romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, April 22, 2018

दूरदर्शन मालिका... जाडूबाई जोरात, शौर्य

#जाडूबाई जोरात 
#शौर्य
#जाडूबाई जोरात
#दूरदर्शन #मालिका #अभिनय
#झीमराठी #झीयुवा मन:पूर्वक  आभार!

Tuesday, April 3, 2018

"घरटं" :साहित्यसौरभ... अस्मिता वाहिनी... २ एप्रिल २०१८

महानगरासारख्या ठिकाणी घरात चिमण्या शिरणं ही शक्य कोटीतली गोष्टं नाही वाटत! खरं तर असल्या जादुई नगरीत काय शक्यं नाही? अशक्य ते शक्य करणं ही महानगराची खासियत. मात्र इथे निसर्ग आणि माणूस यातलं वाढणारं अंतर रोखणं ही गोष्टं निश्चित काळजी करण्यासारखी आहे. इथे जंगल आहे, पण कॉंक्रिटचं!..

दूर उपनगरात सदनिका असणं, ती तळमजल्यावर असणं, त्या सदनिकेला मागचं दार असणं, मागच्या दारात चार बाय आठचं का होईना परसू असणं या अगदीच शक्य कोटीतल्या गोष्टी नव्हेत. पण असल्या तर त्यांचं महत्व जाणवतं का? यंत्रवत झालेले आपण त्या यांत्रिकतेतून बाहेर पडतो का?

बहुतेक वेळा सुटीच्या दिवशीच घराचं हे मागचं दार पूर्ण उघडलं जातं. पण त्या लाकडी दारामागेही असतं एक जाळीचं लोखंडी दार. नक्षीदार जाळीचं, भक्कम आणी बंद. पहिल्यांदा केव्हातरी या जाळीतून उन्हाचे कवडसे आले तेव्हा बाप झालेला असूनही मी खुळावलो. लहानपण, आजोळ, छपरावरच्या पन्हाळी कौलातून माडीवरच्या खोलीत येणारे कवडसे, त्या कवडश्यात बागडणारे धुलिकण. तो जादुमय झोत. मला सगळं पुन्हा दिसलं. मुलगी अगदीच लहान होती तेव्हा. लोखंडी जाळीतून भिंतीवर, बिछान्यावर पडणारे कवडसे तिच्या मऊ हातांनी पुसायचा प्रयत्न करत होती. मनासारखं होत नाही म्हणून चिरकत होती. शेवटी कंटाळून तिनं नेहेमीप्रमाणे तोंडात बोटं घातली आणि ऊं ऊं करत पडून राहिली...

मग मुलगी सात-आठ वर्षाची झाली. जाळीचा लोखंडी दरवाजाही आता मुडपून बाहेरच्या बाजूला अर्धा का होईना उघडण्यायोग्य केला. आता कुठल्यातरी ऋतूत, सूर्याच्या अयनानुसार कधीतरी आत येणार्‍या या उन्हाची सवय झाली होती.

सुटीचा दिवस. मी लोळत वाचत पडलेला. पायाशी मुलगी चित्रं काढत आणि रंगवत. माझा पाय हलवत शक्य तितक्या सौम्य सुरात उद्गारली, “पपा स्पॅरोSS..”. त्या आधी ती कशाने तरी दचकली हे मला अर्धवट जाणवलं होतं. तिनं दुसर्‍यांदा माझा पाय हलवला आणि मी तंद्रीतून जागा झालो. तिनं दाखवलं तिकडे बघितलं. एक चिमणा- चोचीपासून गळ्यापर्यंत काळा मफलर घातला असल्यासारखा- अंतराअंतरानी चिवचिवत होता. ’आत येऊ का?’ असं विचारत होता किंवा ’टू बी ऑर नॉट टूबी’ असं स्वत:शीच पुटपुटत होता. शेपटी उडवत. अर्धवट उघड्या लोखंडी दाराच्या, एका जाळीच्या भोकात तो मावला होता. मग अचानक आजूबाजूच्या दोन-तीन भोकांमधे त्याच्या मित्रमैत्रिणी पोहोचल्या. चिवचिवाटाची आता कुचकुच झाली. मी नकळत मुलीकडे पाहिलं. ती माझ्यासारखीच दंग. फडफड झाली आणि त्या जाळीतल्या दोन-तीन चिमण्या आणखी आत आल्या. एक आत उघडलेल्या लाकडी दाराच्या कडीवर बसली. दोन दाराच्या वरच्या कडेवर. पुन्हा कुचकुचाट सुरू झाला. मी मुलीला अडवलं. ती शूSS.. करून त्याना उडवण्याच्या बेतात होती. आगंतुकाला घरात घ्यायचं नाही. दाराचा कडेकोट बंदोबस्तं करायचा. कुलुप, लॅच, पीपहोल.. असल्या संस्कृतीत ती जन्माला आलेली, तसं करण्यात तिची काहीच चूक नव्हती. अडवल्यावर मग ती नेहेमीसारखी तोंडात बोटं घालून बसली. अशावेळी मुलं मनन करत असतात असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं..

आमचं अस्तित्व जाणवल्यामुळे म्हणा किंवा त्यांचं आपापसात काही ठरल्यामुळे चिमण्या एकाएकी अचानक भुर्रकन उडून बाहेर निघून गेल्या. आपल्या मननामधून बाहेर यायला मुलीला थोडा वेळ लागला मग तिची चौकसबुद्धी जागी झाली, “इतक्या सगळ्या स्पॅरोज- सॉरी चिमण्या- आजच आपल्या घरात कशा घुसल्या?”



काहीही न बोलता मी हळूच तिला खिडकीत आणलं. दाराच्या चौकटीपासून फूटभर अंतरावरच्या. घरं म्हणजे कोंडवाडे, असं म्हणण्यापेक्षा ते तुरुंगच झालेत. लाकडी दाराबाहेर लोखंडी जाळीचं दार आणि खिडकीला आतून डासप्रतिबंधक जाळी आणि बाहेरून लोखंडी नक्षीचा सांगाडा. अशा खिडकीतून मी मुलीला बाहेर, वर बघायला लावत होतो.

बाहेर, दार आणि खिडकीच्या वर इमारतीचा स्लॅब. त्यामुळे झालेला आयताकृती आडोसा. त्या आडोशात दोर्‍या बांधून वाळत घातलेले कपडे. त्या कपड्यात असंख्यं चिमण्या भुरभुरत होत्या. चिवचिवत होत्या. कुचकुचत होत्या. इकडून तिकडे पळत पकडापकडी खेळत होत्या. मिळेल त्याला लोंबकळत होत्या... तुरुंगातल्या कैद्यांनी, बाहेर खुलेआम फिरणार्‍या, बागडणार्‍या आयुष्याकडे बघत रहावं तसं त्या खिडकीतून मी आणि माझी मुलगी त्या चिमण्यांकडे बघत होतो...

सुटीचा दिवस नकळत संपतो आणि रूटीनचा राक्षस लगेच मानगुटीवर स्वार होतो. नको त्या विचारांचं मोहोळ घोंगावू लागतं. पण त्या दिवशी मात्र विषयांतर झालं होतं. अधूनमधून त्या चिमण्या माझ्या मनात सतत डोकावत राहिल्या. नुसत्या डोकावल्याच नाहीत तर त्यांच्या पंखांनी त्यानी मला भूतकाळात नेलं...

ही इमारत उभी राहिली त्याला साताठ वर्षं होऊन गेली होती. या जागेवर त्यावेळी असलेल्या चाळीला अंगण होतं. शेणानं सारवलं जाणारं. त्यावर शेकडो चिमण्या उतरायच्या. आईनं भाजलेल्या शेंगदाण्याच्या मधला कडक टाकाऊ भाग, जो खाल्ला तर पित्त होतं असं ती सांगायची, तो किंवा तांदूळ निवडता निवडता त्यातले खडे किंवा भाताची तूसं उडवली की चिमण्या गर्दी करायच्या ते टिपायला. लहानपणी तेव्हाच कधीतरी आईने चिमणा आणि चिमणीमधला फरक दाखवला होता.

अंगणात कावळे यायचे, साळुंक्याही यायच्या. समोर बंगला होता. आमच्या दारासमोर त्याची मागची बाजू यायची. फळबागच होती ती. कैर्‍या, जांभळं, पेरू, काजूची बोंडं, जांब... उन्हाळ्यात कुंपणाच्या तारा वाकवून चोरुन त्या बागेत जाताना गंजीफ्रॉक फाटायचा. पाठीवर ओरखडे उठायचे. वर शिव्याशाप. बंगल्याच्या मालकांचे. मग घरच्यांचे. बागेत पोपट तर यायचेच. भारद्वाजही यायचा. तो दिसला की म्हणे भाग्योदय व्हायचा...

तेरा बाय अकराच्या खोलीला दारात लाकडी फळी आडवी लावावी लागायची. अंगणात सहज फिरणारे साप, धामण, सापसुरळ्या, पावसाळ्यात बेडूक आत येऊ नयेत म्हणून. पावसाळ्यात त्या फळीला टेकून बसल्यावर काळंभोर कोसळणारं अमर्याद आभाळ दिसायचं. पागोळ्या कोसळत रहायच्या. झाडं, पानं हिरवीगार ओथंबायची, झावळ्या झुलायच्या.. अंगणात जास्वंद होती, तगर होती, अनंत होता. आवळा, केळी, सोनटक्का, गुलबक्षी, पावसाळ्यात टाकळ्याचं रान, साचलेल्या डबक्यात फडक्यानं मासे पकडणं...

असा खोल खोल जात मी थेट माझ्या आजोळातच पोहोचतो. पण तो दिवस त्या आधीच संपला. रहाटगाडग्याचं ओझं ढकलत घरी पोहोचलो. भूतकाळाची साखळी तुटली. आल्यावर मग बिछान्यावर लोळण्याचा कार्यक्रम. त्यासाठी बिछान्यावर जागा करायला लागणार. पसरलेल्या धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ते कपाटात ठेवायची पाळी माझी. पहिलाच माझा टिशर्ट हाताला लागला. तो सुलटा करण्यासाठी आत हात घातला आणि दचकलो. बहुतेक झुरळ- नाही- खरखरीत मोठं असं काहीतरी- अरे घरटं?... आत व्यवस्थित तयार केलेलं घरटं हातात आलं. मी पहातच राहिलो...

दुसरा दिवस. रुटीनच्या राक्षसानं कालचं घरटं विसरायला लावलेलं. संध्याकाळी घरी आल्यावर वर्तमानपत्र, छोटा पडदा अशा टिवल्याबावल्या करत बिछान्याजवळ आलो. आजही कपड्यांच्या घड्या करण्याची पाळी माझीच. आलेली जांभई आवरत दोन कपड्यांच्या घड्या घातल्या. पॅंट सुलटी करण्यासाठी आत हात घालून तिचा एक लांब पाय ओढायला जातो तर हातात घरटं. ओरडलोच, “हे काय चाललंय काय?” बाहेर दिवाणखान्यात छोट्या पडद्यासमोर तोंडात बोट घालून रमलेल्या मुलीलाही ते ऐकू आलं. ती धावत माझ्याजवळ आली. विचित्रं प्राणी बघावा तसं ती घरट्याकडे पहात राहिली. मग पुन्हा तिचं मनन सुरु झालं..

तिसरा दिवस. आज घड्या करण्याची पाळी बायकोची. “अरे हे काय आहे काय?” म्हणून तीही ओरडली. बाहेर दिवाणखान्यात रमलेले मी आणि मुलगी आत तिच्याजवळ पळालो. तिच्याही हातात, माझ्याच एका शर्टाच्या आतून निघालेलं... घरटं...

मग माझ्याच कपड्यात नेमकं ते घरटं कसं सापडतं, मी घरात कसा अडकलो आहे यावरुन विनोद आणि त्याहीपेक्षा जास्त हसणं...

असं आणखी दोनचार दिवस झालं आणि मग बंद झालं. विनोदही संपले. पण एरवी मी एकटा असताना, राक्षसी रुटीनमधेसुद्धा डोक्यातलं घरटं काही जाईना. पक्षी हुशार असतात. चिमण्या असतातच. दोरीवरचे कपडे रोज बदलत असतात हे त्याना कळत नसेल?.. हाताएवढ्या मोठ्या घरट्यासाठीचा कच्चा माल त्या रोज कुठून, कुठून, कसा जमवत असतील? घरटं जमवायची मूळ जागा म्हणजे वळचण किंवा झाडाच्या फांदीतलं बेचकं. दोन्हीही आता राहिलेली नाहीत!... काय करतील त्या?... रोज हातात आलेलं घरटं फेकून देताना जीवावर यायचं. नंतर ते आठवत रहाताना त्रास व्हायचा...

लहानपण चाळीत गेलं. अंगणात चिमण्या यायच्या. वळचणीला रहायच्या. लग्न झाल्यावर शहरापासून पार दूर रहायला गेलो. तिथे पाण्याचा प्रश्न. घर बंदच रहायचं जास्त वेळ. उघड्ल्यावर बाथरुमच्या गिझरमागे घरटं. ते काढून टाकायला लागायचं. जीवावर येऊन. लगेच नाही काढलं तर आत जीव धरतील मग ते आणखीच कठीण होऊन जाईल सगळं...

अशीही वेळ आली की आम्हाला कोकिळेसारखा दुसर्‍याच्या घरी राहून आपला संसार निभवायला लागला.   

चिमण्यांची हातात आलेली घरटी फेकून देताना मला माझी बदलावी लागलेली घरं आणि त्यावेळचे ते त्रास आठवत राहिले...

आता माझी मुलगी इतर अनेक मुलांप्रमाणे शिक्षणासाठी परदेशी उडून गेलीय. तिला भेटायचं म्हणजे आम्ही तिच्याकडे उडत जायचं की तिनी उडत इथे यायचं याच्यावर आमच्यात चर्चा चालू असतात.

परवा संध्याकाळी मी आणि बायको एका सहनिवासाच्या दगडी कुंपणाबाहेरुन चाललो होतो. कुंपणालगत आत ओळीने अशोकाची झाडं. त्यांची पानं आणि फांद्या वेगळ्या ओळखू येत नाहीत. त्यांची ती रचना  उतरती होऊन प्रत्येक फांदीआड एक सुरक्षित आडोसा तयार होतो. बायकोनं दाखवल्यावर लक्षं गेलं. कुचकुचाट करत असंख्य चिमण्या त्या फांद्यांआडच्या आडोश्यात आत घुसत, बाहेर येत आनंदानं बागडत होत्या. ते आपलंच घर असल्यासारख्या. आता त्याना आपलं घरटं जमवायचीही गरज नव्हती... ते दृष्य आम्ही मी डोळे भरुन पहात राहिलो..
जग खूप जवळ आलंय. प्रचंड घडामोडीचा हा काळ आहे. घरातून उडून दूर जायचं. तिथे घर करायचं. पुन्हा कारणपरत्वे उडून राहून नव्या नव्या घरांकडे झेपावत रहायचं हे आजचं वास्तव आहे. आजच्या या कोलाहलाच्या वास्तवात अशोकाच्या झाडांच्या त्या आडोश्यात आनंदानं स्वत:चं घर शोधून बागडणार्‍या चिमण्यांचं ते दृष्य अजिबात पिच्छा सोडत नाही. आनंदच आनंद म्हणजे काय याची ते नेहमीच साक्ष देत रहातं...


२ एप्रिल २०१८ रात्री ९.३० वाजता अस्मिता वाहिनीवर साहित्यसौरभ या कार्यक्रमात "घरटं" अभिवाचन स्वरुपात सादर केलं...
 (छायाचित्र.. आंतरजालावरून साभार..)