romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label एकांकिका. Show all posts
Showing posts with label एकांकिका. Show all posts

Monday, September 22, 2014

सावधान!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारत खेड्यांमधे वसलेला देश आहे. खेड्याकडे चला... अशी विधानं, आवाहनं आपण गेली कमीत कमी साठ वर्षं तरी ऐकतो आहोत.
दरम्यान पुलाखालून, पुलावरुन बरंच पाणी वाहून गेलंय...
आता जागतिकीकरणाच्या जमान्यात जग हेच एक खेडं झालंय असं म्हटलं जातं.
मोबाईल, इंटरनेट अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पण वीज, पाणी ह्या मूलभूत गोष्टी अजून खेड्यांतच काय शहरातल्या, महानगरांतल्या कानाकोपर्‍यांतही पोचल्या आहेत का?...
दुसरी गोष्ट अंधश्रद्धांची...
बरंच पाणी वाहून गेलेल्या अशाच एका पुलावर एका अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्य वेचणार्‍याचं आयुष्य हिरावून घेतलं तर गेलंच पण हे कोणी केलं याचा मागमूसही लागून दिला जात नाहीए...
माहितीचा अधिकार मिळाला पण त्या आधाराने अन्यायाला वाचा फोडणार्‍या कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतलंच. कुणाच्या खुनाला वाचाच फुटली नाही तर कुणाचे खटलेच रद्दबातल ठरताएत...
तुम्ही नकारात्मकच चित्रं दाखवू नका हो! सकारात्मक काहीच बोलत नाही तुम्ही!.. असा उद्गार समोरुन लगेच येतो.
आहे ना नाही कोण म्हणतोय? पुढची पिढी खर्‍या अर्थाने हुशार आहे. प्रगती, विकास तर ती साधतेच आहे पण रचनात्मक कामही ती करताना दिसतेय. पहिल्यापासून झोकून देऊन किंवा चाळीशीनंतर संपूर्णपणे. सर्वप्रकारच्या संशोधनात चमकते आहे...
दोन टोकामध्ये दरी आहे हे तर मान्य करुया...
अर्धा भरलेला ग्लास असतो. त्याच्या दोन्ही बाजू वास्तव असतात. एक बाजू नि:संशय उजवी असते पण डावं कितीही झाकत राहिलं तरी डाचत रहातं. रहातं ना?...
बसमधला, खंडहर झालेल्या मिलच्या जागेवरचा बलात्कार, दलित युवक जळीत प्रकरण अशी प्रकरणं व्हायची थांबत नाहीत.
अशावेळी काय करायचं?... ज्याला बोलता येतं त्याने योग्य असेल ते योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे बोलायचं.. याच धर्तीवर लिहिणार्‍याने लिहायचं. कलेच्या माध्यमातून सांगणणार्‍यानं सांगायचं...
२०१२ आणि २०१३ या दोन वर्षी "अभिलेख" उपक्रमाअंतर्गत असा योग जुळून आला. २०१२ ला बलात्कारीत युवतीच्या प्रश्नावरचा दीर्घांक "कन्या" सादर करायला मिळाला.
२०१३ म्हणजे गेल्यावर्षी "शुभमंगल सावधान!" ही एकांकिका सादर करायला मिळाली. अनेकांच्या सहकार्याने आपल्यापरीने प्रश्न मांडता आले. त्या प्रश्नांचे सकारात्मक कोन दाखवण्याचा प्रयत्न करता आला...
शुभमंगल सावधान आणि कन्या बद्दल या आधी इथे लिहिलंच आहे. कन्याचं ध्वनिचित्रमुद्रणही सादर केलंय.
अभिलेखच्या वाचकांसाठी इथे सादर आहे शुभमंगल सावधान या एकांकिकेचं दोन भागातलं ध्वनिचित्रमुद्रण...






Friday, November 15, 2013

"शुभमंगल सावधान!" एकांकिका "कृष्णलीला" कार्यक्रमात...

कृष्णलीला, कृष्णलीला, कृष्णलीला... असा गजर घरी गेले कमीत कमी सहा महिने चालला होता... हे असं पहिलंच वाक्य तुम्हाला काय सांगायचं ते सांगून गेलंच असेल... तरीही... सांगतो... हा गजर तुम्ही ओळखला तिनेच म्हणजे आमच्या अर्धांगिनीने केलेला... तिच्या नृत्यवर्गाचा कार्यक्रम... सूत्र कृष्णलीला... तर तिला आमची एक एकांकिका त्यात बसतेय हे आठवलं आणि "कृष्णलीला" आमच्याही मागे लागली...
आता ताकाला जाऊन भांडं लपवायचं काही कारण नाही आम्हाला... आम्ही वाट बघत असल्यासारखेच... अशा संधीची केव्हापासून...
तर अशी झाली "शुभमंगल सावधान!" या एकांकिकेच्या सादरीकरणाची सुरवात...
"शुभमंगल सावधान!" लिहिली खूप आधी. मराठवाड्यातल्या एका गावातल्या एका आदिवासी तरुणीचं लग्न देवळातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीशी लावलं... अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली. तिची कथा झाली. एकांकिका होईल असं नंतर कधीतरी वाटलं. मग सुनीता आणि श्रीकृष्ण असा कथेतला एकमेव प्रवेश एकांकिकेचा शेवटचा प्रवेश झाला. त्याआधीचे प्रवेश मग बांधले गेले. असं अस्मादिकानी केलं पहिल्यांदाच...
गेल्या वर्षी कन्या या लिखित, दिग्दर्शित दीर्घांकाची निर्मिती केली. यावर्षी भूमिकाही करा असा आग्रह झाला अर्धांगिनीकडून आणि आमच्या आतून तर तो होतच रहातो नेहेमी... मग जमवाजमव सुरु झाली...
ती एक मज्ज्याच असते. कलाकार निवडणं. मग त्यांनी गळणं. कुणी हो हो म्हणत अचानक कलटीची चाहूल देणं. आपण त्याना तयार करतोय असं आपल्याला वाटणं. मग नाद सोडून द्यावा लागणं. एखाद्याने घाबरून पळच काढणं इत्यादी... रिहर्सलसाठी जागा हा आणखी एक व्याप आणि ताप... असं करता करता यावेळची गंम्मत म्हणजे दोनच कलाकार उपलब्ध. त्यातले एक अस्मादिक. मग पुनर्लेखन. आशय तोच ठेवायचा. तांत्रिकता सांभाळायची. रचनेचा तोल बिघडू द्यायचा नाही... एकांकिका सोडूनच द्यायचा विचार पक्का होत चालला. पण घर आणि संच (इन मिन दोन कलाकार) यांकडून आग्रह होऊ लागला आणि अस्मादिकांना वाट सापडली पुनर्लेखनाची...
आता दोन्ही कलाकारांना पूर्णवेळ फलंदाजी... फूल फ्लेज्ड बॅटिंग... म्हणजे मेहेनत भरपूर... तीत कमी पडायचं नाही. तेवढंच एक हातातलं...
अनंत अडचणी. त्या येतातच. काही करायचं असलं तर येतातच. विचार येऊ लागला यापेक्षा भरपूर चिकित्सात्मक अभ्यास केला असता तर रोज एक पिल्लू सोडून घमासान चर्चांचे फड उभे केले असते सोशल नेटवर्कींग साईटवर तर केवढं काम झालं असतं. केवढ्याना कामाला लावलं असतं... पण काहीतरी प्रत्यक्ष करायची खाज ना? काय करणार?
संगीत, प्रकाश सगळ्यातल्या अडचणी, मोबाईल्स न उचलणं, अडलेल्याला नाडलं करुन सोडणं... सगळं नेहेमीसारखं... तसं निर्मितीतलं नवेपणही मधे मधे येऊन अडचणी वाढवणारं... शेवटच्या क्षणापर्यंत...
प्रयोगात मग नेहेमीचं थोडंसं इकडे तिकडे झालेलं सोडलं तर महत्वाची अडचण न येता पस्तीस ते चाळीस मिनिटं कधी गेली कळलं नाही...
अस्मादिक (हा शब्द या नोंदीत किती वेळा आला?.. ते तुम्ही मोजलं असेलच!) विनोदाचं धनुष्य पेलून पहिल्यांदाच. तीन भूमिका: सूत्रधार, गणा, श्रीकृष्ण. थोड्याशा वेशभूषा बदलानेच साकार होण्यासारख्या. सोबतच्या स्त्री सहकलाकाराचंही तसंच, तीन भूमिका: अप्सरा-नटी, लक्षुमी आणि सुनिता ... मी खूप वर्षांनी प्रत्यक्ष रंगमंचावर... त्या तुलनेने नवीन...
प्रेक्षकांचे अभिप्राय अंतिम. ते अजून येताहेत.
आमंत्रण बर्‍याच जणांना गेलेलं असतं. काहींच्या खर्‍याच अडचणी. काही न जमवणारे, मग काही करत नसताना ’सध्या काय चाललंय?’ असं थांबवून थांबवून विचारणारे. काही ’यानं प्रत्यक्ष काही केलं बरं का’ म्हणून हिरमुसणारे, सरसावून उगाच आपलं काहीतरी कुठेतरी दामटत बसणारे...
आपल्याला कुणी किती गंभीरपणे घेतंय हा विचार लोप पावलेला असतो प्रत्यक्ष काही करत असताना. आपलं असेल नसेल ते कौशल्य पणाला लाऊन काम पूर्ण करणं यात आनंद असतो. नक्कीच असतो...
तो या नोंदीद्वारे आपल्यापुढे सादर करतो... आभार!...
"शुभमंगल सावधान!" (एकांकिका) "अभिलेख" निर्मित, "नृत्यरंग" आयोजित 
लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित 
प्रकाशयोजना: वासुदेव साळुंके 
पार्श्वसंगीत: अरुण कानविंदे 
रंगभूषा: शशी सकपाळ, रमेश वर्दम आणि मंडळी 
वेशभूषा: वरदा पंडित 
कलाकार: प्रिया गडकरी, विनायक पंडित