romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label माध्यमं. Show all posts
Showing posts with label माध्यमं. Show all posts

Thursday, March 1, 2012

'झुलवा' चा प्रवास...

’झुलवा’ १९८७-८८ ला संगीत नाटक ऍकेडमी, दिल्ली या मान्यवर संस्थेच्या त्यावर्षीच्या राष्ट्रीय लोककला महोत्सवात सादर झालेलं नाटक! या नाटकानं त्यावर्षी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर १९८७ मधे पश्चिम विभागीय महोत्सवात ते भारत भवन, भोपाळ इथे सादर झालं. त्या विभागीय महोत्सवातून ’झुलवा’ची राष्ट्रीय महोत्सवात निवड  झाली आणि जानेवारी १९८८ मधे ’झुलवा’ दिल्लीला कमानी ऑडिटोरियम या विशाल नाट्यगृहात सादर झालं. माजी मंत्री कै. वसंत साठे त्यावेळी आवर्जून हजर होते.
मुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, प्रसिद्ध जर्मन नाट्य दिग्दर्शक फ्रीत्झ बेनिवित्झ- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.
मुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्‍या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात नाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्‍यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही! ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली!  

माझ्या या ब्लॉगवर मी या आधी झुलवा या नाटकावर लिहिलं आहेच. माझ्या आयुष्यात झुलवा नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे असे मी मानतो. मी या नाटकाच्या प्रवासात काय शिकलो नाही? लोकांनी मला काय काय शिकवलं नाही? एक समूह, ग्रुप म्हणजे काय मजा असते, ती अमुक एका वयात आपल्याला सर्वतोपरिने कशी सांभाळते, आधार देते हे खूप समाधानानं अनुभवलं. या नाटकाचे झालेले दौरे चिरस्मरणीय राहिले आहेत. या संबंधात  कलकत्त्याजवळच्या बेलूर मठबद्दल या पूर्वी लिहिलं आहे.
नेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच (!) जागरूक असायचा! एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्‍या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्‍यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं  बरंच काही एकत्र करून इफ्तार पार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.
अशा मजा, गंमती किती सांगाव्यात? रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील! रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.  
माझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी (!) करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच (!) रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला (!) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्‍याला आणखी काय हवं? आयुष्यातला सर्वोच्च क्षण!
खरी मजा तर पुढेच झाली! झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का? वर का नाही? का वरच? काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था!) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम (!) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला  होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे? मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे!’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही!’ असं खरंच कसबसं मला तिला सांगावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली!
आणि काय सांगावं महाराजा! कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला! पुढे आयुष्य सुफळ संप्रूण (!) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच! :D
झुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं! त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं? काय आधी झालं? काय नंतर?...
माझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते! पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..

      

Tuesday, February 28, 2012

बालनाट्याच्या गावा जावे..

सुरवातीलाच स्पष्ट करतो, जरा गंमत म्हणूनच बघा या प्रकाराकडे. म्हणजे एखादं लहान मूल बघतं ना त्या नजरेने. विषय अर्थातच खूप खूप वर्षापूर्वी सादर केलेल्या बालनाट्याचा आहे. बालनाट्य म्हटलं तरी ते लहान मुलांसाठीचं नाटक म्हणून कमी महत्वाचं मानता येत नाही हे मलाही या बालनाट्यात सहभागी होताना समजलं. लहान मुलाना सहज समजावं, त्यांची मस्तपैकी करमणूक व्हावी आणि त्यानंतर त्याना त्यातून काही (शिकायला) मिळावं असा सर्वसाधारण उद्देश या नाटकांमागे असतो. मी ज्या नाटकाबद्दल बोलतोय तो काळ पंचवीस वर्षापूर्वीचा आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आणि त्याही आधी बालनाट्यांची, सकस बालनाट्यांची रेलचेल होती. अनेक मान्यवर लेखक खास मुलांसाठी म्हणून नाटकं लिहित होते. बालांसाठी, बालकुमारांसाठी असे वेगवेगळे विषय असलेली ही नाटकं असत होती. अगदी सहज तोंडावर येणारी नावं म्हणजे रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर ही. इतर अनेक संस्थाही आपापल्या परीने उत्साहानं ही नाटकं करत होत्याच. नाटक क्षेत्राचं आर्थिक गणित एकूण कधीच समाधानकारक राहिलेलं नाही. तेव्हा त्यावेळीही ही मंडळी अशी नाटकं कशी करत असतील त्यांचं त्यानाच माहित! अशा सर्वांना मनापासून सलाम! प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती स्थिती आणि लय अपरिहार्य असते. मी अभिनेता म्हणून वावरत असलेल्या संस्थेचा तो स्थितीचा काळ असावा. मुंबईत तेव्हा एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटकं, राज्य नाट्यस्पर्धा आणि अर्थातच व्यावसायिक नाटकं यांचा एक सशक्त प्रवाह जोमानं वहात होता. अनेक वर्षांनंतर अलिकडच्या काही वर्षांमधे तो पुन्हा नव्या जोमानं, ताकदीनं आलेला दिसतो. त्याचं कौतुक मराठी माणसाला असणारच! त्यानाही सलाम!
कुठल्याही क्षेत्रामधे सतत भर पडत रहाणं आणि ती सशक्त असणं महत्वाचं असतं. रंगभूमीच्या बाबतीत एकांकिका, दीर्घांक, प्रायोगिक आणि हौशी नाटकं त्यानंतर व्यावसायिक नाटकं असा प्रवास सर्व रंगकर्मींच्या मनात सर्वसाधारणपणे असतोच. आमच्या संस्थेने थोडसं पुढचं पाऊल टाकायचं असं ठरवून ’इंद्रधनूच्या गावा’ हे बालनाट्य सादर करायचं ठरवलं आणि एक आख्खं नाटक करायला मिळणार म्हणून आम्ही आनंदित झालो नाही तरच नवल. त्याच्या वर्तमानपत्रात आलेल्या अभिप्रायांची कात्रणं या पोस्टमधे दिसताएत. एका विशिष्ट जागी संस्थेच्या नाटक- एकांकिकांच्या तालमी चालायच्या. त्या जागेसमोरचा रस्ता ओलांडला की एक प्रतिथयश वसाहत होती. काही सहकारी जे स्थानिक होते त्यानी त्या वसाहतीतली जवळ जवळ वीस एक मुलं जमवली. त्या सगळ्यांच्या पालकांची परवानगी काढायला सगळा संस्थेतला वर्ग घरोघर गेला. वसाहत मोठी होती आणि मुलं चुणचुणीत होती. सगळी अर्थातच नवीन. संस्थेतले कलाकार आणि ही मुलं अशा संचात हे नाटक बसणार होतं, सादर होणार होतं. परिसराजवळच असलेल्या एका नावाजलेल्या आणि जुन्या शाळेतले एक कलाशिक्षक बालनाट्य प्रकाराशी संबंधित होते. त्यानी हे नाटक लिहिलं.

त्याकाळातलीही ती हुशार मुलं. ज्याना लहान मुलांच्या ’किलबिल’ कार्यक्रमापेक्षा फिल्मी गाण्यांचा ’चित्रहार’ जास्त आवडणारा. ती आवड लक्षात घेऊन सॅंतॉक्लॉज या मुलांना चित्रहारसाठी एकत्र करतो. मुलांना चिऊकाऊची गोष्टं दाखवली जाते. मग शेतकरी मालक, हट्टी मालकीण आणि त्यांची गाय आणि म्हैस यांची गोष्टं. ज्यात नेहेमीच मालकाच्या उलट बोलणार्‍या, कृती करणार्‍या आणि चुकीचं वागणार्‍या हट्टी मालकीणीला  मालक कसा धडा शिकवतो ते दाखवलं जातं. सरतेशेवटी एकलव्याची परंपरागत गोष्टं सांगितली जाते. हुशार मुलांना एकलव्याचा पराभव अजिबात आवडत नाही मग मुलंच एकत्र येऊन ज्युडो-कराटेच्या (हे प्रकार त्यावेळी चांगलेच लोकप्रिय होत होते) सहाय्याने एकलव्याच्या गोष्टीला न्याय देऊन ती दाखवायला लावतात अशी वेगळी थीम या नाटकात बांधली होती. सोबत नाच, गाणी अगदी इंद्रधनू प्रकाशात सादर केली गेली. वयानं मोठ्या कलाकारांपेक्षा लहान मुलंच बाजी मारून जातात असं यावेळीही अर्थातच लक्षात आलंच.
या नाटकात मला मालक मालकीणीच्या गोष्टीत शेतकरी मालकाची भूमिका मिळाली. गावरान बाजाची भाषा लहानपणी कानावर पडलेली असल्यामुळं तो भाग जमला होता. गोष्टं विनोदी ढंगानं सांगितली होती. बोलण्यातून आणि हालचालीतून विनोद कसा व्यक्तं करायचा याचं शिक्षण पहिल्यांदा इथे मिळालं. जेमतेम दोन वर्षाचा अनुभव- मधल्या एक वर्षात आत्यंतिक अडचणीमुळे काहीच करता आलेलं नव्हतं. एक सुन्नपण आणि शून्यत्व आलेलं. या नाटकानं मनस्वास्थ्य सुधारायला मदत झाली. मोठी संधी मिळाली. बरंच नवं शिकायला मिळालं. दिग्दर्शकाबरोबरचं ट्यूनिंग काय असतं याचा अनुभव आला. ग्रामीण माणसाची, शेतकर्‍याची एक विशिष्ट चाल असते. एका तालमीत माझं लक्ष एकाग्र नसावं. ’तू शेतकरी नाहिएस आता, काय झालंय?’ असं दिग्दर्शकानं सांगितल्यावर आपण शेतकर्‍यासारखं चालत नाही आहोत. आताची आपली मोठी मूव्ह तशी झाली नाही हे लक्षात आलं. मग ती चाल चांगलीच लक्षात राहिली. बाकी, गाय आणि म्हैस (मानवी कलाकारांनी सादर केलेल्या) यांच्याबरोबर एक लाईव्ह गाणं काही अस्मादिकांना झेपलं नाही. गाण्याच्या नावानं आनंदच होता आणि नाचवजा हालचाली बर्‍या म्हणाव्यात तर त्यांची गाणं लाईव्ह म्हणण्यामुळं वाट लागत होती. मग ध्वनिमुद्रित गाण्यावर निभवावं लागलं. तेही बर्‍याच अंशी कसबसं निभवलं. सरावानं जमलं. मुंबईतल्या चिखलवाडी गणेशोत्सवाच्या मंचावर मी आधी एन्ट्री घेणार तर माझ्या म्हशीनं मलाच विंगेत ढकलून माझ्या आधी चुकीची एन्ट्री घ्यायचा प्रयत्न केला आणि  मी अक्षरश: पावसाळातल्या त्या चिखलात, स्टेजच्या जवळ, खाली जमिनीवर; पार्श्वभागावर आपटून उलटाच झालो. तसाच कुणीतरी मला हात दिला आणि पार्श्वभाग, टोपी इत्यादीचा चिखल मिरवत पुढचं नाटक निभवलं. कात्रणं तुम्ही बघता आहातच. त्यात फोटोसेशनसाठी पोज देणं आपल्या दृष्टीनं उत्साहाचं असतं आणि बघणार्‍यांच्या दृष्टीनं चांगलं, चांगलंच मनोरंजक असतं.
हे नाटक उभं रहाण्यासाठी संस्थेनं वेगवेगळ्या खाजगी आस्थापनांमधे स्पॉन्सरशिप मागण्याचा प्रयत्न करून पाहिला. पत्रक घेऊन आम्ही कार्यकर्ते अशा आस्थापनांमधे ओळखी काढून प्रयत्न करत राहिलो. प्रतिसाद अल्प आणि प्रयत्न केल्याचं समाधान जास्त असं या बाबतीत नेहेमीसारखं घडलं.
दोन अवांतर गोष्टी या संदर्भातल्या म्हणजे, या नाटकाचे लेखक, चांगल्या ओळखीचे झालेले. गप्पा मारणारे. चांगले हट्टेकट्टे. अगदी तरूण नव्हे पण प्रौढ. मनमिळाऊ. या नाटकानंतर काही काळाने त्याना अचानक दुर्धर आजार झाला. ते इतके बारीक झाले की तुम्हाला काय झालंय म्हणून विचारल्याशिवाय कुणालाच राहवत नसे. सैरभैर झाला बिचारा माणूस. कालांतराने निधन पावला. त्यांची आठवण आज प्रकर्षाने येते.
दुसरं म्हणजे या नाटकात नृत्य, जुडो-कराटे शिकवणारा, मदत करणारा आणि हे सगळं आपला छोटासा व्यवसाय सांभाळून करणारा, त्यावेळी अरे-तुरे करत असू तो; मधे एकदा अचानक पेपरात दिसू लागला. तो खूप मोठा योगी झालाय. त्याचं स्वत:च्या नावाचं फाऊंडेशन आहे. त्या फाऊंडेशनची सेमिनार्स आयोजित होतात. पुरस्कार जाहीर होतात. माणसं कुठल्या कुठे जाऊन पोचतात. इतकी, की हीच ती? असा प्रश्न पडतो. त्यांचा हा प्रवास कसा झाला असेल याची उत्सुकता दाटून रहाते.. असो! खाली आहेत वर दिलेल्या कात्रणांचे संपूर्ण अंश..                                                                            

Wednesday, January 25, 2012

डेडलाईन (प्रजासत्ताकाची?).. भाग अखेरचा..


बसा! खाली बसा इटक्याल! फ्रीडम फायटर कोण आहे इथं? तुम्ही का मी?.. बसा!.. अहो भडकायला काय आता नवतरूण नाही राहिलात तुम्ही!
सॉरी सर! पण तुम्ही एकदम वेगळ्याच ट्रॅकवर-
हाच ट्रॅक खरा आहे इटक्यालसाहेव! हाच ट्रॅक! आणि आमचे आदर्श होते आमचे नेते!
काऽऽय? इटक्यालचं तोंडच विस्फारलं. राधाबाईंना त्याची काळजी वाटू लागली. दहिहंडीसाठी हुकमी उतरंड रचावी तसे आण्णा बोलत होते.
नारे द्यायचे आणि बाजूला व्हायचं! मग त्यात सत्राशेसाठ आहुत्या पडल्या की स्वदेशीची चळवळ सुरू करायची. ती लोकांनी डोक्यावर घेतली की अचानक मागे घ्यायची. वसाहत म्हणून मान्यता द्या, चालेल! संपूर्ण स्वातंत्र्य कशाला? पोरांना फाशी जाहीर झाली, त्यानी उपोषण केलं.. आपण आपल्याकडे लक्ष वेधून ठेवायचं देशाचं. आपल्यापेक्षा मोठं कोणी होता कामा नये. ते त्यांचं राष्ट्र मागताहेत, देऊन टाका झालं, उगाच.. हे.. माझे तरी आदर्श होते इटक्यालसाहेब आणि मी योग्य ते संकेत घेण्यात-
काय बोलताय तुम्ही हे? कुणाबद्दल बोलताय? हे-हे-हे कसं-
छापायचं! असं म्हणायचंय ना तुम्हाला इटक्याल?.. की खरंच तुमच्याकडे ती वस्तू आहे?.. सात्विक संताप का काय म्हणतात ती? आत्तासारखंच सगळं होतं तेव्हा.. दरोडे घातले जात होते, राजकारणात एकमेकांच्या अपेक्षांची कापाकापी होती, ताम्रपट वाटपात भ्रष्टाचार झाले ते पुढे पण चळवळीचं नेतृत्व कुणी करायचं-
हे..हे-हे-हे भयंकर आहे! भयंकर!.. तुमच्यासारख्या माणसानं हे असलं सगळं- मॅडम-हे-हे तुम्हीतरी-
हे जास्त सनसनाटी आहे नाही मिस्टर इटक्याल! खरं नाही वाटत तुम्हाला? की तुमच्या उपयोगाचं नाहीए हे?.. आता पुढे सांगतो. ब्रिटीश काही आपल्याला घाबरून नाही पळून गेलेऽ.. आपल्यासारख्यांच्या या अवलादीची पूर्ण कल्पना होती आणि खात्री होती त्याना-
क-कसली? कसली?
पुढच्या पन्नाससाठ वर्षांत पुन्हा देश विकायला ठेवणार आहे ही अवलाऽऽदऽ पुन्हाऽऽ.. आणि तेव्हा सगळी तरूण पोरं परदेशात स्थाईक झालेली असणार आहेत.. राहिलेली स्वत:त, चंगळवादात आणि बुवाबाजीत अडकलेली असणार आहेत.. घोटाळे हा सरकार आणि नोकरशाही यांचा हक्क होणार आणि.. उथळ मनोरंजन आणि सनसनाटी याशिवाय वर्तमानपत्रात काहीही उरणार नाही.. अन्य माध्यमांची बातच सोडा! छापणार आहात तुम्ही हे सगळं?
अचानक लालबुंद होऊन आण्णा थरथरत उभे राहिले. प्रतिध्वनिसारखा तोच तोच प्रश्नं विचारत राहिले, छापणार आहात तुम्ही हे सगळं?
इटक्याल अचानक शांत झाला. पत्रकारितेचं कातडं पांघरून तो पूर्ण भानावर आला. आपलं जे काही सामानसुमान होतं ते आवरून तो तितक्याच शांत, सावधपणे मार्गस्थ झाला तेव्हा आण्णासाहेब थरथरत होते. त्यांचा चेहेरा अजुनही तांबडालाल होता. राधाबाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होतं. आण्णासाहेबांना त्यांनी घट्ट धरून ठेवलं होतं.
इटक्याल रस्त्त्यावर आला. त्यानं तेच ते आपलं बहुउद्देशीय अत्त्याधुनिक यंत्र बाहेर काढलं. त्यावरचा एकच नंबर दाबला. त्या नंबराखाली प्रत्यक्ष संपर्क क्रमांक साठवलेला होता.
हॅलोऽहॅलो सर, म्हातारा बराच तिरसट निघाला. आपल्या लिस्टवर दुसरं नाव कुणाचं आहे सांगा. आज रात्रीची डेडलाईन आहे!”          (समाप्त? की पुढे असंच चालू? कधीपर्यंत?)

Tuesday, January 24, 2012

२) डेडलाईन (प्रजासत्ताकाची?)


इटक्यालला ’हो’ म्हणणं भाग पडलं. त्याला हे काम झटपट उरकायचं होतं पण म्हातारा खट वाटत होता. इतर फ्रीडम फायटर्ससारखा गलितगात्र नव्हता. उतावीळ नव्हता स्वत:बद्दल बोलायला. आण्णा त्याला निरखत होते
तुम्ही, इटक्याल, टेलिफोनबूथ वाटपाचं प्रकरण धसास लावलंत खरं पण तुमचे सहकारीच काय तुमचे मालकसुद्धा नाराज झाले तुमच्यावर. एकदम सगळ्यांपेक्षा खूपच मोठे झालात हो तुम्ही! ‍हाऽहाऽहाऽहाऽऽऽ.. शोध पत्रकारितेच्या महत्वाच्या खात्यातून तुम्हाला टाकलं जनरल इंटरव्ह्यू सेक्शनमधे. आमच्यासारख्या थडग्यांच्या मुलाखती घ्यायला! हा हाऽहाऽऽ.. राधाबाईंनी चपापून इटक्यालकडे पाहिलं. ही तर सुरवात होती आणि कदाचित इटक्यालच्या मदतीला राधाबाईच धावून येणार होत्या. इटक्याल काही लेचापेचा गडी नव्हता. त्याचा चेहेरा भावनाशून्य झाला. त्यानं आपलं ते भ्रमणध्वनिवजा अत्त्याधुनिक यंत्र टेबलावरून पुन्हा आपल्या हातात घेतलं आणि ज्याला आण्णासाहेब आजकालच्या जनरेशनचं मोबाईल टुचुक्‍ टुचुक्‍ करणं म्हणायचे तसं करत तो त्याच्याशी खेळू लागला. आण्णासाहेबांच्या ते लक्षात आलंच. हऽहऽहऽहऽऽ.. पत्रकारितेत गोपनीयता फारच महत्वाची असते नाही इटक्याल? तरीही विचारतो, ज्या मुलाच्या प्रतिज्ञापत्रावरून हा घोटाळा तुम्ही उजेडात आणलात त्या मुलाला मिळाला का हो बूथ?- म्हणजे भविष्यात तसं काही होण्याची शक्यता? हऽहऽ.. नाही!- जवानांच्या विधवा, अपंग, स्वातंत्र्यसैनिक या सगळ्यांचेच बूथ परत मागितलेत हो सरकारनं! त्या मुलाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागलं म्हणजे असंख्य प्रयत्नं करून पैसे खरचून त्याला बूथ मिळालाच नाही, तेंव्हा-
मिस्टर कुरूंदवाडकर! मे वुई स्टार्ट वुईथ योर इंतरव्ह्यू? आज मला प्रजासत्ताकदिनाची अर्ध्याच्यावर पुरवणी कव्हर करायची आहे ऍंड यू नो आय ऍम अ सॅलरीड पर्सन. नोकरीवर लाथ मारणं हा वाक्प्रचार इतिहासजमा झालाय आता. उलट गदा येऊ नये म्हणून- तुम्ही जे काही विचारताय त्याचं उत्तर काळच देईल असं मला वाटतं. ’स्वातंत्र्य चळवळीतले तुमचे दिवस’ हा तुमच्या मुलाखतीचा विषय. जवळजवळ अर्ध पान तुम्हाला ऍलोट केलंय. तुम्ही प्रसिद्धीपासून सतत दूर राहिलात. महाराष्ट्रातल्या महत्वाच्या उठावांमधे तुमचं नाव सतत घेतलं जात होतं. महाराष्ट्रात ताम्रपट दिल्या गेलेल्या पहिल्या तुकडीत तुमचं नाव होतं. सत्तेत, पक्षकार्यात तुम्ही सामील झाला नाहीत. विधायक कार्यांना पाठिंबा देण्यात आणि विधायक विरोध करण्यात तुम्ही नेहेमीच आघाडीवर राहिलात. खरं तर पेपरवाल्याना उभं न करण्याबद्दल तुमची ख्याती पण निदान आम्ही तुमची भेट घेण्यात तरी यशस्वी ठरलो. आपण तुमच्याबद्दल बोलूया! चला! हे मी दाबलं या माझ्या यंत्राचं बटण. हे चालू झालं ध्वनिमुद्रण. बोला!
हाऽहाऽहऽहऽ.. इटक्याल गृहपाठ चांगला आहे तुमचा. खरंच चांगला आहे. चलाखही आहातच. एवढा.. घोटाळा उजेडात आणलाय तुम्हीऽ.. माझ्याबद्दल बरंच बोलायचंय मला.. कधी नव्हे ते! राधाबाई.. तुम्हीही ऐका.. हरकत नाही ना इटक्याल तुमची? राधाबाई इथे असल्यातर? आं?.. हाऽहाऽहऽहऽ.. तर.. ’चलेजाव’च्या वेळी मी जेमतेम वीस वर्षाचा होतो. नुकताच म्याट्रिक झालेला. कुणाचंही लक्ष वेधून घेण्याचं मला अप्रूप. कुणाचंही. मग काय करायचं?.. म्हटलं मारूया उडी. भित्रे काही कमी नव्हते गावात. म्हटलं उडी मारली चळवळीत तरच उठून दिसू! हाऽहाऽहाऽहाऽ..”
इटक्याल उडालाच. हे असलं काही अनपेक्षित होतं त्याला. तो राधाबाईंकडे बघायला लागला. राधाबाई विस्मयचकीत, डोळे विस्फारून आण्णांकडे बघत होत्या. आण्णासाहेब हसतच होते. इटक्यालला रहावलं नाही.
सर!.. म्हणजे राष्ट्रप्रेमानं भारून-
छ्याट्‍!.. अजिबात नाही! खोटंय ते!
आता दचकण्याची पाळी राधाबाईंची होती. त्यांनी पदर तोंडाला लावला.
काय कुणास ठाऊक कुठून माझ्यात ती लक्ष वेधून घेण्याची प्रवृत्ती आली. मी सतत बैचेन असायचो. अभ्यासात, खेळात फारशी गती नव्हती. ’चलेजाव’ आलं, मी वाटच पहात असल्यासारखं. मोठी रिस्क होती इटक्यालसाहेब मोठी.. पण मी घेतली. लाठ्या घेतल्या, काठ्या झेलल्या.. सगळे बरोबर आहेत ना हे बघून तुरुंगातही जाऊन आलो. अभ्यासाची पुस्तकं घेऊन.. लक्ष वेधून घेण्याचा आणखी एक प्रयत्न. अभ्यासात खंड पडू दिला नाही. इतरांची बैचेनी मला नव्हती. जलेजाव म्हणूनही ’ते’ जात नाहीएत, देशावरची गुलामगिरी संपत नाहिए.. गावाचं लक्ष मी माझ्याकडे वेधून घेतलं होतं, माझं काम मार्गावर होतं मला कसली बैचेनी?-
इटक्याल आता पॅनिक झाला. राधाबाईंचा तोंडावरचा हात आता कपाळावर गेला. आण्णा तंद्रित जाऊन स्वत:शीच हसत होते. वेड्यासारखे.
सर!.. सर!.. मग कलेक्टर कचेरीवर तिरंगा फडकवलात युनियन जॅक उतरवून त्या प्रसंगात तुमचं नाव अग्रेसर-
का असणार नाही? का असणार नाही! हाऽहाऽऽहाऽहाऽ कामाला होतो मी तिथेच. कलेक्टरला बदली हवी होती. त्याचं सगळं तुंबलेलं काम मी पूर्ण करून दिलं. ब्रिटीश असे होते, तसे होते, शिस्तीचे भोक्ते होते हे आपलं फुकाचं कौतुक! कंटाळला होता बिचारा. म्हणाला, मी जातो, पुढचा विलायतेहून यायच्या आत काय़ वाट्टेल ते करा. मी आतल्या गोटात लगेच खबर पोहचवली-
सर हे फार होतंय! म्हणजे हे तिरंगा फडकवणं, युनियन जॅक उतरवून, हे आजच्या कुठल्याही राजकीय नेत्यानं ध्वजारोहण करण्याइतकं सोपं होतं म्हणायचंय तुम्हाला? फ्रीडम फायटर्सनी जीवाची बाजी लावून-
इटक्याल संतापून कधी उभा राहिला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. 
बसा! खाली बसा इटक्याल! फ्रीडम फायटर कोण आहे इथं? तुम्ही का मी?.. बसा!..”    (पुढे चालू)

Saturday, October 29, 2011

विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या खरय़ाखुरय़ा नायकास...

प्रिय अरुण,
                 तू माझ्या वयाचा नव्हेसच, खरं तर माझ्या वडलांच्या वयाचा.तुला काय म्हणून संबोधायचं इथपासून माझी तयारी.बरं तुझी व्यक्तिगत माहिती काहीच नाही, म्हणजे तुझा जन्म कधीचा, तू.. तू गेलास ती तारीख.परवा तुझा सिनेमा बघितला एक चॅनलवर.खरय़ा अर्थाने तो तुझा सिनेमा नव्हता अर्थात. पण तुझं ते फेटा, जाकीट घातलेलं, धोतर नेसलेलं रूप.पडद्यावरचं ते तुझं अप्रतिम ढोलकी वाजवणं.तुझ्या मनगटावरचा काळा धागा.. तुझा हातखंडा असलेला नायिकेबरोबरचा तुझा प्रेमप्रसंग.. तुझं हसणं, तुझं बोलणं.. त्या तुझ्या सहजतेला अभिनय म्हणणंसुद्धा व्यर्थ वाटलं.तुझं आणि माझं गाव एक हा फक्तं बादरायण संबंध जोडून तुला लिहायला बसणं अपरिहार्य झालं मला.हा भावनेचा खेळ तूच समजून घेशील.
                 तुझा सगळ्यात अप्रतिम सिनेमा कोणता? माहित नाही.तुझं पडद्यावरचं दिसणं अधिक चांगलं की हसणंच चांगलं, तुझा आवाज उत्तम की तुझं बघणं, तुझी नजर वेधून घेणारी.तुझं गावरान रूप अधिक चांगलं की शहरी जास्त प्रभावी.असलं काहीही मला डिफरंशिएट करता येणार नाही.मा.विठ्ठलना मी अगदीच थोडं बघितलं, तुला जास्त बघितलं ते माझ्या लहानपणी पण त्यानंतर ’नायक’ म्हणून कुणीच रूचलं नाही.तुम्ही दोघेच फक्त.अभिनेत्यांची यादी डॉ.लागू, निळू फुले, विक्रम, नाना, अशोक सराफ, दिलिप प्रभावळकर अशी लांबलचक होईल.पण नायक तुम्ही दोघंच.हे माझं मत.
                 तुझ्या एवढी प्रचंड सहजता आणि चार्म अरूण, नाही बघितला कुणात.तू आज असतास तर अनेक प्रश्नं विचारता आले असते प्रत्यक्ष.तू हिंदीत का गेला नाहीस? आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे नायक, अभिनेते आहोत असं तुला वाटतं का? तू ’तुघलक’ केलंस पण तेंडुलकरांचं तुझ्यासाठी लिहिलेलं ’अशी पाखरे येती’ तू नाकारलंस हे खरं का?.. 
                 तुझी कोणतीही विशिष्टं लकब नव्हती, जशी बलराज सहानी, मोतीलाल यांचीही सांगता येणार नाही.आता इथेच थांबतो.तुझी अमुक कुणाशी तुलना करायची नाहिए पण माझ्यामते तू उत्तम अभिनेता होतास.स्टाईलाईज्ड न होता व्यावसायिक चित्रपटांमधून तू लोकप्रिय झालास.
                ’थांब लक्ष्मी कुंकू लावते’ लहानपणी थिएटरमधे बघितलेला तुझा पहिला चित्रपट.मग टिव्हीवर बघितलेले ’संथ वाहते कृष्णामाई’, ’घरकुल’, ’मुंबईचा जावई’, ’सिंहासन’ शिवाय नाव न आठवणारे काही ग्रामीण चित्रपट, तमाशापट.हवालदार नायक आणि त्याच्यासारखाच दिसणारा नायिकेचा पाठलाग करून तिचा खून करू पहाणारा खलनायक असा दुहेरी रोल असलेला चित्रपट.. सिनेमांच्या नावापेक्षा तू लक्षात राहिलास.तुझ्या नायिकांची तुझ्याबरोबर प्रेमप्रसंग करताना काय अवस्था होत होती?
                 तुझा नायक मिष्कील असायचा.तो कधी व्यसनी व्हायचा, मग पश्चातापदग्धही व्हायचा.तो गर्विष्ठही असायचा आणि त्यात खलनायकी रंगही कधी असायचा.हे सगळं तू तुझ्या डोळ्यातून, आवाजातून आणि मुख्य म्हणजे सर्वांगातून आणायचास.आणायचास! दाखवायचास नव्हे! तुझ्या भूमिकांमधून चांगलंच वैविध्य असायचं.तुझ्या प्रेमात असल्यामुळे कदाचित पण तू खूप चांगला माणूसही असावास या माझ्या मतावर मी ठाम आहे.मध्यंतरी, जयश्रीबाई असताना, एका मुलाखतीमधे तुझ्याबद्दल बोलताना त्यांचा गळा भरून आल्याचं मला आठवतंय.तू चांगला माणूसही असल्याचं त्या सांगत होत्या.संभा ऐरा नावाचा तुझा सहकारी तुझ्या माणूसपणाबद्दल खूप आवर्जून बोलला होता माझ्याशी तेही आठवतं.कचकड्याच्या या दुनियेत, मिन्टामिन्टाला रंग बदलणारय़ा सरड्यांमधे तू कसा वावरला असशील? पण तू खरंच मर्दानीही होतास.राजामाणूस होतास.तुझं स्थान तू निर्माण केलंस.
                 सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक निवृत्तीबुवा सरनाईकांचा तुला वारसा.तू गाण्याकडे का तितकंस लक्ष दिलं नाहीस? ’घरकुल’ मधलं ’पप्पा सांगा कुणाचे’.. त्यातलं तुझं गाणं आणि विशेषत: गात गात हसणं.सहज हसणं.हसणं हा कितीतरी अभिनेत्यांचा आजही प्रॉब्लेम आहे.’चंदनाची चोळी..’ मधलं तू गायलेलं ’एक लाजरा न साजरा मुखडा’, ते सुद्धा सुप्रसिद्ध पार्श्वगायिकेबरोबर.कोण विसरू शकेल? ’मुंबईचा जावई’ मधलं रामदास कामतांनी म्हटलेलं ’प्रथम तुज पाहता’ पडद्यावर तुझ्याइतकं चांगलं कोण म्हणू शकलं असतं? तू मात्रं तुझ्यातलं गाणं फारसं मनावर घेतलं नाहीस!- आणि आज गाणं न येणारेही गात सुटलेत.स्वत:चे ढोल तू स्वत:च कधी बडवले नाहीस.तुला त्याची गरज नव्हती.पण तू विस्मृततही लवकर गेलास.तुझा जन्मदिवस, तुझा मृत्यूदिन कोणीही नुसता उधृत केलेलाही आठवत नाही.तुझ्यावर कुणी पुस्तकही लिहिलं नाही.तू मागे सोडलेल्या तुझ्या एकट्या लेकीकडे तुझं बरचसं संचित असेल.ते ती जपत राहिली असेल.
                आजच्या भाषेत सांगायचं तर तू तेव्हा नंबर वन होतास मराठी चित्रपटात.तसं असूनही केवळ शोबाजी केल्यासारखं न करता इमानदारीत नाटकंही केलीस. ’लवंगी मिरची कोल्हापूरची’, ’अपराध मीच केला’, ’तरूण तुर्क म्हातारे अर्क’, ’गुड बाय डॉक्टर’, आणि अगदी ’गोष्टं जन्मांतरीची’सुद्धा.तू छबिलदासला ’तुघलक’ही केलास, जो बघायला मिळाला नाही म्हणून मी आजही हळहळतोय.
                 मी एकदाच तुला हाताच्या अंतरावरनं पाहिलं.एका नाटकाच्या कॉन्ट्रॅक्ट शोच्या वेळी स्वत: बसमधून उतरून तू बस वळवून घ्यायला मदत करत होतास...
                तू आणखी जगला असतास तर काय काय केलं असतंस? मालिकांमधे काम केलं असतंस? जे काय केलं असतंस ते नक्कीच दर्जेदार केलं असतंस.तू चांगल्या चरित्रभूमिका केल्या असत्यास ’सिंहासन’ मधल्या मुख्यमंत्र्यासारख्या आणि आंगापेक्षा बोंगा जड विग लाऊन, आरडत, ओरडत, छातीवर हात दाबून किंचाळी, कंठाळी अभिनय करणारय़ा नेहेमीच्या यशस्वी चरित्र अभिनेत्याना धडे दिले असतेस.कुणीही शेंबडकोंबड्यानं उठून नायक बनण्याच्या आजच्या जमान्यात खरा नायक कसा असतो हे आजच्या तुझ्यासारख्या म्हातारय़ाकडे बघून कळलं असतं त्याना.कळलं असतंच पण वळलं असतं की नाही याची मात्रं मी काहीही खात्री देत नाही.तू आज असतास तर बरंच काही झालं असतं.मुख्य म्हणजे मला खूप बरं वाटलं असतं.पण तू गेलास.गेलास तो ही..
                 काही वर्षांपूर्वी एका आत्मचरित्रात तुझ्याबद्दलचा एक प्रसंग वाचून वाईट वाटलं होतं.पुण्याला तुझ्या नाटकाचा प्रयोग आणि तू पूर्णपणे ’आऊट’.प्रयोग रद्द करण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही.वाईट वाटलं.तुला खरंच खूप दु:ख होतं? कुठली चूक झाली होती तुझ्या हातून डोंगराएवढी म्हणून तू स्वत:वर आणि तुझ्या चाहत्यांवर सूड उगवत होतास? की कलाकार आणि व्यसन ह्यांचं अद्वैत असल्याचा न्याय तूही सिद्ध करत होतास?.. काहीही असलं तरी अगतिक व्यसनाधिनता ही कुणीही मान्य करण्यासारखी गोष्टं अजिबात नाही!
                 नियतीचा डावही असा की या व्यसनातूनही तू पूर्णपणे बाहेर आलास आणि ’पंढरीच्या वारी’ला निघालास. त्याचवेळी एका निर्घृण अपघातात तुला काळानं ओढून नेलं.तुला, तुझ्या पत्नीला, तुझ्या मुलग्यालासुद्धा! त्या भीषण अपघातात आपल्यालाही का नेलं नाही असं मागे राहिलेल्या तुझ्या मुलीला वाटलं असेल.तुमची मरणं अनुभवल्यानंतर ती आजतागायत काय जगली असेल याची मी फक्तं कल्पनाच करू शकतो.
मग हे अरूण नुसतं स्मरणरंजन नाही रहात.मग प्रश्न पडायला लागतात.कलावंताचं कलेसारखं त्याचं आयुष्यसुद्धा नाट्यमय किंवा सिनेमॅटिकच असतं का?.. कलाकार खरंच कलंदर असतो?.. कला शापित असते?.. की मरण अटळ असतं?.. संदर्भ असलेले, नसलेले असंख्य प्रश्नं..
                एका सिनेमात तुला अचानक पाहिलं.वावटळीसारखा माझ्या आठवणींमधे घुसलास तू.माझा नेहेमीचा हळवेपणा म्हणून अनेकवेळा तुझ्या आठवणींना काढून टाकण्याचा प्रयत्न केला.घुसमटत गेलो.तुला लिहायलाच बसलो.ते अपरिहार्य झालं.मला समानधर्मी मिळण्याचे अनेक चान्सेस दिसायला लागले, तुझ्याबद्दल माझ्यासारखंच वाटणारे.
                 अरूण.. तेव्हा.. वेगळ्या रूपात पृथ्वीवर आला असशील तर भेटूच! अन्यथा.. जरूर भेटू!
                 मी निदान तुझ्या गावचा आहे हे पुन्हा एकवार आठवून द्यायची आणखी एक संधी मी निश्चितच सोडू शकत नाहीए.तू काहीही म्हण!
                                                                    तुझा
                                                                              मी

Thursday, October 27, 2011

माध्यमं.. मुलं.. समाज..

कार्टून फिल्म्स ज्यांच्या अत्यंत आवडत्या होत्या ती बालकं कालांतराने टीव्हीवरच्या कौटुंबिक मालिकांमधे रमली.आता ती बालकं सोशल नेटवर्कींग साईट्सच्या आहारी गेली आहेत.वेगवेगळी सर्वेक्षणं आणि त्यांचे प्रसिद्ध होत रहाणारे निष्कर्षं मनोरंजक असतात.त्यांमधे तथ्यंही असतंच.
लहान मुलं दूरचित्रवाणी मालिकांमधे काय बघत असतात, किंवा होती? चकचकीत घरं? सतत लग्नंसमारंभातले कपडे घालून वावरत असलेले स्त्रीपुरूष? त्यांची भांडणं? कट आणि डावपेच? असंख्य विचित्र नमुने एकत्र असलेली कुटुंबं? त्यातला कमीतकमी एखादा ते अनेक विकृत?... की मालिकांमधे दाखवल्या गेलेल्या लग्नसंस्थेतला किंवा कुटुंबसंस्थेतला अत्यंत महत्वाचा घटक अर्थात विवाहसंबंध?... आपण जाणते आहोत.जाणत्या लोकांसाठी त्यांच्यातल्याच जाणत्यांनी सार्वजनिक माध्यमांचा आसरा घेऊन केलेली प्रत्येक कृती भावी समाजमनावर परिणाम करणारी आहे हे आपल्या लक्षात येत नाही? की डेलिसोपवाल्यांनी, कॉमेडी शोजवाल्यांना, माईंडलेस (?) कॉमेडीवाल्यांनी रिऍलिटी शोजवाल्यांना बोल लावायचे आणि त्यांनी न्यूज चॅनल्सना? आणि मग त्यानी चित्रपट उद्योगाला? कलाकृती मांडण्याचं स्वातंत्र्य- फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि सामाजिक जाणीव यांची सांगड कोणी आणि कशी घालायची? साधारणत: दूरचित्रवाणीवरून सादर होणारय़ा सरासरी कार्यक्रमांना ’एक्सप्रेशन’ चा दर्जा देता येईल? असं प्रकटीकरण की ज्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलं म्हणजे फार मोठा आघात झालाय मानवी मूल्यांवर वगैरे?...
एकीकडे विवाहबाह्य संबंध अपरिहार्य आहेत असं चित्र दाखवायचं आणि दुसरीकडे निरांजनातली ज्योत विझणं, करवा चौथच्या दिवशी (हा हल्ली मराठी मालिकांमधेही सर्रास साजरा होतो) नेमकं अघटित घडणं, यासारखे तेच ते अपशकुन, यातून आपली बालकं काय बोध घेणार आहेत? विनोदासाठी कुटुंबातल्या एखाद्या आदरस्थान असलेल्या माणसाची संवंग पद्धतीने खिल्ली उडवणं यातून ही मुलं काय शिकणार आहेत? माणसाचं सबंध आयुष्य घडवणारय़ा सुरवातीच्या वर्षांत, संस्कारक्षम मुलांना जे बघायला लागतंय त्याची जबाबदारी आपल्यावर नाही? ती पार पाडायला आपण पालक हतबल आहोत, असमर्थ आहोत? मुलांनी बघू नयेत असे कार्यक्रम मुलांच्या तोंडावर बंद करण्याचं धारिष्ट्य आपल्याजवळ आहे? जरा जाणत्या मुलांना ’सोशल नेटवर्कींग साईट्सची सफर बस्स झाली आता! या महाजालातून आता लवकर बाहेर पड!’ असं सांगणं आपल्याला जड जातंय? मुळात आपलं आपल्या मुलांच्या हालचालींवर योग्य लक्षं आहे का? ते नक्की काय बघतात यावर आपण सतत लक्षं ठेऊ शकतो का? नाहीतर मग काय?..
विषयाला हात घालताना असे अनेक प्रश्नं समोर येतात.नेहेमीचेच वाटणारे पण नेहेमीच अनुत्तरित रहाणारे..
मुलं कार्टून बघत होती.त्यात दाखवलेल्या अतिरिक्त हिंसेमुळे मुलं हिंसक बनतात असं मत मांडलं गेलं.ही मुलं मग दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघण्यासाठी आटापिटा करू लागली. ’सतत विवाहबाह्यसंबंध ठेवायचे, मग विवाह का करायचा? संबंध असेच का नाही ठेवायचे?’ असे प्रश्नं त्यांच्या मनात, डोक्यात आणि मग कदाचित ओठांवर येऊ लागले.आता तर वर्ल्ड वाईड वेब त्यांच्यासमोर खुलं झालंय.. आता ती परस्परांमधे चॅट करतात.पडणारे प्रश्नं ते आपापसात सोडवतात.काय असतात त्यांची सोल्यूशन्स? कशावर आधारित असतात त्यांची मतं? माध्यमलोंढ्यातल्या त्या हातोडाबाज (हॅमरिंग) मतांवर? असलं हॅमरिंग की जे कुठल्यातरी वाहिनीचा, कुठल्यातरी व्यक्तीचा, कुठल्यातरी अतिरेकी राजकारणी, अतिरेकी धार्मिक समुदायाचा अल्पकाळाचा स्वार्थ साधणारं आणि सगळ्या समाजाच्या दूरगामी तोट्याकडे हेतूपूर्वक/अहेतूपूर्वक दुर्लक्ष करून सवंग पद्धतीने मांडलेलं असतं? जे कदाचित समाजाला खड्ड्यात लोटणारं असू शकतं?
मुलं परिपक्व होतील, योग्य, अयोग्य त्याना समजू शकेल अशा पद्धतीचे संस्कार आपणंच त्याना देऊ शकतो.माध्यमांमधलं चांगलं काय हे आपण मुलांना सांगू शकतो.त्याना त्या दिशेने वळवू शकतो.आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्याकडून तसं होतंय की नाही हे बघू शकतो.आपल्या दृष्टीआड असलेल्या सृष्टीबद्दल काय? जरा जाणती मुलं आपण दृष्टीआड होण्याचीच वाट बघत असल्यासारखी बसून असतात.त्याना स्वत:च्या बळावर, त्याना संपूर्ण मुक्त झालेल्या सृष्टीची मन:पूत सफर करायची असते.मग काय? त्याना तसं करू द्यायचं? असं करत करत, पडत, ठेचकाळतच ती शिकतील हे मान्य करायचं? मुलांना शिस्त कशी लावायची? मारणं, झोडणं कितपत योग्य आहे? आजच्या काळात? मग त्यांना मारण्याझोडण्या व्यतिरिक्त शिक्षा करायची? काय शिक्षा करायची?
मुलांना सतत कुठल्या न कुठल्या सकारात्मक कामात गर्क ठेवायचं!.. म्हणजे? त्यांना अनेक ऍक्टीविटी क्लासेसना, संस्कारवर्गांना घालायचं.शाळा, शिकवणीवर्ग आणि मग संस्कारवर्ग असं वेळापत्रक सेट करायचं? बस्स! मग काय चिंता? हा योग्य उपाय आहे? तो किती प्रमाणात व्यवहार्य आहे? सगळं करून झाल्यावरही आजकाल वेळ उरतोच मुलांना म्हणे! मग विरंगुळ्यासाठी त्यांनी नाही वळायचं माध्यमांकडे?..
पूर्वी वर्तमानपत्रं येतंच होती की घरी! त्यात नव्हते चोरय़ा, डाके, बलात्कार, खून? वर्तमानपत्रंही खुलीच होती की? चित्रपटही होते.नंतर ते दूरचित्रवाणीवरही आले.. पुस्तकं, मासिकं यायची की! वडलांच्या, आजोबांच्या खोलीत, कपाटात, टेबलावर विराजमान असायची! मुलं बागडायचीच की घरभर!..
जग बदलत चालंलय! मूल्यं बदलताएत! मूल्यांचा र्‍हास होत चाललाय! आणि त्याचवेळी जग आणखी आणखी जवळ येत चाललंय! एकत्र कुटुंब पद्धती उतरणीला गेलीय.कुटुंब लहान सुख महान म्हणत म्हणत घर म्हणजे एकट्या, एकाकी जीवांसाठीच्या प्रयोगशाळा झाल्या आहेत.कॉंक्रिटची जंगलं तयार झालिएत.यात रहाणारय़ा जीवांचं विरेचन कसं व्हायचं? त्यांनी व्यक्तं कसं व्हायचं? मुलांमधे जी प्रचंड उर्जा असते तिची घुसमट या मुलांना, आपल्याला, या समाजाला कुठे नेणार?
वळण, शिस्त लावणारी पालक मंडळी आहेत.टोकाची, प्रसंगी घरात टिव्ही, कॉम्प्युटरच न ठेवणारी पालकमंडळीही आहेत.वाचन, चित्रकला, नृत्य, वाद्यवादन असे छंद; छंद म्हणून जोपासायला उद्युक्त करणारी पालकमंडळी आहेत.त्यांच्या संख्येत वाढ होतेय.पण सर्वसाधारण चित्रं काय दिसतं? ’तुला शिकवणीवर्गासाठी लांब जावं लागतंय, घे हा मोबाईल!’ असं म्हणून त्याच्या हातात एकविसाव्या शतकातलं, नव्या सहस्त्रकातलं असं प्रभावी आयुध दिलं की आपलं त्या मुलावर, त्याच्या हातातल्या त्या वस्तुच्या वापरावर कितपत नियंत्रण रहातं? अपरिहार्य व्यवहारातून निरोगी मानसिकता कशी घडवायची?
मुलं चांगली असतात.समंजस असतात.पुढची पिढी अधिक समंजस आहे.त्याना जास्त कळतं.आपण सगळेच दिवसेंदिवस अंगावर येणारय़ा वेगवेगळ्या माध्यमप्रवाहांच्या लोंढ्यांशी स्वत:ला जुळवून घेत जगू शकू.आपल्या वातावरणाशी, सभोवतालाशी जुळवून घेत मानवजात आगेकूच करतेय.त्यातलं जे चिरकाल टिकणारं असेल, मानवाच्या पुढील प्रवासाला अनुकूल असेल ते टिकेल; बाकीचं नष्टं होत जाईल.
डार्विनचं तत्वज्ञान इथे लावता येईल?