romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, October 12, 2014

घरात हसरे तारे...

दया तिचे नाव भूतांचे, पाळण आणिक निर्दाळण कंटकांचे...
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे...महाराजा... 
काय?... हो ऐकलं...
असतील शिते तर जमतील भुते...
आता भुते वर आणखीही श्लेषही साधू?... जगद्जननीचे भुते... दिवट्या, संबळ घेऊन जगद्जननीला आळवणारे...
सर्वत्र असा माहोल भरुन राहिलेला माहाराजा...
सगळ्याच वोळी कुठेनंकुठे कुणालानकुणाला लागू पडत असलेल्या...
भाषा वाकवावी तशी वाकते आणि विचार वळवावे तसे वळतात... महाराजा...
होय! होय!... येतोच आहोत शीर्षकाकडे... सुरवात बरी वाटली म्हणून सुटलो झालं...
खरं तर आता सुटका येत्या १९ तारखेनंतरच...
आधी सुटका लोकशाहीची आणि मग कुणा रायबागोयबाची... महाराजा...
महाराजा, महाराजा करतोय म्हणजे आम्ही कोण म्हणूनी कशास पुसता?... आम्ही असू लाडके... तर ते ही नाही आणि काय पुसता दाताड वेंगाडुनी... असंही आम्ही म्हणणार नाही...
आम्ही कुणीच नाही म्हणून आम्हालाच आम्हाला आम्ही म्हणावं लागतंय... एरवी पोटार्थीपण कुणाला चुकलंय?... होय.. तेच म्हणणार होतो मी महाराजा...
तर... घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे अशी कर्त्या गृहिणीसारखी अवस्था होऊन बसलेली महा- आता महाराजा ह्या पालुपदाचा जिम्मा तुमचा बरंका...
आता म्हणाल मध्ययुगीन काव्यपंक्तींकडून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भावगीत रम्य स्वप्नांकडे कसे आणि कशाकरिता वळलात?
वळणं, वाकणं बरीच आहेत... पुढे ध्येनतनान! ध्येनतनान! असा कमीना गजरही कदाचित होईल...
विकास महत्वाचा, तो कसा होतो, कोण करतं हे महत्वाचं नाही. आधुनिक समाजमाध्यमं महत्वाची. अशा विकासाबरोबर काय काय येणार हा विचार करायची उसंतच आम्हाला नाही... तेवढा, जेवढ्यातेवढ्यापुरताच विचार बहुमती सरकार आणतो का?... ते आपण अलिकडेच बघितलं...
पुन्हा पुन्हा शीर्षकाची आठवण करुन द्या... आताशा विस्मरणातच रमावसं वाटतं....स्मरणरंजनापेक्षा ते बरं... असं कुणीही म्हणेल...
इकडे तारे, तिकडे तारे सगळीकडे तारेच तारे...
तारेत बडबडतो आहोत ते असल्यातसल्या नव्हे मूलभूत हक्क बजावण्याच्या... सततची तार सटकत रहाण्यापेक्षा आणखी एखाद्या तारेच्या आधीन होणं केव्हाही महत्वाचं... व्यवहार्य...
स्टार उमेद्वार, स्टार प्रचारक, स्टार कार्यकर्ते, स्टार तुम्ही आम्ही... ही वेगळ्याच एका स्टार गुटख्याची मांदियाळी...
स्टार उमेद्वारांपर्यंत पोहोचणं सामान्याला कितपत शक्य? आम्हाला तरी नाही. ते येण्याची वाट पहातो आहे. दाराशी. हात जोडून. आमच्या. ही एकच वेळ त्यांची. मग आमचेच हात जोडलेले रहाणार. तेथे कर माझे जुळती....
अशांचा उल्कापात झाला तरच ते दिसणार. पानाच्या ठेल्यावर आणि कुठे कुठे... नको त्या ठिकाणी. 
नुसतं उभं राहूनही काहींचं भलं झालेले असणार की. ते जातील वरच्या आणखी कुठल्या चलनी पायरीवर...
स्टार प्रचारक... त्या, संघापासून गल्लीतल्या कबड्डी इत्यादी संघांपर्यंत पसरलेले... कोण, कुणाचा, कुठुन, कसला प्रचार करतोय हे समजणं दुरापास्त आहे बाॅ यंदा... हा नेहेमीच्यांच्या गटातला म्हणावा तर त्याच्यावर वरुन कुणी भलताच लादलेला...
स्टार कार्यकर्ता... जरा जास्त जवळचा. म्हणजे तो आपल्याला काय करत नाही जवळ. आम्ही आपले घाबरुन रहातो जवळ. त्याला गुरकवायची सवय, आम्हाला घाबरायची...
असला एक, एरियात दिसेचना. उमेद्वार जाहीर झाला तेव्हा भेटला. घुश्शातच होता. नेहेमी काय शोधत बसणार अशांच्या घुश्शाचं कारण. रात्री झोपताना तरी काढून ठेवत असावेत हे आपल्या घुश्शाचं आवरण. शुद्धीत असत असले तर. नाहीतर काय, ते सक्षम नरास सांगणे नलगे...
परवा एरियातल्या कोपच्यात वडापाव खाताना किंवा वडापाव खाताना कोपच्यात पकडला. वडापाव घुसला असल्यामुळे बोलता येत नव्हतं. घुश्शात बिश्शातची नाटकं झाली. आम्ही काही समोरुन हललो नाही.
आहेस कुठे?- आम्ही विचारलं.
"..ष्ठा!!!!" एवढाच उच्चार कानी आला आणि भलतंच मुळाक्षर कानामात्रेसकट आमच्या मनात उतरलं... आमचे डोळे विस्फारले. ते कधी नसतात विस्फारलेले? म्हटलं हा गडी सुप्रभाती करायच्या गोष्टी आत्ता काय करतोय. मग मी सहानुभूतीवर उतरलो, म्हटलं थांब आणतो पाणी. म्हणून मिनरल वाॅटरवाल्या केमिस्टाकडे झेपावलो. तो हातवारे करु लागला. मग तो आजुबाजूच्या अनेक अनेकरंगी टोप्यावाल्यांच्या कोलाजकडे बघू लागला. त्याचा अगदी बर्फी सिनेमा झाल्यावर माझ्या लक्षात आलं, कुठल्याही टोपीवाल्याकडे पाणी माग. रंग वेगवेगळे असले तरी अजून वेळ झाली नाहिए, पाणी बिनरंगीच असणार.. असं सुचवतोय तो... 
हो! या काळात विकत का घ्यायच्या वस्तू? राहता राहिला प्रश्न विविधरंगी टोप्यांचा. तर, एक तर त्या घालायच्याच असतात राजकारणात आणि अवघे धरु सुपंथ हे तर राजकारण्यांचं मूलतत्वच की...
वडापावच्या लगद्यासकट पाणी गिळून झाल्यावर माझा गैरसमज दूर झाला, अच्छा म्हणजे निष्ठा म्हणतोय हा... 
"अरे पण मग तू इथेच असायला हवंस आपल्या एरियात?"
"तू पण काय भाई! तो त्यांचा!"
"अरे पण तुझ्या- (इथे मी जीभ चावली) म्हणजे आपल्याच पक्षाचा ना?"
च्यक् असा आवाज करुन त्याने एकाच झटक्यात दोन्ही दाढांत रुतलेला लगदा आणि मी, सगळ्यांनाच साफ करुन मागे सारलं आणि कुठल्याशा टोपीवाल्याच्या बाईकमागे सरुन पुढे सरकला... तो दुसर्‍या त्याला मान्य असणार्‍या आणि त्याचं संचित भक्कम करणा-या स्टार उमेद्वाराच्या मागे लागला होता...
तुम्ही आम्हीही स्टारच की... १९ तारखेपर्यंत. उमेद्वारराजे म्हणून. तुमची आमची अवस्था काय?
ते आम्ही सांगू बरोबर. वर झालं असेल कनफ्युजन आमच्या समजण्यात... युत्या,  आघाड्याच जिथे च्यूत झाल्या- ही शिवी नाही हो- कर्तव्यात चुकल्या, समन्वयाच्या,  तर असं होणार की... सवय झालेली हो आम्हातुम्हाला, याने, त्याने आणि त्याने, ह्याने एकत्र रहाण्याची... मग आतून ते कसेही असोत. तो त्यांचा खाजगी मामला.
स्टार तुमच्या आमच्यांपैकी अनेकांना विकासाचा मुद्दा ज्याम पटलाय. पूर्वपीठिका या शब्दावरच त्यांचा विश्वास नाही. तो त्याना मान्य नाही आणि ते विजयी झाले आहेत... हा सूर्य हा जयद्रथ या न्यायाने... त्यांचा- तुम्ही त्याला काहीही म्हणा- सूर्य किंवा जयद्रथ, तो जन धन, जन गण करत चांगलाच तळपतो आहे... लोकशाहीच्या मार्गाने...
तरीही आम्ही ठोकतच रहाणार... जे जे मूलतत्ववादी आहे ते आम्ही धुत्कारतच रहाणार... ते सगळे मिळून शेवटी सगळे सारखेच असले तरी आम्ही अरेला कारे करतच रहाणार... पर्याय काय?... ते नका विचारु आम्हाला... एकाला पकडून झोडत रहाणार... जेवढे तुम्ही चढवणार तेवढे आम्ही बडवणार.. त्या एका ऐवजी काय? ते नका विचारु... ते आमचं काम नाही. दुसरा पडद्याआड तेच करतोय की आणखी काय, ह्याचा विचारच आम्ही विचार करणारे करणार नाहिओत तर! आता भोंगळपणा बस्स झाला. एक बाजू लावून धरायची म्हणजे धरायची बस्स!... कळलं? हा एक प्रवाह...
तरल बुद्धिमत्ता फार छळते. आर्त बनवते. नको नको ते दिसू लागतं. दिसणारं प्रखर, कटू वास्तव असतं पुन्हा... ते स्वत:ला मांडून घेण्यासाठीही छळून त्राही त्राही भगवान करुन सोडतं. भगवानावर विश्वास असो नसो... फार कठीण अवस्था. ते मांडून मोकळं होता येत नाही. टकमक टोकावर हत्तीच्या पायी जावं लागावं असं काही... फारांना ते समजतही नाही... आमच्यासारखा यकश्चित ब्लाॅगर आणखी काय थांग लावणार या अवस्थेचा?
त्यापेक्षा सोयीप्रमाणे सगळ्यातून स्वत:ला वजा करणं आणि सोयीप्रमाणे जोडून घेणं बरं.. इथे हे चित्र दिसलं, तिथे ते. हा माझ्याशी असं बोलला, मग तो. मी स्वत: या सगळ्या गुंत्यातून, पसार्‍यातून मोकळा... दिलकी भडास निघाली बस झालं.. मला स्वत:ला काय लागू आहे? लोकशाही आहे. पटेपर्यंत राहू नाहीतर आहेतच अनेक तारांगणे या पृथ्वीतलावर विचरायला प्रतिभाबले... आम्हाला वगळा झणी गतप्रभ होतील अशी जी... ग्लोबल नेटिझन्स झालोच आहोत, ग्लोबल सिटिझन्सही होऊ... ती जास्त मोठी लोकशाही... असेना का! जबाबदारी कोणावर आहे? आम्हाला काय लागू?... लांबचा विचार आम्ही केलाच आहे जास्त विचार न करता... परदेशस्थ हे देशस्थ, कोकणस्थ इत्यादींसारखं वर्गवैभव केव्हाच होऊन बसलंय की... तेवढ्यापुरताच विचार करुन दूरदेशी की दूरदर्शी- ते तुम्ही सांगा बुवा- आम्ही पडलो विंग्रजीमाध्यमी- होता येतं ते असं...
तेवढ्यापुरता विचार किती बरा... ते तरुण आहेत, छान आहेत, पूर्वजांचा प्रभाव असणारच की... कुणी बोलत नाही, ते बोलतात तरी, मुद्याचं, विकासाचं... बोलतात हेच खूप... तेवढाच विचार सध्या करु... चेहेर्‍यामागचा चेहेरा, खरा हेतू यांचा आत्ताच कशाला पसारा...
त्या पुढे...
सर्व सामान्य स्टार... पादचारी... अल्पसंख्येत गेलेले... शारीरीक कारणांसाठी चालण्याचा व्यायाम घेणारे का असेना... त्यांचं काय? त्यांचं थोडक्यात असं-
तो चालत चालत वळला. त्याच्या पुढ्यात अ‍ॅक्टिवा. तीवर तीनचार टीनएजर्स. दोघांच्यामधे लाठ्यांचा गठ्ठा आडवा लावलेला. कसलासा संकेत घेत असल्यासारखे, ते अ‍ॅक्टिवाचं नाक फुटपाथला लावून. फुटपाथवर इमारतीच्या तळमजल्याआत खोलवर, आरपार घुसलेलं कसलंसं प्रचार कार्यालय. 
तो निर्विकार विमनस्कतेने सगळ्याला सामोरा. सगळ्याला. शून्य नजर वळवून मार्गस्थ. प्रगत झाल्यावर सद्यस्थितीतल्या प्राप्त मार्गावर... अचानक त्याच्या रस्त्याकडच्या उजव्या कोपराच्या आणि पंजाच्या मधल्या फोरआर्मवर जबरदस्त दणका. बाईकवाल्यांचं काही नवीन नाही म्हणून त्यांची 'चोरी तो चोरी औ फुकटकी सीनाजोरी' म्हणून त्यांच्याकडे चिडकं  केविलवाणं दुर्लक्ष करण्याच्या प्रयत्नात तो. तर समोर वेगाने पुढे चाललेलं ते चौबल सीट नेतृत्व संकेत मिळवून मार्गस्थ झालेलं. त्याच्याकडे वळून वळून पहात. तो त्यांच्या नजरेतला अर्थ जाणून घेण्यापेक्षा त्या लाठ्यांच्या आडव्या गठ्यावर एकाग्र. 
'एक लाठी उतनी असरदार नही होती... आईए, लाठिओंका गुच्छ बनाएँ... ताकत बढाएँ...' लहानपणी ऐकलेलं त्याच्या मनात रुंजी घालू लागतं... कशासाठी?... ह्या झेंड्यांच्या ओक्याबोक्या लाठ्या? की कापडी फलकांचा दोन्ही बाजूचा आधार?... की भलत्याच कशासाठी?... पापभीरुरुपी अहिंसा त्याचा कब्जा घेते... कान, तोंड यांच्यावर झडपा बसल्याच आहेत. डोळ्यांवरच्या नैसर्गिक झडपांच्या जलद हालचालींआधीच समोरच्या लाठ्याकाठ्या वेगाने अदृष्यमान होतात. मनुष्याने अ‍ॅक्टिवासारखी अस्त्रे बनवली त्याबद्दल तो भवतालाचे आभार मानतो...
तो पुन्हा वळतो. एक फकीर महापालिकेच्या दिव्याच्या चंदेरी खांबावरच्या उभ्या आयताकृती पेटीवर आपलं धुनीपात्र ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तो चरकतो. अशावेळी अशा कृतींना चटकन रोखायचं असतं हा विचार त्यानं अंगी बाणवलेला नसतो...
विचाराने छळून घेण्यातच धन्यता मानणारा तो. यावेळी तो पुढे जात राहिला पण पुन्हा पुन्हा मागे वळून तो त्या फकीरी कृतीकडे पाहू लागला. फकीराला शरीरधर्म जास्त अनावर झाला असावा. धुनीपात्र जमिनीवर ठेवणं धर्मात बसत नसावं, अशी आपल्या धर्मातल्यासारखी त्याने आपली समजूत करुन घेतली. मार्गातल्या पुढच्याच खांबावर एक उमेद्वार लटकला होता. बांधणीच्या तुर्रेदार फेट्यातून त्याचं भूमिपुत्रपण लपत तर नव्हतंच- त्याला काही अमुक एका रंगाची, पॅटर्नची गरज नसते आता. हे एक महत्वाचं कार्ड आणि आता खुर्ची माझीच असा झळकणारा आत्मविश्वास त्याच्या चेहेर्‍यावर मोहोर उठवून होता. स्टुडिओवाल्याला फ्लॅशचीही गरज लागली नसेल... तो त्या उमेद्वारावरुन पुढे आला आणि चरकला. समोरच होतं उमेद्वाराचं कार्यालय. भल्या मोठ्या वॅनमधेच... ओसंडणारं... आत काळोख... त्यात सावल्या... काही मोजताएत त्या?... काय? ... त्यांच्या हातात असेल नसेल ते त्याला अधांतरी अंधारात दिसू लागतं... साक्षीदारपणा नको भलता म्हणून तो नजर काढून घेतो... समोर नाक्यावर दंडुकेधारी घोळका... वॅनला पाठमोरा... तो मनात म्हणतो, यार याना तर धाड घालायला ठेवलंय. हे पाठमोरे काय मोजताएत... टोकाचा सडेतोडपणा त्याला झेपत नाही. मग तो कासव होतो... अंग चोरत अबाऊट टर्नच्या धंद्याला लागतो....
... मगाशी त्या फकीराला रोकलं असतं, टोकलं असतं आणि ते या ओसंडत्या पित्त्यांपैकी कुणी बघितलं असतं आणि ते तसले मूलतत्ववादी की कुणी असले... निष्क्रियता ही कृती किती योग्य असते यावर त्याचा पुन्हा एकदा ठाम विश्वास बसतो...
आपल्या चालण्याच्या व्यायामावरुन परतताना त्याला वेगळ्या जागी पुन्हा तो फकीर दिसतो. कॉंक्रिट जमिनीवर उकिडवा बसलेला. धुनी जमिनीवर ठेवून. हात्तिच्या.. ठेवतात तर ह्यांच्यातही जमिनीवर... त्याच्या एका बाजूला रेडिमेड धुपाची पावकिलोची प्लास्टिक पिशवी,  धुपानं धुरकटलेला चमचा पडलेला. ओकीबोकी धुनी होतीच. लांबलचक अंगरख्याच्या खिशात हात घालून तो माचिस शोधत असावा. आज जुम्मा, दिवेलागण... शरीरधर्म आणि जिवीतकार्यकारण कुणालाच चुकत नसतं... असं फिलाॅसाॅफिकल झाल्यावर त्याला खूप बरं वाटतं. आध्यात्मिक झाल्यावरही त्याला असंच वाटत असतं. या दोहोंत फरक काय? हा नवा किडा सोडून घेऊन स्वत:त, तो चालण्याच्या व्यायामाच्या सुफळ संपूर्णतेकडे कधी वळतो, त्याचं त्यालाच कळत नाही...
...तेव्हा, या बहुस्टारी प्रवचनानंतर... सर्वांभूती सहानुभूती निर्माण झाली आहे देवा...
नभाकडे पहावंसुदीक वाटत नाही... आता कसलीच काळजी उरली नाही...
फक्त एकोणावीस हा आकडा दिसतो आहे. तो विदर्भाकडे निर्देश करतो आहे का? ते तुम्ही पहा...
विजय होणार, पराजय होणार... सेलिब्रेशन्स होणार त्यावेळी जेते आणि जीत गळामिठी घालणार. घोडेबाजाराची हीच तर सुरवात असं तुम्ही आम्ही म्हणत रहाणार...
मग आहे दिवाळी... सण मोठा नाही आनंदा तोटा... तेव्हा नो कटुता...
मग ख्रिसमस... अल्पसंख्याकांचा सण...
मग वर्षाखेर... बहुसंख्याकांचा पिण्याचा सण...
घोडेबाजाराला पुरेसा अवकाश- अशी तुम्ही आम्ही तरीही कुरापत काढू... राजकारण्यांचं दु:ख तुम्हाआम्हाला कधी कळलंय? पाण्यातल्या माशाचे अश्रू कोणाला दिसतात?.... कोण- कोण म्हणालं ते नेटवरच्या दिसतात?... काय? नेटमधल्या?... तुम्हीही या बोटावरची त्या बोटावर करायला लागलात तर?... हेच मला तुमचं आवडत नाही!...
तर, वर्षारंभ... संक्रांतीपर्यंत तेच तर चालू राहील... मग संक्रांत येईल... कुणावर नव्हे! सण म्हणून येईल... तेव्हा शुभमुहुर्ती छत्रपतींची साथ कुणाला हे दृगोचर होईल...
अगदी ग्रहबलावरच रहायचं तर नंतर शिमगा... एका वर्षात एकच शिमगा व्हावा, नाही?... दाकृ काय म्हणतात, विचारावं लागेल...
आरे पण पाडवा आहेच की गाढवा- हे आम्ही स्वत:शीच म्हणतोय- पाडवा आहेच... नव वर्ष... आपलं... भूमिपुत्रांचं... गुढ्यातोरणांचं... आणि अर्थातच रामराज्याचं.... रामराज्य येणार, राममंदिराचं काय ते तुम्ही शोधत रहा...
रामराज्य येणार तोपर्यंत सगळ्या सेटलमेंटी संपलेल्या असणार...
नवी विटी नवे राज्य... विटी तीच ती धार काढलेली असली तरी राज्यकारभार धारदार असणार ही तुम्ही आम्ही खात्री बाळगू...
स्वप्नांच्या नभांगणांतून आता सत्यात उतरु. सत्य म्हणजे नक्की काय, कुठलं वगैरे खोलात नको जाऊया...
जोडून सुट्टी नाही तेव्हा बाहेरगावी नको जाऊया... साफसफाई होतच राहील दर दिवाळीला. आधी लगिन लोकशाहीचं लावूया...
एक मूलभूत हक्क बजावू... तो कितव्या महत्वपूर्ण स्थानावर आणून ठेवला गेलाय, याचा विचार सोडून देऊ...
निळं बटण दाबू... त्याआधी ते कुणासमोर आहे त्याला मात्र नीट पारखून घेऊ... लोकशाहीचं निळं निरभ्र आकाश दिसू लागण्यासाठी तो एकमेव आधार आहे तुम्हाआम्हाकडे...
निरभ्र नभातले चमकणारे तारे आणि या घरातले हसरे तारे तेव्हाच कदाचित एकरुप होतील सारे...

Wednesday, October 1, 2014

दिवेलागण...

त्या दिवशी अचानक दिवेलागण इस चीज का अहसास हुआ... बाहेर पडलो काही आणायला. साडेसहा संध्याकाळचे. उजेड होता पण दुकानांमधले, रस्त्यावरचे दिवे लागायला सुरवात झाली होती...
दिवेलागण... केरोसिनचा वास दरवळला अचानक मनात... राॅकेलचा... येशेल म्हणायची आजी ते गोडेतेलाला बहुतेक...
आजोळ जागं झालं पुन्हा... खूप दिवसांनी... माझं आजोळ...
चाळीस वर्षांपूर्वी गावात वीज नव्हती. निमशहरी गावाच्या दृष्टिनं चाळीस वर्षं म्हणजे फार मोठा काळ नव्हे. माझ्या आजोळच्या अनेक कारणांनी महत्व प्राप्त झालेल्या गावात तेव्हा तरीही वीज नव्हती हे खरं...
कंदील... तारांच्या सापळ्यात लंबगोलाकार काच बसवलेले, वर लावलेल्या तारेच्या लंबगोलाने तो कंदील स्वत:बरोबर कुठेही वाहून नेता यायचा...
चिमणी... लंबगोलाकार पितळेची छोटीशी बुधली. मोठी वात असलेली... काड्याचपेटीनं ती लावायची. मोठी ज्योत, त्यावर काजळीमय धुराची वर जात राहिलेली काळीभोर वळवळती जाड रेखा... चिमणी लवंडायची, कधी पेट घ्यायची... मोठ्या माणसांनी मुलांना सतत सावध करायचं. काम झालं की आजी हाताच्या एका फटका-यात शांत, गपगार करायची तिला... कुणाच्या नकळत किंवा कधी मी करतो, मी करतो म्हणून ती विझवायला- नव्हे शांत करायला गेलो तर हवेत वार केल्यासारखे कितीही हात मारले तर चिमणी ज्योत विरुद्ध दिशेलाच... मग फुंकरा मारायच्या. तसं करणं आणखी धाडसी. हे सगळं करत असताना मागावर असलेलं; आई, मावशी, मामी नाहीतर साक्षात आजी मागे यून उभी राहिली की मग कंबक्तीच.
या दिव्यांव्यतिरिक्त गोल बुधलीच्या तोंडावर गोलाकार दाते असलेली खाच. त्या खाचेत पेरुच्या आकाराची गोलाकार काच बसवलेले छोटे कंदील अधिक सुरक्षित... रात्रीच्या वेळी पायखान्यात न्यायला जास्त सोप्पे... बुट्टी असलेले पायखानेही किती दिवस होते वीज नव्हती त्या काळात... त्या बुट्ट्या खालच्या खाली ओढून मैला वहाणारे कर्मचारी... अंगावर शहारा येतो आज...
रात्र म्हणजे काळोखाचं साम्राज्य... निबिड काळोखाचं... आज चकचकाटाचं साम्राज्य आहे... दिवसाही विजेचा चकचकाट असतो अनेक ठिकाणी.
तेव्हा अंधार पडून निजेपर्यंत काय करायचं लहान मुलांनी?... मग मावशीनं सगळ्याना माडीवर न्यायचं. मोठ्या बुधलीवरचा अर्धा, पाऊणफूट उंचीचा स्टँड कंदील लावायचा... हा कंदील रोज अंधार पडायच्या आत साफ करण्याचं रोजचं एक मोठं काम असायचं. कंदीलाच्या काचेवरची काजळी साफ करायची. कापडानं पुसून जात नसेल तर राखेनं घासून पुसायची. खालची राॅकेलची टाकी भरायची. जाड आडव्या वातीची काजळी खुडून वात वर ओढायची...
हा मोठ्ठा कंदील लाऊन भोवतीनं बालगोपालांनी बसायचं. मावशीनं गोष्टी सांगायच्या. कधी इस्पिटानं- इश्पिटानं- पत्त्यानं खेळायचं... माडीच्या खाली काळोखं माजघर. तिथे दिवसाही डोळ्यात बोट घालूनही दिसायचं नाही. त्याच्या मागच्या अंगाला स्वैपाकघर. रात्रीचा चुलीचा धूर, त्याचा वास, अन्नपदार्थ शिजल्याचे वास माडीचर येत असायचे...
मावशीला डबलड्यूटी -दुहेरी काम असायचं. स्वैपाकघर ते माडी अशा तिच्या फेर्‍या चालू असायच्या...
तिच्या दोन येण्यांच्या मध्यंतरात वडील भावडं भिंतीकडे बोट दाखवायची आणि धाकल्यांना 'भूत भूत' करुन घाबरवायची... कंदीलाभोवतीनं बसलेल्या सगळ्यांच्या सावल्या दुप्पट, चौपट मोठ्या आणि काळ्याभोर होऊन, शेणाने सारवलेल्या, गेरु किंवा चुन्याचे हात फिरवलेल्या भिंतीवर; दबा धरुन बसल्यासारख्या दिसायच्या...
मावशी येऊन दांडग्यांना आवरेपर्यंत आणि लहानग्यांना जवळ घेईपर्यंत हा खेळ चालायचा. माझं आजोळ या इथेच या आधी लिहिलेल्या मालिकेतल्या एका नोंदीत मावशीच्या जाण्याचा उल्लेख आला आहे...
स्मरणातल्या त्याच त्या गोष्टी परत परत आठवत रहातात... शोभादर्शक यंत्रातून बांगड्यांच्या काचांच्या तुकड्यांची मांडणी दरवेळी वेगवेगळी दिसते तशा. पहिल्यापेक्षा नंतरची मांडणी वेगळी आणि आणखी मनोहर, सुंदर... काही वेळा व्याकूळ, अंतर्मुख करणारीही...
मावशी देवाघरी गेली. सगळी वडील भावंडे या ना त्या कारणाने दुसर्‍या शहरी स्थायिक झालेली... आजी-आजोबा एकटे आणि म्हातारपणी अपत्यमृत्यूचा चटका. मध्यरात्री आजीला दार ठोठावल्या्चे आणि 'आई दार उघड, मी आहे!' असे आवाज एकू येऊ लागले. एकदोनदा तिनं आजोबाना मध्यरात्री दार उघडायला लावलं... मग एके दिवशी आजोबांच्या धाकट्या भावानं हे बिर्‍हाड गावातच आपल्या शेजारी हलवलं...
आमचे काका आजोबा त्यावेळी एका चौसोपी वाड्याचं कारभारीपण पहात त्याच वाड्यात रहात होते...
पुढे गावात वीज आली...
काका आजोबा रात्री चौसोपी वाड्याच्या कानाकोपर्‍यातले लाईट्स बंद करायला खोलीबाहेर पडायचे तेव्हा त्यांच्या हातात कंदील हेलकावत असायचा. शेवटचा  विजेचा दिवा बंद केल्यावर गुडुप अंधारातून खोलीत परतताना हेलकावणारा कंदील हे एक प्रत्ययकारी दृष्य होतं...
मला हे समजलं एक कथा वाचताना. काका आजोबांच्या मुलीनं, माझ्या दुसर्‍या मावशीने लिहिलेल्या..,
ती कथा मी फारसं समजत नसताना एका मासिकात बघितलेली आठवते. वाचली पण वरच्या दृष्याखेरीज काही आठवत नाही. आईला वाचनाचं वेड होतं तिनं मला ती दाखवली होती. मावशीचा अशा कथांचा संग्रह प्रसिद्ध झाल्याचं कालांतरानं कळलं पण तो काही पहायला मिळाल्याचं आठवत नाही. बघायला मिळाला असेल तरी त्याचं महत्व त्यावेळी न कळण्याची अवस्था अस्मादिकाची होती...
मी लिहायला लागल्यावर तुझ्या कथा वाचायला दे म्हणून मावशीला विचारलं, मागे लागलो. माझ्याकडे काहीच नाही रे त्यातलं असं मावशी तिच्या गोड आवाजात, हसत सांगत राहिली. मी पुन्हा पुन्हा आठवण करत राहिलो.
मावशी आता एका विद्यापिठातून मुख्य ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाली आहे.
मी मधल्या काळातल्या अभ्यासासाठी प्रदक्षिणाचे खंड आणले. कालाप्रमाणे साहित्यिकांची जंत्री, माहिती, महत्व अशा प्रकारानी हे खंड उपयुक्त आहेत. प्रदक्षिणा च्या दुसर्‍या खंडात ज्येष्ठ समीक्षक श्री. म. द. हातकणंगलेकर सरांचा लेख आहे. साधारण १९७५ च्या सुमाराला उदयोन्मुख असणार्‍या स्त्री कथालेखिकांमधे मावशीचं नाव आहे... सुमती जाधव
मी मावशीला हे सांगितलं... ती पुन्हा गोड हसली... कथासंग्रह आता मलाच शोधावा लागणार आहे...
माझ्य़ा आजोळच्या नात्यांचा आणखी एक कोन, आणखी एखादा पदर मला खुणावतो आहे, खेचतो आहे...
दिवेलागणीच्या या संवेदनेनं मला तिकडे चांगलंच ओढलं आहे...
माझं आजोळ हे माझं महत्वाचं संचित आहे... 
(सर्व छायाचित्रं आंतरजालावरुन साभार)