romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, April 5, 2011

आवाजचाचणी…

वेळ मिळेल तेव्हा ’माझं काय चुकलं?’ नाटकातला, मी आवाजचाचणीसाठी निवडलेला संवाद हातात घेऊन म्हणून बघत होतो.तो पाठ म्हणायचा नव्हता पण सतत सराव केल्याने त्या संवादातला अर्क जेवढा जमेल तेवढा जाणिवेत आणि मग नेणिवेत मुरावा असा प्रयत्न होता.केवळ आवाजातून नाटकातल्या पात्राच्या भावना पोचवणं सोपं नाही.नवोदिताला तर नाहीच नाही पण नेहेमीप्रमाणे प्रयत्नाअंती जे पाहिजे ते शक्य होतं ही खूणगाठ मनाशी बांधून होतो.हातातला संवाद नाटकातल्या नायकाचा आणि त्याच्या बायकोचा.यात नायक आपण आत्महत्या करणार, ती अशी अशी करणार असं तिच्याजवळ जाहीर करतो.
आकाशवाणीवरच्या नाट्यविभागाच्या आवाजचाचणीचा दिवस उजाडला.मी जवळ जवळ टेन्शनमूर्ती होऊन आकाशवाणी केंद्रावर पोहोचलो.नाट्यविभागात गेलो.त्यावेळी नाट्यविभागप्रमुख होते श्री चंद्रकांत बर्वे.नवोदिताला बोलता बोलता सहज रिलॅक्स करणारे.त्यांनी मला ध्वनिमुद्रण कक्षात नेलं.तिथं पोचता पोचता माझ्या कानावर एक अतिपरिचित पण तितकाच दैवी स्वर कानावर पडला.मी त्या दिशेने बघितलं आणि जागच्या जागेवरच उभा राहिलो.त्या श्रीमती करूणा देव होत्या.पळून जावसं वाटलं.या बाई माझी आवाजचाचणी चालू असताना इथे असणार? त्यापेक्षा… पण आतून तयार झालेल्या निश्चयाने तसं करू दिलं नाही.
माझ्याबरोबर आवाजचाचणीसाठी इतर अनेक उमेदवार होतेच.आत काय चाललंय हे केवळ उमेदवार कक्षाचं दार उघडून आत जाण्या किंवा बाहेर येण्याच्या अवधीतच दिसत, समजत, कानी पडत होतं.त्यात ’तो’ दैवी स्वर प्रत्येकवेळी साथ करत होताच.एकाबाजूने सुखावणारा आणि दुसर्‍या बाजूने तो आपल्या चाचणीच्या वेळी तिथेच असणार या वास्तवाने अंगावर काटे आणणारा.
आवाजचाचणीची माझी पाळी आली.मी आत गेलो.चंद्रकांत बर्वेंनी स्वागत केलं.माझी आणि करूणा देव या दैवी आवाजाची ओळख करून दिली.इथपर्यंत मी लटपटत होतो आणि बर्वेसरांच्या पुढच्या वाक्याने कोसळायचाच बाकी राहिलो. “तुमच्या बरोबरचं स्त्री पात्राचं भाषण देव बाई वाचणार आहेत” बर्वेसरांनी त्यांच्या समंजस आवाजात अगदी सौम्यपणे सांगितलं.इथे माझी पाचावर धारण बसायला सुरवात झाली.
त्याआधी लहानपणापासून त्यावेळी निलम प्रभू आणि आता करूणा देव म्हणून या आवाजाला जीवाचा कान करून ऐकलं होतं.लहानपणी दूरदर्शनचा संचार झालेला नव्हताच.रात्री दिवे विझवून बिछान्यावर पडलं की आई आकाशवाणीवरच्या श्रुतिका लावायची.तिला आणि त्यावेळी सगळ्याच प्रौढांना ते वेडच होतं.त्यात राष्ट्रीय नभोनाट्याचे कार्यक्रम लागत.वेगवेगळ्या केंद्रांवरची नभोनाट्यांची रूपांतरं सादर केली जात.ती तासभर अवधीची असत.
अशा कित्येक नाटकात नायिका म्हणून निलम प्रभू आणि नायक म्हणून श्री बाळ कुरतडकर यांना ऐकणं म्हणजे पर्वणी होती.त्यावेळचे ते स्टार्स होते.
असा एक तारा आता माझ्याबरोबर संवाद वाचणार होता.करूण देव बाईंनी माझ्याकडचं संवादाचं पान घेतलं.चाळलं, म्हणाल्या, “आहो हे काय? यात माझंच भाषण जास्त आहे की!” त्यांचा अप्रतिम आवाज आता मला धडकी भरवायला लागला.मी कसंबसं “नाही-तसं नाही-पुढे” असं सांगायचा प्रयत्न करत होतो.तोंडातून आवाज फुटत नव्हता.इतक्यात दैवी आवाजच शांत, समंजस स्वरात म्हणाला, “नाही हो! आहे की तुमचं पुढे! चला! करूया सुरवात? तालीम करायची की टेक करायचं?” माझी अवस्था पारव्यासारखी झालेली.तोंडातून फक्त हां, हूं, हं शिवाय काही बाहेर पडतंच नव्हतं.आता तालीम काय किंवा प्रत्यक्ष आवाजचाचणी काय, काय ते एकदा होऊन जाऊदे! असा पवित्रा मनाने घेतला.
देव बाईंनी आणि मी तालीम केली.तालीम मीच केली त्या टेक द्यावा त्यापेक्षाही अप्रतिम वाचत होत्या.मला सराव करून जमत नव्हतं ते त्यांनी नुसता संवाद एकदा चाळून सहज जमवलं होतं.
तालीम आणि आवाजचाचणीसाठीचं ध्वनिमुद्रण अर्थात टेक होत असताना असा एखादा क्षण आला की त्यावेळी असं वाटलं हा संवाद संपूच नये!
दोन-तीन टेक झाले आणि चाचणी संपली. “तुम्ही चांगलं वाचलंत हो!” बाई गंभीरपणे म्हणाल्या.माझ्या अंगावरचे काटे गळून मुठभर मांस चढायला लगेच सुरवात झाली.
बर्वेसरांचे आणि देवबाईंचे आभार मानून मी बाहेर पडलो ते तरंगतच.आता आवाजचाचणीचं काय व्हायचं ते होऊदे! आजचा दिस गोड झाला… ही एकच भावना कब्जा करून होती!
असं त्या त्या दिवसापुरतं जगलो तर काय बहार येईल नाही? असं अनेक वेळा वाटतं.
आवाजचाचणी उत्तीर्ण झाल्याचं आकाशवाणीचं पत्र आलं आणि मणिकांचन, दुग्धशर्करा इत्यादी माझ्यासमोर ठाण मांडूनच बसले.
या अनुदिनीचे आभार यासाठी की हा अनुभव पुन्हा जगता आला.कोळी बनून अनेक कोळीष्टकांमधे गुंतलेलं असताना हा पुन:प्रत्ययाचा आनंदसुद्धा मोलाचा वाटतो.

6 comments:

शांतीसुधा (Shantisudha) said...

छान अनुभव कथन. अनुभव अगदी डोळ्यांसमोर उभा राहीला.

साधक said...

पुढे काय झालं? छान अनुभव.

विनायक पंडित said...

शांतीसुधा आणि साधक आपल्या दोघांचेही मन:पूर्वक आभार!

विनायक पंडित said...

साधक! पुढे आणखी लिहिणार आहे! आभार!

Anagha said...

छानच सांगितलात हं अनुभव...
'असं त्या त्या दिवसापुरतं जगलो तर काय बहार येईल नाही? असं अनेक वेळा वाटतं.'
विचारातच पडले मी....असं मला किती वेळा वाटलं? की अजून नाहीच वाटलेलं? :)

मग पुढे काय झालं?

विनायक पंडित said...

:)प्रतिक्रियेबद्दल आभार अनघा! त्या ’दिवसापुरतं जगलो तर काय बहार’ असं वाटतं खरं.ही सुद्धा एक फॅंटसीच असावी पण तिची कल्पना करून खरंच खूप बरं वाटतं:):)