romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label trip. Show all posts
Showing posts with label trip. Show all posts

Tuesday, May 8, 2012

नॉरबुलिंगका (Norbulingka)

नॉरबुलिंगका! काय आहे नॉरबुलिंगका? केवळ एक विचित्र शीर्षक द्यायचं म्हणून दिलंय नॉरबुलिंगका? नाही! अलिकडेच अमृतसर, धर्मशाला, डलहौसी असा दौरा झाला. अर्थातच स्थलदर्शन, रहाटगाडग्यापासून आराम इत्यादीसाठी. १८ एप्रिलला प्रस्थान आणि ३० एप्रिलच्या पहाटे परत. मग नेहेमीप्रमाणे ते सांगावं असं वाटलं. अमुक गाडी पकडून आधी इथे पोचलो. मुक्काम केला. ज्येवलो. झोपलो. सकाळी उठलो. स्थळदर्शनासाठी... असं दैनंदिनीवजा लिहावं असं वाटेना. मुळात होतं काय की कितीही झाली तरी अशी भेट ही धावती भेट होते. त्यात ती पर्यटनसंस्थेबरोबर केली तर आखीव रेखीव होते. तसं होण्यात काही न्यून आहे असं अजिबात नाही पण थोड्या कालावधीत अमुक एका प्रदेशाचा ’फील’- निश्चित अंदाज येत नाही. निश्चित अंदाज असा शब्द मुद्दाम वापरतोय कारण अमुक एका प्रदेशाबद्दल एक वेगळं मत तयार निश्चित होतं पण तेच अंतिम असं मानता येत नाही. दुसरी शक्यता अशा प्रदेशातून पायी भटकंती करण्याची. न ठरवता भ्रमण करण्याची. ती आळशीपणामुळे आणि अर्थातच अनेक व्यवहार्य कारणामुळे अजमावली जात नाही. तसं न करताही कधी कधी अचानक एक वेगळं स्थळ समोर येऊन उभं ठाकतं. भारून टाकतं. त्यात शिरल्यावर सगळं सगळं विसरून गुंग व्हायला होतं. मला वाटतं स्थळ उत्तम असल्याचं हे मुख्य परिमाण आहे. तर नॉरबुलिंगका... ’इथे आणखी एक मॉनेस्ट्री- बौद्धमठ आहे. खरं तर साईटसीईंगमधे अंतर्भूत नाही पण अधूनमधून वेळेच्या उपलब्धीनुसार पर्यटकांना आम्ही इथे आणत असतो’ असं आमच्याबरोबरचे दौरा व्यवस्थापक, मार्गदर्शक इत्यादी अनेक भूमिकांमधे लीलया आणि यशस्वी संचार करणारे म्हणाले तेव्हा आम्ही नुकताच नॉरबुलिंगका मधे प्रवेश केलेला होता...  आत शिरताना मार्गदर्शकाची वाक्य कानावर पडत होती आणि समोर चढत्या पातळीवरचं एक शिल्प दृगोचर होत होतं. चित्रपटातल्या एखाद्या झूमसारखं. होय, मला आशियाई चित्रपटात पाहिलेल्या थायलंड देशाच्या एका प्रवेशिकेची आठवण झाली. दगडांची नक्षी करत नेऊन एक एक पायरी तयार करत चढत जाणार्‍या पायर्‍या. त्या दगडांच्या सांध्यातून, पायर्‍यांच्या कोपर्‍याकोपर्‍यांतून रूजवलेली फुलझाडांची झुडपं. त्यावर फुललेली छोटी छोटी फुलं. दगडांच्या सांध्यांमधे मातीचंच लिंपण असावं. त्यामुळे त्या रचनेला एक भूतकालीन रम्यतेचं स्वरूप आलेलं... पुन्हा या सगळ्याला किनार होती पाण्याच्या ओहळाची. कृत्रिमरित्या खेळवलेला ओहोळ. ओहोळाचा खरं तर परिघ. मधेच तो ओहोळ एका डबक्यात सोडून दिलेला. छोटसं पण देखणं डबकं. त्यात नुकत्याच सुरू झालेल्या संध्याकाळच्या पावसामुळे आलेलं गढुळपण. त्यात दिसणारे सोडलेले मासे... सगळं रचलेलं तरीही त्यात नैसर्गिकपण आणलेली उत्स्फूर्तता. नैसर्गिक वेडेवाकडेपणा... मला पुन्हा तो थायलंडचा चित्रपट आठवू लागलेला. त्यात अशा पद्धतीच्या मठाचा आतला परिसर कॅमेर्‍यानं व्यवस्थित दाखवलेला... मी इथे वर पाहिलं. राजवाड्यासारखी रचना असलेला तो वाडा.. वाडाच म्हणालो मी मनात. मग भूतकाळातल्या माझ्या आजोळच्या वाड्यात, भोवतालात असलेल्या हौदावर, त्यातल्या गढूळ पाण्यातल्या माशांवर.. फिरून आलो. सगळं खूप जवळचं वाटायला लागलं... वारंवार लक्ष जायला लागलं सोन्याच्या मुलामा दिलेल्या त्या वाड्यावरच्या नक्षीकामावर..
वाड्याच्या जवळ गेलो. आतल्या मखमली लालभडक भिंती, मखमली लालभडक भलेमोठे- पूर्वीच्या वाड्यांना असत तसे दरवाजे.. त्यावरची सोन्याच्या मुलाम्याची नक्षी... आणि केंद्रभागात भला मोठा सोनेरी बुद्ध... अर्धपुतळा स्वरूपातला... उंचच उंच... इथली रचना थोडीशी चर्चच्या केंद्रस्थानी असते तशी. बुद्धापर्यंत पुन्हा पातळ्या. लाल रंगाचं आवरण घातलेल्या पायर्‍या. एका पायरीवर सद्य दलाई लामांचं छायाचित्र... खूपच छान वाटत होतं.. एखाद्या वातावरणाने आपल्याला आपल्या आठवणीतली चित्र दिसायला लागली तर ते वातावरण आणखीनच भावतं का?... असेल. पण बघत रहावं, इथून हलूच नये असं वाटणारं ते वातावरण... प्रसन्न करणारं...
काही धर्मस्थळं म्युझियमसारखी वाटतात तसं इथे वाटलं नाही. रचना केली आहे हे कळूनही नैसर्गिकतेचा प्रत्त्यय देणारं असं काही.. आपोआप पावलं रेंगाळली. शेजारी तिबेटियन डॉल्स म्युझियम आहे. तिथे चला. अशी सूचना आल्यावर उत्सुकतेने तिथेही डोकावलो.चीनमधे त्रास झालेल्या तिबेटी नागरिकांना भारताने आश्रय दिला. त्या तिबेटी नागरिकांनी धर्मशाला या हिमाचल प्रदेशातल्या भागात आपल्या संपूर्ण संस्कृतीचं दर्शन घडवणारी दालनं उघडली. त्यातलं हे एक. या बाहुल्यांच्या घरात तिबेट प्रांतातल्या वेगवेगळ्या जातींच्या, प्रजातींच्या, टोळ्यांच्या चालिरिती, त्यांच्यात साजरे होणारे समारंभ, त्यांची हत्त्यारे इत्यादींच्या देखण्या प्रतिकृती सादर केल्या आहेत. काचेच्या प्रकाशमान पेट्यात ठेवलेल्या गुहेसारख्या अंधार्‍या लांबलचक भुयारासारख्या सभागृहात या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. या बघायला विशेषत: वृद्ध तिबेटी पर्यटक येतात आणि भारावून पुन्हा पुन्हा हे बाहुल्यांचं घर न्याहाळत रहातात. त्यांच्या डोळ्यात किंचित पाणी आहे की काय असं त्या निर्माण केलेल्या गूढ अंधारात त्यांच्याकडे बघताना चाटून गेलं. आपल्या प्रदेशातून हाकललं जाणं. काही स्वरूपातलं स्थैर्य मिळणं आणि तरीही मातृभूमीपासून हिरावलं गेल्याचा सल. या ज्येष्ठ नागरिकांच्या देहेबोलीतून जाणवतो. वृद्धत्वाच्या परिमाणामुळे तो अधिकच गडद होत असावा.
इथल्या तिबेटी निर्वासितांना भारत सरकारनं खूप प्रमाणात सवलती दिल्या आहेत. क्वचित इतक्या की भोवतालचे भारतीय त्यानं नाराज होतात. तिबेटी निर्वासितांना मतदानाचा हक्क नाही. हे निर्वासित ’भटाला दिली ओसरी’ सारखे इथे रहातात. यांनी निर्मिलेल्या पुस्तकांमधे भारत सरकारबद्दलचा रोष वाईट पद्धतीनं बाहेर आलेला आहे. त्याना भारत सरकारही आपल्यावर अन्याय करतं आहे असं वाटतंय. अशी मतं इथे कानावर आली. चीन सरकारनं त्यांच्यावर अन्याय केलाच आहे. त्याचे फलक विशेषत: मॅकलोडगंज इथे दिसतात. मॅकलोडगंज इथे बौद्धमठ आहे. तो विशेष प्रसिद्ध आहे. या मठाजवळ सद्य दलाई लामांचं निवासस्थान आहे. तो दलाई लामांचा मठ म्हणून ओळखला जातो. परदेशी चलनातल्या भरपूर देणग्या मिळवणारा हा मठ आहे. मला स्वत:ला तो जास्त म्युझीयमसारखा वाटला. त्याविषयी पुन्हा कधीतरी...  
नॉरबुलिंगका संदर्भातली आणखी काही चित्रं!
पहिलं चित्र आहे फिरत्या दंडगोलांच्या रांगेचं. सोनेरी मुलामा असलेल्या दंडगोलांवरून हात फिरवत मंत्रसदृष्य जप करणं हा बौद्धमठात येणार्‍या भक्तांचा महत्वाचा उपचार. 
दुसरं चित्र आहे अंतर्गत सजावटीच्या नमुन्याचं.
तिसरं चित्र आहे मखमली, सोनेरी नक्षीकाम असलेल्या दरवाज्याचं.
चौथं चित्र आवाराचं आणि पाचवं आहे विशाल बुद्धाचं!

 
    (या आधीच्या सिरसी, कर्नाटक दौर्‍याच्या पोस्ट्स इथे जरूर पहा!)

Friday, June 24, 2011

सिरसी: सहस्त्रलिंग आणि झुलता पूल!

पर्यटनाला गेल्यावर आपण अनेक स्थळांना भेट देत असतो.हे स्थळ त्यावेळी कसं वाटतं हे त्या त्या वेळच्या वातावरणावर, परिस्थितीवर, तुम्ही तिथे पोचता त्या वेळेवर तसंच तुमच्या मनस्थितीवरही अवलंबून असतं.सिरसी या उत्तर कर्नाटकातल्या गावापासून जवळंच असलेल्या सहस्त्रलिंग या ठिकाणाबद्दलची माहिती दिली गेली तेव्हा ते पहाण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.नदीच्या पात्रातल्या अनेक, म्हणजेच सहस्त्र पाषाणांवर एकेक, अशी कोरलेली हजार शिवलिंगं इथे बघायला मिळतात असं ऐकल्यावर कधी एकदा ते बघतो असं होऊन गेलं होतं.त्यावेळच्या एका राज्यकर्त्याला मूलबाळ होत नव्हतं म्हणून त्यानं शिवाची आराधना केली तेव्हा त्याला स्वप्नात अशी आज्ञा झाली की सहस्त्रलिंगं कोरून घे आणि पूज! तुझी इच्छा पूर्ण होईल! राजानं तसं करून घेतलं आणि सगळीकडे आनंदीआनंद झाला!
ही जातककथा ऐकल्यावर प्रत्यक्ष काय झालं असेल? इतक्या सगळ्या कारागीरांनी, आजच्या भाषेत हे सगळं प्रोजेक्ट कसं पूर्ण केलं असेल, नक्की सांगितलं जातं तेच कारण असेल की आणखी काही? असे प्रश्न मनात आलेच.
प्रत्यक्ष सहस्त्रलिंग या जागी पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.मळभ असलेली उदास संध्याकाळ.नदीकिनारी बांधलेल्या सिमेंटच्या पायरय़ांपर्यंत पोचलो तेव्हाच साठलेल्या पाण्याचा कुबट असा वास यायला लागला.आदल्याच दिवशी सातोडी फॉल्स या धबधब्यावर नि:संकोच भिजलो होतो.धबाधबा कोसळणारय़ा स्वच्छ निर्मळ पाण्याचा अनुभव मनसोक्त घेतला होता.त्याच्या आदल्या दिवशी सिरसी गावाच्या अगदी जवळ असलेल्या एका नदीच्या पात्रात संध्याकाळी मुलांना डुंबण्यासाठी नेलं होतं.तीही जागा वहात्या पाण्याची होती.स्वच्छ होती.सहस्त्रलिंग या ठिकाणी तसं वाटलं नाही.मे महिन्याचा मध्य म्हणजे वहात्या पाण्याची अपेक्षा करू नये पण इतर ठिकाणी आश्चर्यकारकरित्या तसं पाणी मिळालं होतं.सहस्त्रलिंग असलेल्या पात्रात मात्र नाल्यासारख्या ठिकाणी येतो तश्या पुंगस वासामुळे पायरय़ा उतरून खाली जाववेना.काही जण तरीही पाणी, पाणी करत उतरले.एकूण जराश्या मळभ आलेल्या आणि अजिबात हवा नसलेल्या वातावरणात जीव रमेना.इतकंच काय एकेका लहान मोठ्या दगडावर असलेलं एक एक शिवलिंग बघून त्याचं छायाचित्र काढायचंसुद्धा माझ्या मनात आलं नाही हे कबूल करावं लागेल.सगळंच काही अगदी वाईट होतं असा याचा अर्थ नाही पण कधी कधी आपली मनस्थिती आपल्याला भोवतालाबद्दल उदास रहायलाही प्रवृत्त करत असावी.
यामुळे सहस्त्रलिंग या स्थानाचा हा जालावर मिळालेला दुवा इथे उधृत करतो आहे, मी काढलेलं छायाचित्र नसल्यामुळे तेही इथे शेअर करता आलेलं नाही.
तिथून माझा पाय लगेच काढता झाला याला आणखी एक कारण म्हणजे आमच्या अनुभव ट्रॅवल्सचे आमच्याबरोबर असलेले एक मार्गदर्शक श्री पटकुरे आपल्या कारवारी-कोकणी मिश्रित मराठीत “पुडे च्यला! लक्ष्मण झूला हाये लक्ष्मण झूला!”असं ओरडायला लागले.माझ्यासारखी रेंगाळणारी आणखी काही मंडळी लगेच पुढे सरसावली.दोन चार पावलावर त्याच नदीच्या पात्रावर एक झुलता पूल दिसला.लहान मुलाच्या चपळाईने लगेच धावलो.खरं तर ह्या पूलाचा उपयोग कृत्रिमरित्या बनवलेलं स्थलदर्शनाचं ठिकाण म्हणून केला असावा असं दिसत होतं.पण कर्नाटकातल्या पद्धतीने छान रंगरंगोटी करून व्यवस्थित राखलेल्या या पूलानं आमचं लक्ष वेधून घेतलं.तोपर्यंत कुठुनसं सूर्यदर्शनही होऊ लागलं होतं.मगासचं उदास वातावरण जाऊन आम्ही त्या पुलावर हेलकावे खाण्याचा आनंद लुटायला लागलो.लांबवर दिसत होते सहस्त्रलिंगावरच्या प्रत्येक पाषाणावर जाऊन त्या त्या लिंगावर नतमस्तक होणारे स्थानिक आणि पर्यटक.साचलेल्या पाण्यातलं निर्माल्य दिसत होतं.जवळच एके ठिकाणी साचलेल्या पाण्यात काहींचा जलविहार(!)ही चाललेला होता.आम्ही पुलावरचे, हलत्या पुलावरून, उंचावरून दिसणारं नदीचं पात्रं, भोवतालची झाडी, सहस्त्रलिंगांभवतीची गर्दी न्याहाळत होतो.त्या पुलाच्या छायाचित्रांची ही एक मालिका! तुमच्यासाठी!
Bridge near Sahastralinga, Sirsi

P200511_18.12

P200511_18.13

P200511_18.16

P200511_18.19

Monday, June 20, 2011

सिरसीजवळचे भस्माचे डोंगर – ’याणा’!

Photo0053सिरसीजवळ भस्माचे डोंगर आहेत हे ऐकल्यापासून उत्सुकता ताणली गेली होती.ते कसे असतील या कल्पनेने वेगवेगळी दृष्यं नजरेसमोर उभी रहात होती.पुराणकाळात अनेक वर्षं यज्ञयाग चालल्यामुळे हा असा भस्माचा साठा जमला वगैरे गोष्टीही ऐकल्या.भरगच्च कार्यक्रम असलेल्या सिरसी आणि आसपासच्या अनुभव ट्रॅव्हल्सच्या सहलीच्या कार्यक्रमात ’याणा’ला भेट द्यायचा दिवस उजाडला.’याणा’ अर्थात Yana हे ठिकाण सिरसी ह्या उत्तर कर्नाटकातल्या गावापासून ८६ किमी अंतरावर आहे.हे ठिकाण पर्यटकांनी फारसं भेट न दिलेलं असं ठिकाण आहे.या परिसरात खूप मोठी जंगलं आढळतात हे यापूर्वीच्या या संबंधातल्या लिखाणातून आलेलं आहेच.या जंगलांमधून टेंपो ट्रॅवलर्सनी प्रवास करणं जास्त सोयिस्कर आहे.अशा जंगलातून वाट काढत आपण याणाजवळ पोहोचतो आणि लांबूनच हॅरी पॉटरच्या चित्रपटातल्या हॉगवर्ट मॅजिक स्कूलची आठवण करून देणारी स्ट्रक्चर्स दिसायला लागतात.कातळांचे पातळ पातळ पापुद्रे एकमेकाला चिकटत आकाशात उंचच उंच झेपावलेले आहेत.असे तीन-चार तरी डोंगर इथे आहेत.एका डोंगराखाली महादेवाचं मंदिर आहे.महादेवाचा आणि भस्माचा खूप जवळचा संबंध.मंदिरात नेहेमी देतात तशा फलकावर एक पुराणजन्य कथा आहेच.आपल्या मनातलं भस्म न दिसल्याचं कोडं नंतर उलगडतं.खरं तर लाखो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालाभूमीच्या उद्रेकातून ही भलीमोठी कातळशिल्प उभी राहिली आहेत.
P200511_11.53
ती भव्य आणि मोहक तर दिसतातच पण या डोंगरांच्या पोटातल्या घळी किंवा गुहा या जास्त प्रेक्षणीय वाटतात.काही गुहांमधल्या सिलींगवर एखादा पाषाण अधांतरी राहून गेलाय आणि त्यानं निर्माण केलेल्या फटींमधून ऊन आत येतं.छायाप्रकाशाचा अप्रतिम खेळ इथे बघायला मिळतो.
P200511_12.05
आणि खाली दिलंय तसं एक छायाचित्र.आमचा लहानगा मित्र अनिमेष कर्णिक एका गुहेतून पळत पळत आत जाताना पकडला गेलाय अगदी अनवधानाने! त्याच्या आणि माझ्या!
P200511_12.06
ह्या गुहांमधून पुढे जाणारा महादेवाला प्रदक्षिणा घालणारा प्रदक्षिणामार्ग आहे पण तिकडे न वळता भाविकपणे या गुहांमधेच रमलो हे कबूल करतो!
निसर्गाने केलेली कमाल हेच ’याणा’ ह्या स्थळाचं वैशिष्ट्यं सांगता येईल!

Monday, June 13, 2011

धबधबे! सिरसीतले!

धबधबे अर्थात वॉटर फॉल्स ही निसर्गातली अशी आश्चर्यजनक गोष्टं आहे की जिच्या मोहात कोण पडत नसेल तरच नवल! मुळात पाण्यात खेळणं हीच माणसाच्या दृष्टीनं आनंदाची गोष्टं.आज तो वॉटर पार्कस् निर्माण करून त्यात जाऊन बारा महिने त्याचा आस्वाद घेतोय.पाणी ह्या वस्तूचं स्वरूप दिवसेंदिवस कसं होत जाणार आहे ह्याचा विचार या आनंदाच्या वेळेला नको करूया! सध्या अनेक ग्रुप्स् पावसाळा सहलीसाठी नेहेमीच्या किंवा नव्या, फारशी ये-जा नसलेल्या धबधब्यांच्या शोधात निघाले आहेत, त्या सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!P180511_17.43
मे महिन्याच्या मधल्या आठवड्यात सिरसी या उत्तर कर्नाटकातल्या गावाला आणि आजूबाजूच्या परिसराला भेट दिली, अनुभव ट्रॅवल्सच्या कूलर समर दौरय़ात.दोन केवळ वाहणारय़ा पाण्याची ठिकाणं आणि दोन धबधबे बघितले, अनुभवले!
अनेक धबधब्यांच्या या परिसरात जोग फॉल, अनचेली फॉल आणि सातोडी फॉल हे तीन धबधबे बघायची योजना होती.यापैकी जोग फॉलला पाणी नाही म्हणून तिकडे जाणं रद्द झालं.P180511_11.10 अनचेली फॉल हा नुसता बघण्याचा धबधबा आहे.टेंपो ट्रॅवलर्स थेट अनचेली फॉलपर्यंत जातात पण तरीही पुढे जंगलातली वाट चालत मार्गक्रमण करावं लागतंच.मोठ्या बसेस टेंपो ट्रॅवलर्स पोचतात तिथपर्यंतही पोचत नाहीत.पुढचा मातीचा रस्ता चालून जातच अनचेली फॉल गाठावा लागतो.जंगलाने वेढलेला हा रस्ता.परिसरातल्या या आणि इतर कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी जाताना जंगलातून वाट काढणं अपरिहार्य आणि तितकंच आनंददायी आहे.ह्या वाटा आणि ही जंगलं इतकी व्यवस्थित कशी काय राखली गेली आहेत याचं राहून राहून आश्चर्य वाटतं.ती निसर्गानं स्वत:च राखली आहेत!
अनचेली फॉलकडे जाणारा रस्ता हा चांगलाच उताराचा आहे.अर्धा रस्ता आपण चालून जातो आणि उरलेला अर्धा रस्ता आपल्याला अक्षरश: दरीकडे नेतो.या ठिकाणी व्यवस्थित पायरय़ा आणि दोन्ही बाजूला लोखंडाचं दणकट रेलिंग आहे.P180511_11.25हे रेलिंग संपल्यावर समोर हीऽऽ मोठी दरी आणि समोर दिसणारय़ा अनचेली धबधब्याच्या सतत वहाणारय़ा दोन-तीन शाखा.मे महिन्याच्या मध्यावरही संततधार असलेल्या.हे दृष्यं मनोरम आहेच पण त्यापेक्षाही हुरहूर लावणारं आहे कारण त्या धबधब्यापर्यंत आपण पोचू शकत नाही!
ही हुरहूर प्रमाणाबाहेर भरून काढतो तो सातोडी फॉल!खरंतर हा फॉल अनुभव ट्रॅवल्सच्या शेड्यूलमधे नव्हता.सातोडी फॉलची छायाचित्रं खूप लांबून घेतली आहेत.या फॉलमधून सातोडी नदी उगम पावते आणि या नदीत मे महिन्याच्या मध्यावर इतकं पाणी बघून चकीत व्हायला होतं.विशेषत: पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशातून येणारय़ा लोकांना! एक मस्त आखीवरेखीव पायवाट, निसर्गानंच निर्माण केलेली, मस्त जंगलातून जाणारी, दोन्ही बाजूला वाहणारे ओहोळ असलेली पार केल्यावर एक चबुतरा बांधलेला आहे, सामान, कपडे आणि ज्येष्ठं नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी.सातोडी फॉलचं लांबून दर्शन घेताना कधी एकदा तिथे पोचतोय असं होतं! कारण धबधब्याखाली आबालवृद्धांचा आनंदोत्सव साजरा होत असतो.आपण अतिउत्साहानं दरीत उतरतो.भले मोठे पाषाण आणि दोन पाषाणांमधे तेवढ्याच मोठ्या खाचा असलेला हा रस्ता पार करताना नाकेनऊ येतात.पाषाणांवरून पाय घसरत असतात, वर ऊन तळपत असतं, खाचेमधे घाण पाणी साचलेलं असतं. कधीकधी दोन शिळा पार करताना मधे आडवा ओंडका टाकलेला असतो.त्यावरून हे अंतर पार करणं हे शहरातल्या फूटपाथ संस्कृतीतल्या नागरिकांना, विशेषत: ’विशाल’ महिलांना चांगलंच जड जातं.
P190511_14.25
खाली बघत हे सगळं पार करत आपण एकदम धबधब्यासमोर येतो आणि पंचमहाभूताचं हे चार पुरूष उंच कातळावरून धबाधबा कोसळणारं रूप बघून दिग्मूढ होऊन उभेच रहातो! यात पुढे जावं की इथेच दर्शन घेत रहावं हा भीतीचा भाग असतोच.कुटुंबातल्या लहानथोरांचं एकमत होतं आणि मग भल्यामोठ्या दगडांमधून आधी घोट्यापर्यंत, मग कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत पोचणारय़ा पाण्यात आपण उतरू लागतो.दोन भल्या मोठ्या पाषाणांमधून वाट काढू लागतो.ते पंचमहाभूत आपल्याला ओढून घेतंय की काय असं वाटत असतं.आपोआप एकमेकांचे हात धरून साखळी केलई जाते.आपली शहरी अदब अजूनपर्यंत राखून ठेवलेले, रिझर्व्ड अर्थात स्पष्टं शब्दात सांगायचं तर माणूसघाणे शहरी आता पूर्णपणे एकमेकांच्या परिचयाचे होतात.निसर्गं काय काय घडवून आणतो?P190511_15.15
आजूबाजूच्या पाण्यात इंद्रधनुष्यं बघून लहानांइतकेच थोरही लहान होतात.त्या चार पुरूष उंच कातळाला टेकतात.वरून पाठ सडकवून काढणारं पाणी बदाबदा अभिषेक करत असतं.आधी डोकं आणि मग पाठ, मग सगळं शरीर आणि अर्थात त्याआतलं मन हा अवर्णनीय सोहळा साजरा करत रहातं.लहान मूल घाबरून बाहेर निघाली तरी मोठी मंडळी लहानाहून लहान होतात.आणखी कोपरे, दगडातल्या बसायच्या जागा शोधू लागतात.त्याना तासभर झाला तरी या सगळ्यातून बाहेर यायचंच नसतं.कुणाला छायाचित्रं घ्यायची असोशी उरलेली नसते.कुणाला परतण्याची घाई नसते.शहरातल्या चिंता कुठल्यातरी खुंटीला टांगून सगळे जीव या स्वर्गीय वर्तमानात पंचमहाभूताच्या सान्निध्यात रममाण होऊन गेलेले असतात!
मग कधीतरी भूकेची जाणीव होते.वर चबुतरय़ाकडे जाऊन कोरडं व्हायचं असतं.कुलकर्णी बाईंनी केलेल्या मिष्ठानंयुक्त भोजनाचा आस्वाद घ्यायचा असतो.अनुभव ट्रॅवल्सने हे पर्यटकांच्या सुग्रास जेवणाचं व्रत इथेही सांभाळलेलं असतं!
P190511_15.15_[01]

Thursday, June 9, 2011

गोकर्ण महाबळेश्वर आणि मुर्डेश्वर!

सिरसीपासून ८०-९० किलोमीटरवर असलेली ही दोन वेगवेगळी स्थळं.एकमेकांच्या अगदी विरूद्ध असलेलं त्यांचं रूप.
गोकर्ण महाबळेश्वर अनेकांचं तीर्थस्थळ.मुर्डेश्वरही.रावणाची ती प्रसिद्ध गोष्टं या परिसरात वारंवार उल्लेखली जाते.अघोरी तपश्चर्येने भोळ्या सांबाला प्रसन्न करून घेणारा रावण.त्याला शिवलिंग हवंय.वारंवार येणारय़ा, आणल्या गेलेल्या अडचणींतून तो तपश्चर्या पूर्ण करतो.शिवलिंग मिळवतो.तो सर्वेसर्वा होणार म्हणून नारद ते शिवलिंग त्याच्याकडून काढून घेण्याच्या प्रयत्नात.गणपतीला या मोहिमेवर पाठवण्यात येतं.रावणाला वराबरोबर शिवलिंग जमिनीवर ठेवलंस तर शिवलिंगाला मुकशील अशी अटही मिळालीय!
रावण स्वगृही निघालाय.संध्याकाळ.रावणाच्या संध्येची वेळ झालीय.नेमाने संध्या करणारा रावण.आता काय करायचं? लिंग खाली ठेवावं लागणार या विवंचनेत तो असताना ब्राह्मण, बटूच्या रूपातला गणेश त्याला दिसतो.तो गणपती आहे हे रावणाला कळत नाही.संध्याकर्म संपेपर्यंत शिवलिंग तुझ्याकडे धरशील का? या रावणाच्या विनंतीवर गणपती म्हणतो, मी तुला तीन हाका मारीन.तिसरय़ा हाकेपर्यंत तू लिंग ताब्यात घेतलं नाहीस तर मला ते नाईलाजाने खाली जमिनीवर ठेवावं लागेल.शिवलिंग सुपर्द करून रावण संध्येला लागतो.ठरलेल्या बेताप्रमाणे त्याचं संध्याकर्म उरकण्याच्या आत गणपतीनं तीन हाका मारून शिवलिंग जमिनीवर ठेवलंय.रावण येऊन ते पहातो.ते जमिनीत आत जाऊ लागलंय.रावण ते खेचायचा प्रयत्न करू लागतो.जोर लावतो.लिंगाचा काही भाग हातात येऊन जोर लावल्यामुळे आसमंतात फेकला जातो.लिंगाचे चार भाग चार दिशांना जाऊन पडतात.त्यातलं एक स्थान मुर्डेश्वर आणि जिथे लिंग ठेवलं गेलं ते स्थान, तीर्थस्थान म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर!
गोकर्ण महाबळेश्वराला कारवार-धारवाड परिसरात खूपच महत्व आहे.गोकर्ण महाबळेश्वराचं देवालय खूप जुनं.अजून त्याच प्राचीन अवस्थेत असल्यासारखं.या देवालयाचे पुजारी, त्या सगळ्यांची आडनावं ’मुळे’.ह्यातलेच काही ’आदी’- Adi असंही नाव लावतात.हे मुळे संपूर्ण नावामुळे मुळचे महाराष्ट्रातले वाटतात.वरची हकीकत आम्हाला सांगणारे देवळातले गुटगुटीत पुजारीही मुळेच.मी मराटी नाई.कन्नड आहे.तुमी मला समज्यून घ्येईल- असं बोलत त्यांनी वरची हकीकत सांगितली.
देवळात फोटो काढायला परवानगी नाही.पुरूषांनी अंगावरचा शर्ट काढूनच दर्शन घ्यायला आत शिरायचं.आत जेमतेम जमिनीवर असलेलं लिंग, इतर शिवलिंगाप्रमाणे त्याचा आकार दिसत नाही.सतत अभिषेक चाललेला असतो.खाली बसून जमिनीवरच्या छोट्या गोल खाचेत हात घातल्यावर आपल्या हाताला शिवलिंगाचा वरचा अर्धाकृती भाग लागतो.दर्शनाला इतर ठिकाणांसारखी घाईगर्दी मात्रं नाही!
त्या बटूनं- बटू स्वरूपातल्या गणपतीनं फसवलं म्हणून रावणानं गणपतीच्या डोक्याच्या वर, मध्यावर प्रहार केला तिथे गणपतीला एक खड्डा पडला.गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर त्या गणपतीचंही देवालय आहे.यातल्या उभ्या गणपतीच्या डोक्यावर खाच आहे.ह्या खाचेत हात घालून या गणपतीचं दर्शन घेतलं जातं...
गोकर्ण महाबळेश्वर देवालय म्हणजे परंपरेचा अस्सल नमुना तर मुर्डेश्वर म्हणजे आधुनिकता.मुर्डेश्वर फोटोंमधून अधिक बोलतं.देवालयच्या वर १२० फूटाची ध्यानस्थ शंकराची फायबरमधली असावी, मूर्त आहे.डोळे दिपवणारी.
P170511_16.26

तिच्या खाली ध्वनिप्रकाशाचा खेळ चालत असलेलं म्युझियम आहे! यात वर सांगितलेली गोष्टं देखाव्यांच्या स्वरूपात अप्रतिमरित्या मांडलेली आहे.यातला रावण बघण्यासारखा.खरं तर दक्षिणेत रावणाला मानही आहे.या देखाव्यांमधला रावणाचं शरीरषौष्ठव वाखाणण्यासारखं मूर्तीबद्ध केलंय आणि तरीही त्याचा चेहेर्‍यावरून त्याचं राक्षसपणही जाणवतं.
Murdeshwar_ Light & Sound Show

या सगळ्यात रमून आपण बागेसारख्या बनवलेल्या परिसरात फिरत विविध देवालयात जाऊन दर्शन घेतो.समोर तामिळनाडूत मदुराई वगैरेत असतात तसं गोपुरम् आहे.ते ही उंच पण शंकराच्या आवाढव्य मूर्तीपेक्षा छोटं.त्यात दिल्लीच्या कुतुबमिनाराप्रमाणे वरवर जाता येतं.वरून देवालयाच्या मागेच असलेला सुंदर समुद्रकिनारा न्याहाळता येतो.
Gopuram at Murdeshwar

या सगळ्या आधुनिक रचनेत गुंतून आणि नंतर देवळामागच्या बीचवर जायची घाई मागे लागून नेमक्या मुर्डेश्वर देवालयाकडे थोडं दुर्लक्षंच होतं खरं.काही उत्साही बीचवर जाऊन आल्यावर मग दर्शन घेऊ म्हणून थेट बीचंच गाठतात.
बीचवर जाण्याआधी बीचलगत उंचावर असलेलं उपहारगृह आहे, तिथेही पर्यटकांची गर्दी होते.या उपहारगृहाच्या बाल्कनीत खुर्च्याटेबलांवर बसून सगळा समुद्र न्याहाळता येतो.
P170511_18.04

मुर्डेश्वरचा समुद्रकिनारा अप्रतिम आहे.स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे.पर्यटकही शिस्तीत मजा लुटत असतात.सगळ्यावर कडी म्हणजे बीचलगत स्त्रीपुरूषांसाठी स्नान करण्यासाठी सोय आहे.फिरती स्नानगृह इथे पार्क करून ठेवलेली आहेत.त्यामधे भरपूर पाणी आहे.स्वच्छता आहे.बीचमधल्या खारय़ा पाण्यातून बाहेर पडून स्वच्छ कोरडं व्हायला मिळाल्यावर कोण खूष होणार नाही!
Murdeshwar Beech

Saturday, June 4, 2011

सिरसीतल्या सुपारय़ा, मिरी आणि कॉफी, आंब्याच्या बागा

अनुभवच्या अरूण भटांचं निसर्गावरचं प्रेम सतत जाणवतं.मधुकेश्वर मंदिराला जातानाच्या रस्त्यावर त्यानी सर्वप्रथम उतरवलं ते या सुपारीच्या बागेत! सिरसीत सुपारीचं उत्पादन खूप.ही सुपारीच गुटख्यामधे वापरली जाते.सुपारीच्या सडसडीत उंच झाडाना वेढून असते मिरीची वेल.मिरीचंही उत्पादन इथे खूप आहे.सुपारीची झाडं विशिष्टं पद्धतीनं लावली जातात.दोन झाडांमधे विशिष्टं अंतर असतं आणि ही झाडं कुठल्याही दिशेने बघा, ती एका रांगेत असतात.एखादं झाड वठलं तर त्याच जागी दुसरं रोप लावलं जातं.अरूण भटांनी सगळ्या मुलांचं, जी शहरात संगणक, दूरचित्रवाणीला चिकटून असतात, त्यांचं एक छोटसं बौद्धिक घेतलं.त्याना संपूर्ण बाग फिरायला सांगितलं आणि मुलं उधळली!
सुपारीला साथ करतात ही कॉफीची बुटकी झाडं.झुडपासारखी.दक्षिणेतल्या कॉफीची चव काही न्यारीच असते नाही?

Coffee_Sirsi
आणि हे आहे आंब्याचं झाड(?)... स्थानिक, चोखून खाण्याचे हे आंबे! कमी उंचीची झाडं आणि फळं अक्षरश: जमिनीवर लोळणारी!Mango_Sirsi इथे उतरवून आम्हाला एक प्लास्टिकच्या ट्रेमधे ठेवलेले आंबे मनसोक्त खायला सांगितलं जातं.आम्ही अशा गोष्टीसाठी सदैव तैयार! याच बागमालकाला नंतर हॉटेलवर बोलवलं होतं.त्याच्याकडे कर्नाटकात आणून लावलेला देवगड हापूस, पायरी आणि रायवळ आंबे! पुण्या-मुंबईतल्या लोकांनी किलोवर खरेदी केले आणि नेले.असं फळ मुंबईत क्रॉफर्ड मार्केटशिवाय कुठेही दिसत नाही.आम्ही घेतलेल्या हापूसची चव माझ्या लहानपणीच्या आंब्यांची आठवण देऊन गेली.कोकणातल्या सावंतवाडी, दापोली कृषिविद्यापिठांमधे प्राध्यापक असणारा माझा मामा दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा पंधरा-वीस जणांना महिना-दीड महिना, रोज कमीतकमी दोन पुरतील इतके आंबे, आंब्यांच्या पेट्या आणायचा.फणस, काजू, कोकम-रातांबेही! मामा हे सगळं कसं करत असेल? तेव्हा खाणंच माहित होतं आता किमतीचा विचार प्रथम करावा लागतो.
ही वाट दूर जाते... सिरसी

Monday, May 30, 2011

हुबळी ते सिरसी आणि मधुकेश्वर, मरिकांबा...

रात्री साडेनऊ ते दुसरय़ा दिवशी सकाळचे साडेनऊ असा प्रवास करून हुबळीला पोचलो.सकाळचे विधी आटपले.हुबळीच्या हॉटेल स्वाती (Swathi) मधे ही सोय केली गेली होती.इडली सांबार, उपमा आणि रसम वडा नव्हे पण तसाच आणि त्यापेक्षाही उत्कृष्ट चवीचा वडा खाल्ला.बारीक पाऊस पडतोय की काय असं वातावरण.तरीही पुढचा हुबळी-सिरसी हा अडीच तासाच प्रवास अंगावर आला होता. अनुभवच्या चार-पाच टेंपो ट्रॅवलर्स सज्ज झाल्या आणि आमचं छप्पन्न जणांचं कुटुंब सिरसीच्या दिशेने निघालं.हुबळी शहर मागे पडलं आणि जाणवलं की प्रवासानंतर जिथे पोचायचं आहे त्या शेवटच्या मुक्कामापेक्षा प्रत्यक्ष प्रवास किती गुंगवून टाकतो.असं काही आम्ही अनेक महिन्यांनी, वर्षांनी पहात होतो!
सिरसीला पोचलो.हॉटेल शिवानी या हॉटेलमधे सहा रात्रींचा मुक्काम असणार होता.प्रत्येकाला त्याच्या त्याच्या सहा रात्रींसाठीच्या जागांचं वाटप झाल्यावर आंघोळ आणि त्यानंतर हॉटेलच्या डायनिंग हॉलमधे दुपारचं जेवण.हे पहिलं जेवण.जेवणाची सुरवातच पुरणपोळीनं झाली आणि इथपासून आम्हा सगळ्यांचा आहाराचा अफलातून सिलसिला सुरू झाला.नाश्त्यात कधी वाटीतली गुबगुबीत इडली, कधी कुरकुरीत मेदूवडा, कधी उपमा, अननसाचा शिरा, पोहे वेगवेगळ्या प्रकारचे जवळ जवळ रोज! आम्लेटब्रेड, ब्रेडबटर रोज, डोसे असं सगळं पोट भरून.ज्याला जे आवडेल ते आणि मनसोक्त.अरुण भटांचा आग्रह आणि त्यांच्या सगळ्याच सहकारय़ांची तत्परता.जेवण झाल्यावर मेसच्या प्रमुख दाराला जणू कायमचाच टांगलेला वेलची केळ्यांचा घड.तो असतानाही चार-पाच दिवस चोखून खाण्याचे आंबे!
जेवणातही तसंच.शाकाहारी, मांसाहारी दोन्ही.पोळ्या, पुलाव, रोज दोन-तीन प्रकारच्या भाज्या, आमटी.डाळ.कारवार-कर्नाटकातला सासम हा प्रकार.हे सासम अननसाचं, आंब्याचं आणि अगदी कारल्याचंसुद्धा! कुठलीही चव बिघडलेली नाही.मीठ कमी जास्त नाही.मांसाहारीसाठी जवळ जवळ रोज तळलेला मासा तर शाकाहारींसाठी वांग्याचे, बटाटयाचे तळलेले काप! वर प्रेमाचा आग्रह आणि आग्रह! नको नको! फार होतंय! असं म्हणत मंडळी आडवा हात मारतातच आहेत! नूडल्स, चिकन, फिशकरी, कर्नाटक पद्धतीचा घी राईस, बासुंदी, श्रीखंड, खीर! रोज नवीन! रिपीट मेन्यू नाहीच! चं.. ग.. ळ!..
पहिल्या दिवशी आडवा हात मारेस्तोवर अडीच वाजलेच.साडेचार वाजता स्थलदर्शनाला टेंपो ट्रॅवलर्स निघणार होत्या, शिरसी जवळच्या ’बनवासी’ या स्थळाकडे, मधुकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी.
“शांत झोप काढा! साडेचारला जमा! आपल्याला घाईगडबड करायची नाही!”अरूण भट सांगत असतात आणि हे घाई गडबड न करण्याचं तत्वं ते सहल संपेपर्यंत पाळतात हे विशेष!
’बनवासी’ ही जुन्या कर्नाटकाची राजधानी.सिरसी पासून २२ किमी.जिला दक्षिण काशीही म्हटलं जात होतं.कानडी किंवा एकूणच दक्षिणेला मंडपाला मंटप किंवा मंटपा अशी संज्ञा आहे.असे एकूण पाच दगडी मंटप इथे आहेत.मधुकेश्वर मंदिर पुरातन.इथल्या शिवलिंगाचा रंग मधासारखा म्हणून हे मधुकेश्वर.या लिंगाला मधाचाच अभिषेक केला जातो.मुगलांच्या आक्रमणाच्या वेळी हे लिंग नाश पावू नये म्हणून त्याच्या असंख्य प्रतिकृती करण्यात आल्या आणि मूळ लिंग जपून ठेवण्यात आलं, म्हणून ते वाचलं अशी कथा आहे. मंदिर प्रशस्त आहे.मंदिराचं आवार विस्तीर्ण आहे.आवाराच्या कडेला रांगेने या टोकापासून त्या टोकापर्यंत विविध देवतांची मंदिरं आहेत.ह्या देवतांच्या मूर्ती कर्नाटकाच्या वेळोवेळीच्या राज्यांनी स्वारीला जाऊन विजय संपादन केल्यावर, त्या विजयाची आठवण म्हणून भारतवर्षातून कुठून कुठून आणल्या.आवारात अर्ध गणपतीचं देवालय आहे.ही भग्नं मूर्ती नाही तर खरंच घडवलेला अर्ध गणपती आहे.आवारातल्या देवालयांवर देखावे कोरलेले आहेत.त्यात राक्षसमंथन असा एक देखावा आहे.देवीदेवतांची चित्रंही आहेत.मंदिराच्या आवारातल्या एका गाळ्यात एक पलंग आहे.हा ग्रेनाईटचा प्रशस्त पलंग भारतातला एकमेव असं सांगितलं जातं.
मधुकेश्वराच्या मंदिरातल्या नंदीचीही चित्तचक्षुचमत्कारिक म्हटली जाते अशी हकीकत आहे.मंदिरात प्रवेश केल्याकेल्याच हा नंदी नजरेस भरतो.महादेवाच्या अर्धांगिनीला, पार्वतीला नंदीचं महादेवावरचं हे तिच्या दृष्टीनं भलतंच प्रेम आवडत नव्हतं.नंदीला तिच्या वागण्याचा राग आला.परिणामी पार्वतीला मंदिराच्या आवारातल्या दुसरय़ा छोट्या देवालयात जाऊन बसावं लागलं.तरीही हा नंदी तिच्याकडे आजही एक डोळा रोखून बघतो आहे! अशी हकीकत सांगितली जाते.रचनाकारांचं कौतुक ह्यासाठी की खरोखरंच पार्वतीच्या मूर्तीजवळ जाऊन नंदीच्या दिशेने बघितलं तर मधल्या सगळ्या दगडी खांबांच्या जंजाळातून नंदीची एका डोळ्याची वक्रदृष्टी ठळकपणे नजरेस भरते!
अत्यंत पुरातन अशी ही वास्तू निरखताना पावसाळी वातावरण झाल्यामुळे एक वेगळाच परिणाम जाणवत होता.अंधार पडायलाही सुरवात झाली होती.
परतताना सिरसी गावात शिरल्यावर ग्रामदेवता मरिकांबेचं दर्शन घेतलं.कर्नाटका एकूणच याआधीही जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे टापटीप आणि सुव्यवस्थित नियोजन.एकही घर जुनाट, भग्नं दिसणार नाही.सगळी घरं आताच रंगरंगोटी केल्यासारखी.आपल्याकडे एका गावातून बाहेर पडल्यावर वाटेत छोटे छोटे बसथांबे दिसतात.कधीकाळी बांधलेले, भंगलेले, उकीरडा झालेले.या प्रवासात हे सगळे थांबे जाहिरातीने रंगवेलेले का असेना पण अगदी कोरे करकरीत!
ग्रामदेवता मरिकांबेचं देऊळही तसंच.प्रशस्त वास्तू.प्रवेश केल्याकेल्या भलामोठा हॉल किंवा सोपा लागतो त्याचा छान दुहेरी उपयोग करून घेतलेला.देवीसमोरच्या भक्तांना दर्शन किंवा आरतीला जमण्यासाठी उभं अवकाश आणि आडव्या अवकाशात त्याच हॉलच्या उजव्या बाजूला एक स्टेज, छोटा रंगमंच बांधलेला.आडव्या अवकाशात बसून शंभर एक माणसं सहज किर्तन, व्याख्यानादी कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतात.
मंदिरात टांगलेल्या भल्यामोठ्या तसबिरी फक्तं देवीरूपांच्याच! कुणी कुठल्याही देवाची तसबीर भेट दिली, दिली टांगून, असं नाही.देवीच्या वेगवेगळ्या रूपांच्या, लक्ष्मी, सरस्वती, अंबाभवानी इतकंच काय भारतमातेचीही एक तसबीर! सगळ्या तसबिरी भल्यामोठ्या आणि एकसारख्या.
पूर्वी ग्रामस्थांकडूनच चालवलेलं हे देऊळ आता रितसर ट्रस्ट स्थापून चालवण्यात येतं.ह्या देवळाच्या उत्पन्नातून दहा बालवाड्या चालवल्या जातात.केवढा मोठा आणि कौतुकास्पद असा हा उपक्रम!

Monday, May 23, 2011

सिरसीतला सुसह्य ग्रीष्म! (कूलर समर)

सिरसी हे उत्तर कर्नाटकातले एक गाव.कर्नाटकातलं महाबळेश्वर असं त्याला म्हणायचं ते तिथल्या वातावरणाची कल्पना येण्यासाठी.महाबळेश्वरमधेही हल्ली मे महिन्यात दुपारचं उकडतंच, सिरसीलाही अगदी तसंच.संध्याकाळी, रात्री आणि पहाटे मात्रं अतिशय सुखद गारवा!
सिरसीचा उच्चार बरेच वेळा शिरशी असा केला जातो.पण सिरसी हे अधिकृत नामाभिधान आहे असं इथे आल्यावर लक्षात येतं.अशा या ठिकाणी सहा रात्री नुकत्याच सहकुटुंब घालवल्या.आम्ही एकूण छप्पन्न पर्यटक होतो आणि हा अप्रतिम आनंद आम्ही सगळ्यानीच घेतला अनुभव ट्रॅवल्स या मूळ मुंबईतल्या पण कर्नाटकात पाय रोवलेल्या एकमेव पर्यटनसंस्थेद्वारे.मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे इथले हे पर्यटक वय वर्षं पाच ते सात पासून वय वर्षं सहाऐंशी पर्यंतचे होते.हे एक मोठं कुटुंबच होतं आणि या कुटुंबाला कुटुंबासारखंच ठेवलं अनुभव ट्रॅवल्सचे सर्वेसर्वा श्री अरूण भट यांनी.
अरूण भटांचा उल्लेख एक वल्ली असा करावा लागेल.हे खरं तर मुळचे हाडाचे शिक्षक.साधारण चाळीस वर्षांपूर्वी गिरगावातल्या साहित्यसंघ इमारतीत भटसरांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताचे वर्ग (कोचिंग क्लासेस) चालत आणि ते अतिशय सुप्रसिद्ध होते.एकोणतीस वर्षं भट सरांनी हे वर्ग एखाद्या व्रतासारखे चालवले आणि एप्रिल-मे महिन्यात हिमालयात पर्यटक न्यायला सुरवात केली.अरूण भटांची कर्नाटकमधल्या किनार्‍यांची सफर अर्थात कोस्टल कर्नाटका चांगलीच गाजली.इतकी गाजली की अरूण भट किंवा अनुभव ट्रॅवल्स पेक्षा नुसतं ’कोस्टल’ म्हणूनच ती जास्त प्रसिद्ध झाली.आम्हा सगळ्या पर्यटकांचा योग असा की या दौरय़ात श्री भट, त्यांच्या पत्नी डॉ.शीला भट आणि कन्या प्राची भट आमच्या बरोबर होते.हे सगळं कुटुंब भट सरांचा मुलगा श्री मयुरेश भटसह अनुभव ट्रॅवल्सचं काम बघतं.कुणी म्हणेल पर्यटनसंस्थेबद्दल हे एवढं काय सांगत बसायचं? तर- भट यांचं मूळ जरी कर्नाटकातलं असलं तरी ते पूर्णपणे मराठी कुटुंब आहे.सगळं कुटुंब पर्यटनक्षेत्रात आहे.सगळ्यात महत्वाचं म्हणजे नको इतकी जाहिरातबाजी करून लोकांच्या खिश्यावर डल्ला मारण्याचा पवित्रा घेण्यापेक्षा त्यांचा भर मौखिक प्रसिद्धी, कौटुंबिक वातावरण, खाण्यापिण्याची प्रचंड रेलचेल यावर आहे.आम्ही सगळेच या दौरय़ावर खूष आहोत.स्वत: श्री अरूण भट हा हाडाचा परफॉर्मर आहे! अशा दौर्‍यांवर त्यांचे पूर्वीचे विद्यार्थी असतातच.ते सांगतात की भटसरांच्या वागण्याबोलण्यामधे इतक्या वर्षात काडीचा फरक पडलेला नाही.आज करोडोंची उलाढाल असूनही हा माणूस जश्याचा तसा आहे, जमिनीवर आहे.समूहासमोर अनेकविध मनोरंजक मार्गांनी व्यक्तं होणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे.ते सतत माणसांबरोबर असतात, समूहाला आपल्या आयुष्यातल्या घटनांनी, विनोदानं, कवितांनी गुंगवून टाकतात.वैयक्तिक प्रसिद्धीपासून जाणूनबुजून लांब रहातात.खाण्याची आणि खिलवण्याची त्याना जन्मजात आवड आहे.आपला परफॉर्मन्स त्यानी रंगमंचावर सादर करण्याची हाव धरलेली नाही.आयुष्यावर ’बरंच काही’ बोलू शकण्यासाठी आवश्यक असणारं भलं मोठं रंगीबेरंगी गाठोडं त्यांच्याजवळ आहे.ते व्यक्तं करण्याची प्रथमश्रेणीची पात्रता त्यांच्याकडे आहे (एवढंच काय सुयोग या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा श्री सुधीर भट हे त्यांचे सख्खे लहान भाऊ!) पण आपल्या पर्यटक मित्रांसमोर मित्रत्वानं उघडपणे व्यक्तं होणं त्यांनी कायमसाठी स्विकारलं आहे.ह्या व्यक्तं होण्यात व्यावसायिक भाग आहेच पण मानवी संवेदना जपणं हे हल्ली कुठल्याही व्यवसायात दुरापास्त होत चाललेलं वैशिष्ट्यं त्यांनी अजून जपलेलं आहे.
तर ह्या अशा दौरय़ावर मी मुंबईहून सहकुटुंब निघालो विडीयोकोच बसमधून रात्री साडेनऊला.बारा वाजेपर्यंत बस चेंबूरजवळंच ठाण मांडून होती.सकाळी साडेसहावाजता कोल्हापूर आणि हुबळी या कर्नाटकातल्या महत्वाच्या, पुण्याची आठवण करून देईल अशा शहरी पोचलो सकाळी दहाच्या सुमारास.उशीर झाला होता.हुबळीत एका हॉटेलमधे सकाळचे विधी आटोपून उरलेला प्रवास करायचा होता.सिरसी अजून रस्त्याने अडीच तासाच्या अंतरावर (१०० किमी.) होतं!...

Sunday, May 1, 2011

बेलूर मठ

बेलूर मठाची अचानक आठवण यायचं कारण काय? कधीही काहीही आठवतं.मन कुठेही सैर घडवतं आणि आपण आश्चर्य करत रहातो, हे कुठून आलं म्हणून! सुट्टी, नेहेमीपेक्षा वेगळं रूटीन (!).आळस, झोप, आराम, वर्तमानपत्रं, जेवण, वामकुक्षी, दुपारचा चहा इत्यादी प्राथमिकता पार पडल्यावरच विचार या गोष्टीला जाग येते.एरवीच्या रूटीनमधे उठलो की आज काय करायचंय, काय होणार आहे, काय वाढून ठेवलेलं असणार आहे असे प्रश्न विचार या तत्त्वाला चालना देतातच.
आज सगळं झालं आणि नंतरच घड्याळाकडे लक्ष गेलं.पाच वाजलेत.घामानं कोंदटल्यासारखं झालंय.अजून दोन तास आहेत सूर्याचं तेज पूर्णपणे निवायला.मग कदाचित थोडं सुसह्य होईल.
पाच वाजले म्हटलं आणि कुठलीतरी कळ दाबल्यासारखी झाली.पाच वाजता सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता बेलूर मठात पोचलो तेव्हा! बेलूर मठ! तिथे जाऊन झाली आता जवळ जवळ वीस वर्षं!
झुलवाचा दौरा होता कलकत्त्याचा.कलकत्ता तेव्हा कोलकाता झालेलं नव्हतं.हावडा रेल्वे स्थानकाबाहेर पडलो.चाळीस जणांच्या आसपास असलेला ग्रुप.एक ठिकाण आलं की सगळे एके ठिकाणी जमायलाच पाच दहा मिन्टं लागायची.तोपर्यंत जागच्या जागेवर उभं राहून दृष्टी पोचेल तिथपर्यंतचं स्थलदर्शन.बाहेर उभे होतो रेल्वेचा लांबलचक प्रवास आटपून.पहिलं जाणवलं ते धूसर वातावरण.प्रदूषण असावं असं धुकं.लांबवर दिसणारा हावडा ब्रिज.टक लाऊन बघत बसलो.सगळा ग्रुप जमलाय चला आता बसकडे असा रेटा जाणवेपर्यंत.मग बस, महाराष्ट्र भवन, तिथे जागा उपलब्ध नाही म्हणून गावभर फिरत सॉल्ट लेक सिटी या नव कलकत्त्यातल्या भागाकडे.आख्ख्या कलकत्त्यातून.जिथे ट्रॅम, माणसं, इतर वहानं, अगदी माणसांनी ओढायच्या रिक्षांसकट अशी सगळी भेळ असते- असायची- आता काय झालं असेल ते देव- कालिमाताच जाणे!
रुद्रप्रसाद सेनगुप्ता नावाचा ज्येष्ठ प्रायोगिक रंगकर्मी.त्याची नांदीकार नावाची संस्था.त्यांनी भरवलेला राष्ट्रीय नाट्यमहोत्सव.रवींद्र भवन या नाट्यगृहात.रवींद्र भवन हे तिथल्या मेट्रो रेल्वेचं स्थानक आहे.मेट्रो रेल्वे कलकत्त्यात कधीच आली.
झुलवा या प्रायोगिक नाटकाचे देशभरात आणि महाराष्ट्रात अनेक दौरे झाले.दौर्‍यावर एक दिवस स्थलदर्शनासाठी ठेवलेला असे.त्यादिवशीची संध्याकाळ बहुदा खरेदीसाठी राखून ठेवलेली.बाहेर गेल्यावर स्थलदर्शनापेक्षा खरेदीसाठीचीच झुंबड जास्त.काय काय घ्यावं? बांबूच्या चटया करतात तश्या पद्धतीने चार घट्टं पाय विणून आणि वर चौकोन विणून छोटे मोडे विकायला होते.हीऽऽ झुंबड.आमचा एक मित्र बहुदा तो या मौल्यवान खरेदीबद्दल अनभिज्ञ असावा.त्याला ते ज्ञान प्राप्त होईपर्यंत उशीर झाला असावा.बसमधून सगळा चमू खरेदी आटपून परतताना हा आपला सारखा त्या इतरांनी खरेदी केलेल्या मोड्यांकडे टक लाऊन पाही आणि अस्वस्थं होई.आम्ही काही टारगट ’कारे’ होतो.संसार नव्हता.खरेदी-बिरेदी म्हणजे भंपकपणा असा आमचा समज.आमचं लक्षं आता नवीन कुणाला लक्ष्यं (टारगेट) करायचं याकडे असायचंच.मोडा न मिळालेल्या मित्राची अस्वस्थता आमच्या डोळ्यात भरलेली.हा अनुनासिक होता.प्रत्येक मोडेमालकाकडे जाऊन हा आपला चौकशी करी आणि आपल्याला इतका स्वस्तं आणि मस्त मोडा मिळाला नाही म्हणून चुकचुके.कलकत्त्यातल्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस म्हणजे आत आजूबाजूनी सीट्स आणि मधे मोकळी जागा.अशा मोकळ्या जागेत माणसांची गर्दी उभी.आमच्या मोडेप्रेमी मित्राला त्या जराश्या विरळ गर्दीत खाली ठेवलेला एक मोडा दिसला.तो त्या मोड्याजवळ गेला आणि त्या मोड्यावर बसला.मग घाईघाईने उठून, “च्यांयला फांलतूं आंहे!”असा जोरदार रिमार्क मारून आमच्याजवळ आला.आम्हाला हसायला कुठलंही कारण चालायचं.या मित्राच्या मनात नक्की काय चाललं होतं त्याचं तोच जाणे.पण कोल्ह्याला द्राक्षं आंबट असं म्हणत सगळ्या ग्रुपला एकमेकांना सांगायला तो किस्सा बरेच दिवस पुरला.
आज स्थलदर्शनाचा दिवस! अशी घोषणा झाली आणि सगळे रंगकर्मी (!) उंडारायला तयार झाले.समस्त स्त्री वर्ग ’खरेदी’ या विषयावर ठाम होता.खरं तर आम्ही- म्हणजे चाळीसबिळीस जणांच्या ग्रुपमधे सबग्रुप्स पडतात तसा ग्रुप- कोण नेईल तिथे जाणारे.दौर्‍याआधी प्रचंड प्लानिंग करून दौर्‍यात काय काय बघायचं ते पक्कं ठरवून ते पूर्ण करायचं म्हणजे करायचंच असला मुशाफिरी खाक्या आमच्याकडे नव्हता.आम्ही आपले रेंगाळत, पुन्हा कुणी ’लक्ष्यं’ बरोबर असेल तर दिवस मस्त जाईल या इच्छेने ते शोधण्याचा प्रयत्नात.इतक्यात आमचाच एक गायक मित्र जोरदार कॅनवासिंग करतात तसं, “ए, बेलूर मठला जाऊया बेलूर मठला! येताय का? खरेदीबिरेदी कधीही कराल.आपण रहातोय तिथपासून जरा लांब आहे.विचारत विचारत, दोन-तीन बसेस बदलत जावं लागेल.अप्रतिम ठिकाण आहे! पुन्हा इथे कधी यायला मिळेल सांगता येत नाही.खरेदी करणार आहात का? ती काय कुठेही करता येईल तुम्हाला पण बेलूर मठ बघता येणार नाही! दक्षिणेश्वर कालीमातेचं मंदिरपण अप्रतिम आहे.येताय का?” असं सांगून सांगून आख्ख्या ग्रुपला हैराण करत होता खरंतर.असं कुणी जास्त सांगायला लागलं की लोक उगाचच सावध होतात आणि जायचं की नाही असा विचार करायला लागतात.अशा बर्‍याच जणांच्या मनात खरेदी करणं ठाण मांडून बसलेलं असतं.खरेदी न करता वेळ घालवायचा म्हणजे जरा अतिच वगैरे... आमचं तसं नव्हतं.आम्ही तयार झालो.बेलूर मठाकडे जाणारा आमचा ग्रुप छोटाच झाला, मोठा खरेदी करायला निघून गेला.
विचारत विचारत पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस बदलत आम्ही दक्षिणेश्वर कालिमातेच्या मंदिराजवळ पोचलो आणि मंदिराचे दरवाजे दुपारभरासाठी बंद झाले.आता?... मित्र म्हणाला, “पुढे जाऊ.इथे बोटींग असतं.बघूया!”बोटींग स्थानकाजवळ गेलो.चौकशी केली.तिथे एका स्थानिकानंच आयडिया दिली की तासादीडतासाचं बोटींग करा.परत येईपर्यंत देवळाचे दरवाजे उघडलेले असतील.मग बोटींगच्या तिकीटांची घासाघीस.बोट म्हणजे बंगाली वातावरणातली होडी दाखवतात तशीच.तुटकंमाटकं शीड आणि भली मोठ्ठी वल्ही घेऊन उभ्याने वल्हवणारे ’मांझी रेऽऽ’आणि ती होडी डुचमळत, हिंदकळत नदीच्या पात्रात वेग घेतेय.नदी म्हणजे जवळ जवळ समुद्रासारखीच लांबलचक आणि आडवीतिडवी.बरोबर होडी हलली रे हलली की चित्कारणारा स्त्रीवर्ग.आम्ही (टगेही) सुरवातीला जरा जीव मुठीत धरूनच.बोटींग क्लबवर बोटींग करणं वेगळं आणि हे असं नदीत होडी सोडून देणं वेगळं.जरा वेळानं वारा.मग सगळ्याना कंठ फुटून गाणी.मग माझ्या अंदाजे कधीतरी हावडा ब्रिजच्या खालून प्रवास.अपरिहार्यपणे ’अमर प्रेम’ शक्ती सामंता-राजेश खन्ना-शर्मिला टागोर-आनंद बक्षी-एस डी-किशोरकुमार या सगळ्याची आर्त आठवण.
हा प्रवास संपूच नये असं आता वाटायला लागलेलं आणि आमचा गायक गाईड मित्र बैचेन.अंधार पडायला सुरवात झालेली.नदीकाठची एकाकी हवेली पुन्हा बंगाली वातावरणातल्या चित्रपटांकडे घेऊन जाणारी.मित्राला वेगळीच काळजी.पूर्ण अंधार झाल्यावर किनार्‍यावर जाऊन जे बघायचंय ते शोधायचं कसं?
नौकानयन संपलं.काठावर आलो.सूर्यास्त होऊ लागलेला.किती वाजले? फक्त पाच? हो! इथे डिसेंबरमधे संध्याकाळी पाचला सूर्य मावळतो! घंटा वाजू लागलेल्या.आमची पावलं त्या दिशेने.Belur Math
तो... बेलूर मठ! मित्र सांगतो.आम्ही जवळ जातो.स्वर्गीय असं दगडी बांधकाम.लांबलचक.पायर्‍या.आत गर्दी बसलेली.घंटांचा आवाज वाढून आता गजर होऊ लागलेला.बाहेर चपला काढून आणि त्या कुणी उचलणार नाहीत ना? हा विचार कायम ठेऊन आम्ही सगळे आत.हा भला मोठा दगडी मंडप.ही गर्दी आत बसलेली.समोरच्या टोकाला रामकृष्ण परमहंसांची ध्यानस्थ मूर्ती, पद्मासनातली.आरती करणारे येतात.त्यांच्या हातात मोठमोठ्या ज्योती असलेल्या पंचारत्या.काही जणांच्या हातात पांढर्‍याशुभ्र चवर्‍या.मृदुंग, टाळ वाजू लागतात.सगळ्यांचा एकच सूर त्या विशाल दगडी मंडपात घूमू लागतो.परमहंसांची आरती सुरू होते.ते विशिष्टं बंगाली उच्चार.बंगाली संगीत.खरं तर आम्ही भाविक नव्हे पण ते तिथलं वातावरण.ते सूर.ती चाल, ताल, त्या पंचारत्या, त्यानी तेजाळून गेलेली खरी वाटणारी रामकृष्ण परमहंसांची मूर्ती.पाय निघेना तिथून.स्वप्नवत, स्वर्गवत वातावरण.आरती संपल्यावर पुढे गेलो.अजूनही परमहंसावर चवर्‍या ढाळणारे कुणी.फार पुढे जाऊ न देणारे.बाहेर पडताना मित्र काही सांगत होता.बेलूर मठ संस्थानाविषयी.तिथल्या व्यवहाराविषयी.
तो संध्याकाळी पाच वाजताचा सूर्यास्त, तेव्हाचा तो अथांग नदीतला होडीचा प्रवास आणि मग बेलूर मठातली ती आरती... हे सगळं इतकं मनात ठाण मांडून बसलेलं की इतर काही आत येतंच नव्हतं...
आजही ती संवेदनशील कळ कधीमधी सहज दाबली जाते आणि सगळा पट समोर उभा रहातो.त्या तोडीचं दृष्यं आजवर दुसरं पाहिलं नाही...