romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label television. Show all posts
Showing posts with label television. Show all posts

Thursday, March 1, 2012

'झुलवा' चा प्रवास...

’झुलवा’ १९८७-८८ ला संगीत नाटक ऍकेडमी, दिल्ली या मान्यवर संस्थेच्या त्यावर्षीच्या राष्ट्रीय लोककला महोत्सवात सादर झालेलं नाटक! या नाटकानं त्यावर्षी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर १९८७ मधे पश्चिम विभागीय महोत्सवात ते भारत भवन, भोपाळ इथे सादर झालं. त्या विभागीय महोत्सवातून ’झुलवा’ची राष्ट्रीय महोत्सवात निवड  झाली आणि जानेवारी १९८८ मधे ’झुलवा’ दिल्लीला कमानी ऑडिटोरियम या विशाल नाट्यगृहात सादर झालं. माजी मंत्री कै. वसंत साठे त्यावेळी आवर्जून हजर होते.
मुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, प्रसिद्ध जर्मन नाट्य दिग्दर्शक फ्रीत्झ बेनिवित्झ- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.
मुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्‍या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात नाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्‍यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही! ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली!  

माझ्या या ब्लॉगवर मी या आधी झुलवा या नाटकावर लिहिलं आहेच. माझ्या आयुष्यात झुलवा नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे असे मी मानतो. मी या नाटकाच्या प्रवासात काय शिकलो नाही? लोकांनी मला काय काय शिकवलं नाही? एक समूह, ग्रुप म्हणजे काय मजा असते, ती अमुक एका वयात आपल्याला सर्वतोपरिने कशी सांभाळते, आधार देते हे खूप समाधानानं अनुभवलं. या नाटकाचे झालेले दौरे चिरस्मरणीय राहिले आहेत. या संबंधात  कलकत्त्याजवळच्या बेलूर मठबद्दल या पूर्वी लिहिलं आहे.
नेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच (!) जागरूक असायचा! एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्‍या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्‍यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं  बरंच काही एकत्र करून इफ्तार पार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.
अशा मजा, गंमती किती सांगाव्यात? रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील! रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.  
माझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी (!) करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच (!) रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला (!) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्‍याला आणखी काय हवं? आयुष्यातला सर्वोच्च क्षण!
खरी मजा तर पुढेच झाली! झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का? वर का नाही? का वरच? काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था!) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम (!) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला  होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे? मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे!’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही!’ असं खरंच कसबसं मला तिला सांगावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली!
आणि काय सांगावं महाराजा! कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला! पुढे आयुष्य सुफळ संप्रूण (!) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच! :D
झुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं! त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं? काय आधी झालं? काय नंतर?...
माझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते! पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..

      

Monday, January 16, 2012

कॉमेडी शो: यल आणि डिविट्री (की यम आणि सावित्री?)

Saturday, January 14, 2012

कॉमेडी शो: रिझर्वेशन!

शाहीर:   सोंगाडे सायेब ओ सोंगाडेसायेब अवं थांबा की वाईच!
सोंगाड्या: कश्यापाय थांबू?
शाहीर:   आवो आवो आसं आंगावर काय येताय?
सोंगाड्या: मंग काय करू?
               शाहीर:   आरं! आरं! काय झालंय काय मला सांगा! आवो संध्याकाळ झाली. दिस सरला. गुरं रानाकडनं घराकडं परतायला लागली –
सोंगाड्या: मला बी जाऊद्या
शाहीर:   काटी न घोंगडं घेटल्याबिगर जाऊद्या हा हा हा...
सोंगाड्या: (चिडवत) हॅ हॅ हॅ हॅ. शाईर तुमास्नी सांगतोय ही चेष्टा करायची येळ न्हाई!
शाहीर:   (हाताचा आंगठा वर करत) मग कस्ली येळ ह्ये?
सोंगाड्या: च्या मायला आता काय करू?
शाहीर:   थांब थांब थांब गड्या. वाईच निवांत हो. काय झालंय? कोन चचलं? का कुनी अपघातग्रस्त हाय का? कुनी आजारी हाय का माज्या सोन्या?
सोंगाड्या: (रडत) काय सांगू शाईर. मला रिजर्वेशन दिना हो कुनी!
शाहीर:   रिजर्वेशन? हातिच्या! आत्ता दिऊ की! काय म्हनून पायजी रिजर्वेशन? म्हंजी कुटल्या कॅटॅगरीत पायजी त्येवडं सांग! मी द्येतू रिजर्वेशन!
सोंगाड्या: म्हॅनॅ मॅ द्यॅतू! अवो काय द्येताय? सोपं हाय व्हय त्ये?
शाहीर:   आरं येकदम सोपाय. हा हा हा... आंदोलन करायचं. पब्लिकच्या मालमत्तेची लुस्कानी करायची. पत्रकारांच्या दरवाज्यावर डांबर ओतायचं. तुला सांगतो आग्दी म्येट्येकुटीला म्हन्त्यात बग – म्येट्ये –
सोंगाड्या: म्येटाकुटीला. काय शाईर तुमी आशुद बोलायलाय.
शाहीर:   आरं म्येट्ये का म्येटा कायतरी कुतीला- आपलं ह्ये कृतीला याचं- आन आरक्षन मिळवायचं म्हंजी मिळवायचंच. आरक्षन मिळवणं म्हंजी माजा जन्मसिद्द हाक्कं हाय आन त्यो मी –
सोंगाड्या: ओय. इस्टॉप. आगुदर ही गाडी थांबवा.
शाहीर:   आदी हात दाकवा. हात दाकवा –
सोंगाड्या: आन आवलक्षान करून घ्या-
शाहीर:   ये थोबाड फोडीन. हात दाकवा गाडी थांबवा.
सोंगाड्या: अव पर तुमची गाडी तर भरधाव पळायाच लाग्ली!
शाहीर:   आरं आरक्षन हा मुद्दाच तसाय बाबा. भल्याभल्यांची गाडी पळाय लाग्लीया. हाईस कुटं?
सोंगाड्या: शाईर मला माज्या फ्यामिलीला आरक्षन पायजी. पर ह्ये नव्हं.
शाहीर:   आरक्षन पायजी! ह्ये नव्हं! म्हंजी मी काय समाजलो न्हाई गड्या!
सोंगाड्या: मला उन्हाळ्याच्या रजंत बायकूपॉरास्नी आमच्या हीच्या म्हायेरी घिऊन जायाचं ह्ये. मला त्ये आरक्षन पायजी.
शाहीर:   आरं मग जा की! लाईनीत उबं राह्याचं. तिकीट काडायचं का सपलं!
सोंगाड्या: काय सपलं? सोपं हाय व्हय त्ये?
शाहीर:   जगात काय सोपं आस्तंय राव. म्हेनत! म्हेनत! ती करायाच लागती!
सोंगाड्या: तीच करून करून घ्येरी याला लाग्ली. आता घरी जायलाग्लोय.
शाहीर:   भ्येटलं रिजर्वेशन?
सोंगाड्या: भॅटलॅ? अव आसं भ्येटायला त्ये काय वरच्या आळीचं गंप्या हाय व्हय? सदानकदा आपलं चावडीवर पसारल्यालं.
शाहीर:   मग पॉईंटाचा मुद्दा काय ह्ये?
सोंगाड्या: तुमास्नी काय राव सरकारी कोट्यातून भ्येटत आस्तील तिकीटं. तुमी ये ग्रेड आर्टिश्ट. आमची तिच्या मारी ग्रेड कंदी ठर्नार कुनास ठाऊक!
शाहीर:   सोंगाडे! मुद्याचं बॉला!
सोंगाड्या: मुद्याचं काय ह्ये मुद्याचं? दिसभर लायनीत उबं
राह्यलो. मी ज्या लायनीत उभा राह्यलो त्या खिडकीवरचा बाबू म्हन्ला मी दीड वाजता म्हंजी दीड वाजता माजी खिडकी बंद करनार!
शाहीर:   लंच टाईम आसंल.
सोंगाड्या: अव लंचटाईमला खिडकी बंद आस्तानाच मी
जाऊन उभा राह्यलो. चाळीसावा.
शाहीर:   अव लवकर जायाचं. काम कुनाचं ह्ये?
सोंगाड्या: समदी कामं आपलीच की वो! ती करून जाऊन
उभा राह्यलो. चाळीसावा लंबर.
शाहीर:   मंग?
सोंगाड्या: मंग काय मंग? त्यो म्हने दीड म्हंजी दीडला-
शाहीर:   त्ये समाजलं. पर का?
सोंगाड्या: आमी समद्यानी इच्यारलं पर का? ह्येड बाबू म्हनला हिशोबासाटी बंद. बंद म्हंजी बंद! दुसरे खिडकीम्ये जाव!
शाहीर:   हिंदीत?
सोंगाड्या: दम द्याला हीच भाषा वापरतात समदी!
शाहीर:   दुसर्‍या खिडकीच्या सामनं किती मानसं?
सोंगाड्या: आनकी चाळीस पन्नास.
शाहीर:   अवं गप काय बस्लात! आंदोलन करायचं!
सोंगाड्या: कटाळलेत लोक शाईर कटाळलेत! घुसनारे
घुसले. आंदोलन करनारे भांडत बस्ले आनि लायनीला मुकले!
शाहीर:   आनी तुमी?
सोंगाड्या: रांगंच्या शेवटी जाऊन बस्ले. आमचा हिंसेवर इश्वास
न्हाई शाईर!
शाहीर:   मंग कश्यावर ह्ये?
सोंगाड्या: पेशनवर ह्ये शाईर प्येशनवर!
शाहीर:   म्हंजी वाट बघन्यावर!
सोंगाड्या: वाट लागस्तंवर वाट बघन्यावर!
शाहीर:   आसं म्हनू नगा सोंगाडे. अव मग दीड वाजल्यापास्नं आता ह्ये संद्याकाळपातुर काय क्येलंत?
सोंगाड्या: (दुर्वा उपटल्यासारख्या खुणा करत) लोक लायनीत
हुबं राहून करत्यात त्येच!
शाहीर:   अवं यापरीस मंग दुसरं काय तरी करायचं. येकादा एजंट गाठायचा. त्ये ई तिकीट का काय म्हन्त्यात त्ये काडायचं. अव मायंदाळ सोई हाईत हात जोडून!
सोंगाड्या: तुमास्नी हात जोडतो शाईर. आता तरी घरी
जाऊद्या.
शाहीर:   आरं पर त्या रिजर्वेशनचं काय झालं श्येवटी?
सोंगाड्या: टोकनं दिल्यात टोकनं उद्यासाटी. आता परत उद्या
भीक मागायची रिजर्वेशनसाटी!
शाहीर:   आर रा रा रा... काय रं ही सामान्यं मानसाची
आवस्था. सादं सुटीत गावाला सुकासुकी जाता यिनाऽऽ
सोंगाड्या: काय सांगू शाईर. काय तरी करा शाईर! तुमच्यासारक्या सरकारदरबारी वजन आसनार्‍या मानसानं कायतरी कराया पायजी!
शाहीर:   करतू मी . करतू मी. या आदीवेशनात मांडतू
मी. नायतर आसं करतो आमच्या निवडनूक जाहिरनाम्यात-
सोंगाड्या: त्यापरीस आसं करा माजं मानधनाचं पाकीट –
शाहीर:   (विंगेत हात उंचावून) आरं गनपा ये गनपा आरं तुजं काय जालं बाबा? तुजा काय प्राब्लम जालाय? आसं काय तुजं तोंड? (निघून जातात)
सोंगाड्या: (मागे धावत) शाईर! शाईर! माजं पाकीट! पाकीट! थूत तिच्या मारी! येकांद डाव त्ये रिजर्वेशन सहज भ्येटंल तिच्यामायला. पर गावाकडचं रिजर्वेशन आनि शाईरांकडनं पाकीट भ्येटनं म्हंजी-छ्या छ्या: च्या मारी... (कपाळ बडवून घेत उभा रहातो)  
        ह्याच प्रहसनाचं अभिवाचन ऐकण्यासाठी इथे टिचकी द्या!

Thursday, October 27, 2011

माध्यमं.. मुलं.. समाज..

कार्टून फिल्म्स ज्यांच्या अत्यंत आवडत्या होत्या ती बालकं कालांतराने टीव्हीवरच्या कौटुंबिक मालिकांमधे रमली.आता ती बालकं सोशल नेटवर्कींग साईट्सच्या आहारी गेली आहेत.वेगवेगळी सर्वेक्षणं आणि त्यांचे प्रसिद्ध होत रहाणारे निष्कर्षं मनोरंजक असतात.त्यांमधे तथ्यंही असतंच.
लहान मुलं दूरचित्रवाणी मालिकांमधे काय बघत असतात, किंवा होती? चकचकीत घरं? सतत लग्नंसमारंभातले कपडे घालून वावरत असलेले स्त्रीपुरूष? त्यांची भांडणं? कट आणि डावपेच? असंख्य विचित्र नमुने एकत्र असलेली कुटुंबं? त्यातला कमीतकमी एखादा ते अनेक विकृत?... की मालिकांमधे दाखवल्या गेलेल्या लग्नसंस्थेतला किंवा कुटुंबसंस्थेतला अत्यंत महत्वाचा घटक अर्थात विवाहसंबंध?... आपण जाणते आहोत.जाणत्या लोकांसाठी त्यांच्यातल्याच जाणत्यांनी सार्वजनिक माध्यमांचा आसरा घेऊन केलेली प्रत्येक कृती भावी समाजमनावर परिणाम करणारी आहे हे आपल्या लक्षात येत नाही? की डेलिसोपवाल्यांनी, कॉमेडी शोजवाल्यांना, माईंडलेस (?) कॉमेडीवाल्यांनी रिऍलिटी शोजवाल्यांना बोल लावायचे आणि त्यांनी न्यूज चॅनल्सना? आणि मग त्यानी चित्रपट उद्योगाला? कलाकृती मांडण्याचं स्वातंत्र्य- फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि सामाजिक जाणीव यांची सांगड कोणी आणि कशी घालायची? साधारणत: दूरचित्रवाणीवरून सादर होणारय़ा सरासरी कार्यक्रमांना ’एक्सप्रेशन’ चा दर्जा देता येईल? असं प्रकटीकरण की ज्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलं म्हणजे फार मोठा आघात झालाय मानवी मूल्यांवर वगैरे?...
एकीकडे विवाहबाह्य संबंध अपरिहार्य आहेत असं चित्र दाखवायचं आणि दुसरीकडे निरांजनातली ज्योत विझणं, करवा चौथच्या दिवशी (हा हल्ली मराठी मालिकांमधेही सर्रास साजरा होतो) नेमकं अघटित घडणं, यासारखे तेच ते अपशकुन, यातून आपली बालकं काय बोध घेणार आहेत? विनोदासाठी कुटुंबातल्या एखाद्या आदरस्थान असलेल्या माणसाची संवंग पद्धतीने खिल्ली उडवणं यातून ही मुलं काय शिकणार आहेत? माणसाचं सबंध आयुष्य घडवणारय़ा सुरवातीच्या वर्षांत, संस्कारक्षम मुलांना जे बघायला लागतंय त्याची जबाबदारी आपल्यावर नाही? ती पार पाडायला आपण पालक हतबल आहोत, असमर्थ आहोत? मुलांनी बघू नयेत असे कार्यक्रम मुलांच्या तोंडावर बंद करण्याचं धारिष्ट्य आपल्याजवळ आहे? जरा जाणत्या मुलांना ’सोशल नेटवर्कींग साईट्सची सफर बस्स झाली आता! या महाजालातून आता लवकर बाहेर पड!’ असं सांगणं आपल्याला जड जातंय? मुळात आपलं आपल्या मुलांच्या हालचालींवर योग्य लक्षं आहे का? ते नक्की काय बघतात यावर आपण सतत लक्षं ठेऊ शकतो का? नाहीतर मग काय?..
विषयाला हात घालताना असे अनेक प्रश्नं समोर येतात.नेहेमीचेच वाटणारे पण नेहेमीच अनुत्तरित रहाणारे..
मुलं कार्टून बघत होती.त्यात दाखवलेल्या अतिरिक्त हिंसेमुळे मुलं हिंसक बनतात असं मत मांडलं गेलं.ही मुलं मग दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघण्यासाठी आटापिटा करू लागली. ’सतत विवाहबाह्यसंबंध ठेवायचे, मग विवाह का करायचा? संबंध असेच का नाही ठेवायचे?’ असे प्रश्नं त्यांच्या मनात, डोक्यात आणि मग कदाचित ओठांवर येऊ लागले.आता तर वर्ल्ड वाईड वेब त्यांच्यासमोर खुलं झालंय.. आता ती परस्परांमधे चॅट करतात.पडणारे प्रश्नं ते आपापसात सोडवतात.काय असतात त्यांची सोल्यूशन्स? कशावर आधारित असतात त्यांची मतं? माध्यमलोंढ्यातल्या त्या हातोडाबाज (हॅमरिंग) मतांवर? असलं हॅमरिंग की जे कुठल्यातरी वाहिनीचा, कुठल्यातरी व्यक्तीचा, कुठल्यातरी अतिरेकी राजकारणी, अतिरेकी धार्मिक समुदायाचा अल्पकाळाचा स्वार्थ साधणारं आणि सगळ्या समाजाच्या दूरगामी तोट्याकडे हेतूपूर्वक/अहेतूपूर्वक दुर्लक्ष करून सवंग पद्धतीने मांडलेलं असतं? जे कदाचित समाजाला खड्ड्यात लोटणारं असू शकतं?
मुलं परिपक्व होतील, योग्य, अयोग्य त्याना समजू शकेल अशा पद्धतीचे संस्कार आपणंच त्याना देऊ शकतो.माध्यमांमधलं चांगलं काय हे आपण मुलांना सांगू शकतो.त्याना त्या दिशेने वळवू शकतो.आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्याकडून तसं होतंय की नाही हे बघू शकतो.आपल्या दृष्टीआड असलेल्या सृष्टीबद्दल काय? जरा जाणती मुलं आपण दृष्टीआड होण्याचीच वाट बघत असल्यासारखी बसून असतात.त्याना स्वत:च्या बळावर, त्याना संपूर्ण मुक्त झालेल्या सृष्टीची मन:पूत सफर करायची असते.मग काय? त्याना तसं करू द्यायचं? असं करत करत, पडत, ठेचकाळतच ती शिकतील हे मान्य करायचं? मुलांना शिस्त कशी लावायची? मारणं, झोडणं कितपत योग्य आहे? आजच्या काळात? मग त्यांना मारण्याझोडण्या व्यतिरिक्त शिक्षा करायची? काय शिक्षा करायची?
मुलांना सतत कुठल्या न कुठल्या सकारात्मक कामात गर्क ठेवायचं!.. म्हणजे? त्यांना अनेक ऍक्टीविटी क्लासेसना, संस्कारवर्गांना घालायचं.शाळा, शिकवणीवर्ग आणि मग संस्कारवर्ग असं वेळापत्रक सेट करायचं? बस्स! मग काय चिंता? हा योग्य उपाय आहे? तो किती प्रमाणात व्यवहार्य आहे? सगळं करून झाल्यावरही आजकाल वेळ उरतोच मुलांना म्हणे! मग विरंगुळ्यासाठी त्यांनी नाही वळायचं माध्यमांकडे?..
पूर्वी वर्तमानपत्रं येतंच होती की घरी! त्यात नव्हते चोरय़ा, डाके, बलात्कार, खून? वर्तमानपत्रंही खुलीच होती की? चित्रपटही होते.नंतर ते दूरचित्रवाणीवरही आले.. पुस्तकं, मासिकं यायची की! वडलांच्या, आजोबांच्या खोलीत, कपाटात, टेबलावर विराजमान असायची! मुलं बागडायचीच की घरभर!..
जग बदलत चालंलय! मूल्यं बदलताएत! मूल्यांचा र्‍हास होत चाललाय! आणि त्याचवेळी जग आणखी आणखी जवळ येत चाललंय! एकत्र कुटुंब पद्धती उतरणीला गेलीय.कुटुंब लहान सुख महान म्हणत म्हणत घर म्हणजे एकट्या, एकाकी जीवांसाठीच्या प्रयोगशाळा झाल्या आहेत.कॉंक्रिटची जंगलं तयार झालिएत.यात रहाणारय़ा जीवांचं विरेचन कसं व्हायचं? त्यांनी व्यक्तं कसं व्हायचं? मुलांमधे जी प्रचंड उर्जा असते तिची घुसमट या मुलांना, आपल्याला, या समाजाला कुठे नेणार?
वळण, शिस्त लावणारी पालक मंडळी आहेत.टोकाची, प्रसंगी घरात टिव्ही, कॉम्प्युटरच न ठेवणारी पालकमंडळीही आहेत.वाचन, चित्रकला, नृत्य, वाद्यवादन असे छंद; छंद म्हणून जोपासायला उद्युक्त करणारी पालकमंडळी आहेत.त्यांच्या संख्येत वाढ होतेय.पण सर्वसाधारण चित्रं काय दिसतं? ’तुला शिकवणीवर्गासाठी लांब जावं लागतंय, घे हा मोबाईल!’ असं म्हणून त्याच्या हातात एकविसाव्या शतकातलं, नव्या सहस्त्रकातलं असं प्रभावी आयुध दिलं की आपलं त्या मुलावर, त्याच्या हातातल्या त्या वस्तुच्या वापरावर कितपत नियंत्रण रहातं? अपरिहार्य व्यवहारातून निरोगी मानसिकता कशी घडवायची?
मुलं चांगली असतात.समंजस असतात.पुढची पिढी अधिक समंजस आहे.त्याना जास्त कळतं.आपण सगळेच दिवसेंदिवस अंगावर येणारय़ा वेगवेगळ्या माध्यमप्रवाहांच्या लोंढ्यांशी स्वत:ला जुळवून घेत जगू शकू.आपल्या वातावरणाशी, सभोवतालाशी जुळवून घेत मानवजात आगेकूच करतेय.त्यातलं जे चिरकाल टिकणारं असेल, मानवाच्या पुढील प्रवासाला अनुकूल असेल ते टिकेल; बाकीचं नष्टं होत जाईल.
डार्विनचं तत्वज्ञान इथे लावता येईल?