romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, January 24, 2011

भलताच क्लायमॅक्स आणि नाटक

भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला! माझी आई आता काही दिवसांचीच सोबती आहे हा विचार गिधाडासारखा माझ्या मानगुटीवर स्वार झाला.माझं काय? आईवरच्या जबाबदार्‍या आता माझ्यावर आल्या, त्या कशा निभावू? अनेक ताण ठाण मांडून बसले.मी काय काय करणार होतो? माझ्या हातात किती गोष्टी आहेत? मी स्वत:विषयीच्या अवाजवी सहानुभूतीमधे गुंतवून घेऊ लागलोय स्वत:ला? अनेक विचार तेव्हा आणि नंतर कितीतरी काळ माझ्या मनाचा कब्जा घेऊन बसले.
आई तीन महिनेच जगली.अतिशय सुरक्षित वातावरणात जगलेल्या मला या तीन महिन्यात जगानं स्वत:चं नवं आणि क्लेशदायक रूप दाखवलं.हे जग आपल्या घरातूनच सुरू होतं ही पराकोटीची वेदना होती.घरातल्या एखाद्या मत्यूसंदर्भात माझ्यासकट इतर सगळेच संबंधित कसे प्रतिक्रीय होतात ते बघून मी खचत चाललो.
आई गेल्यानंतर वर्षभर मी रिता होतो.सुनंसुनं रितेपण म्हणजे एक वेडाच्या सीमेवरचा प्रवास वाटायला लागतो.
आई गेली आणि तिनं ज्या बिछान्यावर शेवटचे दिवस काढले त्या बिछान्यावर खोलीच्या दाराकडे पाठ करून मी अर्धवट वाचून बाजूला टाकून दिलेलं ’अभिनयसाधना’ वाचून संपवलं. कॉन्स्टटिन स्तॅनिस्लॅवस्की या रशियन रंगकर्मीच्या An Actor Prepares या इंग्रजी भाषांतरीत पुस्तकाचा के.नारायण काळे ह्या जुन्याजाणत्या रंगभूमी अभ्यासक, पटकथालेखकाने केलेला मराठी अनुवाद.मी कधीतरी उत्साहाने तो मिळवला होता.यातले पायदिवे-footlights, डोयदिवे-spots अशा मला माहित असलेल्या इंग्रजी शब्दांच्या मराठी अनुवादाने मी बिचकलो.नटानं नाटक आणि त्याची विविध अंग हा अभ्यास करताना शिजवलेल्या टर्की कोंबड्याचे वेगवेगळे तुकडे आणि संपूर्ण शिजवलेल्या कोंबडा असं उदाहरण वाचून मी बाचकलो.माझ्याकडून ते पुस्तक कधी बाजूला पडलं मला समजलं नाही.यातले शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी, त्यांनी एकमेकांना विचारलेले प्रश्नं, विद्यार्थ्यांना सरावासाठी मिळालेला प्रत्यक्ष रंगमंच, नेपथ्य, शिक्षकानी विद्यार्थ्यांना कृती करायला लावून, कल्पनाबीज विस्तारीत- improvisations करायला लावून शिकवलेली नाट्यमाध्यमातली तत्वं हे सगळं सगळं माझ्या दृष्टीने खूप लांबचं होतं.पुस्तकात रस वाटता वाटता ते दूर लोटलं जाई.ते कधी बाजूला पडलं समजलंच नाही.
आईच्या जाण्यानंतरच्या ’दिवसां’ मधे मी ते झपाट्यात वाचून संपवलं.मी पुस्तकात पूर्ण एकाग्र झालो होतो.मला त्यावेळी वेगळ्याच कुठल्यातरी पण मला बांधून टाकणार्‍या विश्वात स्वत:ला गुंतवून घ्यायचं होतं.माझ्या संदर्भात हे विश्व नाटक या माध्यमाचं होतं.
नंतर कधीतरी मी Bulding A Character स्तॅनिस्लावस्की ह्यांच्या मूळ रशियन लेखनाच्या इंग्रजी अनुवादाचा के.नारायण काळे यांनी केलेला मराठी अनुवाद ’भूमिकाशिल्प’ हे पुस्तक मिळवलं.या दोन पुस्तकांची मी पारायणं करत होतो.माझं अत्यंत सुरक्षित आयुष्य त्या घटनेने असुरक्षित झालंय असं वारंवार जाणवत होतं.ही असुरक्षितता वेढून टाकत होती.मी लोकल प्रवासातसुद्धा या पुस्तकांमधली टिपणं काढत होतो.
त्याही नंतर मला स्तॅनिस्लॅवस्की या थोर रंगकर्मीच्या रशियन लेखनाची इंग्रजी भाषांतरं सापडली. ‘An Actor Prepares’, ‘Bulding A Character’ आणि Creating A Role इंग्रजी वाचनाचा सराव नसताना मी या पुस्तकांशीही झटू लागलो.ही पुस्तकं इंग्रजीतून वाचताना मजा येत होती अर्थात मी त्यातल्या दोन पुस्तकांचे मराठी अनुवाद वाचले होते ही माझ्या दृष्टीने जमेची बाजू होती.
नाटकासारखी रंगमंचावर प्रत्यक्ष सादर करण्याची कृती पुस्तकं वाचून कितपत साध्य होते हा रंगकर्मींमधे चर्चिला जाणारा महत्वाचा प्रश्नं आहे हे मला कालांतराने समजलं.मी माझ्या पद्धतीने नाटकाविषयी जे जे काही मिळत होतं ते मिळवत होतो आणि अभ्यासण्याचा प्रयत्नं करत होतो.
पुन्हा प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करायला मिळणार नाही असं मला त्या घटनेनंतरच्या काही दिवसा-महिन्यांमधे ठाम वाटत होतं.दुसरीकडे भविष्यातले खर्चं डोळ्यासमोर दिसत होते.
माझ्याबरोबरचे मित्र, सहकारी शेअर्समधे पैसे गुंतवत होते.प्रमोशनसाठी जीव तोडून प्रयत्न करत होते.त्यांची लग्नं होत होती.संसार थाटले जात होते.ते कधीच मार्गाला लागले होते.सेटल झाले होते.
नाटकाच्या अभ्यासाबरोबर काही उत्पन्नही मिळायला पाहिजे असं माझ्या मनाने याच दिवसात घेतलं.नाटक माध्यमाशी संबंधित एका वेगळ्या माध्यमाकडे वळायचं माझ्या मनानं घेतलं.यात कदाचित माझा वेळ वाचणार होता.आई असताना घरादाराचा विचार न करता नाटकच डोक्यात होतं.तसं पूर्णपणे गुंतून रहाणं यापुढे कितपत शक्य आहे? हा विचार बळावला आणि मी या नव्या माध्यमाकडे वळलो.

Thursday, January 20, 2011

प्रेमाचं वादळ!...

Cyclone Warning ... [33/P365]कोवळ्या वयातली मुलं लैंगिक आकर्षणाला बळी पडली किंवा प्रेमातल्या नैराश्याने खचली तर आयुष्यभर असह्य ताणाखाली वावरतात.अशा वेळी त्यांच्या भोवतालचं वातावरण, घर, विशेषत: त्यांचे आईबाप फार मोठी भूमिका बजावत असतात.घरातलं भावनिक अस्थैर्य, आईवडलांमधला विसंवाद मुलाचा भावनिक पाया खिळखिळा करतात.त्यातच बाप आणि मुलगी किंवा आई आणि मुलगा या अतिमहत्वाच्या नात्यांमधे जरूरीपेक्षा जास्त तणाव असला तर ते मूल आधीच भावनिक ताण अनुभवत असतं.या परिस्थितीत या ना त्या कारणाने येणारं प्रेमातलं नैराश्य किंवा लैंगिक आकर्षणाला बळी पडणं फारच क्लेशकारक ठरू शकतं.
शाळेतून कॉलेजमधे जाताना आणि त्यानंतर नोकरी-व्यवसायात शिरताना माणसातल्या सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं.प्रेम या विषयात अनेक नवनवीन जाणिवा व्हायला लागतात.प्रथमदर्शनी प्रेम आणि पहिलं प्रेम यांच्या रोमांचकारी अनुभवाचं हे सर्वसाधारण वय म्हटलं पाहिजे.हिंदी सिनेमानं हा अनुभव आणखी रोमांचकारी बनवून टाकला.उदा. ’मेरे मेहेबूब’ ह्या सिनेमातली ती सुप्रसिद्धं आणि नंतर अनेकांनी अनेक रांगोळ्या घातलेली नायक-नायिकेची प्रथम भेट, ते अनवधानाने एकमेकांना धडकणं, ती पुस्तकं पडणं, त्यानं ती गोळा करणं, सगळं एकमेकांच्या नजरेत बांधलेल्या नजरा न सोडवता... काय? गेलात नं समाधीत?...
प्रथमदर्शनी प्रेमातून हटकून प्रेमाचं बस्तान बसण्याची कल्पना तशी वास्तवाला धरून मात्र नाही. ’पहिलं प्रेम’ हा मात्र माणसाच्या आयुष्यातला फार मोठा अनुभव.ज्यांचं पहिलं प्रेम यशस्वी होतं ते सुदैवी.अर्थात, प्रेमात यशस्वी होणं हा फार लांबचा पल्ला असतो.ते लग्नात परिणत होणं हा त्यातला पहिला टप्पा मानला जातो.
मागच्या पिढीत प्रेमविवाह हेच एक अप्रूप होतं तेव्हा पहिल्या आणि जराश्या आकर्षणाने झालेले विवाह नंतर खूप क्लेशदायी झालेले आढळले.प्रेमविवाहाबद्दल एक नको तेवढी रोमांचक कल्पना बाळगल्यामुळे हे झालं असावं.प्रेमविवाह अजून समाजात मुरले नसावेत.आजच्या पिढीत सर्वसाधारण अनुरुपता, शिक्षणक्रमातला समानधागा, समान करियर अशा मार्गाने एका अर्थाने कॅलक्युलेटेड (हिशोबी) प्रेमविवाह होतात.कालानुसार हे सुसंगत असावं.तरी प्रेम ही भावना त्यातही आपला प्रभाव दाखवल्याशिवाय रहात नाही.Love Love Loveआपल्याला आवडणारं माणूस छोट्या छोट्या गोष्टींतून आपली काळजी करतंय, आपल्याबद्दल त्याला खास काही वाटतंय असे अर्थ लावणं, मग ते खरे ठरणं, दोन्ही बाजूंना त्यांची संपूर्ण जाणीव होणं... यानंतरचा प्रवास स्वप्नातून जाणारा असतो!.रोजचं अर्थहीन आयुष्य चटकन्‌ रोमांचकारी वाटायला लागतं.मग एकमेकाला जपणं, एकमेकांचे हट्टं पुरवणं असं करता करता रूसवे-फुगवे, लटकी भांडणे, अबोला धरणं या मार्गांनी प्रेमाचं वादळ माणसाच्या आयुष्यात प्रवेश करतं.त्याला दिशा देणं या दोन्ही प्रेमिकांच्या हातात असतं.
निवडीची उलथापालथ करत रहाणं हा काही माणसांचा स्वभाव असतो.ठरवून प्रेमात पडता येत नाही हे त्याना मान्य नसतं.त्यांना कुणी आवडतच नाही.माणसातले दोष शोधत रहाणं, स्वत:बद्दलच्या अवाजवी कल्पना आणि प्रेमसंबंधातून अवाजवी अपेक्षा बाळगणं अशा वृत्तीमुळं ती प्रवाहापासून अलग पडतात.एखादा किंवा एखादी खूपच भिडस्त असते.समोरून आवाहन करणारं प्रेमही अशांना त्यांच्या कोषातून बाहेर काढू शकत नाही.काहींच्या बाबतीत प्रेमाचे योगच नसतात.प्रेम जुळण्यात सतत काहीतरी विघ्नं निर्माण होत रहाणं, उगाच गैरसमजच होणं, व्यावहारिक अडचणीत गुंतून प्रेमसंबंधासाठी अवकाशच न मिळणं अशा गोष्टींमुळे ते प्रेमापासून वंचित रहातात.हळूहळू अनावर होत जाणारं लैंगिक आकर्षण भुकेच्या स्वरूपात समोर उभं राहू लागतं.प्रेम आहे तरी वादळ, नाही तरी वादळ अशी परिस्थिती निर्माण होते.
समवयस्कांमधे प्रेम निर्माण होणं सहज असतं.कधीकधी आपल्यापेक्षा जास्त वयाची, वयात खूप अंतर असलेली व्यक्ती आवडायला लागते आणि तो समाजाच्या कुतूहलाचा विषय बनतो.यातल्या लहान भागीदाराच्या प्रेमाची गणती बालिश प्रेमात (काफ लव्ह) होऊन ते फारसं गंभीरपणे न घेण्यासारखं असतं असा सर्वसाधारण समज असतो.तर जास्त वयाचा जोडीदार पावलोपावली आपण करायला जातोय ते योग्य की अयोग्य या संभ्रमात पडायला लागतो.दोघंही एकमेकात इतकी गुंतलेली असतात की बाहेर पडणं दोघांनाही कठीण होऊन बसतं.लहान भागीदार कोवळ्या वयातला असेल तर त्याच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारी परिस्थितीच जणू त्याच्यासमोर उभी रहाते.संबंधातला जास्त वयाचा भागीदार जर विवाहित असेल तर फारच अडचणीचा मामला होतो.अशा विवाहबाह्य प्रेमातून अनेक माणसं दु:खी होऊ शकतात."killing love #2"
प्रेम कधीकधी जे राक्षसी रूप घेतं ती वादळाची परिसीमा ठरते.वर्गात शिरून किंवा भर रस्त्यात रॉकेल ओतून पेटवून देणं, तुकडे करून फेकून देणं, भररस्त्यात भरदिवसा सपासप वार करून बदला घेणं हे केवळ राक्षसच करू शकतात.त्यांना प्रेमिक वगैरे म्हणणं हा प्रेम या शब्दाचा अपमान होईल.याच्या बरोब्बर विरूद्ध असतं ते ’प्लेटोनिक लव्ह’.कुठलंही लैंगिक आकर्षण नसलेलं, निरपेक्ष असलेलं प्रेम.पृथ्वी सूर्याभोवती किंवा चंद्र पृथ्वीभोवती फिरत राहिलेले आहेत अनंतकाळ तसं.
स्त्री-पुरूषांमधे निखळ मैत्री असू शकत नाही असं नाहीच.पण त्या दोघांत प्रेम निर्माण झालं तर त्यात लैंगिक आकर्षणाचा भाग नसतो हे पटणारं नाही.मुळात स्त्री-पुरूषात मैत्री व प्रेम यात फार पुसटशी रेषा आहे.
प्रेम जमतं आणि मग पुढचे निर्णय घेणं महत्वाचं ठरतं.त्यासाठी प्रेमाच्या धुंदीतून बाहेर यावं लागतं.त्या धुंदीत ही माणसं जास्तीत जास्त निकट येतात.एकमेकांच्या सवयी, दोष, एकमेकांना गृहीत धरणं, एकमेकांकडून अपेक्षा ठेवणं आणि त्यानंतर ’जेलसी’.आपल्याला आवडणारं माणूस फक्तं आपलंच ही ’पॅशन’.आपल्याच माणसावर बारीक नजर ठेवणं, त्यानं सतत आपल्याच अंकित असावं अशी अपेक्षा बाळगून त्याला जखडून ठेवल्यासारखं करणं, तो किंवा ती सतत आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असा समज (गैर) करून घेणं.तसं त्यानं करू नये असा ह धरणं असे प्रकार वादळात आणणारे ठरतात.sahara108प्रेमाचा एक मार्ग विवाहाकडे जातो.किंवा आजच्या युगात ’लिव इन’ कडे जातो.तसं झालं तर प्रेमातून काहीतरी निष्पन्न तरी होतं.तसं नसेल तर आणखीनच खोल भोवर्‍यात अडकणं चुकत नाही.’विशी ते तिशी’ हा माणसाच्या आयुष्याचा कालखंड या ना त्या कारणाने माणसाला प्रेमात बैचेन करणारा असतो.भावनिक वादळं उठवणारा असतो.सारासार विचार करून काहीएक निर्णय घ्यावे लागतात.माणसाच्या आयुष्यातलं प्रेम त्यामुळे समंजस होत जाणार असतं!

Monday, January 17, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(६)

निशीच्या खांद्यावर मजबूत हाताची पकड पडली.बंड्या त्याच्या खुर्चीच्या पाठीवर आपला दुसरा हात ठेऊन उभा होता.एकशे एकाव्यांदा दचकून निशीने समोरच्या काळ्या काचेत बघितलं.खालचा बंड्याऽऽ... म्हणजे आता कंबक्तीच...angry red-faced guy
“काय करतूस?”
“का-काय- काही नाही-काही नाही!”
“भडव्याऽऽ यून किती टाईम झाला.. ××× करत काय बसलाईस?”
“कु-कुठे-कुठे-काही नाही!”
“त्येच ×××लं म्हन्तो मी.. त्या समूर..पाववाल्या आन् त्या काळ्या काकडीच्या गप्पा ऐकतूस व्हय?”
“ना- नाही हं साहेब.. अजिबात नाही-नाही”
“मला सांगतुईस व्हय रं भाडखाऊ.. आज ××लेत व्हय मला?... चल!”
“कु-कुठे-कुठे? कुठे?”निशीला घाम फुटून श्वास लागला होता.
“आऽरं चाऽलऽ ऊठ!”
“ये-येतो साहेब- पण-कु-कु-”
“कोंबडं हैस व्हय रं! कुकुकु- चल च्यामायला कॅशमदी! मेनला.पेमेंटमदीऽऽ”
“मे-मेन कॅश!- स-स-साहेब-साहेब-
खालच्या बंड्यानं आपली पकड मजबूत ठेवली नसती तर निशी दाणकन् खाली जमिनीवरच आपटला असता.आता जागेवरून हलणं भागच होतं.निशीनं मनातल्या मनात सुपेचं स्मरण केलं.अडीअडचणीला निशी सुपेकडे जायचा.सुपे पत्रिका बघून, हात बघून शंकानिरसन करायचा.उपाय सुचवायचा.जप मनातल्या मनात चालू केल्यावर निशीला सुचलं.आपले प्रयत्नं सोडता कामा नयेत.उठता उठता थुंकी आवरत तो म्हणाला,
“सा-सा-साहेब-पण टोकेकर-”
“तो भडवा सायेब झालाय आज! ऑफिसरची एक्टिंग हे त्येला!”
“स- साहेब पण मिसाळ-”
“तुला भड्व्या कोन कोन सिनियर हाय त्ये बरूबर म्हाईत! मिसाळ ब्येनं बस्लंय तुज्या आदीच कांपुटरवर! तुज्या मायला तुजं ध्यान त्या पाववाल्याकडं आन् काळ्या काकडीकडं-”
“पण-साहेब-भा- भाई-”
“त्याच्या आयला लागला ×× त्याच्या- तू चलतुस का लाऊ तुला पन-”
“आ- आलो-साहेब- जरा- टॉयलेट-”
“जा मूत भडव्या आन म् येऽऽ”असं म्हणून खालचा बंड्या भर चौकात खदखदा हसावं तसा ग्राऊंडफ्लोअरवरच्या त्या हॉलच्या मधोमध उभा राहून हसला.कोपरय़ातून वीरकर आणि इतर शिपाई बंधूंचा प्रतिध्वनी मागोमाग आलाच.निशीऽऽ निशीऽऽ असं ओरडून कर्मचारीगणही त्यात सामील झाला.
टॉयलेटमधे शिरला तेव्हा निशीचे धाबे दणाणले होते.किंवा धाबे दणाणल्यामुळे त्याला टॉयलेटकडे यावं लागलं होतं.मोकळा होता होता तो झाल्याप्रकाराची संगती लावू लागला.
आज मार्गशीर्षातला गुरूवार.नेमका मार्गशीर्षातला पहिला दिवस.नेमका.कधी नव्हे तो.गेला आठवडाभर लोकांची गटारी.काल मोहरम की ईद की काय ती सुटी.परवा लाईट नव्हते म्हणून सगळे कामं टाकून गूल.नेमका डिसेंबरचा पहिला आठवडा.पहिला आठवडा म्हणजे कॅशमधे तोबा गर्दी.ही पर्वणी साधून नेहेमीप्रमाणे रहाटेने मारलेली दांडी.मेन कॅश काऊंटरवरच्या.पेमेंट करणारय़ा.लाखांमधे...
भाईला बसायला सांगितलं तर- कोण रहाटे? कुठली कॅश? कुठला काऊंटर? असं विचारून खडबडलेल्या चेहेरय़ावर इतके अनभिज्ञ भाव आणेल की आजूबाजूचे सगळे नुकतेच अलिबागहून आलेले आहेत.आणि निर्लज्ज उर्मट चेहेरय़ाने हसत बघत राहील.
परब कळव्याहून, इतक्या लांबून येतो म्हणजे उपकारच.त्याला नेमके जुलाब होत असतील किंवा थंडी भरून आलेली असेल. ’असं पहिल्यांदाच झालं!’ असंही तो नेहेमीप्रमाणे म्हणेल.
दिलीपला नेमकी लंचअवरमधे साखरपुड्याचे फोटो काढायची ऑर्डर असेल.आपण राष्ट्रपतींचे फोटो काढायला जाणार असल्याच्या थाटात तो ते सांगेल.
’ऑन द स्पॉट’ कॅशवरून डाका, दरोडा, लाख, खाक अशा शब्दांचा वाक्यात उपयोग करून भलत्याच अर्थाची म्हण बनवेल.ती खदाखदा हसून किंवा चिडून कानठळ्या बसवणारय़ा आवाजात सुनवत राहील.पर्यायानं बंड्या थंडा होईल.
उत्तम शिंदे कॅश वरून यॅस, फॅस असं काहीतरी जुळवून ज्योक तयार करेल.तो सांगताना दहादा विसरेल.हे सगळं करताना तो सतत तोंड पसरून स्वत:च आपल्या ज्योकवर हसत बसेल.इतका हसेल की समोरचा गप बसेल.
मनू मुत्तमवार, ’कॅशमधे बस!’ या मार्गावरची गाडी भलत्याच मार्गावर घेऊन जाईल.तोंड पाडून, एरंडेल प्यालासारखं हसून, नको तेवढं इंग्रजी बोलून, प्रमाणाबाहेर विनम्र होऊन, अनेक चित्रंविचित्रं स्थानकांवरच अडकून राहील.
जयदेव मिसाळ कामात फास्ट.फास्ट म्हणजे त्याच्यासारखा तोच.असं त्याचं मत.केसांवरून हात फिरवत सगळ्यांच्या आधी येऊन, रिकामी जागा हेरून, अलाऊन्स साधून त्यानं एव्हाना, म्हणजे तासाभरात सगळं काम संपवत आणलेलं असेल.त्याला कसं उठवणार?
कबनुरकर, सावंत, काळे पोरंबाळंवाल्या बाया म्हणून बादच!blue in the face
रहाता राहिले टोकेकर.त्याना ऑफिशिएटिंग.एक्टिंग.
म्हणजे मग...
टॉयलेटमधे मोकळं होता होता निशी इथपर्यंत आला आणि पुन्हा दचकला.कितव्यांदा कुणास ठाऊक.च्यायलाऽऽ... पळालं पाहिजे लवकर कॅश केबिनमधे नाही तर बंड्याचे चिमटे...
कितव्यांदा कुणास ठाऊक निशीने धूम ठोकली आणि तो लॅचशी खडखड करून, झपकन् बंद-उघड होणारय़ा दाराशी झटापट करून कॅश डिपार्टमेंटमधल्या मेन पेमेंट काऊंटर केबिनमधे शिरला.प्रमाणाबाहेर उंच असलेल्या खुर्चीवर चढून बसताना एखाद्या मनोरय़ावर चढावं तसा श्वास त्याला लागला...

Saturday, January 15, 2011

कॉमेडी शो “पोस्टातली गोष्टं! ”

मनू फक्तं मलाच भेटतो असं नाही.आपल्या सगळ्यांनाच तो पावलोपावली भेटतो हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल.आपणच कधी ’मनू’ होतो का? हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न!
काही वर्षांपूर्वी मला मनू पोस्टातल्या एजंटच्या रूपात भेटला.अतिशय दीनवाणा, लाचार, चाचरत चाचरत बोलणारा, अत्यंत गरजू असा.Cartoon Nerd/Geek Illustration
आयुष्यात आपल्याला आयकर (इन्कमटॅक्स) भरावा लागतो या कल्पनेनेच मी प्रचंड भारावून जातो दोस्तांनो दर वर्षी.आपण भरायचे आणि ’त्यांनी’ खायचे.सामान्य माणूस आणखी कशाने भारावणार? असा मी प्रचंड भारावून माझ्याच मनोराज्यात दंग झालेला असताना मनू समोर आला.मगाशी म्हटलं त्या स्वरूपात.१ रूपयाला ७ रूपये पोस्टाच्या राष्ट्रीय बचत योजनेत टाकून सर्टिफिकीट मिळवा आणि १ रूपयाही वाचवा.माझा आनंद गगनात मावेना.एक रूपया वाचणार वर सर्टिफीकीट.सामान्य माणसाला सर्टिफिकीटाचं- मग ते कसलंही असो- काय मोल असतं तुम्हाला तर माहितीच आहे.मी कर्ज काढून टॅक्स वाचवला.पाच हजार वाचवण्यासाठी पस्तीस हजार गुंतवले.मनूला त्यावर एक टक्का कमिशन.त्यातलं काहीतरी तो मला देणार.त्यानं मला काहीच दिलं नाही.मी सामान्य आणि मनू मराठी माणूस, त्यातून गरजू, म्हटलं जाऊ दे! दरम्यान माझ्या असं लक्षात आलं, मनूनं ज्या पोस्टाची नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स दिली होती ते मला खूप लांब होतं.मी पुन्हा मनूला गाठलं नाही.त्यानंतर दरवर्षीचे व्यवहार मी स्वत:च माझ्या जवळच्या पोस्टातून करायला लागलो.
सात वर्षं सरली.मनूनं दिलेल्या सर्टिफिकीटांची मुदत संपत आली.मी माझ्या त्या जवळच्या पोस्टात गेलो आणि याच पोस्टातून मला त्या दूरच्या पोस्टातल्या सर्टिफिकीटांचे पैसे मिळावेत असा अर्ज महिनाभर आधीच नेऊन दिला.कुठल्याही पोस्टातल्या एनएससीजचे पैसे दुसर्‍या कुठल्याही पोस्टातून मिळायची सोय तेव्हा तरी होती.
साठ हजाराच्या आसपास रक्कम मिळणार.त्यातून चालू वर्षाचा टॅक्स भरायचा.पैसे मिळणार असं कळल्यावर घर आणि घरातले महत्वाचे खर्च लगेच डोकं वर काढतात.आपल्या श्रमाचे आपण गुंतवलेले पैसे!
मुदत उलटून गेली तरी माझ्या जवळच्या पोस्टात त्या दूरच्या पोस्टातून परवानगी आली नाही.मी अस्वस्थ होऊन आणखी दोन स्मरणपत्रं पाठवली.३१ मार्च ही तारीख जवळ आली तशी मला मनूला गाठल्याशिवाय पर्याय राहिला नाही.सुरवातीलाच मला मनूला गाठता आलं असतं पण मग मनूनं मला त्या एजंटी काव्यानं जबरदस्ती त्याच्याकडेच पैसे गुंतवणं भाग पाडलं असतं. ’पैसे देतो पण इतके गुंतव’ असे दमबाजीचे प्रकार प्रत्यक्ष पोस्टाच्या खिडक्यांवर चालतात असं मी ऐकलं होतं.
मनूला फोनवर गाठलं आणि सात वर्षांपूर्वीच्या लाचार मनूचं रूपांतर कशात झालंय हे समजलं. “आता वेळ नाही.माझ्याकडे पहिल्यांदा का नाही आलास? आता पैसे १ एप्रिल नंतर!” लोक एप्रिल फूल करतात ते मला माहित होतं.मनू मला एप्रिलनंतरही फूल करायला निघाला होता.त्यानं अडवणूक चालूच ठेवली. “तुझा अर्ज त्या पोस्टात मिळालाच नाही.मिळाला असेल तर पोस्टमास्तरनं तो दाबला (कशासाठी?) असेल.” असं उद्धटपणे बोलायला लागला.त्या पोस्टात फोन केला तर मास्तर चहा प्यायला गेलेले.माझा अर्जं, त्यानंतरची चार स्मरणपत्रं काही काही मिळालेलं नाही! इतके दिवस मी लोकांची पत्रं एकमेकाना मिळत नाहीत असं ऐकलं होतं.पोस्टातली पत्रं खात्यातल्या खात्यात एकमेकाना मिळत नाहीत? डोक्याचा गोविंदा झाला आणि कळलं हे इतकं सरळ नाही.
शेवटचे चार दिवस उरले.हातात पैसा नाही.आपला पैसा अडवून ठेवलेला.हकनाक.दोन रात्री झोप लागली नाही.
तिसर्‍याच दिवशी पहाटे जाग आली.सामान्य, सरळ वाटेने जाणार्‍या माणसाला देव म्हणा, सुप्तमन म्हणा मदत करतं असं म्हणतात.टेलिफोन डिरेक्टरीच्या मागच्या बाजूला विविध सरकारी खात्यातल्या वरिष्ठांचे फॅक्स नंबरस् दिलेले असतात असा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.उठलो.चीफ पोस्ट मास्तर जनरल पासून खालपर्यंत असे सहा फॅक्स केले.फॅक्सने तुमची लेखी कंप्लेंट जाते.आश्चर्य म्हणजे संध्याकाळपर्यंत खातं चक्कं हललं! एका वरिष्ठाचा मला- मला फोन आला.पैसे रोख तयार आहेत.घेऊन जा.वीस हजारांवर पैसे रोख देता येत नाहीत असा नियम असूनसुद्धा!
सामान्य माणूस नुसतीच टीका करतो.नकारात्मक चित्रं रंगवतो.सहसा पेटून उठत नाही.पण कधी काळी पेटला तर हट्टालाच पेटतो.
मी पुन्हा मनूला फोन केला.२९ मार्च.त्याची अरेरावी अजून संपली नव्हती.मी त्याला ठासून सांगितलं पैसे तूच आणून द्यायचे.पोस्टमास्तरला फोन केला.तो म्हणाला, “मनूला पुन्हा पुन्हा येण्या- जाण्याचा त्रास (!) नको.सर्टिफिकीटं सह्या करून तयारच ठेवा.मी मनूला पैसे घेऊनच पाठवतो!”
३० मार्च.मनूच्या नाकी नऊ आलेले.सगळीकडून पैसे जमवून भरण्याची त्याची एजंटगिरीची घाई उद्याच्या ३१ मार्चमुळे टोकाला आलेली.त्यात मी धोबीपछाड टाकलेला.चिडून म्हणाला, “मला दुसर्‍या पोस्टात पैसे भरायला जायचंय.किती वाजेपर्यंत पैसे घेतात महित्येय का?” मी फोनवर जोरात ओरडलो, “पोस्टात काय चालतं हे सगळं मला माहित झालंय! तू पैसे घेऊन येतोस की नाही ते सांग!” मनूनं फोन डिसकनेक्ट केला.कुठल्या तोंडानं तो मला भेटणार!
३१ मार्च उजाडला.मनूच्या कृपेमुळे मला अखेर त्या लांबच्या पोस्टात जावं लागलंच.Mr. van Rooy  Cartoon by Shonaमास्तर मिशांना पीळ भरत माझी वाटच बघत होते.३१ मार्च होता तरी मिशीला पीळ भरून झाल्यावर ते हाताची घडी घालून बसले होते.माझ्याकडे बघत त्यांचं ते गुलछबू हसणं.रंगेलपणे हॅ हॅ हॅ हॅ करत माझं त्यांनी स्वागत केलं.पैसे चोख काढून ठेवलेले.नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही याचा अर्थ मला कळला.आपल्याकडेही ताकद असते याचा प्रत्यय आला.दुसर्‍या मिन्टाला माझे पैसे अखेर माझ्या हातात पडले.तरीही, वरून बांबू मिळूनही तो गुलछबू मास्तर जणू काही झालंच नाही असा हसून मला चहा पाजायला बघत होता.तुमचा अर्ज अजून सापडत नाही हो- असं ठाम निर्लज्जपणे सांगत होता.
मनू त्या पोस्टातला रेग्युलर एजंट.त्याला कमिशन मिळतं.तो मास्तरला कमिशन देऊन आपल्याकडे न येणारे पैसे अडवतो.अडवून पैसे आपल्याकडे गुंतवून घ्यायचे.नाही मिळाले तर अडवायचे आणि सामान्य माणसाला म्हणायचं आता बस बोंबलत! हा या दोघा मराठी माणसांचा डाव लक्षात यायला आता मला शेंबड्या पोराचीही गरज नव्हती.माझ्यावर मात्र ’वरून’ खरंच कृपा झाली होती!
या प्रकारची कृपा माझ्यावर नंतरही झालेली आहे दोस्तांनो! त्यानंतर विमा आणि नंतर एका खाजगी बॅंकेच्या एटीएम व्यवहारासंदर्भात! खरंच! अजिबात भिऊ नका! हे सेवा उद्योग आपल्या पाठीशी निश्चित उभे आहेत!
Post Office in Fort

Friday, January 14, 2011

प्रेम: एक हुरहूर

Falling
माणूस आणि प्रेम यांचं नातं अतूट आहे.माणूस आपली परिस्थिती, भोवताल, आलेली वेळ, काळ, वाढणारं वय या सगळ्या आणि इतर कितीतरी परिमाणांमधून प्रेमाच्या अनेक छटा अनुभवतो.अनेक वेळा प्रेम होतंय हे समजेपर्यंत प्रेमाची जादू संपून गेलेली असते.माणसाला प्रेम करून घ्यायला खूप आवडतं.ते दिल्यानं वाढतं हे त्याच्या लक्षात येत नाही.निर्मळ प्रेमाचा ओघवता स्त्रोत असणारे म्हणूनच या जगात महान ठरतात.
प्रेमाबद्दल सतत इतकं सांगून झाल्यावरही अजून काही सांगायचं उरतंच.प्रेम नक्की काय आहे? माणूस अजून शोध घेतोच आहे.एवढा प्रगत झालेला असूनही प्रेम या शब्दाची व्याख्या करणं त्याच्या आटोक्याबाहेरचं राहिलं आहे.
सर्वसाधारणपणे ’प्रेम’ म्हटल्यावर स्त्री-पुरूषांमधले नाजूक भावबंध हेच त्याचं रूप डोळ्यांसमोर येतं.अनेक हिंदी सिनेमांनी, कथा-कादंबर्‍यांनी कवितांनी प्रेमाला सतत खतपाणी घातलेलं आहे.खरंच! प्रेमाचा हा एवढा भाग जरी विचारात घेतला तरी त्याचा पसारा बघून चकीत व्हायला होतं.स्त्री-पुरूषांमधलं प्रेम हे बाप-लेक, आई-मुलगा, आजी-नातू अश्या नात्यांमधलंही असतं पण आपल्याला प्रेम म्हटल्यावर सहजपणे दिसतं ते स्त्री-पुरूषामधलं आकर्षण.नैसर्गिकरित्या हे आकर्षण निर्माण होतं, वाढतं, खुंटतंसुद्धा.हे प्रेम म्हणजे केवळ लैंगिक आकर्षण असतं असं नाही.
In Love
पुरूषात जे आहे ते स्त्रीत नाही आणि स्त्रीत जे आहे ते पुरूषात नाही.नैसर्गिकरित्याच पूर्णपणे परस्परावलंबी असे हे जीव आहेत.त्यामुळे ’प्रेमबिम सब झूठ आहे’, ’आपल्याला प्रेम वगैरे काही ठाऊक नाही’ असं म्हणणारे लोकांपेक्षा स्वत:लाच फसवत आलेले आहेत.प्रेमात नैराश्य आल्यानंतर काही काळ असं वाटणं स्वाभाविक आहे.दुर्दैवाने ज्यांच्या वाट्याला मात्र सतत प्रेमातल्या दु:खाचीच बाजू आली आलीय किंवा हेकेखोरपणे, आपल्या स्वभावाला मुरड न घालता आल्यामुळे जे सतत या दैवी देणगीपासून लांबच राहिलेत त्यांच्याएवढं दु:खी या जगात कोणीच नसेल.
पैसा, मानमरातब, दर्जा असं काहीही नसलं तरी एक वेळ चालेल, पण प्रेम नाही, ते देण्या-घेण्याची पात्रता नाही म्हणजे माणसाकडे काहीच नाही.
माणूस वयात येतो आणि त्याला प्रेमाची हुरहूर लागते.मुली मुलांकडे बघितल्यावर उगीच कॉन्शस होतात.मुलं आजुबाजूला एखादी जरी मुलगी असेल तर उगाच आपण स्मार्ट असल्याचं दाखवतात.आजकाल मुलं-मुली अधिक मोकळेपणानं मिसळतात.तो मोकळेपणा निखळ मैत्रीचाही असतो.मोकळेपणाने दुसरंच टोक गाठलंय की काय असंही काही वेळा जाणवतं.
पूर्वी एकमेकांना अहो-जाहो करणं, वर्गात मुलामुलींना वेगवेगळं बसवणं किंवा सरळ सरळ मुला-मुलींच्या वेगवेगळ्या शाळा काढल्या गेल्या.एकत्र शिक्षणपद्धतीत वर्गात गप्पा वाढतात म्हणून एक मुलगा, एक मुलगी एका बाकावर बसवण्याची शिक्षा (?) दिली जायची.मग एकाचवेळी नकोनकोसं आणि हवंहवसं वातावरण तयार व्हायचं.आज मोकळेपणानं एखादी मुलगी एका मुलाला तू मला आवडतोस असं म्हणू शकते.तो आवडतो म्हणजे लगेच झालं असंही नसतं.आज मैत्रीचा धागा दिसतो तो पूर्वी लुप्त होता.मैत्री आहे असं सांगणंसुद्धा ईऽऽऽ असा प्रकार होता.The child like look, Indiaविरूद्ध लिंगाच्या व्यक्तीशी मैत्री करावीशी वाटणे ही हुरहूरीची सुरवात.मजा म्हणजे पूर्वीपासून आजतागायत सगळेच जण या स्थितीतून गेलेले असतात आणि तरीही बारा-तेरा वर्षाच्या मुला-मुलीसंदर्भात निखळ असं जरी काही दिसलं तरी प्रत्येक माणसातले आई-बाप लगेच जागे होतात.काय ही पोरं! काय यांचं वय! अभ्यास करायच्या वयात हे काय?... पण हे वयच तसं असतं.प्रेमानं आपली जादू दाखवायला सुरवात केलेली असते.हे प्रेम अर्थात असं लगेच जुळतं असंही नाही.कुठेही गेल्यावर, कुणीही आवडल्यावर हुरहुरणं, तिचं किंवा त्याचं आपल्याकडे लक्ष आहे का नाही ते बघणं, असेल तर ते आणखी वेधून घेणं, हसणं, बोलणं, चेष्टामस्करी करणं इथपर्यंत या वयात प्रेमाची मजल असते.शाळा-कॉलेजातला ’अभ्यास’ नावाच महाप्रचंड राक्षस हे वय, ही हुरहूर गिळण्याच्या पवित्र्यात नेहेमीच असतो.या राक्षसाला वळसा घालून किंवा त्याला खाकोटीला मारून पुढे जाणारेही असतात.पण प्रेम लगेच सापडत नाही.काही काळ हुरहूरीचा जो सिलसिला चालू रहातो त्याला ’क्रॉसवायर्स’ असं म्हटलं जातं.आपल्याला जो किंवा जी आवडत असते, ती-तो आपल्याकडे ढुंकूनही बघत नसतात.ज्यांना-जिला आपण आवडत असतो त्यांचा पिच्छा सोडवणं यात आपल्याला नाकेनऊ येत असतात.
Torn
या वयातल्या प्रेमाची व्याप्ती दिसणं, हुशार असणं किंवा स्मार्ट दिसणं, बोलणं, मनापासून मदत करणं आणि ग्रुपमधल्यांनी चिडवणं किंवा डिवचणं यापुरती असते.मग डेट्स, भ्रमणध्वनि किंवा शक्य असेल तर चॅटवर तासनतास घालवणं.रूसवे फुगवे, आणा-भाका घेणं, पुढच्या आयुष्याचे बेत (!) ठरवणं इथपर्यंत सगळं ठीक असतं.हा एक प्रकारचा भातुकलीचा खेळ असतो.तो अतिशय सच्चा असतो.पण आयुष्यात त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आहे याचं भान तेव्हा नसतं.स्वभावानुसार जवळ आलेले हे प्रेमी अतिजवळकीने परस्परांमधले दोष कळून वेगळेही होतात.पण नैराश्य रहातं आणि या वयातलं हे नैराश्य आयुष्यावर फार मोठा आघात करू शकतं.दोन जीवांनी या वयात प्रेमात पडून हा असा प्रवास पूर्ण केल्यावर माणसामाणसांत जागे झालेले आई-बाप खरे असतात असं अशावेळी वाटायला लागतं.हे आई-बाप आणखी प्रकर्षाने खरे वाटतात, जेव्हा ही कोवळ्या वयातली मुलं लैंगिक आकर्षणाला बळी पडतात.आता प्रेमाच्या वादळाला सुरवात झालेली असते!...
Nouméa, 13 janvier 2011, Vania

Thursday, January 13, 2011

साद देती हिमशिखरे!

Kanchenjunga
सुरवातीलाच एका वैश्विक सत्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.सर्वसाधारणपणे कोणत्याही क्षेत्रात नावाजलेल्या माणसाचं उदाहरण घेतलं तर असं लक्षात येतं की त्याचं ध्येय त्याच्या विशीतच पक्कं झालेलं आहे.त्या वयात त्याला यश मिळायला सुरवात झालेलीही आढळते.
एखाद्याजवळ त्याच्या विशीच्या आसपास एखादं ध्येय समोर ठेऊन ते अंमलात आणायला प्रवृत्त करणारी धारणा असते का?
अशी धारणा जवळ असणे ही गोष्टं दोन घटकांवर अवलंबून असते असं दिसतं.एक म्हणजे अंत:प्रेरणा आणि दुसरा घटक म्हणजे पार्श्वभूमी.अंत:प्रेरणेच्या संदर्भातलं एक उदाहरण सुप्रसिद्ध साहित्यिक आनंद यादवांचं.जेमतेम प्राथमिक शाळेत जाणार्‍या लहानग्या आनंदाला शिक्षण घेण्याची प्रचंड आसक्ती कुठून निर्माण झाली? (वाचा: झोंबी हे त्यांचं आत्मकथन) आसक्तीच म्हणायला पाहिजे.कारण घरातल्या थोरामोठ्यांकडून शीक! शीक! असा उपदेश होणं अशक्यच होतं.प्रतिकूल परिस्थिती होती.शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.आधीच्या पिढ्यानपिढ्यांच्या वारशाचा तर प्रश्नंच नाही.जेवढा जेवढा विरोध जन्मदात्याकडून होत होता तेवढी शिक्षण घेण्याची इच्छा प्रज्वलित होत होती.प्रचंड प्रतिकूल परिस्थिती आणि तिच्याविरूद्धं उठाव करण्याचं भान ही नंतरची गोष्टं.पण आपल्या अंत:प्रेरणेवरचा प्रचंड विश्वास, इच्छाशक्ती, प्रयत्न या सगळ्याची सांगड घालत ते फक्तं स्वत:च शिकले असं नाही तर त्यांनी तळागाळातल्या समाजाला शिक्षण मिळावं यासाठी प्राध्यापक बनून प्रयत्नंही केले.
kumar_gandharva  , ,we love you स्व.कुमार गंधर्व लहानग्या वयातच एखाद्या मोठ्या शास्त्रीय गायकाचं गाणं जसंच्या तसं म्हणून दाखवत.हे कुठून आलं? जन्मजात अंत:प्रेरणा किंवा उपजत धारणाशक्ती ही जेव्हा अशाप्रकारे चमत्कारी स्वरूपाची असते तेव्हा ती कुठून येते याबद्दल निश्चित विधान करणं धाडसाचं आहे असं दिसतं.
आपल्याला अमुक एक कौशल्य असलेली संतती हवी असा निश्चयी संकल्प केलेल्या पतीपत्नीच्या पोटी तशी संतती निपजते असं आपल्या शास्त्रांमधे म्हटलं जातं.कुठलही ध्येय हे एका आयुष्यामधे पुरं होत नाही.माणूस जसजसा एखाद्या क्षेत्रात खोलवर जातो तसं आणखी आव्हानात्मक झालेलं ध्येय त्याच्यासमोर उभं रहात असतं.एका जन्मात अपूर्ण राहिलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी जन्मजन्मांतरीचा प्रवास करावा लागतो.शेवटी एखाद्या जन्मात तो त्या क्षेत्रात अत्त्युच्च शिखर गाठतो.ध्येयाचं अत्त्युच्च शिखर गाठलेल्या अशा महान व्यक्तीच्या संदर्भात अशीही गोष्टं आढळते की त्याचं नाव चालवणारा वारस त्याला लाभत नाही.असलाच तर तो निष्प्रभ असतो किंवा दुसर्‍याच कुठल्या तरी क्षेत्रात झेप घेत असतो. (उदा. प्रकाश पदूकोण: दीपिका पदूकोण)
चमत्कारी स्वरूपाच्या अंत:प्रेरणा या घटकाचा माग या दिशेने काढता येऊ शकतो.या संदर्भातलं आणखी एक उदाहरण हृतिक रोशन या स्टार अभिनेत्याचं.एक आजोबा सर्जनशील संगीतकार (स्व.रोशन), दुसरे आजोबा दिग्गज निर्माता-निर्देशक (जे.ओमप्रकाश) वडील अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि काका संगीतकार.ATcAAACgiqEKNXgtTr_IlEW6Oq839ejgcqjTcfamzha9GtyrYLOks6CDXyvmUbUn8ogX9FxT2mlCfmWmN99T1Dcbkf-rAJtU9VBKtlZoEKmrMWty5F6HYi-Qo4syYQसगळं सहजप्राय असूनही हृतिकला आपला तोतरेपणा घालवण्यावर प्रचंड मेहेनत घ्यावी लागली.शरीर कृश होतं म्हणून ते कमवावं लागलं.त्यानं केलेले शंभर टक्के प्रयत्नं त्याला पहिल्याच फटक्यात त्याला ध्येयप्राप्तीच्या मार्गावर कितीतरी पुढे घेऊन गेले.आपण कुठेही कमी पडता कामा नये म्हणून त्याने स्वत:ला आवडत्या नृत्यासकट प्रत्येक गोष्टीवर केलेली मेहेनत विसरण्याजोगी नाही.पार्श्वभूमी, वारसा, अंत:प्रेरणा, प्रयत्न आणि हुशारी ही पंचसूत्री त्याच्या चांगल्याच कामी आली.
शंभर शतकांच्या उंबरठ्यावर असलेला सचिन हे त्यापुढचं मोठ्ठं उदाहरण!
उच्च ध्येय गाठलेल्यांच्या आयुष्यात पदार्पणातलं यश परिणामकारक ठरल्याचं दिसतं.अथक प्रयत्नं मात्रं कुठल्याही पायरीवर अपरिहार्यच ठरतात...
सगळ्यांनाच फार मोठी ध्येयं गवसणं शक्य नाही.चमत्कारी यश मिळतंच असं नाही.वेगवेगळ्या कलांची, शास्त्रांची अनुवांशिकता मिळणं शक्य नाही किंवा अनुवांशिकता नसतानाही अंत:प्रेरणा असतेच असं नाही.सर्वसाधारण माणसाचं काय? त्यालाही ध्येयं असतातच!
विशीच्या अलिकडपलिकडच्या सर्वसाधारण मुलाचं ध्येय त्याच्या आईबापांनी आधीच निश्चित केलेलं असतं.आई, बाप स्वत: कार्यरत असलेल्या क्षेत्रात किंवा ते जाऊ न शकलेल्या त्यांच्या आवडत्या क्षेत्रात ते आपल्या पाल्याचं ध्येय निश्चित करतात.हे तसं व्यवहार्यंच म्हटलं पाहिजे.
मग लाटा सुरू होतात... डॉक्टर होण्याची, इंजिनियर बनण्याची, संगणक तज्ज्ञं होण्याची, परदेशी शिक्षण घेऊन तिथे स्थायिक होण्याची...
ढोबळ लाटांना ध्येयं तरी कसं म्हणायचं? अशा लाटांवर आपल्या मुलांना लोटणार्‍या पालकांना आपल्या मुलात याहीपेक्षा वेगळ्या प्रकारची प्रज्ञा आहे याची जाणीव नसते की धाडस कमी पडतं की व्यवहार्यतेच्या कोषातून बाहेर पडायचं नसतं?
मुलांना ’सचिन तेंडुलकर’ बनवण्याची, मुलांना टीव्ही सेलिब्रेटी बनवण्याची, मुलांना नागरी सेवेत घालण्याची, अंतिम स्वरूप म्हणून व्यवस्थापनतज्ज्ञ बनवण्याची अशा वेगळ्या वाटेवरच्या लाटांचही चांगलंच स्वागत झालं.
महाजालावर माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध आहे.आज मराठी घरातला मुलगा, मुलगी ह्या साठ्याचा उपयोग करून स्वत: स्वत:चं ध्येय ठरवतो आहे हे बघून अभिमान वाटतो.त्यातही लाटांचा सहारा घेणं अपरिहार्य ठरतं.सहज असतं.कुठल्याही क्षेत्रात शिरलं तरी अंतिमत: मॅनेजमेंट किंवा फायनान्समधे जाणं या आणखी काही लाटा.आज रिस्क घेण्याचं प्रमाण वाढतं आहे.नोकरीत पर्मनंट हा शिक्का साफ पुसला जातोय.ध्येयासाठी नोकर्‍या बदलण्याचं प्रमाण वाढतंय.ट्रॅवल आणि टुरिझमसारखी वेगवेगळी क्षेत्रं विकास पावताहेत.महाजाल हे केवढं मोठं क्षेत्रं आहे! आज एकाच क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर जाण्याचा मोहही राहिलेला नाही उलट वेगवेगळी क्षेत्रं धुंडाळून आर्थिक समाधानाबरोबर मानसिक समाधान मिळवण्याची ओढ वाढली आहे.संघर्षं करण्याची क्षमता वाढली आहे.हे निश्चित कौतुकास्पद आहे.
पूर्वी या ना त्या करणाने ढोबळ ध्येयांचीही जाणिव दिसत नव्हती.काहीच ध्येय नसलेले कारकून नोकरीचे सर्व फायदे उपटताना कर्तव्याच्या वेळी अळीमिळी गुप चिळी या नात्याने रहात होते.कामगार संघटनांचा दरारा होता.आज ध्येय हे सर्वात महत्वाचं झालं आहे.ध्येयासाठी सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत राबणार्‍यांची संख्या वाढते आहे.त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.अनिवासी भारतीयांची संख्या वाढते आहे.
आर्थिक आणि व्यावसायिक समाधानानं एक चांगलं टोक तर गाठलंय पण त्याच्या जोडीनंच येणार्‍या अतिलोभाच्या, आसुरी स्पर्धेच्या, अपरिहार्य अशा कौटुंबिक जीवनाच्या अभावाच्या दुसर्‍या टकमक टोकाकडे आजच्या पिढीचं लक्षं आहे का?
ध्येयनिश्चितीसाठी पहिला मैलाचा दगड अजूनही शाळा-कॉलेजातलं जास्तीत जास्तं टक्के मिळवणारं शिक्षण हाच राहिला आहे.विद्यार्थ्यांची अशी अवस्था होतेय की पुस्तक आणि चष्मा याव्यतिरिक्तं कुठलीही गोष्टं वापरताना त्यांच्यात आत्मविश्वास असेल का याची खात्री देता येत नाही.
Student Studyingआजच्या स्पर्धेच्या युगात नक्की कसली आवशकता आहे?
अथक प्रयत्नं आणि संपूर्ण समर्पण या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण त्याचबरोबर निवडलेल्या क्षेत्राचा अचूक अंदाज पाहिजे.कुठली कळ दाबली की वरची पायरी उघडेल याची समज पाहिजे.नसली तर ती संपादित करता आली पाहिजे.निवडलेल्या क्षेत्रात आपल्याला नक्की काय हवं याचा निर्णय पक्का हवा.एक प्रकारची आक्रमकता अंगी बाणवता आली पाहिजे.प्रचंड स्पर्धेच्या, दिखाव्याच्या या जगात शर्यतीतला योग्य उंदीर होता आलं पाहिजे.अन्यथा... आपल्याला जे आवडतं, पटतं, योग्यं आहे असं वाटतं ते प्रचंड संयम ठेऊन करत रहाण्याची ताकद कमवता आली पाहिजे.
भावनिक, आर्थिक, लौकिक कशाही प्रकारचं आव्हान झेलता आलं पाहिजे, प्रचंड सोसता आलं पाहिजे आणि तरीही प्रयत्नात सातत्य ठेवता आलं पाहिजे...

Wednesday, January 12, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(५)

युनियन लीडरनी ’चेक्सचं सॉर्टिंग करू नकोस! ते तुझं काम नाही!’ असं वारंवार बजावलेलं निशीला आठवत होतं तरीही तो किमान चार वेळा त्या चेक्सच्या ढिगापर्यंत जाऊन दूर झाला होता.खातेबदल.नियमाप्रमाणे डिपार्टमेंट चेंजचा फार्स दर वर्षा-दोन वर्षांतून होतो तसा यावेळीही झाला होता आणि प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सगळ्यानी मिळून पुन्हा एकदा निशीला घोडा लावला होता.रजाराखीव-लीव्हरिझर्व म्हणून.म्हणजे कमी तिथे तो.पडेल ते काम.पडेल म्हणजे मुद्दाम पाडलं जाईल, केलं जाणार नाही ते...
पाचव्यांदा निशीला रहावलं नाही.कामावर येऊन, नुसतं बसून किंवा रेंगाळून काय करणार? तो बोटांना थुंकी फासून फताफता काउंटरवाईज चेक्सचं सॉर्टिंग करायला लागला.
इतक्यात कॅंटीनचा पोर्‍या चहा घेऊन आला.
“एऽऽ क्या बनाया आज?”
“इटली”पोर्‍या म्हणाला.
“छ्याऽऽ खाया में अभी”असं म्हणून निशी थुंकी उडवत सॉर्टिंग करत राहिला.
कॅंटीनचा पोर्‍या पुढे जाऊन रेंगाळला.सॉर्टिंग करता करता निशीचं लक्ष पोर्‍याकडे गेलं.पोर्‍याचं लक्ष भलतीकडेच.मग निशीचं लक्ष भलतीकडे गेलं आणि त्याचे हात रेंगाळले.ओठांच्या कोपर्‍याशी थुंकी जमा होऊ लागली.लागल्यासारखा श्वास थाडथाड उडू लागला.शरीरातून विचित्रं लहर दौडू लागली.मान, डोकं मागे करून श्वास पूर्ववत करायचा प्रयत्न त्याचं शरीर आपसूक करू लागलं.
पोर्‍यानं मुद्दाम त्या दोघांच्या मधे जाऊन कॉफीचे कप ठेवले.दोघेही परस्परात गुंग.पोर्‍या मुद्दाम रेंगाळला.दोघांच्या भावस्थितीत इवलासाही फरक नाही.पोर्‍यानं मुद्दाम निशीकडे बघितलं.निशी आ वासून त्या दोघांकडे पहात होता.पोर्‍या मुद्दाम निशीसमोरून पास झाला.निशी तसाच.हक्काबक्का.कुणीतरी स्टॅच्यू घातल्यासारखा.छातीत धडधड आणि श्वास खालीवर.
त्या दोघांमधला तो गोरापान, उलटे केस फिरवलेला, स्मार्ट, परधर्मीय पण बाटगेपणाचा शिक्का असलेला.ती कर्मठ धर्माची.काळी, उंच, फेंदारलेल्या नाकाची.चेहेरा वर केला की नाकावरच्या चमकीतली नाकातली गाठ दिसायची.हसरी, कामसू, बांधा बरा.चापून चोपून नेसलेली साडी.
दोघेही आले, बसले की एकमेकांत धुंद असतात... निशीने एकदा मार्क केलं होतं.पुन्हा दोघेही विवाहित.एकमेकांशी नव्हे.तो खूपच पुढाकार घ्यायचा.गोरा.ती हसायची.मनमोकळं बोलायची.एकदा.. निशीने.. त्याना मागच्या गल्लीत पाहिलं होतं.पाठमोरं.त्या, गोर्‍यानं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला.इथे निशीच्या अंगातून शिरशिरी गेली.त्याचा हात खांद्यावरून पाठीवर.मग खाली... तेवढं निशीने बघितलं.मग चपापून आजुबाजूला बघेपर्यंत ते गर्दीत कुठल्यातरी गल्लीत दिसेनासे झाले.
तेव्हापासून ते असे बोलत बसलेले दिसले की निशीला श्वास लागायचा.त्याच्या छातीत धडधड व्हायची.तो नाक, कान , डोळे सगळी इंद्रिये एकवटून त्यांचं ते सगळं न्याहाळत बसायचा.
“येऽऽ आलं रं आलंऽऽ...” अशी बंड्याची हाळी कानावर आली आणि निशी भानावर आला.तोपर्यंत चेक सॉर्टिंग सगळं बोंबललं होतं.आता काउंटरवाले आपल्याला भोसडणार लक्ष कुठे असतं तुझं म्हणून.निशी झालेला गोंधळ निस्तारायच्या मागे लागला...साला..यांना मदत करायची..यांचं काम आपणच करायचं..काही चूक झाली की हे आपल्यावरच चढणार...
ते सगळं निस्तारण्याच्या नादात निशीला समोरच्या काळ्या काचेत मागे बंड्याजवळ जमलेली गर्दी दिसली नाही.आजुबाजूला जमत असलेली इतर कर्मचारीमंडळी दिसली नाहीत.त्यांच्यात काय चर्चा चाललीय हे दिसलं नाही...
चारचारदा चेक्स उलटे पालटे करून, त्यांचे चार-पाच वाटे पुन्हा पुन्हा निरखताना त्याने अचानक दचकून आजुबाजूला बघितलं.मग त्याच्या लक्षात आलं.छ्यॉऽ... युनियन लीडर एवढ्या लवकर कुठला यायला?.. पण त्याने पुन्हा आपल्याला असं हे सॉर्टिंगफिर्टिंग, आपलं नसलेलं, काम करताना बघितलं तर.. ××वर लाथ मारीन!.. निशीला युनियन लीडरचा करपटलेला चेहेरा पुन्हापुन्हा आठवत राहिला...
चेक्सचं ते-रामायण-महाभारत-काय ते-हातावेगळं करून बाजूला सारत असताना त्यानं पुन्हा आजुबाजूला बघितलं आणि सकाळपासून मोजून आता साधारण शंभराव्यांदा तो दचकला... च्यायलाऽऽ या सॉर्टिंगच्या नादात आज कोण कोण आलं नाही ते आपण बघितलंच नाही.म्हणजे आज कॉम्प्युटर नसला तर आजही अलाऊन्स नाही.. अरे! इथे! कोण नाही? जाऊया का? नको! तो भाई असेल तर कानफटातच मारेल! घाणेरड्या शिव्या देऊन!.. कबनुरकर असेल तर पुन्हा आपल्या लग्नाचा विषय काढून टोचून बोलत राहिल.. काळे असेल तर ’आईशप्पत’ म्हणून तोंडावर हात ठेऊन बघून हसतच राहिल.. काय करावं.. काय करावं.. कुठे जागा मिळेल.. कोण आपल्याला कसं दटावेल या विचारात निशी चुळबुळत बसल्याजागीच बूड चिकटवून बसून राहिला आणि.. आणि एकशे एकाव्यांदा दचकला.

Monday, January 10, 2011

कॉमेडी शो “काय नवीन?”

“काय नवीन?...” आज आत्ता आठवड्याभरानंतर मनू भेटला, या नव्या वर्षात.मी म्हटलं, “नवीन? काय नवीन?” मनू मला टप्पल मारत बोलला, “यड्या मलाच काय विचारतोस पुन्हा तेच! माझी रोज पार्टी चालू आहे नवीन वर्षाची!” मी म्हटलं, “रोज?” तो म्हणाला, “तू नं नेहेमी जीवाला वैतागलेलाच रहा.सगळं जग आनंदित झालंय नववर्षं आलंय म्हणून आणि तू! चिंतातूर जंतू!” असं म्हणून मनू हसला.ज्या हसण्याला मी कुत्सित म्हणतो आणि मनू ज्याला स्टायलिश म्हणतो ते हसू. “बोल! काय नवीन?” माझ्या पाठीत इरिटेटिंग धपाटा घालत मनू तोच प्रश्नं मला पुन्हा विचारत होता.मी उसळलो- उसळलो म्हणजे- आवाजानं एक वरची पट्टी पकडली फक्तं.म्हणालो, “अरे नवीन काय नवीन नवीन? काय नवीन?” मनू पुन्हा हसला- आता मी खरंच चिडायला लागलो होतो.त्याला हवं ते झालं होतं.माझं सुरू झालं. “वाण्याचं बिल वाढतंय.ते वाढतंय म्हणून मॉलमधे जावं तर क्रेडिट कार्ड वाकडंतिकडं झालं सारखं सारखं स्वाईप करून.डेबिट कार्ड स्वाईप मशिननंच गिळलं.काय नवीन? ओवरड्राफ्ट खात्यातला डेबिट बॅलन्स वाढतोय.कांद्याचा वांधा नाशिकपासून पाकिस्तानपर्यंत पसरलाय.डाळींनी पुन्हा उचल खाल्लीय.वर कृषीमंत्री म्हणतात हे असं रहाणारंच! च्यामारी त्या गुटख्याच्या! तो मात्रं सगळीकडे मिळतो! काय नवीन? कामावर जायला बाहेर पडावं तर ट्रॅफिकचे लोच्ये-सगळीकडे.वर होर्डिंगवर नॅनोचा ’आनंद’ ० पैशात देतो म्हणे गाडी! काय नवीन? एमयूटीपीची ट्रेन स्टेशनमधे शिरायला दहा मिन्टं घेते! कारण काय? मोटरमनवर अन्याय? मोनोरेल आणि हवेतून रेल्वे! काय फरक पडणार? धंदे आणि स्टॉल्स पदपथावरून भर रस्त्यांमधे आलेत आता! पाण्याचा ब्लॉक, रेल्वेचा मेगाब्लॉक, हे सेवाउद्योग ब्लॉकमधेच संपणार आणि आपल्यालाही संपवणार! शिक्षणक्षेत्रात देशव्यापी एकत्रीकरण! पोरं लॅपटॉप मागताएत शाळेत जायलाऽ अर्‍ये काय नवीन?...”
मी प्रत्येक वेळा ’काय नवीन?’ च्या समेवर येत होतो आणि दाद दिल्यासारखं मनू त्याचं ते स्टाईलिश हसू हसत होता.तो हसला की मला आणखी चेव येत होता.मी दमतोय असं दिसल्यावर त्यानं मला थांबायची खूण केली आणि म्हणाला, “साल्या तू ना सामान्यच रहा नेहेमी!” “अर्‍ये मग काय करू?” मी विचारलं.त्यावर मनू उत्तरला, “अरे काय करू म्हणून काय विचारतोस? मोठा हो.मोठा हो!” मनूचं काहीतरी वेगळंच! मी विचारलं, “मोठा हो म्हणजे?” मनू माझा मित्र होताच.आता तो माझा मार्गदर्शक व्हायला बघत होता.म्हणाला, “मला सांग! तुझ्यासमोर पाण्यानं भरलेला अर्धा ग्लास ठेवला, तर तू काय म्हणशील?” मी चटकन् म्हणालो, “पिऊन टाकीन! काय म्हणीन कशाला? घशाला आधीच कोरड पडलीय सारखं ’काय नवीन’ म्हणून!” मनू आता माझ्यासाठी तत्ववेत्ताही झाला- म्हणजे फिलॉसॉफर.मनूला तेच चांगलं जमतं.कारण त्यासाठी काही मेहेनत करावी लागत नाही.नुसती तोंडाची वाफ दवडली की झालं.तर मनू त्याच्या खास ठेवणीतल्या आवाजात माझी समजूत काढत म्हणाला, “अरे म्हणजे ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणशील की अर्धा रिकामा आहे म्हणशील?” मी वैतागलो, “अरे कसाही असला तरी ग्लास अर्धाच रहाणार ना रे? आमचं सगळंच अर्धं.आयुष्य अर्धं, स्वप्नं अर्धी, महत्वाकांक्षा अर्धी, पैसा, संपत्ती…” असं म्हणेपर्यंत मला खोकला आला.मी खोकतोय हे बघून मनू पुन्हा हसला.स्टाईलिश.म्हणाला, “अर्धवट आहेस, अर्धवट.चांगला आणि योग्य विचार कधी करणार तू?” आवंढा गिळून मी म्हणालो, “काय वाव आहे विचार करायला? आहे त्या भयाण परिस्थितीत कलमाडी नको म्हणू, राजा नको म्हणू, आदर्श नको म्हणू, ती राडिया नको म्हणू सगळ्यांनी हात धुऊन घेतलेत! आता पुन्हा बोफोर्सच्या तोफा उलटवणार आहेत म्हणे! कोणावर? सगळं शेवटी आपल्यावरच! इकडे आपोझिशनवाले टपलेले, तिकडे राज्य पातळीवरचे नेते टपलेले, पलिकडे आपला शेजारी टपलेला आणि त्याही पलिकडे ती महासत्ता!ऽऽ”
मनू पुन्हा आपल्या ठेवणीतल्या आवाजावर आला.म्हणाला, “नको त्याची काळजी करतोस बाबा तू! तू काय करणार सगळ्या गोष्टींवर? सगळ्या समस्यांवर? टीव्हीचे बघ अगणित चॅनेल्स झालेत! काय वरायटी आहे! रिअलिटी शोज आहेत, गेम शोज आहेत, सेलिब्रिटीजनी चालवलेले.रोजचे सिनेमे आहेत.महामालिका आहेत- तुझ्या भाषेत.राष्ट्रभाषेत.हव्याच असतील तर आंतरराष्ट्रीय भाषेत! करमणूक होत नसेल तर बातम्या आहेत. बातम्यांमागच्या बातम्या आहेत.हॉरर बातम्या, हॉरर शो, अत्त्याचारसुद्धा आहेत! काय नाही? आता रात्री अकरानंतर काय बघायचं हे मी तुला सांगू? तू दिवसा ऑफिसमधे आडोसा करून कंपनीच्या लॅपटॉपवर बघतोस तेच! ते झालं की मॉलमधे जा.सत्राशेसाठ आहेत या टोकापासून त्या टोकापर्यंत.तिथेच मल्टिप्लेक्सेस नाहीत? आणि घरी आल्यावर, रस्त्यात, गाडीत, लोकलमधे, इकडे आणि तिकडे तुझा भ्रमणध्वनि आहे, त्याचे इअरप्लग्ज आहेत.हाताच्या पंज्यावर मावणारं इंटरनेटवरचं मायाजाल आहे.माहिती मिळवायला कोण सांगतय तुला? यूट्यूबवर काय बघायचं हे मी तुला सांगू? तुझा शाळेत जाणारा मुलगा सांगेल तुला! सगळं झालं की किंवा सगळं व्हायच्या आधी किंवा सगळं होताना त्याच्या मधेही गप्पांचे अड्डे आहेतच कीऽऽ होऊदे ना साईटवाल्यांचा फायदाऽ तुझा काय तोटाय हे सगळं करण्यात मला सांग!...नायतर असं कर.येतोस आज पार्टीला? वर्षाखेर आणि वर्षारंभ अशी मिळून मोजून सत्ताविसावी पार्टी आहे आज! धुंद हो.नव्या वर्षाचं स्वागत कर.माझं ऐक.स्वत:ला कुरतडत बसू नकोस असा!” मी म्हणालो, “अरे मनू हा चंगळवाद झाला.सगळ्याच प्रश्नांवर, समस्यांवर सामान्य माणूस काही करू शकेल असं मुळीच नाही.पण आपण आपले, आपल्यापेक्षाही जे सामान्य आहेत त्यांचे प्रश्नं, समस्या डोळ्यांसमोर दिसत असूनही कानाडोळा करायचा? फक्तं आपलंच बघायचं? कुणीतरी सुरवात करायलाच हवी रे.आपल्या आपल्या परीनं.ती कुठल्या नवीन वर्षात करायची?... आणि तू विचारतोएस मला काय नवीन?...” मी माझ्या तंद्रीत कधी गेलो ते मलाच कळलं नाही.
तंद्री भंगल्यावर मी मनूकडे पाहिलं.तो दिसेनासा झाला होता नवीन वर्षाचं स्वागत करायच्या सत्ताविसाव्या पार्टीला आणि मी माझ्या परीनं नवीन वर्षाचं स्वागत करायचा प्रयत्न करत होतो…

Sunday, January 9, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(४)

निशी नेहेमीसारखा मागे मागे पहात लोंढ्याबरोबर स्टेशनवर उतरला.गर्दीत कोण पुरुष किती देखणा आहे हे बघत.निशीच्या मागचा पायावर पाय पडल्याने सणकला.लोकलमधे चढण्या, प्रवास करण्या आणि उतरण्याच्या व्यायामाने तो आधीच हिंस्र झालेला.त्याने निशीच्या टपली मारली.“×××× युपीसे आते है साले मरनेको...”
निशी, आता बायका दोन्ही हाताने साडी उचलून चालतात, चालताना कंबर हलवतात, तसा दोन्ही हाताने पॅंट वर धरून जिना चढू लागला.सगळीकडे भिरीभिरी बघत.काही ऑफिसमधले, काही ओळखीचे झालेले खूष झाले ते बघून.सक्काळ सक्काळ साऽऽला मस्तऽ टाईमपास... त्याच्यावर ज्योक करत ग्रुप पुढे निघाला.निशी मुद्दाम मागे राहिला.सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करत.ब्रिजच्या विरूद्धं टोकाला तो फुटपाथवर कधी उतरला ते ग्रुपला नाक्यावर पोचल्यावरही समजलं नाही.
निशी पुन्हा भिरीभिरी लगालगा चालत खाऊच्या गाड्या शोधत या वेगळ्या रस्त्याने निघाला.पाच रूपयाला चार इडल्या मिळणार्‍या गाडीसमोर उभं राहून त्याने पंधरा रूपये खर्चं केले.दोनदा चटणी ओतून घेतली.ओठावर साचलेले इडलीचे कण चेहेराभर रूमालाच्या बोळ्याने पसरवत हाऽऽशऽऽहाऽऽशऽहूऽऽ करत पुढे निघाला.पुन्हा भिरीभिरी टुकूटुकू बघत...
नेहेमीच्या मुतारीत शिरल्याशिवाय नेहेमीसारखंच गत्यंतर नव्हतं.शिरतो तर बाजूलाच नेहेमीप्रमाणे उभा ग्राहक म्हातारा, काळा, जाडा, सफेद कपड्यातला मालिक.पॅंटच्या चेनवरून हात फिरवत.निशीकडे मिष्कील नजरेने बघत.गालात जीभ फिरवत.विचित्रं स्मित करत.रोखून बघत.निशीनं हडबडून नजर काढून घेतली.मालिक आवाज करून हसला.तोपर्यंत दोघांच्या पुढ्यातले दोघेही रिकामे झालेले.एकदमच.मागचे हे दोघेही मुतारीत वर चढले.निशी नेहेमीप्रमाणे पॅंटच्या चेनशी झटत.मालिक गालात जीभ घोळवत निशीकडे टक लाऊन.
निशीला संपूर्ण रिलॅक्स व्हायला दोन मिन्टं लागली.त्यानंतरच त्याचं इकडे तिकडे लक्षं गेलं.बाजूलाच मालिक.तो अजून बघतोय.नजर आणखी विचित्रं.निशीला नेहेमीसारखंच पुन्हा एकदा तीव्रतेनं जाणवलं, हा... मालिक, मुतारीत येऊन सगळं जग जे करतं ते न करता भलतंच काहीतरी करत उभा असतो.नक्की!...
सामान आत ढकलून घाईघाईत चेन लावताना निशीची चेन नेहेमीसारखी उघडी रहायला लागली.पॅंट जुनी झालीय... घड्याळाकडे लक्षं गेलं आणि तो अक्षरश: पळत सुटला...
पळताना अचानक त्याच्या लक्षात आलं, अरे… आपण आज हा ट्रान्सपरंट शर्टं घातलाय! आतल्या बनियनची लाईन आणि त्यात कसतरी कोंबलेलं अंगही दिसणारा.तो पटकन् शेजारच्या खुराडेवजा बहुमजली चाळीत शिरला.जिन्याजवळच्या आडोश्यात उभं राहून त्याने खसाखसा अंगातला शर्ट काढला.खांद्यावरच्या बॅगेत बोळा करून कोंबला.बॅगेतला घडीत चुरगळलेला रंगीबेरंगी शर्ट काढून त्याच्याशी झटायला त्याने सुरूवात केली.“सालाऽ हातगाडीवाला दिखताय् ऽसालेऽ कैसे ऐशमें रहते आजकल!” जिन्यावरून उतरणारा माणूस असं म्हणाला आणि कशीबशी शर्टची बटणं लावत, पॅंटची चेन पुन्हापुन्हा वरखाली करून बघत निशीने तिथूनही धूम ठोकली.
ढुंगणाला पाय लाऊन धावत धावत घामाघूम होत तो कचेरीत पोचला तेव्हा सव्वादहा वाजत आले होते.इतक्या लवकर- पहाटे- पोचूनही तो सही करायला मस्टरजवळ गेला नाही.मस्टरमागे खालचा बंड्या.त्यात यावेळी ऑफिसात दोनचार जणांशिवाय कोणीच नाही, म्हणजे बंड्या चेकाळणार.
भलत्याच रस्त्याने, दोन काऊंटर्सच्या सांध्यामधून वाट काढत बंड्याला दिसणार नाही अशा बेताने तो खुर्चीजवळ आला.मान पूर्णपणे खाली घालून.लगबगीने खुर्चीवर बसला.डोळ्यावरच्या सोडावॉटर काढून शर्टच्या वरच्या खिशात कोंबलेला रूमालाचा बोळा काढून आपला चेहेरा खसाखसा पुसायला घेतला.सोडावॉटर पुन्हा डोळ्यावर चढवताना त्याला समोर पिलरवरच्या काळ्या चकचकीत काचेत स्वत:चा चेहेरा, केस, खांदे, रंगीबेरंगी शर्ट, त्याच्या कोपरापर्यंत येऊन लोळणार्‍या बाह्या दिसल्या.रिनोवेशन करून सगळीकडे अशा चकचकीत काळ्या काचा बसवल्यापासून निशी सतत हैराण होत होता.सतत आपलं प्रतिबिंब बघून बघून.शॅ: असं करून तो समोरचं प्रतिबिंब चुकवायला जाई.दिशा बदले.तर, तो बघे त्या त्या दिशेला काळी चकचकीत काच आणि तेच ते प्रतिबिंब...
फायनल शॅ:ऽऽ करून तो उठला.उठावंच लागलं.तेही बंड्याला दिसणार नाही अशा बेताने.
बंड्या पॅंट खाजवत टॉयलेटकडे निघालाय.हे दिसल्यावर तो चटकन् जाऊन मस्टरवर पटकन् सही करून आला.कोपर्‍यातल्या वीरकरांनी निशीऽऽ... अशी मारलेली आरोळी चुकवत तो कपाटामागच्या टेबलाजवळ आला.टेबलावर चेक्सचा भला मोठा ढीग.सवयीने तो चटकन् पुढे झाला.लक्षात येताच तेवढ्याच त्वरेने मागे झाला.कुणाच्या लक्षात आपली हालचाल आली असेल का? असं वाटून भांबावून त्याने आजुबाजूला बघितलं.दोनचार जणांशिवाय कोणी काळं कुत्रं अजूनही आलं नव्हतं.ग्राहकही चाणाक्षं झाले होते.कर्मचारी बंधुभगिनींची वेळ समजून घेऊन त्यानी आपली वेळ मागे लोटली होती...

Wednesday, January 5, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(३)

इकडे भाई हरवल्ये आणि तिकडे बंड्याभोवतालच्या त्या गर्दीखालून कबनुरकर, सावंत आणि काळे बाहेर पडल्या.इतक्यात बाहेर पडले नसते तर गर्दीत कमीतकमी विनयभंग तरी झाला असता असे भाव कबनुरकरच्या चेहेर्‍यावर होते आणि झाला असता तर फक्तं आपलाच झाला असता अशी खुषीही त्यापाठोपाठ उमटली.चेहेर्‍यावरच्या वांगाच्या टिकल्यांमधून ती खुषी चेहेर्‍यावर सर्वत्र उतरली.मग जिवणी उघडली जाऊन समोरचे पिवळे पटाशीचे दातही आत मावेनासे झाले.कबनुरकर हसू लागली होती.
सावंत बाहेर आली ती ब्लाऊजवरची साडीची बॉर्डरलाईन चापूनचोपून बसवत, कुठे काही दिसत नाही ना याची चार चार वेळा खात्री करत.“मी गेली गंऽऽ”असं म्हणत ती चालू पडली.तरातरा चालत वर जाणार्‍या जिन्याजवळ गेलीसुद्धा.
काळे भांबावल्यासारखी.हातात पाण्याची रिकामी बाटली.रंगहीन पंजाबी ड्रेस घातलेली. “आईशप्पत!” असं म्हणून तिनं नेहेमीप्रमाणे तोंडावर हात ठेवला.एकदा गर्दीकडे, एकदा काऊंटरला टेकलेल्या परबकडे, एकदा कोपर्‍यातल्या पाठमोर्‍या तंद्रीतल्या भाईकडे बघत राहिली.’ऑन द स्पॉट’ टॉयलेटकडे चालता झालेला.“एऽऽ ऑन द स्पॉटऽऽएऽऽ”त्याला हाका मारत काळे पुढे झाली पण ऑन द स्पॉटला अशी हाक मारलेली आवडत नसे.तो फेंगडे पाय टाकत चटकन् ’जेन्ट्स’ मधे दिसेनासा झाला.तितक्यात कबुनरकरने काळेच्या दंडाला चिमटा काढला.काळे लहान मुलाच्या पार्श्वभागावर चिमटा काढल्यावर ते जसे ओरडेल तशी चित्कारली.म्हणजे नेहेमीसारखंच.“एऽआईक् नं! तर ’हा’ काल जाता जाता म्हणाला होता, लवकर येईन.पण साफ विसरलाच गं! बघ नं! –आणि बबड्याचे पेन्सिल कलर्स, कुकरचं गास्केट, मेथीची जुडी काही काही आणलंन् नाई गं! केवढी पंचाईत माझी माहितीए! -आणि आईंचं आमच्या तुला माहितीए ना, नुसत्या बसून राहिल्या मी येईपर्यंत- आणि बबड्या झोपेपर्यंत तुला सांगूऽऽ -सारखा अशी झोप, अशी झोप! शेवटी मी सांगितलं त्याला! तू काय करायचं ते कर! मी अशीच झोपणार!”कबनुरकरचा ’माझी माणसं, माझं घर’ चा पहिला एपिसोड सुरू झाला.काळेच्या दंडाला हिसके, चिमटे आणि थापट्या बसतच राहिल्या.त्या दोघी ’लेडिज’ कडे सरकल्या तसा कबनुरकरचा आवाज अधिक अधिक खाजगीत जाऊ लागला.
टॉयलेटला जाणार्‍या त्या वाटेवरच वीरकरांचं टेबल होतं.त्यांच्याभोवती शिपाईबंधू जमलेले.स्लीप्स, चेक्स यांचं बंडल बांधत वीरकर सहकार्‍यांचे मनोरंजन करत.आताही वीरकरांनी ’तू काय करायचं ते कर! मी अशीच झोपणार!’ एवढंच कबनुरकरच्या तोंडचं वाक्यं ऐकलं आणि मंडळात खसखस पिकायला वेळ लागला नाही.
अशावेळी निशिगंध गोरंबे काय करत होता?... निशिगंध गोरंबे!... रहस्यकथेच्या नायकाला शोभेल असं ते नाव.निशी म्हणून त्याला जग ओळखत होतं.चाळीस एक वर्षाचा, बुटका, जाडा.बरेचसे केस पिकलेले.केसांना तेल आहे, नाही.ते विंचरलेले काय धुतलेही आहेत, नाहीत असे.डोळ्यांवर जाड काचांचा, जाड फ्रेमचा चष्मा.
सगळे बंड्याजवळ आणि हा हंड्याजवळ.हंड्याजवळ म्हणजे बंड्यापासून दूर कुठेतरी.कुठेही पण बंड्यापासून जास्तीत जास्त दूर.कालच बंड्याने सणसणीत दम भरला होता.उशीरा येण्याबद्दल.वर छातीवर सणसणीत चिमटा काढून बंड्या खदखदून हसला होता.निशी हो, हो, नाही, नाही म्हणत आधीच घाबरलेला.त्यात बंड्याचा हात आता आपल्या पॅंटीच्या दिशेने येतोय हे कधी नव्हे ते आधीच कळल्यामुळे निशीने धूम ठोकली.बंड्या, त्याच्याजवळ उभे वीरकर, सकाळपासून रात्रीपर्यंत तिथेच असणारा ग्राहक म्हातारा ’मालिक’ आणि तीन चार टगे जोरजोरात हसले होते.
मग आज निशी लवकर आला.सगळ्यांच्या भाषेत भल्या पहाटे.म्हणजे सव्वादहा वाजता.मार्गशीर्षं सुरू झालेला.घरात भयानक गडबड.वडलांना कालच हॉस्पिटलमधून डिसचार्ज दिलेला.आईची कंबर धरलेली.सत्तर-ऐंशी वय म्हणजे हे कॉमनच.घरात परंपरा.श्रावण होताच.आता मार्गशीर्षं.कधी नाही ते सकाळी लवकर, म्हणजे सहा वाजता उठून निशीने बेत रांधला.वरण, भात, कोशींबीर, भेंड्याची भाजी, पोळ्या.तूप, लिंबू आहेत की नाही बघितलं.सोवळ्यानं.बंड्याचा दम आठवून आठवून कालपासून दमायला झालं होतं.निघाला.बंड्या रंगात आला की पॅंट पकडून पोटाला जोरदार चिमटा काढायचा.निशीला आज तो चुकवायचा होता...

Tuesday, January 4, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(२)

येणार येणार म्हणून गाजत असलेलं सर्क्युलर अखेर आलं आणि खालच्या बंड्यानं जोरदार हाळी दिली, “येऽऽ आलं रं आलंऽऽ”
नुकतीच सही करणारी, सही करून पंख्याचा वारा शोधत घाम पुसणारी, सकाळच्या फ्रेश गप्पा मारत अक्वागार्डभोवती जमलेली-पाणी भरून घेणारी; अशी सगळी कर्मचारी मंडळी खालच्या बंड्याच्या भोवती जमली.
खालचा बंड्या अडमिनिस्ट्रेशन बघायचा.गावरान.धूर्त.कळकटपणाचं सोंग घेतलेला.तो वरच्या मजल्यावरच्या लोन्स आणि अडव्हान्सेसवाल्या मॅनेजरला ’वरचा बंड्या’ म्हणायचा.केबिनवाल्याला ’आतला बंड्या’.सगळी पोरं ’ह्या’ ला ’खालचा बंड्या’ म्हणायची.
क्लिअरिंगवाला टपाल घेऊन आला.खालच्या बंड्यानं ते उघडलं.खालच्या बंड्याच्या मानेत स्प्रिंग बसवलेली असावी.सतत सगळ्याच गोष्टींवर नजर ठेवताना त्याची मान बगळ्यासारखी हाले.आता टपाल चाळतानाही तसंच.खालच्या बंड्याभोवती गर्दी वाढायला लागली.सगळ्यात पुढे, खालच्या बंड्याला खेटून टेन्शनमूर्ती टोकेकर.कानाला लावलेलं मशिन त्यानी लगेच पाळीला चिमटा घेऊन ऑन केलं.सवईनं टकलावरून हात फिरवत फिरवत ते इतके वाकून बघायला लागले की त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन उभा असलेला मनू मुत्तमवार वैतागला,“ओऽ सिनियर सीटीझन! आडवे काय पडताय बंड्यावर? पाताळात जायचा तो!”
“पाताळात की पातळात?”गर्दीतल्या कुणीतरी डाव साधून घेतला पण टोकेकरांच्या कानात ते काही शिरलं नसावं.नंतरचा जोरदार हशा त्यांच्या कानात शिरला आणि ते गर्दीतल्या एक एक माणसाकडे बघत राहिले.
असले विनोद नेहमी उत्तम शिंदे करायचा आणि त्यावर नेहेमी स्वत:च जास्त हसायचा.त्याचं हसणं सगळ्यात शेवटी संपायचं.टोकेकरांचा नेहेमीच गोंधळ होतो म्हणून तो मुद्दाम हसणं वाढवत न्यायचा.टोकेकर पूर्ण कॉन्शस होईपर्यंत तो थांबायचा नाही.
परब नेहेमी गर्दीपासून लांब.काऊंटरला टेकून.हाताची घडी घालून.लोक त्याला इन्स्पेक्टर परब म्हणायचे.परबला सगळ्यांची गंमत बघण्यात रस.कोण काय करतो, तो ते का करतो, नक्की कशासाठी; असा त्याचा ट्रॅक.आपल्याशी बोलणारा काहीतरी लपवून ठेऊनच सांगतोय हे त्याच्या मनात पक्कं.आत्ताही हा खालचा बंड्या उल्लू बनवतोय.असलं सर्क्युलर काय येतंय काय? सगळे बिनडोक उगाच गर्दी करून उभे राहिलेत- अशा अर्थाची उपरोधिक कम तुच्छतेची नजर त्या सगळ्यांकडे टाकून छद्मी हसत तो पंख्याखाली सरकला.
“क्यों परब! मोहल्लेमें गर्दी, चार आनेका भाव?”’ऑन द स्पॉट’ने आल्या आल्या परबच्या पाठीवर थाप मारली आणि स्वत:च ख्याऽ ख्याऽ करून हसला.हा अमराठी.पूर्वीच्या हिंदी सिनेमातल्या खलनायकांसारखी पालुपदं वापरायचा.“ऑन द स्पॉट-गोल्डस्पॉट!”हे नेहेमी.सगळे त्यालाच ’ऑन द स्पॉट’ म्हणायचे.
त्याच्या पाठोपाठ दिलीप आला.कॅमेर्‍याची बॅग सांभाळत.उन्हात काळा होणारा चष्मा गळ्यात लटकवत.त्याचा चेहेरा सदैव फोटो काढण्यासारखा.आपल्याला सगळं कळतं असं समजणारा दिलीप ती गर्दी पाहून भांबावला.चक्कर आलेल्या बंड्याला बहुतेक जागं करताएत म्हणजे बंड्याचे फोटो घेता येतील, या चाणाक्ष व्यवहारी विचाराने त्याचे डोळे चमकले.पण आता बहिर्दिशेला जाण्यात शहाणपणा होता नायतर पंचाईत झाली असती.बॅग ठेऊन स्वत:च्या शहाणपणाच्या ऐटीत दिलीप टॉयलेटकडे वळला.
मग आले भाई.बाजूच्याच बिल्डिंगमधे रहाणारे म्हणून सगळ्यात शेवटी येणारे.“भाई”ही त्याना मिळालेली उपाधी.त्यांच्या कर्तृत्वाची पावती.मध्यमवर्गीयांचा भाई म्हणजे अगदी गेम वगैरे वाजवला नव्हता कुणाचा पण चांगलीच जरब.सध्या सिंह थंड झालेला.पिकनिक्स अरेंज करायला लागलेला.ध्यानी पिकनिक, मनी पिकनिक.अवघे विश्वचि पिकनिक. ’च्यूत्यासारखे काहीतरी इश्यूज् हवेच असतात’ अशा अर्थाची थंड कुत्सित नजर बंड्याभोवतालच्या गर्दीकडे टाकून, एका कोपर्याथत हाताची घडी घालून भाईंनी ध्यान लावलं.या शनिवारची पिकनिक.पटवापटवी सुरू करायला पाहिजे.कस्टमर्सकडून पिकनिकसाठी डोनेशन्स, ’स्टफ’ची सोय, खाणं, चखणा... भाई हरवल्ये...

ग्लोबल झालिंया कळें...

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
जागतिकीकरणाची सुरवात होऊन वीस वर्षं उलटून गेली आहेत म्हणे! आपल्याला आजुबाजूला काही जाणवतंय? की सगळं आहे तसंच आहे? किंवा असं असेल! आपल्याला सगळ्याची सवय होऊन गेली असेल!
ग्लोबल झालिंया कळें...ही नवी मालिका सुरू करतोय अभिलेख वर!
आमचं (विनोदी!) आस्थापन.त्यातली तशीच (विनोदी!) पात्रं आणि त्यांनी भरून आणि भारून टाकलेला अवघा विनोद! आमचं आस्थापन अजूनही ग्लोबल होण्याच्या मार्गावर आहे.ग्लोबल होत असताना त्याला जाणवणार्‍या ह्या कळा आहेत की ते ग्लोबल होत असतानाच्या अनुभवातून आपल्याला काही कळणार आहे, आपण काही बोध घेणार आहोत? तुम्हीच ठरवा!