romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, August 31, 2011

’डेस्पेरेडो स्क्वेअर’ अर्थात ’संगम’

आशियाई चित्रपट महोत्सवाबद्दल या आधी लिहिलं ते द सिरियन ब्राईड आणि मुतलुलुक- ब्लिस या चित्रपटांबद्दल.मुंबईत दरवर्षी थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव होत असतो.या वर्षी तो २२ डिसेंबर २०११ ते २९ डिसेंबर २०११ या कालावधीत साजरा होणार आहे.२००५ सालापासून या महोत्सवात बरेच चांगले चित्रपट बघायला मिळाले.यातल्या पटकन‍ आठवणार्‍या आणखी दोन चित्रपटांबद्दल केव्हापासून लिहायचं होतं.राहून गेलं.यातला एक चित्रपट ’डेस्पेरेडो स्क्वेअर’ हा इस्त्रायली चित्रपट! एक भारतीय चित्रपटांचा प्रेक्षक असलेल्या मला हा अतिसुखद धक्का होता.मी हा चित्रपट मस्त एंजॉय केला.
१९६४ साली आलेला राजकपूरचा संगम बहुतेकांनी पाहिला असेलच.तो कुणाला खूप आवडला.कुणाला आवडला नाही.चित्रपटातली गाणी हा राजकपूरच्या चित्रपटांचा मुख्य गुणविशेष! ती गाणीही बहुतेकांना आठवत असतीलच.चित्रपट आवडो न आवडो यातल्या गाण्यांवर अनेकांनी समरसून प्रेम केलंय हे नाकारता येत नाही.
१९६४ साली आलेला संगम हा १९४९ साली आलेल्या मेहेबूब खान या चित्रसम्राटाच्या अंदाज या चित्रपटाचा रिमेक होता.या चित्रपटातली गाणीही अविस्मरणीय होती.राजकपूर, दिलिपकुमार, नर्गीस हे मेहेबूब खान यांना गुरूस्थानी मानत.मेहेबूब खानचा १९५७ साली आलेला मदर इंडिया कोण विसरू शकेल? तो त्यानेच १९४० साली बनवलेल्या औरत या चित्रपटाचा रिमेक होता! आता या रिमेकच्या खेळातून जरा बाहेर पडूया!
’संगम’ किंवा तो ज्यावरून घेतला तो ’अंदाज’ या चित्रपटांची मूळ गोष्टं कुणाची होती माहित आहे? 
’तीन मुले’ ही ती मूळ गोष्टं होती, पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपल्या परमपूज्य साने गुरूजींची!
असो!
’डेस्पेरेडो स्क्वेअर’ ह्या इस्त्रायली चित्रपटाचा विषय असा.
इस्त्रायलमधलं एक जमान्यापासून बंद पडलेलं एक सिनेमागृह.त्या सिनेमागृहाचा मालक मरण पावलाय.त्याला दोन तरूण मुलं.त्यातल्या धाकट्याच्या स्वप्नात बाबा येतात आणि कायमचं बंद पडलेल्या त्या सिनेमागृहाचे पुनरूज्जीवन करा! असा आग्रह धरतात.त्या मुलांचा काका त्यांच्यापासून लांब गेलाय तो ते सिनेमागृह बंद पडल्यापासूनच.त्याच्याही स्वप्नात त्याचा वडीलभाऊ येऊन बंद पडलेल्या सिनेमागृहाचे पुनरूज्जीवन करण्याची गळ घालतो.
मुलं ते कायमचं बंद पडलेलं सिनेमागृह चालू करण्याचा विडा उचलतात.पण पहिला चित्रपट कुठला लावायचा? ते काकाला विचारतात.काका म्हणतो आपण हा प्रश्नं ’इस्त्रायल’ ला विचारू.’इस्त्रायल’ ही नमुनेदार व्यक्ती आहे या कुटुंबाचा जीवलग.तो अफलातून हेअरडू करतो.स्वत:ला राजकपूर समजतो.सतत आपल्या दुचाकीवर राजकपूरच्या सिनेमातली गाणी वाजवतो! तो म्हणतो बंद पडलेल्या चित्रपटगृहाची सुरवात करायची तर ती ’संगम’ याच चित्रपटाने.
इस्त्रायल आणि अरॉन-मुलांचा काका या दोघांनाही मदर इंडिया, संगम या चित्रपटांची स्टार कास्ट, गाणी यांचं अक्षरश: वेड लागलेलं आहे. इस्त्रायल गोपाल, राधा, सुंदर यांची ( तीन मुलांची?) गोष्टं अर्थात पिच्चरची थीम सांगतो.  त्या मुलांसमोर ’दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं गाऊन दाखवतो! काका-अरॉनही त्याला साथ देतो.धाकटा मुलगा मोठ्या भावाला म्हणतो. अरे! हेच संगीत मी माझ्या ’त्या’ स्वप्नात ऐकलं होतं! आता बोला!!
पुढे काय होतं? ते पहाण्यासारखं आहे! चित्रपटाचं कथानक त्या बंद पडलेल्या चित्रपटगृहाच्या पुनरूज्जीवनाबरोबर पुढे सरकू लागतं आणि एक वेगळंच इमोशनल नाट्य उभं रहातं.त्यात गुंतागुंत होते.ती गुंतागुंत संपते की नाही? चित्रपटगृह पुन्हा चालू होतं की नाही? हे बघत आपला जीव वरखाली होत रहातो!...
यूट्यूब वरचा या चित्रपटातल्या महत्वाचा सीन तुम्हा सगळ्यांशी इथे शेअर करतोय! तो बघितल्यावर तो डालो करायचा की नाही? याचा निर्णय तुम्हालाच घेता येईल! काय? :-) 
डाऊनलोड केलात तर मला दुवा- लिंक हो!- द्यायला विसरू नका! तुम्ही माझ्यापेक्षा सहजतेने अशी लिंक शोधू शकता, मला माहिती आहे!
मागच्या पिढीतल्या लोकांजवळ लहानपणी गणेशोत्सवात आपण रस्त्त्यावरच्या पडद्यावर चित्रपट बघत होतो याच्या मनोरंजक आठवणी असतील.काळाचा महिमा अगाध आहे.आज आपण डालो करून हवे ते सिनेमे सहज बघू शकतो! नाही?
      आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!



   
 



Tuesday, August 23, 2011

मुंबई अ, ब ते एफएम गोल्ड, रेनबो.. (२)

भाग १ इथे वाचा!
कालाय तस्मै नम: हे सगळ्यात खरं! नाही का? पर्यायच नव्हता तेव्हा आकाशवाणीला! सगळं जग घरात यायचं.ते घरात पडल्यापडल्या, काम करता करता, ट्रान्झिस्टर हे रेडिओचं लहान भावंड आल्यावर जमेल तिथे नेऊन, ऐकता यायचं.सुटसुटीत, सोपी आणि स्वस्तंच म्हणायला हवी अशी दर्जेदार करमणूक होती ही.आकाशवाणी आपलं कर्तव्य अखंडपणे करत आलेली आहे.माझा मुंबईतल्या केंद्राशी संबंध आला.पण महाराष्ट्रात इतरत्र पुणे, सांगली, नागपूर, जळगाव इत्यादी ठिकाणीही ती कार्यरत राहिली आहे.
दूरदर्शन हे माध्यमच एवढं भव्यदिव्य होतं, व्यापून टाकणारं होतं की जनता आकाशवाणीपासून लांब गेली.नवा पर्याय मिळाला होता आणि तो दिपवून टाकणारा होता.सामान्यत: माणसाला ’बघणं’ या गोष्टीत जास्त रमायला होतं.सगळं विसरायला होतं.क्रिकेट सामने, चित्रपट, रामायण, महाभारत अशा महामालिका काय नव्हतं इथे?
मग वर्तमानपत्रातून आकाशवाणीचं काय होणार? असं अधूनमधून छापून आलं की आकाशवाणीची आठवण होत होती.
माणसाच्या आयुष्याला गती आलेली होती.शहरातलं दैनंदिन आयुष्य आणखी आणखी जिकीरीचं होत होतं.दमून भागून घरी आल्यावर ’इडियट बॉक्स’ हा मोठा आसरा होता.दूरदर्शन रंगीत झालं.दूरदर्शनच्या वाहिन्यांची वाढता वाढता वाढे अशी अक्राळविक्राळ अवस्था झाली.
आता कसली आकाशवाणी आणि काय!...
...एका भल्या दिवशी मग फ्रिक्वन्सी मोड्युलेशन हे तंत्रज्ञान आलं.मोबाईल आले.त्यांच्यात आणखी आणखी सुधारणा चुटकीसारख्या वाटाव्यात अशा पद्धतीने घडून आल्या.एफएम रेडिओ आला.तुमच्या सेलफोनवरच एफएम येऊन ठाण मांडून बसलं.
माणसाची करमणुकीची गरज वाढत जाते.अनिश्चितता, असुरक्षितता त्याला सतत कुठल्या न कुठल्या आधाराशी बांधून ठेवायला लागतात.करमणुकीची साधनं, धार्मिक उत्सव, चित्रपट, पार्ट्या सगळंच वाढता वाढता वाढत जातं.रिकामा वेळ मिळाला की माणूस अस्वस्थ होतो, विशेषत: शहरातला.त्याला सतत व्यवधान लागतं.सेलफोनवर आलेल्या एफएमनं ’प्रवास’ ही नोकरीधंद्यासाठी अपरिहार्य असलेली, लांबलचक आणि त्रासदायक करून ठेवली गेलेली गोष्टं चांगलीच सुसह्य केली हे मान्य करायलाच पाहिजे.जिकडे तिकडे कानात ईअरपीस खोचलेली, वेड्यासारखे वाटावेत असे हातवारे करत संगीत ऐकणारी आणि मनोरूग्णासारखे वाटावेत असे हावभाव करत तासन्तास एकमेकाशी चॅट करणारी जमात तयार झाली. ’वॉकमन’ या आधीच्या भावंडाचं हे नवं रूप होतं.सगळी तरूण पिढी याला बळी पडली आहे असं म्हणत हळूहळू इतर सगळेच याला बळी पडू लागले आहेत.काय खरं ना?
’मोबाईलवरचं एफएम मोठ्या आवाजात लाऊन ठेऊन सहप्रवाशांना त्रास देऊ नका!’ अशा उद्घोषणा रेल्वेस्थानकांवरून आता होऊ लागल्या आहेत.एफएम धारकांना प्रवासात भल्या पहाटेसुद्धा मोठ्याने, ईअरपीस न वापरता गाणी ऐकण्याची अनावर हुक्की येते आणि मग भांडणाला तोंड फुटतं.
या सगळ्यातून जात असताना माझीही एफएमची ओळख झाली.एफएमचेही ढीगभर चॅनेल्स आहेत.त्यातले बहुतेक तरूणाईसाठीच आहेत.ज्यात ते रेडिओ जॉकी आवाजाच्या वारूवर मांड ठोकून तुमच्याशी काय वाट्टेल ते तासन्तास बोलू शकतात.रेडिओ जॉकी होण्यासाठी अगदी वरच्या पट्टीत (बेंबीच्या देठापासून, कोकलून, कानठळ्या बसतील असं; हे योग्य मराठी शब्दं!) बोलणं ही प्राथमिक अट असावी.हे जॉकीज् तुम्हाला फोन, एसेमेस करायला सांगतात.बक्षिसं देतात.ही एक संस्कृती म्हणावी इतका त्याचा पसारा झालाय.प्रदर्शित झालेल्या नव्या चित्रपटाबद्दलचं रेडिओजॉकीचं मत निर्माते जाहिरातीसाठी वापरताहेत.जोडीला तुम्हाला क्रिकेट सामन्याच्या स्कोअर सांगतात.तुमच्या दिलातली भडास तेच ओकून टाकतात आणि तुम्हाला आपलेसे करतात.शहरातल्या ट्रॅफिकची अमुक क्षणाला काय परिस्थिती आहे (ती नेहेमीच वाईट असते पण ती किती वाईट आहे हे क्षणाक्षणाला कळलं तर! तर काय वाईट?) ही महत्वाची गोष्टंही सांगतात.ब्रेकिंग न्यूज सांगितल्या जातात.रेडिओ जॉकी दादा आणि ताई तुमच्यातलेच एक होऊन गेले आहेत! तुम्हाला त्याना फॉलो करण्याशिवाय गत्त्यंतरच उरत नाही.उरतं का सांगा? एकूण रेडिओ जॉकी बंधूभगिनींचा दणदणाट आणि संगीताचा ढणढणाट याला पर्याय नाही.
मी आपला ’आपली वाणी आपला बाणा’ करत मर्‍हाटी एफएमकडे वळलो आणि पुन्हा ’आकाशवाणी’ ला सामोरा गेलो! वर्तुळ असं पूर्ण होतं तर!
आकाशवाणीच्या एफएम रेनबो आणि एफ एम गोल्ड अशा दोन वाहिन्यांवरून मराठी गाणी आणि मराठी प्रायोजित कार्यक्रम सादर होतात.
याशिवाय आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी आणि संवादिता वाहिनी अशा दोन वाहिन्या चालू आहेत.ती जुन्या मुंबई ब आणि मुंबई अ ची रूपं आहेत.पूर्वी इतक्या जोमानेच ती चालू आहेत.अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ आहे, गंमत जंमत आहे, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आहेत, पर्यावरणावर कार्यक्रम आहे, युवोवाणी आहे.संवादिता वाहिनीवर हिंदी नाटकं सादर होतात.चित्रपटसंगीत तर प्रसारित होतंच.विविध भारतीही त्याच जोमाने चालू आहे.अस्मिता वाहिनीवर कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या ’महानायक’चं अभिवाचन सादर झालं होतं.ते आणि इतर अशाच साहित्यांची नाट्यपूर्ण वाचनं नुसती सादरंच होत नाहीत तर ती लोकाग्रहास्तव पुन्हा पुन्हा प्रक्षेपित होत असतात.सर्वसाधारणपणे अभिजनांसाठी (क्लासेस) असं यांचं स्वरूप कायम आहे!
आकाशवाणीचे रेनबो आणि गोल्ड हे एफएम चॅनेल्स महाराष्ट्रभर सर्वत्र ऐकू येतात.त्यांचं स्वरूप सर्वसाधारणपणे जनतेसाठी (मासेस) असल्याचं दिसतं.
सगळीच माध्यमं आजकाल जास्तीत जास्तं जनताभिमुख झालेली दिसतात.यात खरोखर जनताभिमुख आणि जनतेला आवडतं म्हणून काहीही फंडे काढून जनतेला त्या फंड्यांच्या मागे धावायला लावणं असे दोन्ही प्रवाह आढळत असतात.
एफएम रेनबोवर पहाटे मंगल प्रभातच्या धरतीवर भक्तिसंगीत, मग भावगीतं, सिनेसंगीत असं सगळं आठ वाजेपर्यंत.आठ वाजता काटा अचानक इंग्रजी संगीताकडे वळतो आणि मग अकरा, एक, दोन वाजता तो पुन्हा हिंदी आणि मुख्यत: मराठी या भारतीय भाषांकडे येतो.
एफएम गोल्ड सकाळी सव्वासहाला सुरू होतो हिंदी भक्तिसंगीताने.त्यानंतर हिंदी चित्रपटसंगीत, बातम्यांचा भला मोठा कार्यक्रम.मग साडेआठ वाजल्यापासून खास कार्यालयांकडे प्रस्थान करणारय़ांसाठी दहा वाजेपर्यंत हिदी चित्रपट संगीत सादर होतं.दोन कार्यक्रमांमधे.या कार्यक्रमांच्या स्वरूपात वैविध्य आहे.फोन संपर्क आहे, एसेमेसचा मजा आहे.मग बातम्या.दहा वाजता ’मराठी’ गोल्डचा कब्जा घेतं.दहा वाजून दहा मिनिटं, अकरा, बारा, एक, दोन वाजता असे मराठी आणि मग हिंदी, काही प्रमाणात इंग्रजी असे कार्यक्रम ’बारीबारीसे’ सादर होत असतात.१० वाजताच्या मराठी गप्पाटप्पांच्या कार्यक्रमात करिअर या विषयावर चालू असलेल्या मान्यवर तज्ज्ञाच्या मुलाखती दखल घेण्यासारख्या आहेत.उद्योजकता, चित्रपट, सण इत्यादी विषयांवर मान्यवरांच्या मुलाखती इथे सादर होतात.त्याशिवाय दोन गाण्यांच्यामधे निवेदक एखाद्या विषयावर किंवा वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर; गंभीर, खुसखुशीत भाष्य करत असतात, माहिती देत असतात.
एफएमवरच्या निवेदकाला त्याच्या बोलण्यातूनही श्रोत्यांचं मनोरंजन करणं अभिप्रेत असतं.एरवी ऑल इंडिया रेडिओच्या नेहेमीच्या चॅनल्सवरचे निवेदक निवेदन करत असताना कायम धीरगंभीर असत आणि असतात.काही निवेदक तर कृत्रिम कमावलेल्या शैलीत बोलणारे असतात.एफएमवर निवेदकानं मोकळं ढाकळं असणं अपेक्षित आहे.मोकळं ढाकळं म्हणजे उंडारणं का, हा ज्या त्या निवेदकाच्या आणि श्रोत्याच्या आवडीनिवडीचा मामला.
एफएम हे एक प्रकारे त्या त्या भाषेचं प्रतिनिधित्व करत असतं.मगाशी म्हटल्याप्रमाणे एफएम हा त्या त्या संस्कृतीचा एक वर्तमानातला पडसाद आहे.बोलीभाषेत बदल होत असतात.प्रमाणभाषेत बोलायचं की वर्तमान बोलीभाषेत हा मुद्दा इतर एफएम चॅनल्सनी ढणढणाटी स्वरूपात सोडवून टाकलाय.आकाशवाणी एफएमनं मोकळंढाकळं होत जुनं स्वरूपच कायम ठेवल्याचं दिसतं.
प्रत्येक निवेदक आपापल्या व्यक्तिमत्वासकट इअरपीसमधून प्रथम आपल्या कानात आणि मग जमेल तसं आपल्या मनात डोकावत असतो, प्रवेश करत असतो.आकाशवाणी मराठी एफएम चॅनल्स- गोल्ड आणि रेनबोवर अशी वेगवेगळी व्यक्तिमत्वं वास करून आहेत.ती आपलं पूरेपूर रंजन आणि उदबोधन करत असतात.
एफएम तंत्रज्ञानानं आकाशवाणीला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणलंय! तुमचं मत काय आहे?
माझे आणि आकाशवाणीचे बंध: जुन्या नोंदींचे दुवे, पुढीलप्रमाणे:
आकाशवाणीची ओळख
आकाशवाणीवरचं पहिलं ध्वनिमुद्रण
श्रुतिकांसाठी आवाजचाचणी
अस्मिता वाहिनीवर ’माझ्या आजोळच्या गोष्टी’
अस्मिता वाहिनीवर ’माझ्या कविता’

Saturday, August 20, 2011

मुंबई अ, ब ते एफएम गोल्ड, रेनबो.. (१)

एखाद्या इतिहासजमा झालेल्या गोष्टीला पुन्हा झळाळी येते ती आधुनिक तंत्रज्ञानामुळे! आणि याचं ठळक उदाहरण म्हणजे आकाशवाणी अर्थात रेडिओ! पुन्हा आलेल्या झळाळीचा दर्जा कसा, काय वगैरे हे ज्याचं त्यानं ठरवायचं.एखादी लयाला गेलेली गोष्ट नवं रूप घेऊन येते.तिचं आधीचं आणि आत्ताचं रूप यांची तुलना करू नये हेच खरं!
रेडिओ या वस्तूची ओळख लहानपणी झालेली आठवते.फिलिप्सचा छोटा काळी कॅबिनेट असलेला आणि चेहेरा गोरा पान असलेला रेडिओ घरी आला.चेहेराच.दोन बाजूला डोळे असल्यासारखी दोन गोल बटणं.एक स्टेशन्स शोधून लावण्याचं आणि दुसरं आवाज कमी जास्त करण्याचं.गोल निमपांढरय़ा बटणांच्या वरचा पृष्ठभाग काळा, म्हणून डोळे.त्या दोन बटणांच्या मधोमध लहरींची बटणं.लघुलहरी SW, मध्यम लहरी MW इत्यादी.त्यातलं मध्यमलहरींचं बटण दाबलेलंच असायचं.ही बटणं दातांसारखी दिसायची.मधला एक दात पडलेला.हा चेहेरा जेव्हा पहिल्यांदा बोलताना ऐकला तेव्हा ज्याम मजा आली.चाळीतले आजुबाजूचेही आलेले आठवतात.रेडिओ बघायला.छोट्याश्या कौलारू चाळीतल्या एका खोलीत.उभ्या जाडजूड माणसाचं रंगीत चित्रं असलेल्या फिलिप्स कंपनीच्या खोक्यावर ठेऊन त्या तंत्रज्ञानं रेडिओ कसा चालवायचा हे दाखवलं होतं.
हा रेडिओ घेतला असावा वडिलांनी मुख्यत: नाट्यसंगीत आणि त्याहीपेक्षा बातम्या ऐकण्यासाठी.आज अजूनही दूरदर्शनवरच्या सातच्या बातम्याच ते ऐकतात.रेडिओवरची जुनी सवय असल्यामुळे.जणू त्या व्यतिरिक्त वेळच्या बातम्या खरय़ा नसतातच. (आजच्या न्यूजचॅनल्सच्या युगात त्यांचं खरं असावं असं पदोपदी जाणवतं खरं!) मग बातम्या ऐकताना त्या छोट्याश्या घरात आवाज मोठा करून हाताचा पंजा उगारून (म्हणजे गप्पं बसा अशी खूण करून) मुलांना, बायकोला गप्पं बसण्याची शिक्षा. (आता ऐकू कमी येतं म्हणून मागील पानावरून पुढे चालूच!) मुंबई ब वरचे आणि दिल्ली केंद्रावरचे शरद चव्हाण, दत्ता कुलकर्णी, सदाशिव दीक्षित, कुसुम रानडे इत्यादी म्हणजे हॉट फेवरिट! जणू हे स्वत:च वाचताएत त्या बातम्या अश्या कौतुकानं हसणं.नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत ह्या संदर्भात ते कानसेनच पण आवाज मोठा करून ऐकण्याची वाईट खोड. (आता ती मुलीला लागलीए.एमटिव्ही रॉक्स का फॉक्स दणदणीत असतानाही ती आवाज आणखी मोठा करतेच करते.आम्ही आमच्या वयात विविधभारती आणि रेडिओ सिलोनचा आवाज मोठा करून आईला वात आणत असू.चालायचंच, नाही?) नाट्यसंगीत ऐकताना वरचे खालचे दात दाबून धरायचे आणि त्यातून निघणारय़ा आवाजात गुणगुणणं.आजही ते चालूच.खरय़ा दाताच्या जागी कवळी आल्यामुळे आवाजाच्या टिंबरमधे फक्त फरक.छोटा गंधर्व (चाल्द मांयझा घा घासरा : चांद माझा हा हासरा), भालचंद्र पेंढारकर (आयी तुझी आठवड येय्यत्ये: आई तुझी आठवण येते, शिवशक्तीचा अटीतटीचा ख्येळ चालला भुबदपटी त्रिगुडाच्ये ह्ये तीदच फासे दिशादिशातूल लिदादती!, शक्कर शक्कर गऊरी शक्कर!), उदयराज गोडबोले (द्येऽऽह द्येवाच्येऽऽ मऽलऽदीऽऽरऽऽ) इत्यादी.हे सांगताना ह्या दिग्गजांची टिंगल अजिबात उडवायची नाही पण सकृतदर्शनी कानावर येणारे त्यांचे स्वर ऐकून आम्हाला तोंड लपवायला लागायचं.मग पुढे कुमार गंधर्वांच्या ’कधी धुसफुसलोऽ’लाही हुकमी हसू फुटायचं.हसू फुटणं हे काही नवलाचं नव्हतं कधीच.. इथे वडिलांचं रेडिओ ऐकणं जवळ जवळ संपायचं.
वडिलांचं रेडिओ ऐकणं संपलेलं असलं तर आणि तरच आईचं रेडिओ ऐकणं सुरू व्हायचं! (आमचं रेडिओ ऐकणं अजून सुरू व्हायचं होतं) आई मंगलप्रभात लावायची आणि आमच्या शाळांची तयारी करण्यात मग्नं असायची.ते लागलं की तिला आधी कोपरय़ावरचं कार्डावरचं दूध घेऊन यायला लागायचं.मग एकसोएक मराठी भक्तिगीतं: पंढरीनाथा झडकरी आता.., बोऽऽलाऽऽ बोला बोऽऽलाऽऽ अमृत बोलाऽऽ.., रघुपती राघव गजरी गजरी.., वारियाने कुंडलं हाऽऽलेऽ.., रात्रं काळी बिलवर काळी गळा मुखे.. (पुढची चाल आठवते.शब्दं सांगाल का प्लीऽऽजऽऽ), कुमुदिनी काय जाणे, परिमळ.. काय गाणी होती राव! चुकलो! आहेत राव! अजरामर गाणी! प्रचंड ठेवा आहे हा! सुवर्णयुग सुवर्णयुग म्हणतात ते हेच! अगदी ते प्रचंड ओलावा आणि मार्दव असलेले (!) आर एन् पराडकरही आठवतात.धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची.झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची! पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशीऽ.. सगळी गाणी गायले ती फक्तं दत्तगुरूंची! हिरे, माणकं, सोनं, नाणी- नाही हे भक्तिगीत नव्हे कुठलं तर- माणिक वर्मा, लता, आशा, उषा, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, भीमसेन जोशी, रतिलाल भावसार हे आणि असे इतर अनेक.. किती नावं घ्यायची? हे केवळ तेव्हा इतकं छान होतं आणि आत्ता तसं नाही असं नाही! ते होतंच तसं! कालानुरूप असेल, परिस्थितीनुरूप असेल.. रत्नं होती एकेक! गायक, गायिका आणि संगीतकार.. सुमन कल्याणपूरांची दशरथ पुजारींनी केलेली गाणी काय अप्रतिम आहेत! किती बोलावं आणि किती सांगावं.. माझ्यापेक्षा तुमच्यातले इतर अनेक जाणकार जास्तं चांगलं सांगतील! मी आपली एक एक कळ चालू करून देतो झालं!
मग भावसरगम! अरूण दाते, सुधीर फडके, हृदयनाथ.. यशवंत देव, श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी.. मंगेश पाडगावकर, शांता शेळके.. या फुलांच्या गंधकोषी.., भेट तुझी माझी स्मरते.., ही वाट दूर जाते.., तोच चंद्रमा नभात.., अशी पाखरे येती.., वेगवेगळी फुले उमलली.. विसर प्रीत विसर गीत.. किती किती सांगू- नव्हे हे ही भावगीत नव्हे! माझी सद्य मनस्थिती! तुम्हाला हसू येईल पण ’सामना’ मधल्या मास्तर सारखं “सांगा राव सांगाऽ सांगाऽ” असं डॉ.लागूंच्या त्या विशिष्ट शैलीत मला तुम्हाला सांगावसं वाटतयं! “कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय?” मुंबई ब वरच्या त्या सुवर्णयुगाखाली दडलंय काय?
नाट्यसंगीतातला जितेंद्र अभिषेकींनी सुरू केलेला नवा अध्याय आठवतो.रामदास कामत, प्रभाकर कारेकर, प्रकाश घांग्रेकर, शरद जांभेकर, विश्वनाथ बागूल, बकुल पंडित, फैयाज, आशालता वाबगावकर आणि द ग्रेट पं.वसंतराव देशपांडे. ’बगळ्यांची माळ फुले’ आणि “कुणी जाल का? सांगाल का? ”कुमारांचं ’अजुनी रूसूनी आहे’.. हेऽऽ हेऽऽ हेऽऽ शामसुंदराऽ राजसाऽ मनमोहनाऽ विनवूनीऽऽऽ सांगते तुज.. शूरा मी वंदिले.. चांदणे शिंपित जाशी.. सांगा! सांगा! लोकहो सांगा! लवकर सांगा नाहीतर लताचं हे राहिलं आणि सुमनचं ते राहिलं म्हणाल! कृष्णा कल्ले आणि डॉ.अपर्णा मयेकरांना घेतलंच नाही म्हणाल! म्हणा! जरूर म्हणा! आहेच ते सुवर्णयुग!
मग वनिता मंडळ, आपलं माजघर.. दर रविवारी मुलांसाठी गंमत जंमत, बालदरबार.. शाळा नववीपर्यंत सकाळची आणि दहावीला नेमकी दुपारची.रेडिओनं सांगितलेली वेळ म्हणजे प्रमाणवेळ! मग बाजारभावही ऐकायचो.. पाचोरा भूमरी अमुक अमुक क्विंटल असे.. तांदळाच्या, कापसाच्या, भुईमूग या सगळ्यांचे बरेचसे तालबद्ध उच्चार असणारे बाजारभाव आपोआप तोंडात बसायचे.सकाळी अकरा वाजता कामगारसभेतली गाणी आणि शनिवारी लोकसंगीताची मेजवानी! शाहीर साबळे, शाहीर निवृत्ती पवार, शाहीर विठ्ठल उमप, श्रावण यशवंते (यो यो यो पाव्हना, सकुचा म्हेवना, तुज्याकडं बगून हस्तोय गं, कायतरी घोटाळा दिस्तोय गं!) बालकराम वरळीकर.. कामगारांची ज्याम वट होती आकाशवाणी मुंबई ब वर.संध्याकाळी साडेसहा ते सातही असायचा.(आज शरद राव कामगारांची वट सामान्यांना त्रास दे देऊन वाढवताएत.जॉर्ज फर्नांडिसरूपी ’चक्का ज्याम’ यांचे ते पट्टशिष्य!) संध्याकाळच्या कामगारसभेत ’सहज सुचलं म्हणून’ ही उद्बोधन करणारी श्रुतिकामालिका, किर्तनं, लोकसंगीत.. दुपारी वनिता मंडळात लीलावती भागवत.. रात्री कृतानेक नमस्कार हा पत्रोत्तरांचा कार्यक्रमही मनोरंजक कार्यक्रमासारखा कान देऊन ऐकला जायचा.प्रपंच, पुन्हा प्रपंच आणि नंतर आंबटगोड.. आकाशवाणीनं वैविध्य दिलं, आपला दर्जा सतत टिकवून ठेवला हे मान्य करायलाच पाहिजे.सगळ्यावर कळस म्हणजे आपली आवड, नभोनाट्यांचां राष्ट्रीय कार्यक्रम, शास्त्रीय संगीताची राष्ट्रीय संगीत सभा.. दिग्गज गायक आकाशवाणीवर गायचं म्हणजे आपला बहुमान समजायचे.नुसतं कंठसंगीत नव्हे, वाद्यसंगीतही.. सगळ्या कार्यक्रमांच्या ओळखधून (सिग्नेचर ट्यून्स?) आजही लक्षात आहेत.आपली आवडची.. युवोवाणीची.. कामगारसभेची.. वनिता मंडळाची.. हे गंमत! जय गंमत! या या या झिन च्याक झिन! झिन च्याक् झिन च्याक् झिन!- आठवतंय का गंमंत जंमत कार्यकर्माचं टायटल सॉंग? साहित्यसौरभ, भाषणं.. एक सद्य घडामोडींवर आधारित स्पॉटलाईट का अश्याच काही नावाचा कार्यक्रम होता.निवेदक कोर्टातल्या वकीलासारखा तुमच्यावर चार्ज करायचा.आठवतंय?
दहावीला असताना म्हणजे शिंग फुटतात त्या वयात आम्हाला विविध भारतीचा शोध लागला.मग शाळेत जायची प्रमाणवेळ कळण्याच्या बहाण्याने हिंदी गाण्यांचा महामूर महापूर.. अभ्यासातलं लक्ष उडालंय म्हणून शिव्या.. या आधी आणि या काळातच रेडिओ सिलोनवरचा हिंदी गाणी सुरू व्हायच्या आधीची ऐकू येणारी ’नागिन’ ची ती सुप्रसिद्धं बीन! रेडिओ सिलोनचा आवाज हवेत हेलकावे खात यायचा.ती बीन तशीच आठवते व्हॉल्यूम कमी जास्त होत लाटालाटांनी कानावर येणारी! ’बिनाका गीत माला’ म्हणजे काय? असं विचारणारा निर्बुद्धं! मूर्खं! स्टुलावर चढून वर लाकडी शेल्फवर ठेवलेल्या रेडिओला कान लाऊन जर पहिली बादान (पायदान?) दुसरी बादान.. अऊर सुननेवालोंऽऽ हां हां हांऽऽ हां! आखरी पायदानपर आज है- कौनसा गीत? हं हं हं हं.. द ग्रेट ’अमीन सायानी’ ला पर्याय होता? हो मनोहर महाजनचा होता काही काळ.पण अमीन सायानी तो अमीन सायानी! आणि सिलोन- नंतर श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनका विदेश व्यापार विभागलाही नव्हता! इकडे विविधभारती आणि मधेच कुठेतरी ऑल इंडिया रेडिओकी उर्दू सर्विस होती, मुंबई अ वर- आठवतंय का?- तरीही!!! ते काय गौडबंगाल होतं हो? विविधभारतीवरचं गाणं संपलं रे संपलं की बॅंडचा लाल काटा फिरवून उर्दू सर्विसवर आणायचा.तिथे तेच गाणं लागलेलं असायचं! असं कुणी सांगितलं म्हणून एकदोनदा प्रयत्नपूर्वक ऐकल्याचं आठवतं.खरंच होतं का हो असं? की आम्हालाच नेहेमीप्रमाणे कुणी कुणी ×× बनवलं! नेहेमीप्रमाणे!
इतक्या तन्मयतेनं अभ्यास केलात तर काहीतरी पदरात तरी पडेल अश्या शिव्या खात आम्ही आकाशवाणीवर कब्जा करू लागलो होतो.एका बाजूला फौजी भाईयों के लिए ऐकण्यासाठी कामगारसभेवर अन्याय करू लागलो.हवामहल ऐकू लागलो.बेला के फूलपर्यंत मजल गेली की शिव्यांमधला जोर वाढायचा मग आपल्या विद्यार्थीदशेची कीव यायची.दुसरीकडे रेडिओवरच्या प्रायोजित कार्यक्रमांचं युग सुरू झालं. ’कोहिनूर मिल’ ही प्रतिथयश कंपनी आहे म्हणून वडिलांनी पहिल्यांदा ’कोहिनूरऽऽ गीऽऽत..गुंजारऽऽ’ लावला होता.विनोद शर्माचा तो अनुनासिक खर्जातला विशिष्टं आवाज! ’दम मारोऽऽ दम’ पहिल्यांदा इथे ऐकलं.त्यानंतर की आधी? ’बिन्नी डबल ऑर क्विट’ असायचं.फारूख शेख तेव्हा अभिनेता झालेला नव्हता.त्याचा आवाज आणि बोलण्याची पद्धत ऐकून प्रचंड भारावल्याचं आठवतं.दर्जा म्हणजे काय, हे आपोआप अंगात भिनत जाणारा एकंदरीत तो काळच असावा.दर्जा शोधावा लागत नव्हता. ’बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्ट’ अखंड चालत आलेलाच आहे. ’क्रिकेट वुईथ विजय मर्चंट’ मधे त्याचं शेवटचं ’अरूवा’ ऐकण्यासाठी कायम शेवटपर्यंत ऐकायचं.केवळ अरूवाच नव्हे पण त्याच्या या कार्यक्रमातून होणारय़ा कॉमेंट्सला चांगलंच महत्वं होतं.ठाकरसी ग्रुप ऑफ मिल्स ही त्याची घरचीच कंपनी.पण त्याचा उपयोग इतका चांगला होत होता.तो मधेच कार्यक्रम बंद करायचा मग तो चालू रहाण्यासाठी क्रिडारसिक आर्जवं करायचे.ती मागणी मग मान्य व्हायची.
हिंदी चित्रपटांचे प्रायोजित कार्यक्रम सुरू झाले आणि आमच्या त्या वेळच्या भाषेत ’थैया’ च झाला! मला देव आनंदच्या ’वॉरंट’, मनोजकुमारच्या ’संन्यासी’ चे प्रायोजित कार्यक्रम आठवतात.रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ’शोले’ नावाच्या जीपी सिप्पी अऊर रमेश सिप्पीका अजिमुश्शान शाहाकार भेटायचा! त्याची ख्याती काय सांगू? तिच नेमकी अभ्यासाची वेळ असायची.पत्र्याच्या स्कूलबॅग्ज असायच्या.आपटून, आपापसात युद्ध खेळून पोचे आणलेल्या आणि उघडता, बंद करताना करकरणारय़ा.सगळे आवाज बंद करून, पालकांची झोप मोडू नये आणि शोले सुटू नये म्हणून ज्याम काळजी घ्यावी लागायची.अफलातून डायलॉग्ज आणि केकवर चेरी म्हणजे हं हं हं हं- हो! तोच तो! अमीऽऽन सायाऽऽनीऽऽ..
विविधभारतीवरच्या जाहिराती म्हणजे स्वतंत्र विषय आहे! टींग डॉंग्! आणि टीऽडीऽटीडीऽ टीडीऽ टॅंग! असं दोन जाहिरातींमधलं संगीत! सॉरीडॉन, हमाम, सोना सोना नया रेक्सोना, आई गं! वैतागले या केसांना! (करूणा देवांची डबल आवाजातली जाहिरात) अमीन सायानी परमेश्वरासारखा सर्वत्र व्यापून उरत असेच.चल संन्यासीऽऽ हा गाण्याच्या मुखडा कट व्हायचा आणी अमीन सायानी ’किधर?” अश्या त्याच्या त्या कमावलेल्या आवाजात विचारायचा.मग मंदिरमेऽऽ इत्यादी.जोडीला ते अजिमुश्शान शाहाकार वगैरे असायचंच! प्रॉडक्शन्सची नावंसुद्धा त्याच्यामुळे कळायची.जीपी सिप्पी-रमेश सिप्पी, मुशीर रियाज पॉडक्शन, सुलतान एहमद का धरमकांटां.. मग कारण नसताना खोजाती सूरमा पण आठवतो त्याच्या आवाजातला.अनेक वाकळं वळणं, हुंकार, हसणं देऊन कमावलेलं ग्लॅमर असलेला आवाज.जरा जास्तंच ग्लॅमरस होतंय असं वाटूनही मंत्रमुग्ध करणारा!
चांगल चाललं होतं हो! पण मग सगळं हळूहळू विरत गेलं.. नाट्यमय श्रुतिकेतलं शेवटचं संगीत विरत जाऊन एक मोठ्ठा पॉज आला.. रेडिओचं डोळे फिरवून टाकणारं भावंडं दूरदर्शन आलं होतं.. टेलिविजन.. तरीही क्रिकेटमॅच बघताना लोक टीव्हीचा व्हॉल्यूम कमी करून रेडिओवरचं धावतं वर्णन लावत होते..
कोपरय़ात पडलेल्या आकाशवाणीला कुण्णीकुण्णी विचारत नव्हतं, नसावं.. अजूनही आठवण झाली की भावनाविवश होणारे आमच्यासारखे अनेक श्रोतेही दूरदर्शनच्या महापूरात वहात गेले, बहकत गेले..
कर्तबगार कुटुंबप्रमुख वृद्धं झाल्यावर वळचणीला खोचला जावा तसं काहीसं..

Friday, August 19, 2011

राज्य (९)

भाग ८ इथे वाचा!
धडधाकट, कळकट काळा, मध्यमवयीन माणूस आत येतो.ढगळ पॅंट, बाहेर काढलेला भलत्याच रंगाचा स्वस्तातला पारदर्शक शर्ट, बारीक केस, लांब शेंडी, तोंडात पान, हातात चेन लाऊन बंद केलेली फाईल.
“आओ!”
आई आणि राजू त्या नवागताकडे बघत राहिलेत.
गुंडू कॉटकडे निर्देश करून त्याला बसायला सांगतो.स्वत: त्याच्या बाजूला कॉटवर बसतो.आई आणि राजूनं आ वासलाय.गुंडू नवागताच्या मांडीवर थाप मारून हसतोय.
“आप बैठो.. आरामसे.. ह ह ह.. आईऽ दूध गरम कर आणि आण!”
आई तशीच उभी.
“हेऽ एजंट आहेत माझ्या ऑफिसचे!”
आई आत निघून जाते.
“राजूऽ”
राजू आज्ञाधारकपणे उठून जवळ येतो.
“ये छोटा भाई! अच्छा छोकरा है! पढता है!”
राजू एजंटला वाकून नमस्कार करतो.
“ऑरे! ऑरे!”
तोंडातल्या पानाच्या तोबरय़ामुळे एजंटला बोलता येत नाही.खिडकीबाहेर थुंकू का? म्हणून खुणेने गुंडूला विचारतो.उठून पिचकारी टाकतो.मग राजूला हातानेच आशिर्वाद देतो.पान चघळणं चालूच.गार्गी नटून थटून बाहेर आलीय.
“येऽ छोटी बहन!”
तिला बघताच बसलेला एजंट टाणकन् उभा रहातो.गार्गी पटकन् नजर काढून घेते.एजंट हसत, मान डोलावत परत बसतो, तिच्याकडे बघतच.
“गार्गी, हे एजंट आहेत माझ्या ऑफिसचे!”
गार्गीनं खोटखोटं हसायला सुरवात केलीय.
“ह ह गुंडूभाऊ घाईत आहे रे जरा! लग्नाला जातेय मैत्रिणीच्या-”
एजंट तिच्याकडे सारखा वाकून बघतोय त्याच्याकडे लक्षं जातं आणि तिचं तोंड वाकडं होतं.
“ऍंऽऽ.. येऊ मग भाऊ?”
“ये! ये! स्टेशनवर घ्यायला येऊ? उशीर होईल?”
“नाही रे! ठीकय! येईन मी! रहदारी असते! येते!”
गार्गी निघून जातेय.तिच्याकडेच बघत असलेल्या एजंटचा जास्त वाकावं लागल्यामुळे तोल जातो.गुंडू त्याला सावरतो.आई दुधाचा पेला घेऊन येते.एजंट हाताने ’थांबा’ म्हणून सांगतो.खिडकीतून पान पूर्णपणे थुंकतो.हसत पेला स्विकारतो.पितो.आई रिकामा पेला घेऊन तंद्रीत स्वैपाकघरात निघून गेलीय.
“राजूऽऽ बाळाऽ जरा उठशील तिथून?”
“भाऊ मी.. माझी पुस्तकं..
“सगळं उचल आणि जरा बाहेर पॅसेजमधे जाऊन बस!”
“बाहेर? भाऊ.. सगळी घाण आहे रे तिथे कॉमन पॅसेजमधे! आत्ता सगळे पाणी भरत असतील! सगळ्यांची येजा-”
“राजूऽ माझं ऐक! याना इथे झोपायचंय! आपले पाहुणे आहेत ते, जरा सतरंजी अंथर आणि तूऽ”
राजू गपचूप उठतो.पुस्तकं आवरतो.सतरंजी अंथरतो.पुस्तकं ओझ्याच्या पाटीसारखी डोक्यावर घेऊन हळू हळू, मागे पहात चालू पडतो.
“आप सो जाओ बिनधास्त!”
एजंट पडत्या फळाची आज्ञा मानून आहे तसाच जाऊन पसरतो आणि आई बाहेर येते.
“अरे गुंडू जेवायचं- अग्गंबाईऽऽ ह्याना काय चक्कर बिक्कर आली का काय?”
“आम्ही जेऊन आलोय आई-”
“जेऊनच नं?”
“होऽऽ.. ते झोपलेत!”
“राजू कुठे गेला रे इतक्यात? म्येला नेमका गिळायच्या वेळेला-”
“आहे! बाहेर बसवलाय त्याला-”
“बाहेर? पॅसेजमधे? अरेऽ–”
“जरा आवाज हळू! झोपलेत ते, त्याना झोपू दे!”
“अरे पण राजूला जेवाय-”
“आम्ही जेऊन आलोय, झोपू दे त्याना स्वस्थं!”
आई गुंडूकडे बघत रहाते.मग झोपलेल्या एजंटकडे पहाते.बाहेरच्या दाराकडे पहात पुढे जाण्याच्या विचारात आहे.
“आई तू जेऊन घे जा!”
आईची चलबिचल.ती बाहेरच्या दरवाज्याकडे नुसतीच पहात पाय ओढत स्वैपाकघराकडे निघून जाते.एव्हाना एजंटच्या घोरण्याचा आवाज आसमंतात घुमू लागलाय..

Thursday, August 18, 2011

आरक्षण: माझ्या मनात उमटलेलं...

प्रकाश झा, राकेश ओमप्रकाश मेहेरा, विशाल भारद्वाज, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळी... असे महत्वाचे मोहरे आज भारतीय चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत ही एक चांगली गोष्टं घडतेय हे नक्की! कोणी कधी अधिक कधी उणं! तरीही त्यांच्या क्षमतेबद्दल शंका घ्यायला फारशी जागा नाही!
कमीने ही माझी आधीची एक पोस्ट! विशालला यात नक्की काय करायचं होतं असा प्रश्नं मला पडला खरा! नंतरचा ’सात खून माफ’ बघायचा योग आला नाही.
’मृत्यूदंड’ हा मी बघितलेला प्रकाश झाचा पहिला चित्रपट.माझ्या आठवणीप्रमाणे त्याचा ’दामूल’ हा समांतर धारेतला सिनेमा त्या आधी आला होता.तो बघायचा राहून गेला होता.
’मृत्यूदंड’ पासून प्रकाश झानं व्यावसायिकतेशी नातं जोडलं, अर्थात स्वत:ची वैशिष्ट्य कायम ठेऊन.चांगल्या गणल्या जाणारय़ा दिग्दर्शकांच्या चित्रपटात जाणवणारी महत्वाची गोष्टं म्हणजे त्या चित्रपटाची रचना.ही रचना मृत्यूदंडमधे दिसली.मृत्यूदंड, गंगाजल, अपहरण, राजनीती.. यात बिहारी रक्तरंजितताही जाणवली.गंगाजलमधे तर उत्तर भारतातल्या एका कारागृहातल्या कैद्यांचे डोळे फोडले गेल्याच्या वास्तव घटनेचं प्रतिबिंबच दिसलं होतं.महाराष्ट्रात कोठेवाडी, मरिनड्राईव्ह बलात्कार इत्यादी घटनांपासून हिंसाचार आपल्या परिचयाचा होतोय.तो होतोय ही नक्कीच वाईट गोष्टं पण उत्तर भारतात असा हिंसाचार अगदी सर्वसाधारणपणे आढळतो.तो चित्रपटातही येतो.काही वेळा तो वलयांकित होऊन येतो.वास्तवातल्या हिंसेमुळे चित्रपटात हिंसा की चित्रपटातल्या हिंसेमुळे वास्तवातली हिंसा हा अंडं आधी की कोंबडं आधी असा सवाल.
प्रकाश झाच्या राजनीतीत तर महाभारतच दिसलं.यात वेगळं काय? असं वाटलं.पण महाभारत दरवेळी नव्याने वेगळं वाटू शकावं एवढ्या प्रचंड क्षमतेचं आहेच.
’आरक्षण’ जाहीर झाला आणि प्रकाश झानं ज्वलंत वास्तव हातात घेतलंय हे जाणवलं.चित्रपटाचा प्रकाशनकाळ हा वेगवेगळ्या संस्थाप्रवेश कार्यक्रमाचा मौसम.असं हल्ली ठरवून केलं जात असतं.मग माध्यमातून त्याचा फायदा उठवला जात असतो.असं सगळेच करत असतात.
आरक्षण!.. असं म्हटल्यावर सगळेच पेटले.आरक्षण साडे एकोणपन्नास टक्के झालंय! आरक्षणविरोधी आणि आरक्षणाच्या बाजूचे यांची रणधुमाळी चालू झाली नाही तरच नवल.त्यात राजकारणी जिथे तिथे नाक खुपसणार.सगळ्या समाजाचं हित जातं बोंबलत आणि भिजत घोंगडी पडतात सामान्य जनतेच्या गळ्यात.आजन्म.पिढ्यानपिढ्या! आरक्षण निघण्याचीच शक्यता सुतराम नाही! मग आर्थिक मागासलेपणावर ते द्या जातीवर नको! निदान एवढे दिवस झालं आता नको! यावर काही तोडगा निघणं शक्यं नाही! आण्णांचे तीर्थरूप असते तरी त्याना ते जमलं नसतं!
चित्रपटासाठी एक भक्कम पार्श्बभूमी तयार होते.तसं करणं हा एक धोरणीपणा असतोच.प्रकाश झानं हे सगळं जमवलं असं दिसतं.कोर्ट खटले, अनेकांसाठी चित्रपटाचे खेळ आयोजित करणं.मग हे काढून टाकतो, ते काढून टाकतो करत मांडवळ करणं हे ही झालं.
वाहिन्यांवरच्या प्रोमोजमधे आणि इतरत्रं आरक्षण टीम सांगू लागली की आमचा चित्रपट हा आरक्षणावर असण्यापेक्षा शिक्षणाच्या होत असलेल्या बजबजपुरी बाजारीकरणावर आहे.तेव्हा इतरांप्रमाणे प्रकाशही कलटी खातोय असं वाटायला लागलं.सोबतीला धीरगंभीर आणि हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व असलेला, साहित्याची जाण असलेला बुढ्ढा अमिताभ होताच!
तेव्हा आरक्षण हे कॅची टायटल देण्यात व्यवसायाचा भाग आहेच.वाद संपताना किंवा संपवताना आम्ही शिक्षणाच्या बाजारीकरणावर भर दिलाय हा पुढचा धोरणीपणा आहे! खरी परिक्षा पुढेच होती!
प्रकाश झाचा चित्रपट हा मी तो चित्रपट बघण्याची पहिली पायरी आरक्षणनं पार केल्यावर मला दिसलं की आरक्षणची पटकथा प्रकाश झा आणि अंजूम राजबली यांनी मिळून लिहिली आहे.अंजूम राजबली हा एक अभ्यासू पटकथाकार आहे.पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत तो हा विषय शिकवतोही.
आरक्षणच्या पटकथेची वीण मला आवडली.फार गुंतागुंत करायची आणि तरीही प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित मांडायची.समस्या मांडलेली असेल तर समस्येचा धागा सोडायचा नाही आणि त्याव्यतिरिक्त प्रेक्षकाला खुर्चीत बसवून ठेवण्याचे सगळे हतकंडे वापरायचे ही पटकथा मांडायची सर्वसाधारण पद्धत.ती इथे चांगल्या पद्धतीने आलेली दिसली.
इथे एक नाजूक विषय होता.ह्या विषयानं निर्माण केलेले प्रश्नं कायम अनुत्तरितच रहाणार आहेत हेही नक्की होतं.प्रकाश झानं आरक्षणवादी आणि त्या विरोधातली अशी दोन्ही मतं एकाबाजूला दीपक (सैफ अली खान) आणि दुसरय़ा बाजूला सुशांत (प्रतीक), पूर्वी (दीपीका पडूकोण) आणि ’पंडित’ इत्यादी व्यक्तिरेखांद्वारे रास्त पद्धतीने मांडली आहेत असं दिसलं.विशेषत: त्या त्या क्षणी चपखल बसणारे आणि पटणारे स्वत: प्रकाश झानं लिहिलेले संवाद. “या तो आप आरक्षण के साथ रह सकतें है या उसके खिलाफ! और रास्ता आपके पास अब नही!” अशा पद्धतीने महाविद्यालय प्रमुख प्रभाकर आनंद (अमिताभ) ला ठणकवणारा आणि संयत पद्धतीने आरक्षणवाद्यांची मानसिकता मांडणारा दीपकही पटतो आणि आरक्षणामुळे अन्याय झालेला सुशांत शेठ, पंडित हेही पटतात. ’पंडित’ या छोट्याश्या व्यतिरेखेचा संपूर्ण प्रवासही या गुंतागुंतीत चांगला मांडला गेलाय.
या दोन्ही ’वाद्यां’च्या कचाट्यात सापडलेल्याचं काय? नुसत्या एकमेकाच्या कॉलरी पकडून दंगे करायचे, राजकारण्यांनी ते घडवायचे, खाजगी शिकवणीवर्गवाल्यांनी त्याचा संपूर्ण फायदा उठवायचा हे सगळं उघड्या डोळ्याने समजणारय़ा आणि हतबलपणे बघत रहाणारय़ा एखाद्या, एखाद्याच सारासार विवेक असलेल्या माणसाचं काय? हे प्रकाशनं उत्तम रितीने दाखवलंय.प्रिन्सिपॉल प्रभाकर आनंदला वादापेक्षा प्रॉब्लेमबद्दल बोलायचं आहे.त्याचं मत हे प्रश्नाबद्दलचं समतोल मत आहे पण ते कुण्णाकुणालाच ऐकून घ्यायचं नाही.कुठल्याही प्रश्नावर असं कुणी बोलू लागला की त्याला डबल ढोलकी बनवण्याची सर्वसाधारण परंपरा आहे.आजच्या आक्रमक, एवढ्या तेवढ्याने पेटून उठणारय़ा आणि मग लढण्यासाठी ’अण्णा’ शोधणारय़ा अनेकांची खरं तर ही गोची आहे पण कुठलीतरी एक बाजू तुम्ही घेतलीच पाहिजे असा जालिम आग्रह आज केला जातोच! नाहीतर तुम्ही डबल ढोलकी, षंढ, अतिशहाणे.. इ.इ. प्रिन्सिपॉलच्या पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीच्या प्रसंगात प्रकाशनं आणि मग अमिताभनं हे संयतरित्या पण परिणामकारकरितीने दाखवलंय.पत्रकाराला तुमच्याकडून त्याला हवी असलेली उत्तरं पायजे असतात.इथला नायक ते ओळखतो.तो त्या अर्थानं सात्विक संतापाने पेटून उगाच हाराकिरी करणारा नाही.तो सगळं जाणून आहे.पुढे त्या मुलाखतीमुळे कसं कसं काय काय होत जातं ते उत्तम पद्धतीने चित्रपटात येत रहातं.हा आणि असे इतर कुठलेही धागे गुंतागुंतीत तुटत नाहीत.
आणखी एक महत्वाचा आवडलेला मुद्दा.दीपक, सुशांत, पूर्वी हे कॉलेजमधले मित्रं.तरूण.तिघांच्याही बाबतीत त्यांचा प्रिन्सिपॉल प्रभाकर आनंदशी संघर्ष होतो.या संघर्षाच्या प्रसंगात हे तिघेही त्यांच्या त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या तरूणाईतल्या समजुतीनुसार अगदी बरोब्बर असतात.प्रभाकर आनंदशी त्या त्यावेळी त्यांचे संबंध तुटतात.नंतरच्या प्रवासातलं त्यांचं आपली चूक समजून ती सुधारणं हा महत्वाचा भाग बघण्यासारखा आहे.हे ट्रॅक्स केवळ नायकाशी जुळवून घेऊन चित्रपटाचा पुढचा प्रवास सुकर करण्यासाठी नाहीत तर तरूणाईनं आपली चूक झाली असेल तर ती स्वत:शी आणि मग त्या मुद्याशी, व्यक्तीशी कबूल करून योग्य कामात सहभागी व्हावं हे सांगण्यासाठी आहे असं जाणवतं.वास्तवात एकूणच असा अनुभव येतो की आजकाल चूक कबूल करणं म्हणजे आपली पोझिशन आपणंच डाऊन करून घेणं.असं अजिबात करायचं नाही.तसंच रेटायचं.अशी प्रवृत्ती सर्रास दिसते.परिस्थिती एकूणच बिघडल्यामुळे, संघर्षमय झाल्यामुळे असेल, मूल्यांचं अवमूल्यन झाल्यामुळे किंवा टोटल सिस्टीम फेल्युअरमुळेही असं असेल पण ते लॉंगटर्ममधे उपयोगाचं नाही.काही चांगलं घडवायचं असेल तर नाहीच नाही.
व्यक्तिरेखा! सगळ्याच माणसांचा संपूर्ण प्रवास गुंतागुंतीतूनही व्यवस्थित दृष्टीस पडतो.समस्या मांडायची असली, मनापासून मांडायची असली तरी चित्रपट ही डॉक्युमेंटरी होऊन चालत नाही.चित्रपट हा व्यक्तिरेखांचा असतो.त्यात एक प्रथम व्यक्तिरेखा किंवा protagonist असतो.सर्वसाधारणपणे त्याच्या दृष्टीनं, point of view नं चित्रपटाचा प्रवास चालू रहातो.नॅरेशनचे इतर प्रकार नसतात असं नाही पण मग पुन्हा सगळ्यांना समजावा अश्या व्यावसायिक चित्रपटात हाच प्रकार सर्वसाधारणपणे वापरला जातो.आरक्षणमधला कोचिंग क्लासवाला खलनायक मिथिलेश सिंगही (मनोज बाजपेयी) पूर्ण लॉजिकने पडद्यावर येतो.त्याचं कूळ, मूळ, शेवट कुठेही सुटत नाही.तो खलनायक आहे म्हणून बलात्कार, पळवापळवी वगैरे करत सुटत नाही.तो नायकाच्या जरूर मागे लागतो पण खलनायकाचं नायकाशी तसं वैयक्तिक आयुष्यातलं काही वैर आहे अशी तद्दनगिरीही टाळली गेलीय.दोन टोकाच्या प्रवृत्तींमधलाच तो संघर्ष वाटतो आणि तरीही तो माणसामाणसातलाही वाटतो.आधीच्या पिढीतला मूल्य जपलेला नायकाचा प्राचार्य मित्र आणि कोचिंग क्लासवर उखळ पांढरं करून घेणारी त्याची सद्यपरिस्थितितली मुलं.कमी मार्क पडूनही चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्याचा हट्टं धरणारा राजकारण्याचा भाचा अशी उपकथानकं एकूण मांडणी समर्पकच करतात असं वाटतं.
सगळे मार्ग खुंटल्यावर नायक तडक निघतो आणि.. हा प्रवास बघण्यासारखा आहे.तो त्याच्या व्यक्तिरेखेला साजेसंच वागतो.
अमिताभ हा समृद्ध अभिनेता आहे.त्याच्याजागी इतर कुणाची कल्पना मी करू शकलो नाही. ’ओंकारा’ पासून सैफ अली खानकडे लक्ष ठेऊन आहे.तो अजिबात निराशा करत नाही.वेगळ्या गेटपमुळे तो ती व्यक्तिरेखा वाटतो.भूमिकेचं बेअरिंग तो कुठेही सोडत नाही.बारकावेही सोडत नाही.दीपिका पडूकोण अभिनयाच्या पातळीवर सुखद आश्चर्याचा धक्का देऊन जाते.यात प्रकाश झाने घेतलेल्या संवांदांच्या रिहर्सलचा भागही असावा पण तिनं काही प्रसंगात कमाल केली आहे म्हणण्याइतपत अभिनय केलाय.मनोज वाजपेयी! त्यानं हिरो बनण्याचा प्रयत्न सोडून दिलाय हे अगदी चांगलं केलंय.प्रोमोजमधून तो राजनीतीतल्यासारखाच आहे की काय असं वाटलं.ती भूमिका गाजली होती.पण मनोजनं यात अगदी वेगळ्या पद्धतीनं काम केलंय.त्याचा तुफान गेटप आणि त्याचे एक्सप्रेशन अफलातून.राजनीतीत तो संवादांवर भूमिका पेलतो तर इथे आवाज संयत ठेऊन चेहेर्‍यावरच्या नेमक्या भावांवर.काही ठिकाणी कॅमेराही त्याच्या मदतीला आलाय.प्रतीकनं (बब्बर) मात्रं निराशा केली.मला तो फद्याच वाटला.एका धूर्त, राजकारणी आणि स्वार्थी प्राध्यापक, विश्वस्ताचा चांगल्या मनाचा खंबीर मुलगा- तो कुठेही वाटला नाही.तो डोळ्यांची अवाजवी उघडझाप करत रहातो त्यानं आणखीच रसभंग होतो.विशेषत: ’जाने तू या जाने ना’ आणि ’धोबीघाट’ मधे प्रतीकने खूपच अपेक्षा निर्माण केल्या होत्या.तो चांगला अभिनेता वाटतो.पण इथे..
शेवट.. धो धो चालणारय़ा कोचिंगक्लासच्या समोर तबेला क्लासरूपी मोफत शिक्षणसंस्था उघडणं फिल्मी वाटणं शक्य आहे पण इथे दिग्दर्शक काही म्हणण्याच्या प्रयत्नात आहे असं माझ्या चित्रपट बघण्याच्या प्रवाहात मला पहिल्यांदा जाणवलं.एक कशोशीने मूल्य जपणारा शिक्षक आपला लढा चालू कसा ठेवणार? असाच! तो हा लढा चालू ठेवतोय म्हटल्यावर त्याला आपला नेता मानणारे त्याच्या कामात आपला वाटा उचलतातच.पण आख्ख्या यंत्रणेसमोर, जी एकवटून भयंकरपणे निस्वार्थीपणे काम करणारय़ाच्या अंगावर येणारंच.मग? इथून पुढे जनता काय करणार हा प्रश्न येतो.प्रभाकर आनंद समोरासमोर तसं आवाहन करतो.बुलडोझरची क्रेन चालवणारा अगदी शेवटच्या थरातला कामगार क्रेन बंद करून पुढे होतो.त्याच्यापेक्षा वरच्या थरातले मध्यमवर्गीय अजून नुसते बघत बसलेले असतात!
चित्रपटाला वेळेची मर्यादा आहे.दृष्यात्मकतेची चौकट आहे.त्यात एरवी सोप्या करून दाखवल्यासारख्या वाटणारय़ा गोष्टीतूनच दिग्दर्शकाला काही म्हणता येत असावं.
’आहे रे’ नी ’नाही रे’ ना उचलून वर घेतलं तरच त्यांचं उत्थान होणार अन्यथा...
आजच्या गुंतागुंतीच्या वास्तवात, टोकाला गेलेल्या, प्रसंगी परस्परांच्या स्वार्थासाठी टोकाला नेल्या गेलेल्या समस्यांवर कोण सोल्युशन देणार? काय देणार?
निदान ही समस्या समग्रपणे मांडायचा प्रयत्नं करणं आणि तेही व्यावसायिक चौकटीत (जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं) हे तसं महत्वाचं, फारसं सोपं नसणारं काम ’आरक्षण’ करतो.एक चांगला अनुभव देतो हे नक्की!

Tuesday, August 16, 2011

"जालवाणी २०११" जालरंग प्रकाशनाचा अंक!

जालरंग प्रकाशन या आमच्या महाजालावर साहित्यविषयक अंक प्रकाशित करणार्‍या प्रकाशनाचा नवीन अंक जालवाणी २०११ प्रसिद्ध झालाय!
लेखकांनी लिहिलेलं आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळालं तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित केलेला आहे. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आम्ही सर्वजण आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत आहोत.
अंकात समाविष्ट झालेल्या माझ्या आवाजातल्या ध्वनिमुद्रणांचे दुवे खाली दिले आहेत!


संपादकीय!

उड्डाण! (विनोदी लेख)

मीलन! (कविता)

गाव! (कविता)

१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात!
लेखन: रोहन चौधरी
अभिवाचन: मीनल गद्रे आणि विनायक पंडित

Saturday, August 13, 2011

राज्य (८)

भाग ७ इथे वाचा!
दिवेलागण झालीय.बाप तीच खुर्ची घेऊन खिडकीखालच्या टेबलाशी काही खरडत बसलाय.राजू त्याच्या नेहेमीच्या जागी, जमिनीवर, पुस्तकात डोकं खुपसून बसलेला.नजर पुस्तकात आणि लक्ष बापावर.
“मग? काय देण्याघेण्याचे हिशेब चाललेत?”
“अं?”
“देणं घेणं लिहिताय?”
“घेणं कसलं बाबा राजू! सगळं देणंच!”
“कंपनीवाले.. आले कसे नाहीत अजून घरी!”
बाप रागाने राजूकडे बघतो.मग उजव्या हाताची तर्जनी डाव्या हाताच्या तर्जनीवर घासतो.
“तुम्ही माझी करताय तेवढी पुरेशी नाही, आता तेही येतील!”
“करावे तसे भरावे पण किर्तीरूपी उरावे!”
“आता मरावेच!”
राजू हसतो.
“तुम्ही हसावे- तुम्ही सुद्धा हसावे!”
“हॅऽऽ हसावे की रडावे तेच कळत नाहिए!”
“होऽ गुंडूभाऊ मोठे स्पॉन्सरर झालेत आता!”
“तुमच्या एरोड्रमचा विमा.. त्यानीच उतरवलाय!”
“तुला काय काय आश्वासनं दिलीएत?”
“पुस्तकं वाचणं चालू रहातयं ते काय कमी! शिवाय पाटी आणि हातगाडी यातला संभ्रम मिटला!.. तुमच्या हातात काय देतात ते बघा! कटोरा तर तुम्ही स्वत:हूनच-”
“तुझी पत वधारली! मोठा माणूस झालास राजू-”
“हो!ऽ आणि त्याबद्दल तुमच्या दु:खात मी सहभागी आहे! मला आता जरा माझं काम करू द्या! तुमची लिस्ट तयार झाली असली तर नेहेमीचं काम करा- आडवं पडण्याचं! ते तुम्हाला बरं जमतं!- पण आता खुर्चीतल्या खुर्चीत ते कसं करायचं ते-"
“ते बघतो मी! तू तुझी ढापणं सांभाळ!”
बाप लिहित रहातो आणि राजू वाचत.गार्गी ऑफिसमधून परतली आहे.येतायेताच समोर बापाला बघते.
“ओऽ ओऽ काय खरडत काय बसलाय? चला! चला! माझी साडी घेऊन या! घाईत आहे मी! चला! उठाऽ”
“आणतो.. आणतो..”
“फटाफट! आधीच आणून ठेवायची! मला वाटलंच तुम्ही-”
केसांच्या पीन्स सोडून हेअर स्टाईल करायला लागते.बाप चोरासारखा बाहेर जायच्या तयारीत.थबकून गार्गीकडे बघू लागतो.
“गार्गी.. पैसे?”
“पुन्हा विचारायचे नाहीत! तुमच्याकडे असतात! नसतील तर इस्त्रीवाल्याला खात्यावर मांडायला सांगा!”
बाप जातो.गार्गीचं पुटपुटणं चालू.
“..एक काम व्यवस्थित करेल माणूस तर- मग? काय राजू?”
राजू हसतोय.
“ये ताई! कशी आहेस? पुन्हा जायचंय का कुठे?”
“हो! कळी खुललीए तुझी कधी नाही ते!”
“वाईट वाटतंय?”
“छे रे बाबा! मला कसलं वाईट वाटणार!”
“नाही!.. जो तो माझ्या खूष होण्यावर टपलाय!”
“अरे तू सगळ्यांचा लाडका!”
“हो! हो! हो!”
“तुझी सगळ्याना काळजी!”
“ही! ही! ही!”
“तुझ्यावर सगळ्यांचं सगळं अवलंबून!”
“हु! हु! हु!”
“तू सगळ्याना महत्वाचा!”
“हं! हहा! झाली बाराखडी पूर्ण! आता बास! काम काय बोल!”
गार्गी केस विंचरत विचारात पडलीए.
“काही नाही रे!.. ह्याचं.. काय करायचं.. कळत नाही!”
“कापून टाक!”
“अं?”
“केस गं! मॅनेज करता येत नसतील तर कापून टाक!”
गार्गी डोक्यात प्रकाश पडल्यासारखी.
“हं!.. हो रे!ऽ हे माझ्या लक्षात आलंच नाही!”
“मलाच सांग ते! मला पटेल!”
“नाही रे! तूच आपल्या घरात विचारी!”
“बिच्चारा म्हणायचात इतके दिवस!”
“झालंय काय.. एकानं सांगितलंय नोकरी कर म्हणजे.. तो सुटेल.. दुसरा म्हणतो नोकरी सोड-”
“म्हणजे? म्हणजे काय होईल?”
“तेच कळत नाहिए रे!”
“तुला कळत नाहीए म्हणजे खरंच कठीण आहे! सरशी तिथे पारशी या नियमाने जाऊनसुद्धा?”
“माझा प्रत्यक्ष फायदा कशात?”
“चांगल कोडं आहे! एखाद्या वाहिनीवर अनाऊंस करूया! बक्षिसं द्यायला हजार स्पॉन्सरर्स होतील तयार!”
“अरे गद्ध्या! तुला विचारतेय तर तू-”
“ताई! माझा फायदा कशात हेच मला अजून ठरवता येत नाहिए! हे पुस्तक म्हणजे सवय नुसती!”
गार्गीची बाकीची तयारी संपत आलीए.ती बाप आणायला गेलेल्या इस्त्रीच्या साडीची वाट बघतेय.
“एक काम वेळेवर करेल हा माणूस तर शपथ!”
“तू मात्रं लावलंस कामाला हं! माझं ओझं हलकं झालं आता!”
“तुझं काय बाबा! गुंडूभाऊला नोकरी लागली, तुझं सोनं झालं!”
बाप येतो.गार्गीचं लक्ष आता त्याच्यावर.
“आलात? लवकर आलात! द्या!”
बाप तिची इस्त्री केलेली साडी तिच्या सुपुर्द करतो.
“मुलाखत असेल ताई मोठी! चहात्यांची रीघ लागते बघायला! ऐकायला! जिथे जातील तिथे! येन केन प्रकारेण-”
“चान्स घे! चान्स घे तू प्रत्येक वेळी!”
गार्गी हसत आत निघून जाते.राजूचं चालूच.
“इतके दिवस दिला नाहीत त्याला मी काय करू?”
“मीच मिळालोय सगळ्याना!.. हीऽऽ आत्ता आत गेली- ही भवानी बघ! नुसती साखर पेरायची! आणि आता-”
“तुमचं लाडकं पिल्लू ते!”
“तंगडी वर करतंय आमच्याच अंगावर!”
“तुमचं कर्म!”
“कर्म नाही बाबा! वेळ! वेळ कठीण हेच-”
आई बाहेरून आलीए तिला बघून थांबतो.मग तिच्यावर घसरतो.
“या! या! तुम्ही कुठे होतात इतका वेळ?”
“कुठे म्हणजे? आजचा दिवस काय? गुंडू कमवता झाला, नवस फेडून आले! मारूतीच्या देवळात हीऽऽ गर्दीऽऽ”
“सगळे! गुंडूसाठी? नवस फेडायला?”
“नाही! तुमच्या मुलाखती घ्यायला! तुमचा पराक्रम मोठाऽऽ नाही आनंदा तोटाऽऽ हे घ्याऽ प्रसाद घ्या! तोंड गोड करा!... हॅ हॅ हॅ हे काय होऽ कुठे निघालात?”
“जातो मुलाखती द्यायला! इथे बिन पाण्यानी होण्यापेक्षा ते बरं!”
“हा हा हा.. गिळायला यालंच! ते दुसरीकडे नाही मिळणार! घे रे राजू प्रसाद!.. गार्गी आली?”
“परत जाणार आहे ती!”
“अरे पण केव्हा? कुठे पसंतच पडत नाही! आता जमलं असतं तर बापाने शेण खाल्लं!”
“काळजी करू नकोस तिची! ती-”
“हा हा.. हो रे बाबा! आता काही कठीण नाही! माझा गुंडू आता सगळं व्यवस्थित करेल!”
गुंडू येऊन दारात उभाच राहिलाय.
“अरे! आलास बाबा गुंडू! अगदी शंभर वर्षं आयुष्य आहे रे बाबाऽऽ”
“एवढं?”
हसतो.बाहेर बघतोय.
“आओ! आओ!”
धडधाकट, कळकट काळा, मध्यमवयीन माणूस आत येतो.ढगळ पॅंट, बाहेर काढलेला भलत्याच रंगाचा स्वस्तातला पारदर्शक शर्ट, बारीक केस, लांब शेंडी, तोंडात पान, हातात चेन लाऊन बंद केलेली फाईल.
“आओ!”
आई आणि राजू त्या नवागताकडे बघत राहिले आहेत..

Tuesday, August 9, 2011

राज्य (७)

भाग ६ इथे वाचा!
नवी सकाळ झालीय.बाहेरच्या खोलीत गुंडू अजून जमिनीवर आडवातिडवा पसरलेलाच.खोलीच्या मधोमध उभा बाप.पाठमोरा.समोरच्या भिंतीवर लावलेल्या तसबिरीला हात जोडत पुटपुटतोय.
“वासांसि.. वासांसि जीर्णानी यथा विहाय.. जसे आपण आपले कपडे जुने झाल्यावर टाकून देतो आणि नवी वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे- वासांसि-”
“गुरूदेऽऽवऽऽ” असं ओरडून बाप त्याच्या दिशेने पटकन् वळायच्या आत गुंडूनं कूस बदललीए.
बाप यड्याबागड्यासारखा इकडे तिकडे बघतो.पुन्हा तसबिरीकडे वळतो.
“आपण- आपण जसे कपडे- नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आत्मा हे शरीर नाश पावल्यावर.. हे शरीर.. टाकून नवीन शरीर धारण करतो.वासांसि जीर्णानी यथा विहाय.. वासांसि जीर्णानी.. वासांसि-”
गुंडू बरोब्बर बापाच्या मागे उभा.
“ओऽ वासांशीऽ” गुंडू नुसता ओरडतच नाही तर “फिऽऽश” असा शिट्टीवजा आवाज काढून बापाला वाटेतून बाजूला व्हायला सांगतो.बाप ताबडतोब आज्ञा पाळून बाजूला होतो.गुंडू त्याच्याकडे बघत बघत राजासारखा चालत स्वैपाकघराकडे रवाना होतो.त्याचवेळी आई घराबाहेरून आत येते.तिच्या हातात पेढे.
“घ्या! घ्या! पेढे!.. माझा गुंडू कुठे गेला?”
बाप हातात पेढे घेऊन पेढ्यांकडे बघतोय.
“पेढे? म्हणजे गुंडूनं दारू सोडली?”
“अहोऽ आहात कुठे? गुंडूने नोकरी मिळवलीए स्वत:च्या बळावर!”
“कुठे?”
“इथेच.. कुठे तेऽऽ.. कुठे होऽते जळ्ळं मेलंऽऑफिसऽऽ”
“दूध घालतात तसं.. आता दारूही घालायला लागलं वाटतं गुंडू!”
“तुम्ही नाऽऽ कुसकेपणा करा सतत! जळाऽ पोरगं येवढं स्वत:च्या पायावर उभं राह्यलंय-”
“पाय रहातात का जमिनीवर स्थिर?”
“तुम्ही काय दिवे उजळले? हात दाखवून अवलक्षण मेलं! आता काही बोलले की शू: शू: करत नाचाल घरभर! त्या कंपनीवाल्यांनी चोपलं नाही जिवानीशी नशीब समजा! का चोपलं?”
“चो-चो-चोपताएत! ते काय- काय नाक्यावर उभं राहून वासुगिरी नाही केली!”
इतक्यात आतून गुंडू आलाय.फ्रेश होऊन.तो ऐकतोय.
“मग काय केलंत? सांगू का सगळ्यांना बोंबलून?”
“गुंडू बाळाऽ आऽ कर! पेढा घे बाबा पेढा!.. राजूच्या जन्मानंतर पेढा काही आला नव्हता या घरात!”
गुंडूनं पेढ्याचा बोकाणा भरलाय.
“शॅणॉचॅ गॉळे ऑलॅ ऍसतॅ घॅरॉवॅर! नॅशॉब सॅमॅज!.. वेळीच पोरं पाठवली कंपनीत म्हणून नाहीतर.. एरोड्रम खणून काढला असता कंपनीने!” असं म्हणताना मुद्दाम स्वत:च्या डोक्यावरून हात फिरवतो.बाप चवताळतो.
“तुम्ही शेण घालताय तेवढं पुरेय! आता नाक्यावर उभं राहून बोंबला!”
गुंडू खिल्ली उडवल्यासारखा हसू लागतो.
“हॅऽऽ हॅऽऽ हॅऽऽ तुम्हाला काय वाटलं कळलं नाहिए कुणाला? तुम्ही गंजीफ्रॉकने खिडकीला टांगून घेतलंत इथपर्यंत-”
आईला आता गुंडूला थांबवावं लागलंय.
“गुंडू! बाबा! जरा बरं बोलत जा बाबा आता!! जबाबदार माणूस झालास तू! चल्! डबा करून देते तुला! आज पहिला दिवस तुझ्या नोकरीचा!”
आई स्वैपाकघरात जाते.बापाला जरा उसंत मिळालेय.तो कॉटवर बसतो.
“बरंच- बरंच बोलायला लागलास गुंड्या!.. हसतोस काय गध्ध्या! तुझ्या चड्डीच्या गुंड्या मी लावत होतो तेव्हा तुला बोलताही येत नव्हतं!”
“हं! हं!”
“मी तुला चालायला शिकवलं! सायकल शिकवली! पहिली सिगरेट ओढून आलास तेव्हा आख्खं पाकीट आणून दिलं!-”
आता गुंडूच बापाची री ओढायला लागतो.
“पहिल्यांदा दारूची चव घेऊन आलो तेव्हा आख्खा खंबा आणून मला घेऊन बसलात! सगळं लक्षात आहे माझ्या! हसताय काय?.. नापास होत गेलो तरी कधी ओरडला नाहीत! मारलं नाहीत! फार उपकार केलेत!”
“आणि तू ते असे फेडतोएस!”
“तुम्ही आमचं काय फेडायचं बाकी ठेवलंत?”
“आणि इतके दिवस तुमचं जे केलं ते-”
“आख्खी गीता नाय् सांगायची बापू आता! आपण केलेलं पापच आपल्या डोक्यावर बसतं! आणि.. आम्हाला ते आमच्या डोक्यावर घ्यायचं नाहिए!”
“सगळ्यांचा तारणहारच तूऽ”
“बघाल!”
“बघू! बघू!”
“उद्यापासून त्या दाराजवळच्या खुर्चीत बसायचं!”
“तुझा हुकूम!” बाप तोंड मुरडतो.
“तोंड चालवायचं नाही! जमिनीला नाक लागलंय तरी टांग ऊप्पर करायची नाही! उठाऽऽ”
बाप, त्याने हक्काच्या मानलेल्या कॉटवरून उठायला तयार नाही.
“ओऽ वासांशीऽऽ फीऽऽश!”
गुंडूनं शिट्टीसारखा आवाज करून दाराजवळच्या खुर्चीकडे निर्देश केलाय.बाप गुपचूप कॉटवरून उठतो, खुर्चीत जाऊन बसतो.गुंडू कॉटजवळ जाऊन कॉटवर हात झाडून कॉट झटकून घेतो.बसतो.
“हांऽ अंगाऽऽशीऽ”
बाप बेरकी तिरक्या नजरेने ते सगळं बघतोय.
“नोकरी.. कुठे मिळाली रे?”
“अं?” गुंडू त्याच्या त्या पूर्ण रूबाबात मान वाकडी करतो.
“कुठे लागली नोकरी?”
“वि.पु.म. मधे!” गुंडू कॉटवर ठाकठीक, ऐसपैस बसतो.
“कुठे?ऽऽ”
“आयला रेऽ.. विऽऽत्त पुरवठा महासंघाऽऽतऽऽ”
“वाट लागली!”
“काय?”
“नाहीऽ ब्-अ- कशी काय लागली?”
“गप् बसा होऽ.. मी तुम्हाला कधी काही विचारलं होतं?.. पडू दे मला निवांत!”
गुंडू कॉटवरच आडवा होतो.लगेच घोरायला लागतो..

Friday, August 5, 2011

राज्य (६)

भाग ५ इथे वाचा!
रात्र बरीच झालीए.रातकिड्यांची किरकिर चालू आहे.मधेच कुठल्यातरी वाहिनीवरच्या सिनेमातलं घणाघाती संगीत ऐकू येतंय.घराच्या या बाहेरच्या खोलीत अंधार.निजानीज झालीए.बाप कॉटवर डाराडूर.जमिनीवरच्या अंथरूणावर गार्गी झोपलेली.एका कोपरय़ातल्या पुस्तकांच्या गराड्यात राजू अंगाची वळकटी करून झोपलाय.
आई दाराजवळ बसलीए, एक पाय जमिनीवर आडवा दुमडून आणि दुसरा पाय उभा दुमडून.आडव्या पायावर हाताचं कोपर टेकवलंय आणि हाताच्या पंज्यात हनुवटी टेकवलीय.दरवाज्याकडे डोळे लावून बसलीए.दरवाजा ओढून घेतलेला, किलकिला.आई जांभया देतेय.मधेच हाताचे दोन्ही पंजे डोळ्यावरून आणि चेहेरय़ावरून खसाखसा चोळते.किलकिला असलेला दरवाजा हळूहळू उघडू लागतो.अंधारात एक बुटकी, ढेरपोटी, पुरूष असावी अशी दिसणारी व्यक्ती लडखडत, सौम्यपणे झिंगत आत येतेय, ’हम होंगे कामयाब’ ची धून गुणगुणत.आईकडे पहाते.थांबून डुलत रहाते.
“आईऽऽ तू.. जागी कशाला रहातेस? तुला सांगितलंय ना मी? उगाच-”
“गुंडू! अरे काय हे? वेळ, काळ- आणि आज पुन्हा झोकून-”
गुंडू तळहाताच्या चार बोटांवर आडवा अंगठा ठेवण्याच्या प्रयत्नात.
“जराशीऽ”
आई नाईटलॅंप लावते.
“गुंडू अरेऽ आपलं घराणं काय! आपली परिस्थिती काय! तू मोठा सगळ्यात! एव्हाना सगळी जबाबदारी तू उचलायचीस तर-”
गुंडू तडक कॉटवर झोपलेल्या बापाकडे हात करतो.
“तो आहे ना अजून जिवंत-”
“जेवणार आहेस की जेवण झालंय तुझं?”
गुंडू विचारात बुडलाय.ते बघून आई आत जायला लागते.
“एऽऽ आई.. आण! थोडसं..च.. पोळीभाजी..”
गुंडूला स्वत:ला अ‍ॅडजेस्ट करत जमिनीवर बसायचा प्रयत्न करू लागलाय. ’हम होंगे कामयाब’ ची धून गुणगुणणं चालूच आहे.आई आतून वाढलेलं जेवणाचं ताट घेऊन येते.त्याच्या समोर ठेवत बसते.
“गुंडूऽऽ”
“बोलऽ”
“..बाबा.. काय करतोस?”
“जेवणाराय!”
“ते नाही रे.. आपल्या घराची अवस्था-”
“कधी बरी होती? आजोबा गेला.. त्याच्या दुसरय़ा दिवशी.. मामा जेवण घेऊन आला.. म्हणून जेवायला मिळालं!”
“ते गेलं रे आता!.. आज! आज काय करायचं?”
गुंडू कॉटच्या दिशेने एक हात पसरतो.
“हे सगळं.. त्याला सांगायचं! कोणी.. आणली ही अवस्था? मी आलो होतो.. बाबानो.. मला जन्माला घाला म्हणून-”
“गुंडूबाळ आपल्याला मोठं कुणी केलं? लाड कोणी केले? कौतुक-कोडकौतुक कुणी केलं?”
पुन्हा गुंडूचा एक हात कॉटच्या दिशेने पसरलेला.
“याने!.. इनवेस्टमेंट होती त्याची त्यात!.. त्याला त्याच्या हातात सगळं हवं होतं! मी.. कामातून गेलेलाच.. त्याला हवा होतो! तुला कधीच गुंडाळलं.. गार्गी-राजू लहान..”
“करायचं काय? सावरायचं कसं यातनं?”
“कशातनं?”
“काय बाबा बोलायचं तुझ्याशी! नको त्यावेळी विषय काढला! मीच मूर्ख!”
अगदी समाधानाने खाकरतो.
“हाऽहाऽहा.. ते आहेच!.. हे बघ!.. आपला परमेश्वर तो! त्याला शरण जायचं की आपलं.. काम झालं!”
“अरे पण तू कधी उजेड पाडणार?”
“रात्र संपल्यावर!”
“हजरजबाबी बिरबल आहेस!.. रोज धुंद होऊन ये! वासूनाक्यावर जग! पण इथे माझं काय होतंय-”
गुंडू आता जेवणाला आणि तिच्या बोलण्याला कंटाळलाय.
“काय होतंय?”
“बापाची नोकरी सुटलीये तुझ्या!”
“काढलंय!”
“तेच ते!”
“महत्वाच्या फायली जाळल्या!”
“काय सांगतोस काय गुंडू!?”
“लोच्या, झोल, लफडी, अफरातफर! इतके दिवस टिकला तेच-”
“पुढे काय?”
“आता बसफुगडी!”
आई तोंडाजवळ हाताची बोटं जुळवून धरते आणि करवादते.
“अरे कारट्याऽ गिळायचं काय?”
गुंडू ढेकर देतोय.
“जिसने दात दिये है.. वो चना भी देगा.. मां!”
आणखी एक ढेकर देतो.
“तुझं बरंय बाबा! पोटात टाकलीस की सुटलास! ती उतरेपर्यंत तू ढगात! जरा माझ्यासाठीपण घेऊन येशील का?- होऽ पण त्यालाही दिडक्या लागतात!.. असं करू, नाक्यावरच उभे राहू! वर्गणी गोळा करू! हप्ता गोळा करू!-”
“माझं येक.. ऐकशील?”
“पाजळ!”
“घाबरायचं नाही! सगळं व्यवस्थित होणार तू-”
“गुंडू!.. दिसायला तू बापाच्या वळणावर गेलाएस! आता त्यांचीच वाक्यं तूही बोलायला लाग!”
“तुला असं वाटतंय का.. की मी बरळतोय!”
“नाही!.. मलाच वासानं झालीए!”
“मी सांगतोय ते लक्ष देऊन ऐक! काळजी करायची नाही! टेन्शन घ्यायचं नाही-”
“मी.. थोडी थोडी.. रोज आणून देईन.. ती घ्यायची!”
“नाईऽऽ आऽऽईऽऽ.. तुझे हाल संपले आता!.. इतके दिवस पिचून गेलीस आता-”
“तू पार संपून जा!”
“आसं.. नाई बोलायचं आई! हा गुंडू असताना आता डरायचं नाई!”
लडखडत उभा रहातो.
“सावर!”
“मोरी.. कुठे आहे?”
“तुझ्या मागच्या दिशेला!”
वळायचा असफल प्रयत्न करतो.
“ठीक आहे!.. ठीक आहे! तू ऐक.. तुझ्या या लाडक्या गुंडूने नोकरी मिळवलेय स्वत:च्या.. हिंमतीवर!”
त्याचा तोल जातो, आई आधार देते.त्याचं चालूच.
“काय?..नोकरी!.. तुझा-तू-गुं-”
“हो! हो! मोरी दाखवू न तुला? चल हात धुवायला.सकाळी बरं वाटेल..”
गुंडू धडपडतो.
“नाऽऽय!.. तुझी.. सगळी स्वप्नं साकार होणार आई.. आईऽऽ तुझ्या गुंडूचं राज्य येणार! यालाऽ आता झोपवतो चांगलाच! बघ तूऽऽ”
कॉटच्या दिशेने जोरात लाथ झटकतो.आता गुंडू पुरता पडणारच पण आई पुन्हा त्याला सावरते.
“तो आधीच झोपलाय गुंडू! तू चल आता तुला-”
गुंडू आता पुरता भावविवश झालाय.
“तुझी शप्पत आई!.. मला खरंच.. नोकरी लागलीए!”
“गुंडूऽऽऽ...”
गुंडू जमिनीवर स्थिर रहायचा अटोकाट प्रयत्न करतोय आणि त्याचवेळी दूर कुठल्यातरी वाहिनीवर वेगातलं लेझीम-संगीत सुरू झालंय.त्यापाठोपाठ लांबलचक तुतारी ऐकू येऊ लागते.
गुंडू दोन्ही पाय फाकवून जमिनीवर घट्टं उभं रहायचा प्रयत्न करत छद्मी हसतोय.तोपर्यंत आई आनंदविभोर झालेली..