romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, October 31, 2011

बदलाचा इतिहास_धर्म

जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या लेखाच्या निमित्ताने विचारमंथन व्हावं अशी एक इच्छा आहे.इथे काही उदाहरणं मांडली आहेत आणि त्यावर अनेक वाचक आपली मतं मांडू शकतील.परस्परांमधल्या मतमतांतर प्रक्रियेला चालना मिळून विषयाचा आवाका नजरेसमोर येत रहावा असा एक उद्देश.
एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारावा हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात का येत असावा? त्यानंतर कृतीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष कृती कशी घडत असावी? त्यानंतरचे पडसाद काय स्वरूपाचे? हा या लेखाचा बीजविषय आहे.या संबंधातली केवळ उदाहरणं समोर ठेवणं हे या लेखाचं स्वरूप आहे.लेखावर वाचकतज्ज्ञांकडून उहापोह व्हावा ही सदिच्छा! 

सुरवातीचं उदाहरण प्रत्यक्ष धर्मांतराचं नाही.कालानुक्रमानंही ते पहिलं नाही.जगण्याची पद्धत एवढाच शब्दश: आवाका या उदाहरणापुरता लक्षात घेऊया.
आपेगावच्या विठ्ठ्लपंत कुलकर्ण्यांना संसारात पडून मुरल्यानंतर, चार अपत्य झाल्यानंतर, गृहस्थधर्म सोडून संन्यस्तधर्म स्विकारावा असं का वाटलं असेल? एकाएकी, एका झटक्याच्या अंमलाखाली एखादी पुरूष व्यक्ती सर्वसंगपरित्याग करणं, तरुण वयात करणं हे त्या काळात कदाचित सहज असेल.मग काशीला जाणं.तिथे गेल्यावर विठ्ठलपंतांच्या गुरूंनी त्याना ’तू गृहस्थधर्म सोडणं ही चूक आहे.पुनश्च गृहस्थधर्म स्विकार!’ अशी आज्ञा करणं.ही आज्ञा शिरसावंद्य मानणं विठ्ठलपंतांना सोप्पं गेलं असेल? गुरूची आज्ञा तडकाफडकी शिरोधार्य मानण्याचा तो काळ.व्यक्तीच्या मनात आपल्या पुढच्या प्रवासांसंबंधात काही आलं नसेल? चलबिचल झाली नसेल? हे असं दोन टोकात गर्रकन् फिरणं या कृतीचा अर्थ एका व्यक्तीच्या अनुषंगातून कसा लावायचा? पुढे काय?
वाळीत टाकलं जाणं हा सर्रास भयानक अनुभव होता.त्याचा अंदाज विठ्ठलपंतांना नव्हता? असूनही ते त्यात पडले.मुलांचं काय? हा यक्षप्रश्न होता.या प्रवासाचा शेवट उभयता पतीपत्नींनी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवण्यात होणं तसं अपरिहार्यच नाही का? पत्नी तर केवळ पतीबरोबर जायचं म्हणून आत्मसमर्पणाला तयार झाली असेल.तिला तिच्या लहानग्या चार-चार मुलांबद्दल काहीच वाटलं नसेल? विठ्ठलपंतांचा हा तीन टोकांवरचा प्रवास मग चमत्कारिक वाटू लागतो.तीन टोकाच्या कृती करणं या मागची मानसिकता काय असेल? विशेषत: हे वास्तवातलं उदाहरण आहे म्हटल्यावर उत्सुकता जास्तच ताणली जाते.  सरतेशेवटी मुलांचं काय? त्या मुलांचा या सगळ्यात काय दोष? त्याना तर अग्निदिव्यातून जावं लागल्याचं स्पष्टं होतं.पुढचे, पाठीवर मांडे भाजणं, भिंत चालवणं, रेड्याच्या तोंडून वेद वदवणं हा झाला चमत्काराचा भाग.चमत्काराचा भाग तर्कात बसत नाही म्हणून तो सोडून देऊ पण भोगावं तर लागलं असेलच.वाळीत टाकलं जाणं, जिथे तिथे अवमान होणं आणि त्यातून तावून, सुलाखून निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई अशी चार-चार अध्यात्मिक रत्नं निर्माण होणं हा पुन्हा एक आश्चर्यकारक प्रवास. विठ्ठलपंतांकडून निर्माण झालेल्या त्या पार्श्वभूमीमुळेच केवळ ही अशी फळं जन्माला आली? मराठी भाषेचा एक आद्यकवी जन्मला.त्यानं ज्ञानेश्वरी सांगितली, पसायदान मांडलं, ते ही इतक्या लहान वयात!- आणि नंतर, आता काही करायला उरलं नाही म्हणून त्यानं समाधीही घेतली!
वर म्हटल्याप्रमाणे विठ्ठलपंतांचा धर्मबदल हा केवळ वाच्यार्थानं घेतला जातो तसं धर्मांतर नव्हे.ते एकाच धर्मातल्या एका पद्धतीतून दुसरय़ा पद्धतीत जाणं (गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रमात) आणि परत फिरणं या स्वरूपाचा प्रवास आहे.ह्या प्रवासातली व्यक्तीव्यक्तींच्या मानसिकतेतली, जगण्यातली, त्याना तत्कालिन समाजानं दिलेल्या वागणुकीतली आणि त्यामुळे एकूणच होणारी घुसळण अस्वस्थ करते, विचार करायला लावते, नाही? या उदाहरणाचा विशेष म्हणजे अतोनात सहनशक्ती अनुसरून ह्यातल्या अंतिम टप्प्यातल्या सर्वच व्यक्तींनी एक सकारात्मक कार्य उभं करणं, जगाला एक उदाहरण घालून देणं हा सगळ्यावरचा कळस म्हणता येईल.सकारात्मक असणं म्हणजे आणखी काय असतं?..

कवि नारायण वामन टिळक अर्थात रेव्हरंड टिळक हे पुढचं उदाहरण.ते संस्कृत शिकले.इंग्रजी आणि इतर विषय शिकून झाल्यावर शिक्षण सोडून देऊन ते चरितार्थासाठी आणि गृहस्थधर्म निभावण्यासाठी शिक्षक झाले.लक्ष्मीबाई टिळकांपाशी अधिकृत शालेय शिक्षण नव्हतं.टिळकांनी प्रोत्साहन देऊन त्याना मराठी लिहावाचायला शिकवलं.स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाईंचं आत्मचरित्र मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड मानला जातो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधे ना.वा.टिळकांनी नोकरया केल्या.शिक्षक, पुरोहित आणि छापखान्यातला खिळे जुळवणारा अशा त्या होत्या.नागपुरात त्याना संस्कृत साहित्याचा भाषांतरकार म्हणून नोकरी मिळाली.संस्कृतात कविता केल्या.’ऋषी’ ह्या हिंदू धर्मविषयक उहापोह करणारय़ा नियतकालिकाचे ते संपादक होते.
नागपूरहून राजनंदगाव ह्या त्या वेळच्या एका संस्थानाकडे आगगाडीने प्रवास करत असताना, प्रवासात त्यांची भेट अर्नेस्ट वॉर्ड ह्या ख्रिश्चन धर्मगुरूशी झाली.वॉर्ड हे फ्री मेथॉडिस्ट चर्च या संप्रदायाचे होते.त्यानी स्वधर्माविषयी टिळकांशी बातचीत सुरू केली.टिळकांना त्यानी बायबलची एक प्रत भेट म्हणून दिली.त्याचवेळी वॉर्ड हे टिळकांच्या कानात कुजबुजल्याचं सांगण्यात येतं.’तुम्ही दोन वर्षांच्या आत सर्वरक्षक येशूच्या प्रेमळ पंखांखाली याल!’ हे ते वाक्यं.
त्याचवेळी हिंदू धर्मातली कर्मकांडं आणि जातीव्यवस्था यावर हा तरल मनाचा कवी आणि अभ्यासक नाराज होता.आजही हिंदू धर्मातल्या प्रमुख बोट ठेवल्या जाणारय़ा गोष्टी, इतक्या काळानंतरही, त्याच राहिल्या आहेत.जाणते आजही ह्या गोष्टींवर नाराज आहेत आणि त्याचवेळी कर्मकांडांनी पुन्हा भयावह रूप घेतलंय.जगण्यातली टोकाची अनिश्चितता हे त्याचं कारण सांगितलं जातं.राजकारणी त्याचा वापर करून घेताएत.जातीव्यवस्था एकीकडे जाळपोळ, बलात्कार, अजून वाळीत टाकणं अशा त्याच त्या मध्ययुगीन मानसिकतेत दिसते तर दुसरीकडे आरक्षण हा विषय दिवसेंदिवस समाजात दुफळी निर्माण करू लागलाय.राजकारणी इथेही अग्रक्रमाने धुडगूस घालू लागले आहेत.जातीव्यवस्थेचं धृवीकरण इत्यादी होतं आहे काय?.. असो! हिंदूधर्मातल्या कर्मकांडं आणि जातीव्यवस्था ह्या गोष्टी संवेदनशील मनाला बोचणारय़ा होत्या त्या तशाच राहिल्या आहेत असं दिसतं.
टिळकांनी धर्मांतर केलं.त्यातलीही विशेष गोष्टं म्हणजे तसं करत असताना त्यानी आपल्या पत्नीला, जिचा हिंदूधर्मावर गाढ विश्वास होता तिला तसं केल्याचं कळवलंच नाही! या धार्मिक मतांतरामुळे पतीपत्नींमधे वेगळं रहाण्याइतपत दुरावा आला.या काळात लक्ष्मीबाईंनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला.त्या ख्रिश्चन धर्माकडे ओढल्या गेल्या आणि शेवटी त्यांनीही धर्मांतर केलं.दोघांचं सहजीवन आणखी प्रेममय झालं.हिंदू विवाहसंस्था भक्कम झाली ती पतिव्रताव्रत आणि एकपत्नीव्रत यांमुळे असं म्हटलं जातं.विवाहानंतर, इतक्या उशीरा पतीपत्नीनं एकत्र येणं आणि एकरूपही होणं हे अगम्य असल्याचं म्हटलं जातं.परदेशात अचानक गायब होणारे नवरे, घटस्फोटित स्त्रीपुरूषांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी होणं, एकपालकी कुटुंबांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढणं या पार्श्वभूमीवर लेखक भालचंद्र नेमाडे एके ठिकाणी असं म्हणतात की आपल्या देशातल्या अफाट जनसमूहाचं सामाजिक स्थैर्य अबाधित राखणारय़ा हिंदू विवाहसंस्था या गोष्टीचा संबंध एकूण मानवी समाजाच्या मानसिक आरोग्याशी जोडला पाहिजे.   
अहमदनगरला रहात असताना आलेल्या प्लेगच्या साथीत उभयता पतीपत्नींनी केलेलं सेवाकार्य, सफाई कामगारांनी त्याचवेळेला केलेला संप मोडून काढणं, ते शरण आल्यावर त्यांचं उद्बोधन करणं, डॉक्टरांकडून प्लेगरूग्णांच्या सेवेबद्दल मिळालेलं मानपत्रं नाकारणं आणि केवळ सेवाधर्माचा धडा घालून देणं हे सकारात्मक कार्य केवळ वाखाणण्याजोगं.ख्रिस्तावरील अपार श्रद्धेमुळे करुणा, दया, सत्य, मानवता आणि सहृदयतेने केलेला सर्व विश्वाचा विचार ही मूल्यं त्यांच्या ठायी प्रकट झाली?  की हा या दोघांचा स्थायीभाव होता? धर्मांतर केलं असतं आणि नसतं तरीही त्यांनी या प्रकारचं कार्य केलं असतं की नसतं?
धर्मांतरांमुळे टिळक पतीपत्नीला सामाजिक जाचाला तोंड द्यावंच लागलं होतं.समाजानं वाळीत टाकणं म्हणजे काय? याची कल्पनाच आपण फक्त करू शकतो.त्या कल्पनेनेही आपल्यासारख्याच्या अंगावर काटा येतो.

अस्पृश्यांवर होत असलेल्या युगानुगाच्या अन्यायाचं काय? सवर्णांनी त्याना जनावरासारखी वागणूक दिली म्हणजे काय काय केलं हे नुसतं वाचून, ऐकून आज संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो.हिंदू धर्मातल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं हे फलित.अशी व्यवस्था समाजात सुसूत्रता यावी म्हणून आल्याचं सांगतात पण त्यानं विषमतेचा भला मोठा डोंगर उभा केला.जो आजतागायत मिटता मिटलेला नाही.महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज यांनी तळमळीने यासंबंधात कार्य केलं.डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी याच समाजात जन्म घेतला.आपली आणि आपल्या ज्ञातीबांधवांची दारूण अवस्था जवळून पाहिली.बडोदे संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर ते जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना तिथे अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही.दोन देशातल्या या परस्पर अनुभवांमुळे आपल्या देशाला, समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचंच हे त्यांनी पक्कं ठरवलं.अमेरिका, लंडन इथे उच्च शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यानी विविध वृत्तपत्रे चालवून अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत आपल्याच हिंदू बांधवांसमोर सतत मांडली.नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी सत्त्याग्रह केला.त्यात ते यशस्वीही झाले. 
हिंदू धर्मात राहूनच त्यानी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला.केवळ महाडचे चवदार तळे किंवा नाशिकचे काळाराम मंदिर एवढ्यापुरतं काम त्याना करायचं नव्हतं तर अस्पृश्य मानले गेलेल्यांना सन्मानाने जगता यावं हे त्यांच्या लढ्याचं उद्दिष्ट होतं.मनुस्मृतीचं जाहीर दहनही त्यानी केलं.त्यानंतरही तथाकथित उच्चवर्णीय आपल्या वर्तनात आणि मानसिकतेत बदल करत नाहीत हे त्यांच्या पुरेपूर लक्षात आल्यावर त्यानी ’मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही!’ अशी प्रतिज्ञाच केली.सरतेशेवटी पाच लाख अपृश्य बांधवांसह त्यानी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.धर्मपरिवर्तन केलं.जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचं ठरवलं तेव्हा सखोल अभ्यास आणि चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म निवडला.

यानंतर थोडसं, जबरदस्तीनं धर्मांतर या विषयाकडे वळूया.हे खरं तर आपण इथे विचारात घेत असलेल्या विषयाचं दुसरं टोक.पण काही वेळा असं अगदी दुसरं टोक गाठल्यावर आपण विचार करत असलेल्या विषयातले आणखी काही दुवे आपल्याला मिळून विचार सर्वंकष होण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.
हे जबरदस्तीचं धर्मांतर ठळकपणे दिसतं पाच पाच मुघल पातशहा हिंदूस्थानात धुमाकूळ घालत होते त्या काळात.हिंदू स्त्रिया, पुरूष, बालकांवर अत्त्याचारांची परिसीमा गाठली जात होती आणि श्री रामदासस्वामींच्या मार्गदर्शनाखाली एकमेव हिंदवी स्वराज्य उभारण्याचं कठीण काम शिवाजीराजानी केलं.हे करत असताना जबरदस्तीनं धर्मांतर करवल्या गेलेल्यांना अस्पृश्याची वागणूक मिळू नये म्हणून राजांनी शुद्धिकरणं करवून घेतली.नेताजी पालकरांचं शुद्धिकरण हे ठळक उदाहरण.

मुख्यत्वे मुस्लिम धर्म आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्म यांनी भारतात कालांतराने पाय पसरले.मुस्लिम राज्यकर्त्यांची जुलमी धर्मांतरं आणि ख्रिश्चन मिशनरय़ांचा धर्मप्रसार (शर्कराअवगुंठीत औषधासारखा?) उल्लेखनीय आहे.विहीरीत पाव टाकणं आणि त्या विहीरीचं पाणी नकळत किंवा नाईलाज झाल्यामुळं वापरावं लागल्यामुळे धर्मांतर होणं ही गोष्टही नोंदली गेली.समाजानं अस्पृश्य म्हणून वाळीत टाकण्यासाठी आणखी एक नवा वर्ग त्यामुळे तयार केला झाला.शुद्धिकरण हा पर्याय या समस्येवर वापरला गेल्याचं दिसतं.या इतर धर्मांनी असे प्रकार राबवले पण हिंदू धर्माच्या प्रसारकांनी असे मार्ग अवलंबल्याचे दिसत नाही.अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार करणारय़ा आदि शंकराचार्यांनी भारतभर फिरून विविध विचारसरणी आणि धर्मांचा पुरस्कार करणारय़ा विद्वानांशी वादविवाद करून आपली मतं सिद्ध केली असं सांगितलं जातं.हिंदू धर्माकडे आकर्षित झाल्यामुळेच हिंदू म्हणून धर्मांतर करून घेतल्याचं जगभर दिसतं.हिंदू म्हणून धर्मांतर करून घेतलेल्या जगभरातल्या व्यक्तींची यादी आंतरजालावर इथे बघायला मिळते.

धर्मांतराविषयी जालावर शोध घेत असताना या जालनिशीवर भारतातल्या विविध प्रांतातली सद्यकाळातली ख्रिश्चन धर्मांतरं मांडलेली दिसली.यातलं पहिलंच उदाहरण वाचताना पुन्हा चमत्कार इत्यादीचा प्रभाव जाणवला.दोन दोन राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालेला आणि परदेशात उच्च शिक्षण घेऊन आलेला मूळ हिंदू, दक्षिणेतल्या एका मंदिराच्या मुख्य पुजारी घराण्यातला मुलगा हा अनुभव सांगतो आहे.त्यात तो बनारस-तामिळनाडू आगगाडीच्या प्रवासात मधेच मध्यप्रदेशात उतरला तो कुणी आवाज (?) त्याला तशा सूचना देतोय म्हणून.मग त्याला पूर्वी ८०० किमी दूर भेटलेला एक संन्यासी तिथल्या रेल्वेस्टेशनवर अचानक भेटतो.तो त्याला नर्मदाकिनारी बाप्तिस्मा होईपर्यंत मार्गदर्शन करतो.एका अर्थाने अतिपरिचयात अवज्ञा असं आपण वर्षानुवर्षं बघत असलेल्या किंवा पाळत असलेल्या धर्माबद्दल होत असावं काय?

नंतरच्या काळातली काही उदाहरणं त्रोटक स्वरूपात:
मोहम्मद अली जिना या पाकीस्तान निर्मितीपुरुषाचे पूर्वज हिंदू राजपूत होते.त्यांचे आजोबा पूंजा गोकुळदास मेघजी हे हिंदू भाटीया रजपूत होते ज्यानी नंतर इस्लाम धर्म स्विकारला.जिनांच्या जन्माआधी काही काळ त्यांचे वडील जिन्हाभाई पूंजा कराची इथे व्यवसायासाठी स्थलांतरीत झाले.कराची तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमधे येत असे.जिन्हाभाई पूंजा हे एक भरभराट झालेले गुजराती व्यापारी होते.काठियावाडमधलं गोंडल हे त्यांचं मूळ स्थान.जिना स्वत: एक हुशार वकिल म्हणून फाळणीपूर्व भारतात सुप्रसिद्ध होते.मलबार हिल इथे आजही अस्तित्वात असलेलं जिना हाऊस महम्मद अली जिना यांचंच.जिना यांचा दुसरा विवाह रत्नाबाई पेटिट यांच्याशी झाला.त्या जिनांपेक्षा चोवीस वर्षांनी लहान होत्या.सर दिनशॉ पेटिट या जिनांच्या मुंबईतल्या पारसी मित्राच्या त्या कन्या.पेटिट ग्रंथालय, पेटिट स्कूल ह्या संस्था मुंबईत आजही अस्तित्वात आहेत.त्या दोघांच्या विवाहाला दोन्हीबाजूनी प्रचंड विरोध झाला.दिना जिना अर्थात दिना वाडिया हे जिना पतीपत्नीचं एकमेव अपत्य.दिनांचं शिक्षण इंग्लंड आणि भारतात झालं.त्यानी नेविल वाडिया या इंग्लिश उद्योजकाशी लग्न केलं.नेविल वाडियांचे वडील सर नेस वाडिया ह्यांनी भारतात बॉम्बे डाईंग ही प्रसिद्ध कंपनी स्थापली.मुंबईला कापड उद्योग म्हणून जगन्मान्यता देण्यात त्यांचा हात होता.नेविल वाडिया पारसी म्हणून जन्मले असले तरी सर नेस वाडियांनी दरम्यान झोराष्ट्रियन धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्विकार केला होता.नेविल वाडिया नंतरच्या आयुष्यात पुन्हा झोराष्ट्रियन झाले! अशी ही धर्मांतराची गुंतागुंत!
(वाडिया कुटुंबाची मुंबईत भरपूर जमिन आहे.टाटा कुटुंबाशी त्यांचं नातं आहे.मुंबईतल्या जिना हाऊसच्या मालकीचं प्रकरण हे भारत पाकिस्तान संबंधातलं आणखी एक परिमाण.हा संक्षिप्त अवांतर तपशील.)    

सुप्रसिद्ध ऑस्कर विजेता संगीतकार अल्ला रख्खा रेहेमान अर्थात ए.आर.रेहेमान हा ए.एस्.दिलीपकुमार म्हणून एका मुदलियार कुटुंबात जन्माला आला.त्याचे वडील आर.ए.शेखर हे मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत नावाजलेले संगीतकार होते.अवस्था हालाखीची होती.आर ए शेखर त्यांच्या वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी वारले.लहान बहिण गंभीर आजारी असताना १९८४ मधे ए.एस्.दिलीपकुमार आणि त्याच्या कुटुंबियांची काद्री इस्लाम या पंथाशी ओळख झाली.जवळीक झाली आणि १९८९ मधे वयाच्या २३ व्या वर्षी आजच्या ए.आर.रेहेमाननं कुटुंबियांसकट इस्लाम धर्म स्विकारला.

पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ म्हणजेच पूर्वाश्रमीचा युसूफ योहाना हा अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मला.राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पाकिस्तानात आढळलेल्या वाल्मिकी या दलित जातीतला त्याचा जन्म.हे कुटुंब नंतर ख्रिश्चन झालं.२००५ मधे इस्लाम धर्म स्विकारून युसूफ योहाना, मोहम्मद युसूफ झाला.त्या आधी तो पाकिस्तान क्रिकेट टीमचा पहिला परधर्मी (ख्रिश्चन) कर्णधार म्हणून नोंदला गेला होता.तब्लिघी जमात या संप्रदायाच्या शिकवणीकडे तो ओढला गेला त्यावेळी त्याची लहान मुलगी कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने आजारी होती असं वाचल्याचं आठवतं. 

स्टीव्ह जॉब्स हा अलिकडेच दिवंगत झालेला ऍपल या कंपनीचा प्रणेता.अनौरस म्हणून जन्मलेला, दत्तक मात्यापित्यांकडे सुपुर्द झालेला आणि स्वत:हून घर सोडून बाहेर पडलेला.सुरवातीच्या हालाखीच्या दिवसात  पोट भरून जेवण मोफत मिळतं म्हणून दर रविवारी सात किलोमीटर चालत हरेकृष्ण मंदिरात जावं लागत असे.प्रचंड प्रतिभाशाली आणि सर्जनशील अशी ही युगप्रवर्तक म्हणावी अशी महान व्यक्ती नंतरच्या काळात बुद्धधर्माच्या तत्वज्ञानाने आकर्षित होऊन बुद्धधर्मीय झाली होती...

Saturday, October 29, 2011

विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या खरय़ाखुरय़ा नायकास...

प्रिय अरुण,
                 तू माझ्या वयाचा नव्हेसच, खरं तर माझ्या वडलांच्या वयाचा.तुला काय म्हणून संबोधायचं इथपासून माझी तयारी.बरं तुझी व्यक्तिगत माहिती काहीच नाही, म्हणजे तुझा जन्म कधीचा, तू.. तू गेलास ती तारीख.परवा तुझा सिनेमा बघितला एक चॅनलवर.खरय़ा अर्थाने तो तुझा सिनेमा नव्हता अर्थात. पण तुझं ते फेटा, जाकीट घातलेलं, धोतर नेसलेलं रूप.पडद्यावरचं ते तुझं अप्रतिम ढोलकी वाजवणं.तुझ्या मनगटावरचा काळा धागा.. तुझा हातखंडा असलेला नायिकेबरोबरचा तुझा प्रेमप्रसंग.. तुझं हसणं, तुझं बोलणं.. त्या तुझ्या सहजतेला अभिनय म्हणणंसुद्धा व्यर्थ वाटलं.तुझं आणि माझं गाव एक हा फक्तं बादरायण संबंध जोडून तुला लिहायला बसणं अपरिहार्य झालं मला.हा भावनेचा खेळ तूच समजून घेशील.
                 तुझा सगळ्यात अप्रतिम सिनेमा कोणता? माहित नाही.तुझं पडद्यावरचं दिसणं अधिक चांगलं की हसणंच चांगलं, तुझा आवाज उत्तम की तुझं बघणं, तुझी नजर वेधून घेणारी.तुझं गावरान रूप अधिक चांगलं की शहरी जास्त प्रभावी.असलं काहीही मला डिफरंशिएट करता येणार नाही.मा.विठ्ठलना मी अगदीच थोडं बघितलं, तुला जास्त बघितलं ते माझ्या लहानपणी पण त्यानंतर ’नायक’ म्हणून कुणीच रूचलं नाही.तुम्ही दोघेच फक्त.अभिनेत्यांची यादी डॉ.लागू, निळू फुले, विक्रम, नाना, अशोक सराफ, दिलिप प्रभावळकर अशी लांबलचक होईल.पण नायक तुम्ही दोघंच.हे माझं मत.
                 तुझ्या एवढी प्रचंड सहजता आणि चार्म अरूण, नाही बघितला कुणात.तू आज असतास तर अनेक प्रश्नं विचारता आले असते प्रत्यक्ष.तू हिंदीत का गेला नाहीस? आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे नायक, अभिनेते आहोत असं तुला वाटतं का? तू ’तुघलक’ केलंस पण तेंडुलकरांचं तुझ्यासाठी लिहिलेलं ’अशी पाखरे येती’ तू नाकारलंस हे खरं का?.. 
                 तुझी कोणतीही विशिष्टं लकब नव्हती, जशी बलराज सहानी, मोतीलाल यांचीही सांगता येणार नाही.आता इथेच थांबतो.तुझी अमुक कुणाशी तुलना करायची नाहिए पण माझ्यामते तू उत्तम अभिनेता होतास.स्टाईलाईज्ड न होता व्यावसायिक चित्रपटांमधून तू लोकप्रिय झालास.
                ’थांब लक्ष्मी कुंकू लावते’ लहानपणी थिएटरमधे बघितलेला तुझा पहिला चित्रपट.मग टिव्हीवर बघितलेले ’संथ वाहते कृष्णामाई’, ’घरकुल’, ’मुंबईचा जावई’, ’सिंहासन’ शिवाय नाव न आठवणारे काही ग्रामीण चित्रपट, तमाशापट.हवालदार नायक आणि त्याच्यासारखाच दिसणारा नायिकेचा पाठलाग करून तिचा खून करू पहाणारा खलनायक असा दुहेरी रोल असलेला चित्रपट.. सिनेमांच्या नावापेक्षा तू लक्षात राहिलास.तुझ्या नायिकांची तुझ्याबरोबर प्रेमप्रसंग करताना काय अवस्था होत होती?
                 तुझा नायक मिष्कील असायचा.तो कधी व्यसनी व्हायचा, मग पश्चातापदग्धही व्हायचा.तो गर्विष्ठही असायचा आणि त्यात खलनायकी रंगही कधी असायचा.हे सगळं तू तुझ्या डोळ्यातून, आवाजातून आणि मुख्य म्हणजे सर्वांगातून आणायचास.आणायचास! दाखवायचास नव्हे! तुझ्या भूमिकांमधून चांगलंच वैविध्य असायचं.तुझ्या प्रेमात असल्यामुळे कदाचित पण तू खूप चांगला माणूसही असावास या माझ्या मतावर मी ठाम आहे.मध्यंतरी, जयश्रीबाई असताना, एका मुलाखतीमधे तुझ्याबद्दल बोलताना त्यांचा गळा भरून आल्याचं मला आठवतंय.तू चांगला माणूसही असल्याचं त्या सांगत होत्या.संभा ऐरा नावाचा तुझा सहकारी तुझ्या माणूसपणाबद्दल खूप आवर्जून बोलला होता माझ्याशी तेही आठवतं.कचकड्याच्या या दुनियेत, मिन्टामिन्टाला रंग बदलणारय़ा सरड्यांमधे तू कसा वावरला असशील? पण तू खरंच मर्दानीही होतास.राजामाणूस होतास.तुझं स्थान तू निर्माण केलंस.
                 सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक निवृत्तीबुवा सरनाईकांचा तुला वारसा.तू गाण्याकडे का तितकंस लक्ष दिलं नाहीस? ’घरकुल’ मधलं ’पप्पा सांगा कुणाचे’.. त्यातलं तुझं गाणं आणि विशेषत: गात गात हसणं.सहज हसणं.हसणं हा कितीतरी अभिनेत्यांचा आजही प्रॉब्लेम आहे.’चंदनाची चोळी..’ मधलं तू गायलेलं ’एक लाजरा न साजरा मुखडा’, ते सुद्धा सुप्रसिद्ध पार्श्वगायिकेबरोबर.कोण विसरू शकेल? ’मुंबईचा जावई’ मधलं रामदास कामतांनी म्हटलेलं ’प्रथम तुज पाहता’ पडद्यावर तुझ्याइतकं चांगलं कोण म्हणू शकलं असतं? तू मात्रं तुझ्यातलं गाणं फारसं मनावर घेतलं नाहीस!- आणि आज गाणं न येणारेही गात सुटलेत.स्वत:चे ढोल तू स्वत:च कधी बडवले नाहीस.तुला त्याची गरज नव्हती.पण तू विस्मृततही लवकर गेलास.तुझा जन्मदिवस, तुझा मृत्यूदिन कोणीही नुसता उधृत केलेलाही आठवत नाही.तुझ्यावर कुणी पुस्तकही लिहिलं नाही.तू मागे सोडलेल्या तुझ्या एकट्या लेकीकडे तुझं बरचसं संचित असेल.ते ती जपत राहिली असेल.
                आजच्या भाषेत सांगायचं तर तू तेव्हा नंबर वन होतास मराठी चित्रपटात.तसं असूनही केवळ शोबाजी केल्यासारखं न करता इमानदारीत नाटकंही केलीस. ’लवंगी मिरची कोल्हापूरची’, ’अपराध मीच केला’, ’तरूण तुर्क म्हातारे अर्क’, ’गुड बाय डॉक्टर’, आणि अगदी ’गोष्टं जन्मांतरीची’सुद्धा.तू छबिलदासला ’तुघलक’ही केलास, जो बघायला मिळाला नाही म्हणून मी आजही हळहळतोय.
                 मी एकदाच तुला हाताच्या अंतरावरनं पाहिलं.एका नाटकाच्या कॉन्ट्रॅक्ट शोच्या वेळी स्वत: बसमधून उतरून तू बस वळवून घ्यायला मदत करत होतास...
                तू आणखी जगला असतास तर काय काय केलं असतंस? मालिकांमधे काम केलं असतंस? जे काय केलं असतंस ते नक्कीच दर्जेदार केलं असतंस.तू चांगल्या चरित्रभूमिका केल्या असत्यास ’सिंहासन’ मधल्या मुख्यमंत्र्यासारख्या आणि आंगापेक्षा बोंगा जड विग लाऊन, आरडत, ओरडत, छातीवर हात दाबून किंचाळी, कंठाळी अभिनय करणारय़ा नेहेमीच्या यशस्वी चरित्र अभिनेत्याना धडे दिले असतेस.कुणीही शेंबडकोंबड्यानं उठून नायक बनण्याच्या आजच्या जमान्यात खरा नायक कसा असतो हे आजच्या तुझ्यासारख्या म्हातारय़ाकडे बघून कळलं असतं त्याना.कळलं असतंच पण वळलं असतं की नाही याची मात्रं मी काहीही खात्री देत नाही.तू आज असतास तर बरंच काही झालं असतं.मुख्य म्हणजे मला खूप बरं वाटलं असतं.पण तू गेलास.गेलास तो ही..
                 काही वर्षांपूर्वी एका आत्मचरित्रात तुझ्याबद्दलचा एक प्रसंग वाचून वाईट वाटलं होतं.पुण्याला तुझ्या नाटकाचा प्रयोग आणि तू पूर्णपणे ’आऊट’.प्रयोग रद्द करण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही.वाईट वाटलं.तुला खरंच खूप दु:ख होतं? कुठली चूक झाली होती तुझ्या हातून डोंगराएवढी म्हणून तू स्वत:वर आणि तुझ्या चाहत्यांवर सूड उगवत होतास? की कलाकार आणि व्यसन ह्यांचं अद्वैत असल्याचा न्याय तूही सिद्ध करत होतास?.. काहीही असलं तरी अगतिक व्यसनाधिनता ही कुणीही मान्य करण्यासारखी गोष्टं अजिबात नाही!
                 नियतीचा डावही असा की या व्यसनातूनही तू पूर्णपणे बाहेर आलास आणि ’पंढरीच्या वारी’ला निघालास. त्याचवेळी एका निर्घृण अपघातात तुला काळानं ओढून नेलं.तुला, तुझ्या पत्नीला, तुझ्या मुलग्यालासुद्धा! त्या भीषण अपघातात आपल्यालाही का नेलं नाही असं मागे राहिलेल्या तुझ्या मुलीला वाटलं असेल.तुमची मरणं अनुभवल्यानंतर ती आजतागायत काय जगली असेल याची मी फक्तं कल्पनाच करू शकतो.
मग हे अरूण नुसतं स्मरणरंजन नाही रहात.मग प्रश्न पडायला लागतात.कलावंताचं कलेसारखं त्याचं आयुष्यसुद्धा नाट्यमय किंवा सिनेमॅटिकच असतं का?.. कलाकार खरंच कलंदर असतो?.. कला शापित असते?.. की मरण अटळ असतं?.. संदर्भ असलेले, नसलेले असंख्य प्रश्नं..
                एका सिनेमात तुला अचानक पाहिलं.वावटळीसारखा माझ्या आठवणींमधे घुसलास तू.माझा नेहेमीचा हळवेपणा म्हणून अनेकवेळा तुझ्या आठवणींना काढून टाकण्याचा प्रयत्न केला.घुसमटत गेलो.तुला लिहायलाच बसलो.ते अपरिहार्य झालं.मला समानधर्मी मिळण्याचे अनेक चान्सेस दिसायला लागले, तुझ्याबद्दल माझ्यासारखंच वाटणारे.
                 अरूण.. तेव्हा.. वेगळ्या रूपात पृथ्वीवर आला असशील तर भेटूच! अन्यथा.. जरूर भेटू!
                 मी निदान तुझ्या गावचा आहे हे पुन्हा एकवार आठवून द्यायची आणखी एक संधी मी निश्चितच सोडू शकत नाहीए.तू काहीही म्हण!
                                                                    तुझा
                                                                              मी

Thursday, October 27, 2011

माध्यमं.. मुलं.. समाज..

कार्टून फिल्म्स ज्यांच्या अत्यंत आवडत्या होत्या ती बालकं कालांतराने टीव्हीवरच्या कौटुंबिक मालिकांमधे रमली.आता ती बालकं सोशल नेटवर्कींग साईट्सच्या आहारी गेली आहेत.वेगवेगळी सर्वेक्षणं आणि त्यांचे प्रसिद्ध होत रहाणारे निष्कर्षं मनोरंजक असतात.त्यांमधे तथ्यंही असतंच.
लहान मुलं दूरचित्रवाणी मालिकांमधे काय बघत असतात, किंवा होती? चकचकीत घरं? सतत लग्नंसमारंभातले कपडे घालून वावरत असलेले स्त्रीपुरूष? त्यांची भांडणं? कट आणि डावपेच? असंख्य विचित्र नमुने एकत्र असलेली कुटुंबं? त्यातला कमीतकमी एखादा ते अनेक विकृत?... की मालिकांमधे दाखवल्या गेलेल्या लग्नसंस्थेतला किंवा कुटुंबसंस्थेतला अत्यंत महत्वाचा घटक अर्थात विवाहसंबंध?... आपण जाणते आहोत.जाणत्या लोकांसाठी त्यांच्यातल्याच जाणत्यांनी सार्वजनिक माध्यमांचा आसरा घेऊन केलेली प्रत्येक कृती भावी समाजमनावर परिणाम करणारी आहे हे आपल्या लक्षात येत नाही? की डेलिसोपवाल्यांनी, कॉमेडी शोजवाल्यांना, माईंडलेस (?) कॉमेडीवाल्यांनी रिऍलिटी शोजवाल्यांना बोल लावायचे आणि त्यांनी न्यूज चॅनल्सना? आणि मग त्यानी चित्रपट उद्योगाला? कलाकृती मांडण्याचं स्वातंत्र्य- फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि सामाजिक जाणीव यांची सांगड कोणी आणि कशी घालायची? साधारणत: दूरचित्रवाणीवरून सादर होणारय़ा सरासरी कार्यक्रमांना ’एक्सप्रेशन’ चा दर्जा देता येईल? असं प्रकटीकरण की ज्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलं म्हणजे फार मोठा आघात झालाय मानवी मूल्यांवर वगैरे?...
एकीकडे विवाहबाह्य संबंध अपरिहार्य आहेत असं चित्र दाखवायचं आणि दुसरीकडे निरांजनातली ज्योत विझणं, करवा चौथच्या दिवशी (हा हल्ली मराठी मालिकांमधेही सर्रास साजरा होतो) नेमकं अघटित घडणं, यासारखे तेच ते अपशकुन, यातून आपली बालकं काय बोध घेणार आहेत? विनोदासाठी कुटुंबातल्या एखाद्या आदरस्थान असलेल्या माणसाची संवंग पद्धतीने खिल्ली उडवणं यातून ही मुलं काय शिकणार आहेत? माणसाचं सबंध आयुष्य घडवणारय़ा सुरवातीच्या वर्षांत, संस्कारक्षम मुलांना जे बघायला लागतंय त्याची जबाबदारी आपल्यावर नाही? ती पार पाडायला आपण पालक हतबल आहोत, असमर्थ आहोत? मुलांनी बघू नयेत असे कार्यक्रम मुलांच्या तोंडावर बंद करण्याचं धारिष्ट्य आपल्याजवळ आहे? जरा जाणत्या मुलांना ’सोशल नेटवर्कींग साईट्सची सफर बस्स झाली आता! या महाजालातून आता लवकर बाहेर पड!’ असं सांगणं आपल्याला जड जातंय? मुळात आपलं आपल्या मुलांच्या हालचालींवर योग्य लक्षं आहे का? ते नक्की काय बघतात यावर आपण सतत लक्षं ठेऊ शकतो का? नाहीतर मग काय?..
विषयाला हात घालताना असे अनेक प्रश्नं समोर येतात.नेहेमीचेच वाटणारे पण नेहेमीच अनुत्तरित रहाणारे..
मुलं कार्टून बघत होती.त्यात दाखवलेल्या अतिरिक्त हिंसेमुळे मुलं हिंसक बनतात असं मत मांडलं गेलं.ही मुलं मग दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघण्यासाठी आटापिटा करू लागली. ’सतत विवाहबाह्यसंबंध ठेवायचे, मग विवाह का करायचा? संबंध असेच का नाही ठेवायचे?’ असे प्रश्नं त्यांच्या मनात, डोक्यात आणि मग कदाचित ओठांवर येऊ लागले.आता तर वर्ल्ड वाईड वेब त्यांच्यासमोर खुलं झालंय.. आता ती परस्परांमधे चॅट करतात.पडणारे प्रश्नं ते आपापसात सोडवतात.काय असतात त्यांची सोल्यूशन्स? कशावर आधारित असतात त्यांची मतं? माध्यमलोंढ्यातल्या त्या हातोडाबाज (हॅमरिंग) मतांवर? असलं हॅमरिंग की जे कुठल्यातरी वाहिनीचा, कुठल्यातरी व्यक्तीचा, कुठल्यातरी अतिरेकी राजकारणी, अतिरेकी धार्मिक समुदायाचा अल्पकाळाचा स्वार्थ साधणारं आणि सगळ्या समाजाच्या दूरगामी तोट्याकडे हेतूपूर्वक/अहेतूपूर्वक दुर्लक्ष करून सवंग पद्धतीने मांडलेलं असतं? जे कदाचित समाजाला खड्ड्यात लोटणारं असू शकतं?
मुलं परिपक्व होतील, योग्य, अयोग्य त्याना समजू शकेल अशा पद्धतीचे संस्कार आपणंच त्याना देऊ शकतो.माध्यमांमधलं चांगलं काय हे आपण मुलांना सांगू शकतो.त्याना त्या दिशेने वळवू शकतो.आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्याकडून तसं होतंय की नाही हे बघू शकतो.आपल्या दृष्टीआड असलेल्या सृष्टीबद्दल काय? जरा जाणती मुलं आपण दृष्टीआड होण्याचीच वाट बघत असल्यासारखी बसून असतात.त्याना स्वत:च्या बळावर, त्याना संपूर्ण मुक्त झालेल्या सृष्टीची मन:पूत सफर करायची असते.मग काय? त्याना तसं करू द्यायचं? असं करत करत, पडत, ठेचकाळतच ती शिकतील हे मान्य करायचं? मुलांना शिस्त कशी लावायची? मारणं, झोडणं कितपत योग्य आहे? आजच्या काळात? मग त्यांना मारण्याझोडण्या व्यतिरिक्त शिक्षा करायची? काय शिक्षा करायची?
मुलांना सतत कुठल्या न कुठल्या सकारात्मक कामात गर्क ठेवायचं!.. म्हणजे? त्यांना अनेक ऍक्टीविटी क्लासेसना, संस्कारवर्गांना घालायचं.शाळा, शिकवणीवर्ग आणि मग संस्कारवर्ग असं वेळापत्रक सेट करायचं? बस्स! मग काय चिंता? हा योग्य उपाय आहे? तो किती प्रमाणात व्यवहार्य आहे? सगळं करून झाल्यावरही आजकाल वेळ उरतोच मुलांना म्हणे! मग विरंगुळ्यासाठी त्यांनी नाही वळायचं माध्यमांकडे?..
पूर्वी वर्तमानपत्रं येतंच होती की घरी! त्यात नव्हते चोरय़ा, डाके, बलात्कार, खून? वर्तमानपत्रंही खुलीच होती की? चित्रपटही होते.नंतर ते दूरचित्रवाणीवरही आले.. पुस्तकं, मासिकं यायची की! वडलांच्या, आजोबांच्या खोलीत, कपाटात, टेबलावर विराजमान असायची! मुलं बागडायचीच की घरभर!..
जग बदलत चालंलय! मूल्यं बदलताएत! मूल्यांचा र्‍हास होत चाललाय! आणि त्याचवेळी जग आणखी आणखी जवळ येत चाललंय! एकत्र कुटुंब पद्धती उतरणीला गेलीय.कुटुंब लहान सुख महान म्हणत म्हणत घर म्हणजे एकट्या, एकाकी जीवांसाठीच्या प्रयोगशाळा झाल्या आहेत.कॉंक्रिटची जंगलं तयार झालिएत.यात रहाणारय़ा जीवांचं विरेचन कसं व्हायचं? त्यांनी व्यक्तं कसं व्हायचं? मुलांमधे जी प्रचंड उर्जा असते तिची घुसमट या मुलांना, आपल्याला, या समाजाला कुठे नेणार?
वळण, शिस्त लावणारी पालक मंडळी आहेत.टोकाची, प्रसंगी घरात टिव्ही, कॉम्प्युटरच न ठेवणारी पालकमंडळीही आहेत.वाचन, चित्रकला, नृत्य, वाद्यवादन असे छंद; छंद म्हणून जोपासायला उद्युक्त करणारी पालकमंडळी आहेत.त्यांच्या संख्येत वाढ होतेय.पण सर्वसाधारण चित्रं काय दिसतं? ’तुला शिकवणीवर्गासाठी लांब जावं लागतंय, घे हा मोबाईल!’ असं म्हणून त्याच्या हातात एकविसाव्या शतकातलं, नव्या सहस्त्रकातलं असं प्रभावी आयुध दिलं की आपलं त्या मुलावर, त्याच्या हातातल्या त्या वस्तुच्या वापरावर कितपत नियंत्रण रहातं? अपरिहार्य व्यवहारातून निरोगी मानसिकता कशी घडवायची?
मुलं चांगली असतात.समंजस असतात.पुढची पिढी अधिक समंजस आहे.त्याना जास्त कळतं.आपण सगळेच दिवसेंदिवस अंगावर येणारय़ा वेगवेगळ्या माध्यमप्रवाहांच्या लोंढ्यांशी स्वत:ला जुळवून घेत जगू शकू.आपल्या वातावरणाशी, सभोवतालाशी जुळवून घेत मानवजात आगेकूच करतेय.त्यातलं जे चिरकाल टिकणारं असेल, मानवाच्या पुढील प्रवासाला अनुकूल असेल ते टिकेल; बाकीचं नष्टं होत जाईल.
डार्विनचं तत्वज्ञान इथे लावता येईल?

Friday, October 21, 2011

फुलझड्याही झडू लागल्या! दीपज्योती ई-दिवाळी अंक २०११!!!

दिवाळी उंबरठा ओलांडायला आतूर झालीए! 
जशी एखादी नववधू उंबरठ्यावरचं माप ओलांडायला असते तशी! 
एकदा ही लक्ष्मी घरात आली की घर कसं सुंदर, छान, इंद्रधनुषी रंगानं मोहरून जातं.
आनंद, आनंद म्हणजे काय? हे यावेळी कळतं! 
घराचं नंदनवन होण्याची ही सुरवात असते.
चंद्रज्योती, अनार आणि फुलझड्या! 
(त्या काही वर्षांनंतर सततच्या झडतात त्या नव्हे बरं का? त्या वेगळ्या!) 
तेव्हा वाचकहो! मोगरा फुलला आहेच! सुगंध वातावरणात भरून उरलाय,  नाही? 
आणि आता झडताएत फुलझड्या! आमचा दीपज्योती ई-दिवाळी अंक २०११ प्रकाशित झालाय! 
अंकात सामील झालंय माझं लेखन, अभिवाचन या स्वरूपात! 
पुढे दिलेल्या दुव्यांवर टिचकी द्या आणि जरूर ऐका! 
                                                 इथे ऐका "चारोळी" स्वरूपातल्या कविता! 
                                                                                
                                                 "ब्रह्मकमळ" हा मुक्तछंद इथे ऐका! 

                                                 "माजी ग्वॉष्टं!" ही ग्रामीण ढंगातली कथा इथे ऐका! 
                        
                आणि... संपूर्ण अंक आपल्याला वाचता येईल खाली दिलेल्या चिन्हावर!
                                                                    शुभ दीपावली!
                               

Thursday, October 20, 2011

मोगरा फुलला दिवाळी अंक प्रसिद्ध झालाय!

वाचकहो! नमस्कार! 
दिवाळी आता अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलीय! 
तुम्हासारख्या रसिकांसाठी साहित्याचा फराळ घेऊन आलाय आमचा मोगरा फुलला ई-दीपावली अंक!   
अंकात सामील झालेलं माझं लेखन:

परमेशर आणि फोटो ही दोन अभिवाचनं इथे ऐकायला मिळतील!                  आणि
आयुष्य ही माझी कविता इथे वाचायला मिळेल!
 
शिवाय संपूर्ण अंक खाली दिलेल्या चिन्हावर उपलब्ध आहेच! मनसोक्त आनंद घ्या! आणि हो! अंक कसा वाटला ते कळवायला विसरू नका!
                                     शुभ दीपावली!

Wednesday, October 19, 2011

भरत रंगानी (२)

भाग १ इथे वाचा!
..आणि, भरतनं काय काय केलं नव्हतं? समूह व्यवस्थापनाच्या पुस्तकी शिक्षणात तो पारंगत झाला.वडलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रत्यक्ष कामातले अ पासून ज्ञ पर्यंतचे धडे गिरवले.स्वबळावर जोखमी पत्करून समूहवाढीला मदत केली.आधुनिकता तसुभरही ढिली होऊ दिली नाही.अनेक छिद्रं हरप्रयत्ने बुजवली.पण.. नाव वडलांचंच वाढलं.वाढत राहिलं.घेतलं गेलं.
वडलांनीही सगळं वेळोवेळी हातात दिलं.त्यामुळे त्यांच्याशी विद्रोह- तो तर त्याच्यासारख्या कुणालाच परवडणारा नव्हता- पण तरीही, वेगळी चूल, स्वत:चं कर्तृत्व, स्थान, यश असलं हिंदी चित्रपटासारखं आयुष्यही त्याच्या वाटेला आलं नव्हतं.आलं असतं तरी वेढेवळसे घेत कर्तृत्व वगैरे दाखवण्यापेक्षा वेळीच समेट करणं किंवा गोष्टी विद्रोहापर्यंत न पोचवता प्रछन्नं जगत रहाणं असा धूर्तपणा त्याच्याकडे होता (भांडवलाचा स्टेकच केवढा मोठा होता!) मग स्वत:ची वेळ येण्याची वाट पहात बसता आलं असतं.
बरं, भरतनं तरीही काही केलं नाही असं नाहीच.वडलांच्या निधनानंतर त्यांच्याच प्रतिमेचा उपयोग करून तो चाली आखू लागला.त्यांच्याहीपेक्षा मोठ्या होण्याच्या.त्याने अनेक खाजगी, निमसरकारी, सरकारी उद्योग स्वत:च्या समूहाच्या पंखाखाली घेतले.यात अनेक क्षेत्रं अशी होती जी थोरल्या रंगानींच्या काळात दुर्लक्षित राहिली होती.
परंपरेने उद्योगजगताकडून वर्ज्य ठरवल्या गेलेल्या अनेक महत्वाच्या व्यासपीठांवर तो दिसू लागला.
अनेक क्षेत्रांतल्या मान्यवर लोकांबरोबर तो सतत वावरू लागला.
कालपेक्षा आज एक पाऊल नक्कीच पुढे पडत होतं पण घोडं तरीही कुठेतरी अडत होतं.एकिकडे एक दिवसात दहा पावलं पुढे जाण्याचं ध्येय होतं आणि दुसरीकडे भरभक्कम कर्तृत्व गाजवलेल्या बापाच्या पोटच्या वारसाचं भागधेय कपाळी लिहिलं गेलं होतं.
या सगळ्यातून उठून वर येण्यासाठी जुजबी, घिसेपिटे उपाय लागू पडणार नव्हते.एका क्षणात जादूची कांडी फिरवता येईल, सगळ्या नाड्या एकाच वेळी हातात येतील, एकमेव भारतीय असा गौरव होईल- असा जालिम पण सहज- उपाय सापडावा असा ध्यास लागला होता! निदिध्यास! रात्रंदिवस!
भरतच्या मनाला ध्यास लागला.ध्यास लागेपर्यंतच्या प्रवासात सर्वबाजूनी विचार केला गेला होता.आडाखे आणि त्यानंतर चाली करून ध्यासाची पूर्तता करता येणं भरतला शक्य वाटत होतं.
ह्या त्याच्या शक्य वाटण्याच्या कामी पुन्हा त्याचे वडीलच उपयोगी पडले.भरतला त्यात गैर वाटण्यासारखं काहीच नव्हतं.बाय हूक ऑर क्रूक- येनं केनं प्रकारेणं- खरी, आपल्याला जिचा ध्यास आहे ती, वाट सापडणं महत्वाचं होतं.
ही वाट शोधण्यातही अनेक तास खर्ची पडले.डोक्याचं भुस्काट पडता पडता बाकी राहिलं.जागतिक उद्यमजगताचा इतिहास, अनेक चरित्रग्रंथ, भरमसाठ वेबसाईट्स त्याने पालथ्या घातल्या.माहितीचा फडशा पाडला.अनेक उद्योगपतींना- उद्योगसमूहाचे राजे असलेल्यांना- प्रत्यक्ष भेटला..
गावाला वळसा घातला आणि कळसा काखेतच गवसला!
इथेही वडीलच कामी आले.
द सक्सेसफुल बिझनेसमन शुड हॅव अनकॅनी सेन्स ऑफ पर्सेप्शन!
वडील नेहेमी म्हणायचे, म्हणायचे काय? जपच करायचे!
मजा अशी होती की तोही गेली अनेक वर्षं हे वाक्य मनात घोळवत होता.
The successful businessman should have uncanny sense of perception!
यशस्वी उद्योजकाजवळ अनैसर्गिक, गूढ अशी आकलनशक्ती हवी!
अतिपरिचयात अवज्ञा असं काहीतरी झालं होतं आणि कोणे एके दिवशी भरत रंगानी त्या आफ्रिकन वन्यजीव संग्रहालयाजवळ असलेल्या गुप्त विश्रामधामात ध्यासाचं कोडं सोडवत असताना लख्खं प्रकाश पडल्यासारखं ते वाक्यं त्याच्या अंत:चक्षूंसमोर नाचू लागलं.पिच्छाच सोडेना!
त्याच्या या विश्रामधामाकडच्या फेरय़ा वाढू लागल्या.गुप्त ठिकाण असल्यामुळे अनेक सुरक्षाकवचं- अर्थात उद्योजकांनीच तयार केलेली- भेदावी लागत.एकूणच जागतिक उद्योगजगताला एकांत आणि विश्राम कसा मिळणार?
या भरतानं कशाचीही पर्वा केली नाही..
दिशा मिळाली पण पुढे काय?..               (क्रमश:)           



Tuesday, October 18, 2011

भरत रंगानी (१)

भरत रंगानीचं हेलिकॉप्टर आफ्रिकन वाईल्डलाईफ सॅंन्क्च्युअरी जवळ असलेल्या खाजगी आणि गुप्त अशा हेलिपॅडवर अलगद उतरलं.वन्यजीव संग्रहालयाच्या जवळची ही धावपट्टी अतिशय गुप्त ठिकाणी तर होतीच पण तिच्याजवळ भर जंगलात आणि तरीही सुरक्षित असं गुप्त विश्राम संकुलही होतं.जगभरातल्या निवडक उद्योजकांसाठीचं.त्यांनीच स्वत: निर्माण केलेलं.आक्रमक माध्यमांपासूनही ते अनेक वर्षं कसं गुप्त राहिलं हे एक आश्चर्यंच!
या उद्योजक बांधवांमधे भरत रंगानी हा एकमेव भारतीय उद्योजक विश्राम संकुलातली एक टुमदार कुटी अडवून होता.अर्थातच भरत रंगानी हा भारतातला आघाडीचा उद्योजक होता हे वेगळं सांगायला नकोच.खरं तर भरतच्या वडलांनी हा अवाढव्य उद्योगसमूह निर्माण केला, वाढवला.त्याची प्रचंड वाढ भरतच्या कारकिर्दीत झाली हे खरं असलं तरी मूळ श्रेय त्याच्या वडलांच्या उद्यमशीलतेलाच जात राहिलं.अनेक क्षेत्रात पसरलेल्या या क्रमांक एकवरच्या उद्योगसमूहाला ब्रॅंडनेमबरोबरच थोरल्या रंगानींचं अवघं व्यक्तिमत्वच जाहिरातीसाठी वापरता येत होतं.फायद्याच्या अनेक कसोट्या उद्योगसमूह लांघत होता.
थोरल्या रंगानींचं वयोमानपरत्वे जाणं हि ही रंगानी समूहासाठी इष्टापत्तीच म्हणायला पाहिजे.नवीन जाहिरातकल्पनेचा उत्तम वापर करून आता समूहानं आपली ए+ ही अत्त्युत्तम श्रेणीही कायम राखली.या कल्पनेमागचा मेंदू होता भरतचा.व्यापारी वातावरणात बाल्य, तारुण्य घालवून आता प्रौढ आणि परिपक्व झालेल्या भरतचा.
भरतजवळ काय नव्हतं? मेंदू तर होताच.उत्तम परदेशी शिक्षण होतं.देखणं व्यक्तिमत्व होतं.राजकारणी, समाजकारणी, माध्यमं यांच्याशी एकाच वेळी तो उत्तम संबंध राखू शकत होता.बहिणी तोलामोलाच्या घराण्यांत पडल्यामुळे समूहाला अडचणीत आणू शकणारय़ा प्रवाहांचा आपसूक बंदोबस्त झाला होता.स्वत:च्या बायकोमुळे करोडोंचं काम एका झटक्यात झालं होतं.बायको लावण्यवती होती.भरतचं आणि तिचं एकमेकांवर निरातिशय प्रेम होतं.त्या वेलीवर दोन गोंडस फुलंही उमलली होती.उमलून ती सध्या परदेशातल्या नावाजलेल्या शैक्षणिक विश्वात विसावली होती.भरतजवळ काय नव्हतं?
भरतजवळ नव्हतं ते कायमचं भारतातलं नंबर १ चं स्थान.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे सर्वत्र खुलेपणा आलेल्या अर्थव्यवस्थेत स्पर्धा वाढत होती.समूहाअंतर्गत आणि समूहासमूहामधली युद्धं- मग ती शीत असोत की उष्णं असोत- वाढत होती; त्रासदायक ठरत होती.बंदोबस्त करण्यात भरत वाकबगार होता, सरकारपासून ते सामान्य व्यक्तिपर्यंतचा; पण आता हा नेहेमीचाच खेळ होऊन बसला होता.उत्तम बुद्धिबळपटूप्रमाणं त्याला पुढच्या चाली रचाव्या लागत नसत, त्या आधीच तयार होत.या सगळ्यामुळे काहीशी दगदग मात्र होत होती.हे सगळं टाळणारा एखादा जालिम पण सहजपणे उपयोगात आणण्याजोगा उपाय आपल्याकडे का असू नये? असं त्याच्या मनानं घेतलं तर ते नवल नव्हतं.नंबर १ चं स्थान कायम टिकणं अत्यंत आवश्यक होतं!
त्याचवेळी, खरं तर त्या आधीपासूनच कधीतरी त्याला आणखी एक गोष्टं खुपू लागली होती.रंगानी उद्योगसमूहाला भरतचं स्वत:चं असं देणं काय? कॉन्ट्रिब्युशन काय? असा सवाल काल आलेला उद्योजक करू लागला होता.यात रंगानी उद्योगसमूहाबद्दल काहीबाही बोलून आपण प्रकाशात येण्याचा गुळगुळीत डाव असला तरी मूळ प्रश्नं भरतच्या मते हळूहळू महत्वाचा ठरवला जात होता.भरतच्या सदसद्विवेकबुद्धिलाही तो आता वेटोळे घालू लागला होता.थोरल्या रंगानींच्या निधनानंतर या प्रश्नाने जोर धरला होता.
तर भरतजवळ नव्हती ती कायमचं शिखरावर असण्याची खात्री आणि स्वत:च्या कॉन्ट्रिब्युशनच्या दुखण्यावरचा अक्सीर इलाज.
पण भरतजवळ स्वत:चा असा मेंदू होता.आपल्याजवळ काय नाही याची त्याला वेळीच जाण आली होती.दुसरा कुणी असता तर तो अनेक पिढ्यांसाठी कमवलेल्यातला आपला हिस्सा ओरपत राहिला असता. समूह सरासरी नफ्यात कायम ठेवत लाईफ मस्त एंजॉय करत राहिला असता.
त्यातला नव्हता म्हणूनच भरत रंगानी वेगळा होता..       (क्रमश:)            

Thursday, October 6, 2011

"या देवी सर्व भुतेषू"

           या देवी सर्व भुतेषू
           मातृ रूपेण संस्थित:
           नमस्तस्यै नमस्तस्यै
           नमस्तस्यै नमो नम:

प्रिय आईस!
खरं तर आज तुझा स्मृतिदिन नव्हेच..
तू घडवलंस, शिकवलंस, सीमोल्लंघन करवलंस..
केवळ माणूसपणातून बाहेर आणलंस,
माणुसकी मात्र कायम ठेवलीस..
लिहायला हात धरून शिकवलंस..
अलिकडे जगाच्या या जगड्व्याळ व्यापात
शब्द सोडून देतोय..
ते केवळ तुझ्यामुळेच..
सुरवातीची एक कविता.. तुझी आठवण..


तो अनुभव..
तो अनुभव
बाहेर पडू शकत नाही त्यातून
ते.. तीन महिने..
परत उगाळायला नको असतात..
सुखावह न वाटणारय़ा आठवणी
सारख्या का डोकावत असतात?..
मनाची सहाण तहानलेली
त्यावर आठवणींचं चंदन घासलं जातं
अश्रू करतात वंगणाचं काम
तरी सुवास कसा जाणवत नाही?..
आतल्या गाभारय़ात
मनाच्या नकळत
पूजा चालू असते तुझी
तुला अर्पिलेल्या चंदनाचा गंध
फक्त तुलाच जाणवत असावा..
पण तू तर आता जाणिवांच्या पलिकडे गेली आहेस
मग कळणार कसं?
उगाळलेल्या चंदनाचा गंध तुला अर्पिल्याशिवाय
आम्ही घेणार कसा?..
आठवणींचं चंदनखोड झिजत मात्र नाही
एवढं उगाळून उगाळून थकत अजिबात नाही
मनाची सहाण मात्र पार थकून गेलीए..
लडखडत लडखडत निर्जिव झालीए..
तू असताना जेवढं शिकवलं नसशील
तेवढं जाता जाता शिकवून गेलीस
पण आहुती द्यावी लागली तुला..
कारण, आम्ही मथ्थड होतो
ते.. तितकंच क्लिष्टं होतं..
तुला वेळ नव्हता..
तुला वेळ नव्हता
दुसरा मार्गच नव्हता
सगळ्या वाटा बंद होत्या
तू आपली वाट शोधलीस..
आता ही कोडी उलगडणार कशी?
कोण आता बोट धरून चालवणार?
एक गूढ मात्र कालालाही उलगडणार नाही..
आम्ही आकार घेतला ती जागा..
खेकड्याला इतकी का आवडावी?...
 
’अभिलेख’ च्या सगळ्या वाचकांना विजयादशमीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा!!!