच संसार करतेय
कधी तरंग उमटवत, कधी उफाळत,
किनाऱ्याशी झुंजत, कधी भरत, कधी ओहोटत
वाऱ्यावर स्वार होत त्याच्या हातात हात घालून
प्रियकराला झालेला उष्मादाह शमवण्यासाठी
स्वत: वायुरूप होऊन अवकाशात जातेय
संततधारेने त्याच्यावर बरसून
त्याला थंड करण्यासाठी
एखाद्या गृहिणीसारखी, एखाद्या पतिव्रतेसारखी…
आता ती व्रतस्थ तपस्विनी वानप्रस्थाश्रमातली
ध्यानस्थ शीतल अभेद्य खडक
एक अष्टमांश वर सात अष्टमांश
आपल्या प्रियकरातच सामावलेली
यावेळी ती दोन्हीही
कूळ आणि मूळ शहाण्यानं शोधू नये अशी
तशीच हळूहळू प्रियकरातच विलीन होणारी
नव्या सवतींची वाट बघत
परंपरागत भारतीय स्त्रीसारखी…

Labels:

प्रेमिक

एक मधू गोळा करता करता
इतका गुंग झाला की
पाकळ्या कधी मिटल्या
काळरात्र कधी झाली
त्याचं त्यालाच कळलं नाही
तेव्हापासून तो शहाणा झालाय
या फुलावरून त्या फुलावर
मध गोळा करत फिरतोय
पाकळ्या मिटायच्या आत…
एक उबेच्या आशेने अजून
उर्जेकडेच झेपावतोय
धारातीर्थी पडून परत परत
उर्जेकडेच झेपावतोय
काजळी होण्यासाठीच फक्त…
एक मनोभावे प्रदक्षिणा घालतोय
बापाकडून प्रकाश घेऊन
लुप्त होत, वाढत वाढत
पूर्ण सुखावत, सुखवत
कलेकलेने रोड होत जातो
पुन्हा लुप्त होण्यासाठी
अनेक आवर्तनांत…
एक सरळ अनंताकडेच झेप घेतोय
हरतोय, मागे होतोय, उफाळतोय
आणि त्याच वेळी इतर अनेकींना
आपल्यात ओढून घेतोय वर्षानुवर्षं
पुन्हा उचंबळण्यासाठी
आपल्या अथांगपणाला साक्षी ठेऊन
प्रतिबिंबित करतोय
फक्त ती अप्राप्य निळाईच…

Labels:

बाप

आदितेजस बाप स्वत:लाच विभागून घेतो
अनेक तप्त गोळ्यांमधे
प्रत्येकाचं स्वत:चं वेगळं अस्तित्व असूनही
त्याना स्वत:भोवती फिरवत, थंड करत
त्याना, त्यांच्या अनेक वंशजाना उर्जा पुरवत, प्रकाश देत
स्वत: सतत खदखदत
सूक्ष्मतम बापही स्वत:लाच विभागून घेतोय
अनेक सूक्ष्म पिल्लांमधे
अंतिमत: सर्व प्राणीजात निर्माण करून
परमेश्वरासारखा शरीराशरीरांमधे वास करत
सजीव पेशींचा मूलभूत घटक बनून
अदृश्य बापाची मात्र सगळी अंशात्मक विभागणी
दर प्राणीमात्रात त्याचा अंश असतो म्हणे
तो वरून पहात रहातो
आपल्या अनेक पुत्रांच्या हालअपेष्टा, विटंबना
क्षुद्र कीटकांकडून
आणि त्याच्या एका पुत्राला मिळालेलं देवत्व
सहकाऱ्यांकडूनच भरवल्या गेलेल्या
शेवटच्या जेवणानंतर
लाकडात खिळ्यांनी चिणून…

Labels:

हरिणी

असतेस नेहमी तशीच बावरलेली
मला ठाऊक आहे
पण तू मात्र शोधत असतेस
कस्तुरी लपलेली…

Labels:

Monday, March 10, 2008

गाव

चालत रहाणे माझा धर्म आहे
दूर तिथे माझा गाव आहे…
गावतो स्वप्नात अन्‌ निसटतो जागेपणी
अळवावर मोतियाचा झरणारा थेंब आहे…
भान जागे आणि उरी एक वेडा पीर उध्वस्त
आठवांच्या खंडरात फिरणारा डोंब आहे…
राबतात हात माझे अनोळखी चेहेरा तयांचा
रेषांतच गुंतलेला आयुष्याचा कोंब आहे…
चालतो स्वखुषीने मग हास्य माझे लोपते का
अंतरीच्या जख्मेला का रडणारी झोंब आहे...
चालत रहाणे माझा धर्म आहे
दूर तिथे माझाही गाव आहे
त्याना गवसली आपुली घरे
मी घर अन् गाव माझे शोधण्यात मग्न आहे…

Labels: