romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label आवर्त. Show all posts
Showing posts with label आवर्त. Show all posts

Sunday, February 26, 2012

वाचकसंख्या ३००००! सर्वांचे आभार!

नमस्कार वाचकहो! ’अभिलेख’ या माझ्या ब्लॉग अर्थात जालनिशीने वाचकसंख्या ३०००० हा महत्वाचा टप्पा ओलांडला आहे! आपले आभार! आभार!! आभार!!!
’अभिलेख’ ची सुरवात झाली १३ फेब्रुवारी २००८ या दिवशी! चार वर्षं उलटून गेली. एवढ्या काळात खरंतर अनेकांनी हा टप्पा आधीच पार केलाय. काही तर लाखाच्या आणि त्यापुढच्या घरात गेलेत. त्यामुळे अप्रूप नाही पण तीस हजारचा पहिला टप्पा पार केल्याचं समाधान जरूर आहे! ही सुरवात आहे. कशी झाली सुरवात?
तुम्ही म्हणाल झालं स्मरणरंजन सुरू! स्मरणरंजनात रमण्याबद्दल अनेक प्रवाह आणि प्रवाद आहेत. आपल्याला बुवा आवडतं त्यात रमण्यात आणि रमतो तर रमतो असं कबूल करायलाही आवडतं.
’अभिनयातून लेखनाकडे’ असा ’अभिलेख’ चा अर्थ मला अभिप्रेत आहे. केवळ रोजच्या जगण्यामधनं मी बाहेर पडलो ते अपघातानं अभिनय करायला लागल्यामुळं. लिखाणाचं बीज आत कुठेतरी होतं. ते माझ्या आईमुळेच पडलं असा माझा ठाम विश्वास आहे. संघर्ष करणं आणि त्यातून बाहेर पडणं असं चक्र माणसाच्या आयुष्यात सतत चालूच असतं. पुढे एक टप्पा असा आला की एका गर्द काळोख्या काळात अचानक कविताच फुटून बाहेर येऊ लागल्या. त्या कविता गोष्टरूप होताएत असं माझ्या लक्षात यायला लागलं. मग कथा- जशा जमतील तशा लिहिणं सुरू झालं.
दुसर्‍या बाजूला, साधारण दहा-एक वर्षाचा अभिनयाचा अनुभव असेल म्हणून म्हणा, कथेत संवाद येऊ लागले. मग कथा लिहिण्यापेक्षा नाटक लिहिणं जास्त सोपं (?) असं काहीतरी मनानं घेतलं आणि नाटक लिहिलं, ते चांगलं वाटलं म्हणून राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धेला पाठवलं. तिथे ते पहिलं आलं. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेला ते पात्र ठरलं आणि प्रकाशित झालं! ते नाटक म्हणजे आवर्त!
हे नाटक लिहिताना किंवा या लेखनाचं पुनर्लेखन करताना असं लक्षात आलं कि पुन्हा पुन्हा लिहिणं फार जिकीरीचं काम आहे आणि आता संगणकाशिवाय पर्याय नाही. पण संगणक घेणं परवडत नाही अशी परिस्थिती. लिखाण चालूच राहिलं. मुद्रित माध्यमात ते छापून येण्यासाठी प्रयत्न चालू झाले. मुद्रित माध्यमातही परिचयाचं कुणीच नव्हतं, नाट्यमाध्यमात तरी कुठे कोण होतं? नियतकालिकांमधे लेख छापून येऊ लागले, दिवाळी अंकात कथा  येऊ लागल्या. पुलाखालून बरंच... ही छोटी कादंबरीही प्रकाशित झाली. पुनर्लेखनाचं कसं तरी जमवावं लागत होतं किंवा मग एकटाकी लिहूनच त्याचं काय ते करावं लागत होतं. छापून आणण्यातलं परावलंबनही जाणवत होतं.
मग एके दिवशी तडक कर्ज घेऊन संगणक घेतला! हा क्रांतीकारी निर्णय असावा! :)
घेतला खरा पण तो चालवायचा कसा माहित नव्हतं. मराठी फॉन्ट्स कसा मिळवायचा माहित नव्हतं. तो सर्वत्र दिसण्यासाठी युनिकोड पद्धतीचा असावा लागतो हे माहित नव्हतं. एवढंच काय माझा पहिला मेल आयडी मी एका जुजबी ओळखीच्याला बोलावून करवून घेतला. तो बिचारा माझा मित्र झाला आणि त्यानं आयडी तयार केला, तो कसा करायचा ते दाखवलं. मग झुंज सुरू झाली. आधी सीडॅकचं iLEAP मिळालं! झुंज पराकोटीला गेली. मग शिवाजी फॉन्ट एका भावानं शोधून दिला आणि टाईप करणं सुसह्य झालं.
माझ्या कविता लोकांसमोर यावात असं खूप मनापासून वाटत होतं. एकतर त्या अतिसंघर्षाच्या काळात झाल्या होत्या आणि त्या बर्‍या आहेत असं मला वाटत होतं, तसे अभिप्रायही इतरांकडून मिळाले होते. ते कसं करायचं?
मग नेटवर शोधताना सुषमा करंदीकर या नाशिकच्या ब्लॉगर बाईंचा पाचोळा हा कवितांना वाहिलेला ब्लॉग सापडला. ब्लॉगचं झालेलं हे पहिलं दर्शन. हे असं करता येतं तर! मग अभ्यास सुरू झाला. उलट उलट जात, शोधत बराहा हे सॉफ्टवेअर एकदाचं मिळालं आणि मग सुटलोच!
..मध्यंतरी कुणीतरी- आता कुणीतरी म्हणजे कुणी जाणकारच असणार म्हणा- ब्लॉगची क्रमवारी की काय ती लावली. त्यात त्याने म्हणे कविता, कथा इत्यादी म्हणजे- ललितलेखनाचे ब्लॉगच वर्ज्य ठरवले म्हणे! अशी क्रमवारी-ब्रिमवारी लावण्याचा अधिकार कोण कुणाला देतो? आणि तो अमुक वर्ज्य, तमुक त्यज्य असं कसं काय ठरवतो? असा प्रश्न पडला. विचार करता असं उत्तर सापडलं की ब्लॉग किंवा आंतरजाल हे असं माध्यम आहे की इथे ’सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे!’ ह्या उक्तीप्रमाणे काहीसं आहे. अर्थात मी ब्लॉग लिहितो म्हणजे काही चळवळ करतोय असं म्हणण्याचं धाडस मी अजिबात करणार नाही पण मी हेच लिहितो कविता, कथा, लेख, नाटक वगैरे. मग माझ्या ब्लॉगवर तेच दिसणार. दुसरं असं आहे की माणूस आला की व्यक्त करणं आलं. व्यक्तं करणं आलं की गोष्टं आलीच. बघा पटतंय का, पण प्रत्यक्ष संवाद, लेखन आणि इतर माध्यमातून कुणीतरी कसलीतरी गोष्टंच एकमेकाला सांगतो की! असो! निंदा अथवा वंदा आमचा आपला सुचेल ते लिहिण्याचा धंदा! अर्थातच ’अभ्यासोनि प्रकटावे!’ हे आम्ही विसरणार नाही!
ज्याचा त्याचा पिंड असतो. ज्याचा त्याचा वाचकवर्ग असतो. कुणी एकाच विषयावर लिहितं. तेच बरोबर असं सांगतं. माझ्यासारख्या अनेकांना माणसं, त्यांचे स्वभाव, मन, नाटक, चित्रपट असं आवडतं. माझ्या आत आणि माझ्या सभोवताली काय चाललंय याकडे बघायला आणि जमेल तसं व्यक्तं व्हायला आवडतं. मी ते करतो. विषयाचं अमुकच असं बंधन नाही. असो!
या प्रवासातला आणखी एक टप्पा म्हणजे ’अभिलेख’ ची स्टार माझ्या वाहिनीच्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेत झालेली निवड! या निवडीनं मला ब्लॉगर मित्रमैत्रिणी दिल्या. त्यातल्या काहींनी त्याआधी ’अभिलेख’ वर येऊन माझा हुरूप वाढवला होताच. मग आंतरजालावरच्या विशेषांकांतून लिहिता आलं. देवकाकांनी ध्वनिमुद्रणाचं तंत्र शिकवलं... शिकण्याचा प्रवास चालू राहिला. हा प्रवास असाच चालू राहो! असं आज अगदी मनापासून वाटतं. सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वाचकांनी ’अभिलेख’ ला भेट दिली. अभिप्राय देणार्‍यांचे आभार. असं लक्षात येतं की अभिप्राय न देताही अनेक वाचक इथे येत असतात. नेमानं वाचत असतात. त्या सर्वांचे, सर्वांचे मनापासून आभार! सरतेशेवटी मला हवं ते, हवं तेव्हा, व्यक्तं करू देण्याचं स्वातंत्र्य आणि त्याच बरोबरीनं येणार्‍या जबाबदारीचं भानही देणार्‍या या माध्यमाचे शतश: आभार! धन्यवाद!


Tuesday, October 19, 2010

’बुक गंगा’ वर माझी तीन पुस्तकं!

आता बुक गंगा या ऑनलाईन बुक स्टोअरवरही माझी आवर्त (नाटक), पुलाखालून बरंच (कादंबरी), स्मरणशक्ती वाढीसाठी (स्वयंविकास) ही पुस्तकं रूजू झाली आहेत!
पहा: http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5081606839785976727

Thursday, October 7, 2010

मित्रांनो! चार ई-बुक्स प्रकाशित झाली!!!

मित्रांनो! माझी संघटन, आवर्त, पुलाखालून बरंच (तीनही नाटकं) , मी झाड संध्याकाळ (कवितासंग्रह), अशी चार ई-बुक्स नुकतीच प्रकाशित झाली आहेत साहित्यसंपदा डॉट कॉम या साईटवर! साहित्यसंपदा डॉट कॉम ही Fuzzysoft Software, Aurangabad यांची साईट आहे.तिला भेट दिल्यावर ही पुस्तके बघायला, वाचायला, खरेदी करायला ...मिळतील! भेट द्या आणि प्रतिक्रियाही! लिंक आहे: http://www.sahityasampada.com/index.jsp

Saturday, March 13, 2010

“आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...


“विनायक पंडित नुसतेच नाट्यलेखक नाहीत तर ते एक नटही आहेत.’बेडटाईम स्टोरी’ किंवा ’रानभूल’ अशा नाटकातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत.आणि मुख्य म्हणजे ’आवर्त’मधून त्यांच्या ठायी असणारा दिग्दर्शकही ठायी ठायी दिसतो.एकाच व्यक्तिच्या ठायी असे विविध गुण प्रकट होणं ही आनंदाची गोष्ट.या विविध गुणांचा उपयोग ’आवर्त’ लिहिताना विनायक पंडित यांनी पूरेपूर केल्यानं नाटकाला एक वेगळंच परिमाण लाभलेलं आहे.”...
(ज्येष्ठ नाटककार श्री.प्रेमानंद गज्वी यांनी “आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...
“आवर्त” हे नाटक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत, मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ४११०३९, दूरध्वनी: ७१२०५२६ यांनी वर्षप्रतिपदा १९२३, दि.२६ मार्च, २००१ रोजी प्रकाशित केले.)

Thursday, January 8, 2009

माझं पहिलं पुस्तक_“आवर्त”_नाटक_नवलेखक अनुदान योजना, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई


 आवर्त_प्रवेश तिसरा

(वेळ दुपारची.रंगमंचावर झगझगीत उजेड येतो, तेव्हा प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला माई आणि बंटू जमिनीवर बसल्या आहेत.माई बंटूला गोष्टं सांगतेय)

माई: हं! मग तिनं काय केलं माहितेय?

बंटू: (गोष्टीत रंगलेली) काय?

माई: तिनं-(’बोकील’ असं नाव पुकारलं जाऊन घराच्या प्रवेशद्वारातून पोस्टाचं मोठं पाकीट आत पडतं.बंटू पटकन उठते.) उठली! उठली लगेच! बस! बस तू! गोष्टं सांगतेय ना मी? एक मिनिट जागेवर बसायला नको!

बंटू: काय गं आजी! (बसते)

माई: हं! मग तिनं काय केलं माहितेय?

बंटू: (अनिच्छेनेच) कॅऽऽय?

माई: तिनं किल्ल्यावरून उडी मारली-

बंटू: (डोळे विस्फारून) बाप रे!... पण किल्ला किती उंच असतो गं?

माई: (तिची लिंक तुटते, जराशी रागावून) आता किल्ला! (काय सांगावं ते समजत नाही) असेल… आपल्या चाळीएवढा!

बंटू: बाप रे! त्याच्यावरून उडी मारली?

माई: (डोळे मोठे करून) होऽऽ मग!

बंटू: आजी! आणि तिचं बाळ?

माई: हो तर! तिचं बाळ होतं नं-

बंटू: तिच्याबरोबर?

माई: मग! पाठीशी घट्ट बांधून घेतलंन होतं तिनं तिच्या शेल्यानी!

बंटू: बाप रे काय ग्रेट असेल नं ती!... पण काय गं?एवढ्या उंचावरून… तिला-बाळाला काही झालं नाही?

माई: अगं (हात वरून खाली आणून, डोळे मोठे) डायरेक्ट घोड्यावरून उडी मारलीन तिनी! मऽऽग! (बंटू भारावल्यासारखी पहातच रहाते.तेवढ्यात उघड्या प्रवेशद्वारातून बंटूचे आजोबा, बापू येतो.चपला काढतो.समोर पडलेलं पोस्टाचं पाकीट दिसतं, ते उचलतो.उलटसुलट पहातो.कॉटवर टाकतो.माईचं तिकडे लक्ष गेलंय, बंटूचं नाही.)

बंटू: (तंद्रीतून बाहेर येत) पण काय गं आजी, त्या बाळाचे बाबा गं?

माई: (बाथरूमकडे जाणाऱ्या बापूकडे पहात) गेले असतील गं कुठेतरी उलथायला! (बापू स्वैपाकघरात जाऊन थांबतो, मग बाथरूमकडे जातो)

बंटू: असं काय बोलतेस आजी?युध्दं चालू होतं नं?

माई: (बापू गेला त्या दिशेने नजर टाकत) हो बाई, रात्रंदिन युध्दंच!

बंटू: मग त्या बाळाचे बाबा-

माई: (चिडते) काय गं? बाबा! बाबा! इथे मी गोष्टं कुणाची सांगतेय?... त्याच्या बाबांबद्दल काही बोलतेय का मी? (बंटू वरमते, नाही अशी मान हलवते) नाही नं? मग? तुझे नं आपले नसते प्रश्न.तू जरा मी सांगते ते ऐक! (बापू बाहेर आलाय) कळलं ना? (माईचं बापूकडे लक्ष जातं) मी सांगतो तसं वागतो ना, त्याचंच भलं होणार, ऐक तू बंटू!

बंटू: आजी, भलं म्हणजे? (बापू गालातल्या गालात हसतो, माई वैतागते)

माई: झालं मेलं तुझं सुरू!... का? कसं? कुठे? कुणाला? कशाला? तुला काय करायचं गं हे सगळं? सांगितलं नं मघाशी? मोठ्या माणसाचं (लक्षात येऊन) म्हणजे माझं-ऐकायचं! (उठत) चऽऽला बाईऽऽ

बंटू: आता कुठे गं? आणि गोष्टं अर्धीच राहिली! (बापू ते पोस्टाचं पाकीट उघडून वाचतोय, त्याच्याकडे लक्ष जाऊन) अय्या! आजोबा, तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही! (त्याच्या अंगाला झोंबते.तो ’अगं अगं थांब वाचू दे’ असं म्हणतो.माई तिटकाऱ्याने पहातेय)

माई: (गरजते) बंटू! (बंटू घाबरते.आजोबाला आणखी घट्ट मिठी मारते.माई हातवाऱ्याने) चल! पहिले आत चल! हातपाय-तोंड धू! बाथरूममधे दुसरा फ्रॉक ठेवलाय! बदल! आणि चल माझ्याबरोबर! (बंटू आजोबांकडे पहाते) चल म्हणते ना! (बापू बंटूला थोपटतो.तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.’आत जा’ अशी खूण करतो.बंटू आत जाते.माईही तरतरा आत जाते.)…     

(प्रकाशक: मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ३९, प्रकाशन दिनांक: गुढीपाडवा २६ मार्च, २००१) 

Sunday, July 6, 2008

नाटक, साहित्य आणि मनोरंजन होणं, विचार करायला लावणं…

मला एक माणूस म्हणून, एक प्रेक्षक म्हणून विचार करायला लावणारं नाटक आवडतं.एक लेखक,अभिनेता म्हणून मात्र असं वाटू लागलं आहे की विचार करायला लावणारं आणि करमणूक करणारं असे दोनच स्पष्ट भेद या माध्यमात नाहीत.विचार करायला लावणारं नाटक फक्त जे संवेदनशील म्हटले जातात त्यांच्यापर्यंत किंवा केवळ विचारवंतांपर्यंत पोहोचून उपयोगी नाही.सामान्य लोकांपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार करायला लावणारा हा विचार पोहोचवायचा असेल तर सामान्य प्रेक्षकांना पचेल असं ते नाटक असायला हवं.ते तसं आहे हे त्यांच्यापर्यंत पोचायला हवं तरच ते नाट्यगृहाकडे येतात.

अभिनेता म्हणून माझा ज्या पहिल्या मुख्य धारेतल्या नाटकाशी संबंध आला ते ’झुलवा’ हे नाटक (१९८७) देवदासींच्या समस्येवरच्या कादंबरीवर आधारित आहे.लेखक श्री.उत्तम बंडू तुपे यांनीं एका जोगती जमातीतल्या कुटुंबाबरोबर राहून त्या अनुभवावर ती कादंबरी लिहिली असं ते मनोगतात म्हणतात.
अजगर वजाहत यांच्या मूळ उर्दू नाटकाचं रूपांतर ’राहिले दूर घर माझे’ या व्यावसायिक नाटकात (१९९६.कलावैभव) ’कासिम’ या मुस्लिम कुटुंबप्रमुखाची भूमिका माझ्याकडे आली.फाळणीनंतर पुन्हा पाकिस्तानात गेल्यावर आणि तिथल्या हवेलीत आश्रय घेतल्यावर हवेलीतली न हटणारी ताबेदार वृध्द हिंदू स्त्री या दोघांमधला झगडा या नाटकात आहे.

माझ्या मनाला भिडणारे विषय नाटक, वृत्तपत्रातलं सदर, कथा, कादंबरी याद्वारे मी प्रकट केलं आहे, करतो आहे.पहिलं लिखाण ’आवर्त’ हे दोन अंकी नाटक (प्रकाशक: म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मार्च२००१, नवलेखक अनुदान योजना) आहे.यात “करियर आणि संसार” हा आज सनातन होत जाणारा झगडा मांडायचा प्रयत्न आहे.अगदी अलिकडे बंगळूरू इथल्या सर्वेक्षणात आयटी क्षेत्रातल्या विवाहविच्छेदांचं गंभीर स्वरूप उघड झालं आहेच.
संभोग या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ (दोन्ही भागीदार सारखेच समाधानी) समाजामधे अजिबात दिसत नाही.’विषमभोग’ या दोन अंकी नाटकात हे वास्तव एक स्त्री जेलर आणि एक बलात्कारी खुनी कलाकार यांच्या झगड्यामधून मांडायचा प्रयत्न आहे.नेहरू सेंटर नाटककार कार्यशाळा, मे २००२ मधे ज्येष्ठ नाटककार श्री.सतीश आळेकर यांच्यासमोर या नाटकाचं वाचन केलं.याच नाटकाला जाने’०८ मधे गंगामाई वाचन मंदिर, आजरा या शंभर वर्षें जुन्या संस्थेचा नाट्यलेखन पुरस्कार मिळाला.
’संघटन’ या दोन अंकी नाटकात आजच्या तरूणाईला सार्वजनिक उत्सवामधून संघटित करून ज्या स्वार्थी आणि मूल्यहीन राजकारणाचा भाग बनवलं जातं त्याचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे.
अगदी अलिकडे २१ जून’०८ ’कन्या’ या दीर्घांकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे झाला त्याची पार्श्वभूमी एका गाजलेल्या बलात्कार प्रकरणाची होती.त्या घटनेतली सनसनाटी वगळून एका स्त्री आश्रमशाळेच्या पार्श्वभूमीवर विविध वयोगटातल्या स्त्री पात्रांद्वारे आजवरच्या एकूण स्त्रीच्या प्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे.ती शोषित मुलगी स्वत: स्वत:च्या पायावर उभी रहाण्याचा निर्णय कसा घेते हा प्रवास आहे.सध्या या दीर्घांकाचं दोन अंकी नाटकात रूपांतर करण्याचं काम चालू आहे.

२००१ हे वर्षभर ’वृत्तमानस’ या सायंदैनिकात ’माणूसपण’ हे साप्ताहिक सदर लिहिलं ज्यात मनू हे एक वरवर विनोदी वाटणारं पात्र घेऊन बदलत्या मूल्यांचं, नागरी समस्यांवर सोपी सोल्युशन्स काढणारया मानसिकतेचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे.

’उत्सव’ ही माझी पहिली लघुकथा अक्षर दिवाळी २००२ (संपादक: निखिल वागळे) या अंकात प्रकाशित झाली.आजच्या उत्सवांचं वाढतं भयानक होत जाणारं स्वरूप पाहणारय़ा, अनुभवणारय़ा तळागाळातल्या एका संवेदनशील माणसाचा दुभंग मानसिक अवस्थेपर्यंतचा प्रवास यात आहे.
’डेडलाईन’ ही लघुकथा ग्रंथाली चळवळीच्या रूची मासिकाच्या मे २००३ च्या अंकात प्रकाशित झाली.यात एका वृध्द स्वातंत्र्यसेनानीचं आजच्या परिस्थितीवरचं उपरोधिक दु:खं आणि १५ ऑगस्टची मुलाखत केवळ डेडलाईनसाठी असणारी पत्रकारिता असा विषय आहे.
गेल्या वर्षीच्या ’मुक्तसंवाद’ दिवाळी अंकात ’अनावृत्त’ ही कथा प्रकाशित झाली आहे.ही एक काल्पनिका आहे.समाजातली लैंगिकता अचानक एक दिवस समाजात वावरून गेलेल्या नग्नं स्त्री देहाद्वारे उघड होते (अश्लीलता पूर्ण टाळून, केवळ मानसिक प्रवास) असा या कथेचा विषय.

’पुलाखालून बरंच’ ही कादंबरिका, जुलै २००६.अक्षर मानव, पुणे यांच्याद्वारे प्रकाशित झाली आहे.यात उड्डाणपूल संस्कृतीद्वारे महानगरात होणारी घडामोड चित्रित आहे.पुलाखाली तयार होणारं अवकाश, ते व्यापणारे वंचित, जगडव्याळ अजगरी यंत्रणा आणि भविष्यात वंचितांकडून वाढत जाणारी आंदोलनं आणि आक्रमणं यांचं सूचन आहे.
मनोरंजन हा मूळ पाया असणारय़ा साहित्य, नाटक, चित्रपट (उदा.आशुतोष गोवारिकरांचे चित्रपट) ह्या माध्यमांमधे प्रेक्षकाला विचार करायला लावण्याची ताकद निश्चितपणे आहे.