
Saturday, October 29, 2011
विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या खरय़ाखुरय़ा नायकास...

Friday, September 2, 2011
जगावेगळा ’बफेलो बॉय’
व्हिएटनामसारख्या देशातून आलेल्या या प्रवेशिकेनं थक्कच केलं.चित्रपट माध्यमाला मर्यादा आहेत का? असा मोठा संभ्रम हा चित्रपट बघत असताना होतो.’पाणी’ या पंचमहाभूताचं विलक्षण दर्शन हा चित्रपट घडवतो आणि तेवढ्यावरच तो थांबत नाही.एका पंधरा वर्षाच्या मुलाला काही महिन्यांच्या अवधीत घडलेलं आयुष्याचं दर्शन केवळ अप्रतिम चित्रप्रतिमांमधे हा चित्रपट सादर करतो.
पंधरा वर्षाचा किम आपल्या वडिलांबरोबर आणि सावत्र आईबरोबर राहतो आहे.तो रहात असलेल्या या भागात, व्हिएटनाममधे, पाऊस म्हणजे अरिष्टंच आहे.तो धुंवाधार बरसताना आपण त्या प्रतिमांबरोबर ओढले जातो.हे शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे दोन म्हशी आहेत.आईवडील अतिवृद्धं झालेले.म्हशी जगवायच्या असतील तर या भूभागातल्या सगळ्यांना त्यांच्या म्हशी एका बेटावर चरण्यासाठी न्याव्या लागतात.प्रचंड पाऊस आणि सर्वत्र भरलेलं प्रलयसदृष्य पाणी यामुळे म्हशींना खायला गवत उरलेलं नाही.
ज्या बीस्ट्स आयलंडवर या म्हशींना न्यायचं तिथपर्यंतचा प्रवासही सुखकर नाहीच.किमचा हा प्रवास सुरू होतो.मुसळधार पावसात, चहुकडे क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्यातून वाट काढत तो चालू पडतो.त्याला काय खायला मिळतं? इतकं पाणी सभोवार असून त्याला प्यायचं पाणी मिळवण्यासाठी काय करावं लागतं? इथपासून चित्रपटाचं डिटेलिंग सुरू होतं.यातली दृष्यं बघून अवाक होणं केवळ बाकी रहातं! आपल्याला मागासलेल्या वाटलेल्या त्या प्रदेशात, पावसाच्या अखंड भडिमारात, प्रलय झालेल्या ठिकाणी हे चित्रिकरण कसं साध्य झालं असेल याचा अचंबा करत आपण किम जगू लागतो.
किमला त्याच्या आयुष्यातलं कुठलं रहस्य या दरम्यान कळतं? त्याची आई कोण? बेटाजवळ पोचल्यावर त्या परिस्थितीतही होणार्या इतर लोकांच्या मारामार्या, स्त्रियांवरचे अत्त्याचार, स्वत: किमनं त्या सगळ्या जगण्यात सामील होणं असं सगळं जगावेगळं जगणं आपण किमच्या दृष्टिकोनातून कधी अनुभवायला लागलो हे आपलं आपल्यालाच कळत नाही!
यातला किमच्या वडलांच्या शिकार्यावरच्या मृत्यूचा सेगमेंट- उपकथानक काटा आणणारं आहे.किमच्या पुन:प्रवासात सभोवतालच्या पाणीच पाणी चहुकडे या अवस्थेत चुकून माकून एखादा शिकारा जवळ आला तरच माणसाची भेट होणार अशी परिस्थिती.यात शिकार्यावरच्या म्हातारा म्हातारीमधला म्हातारा मरतो.अशावेळी माणूस मेल्यावर पुढे काय करायचं हा यक्षप्रश्न.प्रवास न संपणारा.संपेपर्यंत त्या शरीराचं काय होणार? मग त्या मृत शरीराला काळजावर दगड ठेऊन जलसमाधी द्यायची! पण ते शरीर पूर्ण बुडायला तर पाहिजे! मग काय करायचं?... हा प्रसंग मुळातूनच पहाण्यासारखा आहे.
आयुष्य हे दु:खानं भरलेलं तर आहेच.माणसानं त्याच्या जगण्यावर आलेल्या अडचणींवर कसा विजय मिळवला किंवा तो आयुष्याशी कसा लढला हे ’बफेलो बॉय’ अप्रतिमपणे दाखवतो.
चित्रपट संपल्यावर केवळ उदासवाणी हुरहूर लागत नाही आणि आपण कधीच अनुभवू शकणार नाही असं आयुष्य आपल्याला लाभल्याचा साक्षात्कार हा चित्रपट प्रेक्षकाला जरूर देतो...
मग करताय न लगेच डाऊनलोड? त्या आधी हा यूट्यूब ट्रेलर पहा!
द सिरियन ब्राईड
डेस्पेरेडो स्क्वेअर
Wednesday, August 31, 2011
’डेस्पेरेडो स्क्वेअर’ अर्थात ’संगम’
Thursday, August 18, 2011
आरक्षण: माझ्या मनात उमटलेलं...
कमीने ही माझी आधीची एक पोस्ट! विशालला यात नक्की काय करायचं होतं असा प्रश्नं मला पडला खरा! नंतरचा ’सात खून माफ’ बघायचा योग आला नाही.
’मृत्यूदंड’ हा मी बघितलेला प्रकाश झाचा पहिला चित्रपट.माझ्या आठवणीप्रमाणे त्याचा ’दामूल’ हा समांतर धारेतला सिनेमा त्या आधी आला होता.तो बघायचा राहून गेला होता.
’मृत्यूदंड’ पासून प्रकाश झानं व्यावसायिकतेशी नातं जोडलं, अर्थात स्वत:ची वैशिष्ट्य कायम ठेऊन.चांगल्या गणल्या जाणारय़ा दिग्दर्शकांच्या चित्रपटात जाणवणारी महत्वाची गोष्टं म्हणजे त्या चित्रपटाची रचना.ही रचना मृत्यूदंडमधे दिसली.मृत्यूदंड, गंगाजल, अपहरण, राजनीती.. यात बिहारी रक्तरंजितताही जाणवली.गंगाजलमधे तर उत्तर भारतातल्या एका कारागृहातल्या कैद्यांचे डोळे फोडले गेल्याच्या वास्तव घटनेचं प्रतिबिंबच दिसलं होतं.महाराष्ट्रात कोठेवाडी, मरिनड्राईव्ह बलात्कार इत्यादी घटनांपासून हिंसाचार आपल्या परिचयाचा होतोय.तो होतोय ही नक्कीच वाईट गोष्टं पण उत्तर भारतात असा हिंसाचार अगदी सर्वसाधारणपणे आढळतो.तो चित्रपटातही येतो.काही वेळा तो वलयांकित होऊन येतो.वास्तवातल्या हिंसेमुळे चित्रपटात हिंसा की चित्रपटातल्या हिंसेमुळे वास्तवातली हिंसा हा अंडं आधी की कोंबडं आधी असा सवाल.
प्रकाश झाच्या राजनीतीत तर महाभारतच दिसलं.यात वेगळं काय? असं वाटलं.पण महाभारत दरवेळी नव्याने वेगळं वाटू शकावं एवढ्या प्रचंड क्षमतेचं आहेच.
’आरक्षण’ जाहीर झाला आणि प्रकाश झानं ज्वलंत वास्तव हातात घेतलंय हे जाणवलं.चित्रपटाचा प्रकाशनकाळ हा वेगवेगळ्या संस्थाप्रवेश कार्यक्रमाचा मौसम.असं हल्ली ठरवून केलं जात असतं.मग माध्यमातून त्याचा फायदा उठवला जात असतो.असं सगळेच करत असतात.
आरक्षण!.. असं म्हटल्यावर सगळेच पेटले.आरक्षण साडे एकोणपन्नास टक्के झालंय! आरक्षणविरोधी आणि आरक्षणाच्या बाजूचे यांची रणधुमाळी चालू झाली नाही तरच नवल.त्यात राजकारणी जिथे तिथे नाक खुपसणार.सगळ्या समाजाचं हित जातं बोंबलत आणि भिजत घोंगडी पडतात सामान्य जनतेच्या गळ्यात.आजन्म.पिढ्यानपिढ्या! आरक्षण निघण्याचीच शक्यता सुतराम नाही! मग आर्थिक मागासलेपणावर ते द्या जातीवर नको! निदान एवढे दिवस झालं आता नको! यावर काही तोडगा निघणं शक्यं नाही! आण्णांचे तीर्थरूप असते तरी त्याना ते जमलं नसतं!
चित्रपटासाठी एक भक्कम पार्श्बभूमी तयार होते.तसं करणं हा एक धोरणीपणा असतोच.प्रकाश झानं हे सगळं जमवलं असं दिसतं.कोर्ट खटले, अनेकांसाठी चित्रपटाचे खेळ आयोजित करणं.मग हे काढून टाकतो, ते काढून टाकतो करत मांडवळ करणं हे ही झालं.
वाहिन्यांवरच्या प्रोमोजमधे आणि इतरत्रं आरक्षण टीम सांगू लागली की आमचा चित्रपट हा आरक्षणावर असण्यापेक्षा शिक्षणाच्या होत असलेल्या बजबजपुरी बाजारीकरणावर आहे.तेव्हा इतरांप्रमाणे प्रकाशही कलटी खातोय असं वाटायला लागलं.सोबतीला धीरगंभीर आणि हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व असलेला, साहित्याची जाण असलेला बुढ्ढा अमिताभ होताच!
तेव्हा आरक्षण हे कॅची टायटल देण्यात व्यवसायाचा भाग आहेच.वाद संपताना किंवा संपवताना आम्ही शिक्षणाच्या बाजारीकरणावर भर दिलाय हा पुढचा धोरणीपणा आहे! खरी परिक्षा पुढेच होती!
प्रकाश झाचा चित्रपट हा मी तो चित्रपट बघण्याची पहिली पायरी आरक्षणनं पार केल्यावर मला दिसलं की आरक्षणची पटकथा प्रकाश झा आणि अंजूम राजबली यांनी मिळून लिहिली आहे.अंजूम राजबली हा एक अभ्यासू पटकथाकार आहे.पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत तो हा विषय शिकवतोही.
आरक्षणच्या पटकथेची वीण मला आवडली.फार गुंतागुंत करायची आणि तरीही प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित मांडायची.समस्या मांडलेली असेल तर समस्येचा धागा सोडायचा नाही आणि त्याव्यतिरिक्त प्रेक्षकाला खुर्चीत बसवून ठेवण्याचे सगळे हतकंडे वापरायचे ही पटकथा मांडायची सर्वसाधारण पद्धत.ती इथे चांगल्या पद्धतीने आलेली दिसली.
इथे एक नाजूक विषय होता.ह्या विषयानं निर्माण केलेले प्रश्नं कायम अनुत्तरितच रहाणार आहेत हेही नक्की होतं.प्रकाश झानं आरक्षणवादी आणि त्या विरोधातली अशी दोन्ही मतं एकाबाजूला दीपक (सैफ अली खान) आणि दुसरय़ा बाजूला सुशांत (प्रतीक), पूर्वी (दीपीका पडूकोण) आणि ’पंडित’ इत्यादी व्यक्तिरेखांद्वारे रास्त पद्धतीने मांडली आहेत असं दिसलं.विशेषत: त्या त्या क्षणी चपखल बसणारे आणि पटणारे स्वत: प्रकाश झानं लिहिलेले संवाद. “या तो आप आरक्षण के साथ रह सकतें है या उसके खिलाफ! और रास्ता आपके पास अब नही!” अशा पद्धतीने महाविद्यालय प्रमुख प्रभाकर आनंद (अमिताभ) ला ठणकवणारा आणि संयत पद्धतीने आरक्षणवाद्यांची मानसिकता मांडणारा दीपकही पटतो आणि आरक्षणामुळे अन्याय झालेला सुशांत शेठ, पंडित हेही पटतात. ’पंडित’ या छोट्याश्या व्यतिरेखेचा संपूर्ण प्रवासही या गुंतागुंतीत चांगला मांडला गेलाय.
या दोन्ही ’वाद्यां’च्या कचाट्यात सापडलेल्याचं काय? नुसत्या एकमेकाच्या कॉलरी पकडून दंगे करायचे, राजकारण्यांनी ते घडवायचे, खाजगी शिकवणीवर्गवाल्यांनी त्याचा संपूर्ण फायदा उठवायचा हे सगळं उघड्या डोळ्याने समजणारय़ा आणि हतबलपणे बघत रहाणारय़ा एखाद्या, एखाद्याच सारासार विवेक असलेल्या माणसाचं काय? हे प्रकाशनं उत्तम रितीने दाखवलंय.प्रिन्सिपॉल प्रभाकर आनंदला वादापेक्षा प्रॉब्लेमबद्दल बोलायचं आहे.त्याचं मत हे प्रश्नाबद्दलचं समतोल मत आहे पण ते कुण्णाकुणालाच ऐकून घ्यायचं नाही.कुठल्याही प्रश्नावर असं कुणी बोलू लागला की त्याला डबल ढोलकी बनवण्याची सर्वसाधारण परंपरा आहे.आजच्या आक्रमक, एवढ्या तेवढ्याने पेटून उठणारय़ा आणि मग लढण्यासाठी ’अण्णा’ शोधणारय़ा अनेकांची खरं तर ही गोची आहे पण कुठलीतरी एक बाजू तुम्ही घेतलीच पाहिजे असा जालिम आग्रह आज केला जातोच! नाहीतर तुम्ही डबल ढोलकी, षंढ, अतिशहाणे.. इ.इ. प्रिन्सिपॉलच्या पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीच्या प्रसंगात प्रकाशनं आणि मग अमिताभनं हे संयतरित्या पण परिणामकारकरितीने दाखवलंय.पत्रकाराला तुमच्याकडून त्याला हवी असलेली उत्तरं पायजे असतात.इथला नायक ते ओळखतो.तो त्या अर्थानं सात्विक संतापाने पेटून उगाच हाराकिरी करणारा नाही.तो सगळं जाणून आहे.पुढे त्या मुलाखतीमुळे कसं कसं काय काय होत जातं ते उत्तम पद्धतीने चित्रपटात येत रहातं.हा आणि असे इतर कुठलेही धागे गुंतागुंतीत तुटत नाहीत.
आणखी एक महत्वाचा आवडलेला मुद्दा.दीपक, सुशांत, पूर्वी हे कॉलेजमधले मित्रं.तरूण.तिघांच्याही बाबतीत त्यांचा प्रिन्सिपॉल प्रभाकर आनंदशी संघर्ष होतो.या संघर्षाच्या प्रसंगात हे तिघेही त्यांच्या त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या तरूणाईतल्या समजुतीनुसार अगदी बरोब्बर असतात.प्रभाकर आनंदशी त्या त्यावेळी त्यांचे संबंध तुटतात.नंतरच्या प्रवासातलं त्यांचं आपली चूक समजून ती सुधारणं हा महत्वाचा भाग बघण्यासारखा आहे.हे ट्रॅक्स केवळ नायकाशी जुळवून घेऊन चित्रपटाचा पुढचा प्रवास सुकर करण्यासाठी नाहीत तर तरूणाईनं आपली चूक झाली असेल तर ती स्वत:शी आणि मग त्या मुद्याशी, व्यक्तीशी कबूल करून योग्य कामात सहभागी व्हावं हे सांगण्यासाठी आहे असं जाणवतं.वास्तवात एकूणच असा अनुभव येतो की आजकाल चूक कबूल करणं म्हणजे आपली पोझिशन आपणंच डाऊन करून घेणं.असं अजिबात करायचं नाही.तसंच रेटायचं.अशी प्रवृत्ती सर्रास दिसते.परिस्थिती एकूणच बिघडल्यामुळे, संघर्षमय झाल्यामुळे असेल, मूल्यांचं अवमूल्यन झाल्यामुळे किंवा टोटल सिस्टीम फेल्युअरमुळेही असं असेल पण ते लॉंगटर्ममधे उपयोगाचं नाही.काही चांगलं घडवायचं असेल तर नाहीच नाही.
व्यक्तिरेखा! सगळ्याच माणसांचा संपूर्ण प्रवास गुंतागुंतीतूनही व्यवस्थित दृष्टीस पडतो.समस्या मांडायची असली, मनापासून मांडायची असली तरी चित्रपट ही डॉक्युमेंटरी होऊन चालत नाही.चित्रपट हा व्यक्तिरेखांचा असतो.त्यात एक प्रथम व्यक्तिरेखा किंवा protagonist असतो.सर्वसाधारणपणे त्याच्या दृष्टीनं, point of view नं चित्रपटाचा प्रवास चालू रहातो.नॅरेशनचे इतर प्रकार नसतात असं नाही पण मग पुन्हा सगळ्यांना समजावा अश्या व्यावसायिक चित्रपटात हाच प्रकार सर्वसाधारणपणे वापरला जातो.आरक्षणमधला कोचिंग क्लासवाला खलनायक मिथिलेश सिंगही (मनोज बाजपेयी) पूर्ण लॉजिकने पडद्यावर येतो.त्याचं कूळ, मूळ, शेवट कुठेही सुटत नाही.तो खलनायक आहे म्हणून बलात्कार, पळवापळवी वगैरे करत सुटत नाही.तो नायकाच्या जरूर मागे लागतो पण खलनायकाचं नायकाशी तसं वैयक्तिक आयुष्यातलं काही वैर आहे अशी तद्दनगिरीही टाळली गेलीय.दोन टोकाच्या प्रवृत्तींमधलाच तो संघर्ष वाटतो आणि तरीही तो माणसामाणसातलाही वाटतो.आधीच्या पिढीतला मूल्य जपलेला नायकाचा प्राचार्य मित्र आणि कोचिंग क्लासवर उखळ पांढरं करून घेणारी त्याची सद्यपरिस्थितितली मुलं.कमी मार्क पडूनही चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्याचा हट्टं धरणारा राजकारण्याचा भाचा अशी उपकथानकं एकूण मांडणी समर्पकच करतात असं वाटतं.
सगळे मार्ग खुंटल्यावर नायक तडक निघतो आणि.. हा प्रवास बघण्यासारखा आहे.तो त्याच्या व्यक्तिरेखेला साजेसंच वागतो.
अमिताभ हा समृद्ध अभिनेता आहे.त्याच्याजागी इतर कुणाची कल्पना मी करू शकलो नाही. ’ओंकारा’ पासून सैफ अली खानकडे लक्ष ठेऊन आहे.तो अजिबात निराशा करत नाही.वेगळ्या गेटपमुळे तो ती व्यक्तिरेखा वाटतो.भूमिकेचं बेअरिंग तो कुठेही सोडत नाही.बारकावेही सोडत नाही.दीपिका पडूकोण अभिनयाच्या पातळीवर सुखद आश्चर्याचा धक्का देऊन जाते.यात प्रकाश झाने घेतलेल्या संवांदांच्या रिहर्सलचा भागही असावा पण तिनं काही प्रसंगात कमाल केली आहे म्हणण्याइतपत अभिनय केलाय.मनोज वाजपेयी! त्यानं हिरो बनण्याचा प्रयत्न सोडून दिलाय हे अगदी चांगलं केलंय.प्रोमोजमधून तो राजनीतीतल्यासारखाच आहे की काय असं वाटलं.ती भूमिका गाजली होती.पण मनोजनं यात अगदी वेगळ्या पद्धतीनं काम केलंय.त्याचा तुफान गेटप आणि त्याचे एक्सप्रेशन अफलातून.राजनीतीत तो संवादांवर भूमिका पेलतो तर इथे आवाज संयत ठेऊन चेहेर्यावरच्या नेमक्या भावांवर.काही ठिकाणी कॅमेराही त्याच्या मदतीला आलाय.प्रतीकनं (बब्बर) मात्रं निराशा केली.मला तो फद्याच वाटला.एका धूर्त, राजकारणी आणि स्वार्थी प्राध्यापक, विश्वस्ताचा चांगल्या मनाचा खंबीर मुलगा- तो कुठेही वाटला नाही.तो डोळ्यांची अवाजवी उघडझाप करत रहातो त्यानं आणखीच रसभंग होतो.विशेषत: ’जाने तू या जाने ना’ आणि ’धोबीघाट’ मधे प्रतीकने खूपच अपेक्षा निर्माण केल्या होत्या.तो चांगला अभिनेता वाटतो.पण इथे..
शेवट.. धो धो चालणारय़ा कोचिंगक्लासच्या समोर तबेला क्लासरूपी मोफत शिक्षणसंस्था उघडणं फिल्मी वाटणं शक्य आहे पण इथे दिग्दर्शक काही म्हणण्याच्या प्रयत्नात आहे असं माझ्या चित्रपट बघण्याच्या प्रवाहात मला पहिल्यांदा जाणवलं.एक कशोशीने मूल्य जपणारा शिक्षक आपला लढा चालू कसा ठेवणार? असाच! तो हा लढा चालू ठेवतोय म्हटल्यावर त्याला आपला नेता मानणारे त्याच्या कामात आपला वाटा उचलतातच.पण आख्ख्या यंत्रणेसमोर, जी एकवटून भयंकरपणे निस्वार्थीपणे काम करणारय़ाच्या अंगावर येणारंच.मग? इथून पुढे जनता काय करणार हा प्रश्न येतो.प्रभाकर आनंद समोरासमोर तसं आवाहन करतो.बुलडोझरची क्रेन चालवणारा अगदी शेवटच्या थरातला कामगार क्रेन बंद करून पुढे होतो.त्याच्यापेक्षा वरच्या थरातले मध्यमवर्गीय अजून नुसते बघत बसलेले असतात!
चित्रपटाला वेळेची मर्यादा आहे.दृष्यात्मकतेची चौकट आहे.त्यात एरवी सोप्या करून दाखवल्यासारख्या वाटणारय़ा गोष्टीतूनच दिग्दर्शकाला काही म्हणता येत असावं.
’आहे रे’ नी ’नाही रे’ ना उचलून वर घेतलं तरच त्यांचं उत्थान होणार अन्यथा...
आजच्या गुंतागुंतीच्या वास्तवात, टोकाला गेलेल्या, प्रसंगी परस्परांच्या स्वार्थासाठी टोकाला नेल्या गेलेल्या समस्यांवर कोण सोल्युशन देणार? काय देणार?
निदान ही समस्या समग्रपणे मांडायचा प्रयत्नं करणं आणि तेही व्यावसायिक चौकटीत (जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं) हे तसं महत्वाचं, फारसं सोपं नसणारं काम ’आरक्षण’ करतो.एक चांगला अनुभव देतो हे नक्की!
Saturday, September 5, 2009
कमीने! आणि विशाल भारद्वाज जॉनर...
Thursday, November 6, 2008
“द सिरियन ब्राईड”
खूप दिवसांपासून या सिनेमाबद्दल लिहायचं राहूनच जातंय.” द सिरियन ब्राईड” हा इस्त्रायली सिनेमा २००५ सालच्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमधे दाखवला गेला आणि आजतागायत डोक्यातून गेलाच नाही.दिग्दर्शन: इरान रिकलिस.२००४ साल हे त्याचं प्रदर्शन वर्षं.
ड्रुझ जमातीतल्या मोना या मुलीचा विवाह ठरलाय आणि तिला ती रहात असलेल्या गोलन टेकड्यांच्या परिसरात तिची बहिण पूर्वतयारीसाठी ब्युटीपार्लरमधे घेऊन जातेय या दृष्याने चित्रपटाची सुरवात होते.गोलन टेकड्यांच्या चढणीवरून त्या जात असताना पार्श्वभूमीवर लांबवर खूप खालच्या भागात असलेला हमरस्ता दिसतोय. गोलन टेकड्यांचा भाग आता इस्त्रायली अंमलाखाली आहे आणि तिथल्या मोनाचं लग्नं सिरियामधल्या एका प्रथितयश अभिनेत्याशी ठरलं आहे.ईस्त्रायल आणि सिरिया या देशांमधल्या घमासानीनंतर या दोन्ही देशांच्यामधे युनो कर्मचाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेला सैनिकी प्रदेश तयार करण्यात आलाय.विशेष कारणांसाठीच सीमारेषेचा पार करण्याची परवानगी दोन्ही देशांकडून मिळू शकते.मोनाला ६ महिने लागले आहेत ईस्त्रायली सरकारकडून गोलन टेकड्यांचा परिसर सोडायची परवानगी मिळवायला.एकदा तिने हद्द ओलांडली की तिला परतण्याची, आपल्या कुंटुंबाला भेट देण्याची संधी कदचित आयुष्यात मिळणार नाही आणि त्यामुळे ती विचारात पडलीय.दुसरीकडे तिला आपल्या होणाऱ्या नवऱ्याला जाणून घेण्याची संधीच मिळालेली नाही.अश्या मोठ्या तिढ्याने दिग्दर्शक सिनेमाला सुरवात करतो आणि एकापाठोपाठ एक अत्यंत उत्तम व्यक्तिरेखा सादर करू लागतो.
मोनाचे वडील सिरियाशी जुळवून घेणं या मताचे खंदे पुरस्कर्ते म्हणून नुकतेच इस्त्रायली तुरूंगात जाऊन जामीनावर बाहेर आलेत.त्यांच्या एका मुलाने जमातीविरूध्द जाऊन एका रशियन डॉक्टरशी लग्न केलंय तो बहिणीच्या लग्नासाठी येऊ घातलाय.त्याच्या येण्याबद्दल वडलांना गावातून इशारा मिळालाय.मोनाची बहिण एक अयशस्वी विवाहबंधनात असलेली मोठ्या दोन मुलींची आई आहे.या तिघींना त्या ट्राऊझर्स घालतात म्हणून मुक्त स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या समजलं जातं.ही बहिण समाजसेविका म्हणून प्रशिक्षण घेण्याच्या तयारीत आहे.तिच्या नवऱ्याचा परंपरागत व्यवसाय आहे खाटिकाचा.मोठ्या मुलीला इस्त्रायलभिमुख विचारसरणी असलेल्या घरातल्या मुलाशी लग्नं करायचं आहे आणि आईला असं वाटतं की तिनं अजून शिकावं जे आईला करायला मिळालं नाही.बापाला परंपरागत पुरूषी समाजव्यवस्थेतला कुटुंबप्रमुख म्हणून या सगळ्या प्रकाराने द्विधा मनस्थितीत टाकलंय.याच कुटुंबातला, नववधूचा आणखी एक भाऊ इटलीत व्यवसाय करतो आणि तो स्वच्छंदी आहे पण त्याच्या जीवनशैलीला समाज हरकत घेत नाही आणि त्याचवेळी रशियन महिला डॉक्टरशी लग्न केलेल्या त्याच्या भावाला मात्र समाज वाळीत टाकतो…
असा भला मोठा आणि तेवढाच गुंतागुंतीचा पट घेऊन दिग्दर्शक आपल्याला पुढे नेतो.आपण सहज या प्रवाहात सामील होतो.कुठेही आपल्याकडच्या अनेक कॅरेक्टर्स असलेल्या मालिकांप्रमाणे नीरसता तर येत नाहीच!
लग्नाच्या जेवणावळींनंतर वधूला इस्त्रायल-सिरिया सीमारेषेवर आणलं गेलंय आणि इथेच तिच्या पलिकडे जाण्यात विघ्नं येऊ लागतात.दोन्ही देशांमधल्या सरकारी कारवायांचा समर्पक आणि अपूर्व असा हा भाग दिग्दर्शकानं इथे साकारलाय.कुठलीही हाणामारी नसताना आपण श्वास रोखून हया नाट्याचे साक्षीदार होऊ लागतो.इस्त्रायली सरकारनं गोलन टेकड्यांवरच्या रहिवाश्यांच्या पासपोर्टवर ते इस्त्रायल सोडून जात आहेत असा शिक्का मारण्याच्या निर्णय नुकताच घेतला आहे तर सिरियन सरकार गोलन टेकड्यांना सिरियाचा परदेशव्याप्त परिसर मानते आहे.इस्त्रायल सरकारचा शिक्का असलेल्या पारपत्रांना सिरिया सरकार इस्त्रायलच्या सिरियाविरोधी हालचाली मानते आणि अश्या इमिग्रंट्सना प्रवेश नाकारते आहे!...
सरतेशेवटी इस्त्रायली अधिकारी करेक्शन फ्लुईडने आपला शिक्का पुसायला तयार होईपर्यंत युनोचा लायझन ऑफिसर मागेपुढे करत रहातो (दोघंही शेवटी माणसेच!) आणि आता हा प्रश्नं शांततामय मार्गाने सुटू पहातोय तर सीमारेषेवर एक वेगळंच उत्स्फूर्त नाट्य घडतंय!
नववधू आणि तिच्या संपर्कात असलेली तिची स्पष्टं विचारांची मोठी बहिण यांच्यातल्या विचारमंथनानंतर नववधू सगळी सूत्रं आपल्या हातात घेऊन काही पावलांचंच असलेलं सीमारेषेपलिकडचं ते अंतर ठामपणे चालत जाऊन पार करते.त्याचवेळी तिची मोठी बहिण सगळ्या समूहापासून दूर चालत निघते निश्चयाने, मनातली स्वप्नं साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या अदृष्य भिंती तोडून टाकण्याच्या निश्चयाने!...या शेवटच्या दृष्यात विशेषत: मोठ्या बहिणीचे क्लोजअप्स आणि तिच्या समूहपासून दूर जाण्याचा प्रवास दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या माध्यमातून इतक्या प्रभावीपणे दाखवतो की आपण त्याला सलाम करतो! नि:शब्द दृश्य परिणामकारक करण्याचं हे अफलातून कसब.हा सिनेमा वैश्विक आशय असलेला आहेच.राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि मानवी स्वभाव असं सगळं स्वच्छं आणि अत्यंत परिणामकारकतेनं आपल्यासमोर उभं रहातं.हे करणं खूप कठीण आहे.उत्तम व्यक्तिरेखा, तितकाच अप्रतिम अभिनय, गुंतागुंतीच्या पटात सगळ्याचं कडबोळं न होऊ देणं, सतत उत्कंठावर्धकता टिकवणं-अर्थात पटकथेची उत्तम वीण(लेखन:सुहा अराफ, इरान रिकलीस)-जे चित्रपटाचं मुख्य अंग हे हा चित्रपट आपल्यासमोर प्रभावीपणे मांडतो.उत्तम सिनेमाची अपेक्षा असलेल्यांना आणखी काय पाहिजे?
Sunday, April 6, 2008
मुतलुलुक-ब्लिस
हे एका तुर्की चित्रपटाचं नाव.परदेशी चित्रपटाचं नाव योग्यवेळी आठवणं, त्याचा योग्य उच्चार समजणं, तो समजल्यावर तो योग्य पध्दतीनं करता येणं हा सगळा नव्याने शाळेत जाण्यासारखा अनुभव असतो.
गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या (आणि दरवर्षी नेमाने होणाऱ्या)थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला उदघाटनाचा मान मिळाला होता.
मुतलुलुक चित्रपटाच्या पहिल्याच चौकटीत दिसतं एका निर्मनुष्य तळ्याच्या काठी कुशीवर पडलेलं एका वयात आलेल्या मुलीचं शरीर.चित्रपटाची नामावळ चालू होते आणि कॅमेरा तिच्यावर आवर्तनं घेत आणखी वर जाऊन दृष्याची पार्श्वभूमी उलगडत असताना, तळ्याचा निर्मनुष्य परिसर दाखवत असताना मुलीच्या ओटीपोटाजवळून बाहेर आलेली लांबलचक आणि सुकत चालेलेली रक्ताची रेघ दिसते.मुलगी जीन्स, ओव्हरकोट, बूट इत्यादी आधुनिक वेषात, संपूर्ण वस्त्रात आहे.
एक वृध्दत्वाकडे झुकलेला मेंढपाळ, आपल्या जनावरांना तिथे घेऊन आलेला तिला पहातो.तो तिला ओळखतो, ती शुध्दीवर असल्याचं त्याच्या लक्षात येतं.शरीर खांद्यावर टाकून तो तिला तिच्या घरी पोचवतो.
मुलीला वडील आहेत, सावत्र आई आहे.तिच्यावर प्रेम करणारी आजी आहे.मुलीला अत्याचाराबद्दल, तो करणाऱ्याबद्दल विचारलं जातं.ती काहीच सांगू शकत नाही.अश्यावेळी मुलीला दोषी ठरवणं, तिला शिक्षा करणं, ती शिक्षाही देहांताची नाहीतर परागंदा होण्याची-पर्यायानं मरणसदृष्य आयुष्य आणि त्याचा शेवट प्रत्यक्ष मरण! हे समाजाचे नियम! मुलीला एका अंधाऱ्या कोठडीत ठेवलं जातं.सावत्र आईला अश्या अवस्थेत मुलीला घरी आणल्याचं आवडलेलं नाही.त्या मुलीवर अत्याचार होऊन तिला घरी आणलंय हे गावाचा सर्वेसर्वा आणि गावातल्या मोठ्या पिठाच्या गिरणीच्या मालकाला कळलं तर त्याचे परिणाम वाईट होतील ह्याची जाणीव सावत्र आई लगेच करून देते.बापाला तो विचार खातोय पण तरीही तो अत्याचारित मुलीला ठेऊन घेतो.असं करणं धोकादायक आहे.
मुलीचे वडील तरीही हे गावच्या त्या सर्वेसर्वाच्या कानी घालतात, ते सर्वेसर्वाचे नोकर आहेत.त्यांचं एकमेकात नातंही आहे.सर्वेसर्वाला हे अजिबात मंजूर नाही.गावकऱ्यांनी बोटं दाखवावित असं कुणी का करावं?ती मुलगी ही तर त्या सर्वेसर्वाच्या जवळच्या नात्यातली आहे!तिनं परागंदा व्हायलाच हवं हे सर्वेसर्वा ठासून सांगतो.तिला दूर कुठेतरी सोडून यायला हवं.हे काम कोण करणार?
सर्वेसर्वाचा मुलगा आर्मीत आहे.नुकताच एक पराक्रम गाजवून तो मानाने गावात परतलाय. तरणाबांड,कोवळा,मजबूत देहयष्टीचा.तो त्या मुलीचा दादा लागतो(पहिला,दुसरा कझीन).या मुलावर त्या मुलीला दूर कुठेतरी सोडून येण्याची जबाबदारी टाकली जाते.सर्वेसर्वाचा तो अत्यंत लाडका मुलगा आहे.तो वडलांचं सगळं ऐकणारा आहे.समाजाचा कायदा म्हणून मुलीला दूर शहरात नेऊन मारून टाकणं आवश्यक आहे असं वडील सांगतात आणि आर्मीतला जवान मुलगा ते ऐकतो.
अंधारकोठडीत मुलीला भल्या पहाटे गरम पाण्यानं स्नान घातलं जातं, सजवलं जातं, बळी देण्याआधी असावा तसा हा विधी! आजी मुलीला समाजातल्या स्त्रीच्या स्थानाबद्दल सांगते.दोघीही आणि इतर कुणीही त्यांच्या अवस्थेत काहीही बदल करू शकत नाही!
सतत सद्गदित होणाऱ्या त्या कोवळ्या मुलीच्या ओठावर आणि चेहेऱ्यावर माझ्यावर अत्याचार झाला यात माझी काय चूक हे रास्त भाव आहेत.आपल्यावर अत्याचार कोणी केला हे सांगायला ती अजिबात तयार नाही किंबहुना त्या प्रसंगाच्या उल्लेखानेच ती पूर्णपणे कोसळते.
अत्याचारित मुलीला तिचा लांबचा दादा, सर्वेसर्वाचा आर्मीतला मुलगा शहरात घेऊन आलाय.तो सर्वप्रथम आपल्या सख्ख्या मोठ्या भावाकडे येतो.या भावाचं आणि वडलांचं-सर्वेसर्वाचं वाकडं आहे.मुलीला घेऊन आपला धाकटा भाऊ शहरात का आलाय हे मोठ्या भावाला, वहिनीला समजतं.मोठा धाकट्याला परावृत्त करू पहातो पण धाकटा आपल्या मिशनवर ठाम आहे.
आपल्या नात्यातल्या मामे.मावसबहिणीला (कझीन) मारायचं कसं यावर मात्र त्या आर्मीमेनचं गाडं अडू लागतं.तो तिला गोळी घालू शकत नाही.तिला खूप उंचावर नेऊन उडी मारायला लावणं, ढकलणं त्याला अवघड होऊ लागतं.कुणालाही असं फुकाफुकी मारणं शक्य नाही या निष्कर्षापर्यंत तो येतो.
सर्वेसर्वा कुठलंही रिस्क घ्यायला तयार नाही.त्याची माणसं या दुकलीच्या मागावर आहेत…
एवढ्या विस्तृत स्वरूपात ही गोष्ट सांगायचं एक कारण म्हणजे या चित्रपटाचं अतिशय व्यवस्थित आणि तर्कशुध्द नॅरेशन- दिग्दर्शकाचं गोष्ट सांगणं! पुढे जाऊन कदाचित जाणवेल की अरे, ही गोष्ट हिंदी सिनेमासारखीच आहे, तरीही ती सामान्य हिंदी चित्रपटापेक्षा वेगळी आहे.ती चांगल्या पध्दतीने सांगितली गेली आहे.यात हिंदी सिनेमावर टीका करण्याचा उद्देश नाही अलिकडे बनणारे बरेच हिंदी चित्रपट सर्वार्थाने वेगळे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच…
पुढे मग त्या जवानाची कुतरओढ चालू होते, मुलीला कळतं की आपल्याला इथे का आणलं गेलंय, आपला लांबचा मोठा भाऊ आपलं काय करणार आहे.मुलगा मिशन पार पाडतो की नाही हे पहाण्यासाठी माणसं मागावर आहेत.मुलगा मुलीला वाचवण्याचा निर्णय घेतो.
आता या दोघांना जीव वाचवत रहाणं, निरूद्देश पळत रहाणं भाग आहे.फिशरीजचा धंदा असलेला त्या मुलाचा एक मित्र त्याला आपल्या क्रूझवजा घरात सहारा देतो.त्याचा माग लागून दोघांना तिथूनही पळावं लागतं.मग नवा किनारा.एका उमद्या फिलॉसॉफीच्या प्राध्यापकाच्या क्रूझवर दोघेही नोकर म्हणून रहातात.दोघांनी आपली खरी ओळख कायम लपवून ठेवली आहे.त्या प्राध्यापकाला सहवासाने ते कळतं.प्राध्यापक घटस्फोटीत आहे, आपण कोण आहोत(आयडेंटिटी क्रायसिस) या गहन प्रश्नानं त्याला ग्रासलंय.मुलगी अत्यंत निरागस आहे.प्राध्यापक त्या दुर्लभ निरागसतेच्या प्रेमात पडतो.मुलाला वाटतं या दोघांचं काही चालू झालंय.तो तिच्या तोंडात मारतो, प्राध्यापकावर हल्ला करतो.प्राध्यापक त्याच्या या कृतीच्या अर्थ त्याला समजावून देतो.तू त्या मुलीत आणि तुम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडला आहात ह्या वास्तवाचा स्वीकार करा!…
हा सगळा भाग उपकथानकाचा,मूळ गोष्टीपासून दूर गेल्यासारखं वाटलं ना?पण मजा अशी की याही सगळ्या प्रकारात आपण चांगलेच गुंतले जातो.डिटेलींग हा चित्रपटाच्या संहितेतला अतिशय महत्वाचा भाग आहे.उत्तम दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधे तो नेहमीच दिसतो(उदा.मदर इंडिया-मेहबूब खान).शिवाय आपण मूळ गोष्टीपासून फारकत कधीच घेत नाही.त्या दोन तरूण मुलामुलींच्या चित्रपटातल्या कॅरेक्टरला न्याय देऊन पुढच्या घडामोडी(डेवलपमेंट्स)दाखवणं, योग्य पध्दतीने विशद करणं(डिटेलींग) खूप महत्वाचं आहे.गोष्टीच्या पुढच्या भागाची ती मागणी आहे.
तो प्राध्यापक त्या कोवळ्या जीवांना आधार देतो,धाडस देतो.ती दोघं निर्भयतेने एकमेकांसह पुढचं आयुष्य घालवायचं ठरवतात.किनारा गाठण्यासाठी एका वेगळ्या होडीतून ती दोघं निघतात. प्राध्यापक त्याना निरोप देतो.मुलगा होडी मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याच वेळी त्या उघड्या होडीच्या दुसऱ्याबाजूला बसलेल्या मुलीला मागच्या मागे तिचं तोंड दाबून पळवण्यात येतं! आली तशी ती मोटरबोट मुलीचं अपहरण करून निघून जाते!
प्रेक्षकांनाही हा चांगलाच शॉक आहे.शॉक हे नुसतंच गिमिक आहे का?चित्रपटासाठी आवश्यक गोष्टींपैकी ते एक आहे हे नक्की! योग्य वेळी,प्रेक्षक बेसावध असताना असा योग्य धक्का येणं चित्रपटाच्या रंजकतेत नक्कीच भर घालतं.आणि तसंच भर घालतं परमोच्च बिंदूवर धक्का देऊन उघडणारं रहस्य! ते ही या चित्रपटात आहे…
आता सुरू झालाय चित्रपटाचा उत्कर्षबिंदू- क्लायमॅक्स! मुलीचं अपहरण, अपहरणकर्त्यांचा पिछा करणारा तो मुलगा.हा सगळा जथ्था किनारा गाठतो.किनाऱ्यावरच्या झुडपातून जीव घेऊन धावणारी मुलगी, तिच्या पाठोपाठ तो मुलगा, त्यांच्या मागावर ते अपहरणकर्ते.मुलाच्या असं लक्षात येतं की अपहरणकर्त्यांना त्याला अजिबात धक्का लावायचा नाही, मुलीला मात्र त्याना शिल्लक ठेवायचंच नाहिये!मुलगा आता जीव तोडून मुलीला वाचवायच्या प्रयत्नात आहे.मुलगी जीव तोडून धावत पाण्यात शिरते.तिला गोळी लागू नये म्हणून तिला कव्हर करणारा मुलगा तिच्यापाठोपाठ.मुलगी एका क्षणी कोसळून पडते.तिला वाचवताना तो मुलगा तिच्यावर पडतो. मुलगी घुसमटते आणि ओरडते, “काका!माझ्यावर पुन्हा अत्याचार करू नका!”
हे ऐकून तो मुलगा हादरतो, बघणारे आपणही हादरतो.रहस्य उघड करण्याच्या अचूक बिंदूवर रहस्यभेद झालाय.त्या मुलाचा बाप,तो सर्वेसर्वा हाच तो अत्याचारी आहे! संपूर्ण चित्रपटात जेव्हा जेव्हा अत्याचारी कोण हा प्रश्न मुलीसमोर उपस्थित होतो तेव्हा ती काहीच बोलत नाही.पुढच्या त्या दोघांच्या जवळकीत तो मुलगाही तिला खोदून खोदून विचारतो पण आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही असं ती स्पष्ट करते.ते रहस्य अश्या रितीने उघड झालंय.
यानंतरही चित्रपट तार्किकतेची कास सोडत नाही हे महत्वाचं.मुलगा बापासमोर रिव्हॉल्व्हर रोखून उभा राहतो पण तो गोळी चालवू शकत नाही,ते इतकं सोपं कुठे असतं!
मुलीचा बाप, सर्वेसर्वाचा भावासमान नातेवाईक(त्याचा नोकर-व्यवस्थापक) अत्याचारी सर्वेसर्वाला गोळ्या घालतो.त्याचं कलेवर साचलेल्या पीठाच्या ढीगावर पडून त्यातलंच एक होऊन रहातं…
म्हटलं तर फारशी वेगळी नसलेली ही गोष्ट पण उत्तम पध्दतीने सांगितलेली.खूप चांगल्या अर्थाने सगळी व्यावसायिक मूल्यं असलेला हा चित्रपट आणि तरी सामाजिक वास्तवही परिणामकारकपणे मांडणारा!तुर्की चित्रपटांना फार मोठी परंपरा नाही ही पार्श्वभूमी लक्षात घेता हा चित्रपट महत्वाचा आहे जाणवतं.मुतलुलुकचा दिग्दर्शक- अब्दुल्ला ओगझ.
चित्रविश्वात पुन्हा भेटूच.नववर्ष शुभेच्छा!
गुढीपाडवा, ६ एप्रिल २००८