romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, June 5, 2013

कथा: भूक (३)

भाग १  आणि भाग २ इथे वाचा!
मान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा बाजार बघत बघत. घराकडे. घर... घराबद्दल- आपल्या- फार इमले रचले होते का आपण?... तसे सर्वसाधारणच तर होते! की ते सर्वसाधारण होते म्हणूनच... हे असं... तिची पावलं अडखळायला लागली...
छान कुटुंब असावं. छोटं, मोठं, कसंही. एवढं शिकून, उदार वातावरणात वाढून आपला ट्रडिशनलपणा सुटला नव्हता. परंपरागतता की परंपराप्रियता... अमुक एका करियरमागे धावायचं वेड नव्हतंच. सगळ्यात रस होता. स्वैपाक, घर आवरणं, मोठ्यांची, नवर्‍याची सेवा, त्याशिवाय स्वत;चं वाचन, शिवण, नाटक, सिनेमा बघणं... एवढंच नाही तर गप्पांमधे एखाद्या विषयावर आपलं मत ठामपणे मांडणं, चर्चा करणं... असं देव देव तरी आपण करू असं आपलं आपल्यालाच कधी वाटलं होतं?... परवा उषा राजेंद्रन भेटली तर बघतच बसली. कॉलेजमधे असताना आपण तिला सल्ला द्यायचो- भले देवावर विश्वास ठेव पण इतकं... आणि आता आपणच?...
ती घरात शिरायला आणि सासू दारातून बाहेर पडायला नेहेमीसारखी गाठ पडली. सासूनं हात उलटा करून तळव्याखाली मनगटावर बांधलेल्या घड्याळात निरखून निरखून पाहिलं. हुऽऽश्श! केलं. डाव्या तळव्यावर उजव्या हाताची आडवी मूठ आपटून टॉक टॉक असा आवाज करत, "कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, आम्हाला मात्र-" असं म्हणत पुढे गेली...
तिनं कान लक्षपूर्वक बधीर करून घेतले होते. आत आली. सासरे पेपर वाचत बसले होते. तिला बघून हसले. "जेवायला वाढू का?" असं तिनं विचारल्यावर, "असू दे! असू दे! वेळ आहे अजून. तुम्ही बसा!" म्हणाले...
ती मोरीत गेली. हातपाय धुतले. बाहेर येऊन देवासमोर आसन मांडलं. देव्हार्‍यातला स्तोत्रांचा गठ्ठा काढला. जपाची माळ काढली. वेलवेटच्या हातमोज्यासारख्य़ा पिशवीत हात घालून- दत्तगुरू, दत्तगुरू... मोकाट सुटलेल्या आठवणी त्रास देऊ नयेत म्हणून जप करायचा, नुसतं शंखासारखं बसून रहाता येत नाही म्हणून जप करायचा, नुसता जप करायचा म्हणूनही जपच... जप करताना तंद्री लागली की पुन्हा भूतकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ, भविष्यातला काळोख आणि जगणं हे असं... मरण्याचं धाडस नाही म्हणून... असलं सगळं दुष्टचक्र. ते आजवर इतक्या वेळेला फिरून फिरून अजिबात थकलेलं नाही. आणि आपण?... निदान एक घर मिळालं... नाहीतर आईबापाचं घर सुटलेलं, दुसरं आपण सोडलेलं म्हणजे लांडग्यांना पर्वणीच. लांडग्यांच्या नजरा आता हातात मंगळसूत्र धरलं तर आपल्यालाच सौम्य तरी वाटतील... एरवी काय झालं असतं?... लग्नाचं घर तुटलं म्हटल्यावर गरती बाई हा शिक्का पुसायला जग तयारच होतं- "हलवा परशुरामाला मी बैसले जपाला, बोला हो कुणी बोला..." भसाड्या आवाजातलं गाणं... दारातून येणार्‍या सासूबरोबर... मागोमाग ते टिपिकल हसणं... तिच्या कानात सुरीसारखं शिरलं. एरवी बधीर कानानं तशीच बसून रहाणारी ती, उठली. तेवढ्यापुरतीच आत आलेली सासू, "ए म्हसण्याऽऽ" असं कुणालातरी हाक मारत खिदळली, चालती झाली...      
(क्रमश:)   

No comments: