romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, October 22, 2016

देवाणघेवाण: एल्विस प्रिस्ले टू पास्कल बाॅलिवूड!

वाॅट्सअॅप या लोकप्रिय माध्यमावर वायरल झालेल्या दोन चित्रफीती हे या ब्लाॅगनोंदीचं कारण... एक सुप्रसिद्ध पाश्चात्य गायक एल्विस प्रिस्लेची, दुसरी पास्कल बाॅलिवूडची...
पाकिस्तानी कलाकारांना इथल्या चित्रपट, मालिका या माध्यमांमधे संधी द्यायची/नाही द्यायची हा वाद चालूच राहील. वादांवर सर्वमान्य तोडगे निघाले तर समाज माध्यमं चालणार कशी?
सरकारने काही निश्चित कायदेधोरण इत्यादी ठरवावं या मतापासून कोणत्याही मानवाला जगात कुठेही जाऊन योग्यप्रकारे अभिव्यक्त होण्याचा मूलभूत अधिकार आहे, त्यात विरोध करण्यासारखं काहीच नाही; इथपर्यंत मतमतांचा गल्बला आहे. छाट्! अज्याबात नाही!!! हे मत लोकप्रिय दिसतं आहे...
चित्रपट व्यवहार हा बराचसा कुणाच्या मागे पैसा ओतायला कोण तयार आहे? या विचारावरुनच पुढे सरकतो आणि कोण किती पैसे कमावून देतो? यावर स्थिरावत असतो... असो...
या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सुवर्णकाळासंबंधातल्या दोन संगीत चित्रफीतींबद्दल काही बोलायचे आहे...
संगीताची देवाणघेवाण जगभरात चाललेली असते. हिंदी चित्रपटसंगीताने पाश्चिमात्य संगीत सरळ सरळ उचललं अशी अनेक उदाहरणं ज्ञात आहेत. काही संगीतकार देशीय- आंतरदेशीय उचलाउचलीतूनच महान झालेले आहेत...
इथे कलाकृतीचं बीज कुणालाही सुचू शकतं. सुचू शकणारं एकसारखंही असू शकतं. त्याचा घाट ज्याच्या त्याच्या नावावर जाऊ शकतो असं तत्व मांडलं जातं. कुठल्याही हिंदी चित्रपटावरुन जगात कुणी त्याचा पिच्चर उचलला असं उदाहरण अपवादात्मक आहे. माझ्याच एका जुन्या नोंदीत आशियाई चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या 'डेस्परेडो स्क्वेअर' या 'संगम' या हिंदी चित्रपटावर आधारित चित्रपटाबद्दल लिहिलं होतं...
याउलट उदाहरणं खूप आहेत.
रामायण, महाभारत, शेक्सपियरीन नाटकं इत्यादी कालातीत कलाकृती हा तर सगळ्यांसाठीचाच ठेवा आहे...
शंकरजयकिशन या सुवर्णयुगातल्या एका काळाच्या अनिभिषिक्त सम्राट द्वयीने एल्विस प्रिस्ले या गायकनटाच्या चित्रपटातल्या गाण्यावरुन 'झुक गया आसमान' या ज्युबिली राजेंद्रकुमार अभिनीत चित्रपटासाठी गाणं उचललेलं दिसतं. राजेंद्रकुमार यांचा गाण्यातला अभिनय हातवा-यांचा किंवा दोन्ही हात आळीपाळीने खालीवर करण्याचा असे. त्यात या गाण्याचा उपयोग दिग्दर्शक मेलोड्रामासाठी करतो...
एल्विस स्वत: गायक असूनही काहीच करताना दिसत नाही. पण त्याचं व्यक्तिमत्व आणि वावरणंच लाजवाब आहे. दिग्दर्शकानं यात केलेला लेवल्सचा आणि छोट्या मुलीचा वापर परिणामात भर टाकतो. त्यात एल्विसचं गाणं...
इथे इंडियन एल्विस प्रिस्ले म्हणवल्या गेलेल्या लोकप्रिय हिरोचीही आठवण येते. त्याला काय काय घुसळून नवनीत (?) काढावं लागत असे. इथे एल्विस लीलया परिणाम घडवतो. उर्सुला अँड्रेस आणि सगळं जग त्याच्याकडे बघत राहील यात नवल काय?...


दुसरी चित्रफीत पास्कल बाॅलिवूड या फ्रेंच कलाकाराची... 'भाभी' या १९५७ सालच्या चित्रपटातलं राजेंद्रकिशन रचित आणि चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेलं 'चली चली रे पतंग मेरी चली रे' हे गाणं पास्कल हेनी उर्फ पास्कल बाॅलिवूड ज्या तन्मयतेनं गातो ते बघण्याऐकण्यासारखं आहे. वाद्यवृंद आणि सहगायिका परिणामात इतकी सुयोग्य भर टाकतात की गाण्याच्या शेवटी पास्कल जितका खूष होतो तितकेच आपणही खूष होतो...
पास्कलचा देश फ्रान्स. तो कलेच्या मुक्त वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. बाॅलिवूडसंगीताला कला म्हणा, नका म्हणू पण पास्कलनं त्याच्या देशात संगीत आणि नाटक यांचं रितसर शिक्षण घेतलं. एका दौ-यासाठी तो मलेशियाला गेला असता 'जिंदगी एक सफर है सुहाना' हे किशोर-शंकरजयकिशनचं गाणं ऐकलं आणि तो भारावून गेला. परत जाऊन त्याने भारत, हिंदी भाषा इत्यादीचं शिक्षण घेतलं. आज तो भारतात येऊन बाॅलिवूडसंगीताचेच नव्हे तर बंगाली आणि तमिळ गाण्यांचेही कार्यक्रम करतो...
हिंदी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसंगीत आशियात लोकप्रिय आहे. परवा कुणी मलेशिया दौ-यावर गेलं असता तिथे सैराटची गाणीही सतत वाजत होती. इराण, अफगाणिस्तान, इजिप्त इत्यादी देशातही हिंदी चित्रपट लोकप्रिय आहेत. रशिया आणि राजकपूर हे जुनं नात आठवत असेलच.
हिंदी चित्रपटांचं मोठं ओवरसीज मार्केट आहे.
भारत ही सगळ्याच दृष्टीने जगाची मोठी बाजारपेठ आहे हे आपल्याला लागोपाठ झालेल्या भारतीय जगतसुंद-यांवरुन पूर्वीच लक्षात आलेलं आहे...
राहता राहिला प्रश्न राजकारण्यांचा. भले मोठे फ्लेक्सबोर्डस् , गळ्यात पाट्या अडकवणे आणि चित्रपटांवर बहिष्कार घालणं हे मतांच्या जोगव्यासाठी आहे...
मग काय करताय येत्या निवडणुकीत? ;) :p :D :D
तोपर्यंत पाहिल्या नसतील तर पहा या चित्रफीती!

Saturday, February 6, 2016

रणातला जनमेजय आणि इतर... २

भाग १ इथे वाचा!
जनमेजयानं मनातलं प्रस्थान प्रत्यक्षात आणलं खरं पण सहनिवासाच्या मुख्य द्वारी येऊन तो थबकला...
मोर्चे, मिरवणूक, जथ्था, जत्रा, यात्रा, वारी… काय म्हणायचं या सगळ्याला? त्याला सहनिवासाच्या प्रवेशद्वाराच्याही पुढे जाता येईना. सगळे रस्ते प्रवेशद्वाराशी आल्यासारखे. सगळेच येणारे. जाणारा तो एकटाच. असं कसं? चिवट इच्छाशक्तीनं मार्ग काढायचं ठरवलं. समोर येऊन ठेपलेले सगळे काळ्या कपड्यातले होते. काळे शर्ट किंवा झब्बे आणि काळ्या लुंग्या. अनवाणी. शर्टाची बटणं उघडी. चेहेरे रापलेले. पण तेही अस्ताव्यस्त दाढ्यांमधून ते दिसत कुठे होते? डोळे लाल. ते कश्यामुळे? सगळ्याच चेहेर्‍यांवर आलेली गुर्मी नैसर्गिक होती? की वेषांतरामुळे तसं वाटत होतं? हे वेषांतर होतं की- मनाला भरपूर फुरसत असते. पण काट्यांना नसते. त्यांना घाई पार्श्वभाग बडवण्याची- हे जमलेले सगळे कसला निषेध करत आहेत? स्वत:चा?- मनाच्या फुरसतीला दाबून व्यवहारी जनमेजय मेंढा झाला. डोकं वाकवून गर्दीत खुपसल्यावर सगळं सोप्पं. काळ्या गर्दीच्या अंगचटीला येत किंवा तिचं अंगचटीला येणं थोपवत त्याला पुढे जायचं होतं. काळी गर्दी संपली आणि भगवी कधी सुरू झाली? तीही संपली आणि तेवलेले लामणदिवे, पांढर्‍या काचोळ्या आणि लाल किनारीच्या साड्या, गजरे घातलेल्या गरत्या काळ्या ओबडधोबड स्त्रिया फुरसतीतले पद्न्यास कधी करू लागल्या? एवढ्या सकाळी? आणि तोपर्यंत एक लांबलचक गाडी चालवणारी बाई आणि तिच्यामागे अबब- नग्नं देह, बरेचसे म्हातारे, एकामागोमाग, व्हीलचेअरसदृश गाड्यांवर बसलेले, नेमक्या जागी मोरपिसांच्या चवर्‍या ठेऊन- आता पुढे काय- आपण पुढे जातोय ते कुठे- जनमेजय फंबलला. गर्दी संपली. ती कधीच संपणार नाही हे शपथेवर सांगणारं मन नंतर आलेल्या लांबलचक मोकळ्या मैदानामुळे गचकन ब्रेक दाबून थांबल्यासारखं झालं. हे मैदान रोज लागतं आपल्याला? की सगळी गर्दी आधीच शोषून घेतली गेल्यामुळे आता सगळंच ओकंबोकं झालं होतं? पुढचं दृष्यं बघून तो आनंदला. सगळे एकजात रिक्षाचालक मुतायला किंवा हागायला लागलेय पण होत नाहीये, करवत नाहीये अश्या अवस्थेत उभे. उकीडवे, डोक्याला हात लाऊन बसलेले. असं कधी होईल म्हणून जन्मेजयाने वाट बघितली होती. सतत चिडचिडून स्वत:च्याच हृदयाला खार लाऊन घेतला होता. त्याने आनंदाने गर्दीचं मनापासून अभिनंदन करायला मागे वळून बघितलं. अवघा रंग एकचि झाला होत. गर्दीचा. आणि अलिकडे प्ले ग्रुप या नावाने  प्रसिध्द आणि नावारूपाला आलेली शिक्षणसंस्था सुटून चिमुकली टिमुकली त्या रंगीत गर्दीच्या मागे धावत असलेली. तो त्या गर्दीकडे बघत राहिला...
क्रमश:

Thursday, January 28, 2016

रणातला जनमेजय आणि इतर... १

जनमेजय
जनमेजयानं प्रस्थान ठेवलं. मनात ते सकाळपासूनच ठेवावं लागे. रात्रभर ते ठेवण्याच्या विचाराने अनेकदा जाग यायची, दचकून. तशी ती अनेक कारणांनी यायची अनेकदा. आकृतीताईचा पुरू, आठ वर्षाचा, गगनग्रास सहनिवासातच जास्त रमणारा, रात्रभर लोळ लोळ लोळे सर्वभर आणि पेकाटात लाथ हाणत राही. रात्रभर. तो नसेल तर विभूतीताईची शर्मिष्ठा, सहा वर्षाची, झोप झोप झोपत नसे रात्रभर. तीही इथेच रमणारी. ती चुकून झोपलेली असेल तर समीक्षाताई पुण्याहून आलेली असे. तिच्या जुळयांना घेऊन चार वर्षाच्या. त्याना बघायला, त्यांच्या लीलांचं कौतुक करायला आख्खा गगनग्रास सहनिवास लोटे. रात्रभर. किंवा मग बाळंतीण मीमांसाताईचं तान्हंबाळ असेच. रात्रभर. काहीच नसेल रात्रभर तर मग समिधाताईचं मित्रमंडळ असे ख्या ख्या करत हॉलमधे.
जवळजवळ रात्रभर. किंवा मग किचनमधे माधवस्वामी आणि कृपामाई- जनमेजयाचे जन्मदाते-समिधाच्या लग्नासकट कुठल्या न कुठल्या विषयाचा खल करत बसत. पहाटेपर्यंत. किंवा मग जनमेजयालाच झोप लागत नसे. उगाचच. पहाटेपर्यंत. पहाटे डोळा लागावा मस्त आणि ओटीपोटात हुरहूर सुरू व्हावी सुखद, आणखी खाली सरकणारी, तर दचकून जाग यावी प्रस्थान ठेवण्याच्या विचाराने. तर असं हे प्रस्थान.
सकाळी सकाळ झाली म्हणून मनातल्या मनात ते ठेऊन तो उठला तर त्याला कळलंच नाही आधी कुठल्या दिशेनं जावं. मग ते ध्यानात येतंय तर वाट सापडेना बाहेर पडायची. समिधाताईच्या मित्रमंडळींपैकी कुणीतरी, आकृतीताईचा नवरा, मीमांसाताईचा दीर, वरच्या चुलत चुलत गगनग्रासांकडचे पाहुणे अशी जनता आडवीतिडवी पसरलेली. नेहेमीप्रमाणे. बेसिनपर्यंत जातोय तर ब्रश कुणीतरी पळवलेला.  नेहेमीसारखा.  आंघोळीसाठी स्वतःचा टॉवेल शोधतोय तर तो आधीच ओलागिच्च. नेहमीच्या प्रथेप्रमाणे. चहाची वाट बघतोय तर आई योगाच्या क्लासला. आणि नाश्त्याचं बघावं तर विभूतीताई आंघोळीला आणि आता कुठे झोपेला आलेली शर्मिष्ठा याच्या कडेवर. अशी जनमेजयाची अवस्था. त्या धबडग्यात पोटात कळ. संडासात आधीच गेलेला. जाणार असणारा. त्यांच्यामधूनच तीर मारणारा भलता. असं करत करत करत शॉवरचे चार शिंतोडे अंगावर घेऊन तो पुन्हा बेडरूममधे येतोय तर दारातच आकृतीताईच्या सौभाग्याने तंगडया दोन दिशांना पसरवलेल्या. स्वतःच्या घरी असल्यासारखं खाजवणं. आकृतीताईचा प्रेमविवाह. ती पदवीधर होऊनही बुध्दिनं शालेयच राहिलेली. तिचा कथाकथनाचा चमू. त्याच्या ध्वनिफिती काढून विकणं हा सौभाग्याचा प्रमुख व्यवसाय. त्याच्या दोन टांगांवरून खापरी खापरी करत, मीमांसाताईचा दीर, समिधाताईचा मित्र नं.१ यांचे हातपाय चुकवत जनमेजय कपडयांच्या कपाटाजवळ आला. ते उघडल्यावर खरी कर्तबगारी होती. पँटशर्ट अमाप होते. ताया सगळया या ना त्या कारणाने तेच देत. ते प्रमाणाबाहेर वाढले की आई त्याचे पैसे घेई. हल्ली कपडयांवर भांडे मिळायचे बंद झाले होते. कर्तबगारी पुढे होती. पुढचं शोधण्यात. टयूब लावायला बंदी. अंधुक उजेडात, कपडयांच्या कपाटात, माझी कुठली आणि कुणाकुणाची कुठली? गोष्ट छोटी मुद्दा गौण पण हातात आली ती घातली आणि चालला असं एकदोनदा झालं तेव्हा रात्रीपर्यंत कोण पंचाईत झाली. आपल्या दोन टांगांमधला टॉवेल अर्धवट पकडत अर्धवट सोडत तो हातात आलेल्या- ती आपलीच आहे याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत- तिच्याशी झटापट करू लागला. भेलकांडू लागला. पुन्हा सावरू लागला. ते करत असताना पुन्हा पुन्हा त्याचं लक्ष दारात पसरलेल्या त्या आडदांड तंगड्यांकडे, हापपँटीतल्या, उगीचच जात राहिलं. सुखी माणसाची हापपँट अशी असते. आडदांड तंगड्यांवर चढलेली. काळ्या. मागे बुधबृहस्पती पुढे प्रजापती. एवढंच कर्तृत्व. हा विचार आला म्हणून जनमेजयाला कसंतरीच वाटलं मनात. लोखंडी कपड्याच्या कपाटावर हात हलके ठेवून दार बंद करताना अंगावर चरा उमटवणारं त्याचं कुरकुरणं दाबून टाकत त्यानं या विचाराचं प्रायश्चित्त घेतलं. तोपर्यंत त्या अंधुक उजेडात कुणीतरी धडपडत उठला. मीमांसाताईचा दीर किंवा समिधाताईचा मित्र नं.२ किंवा आणखी कुणीतरी. अंधारात सगळे सारखेच. अंधारात म्हणजे अंधुक उजेडात. तर तो उठला. घड्याळात बघितलं. सुटला तो उलट्याच दिशेने. जनमेजयाला आडवा. दोघांच्या आट्यापाट्या. नंतर त्याला योग्य दिशा सापडणं. मागोमाग जनमेजयालाही. जनमेजय थोडा थबकलेला. किचनमधे जावं की सरळ बाहेरच पडावं आता. आईचा योगा म्हणजे बाहेरच पडावं. बा- बाहेर- ही निजलेले- या बहुतेक निजलेल्या. समिधाताईचा चमू. जरा जपूनच उड्या मारल्या नाहीत तर थेट विनयभंग. टींग- टॉंग- टींग- आलंच कुणीतरी- अजून?- जनमेजयानं दार उघडलं. दारात माधवस्वामी- जन्मदाते आणि त्यांचे बैठकीतले मित्र. पीजे. आता एकापाठोपाठ. हं! सुरू… असं जनमेजय मनात म्हणाला आणि माधवस्वामींच्या दोस्तांनी जनमेजयाला समोर बघताच त्याचं नाव, त्याचं वय, घरातलं स्थान, क्रम, त्याचं वागणं, रहाणं सगळ्यावर विनोद सुरु केले. त्याची वाट अडवून. पूर्वाश्रमीचे स्वयंसेवक आता आपला वेगळा गट बनवून प्रात:बैठका घेणारे. बरेचसे एका उपासना ट्रस्टचे विश्वस्त. आपल्या बहुमूल्य मताला धार्मिक आधार असणारे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. त्यांच्या अध्यात्मिक विनोदातून फिल्टर होऊन जनमेजय सदनिकेबाहेर पाय ठेवतोय तर कानांवर जन्मदात्याचा खाकरा आवाज, आरे… लवकर ये आज! बंड्या- मग दोस्तांकडे नजर जाऊन माधवस्वामी कंटिन्यू- बंडू रे- आज बंडू गगनग्रासाच्या मुलीला पहायला येणारेत… हा बंड्या गगनग्रास म्हणजे नक्की कोण? चुलत चुलत चुलता की- याचा शोध एकदा घेतलाच पाहिजे- हा बंड्या तर मग तो- नाही नाही- तड लावलीच पाहिजे- असं मनाला समजावत आणि मानेने जन्मदात्याला होकार भरत तो टणाटण गगनग्रास सहनिवासाच्या पायर्‍या उतरु लागला. वाटेत अनेक गगनग्रास किंवा इथून तिथून गगनग्रास, मागावर असल्यासारखे किंवा वाट अडवल्यासारखे- तेच चुलत चुलत इत्यादी- त्याना चुकवत, हुलकावत, वेळच तशी, सगळ्यानाच घाई, कामवाल्यांना, चुकारांना, बेकारांना आणि रिकामांनाही. तड जनमेजयाला आत्ताच लावता आली असती हा रवि आणि हा जयद्रथ करुन. कुठला गगनग्रास नक्की कुठला याची. कारण सगळे याच वेळी एकमेकाला आडवेतिडवे होणारे. पण घडाळ्याचे काटे जनमेजयाच्या पार्श्वभागी रुतत तरी होते, घुसत होते किंवा पार्श्वभाग ते बडवून तरी काढत होते. नेहेमीप्रमाणे. तो रस्त्यावर उघडणार्‍या मुख्य फाटकाजवळ थडकला त्यांचा मार खात- गगनग्रासांचा आणि काट्यांचा- आणि थबकला...
क्रमश:

Friday, January 22, 2016

युनिक फीचर्सच्या अनुभव जानेवारी २०१६ अंकात ’गुरुजनां प्रथमं वंदे’ कादंबरीबद्दल...

युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांचे मन:पूर्वक आभार.
लेखकानं स्वत:चं पुस्तक प्रकाशित करणं हे एकांड्या शिलेदारीचं काम असतं. 
युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांनी अनुभवच्या जानेवारी २०१६ च्या अंकात गुरुजनां प्रथमं वंदे या कादंबरीची 'पुस्तक शिफारस' या स्तंभात तत्परतेने दखल घेतली. 
वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या कामात अशा प्रकारचं सहाय्य हा सगळ्यात मोठा हातभार असतो. 
युनिक फीचर्स तुमचे मन:पूर्वक आभार!

Monday, January 18, 2016

नजरेतून अभिव्यक्त होणं...

नजरेतून व्यक्त होणं हा कॅमे-यासमोरच्या अभिनयाचा महत्वाचा भाग आहे.
नजरेतून व्यक्त होणं, चेहे-यातून व्यक्त होणं, आवाजातून व्यक्त होणं, हातवारे, हालचालीतून व्यक्त होणं हे सोईसाठी सुटंसुटं समजलं गेलं तरी संपूर्ण देहातून व्यक्त होणं हे अभिनयाचं मर्म आहे.
एरवी एखादा एखाद्या अंगाने आपसुकच चांगला व्यक्त होत असतो. या कामात आपण यशस्वी होतोय हे त्याला जाणवू लागतं. तो बनचुका होऊ लागतो.
व्यावसायिक क्षेत्रात अशा एखाद्या यशस्वी अंगाची शैली बनते. लोक त्यावर फिदा होत असतात. ते करणारा स्वत:वर फिदा होऊ लागतो. मग ते हास्यास्पद होऊ लागतं.
पूर्णपणे भूमिकेत शिरणं, स्वत:चा संपूर्ण कायापालट करणं ही खूप मोठी साधना आहे. काही जणांमधे असं करण्याची क्षमता उपजतच असू शकते पण म्हणून सततच्या साधनेचं महत्व कमी होत नाही.
सर्वसाधारणत: भूमिका वठवण्याच्या दोन ठळक पद्धती मानल्या जातात. भूमिका काय आहे हे समजल्यावर आतूनच तिची तयारी चालू होणं. आधी आत्मा गवसणं आणि मग भूमिकेला शरीर मिळणं अशी एक पद्धती मानली जाते तर भूमिकेबद्दलच्या कलाकाराच्या आकलनानुसार  शरीर, आवाज, हावभाव आधी नक्की करुन भूमिकेच्या आत्म्यात शिरायचा प्रयत्न चालू करणं ही दुसरी पद्धती मानली जाते.
अभिनयात तंत्राचा भाग खूप आहे. केवळ उत्स्फूर्ततेवर कायम अवलंबून रहाता येणं शक्य नाही.
अभिनयासंदर्भात काही जण केवळ उत्स्फूर्ततेचा उच्चार करत असले तरी त्यानी तंत्र घोटवून अगदी सहज वाटावं इथपर्यंत मुरवलं असल्याचं ध्यानी येतं.
नजरेतून यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी संपूर्ण कायापालटाची गरज असते तरी नजरेचा वापर कसा करावा याचीही तंत्रे आहेत.
मी शिकलो ते एकांकिका नाटकं करत करतच. प्रत्यक्ष नाट्यशिक्षणवर्गातून शिकणं कायम मला हुलकावणी देत राहिलं.
पण मला सुरवातीलाच एक हाडाचा शिक्षक म्हणा, तालिम मास्तर म्हणा लाभला. नवीन माणूस अभिनयाला जरासा अनुकूल वाटला तर त्याला त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे कसा तयार करायचा हे कसब त्याच्याकडे होतं.
एका जुन्या जमान्यातली कालांतराने पडझड होऊन अज्ञातवासात गेलेली चित्रपटनायिका प्रमुख पात्र असलेल्या एकांकिकेत मी एक फारसा वाव नसलेली भूमिका करत होतो. लेखक-दिग्दर्शक तुलनेनं नवीन होता. माझ्याकडून त्याला हवं ते काढून काढून तो दमला. त्याचं आणि वर वर्णन केलेल्या हाडाच्या शिक्षक- तालिम मास्तराचं याबद्दल काही बोलणं झालं असावं. तालिममास्तर दुस-या दिवशी तालमीला आला. माझ्या सीनची तालिम सुरु झाली. चार पाच वाक्यांचा माझा काही भाग होता. ती वाक्यं मी कशी अभिव्यक्त करायची हे सांगत असताना त्याने नजरेचा प्रवास उलगडूनच दाखवला.
मी करत असलेलं पात्र नायिकेशी बोलत असतं असा प्रसंग होता. सुरवातीला त्या पात्राची नजर नायिकेच्या चेहे-यावर आहे. तिच्याशी बोलत असताना ते पात्र त्या दोघांच्या गतायुष्यात शिरतं. पात्राचा चेहेरा आणि त्याची नजर नायिकेच्या चेहे-यावरुन निघून प्रेक्षागृहावर प्रवास करु लागते. त्यानंतर ते पात्र त्या आठवणींमधे रमतं. नजर प्रेक्षागृहावर एका काल्पनिक बिंदूवर स्थिरावते. हरवते. या तंत्राचा सराव करायला लागल्यावर माझा ताण बराच कमी झाला. त्या प्रसंगापुरतं तरी मला भूमिकेच्या अंतरंगाकडे जाणं सोपं वाटू लागलं.
भूमिका केवळ ती सादर करणा-यालाच पटून चालत नाही तर समोरच्या प्रेक्षकांना ती पटवून द्यावी लागते. नजरेच्या प्रवासासंदर्भात पात्र गतकालात गेलं आहे, ते विचारात पडलं आहे, ते तंद्रावस्थेत गेलं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी यथार्थपणे सादर करण्याचं तंत्र असं एकिकडे पात्राला भूमिकेत शिरायला मदत करतं आणि प्रेक्षकाला वास्तवाजवळ नेतं. तालिममास्तर हे अचूक करुन दाखवायचा. समजावून सांगायचा...
कालांतराने एका मालिकेत काम करत असताना एका देखण्या नटाला कॅमे-यामागे आणि कॅमे-यासमोर पहाण्याची संधी मिळाली. कॅमे-यामागे तो सतत वात येईल इतपत बडबड, चेष्टामस्करी करत असायचा. हातात सीनचे कागद असायचे. कॅमे-यासमोर गेल्यावर मात्र त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला असायचा. भावदर्शन तर तो उत्तम करायचाच पण प्रेक्षकाला टीव्हीची चौकट नेमकी केवढी दिसते याचं चांगलं भान त्याला असावं. आपण कल्पिलेल्या त्या चौकटीच्या अवकाशात तो नजरेचा प्रवास मांडायचा. माॅनेटरवर तो सीन बघताना त्या सीनमधे तो करत असलेल्या पात्राला काय म्हणायचं आहे ते अचूक कळत असे. पुढे त्याला हिंदी महामालिका मिळाली. त्यात त्याचा हा प्रवास बघणं रंजक तर होतंच पण शिकवणारंही होतं...
नजरेत भय, आश्चर्य, भेदकता, अंगार इत्यादी ढोबळ भावना दाखवून लोकप्रिय होण्याचा एक काळ होता. त्याकालातले हरवलेले काही आजही सापडतील. पण नजरेतून व्यक्त होणं हे केवळ तेवढंच नक्कीच नाही.
नजरेचा यथार्थ वापर अभिनयात करताना, नजरेच्या प्रवासाचं हे तंत्र अभिनय करणा-याला भूमिकेच्या विचाराच्या सतत सान्निध्यात ठेवायला मदत करणारं आहे.
हे सगळं आठवलं एका ताज्या मालिकेतल्या एका तुलनेने नवोदित अभिनेत्रीला नजरेचा वापर यथार्थपणे करताना बघून... जे या माध्यमात विरळाच बघायला मिळतं...
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

Monday, January 11, 2016

कथा: 'तोरण' 'कान्हेरी' दिवाळी अंक २०१५

तेव्हाच मी टोकलं होतं अभ्याला... तोरणाचं म्हणाला तेव्हाच. म्हटलं आज तोरण म्हणेल. उद्या म्हणेल मापच ओलांड. परवा आणखी काही म्हणेल. उदाहरणार्थ, आला श्रावण आता वगैरे, वगैरे.. आधी रहाणारच किती वेळ या जागेत आम्ही .. इन मिन तीन- साडेतीन महिने, एका वर्षभरात. चार- साडेचार महिने म्हणजे डोक्यावरुन पाणी. दोघे मिळून एकत्र रहाणार त्याहीपेक्षा कमी काळंच. मी हॅम्बुर्ग, जर्मनीत. तो कॅनडात- ओटावामधे. पण त्याचं म्हणणं माझं पहिलं घर. माझ्या स्वत:च्या मालकीचं. म्हणजे मी अर्धी मालकीण होतेच. त्याच्या मान्यतेची गरज नव्हती. तोही नाकारत नव्हता म्हणा. तर, दोघांनी मिळून हवं तसं बाविसाव्या मजल्यावरचं, जिम, गार्डन विथ भला मोठा राऊंड जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल असं सगळं असलेलं घेतलं घर. ते घ्यायलाही पार शहराच्या त्या टोकापर्यंत जावं लागलं. मी नकोच म्हणत होते. बड्जेट आणखी वाढवूया म्हणाले. इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ घेऊया म्हटलं तर अभ्याचं म्हणणं, नको. राष्ट्रीय उद्यानाजवळ पाहिजे... आणि तोरणाचं म्हणाल तर तोरण म्हणजे शुभसुरवातीचं एक प्रतिक, माझ्या दृष्टिने... बस्स...
मला... केवळ तोरण इत्यादी माझा प्रॉब्लेम नव्हता. एखाद दुसर्‍या अशा परंपरेमुळे मला फरक पडत नव्हता, काही ऑबजेक्शन नव्हतं. पण अभ्याचा प्रवास मी जज करत होते. अभ्या त्यात खरा उतरताना दिसत होता. त्याचा विचार मला करायला लागत होता...
अभ्यानं मग केलंच हाऊस वार्मिंग. मी हॅंबुर्गला असताना. मला कळल्यावर अर्धातास स्काईपवर झापला त्याला. केलंसच का? मी नसताना का? असताना का नाही?... काय उत्तर दिलं असेल? म्हणाला, केळकरगुरुजींना वचन दिलं होतं ना... वचन??? कसलं वचन?... आणि गुरुजी कसले आमच्याच स्कूलमधे होता तो शिक्या... शिक्या केळकर. कसा होता, काय होता, त्याला आता काय स्टेटस झालंय... ते जाऊ द्या... नेमकी तेव्हा मोठी आत्या होती माझ्याजवळ. जर्मनी पहायला आलेली. म्हणाली, “तुलाही दिलं असतं वचन तुझ्या त्या अभ्यानं, सप्तपदी घातली असतीस तर... आता काय उपयोग? भाऊ बिचारा कंटाळून गेला शेवटी!” इथे गेला वर चांगलाच जोर दिलेला. “भाऊला वाटलं आज ना उद्या घालशील तू सप्त-” ती गळा काढायच्या बेतात होती अगदी. ते काय ते नक्राश्रू की काय म्हणतात तसलं. मी लगेच तिला आणखी एक साईट दाखवली टुरिझमची. सगळं विसरली.
अभ्याचं हे काही नवीन नव्हतं मला. समजुतीनंच घेत गेले. कसं असतं, सोशिकबिशिक असतोच आम्ही पहिल्यापासून. एवढंतेवढं ॲडजस्ट करणं हा व्यवहार आहेच. दोन्हीकडून समजूत असली की फ्रिक्शन रहात नाही- म्हणजे काय ते- हं, संघर्ष! संघर्ष रहात नाही. संघर्ष- अभ्याचा शब्द. तो असे, गांभीर्य, संघर्ष असे शब्दं सहज वापरतो येता जाता. सुरवातीला बरा होता अभ्या. ओटावाला सेटल झाल्यापासून जरा वाढलंच त्याचं. इथे नव्हता तेवढा तसा झाला तो मातृभूमीपासून दूर गेल्यावर. बरंच गांभीर्य का काय ते बाळगून बाळगून...
मला भेटला अभ्या, त्या आधीपासून माझे मित्र होते. त्याला माहित होते. मान्य होते. काळाच्या ओघात आणखी होणार हे ही तो जाणून होता. ॲज द टाइम पासेस यू नो... ही हॅड हिज सेट ऑफ प्रायरिटीज... मी कधीच चॅलेंज नाही त्याला. बट हिज लव फॉर द ट्रॅडिशन... नॉट लव आय से, बट ऑब्सेशन- सॉरी- काय होतं बोलताना, नॅरेट करताना, बरंच इंग्लिश येतं माझ्याकडून. आय ट्राय टू अवॉईड, बट यू नो... हा कामाचा भाग आहे. हॅम्बुर्गला तर इंग्लिशही नाही जास्त चालत. जर्मनच. एकदा तुम्ही ग्लोबल झालात की हे आलंच. मग तुम्ही वर्ल्ड लिटरेचर वाचायचं, वर्ल्डली व्ह्यूव्ज समजून घ्यायचे की... आय आय अग्री... तुम्ही तुमच्या मुळाकडे प्रवास करायला लागता. मला आठवतं की माझं आजोळ! ते खेडगाव. जिथे आमचं रान होतं. शेती होती. आमचं म्हणजे माझ्या मामालोकांचं. आईला हिस्से दिले प्रॉपर. तिची अपेक्षा नसतानाही. आम्ही जात नव्हतो शेंदूर फासलेल्या म्हसोबाला? खेडेगावी राह्यचो चार दिवस तेव्हा रोज जायचो. पण म्हणून काही कोणी तेच धरुन उलटा प्रवास करत नाही. यू टर्न.. ऑर से अबाऊट टर्न...
हे हे म्हणाले मी अभ्याला तेव्हापासून आमचं जरा... “अबाऊट टर्न करु नकोस तू अभ्या!”... मी स्पष्ट म्हणाले. माझा स्वभावंच तसा आहे. ते जुन्या बायकांसारखं सजेस्टीव- काय ते सूचक- पुन्हा अभ्याचा शब्द.. नाय बोलता येत यार आपल्याला. थेट हृदयाला का काय म्हणतात तशी साद घालायची... तेच अभ्याला आवडलं नव्हतं माझ्यातलं?! थेट विचारलं होतं मीच. आर यू अग्री टू लिव विथ मी?... त्यानंच वेळ घेतला. आय वॉज डॅम शुअर अबाऊट मायसेल्फ! मला आत्मविश्वास यायला वेळ लागत नाही. निर्णय घ्यायला त्याहून नाही. आय लाईक्ड हिम. होते मला मित्र. सगळ्या थरातले होते समाजातल्या. इच अन एवरी स्ट्राटा. मी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधे होते. आरटीआय वर्कर म्हणून काम करत होते... खूप इंटरेस्ट होता मला त्या सगळ्यात. हत्त्या झाल्या काही माहिती अधिकाराच्या अधिकारासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांच्या तेव्हा मी बराच फॉलोअप केला होता.. सिंगल हॅंडेडली... मग गवर्मेंट टॉपल झालं. नवं राज्य आलं. ते सहिष्णू की काय ते असेल, असं जनमत तयार झालं.. पण अंदरकी बात- तशा बर्‍याच होत्या- बाता... मला उमजायला लागल्या होत्या... सगळ्यात राहून राहून. वयही वाढतं ना... मुलींचं लवकर वाढतं म्हणायचे पूर्वी... समज येतेच... मला आलीच. मग मी हळू हळू बस्तान हलवलं जर्मनीला. इथली नाळ तोडायची नव्हती. जॉब अपॉर्च्युनिटी, वाढत चाललेलं वय, काम करण्यायोग्य परिस्थिती सगळ्याचा विचार होत जातो. ब्रेन ड्रेन म्हणा अथवा ब्रेन गेन म्हणा... अभ्या स्कॉलर होता. त्याची वाट तीच असणार होती. त्याला तर नाळ अजिबात तोडायची नव्हती...
...मला भेटला अभ्या तेव्हा एका अभ्यासगटात होता. जरासाच गंभीर. आतासारखा गांभीर्य कोळून प्यायल्यासारखा नव्हता. वेकेशनमधे एका एनजीओशी अटॅच्ड होता. हाईक्स, ट्रेक्स करत होता. इनसंस भावला होता त्याचा तेव्हा. निरागसता- त्याने सांगितला हा शब्द नंतर कधीतरी. मला ज्याम म्हणजे ज्याम आवडला होता तो शब्द... अभ्यासुद्धा. न आवडण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यात... माझ्यातही... मला लग्न करायचं नाही ह्यावर मी ठाम होते. हां! हे कदाचित माझ्यातलं न आवडण्यासारखं होतं. बर्‍याच जणांना नाही आवडलं. भाऊंना देखील सुरवातीला अभिमान वाटायचा. भाऊवहिनी दोघांनीही वाढवलं मला ओपन वातावरणात. एकदम खुलं. मोठी आत्या टॉम बॉईश म्हणून टोमणे मारत रहायची. मी माझा अभ्यास, अवांतर वाचनाची पालकांनी लावलेली गोडी आणि माझं उपजत कम्युनिकेशन स्किल यात मश्गुल होते. म्हातार्‍याकोतार्‍यांशीही माझी चट्कन मैत्री व्हायची. अभ्याचं माझ्या उलट. अभ्या स्वत:तच असायचा. ग्रुपमधे असूनही एकटं असणं जमायचं त्याला. माणूसघाणा नव्हता. बोलायला, चेष्टामस्करी करायला लागला की भरभरुन करायचा आणि लगेच कसा काय बुवा डिटॅच्ड होतो हा?... मी एकदा ओठांचा चंबू की काय तो करुन त्याला विचारलं हे. तर तो आपला इसेन्स ऑफ इनसन्स... निरागसतेची दैवी मूर्ती. मग मला कळलं त्याला स्वत:ला त्याच्याबद्दलचं हे ठाऊकंच नव्हतं ओपिनियन. मग तो म्हणतो की त्यानं हळूहळू स्टडी करायला सुरवात केला स्वत:चा... मीही सुरवात केली दरम्यान त्याच्यासारखं डिटॅच्ड होण्याची. अलिप्त होण्याची. योग्यवेळी. योग्यप्रकारे. फार वाहून घ्यायचे मी स्वत:ला सगळ्यात. आणि मग त्रास मलाच व्हायचा. बुद्धी आणि भावना फार तरल आहेत तुझ्या- भाऊ म्हणायचे. वहिनी- म्हणजे माझी आई भाऊंच्या उद्गाराच्या मधे ’नको तेवढ्या तरल’ अशी पुस्ती जोडायची. कधी चिडलेली असताना कधी मज्येत... एकत्र कुटुंबातनं विभक्त कुटुंबात आले भाऊवहिनी त्या काळी. यावं लागलं. बरीच कारणं होती. मुळात डिसइंटिग्रेशनचा काळ होता तो. ही दुसरी पिढी त्यांची. भावंडांतला मोठा म्हणून भाऊ. भावंडं वहिनी म्हणायची म्हणून आम्हीही वहिनी म्हणायचो आईला. चंद्या- चंदन माझा धाकटा भाऊ आता युएसला असतो. वेल सेटल्ड. नो झिकझिक. इकडचा गणपती युएसमधे नेऊन जश्याचा तसा बसवावा तसंच. सगळं तसंच. वाईट काय म्हणा. सुखी आहे तो. ते महत्वाचं... तो असा कसा झाला चंद्या?... त्याचं त्याला माहित. भाऊवहिनींनी त्यालाही कधी आडकाठी केली नाही. वेळोवेळी समजुतीचे चार शब्द सांगितले मात्र...
तर... अभ्या आवडला. अभ्याला निक्षून सांगितलं लिव-इन म्हणजे लिव-इन. कितीही आवडलेला असलास तरी. अभ्यानं बराच विचार केला. घरी वगैरे सांगितलेलंच असावं. विचारही घेतले असावेत कुणाकुणाचे. मी कुणाचेच विचार घेतले नाहीत. माझा निर्णय सांगितल्यावर कुणी कुणी ते आपणहून दिले. भाऊवहिनींसकट. भाऊवहिनी मला प्रमाण होते. ते दोघेही मनाने खुले. दोघांच्या मनात कुचकुच असावी असं मला जाणवत होतं. कधी ती कमी दिसायची कधी जास्त. डिसकशन्स व्हायची. त्या डिसकशन्सचा एंड त्याना माहित असायचा. शेवटचं माझं भरत का काय ते वाक्य त्याना माहित असायचं. माझ्या दृष्टीनं विषय भरकटायचा नाही. त्यांच्या दृष्टीनं मी काही वावगं करणार नाही हयाबद्दल ते निश्चिंत होते...
वावगं... या शब्दावर माझी बरीच मतं आहेत. ती धाडसी वाटावी अशी आहेत नक्कीच. पण ती माझी स्वत:ची आहेत. मी ती अभ्यास करुन कमावलेली आहेत. अभ्यास म्हणजे पुस्तकी नव्हे. प्रत्यक्ष. इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस- समाज विज्ञान संस्थेत होते तेव्हा बरेच सर्वे केले. सगळ्या राज्यभर हिंडले. स्त्री हा विषय अध्याहृत असणारच होता... अनेक आयुष्यं बघितली. अशा आयुष्यांचं अवलोकन करत असताना आपण स्वत:लाही असेस करत असतो. कळत नकळत स्वत:बद्दलची धोरणं ठरवत असतो. मी मला नकळत वाटत असलेल्या गोष्टींनाही कागदावर मांडत गेले. लग्न न करता रहाणार्‍या मुलींचं वाढतं प्रमाण कुणाच्याही नजरेत भरण्यासारखं होतं. मी त्यामागची अनेक कारणं शोधली. नक्की काय गोची होते आहे? गोची होते आहे का नक्की?... इथपासून अनेक उलटसुलट प्रश्न स्वत:ला, संस्थेतल्या प्राध्यापकांना, विविध क्षेत्रातल्या दिग्गजांना वेगवेगळ्या निमित्ताने विचारुन पाहिले...
एक मुख्य मुद्दा लक्षात आला प्रौढ कुमारिकांच्या प्रत्यक्ष जगण्यातला. स्वत:चं मन मारुन जगण्याचा. त्यात अनेकांसाठी म्हणून जगणार्‍या होत्या. विशिष्ट करियर फक्त कवटाळून जगणार्‍या होत्या. स्वत:च्या खाजगी इच्छांना तिलांजली देऊन जगणार्‍यांची संख्या प्रमाणाबाहेर होती. मी ते नाकारलं. पहिली नाकारली योनीसुचिता... हे तुम्हाला धाडसी वाटण्यापुरेसं नक्की आहे... योनिसुचिता न पाळणं आणि स्वैराचार करणं यात फरक आहे हे इथे मुद्दाम नमूद करते...
अभ्या लिव-इनला तयार झाला, त्याच्याच शब्दात विचार मंथनानंतर, त्याचं नाही म्हटलं तरी मला आश्चर्यच वाटलं... ‘तुला अभ्याच का आवडला?’ हा प्रश्न अनेकांनी मला विचारला, विचारतात. मी आधीच सांगितलंय एकमेकाना न आवडण्यासारखं आमच्यात काही नव्हतंच. शिवाय सामान्य संसार्‍यांप्रमाणे जन्मोजन्मीची ही गाठ नव्हती. लिव-इन कक्षेत आम्ही स्वतंत्र होतो... हे विधान जरा विचारपूर्वक करतेय मी... एकत्र या, रहा, वेळ आली की विभक्त व्हा हा जरी लिव-इनचा मूलमंत्र मानला जात असला तरी सढळपणे, सवंगपणे (दोन्ही अभ्याचे शब्दं) त्याचा वापर करायचा नाही असं मी ठरवलं होतं. अभ्यानंही. तर... अभ्या आवडला. या आवडण्याला मला तसं एक्झॅक्ट लॉजिक सापडलं नाही, हे कबूल करते. मग तुम्ही अपोझिट पोल्स अट्रॅक्ट इचआदर म्हणा, प्रेम आंधळं असतं म्हणा.
अभ्याचं माझं इंटरॅक्शन, संवाद कितपत होता?... व्यवस्थित होता. एकमत होतं. माझ्या निरपेक्ष, खुल्या इत्यादी मनोवृत्तीला त्याचा आक्षेप नव्हता. होत्या त्याच्यात परंपरेशी जुळत रहाणार्‍या ट्रेट्स. त्याचं मला काही वावडं नव्हतं.
आमचं बॅकग्राऊंड, वाढलो ती परिस्थिती भिन्न होती. मध्यमवर्ग म्हणून एक टॅग असला तरी त्यात आपल्याकडे जात, मग तिच्या अनुषंगाने जडणघडण, व्यवहार, बोलचाल, जेवणखाण यात फरक असतो. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोण आपलेच पालक, आप्त पूर्वग्रहांनी वेढून टाकतात... इति अभ्याच... अभ्या कामगार वस्तीसारख्या वस्तीने वेढलेल्या मध्यम उच्चमध्यम भागातला. त्यांचं घर परंपराप्रिय होतं. सुखनैव सगळं चाललं होतं. कष्टातून वर आलेलं कुटुंब. व्यवहार आणि आधुनिकतेशी नात जोडणारंही होतं ते. त्याचे बाबा व्यवहारी होते. माणसं प्रिय असलेले. सणांच्या निमित्ताने अनेक कुटुंब या कुटुंबाशी जोडलेली. गावगाड्याशी अजूनही चांगलाच संपर्क होता... अभ्या स्कॉलर निपजला आणि तो आणखी काही डिग्रीज वर आला. मुख्य प्रवाह- हा त्याचाच शब्द- आता त्याला जवळचा होता... अभ्यासगट, ट्रेक, हाईक्स, वाचन, मित्रमंडळं, चर्चा... सगळ्यात छान गुंतला. म्हणून तर आमची भेट झाली...
अभ्याला त्याच्या परिस्थितीनुसार आम्हाला हवा होता तो निर्णय घ्यायला वेळ लागणं अपरिहार्य होतं... आमची थांबायची तयारी होती. तेव्हा आमच्या दोघांच्याही डोक्यात ग्लोबल होण्याचं नव्हतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वेगवेगळ्या रचनात्मक कामात दोघेही व्यस्त होतो. अभ्या माझ्यापेक्षा वयाने लहान होता- दोन, चार वर्षांनी. एक... zeal होती त्या वयात. दोघांच्याही ठिकाणी. लौकिकापेक्षा ज्ञानार्जन, भवताल समजून घेणं यात गुंततो नं आपण तसं...
हळूहळू भवताल बदलत असतो. बर्‍याच वेळा त्याची गति भल्याभल्या म्हणणार्‍यालाही थांग न लागणारी असते.
आम्ही एकत्र राहू लागलो. शहरात लगेच काही स्वत:ची जागा स्वत:च्या बळावर घेण्याची कुवत नसते कुणाची. दोघे मिळून असलो तरी. इनवेस्टमेंट्स वगैरेचा विचार अभ्याच्या डोक्यात होता. त्याचं कुटुंब, भावंडं होती. माझ्या डोक्यात तो विचार अजिबात नव्हता. अभ्या नोकरीला लागला. ती करून तो स्टार्ट अप लॉन्च करण्याच्या प्रयत्नात होता. मित्रांच्या मदतीने. ती सगळी उलाढालच होती. लायसन्सेस, हजारो परवानग्या, जागा... अशा कामांचा मला फारसा गंध नव्हता. मी सोशल सायन्सेस शिकवत होते. फिल्डवर्क करत होते... अभ्या अस्वस्थ होता. स्टार्ट अप्स तेव्हा काही कॉमन नव्हत्या... रेंटवर रहायचं, तेही शहराच्या मध्यभागात, कारण दोघांचाही कनविनियन्स... तेवढा रेंट भरायला प्रॉब्लेम नव्हता. डिपॉझिटची खटपट अभ्यानंच केली. माझा शेअर उभा करताना मला पहिल्यांदा कळलं गुंतवणूक इत्यादीचं महत्व...
आम्ही मजेत होतो. ठेवणारे नावं ठेवत होते. बर्‍याच नजरा मला सहन कराव्या लागत होत्या. अभ्याला अनाहुत सल्ले मिळत होते. लिव-इन शहराच्या आमच्या भागात तरी नवीनच होतं की. महानगर म्हटलं तरी...
आमचं खाजगी आयुष्य कसं होतं?... मी हे जरी ब्लॉगवर लिहून तुमच्यासमोर सादर करत असले तरी अनेकांसारखं सगळं पूर्णपणे सोशल साईट्सवर उघडं करणं मला मान्य नाही. मी स्पष्टवक्ती असले तरी. पहिल्यांदा एक क्लिअर करते... आम्ही दोघंही नऊ ते पाच किंवा दहा ते सहा आणि मग रात्री दहा-बारा अशा जातकुळीतले नव्हतो, नाही. हे मला कुणाला डिग्रेड करायचं, कमी लेखायचं म्हणून सांगत नाही पण आमचं सहजीवन सरासरी असतं तसंच नव्हतं. सेक्शुअल लाईफ समाधानकारक व्हायला काही काळ जावा लागतो तसा आमचाही गेला. दोघांनाही पुर्वानुभव होता. घरासंबंधातली कामं दोघात आपोआप वाटली जात. वॉशिंग मशीन येईपर्यंत कपडे सरळ लॉंड्रीला जात. खर्च झाला तरी सुटसुटीतपणा अपरिहार्य होता कारण रुटीन इतरांच्या मानाने जास्त जबाबदारीचं होतं. नुसती नोकरी करायची नव्हती. एकेकदा मी पाहिलेली, तेव्हा तुरळक असलेली जोडपी बर्‍याच काळानंतर कन्फ्युज होत. हे आपण लिव-इनमधे रहातोय की लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे रहातोय हे त्याना कळायचं नाही. काही वेळा दोघांचे आप्त चान्स घ्यायचे. बर्‍याचदा लिव-इनचं लग्नात रुपांतर व्हायचं... ह्या सगळ्यात अमुक चांगलं तमुक वाईट असं काही नाही पण सर्वसाधारण असं होत होतं असं म्हणता येईल. काही हा पार्टनर सोडून दुसरा असं सहजगत्या करत पण ते विशिष्ट क्षेत्रातले असत. विशिष्ट वर्गातले असत. आम्हीच बरोबर होतो असा माझा दावा नाही. शिवाय लिव-इनही इतकी रिजिड- बांधीव टर्म नाही असं मला वाटतं. अशा सोशल इश्यूजचे अर्थ माणसा, वर्गा, समूहाप्रमाणे वेगळे असू शकतात, लावले जाऊ शकतात...
घरातले सणसमारंभ हा एक मुद्दा होता. अभ्यानं स्वत:च माझ्याबद्दल घरी स्पष्ट करुन टाकलं. ती माझी लग्नाची बायको नाही. तिला जमेल, पटेल, रुचेल तशी ती सगळ्यात भाग घेईल. मी विरुद्ध घरातल्या इतर बायका असा सामना मी माझ्या हुशारीने संपवला. पलटवलाच नाही तर समंजसपणे सोडवला. घरातल्या, अभ्याच्या कुटुंबाशी संबंधित गावगाडयातल्या जवळजवळ प्रत्येक स्त्रीशी माझं चांगलं नातं तयार झालं. मला काय म्हणून संबोधायचं?- कॉमन प्रश्न. मी म्हणाले मला सरळ माझ्या नावाने हाक मारा. त्याना सुरवातीला जड गेलं सगळंच. त्यांच्या नजरा, माझ्या पाठीमागे त्यांचे माझ्या आणि अभ्याविषयी अभिप्राय, बोलणं, हसणं सगळं मी माझ्या स्वभानुसार सहज घेतलं, पेललं. मला सार्वजनिक जीवनाची सवय होती. ती इथेही कामी आली...
सभोवताल बदलत असतो. आपण वयाने वाढत असतो. काही घटनांचे दूरगामी अर्थ जेव्हाच्या तेव्हा आपल्या टाळक्यात शिरतातच असं नाही. आपल्या संबंधितांमधे होणारे बदल आपण पूर्ण तटस्थपणे पाहू शकतो का?... आपल्या आयुष्यात महत्वाचं काही वळण येतंय हे लक्षात आल्यावर आपल्याला मागचे सगळे संदर्भ, सगळे अर्थ जुळताएत असं वाटतं का?...
महानगरात बॉंबस्फोटांची मालिका झाली तेव्हा मी नुकतीच ग्रॅज्युएट झाले होते. अभ्या कॉलेजमधेच असेल. आम्ही भेटलो तेव्हाच त्याचं इंजिनियरींग संपण्याच्या बेतात होतं... ती बॉंबस्फोट मालिका म्हणजे फार मोठा हादसा होता तो महानगरासाठी, इथल्या सामान्य लोकांसाठी. थेट प्रत्यक्ष संबंध न आलेल्यांसाठीही. गोदीतला मोठा बॉंबस्फोट ऐकले पाहिलेली मागची पिढी होती. पण ह्यावेळचं सगळं निराळं होतं... मी खोलात जात नाही. पर्यायानं हे बरंच ताजं आहे. अनेकांच्या स्मरणात आहे. एखादा पक्ष सत्तेवर येण्यासाठी एखादं कॅंपेन करतो. ते धर्मावर अधिष्ठित असतं. त्याचा जोर वाढत जाऊन एक फार खोलवर परिणाम करणारी घटना घडते, घडवली जाते... त्याचा पडसाद म्हणून महानगरात एकाच वेळी दुर्दैवी स्फोटांची मालिका घडत जाते. सामान्य, ज्यांचा या सगळ्याशी प्रत्यक्ष, अर्थाअर्थी संबंध नाही ते यात हकनाक भरडले जातात...
अभ्या, मी भेटलो तेव्हा आम्ही एका ग्रुपमधे भेटत होतो. माझे असे अनेक ग्रुप्स होते. अभ्याचा हा पहिलाच सोशल ग्रुप असावा. शाळा, कॉलेज, आपण रहातो तिथला ग्रुप असे प्रत्येकाचे असतातच. सर्वांगाने वेगवेगळी मुलं मुली असणारा या अर्थाने मी सोशल ग्रुप अशी टर्म वापरते आहे. सगळे वर्ग, वर्ण, जाती इत्यादींनी बनलेल्या समाजाबद्दलचं भान आपल्याला अशा समुहामधनं, अशा वेगवेगळ्या समुहांमधनं येत असतं. मी अनुभवी, बोलकी आणि समाज हा अभ्यासाचा विषय असल्यामुळे व्यक्त होत असे. अभ्या तुलनेने नवीन होता. अबोल होता. ऐकण्याचं काम तो उत्तम करत असावा. त्याचे पूर्वग्रह असतील, ग्रुपमधल्या चर्चा ऐकून नवे ग्रहही तयार होत असतील. त्यानं आपलं वाचन या काळात प्रयत्नपूर्वक वाढवलं.
आमच्या सगळ्याच सामान्यांच्या दृष्टीने त्या घटनेनंतरच्या काळात एक शांत मध्यंतर आलं... सगळे वैयक्तिक आयुष्यात स्थित्यंतराच्या प्रक्रियेत होते. आम्ही दोघं भेटू लागलो. फिरु लागलो. अभ्यानं नोकर्‍या केल्या. त्याला स्टार्ट अपचा किडा सुरवातीपासून चावला होताच... आम्ही एकत्र राहू लागलो. त्यानंतरचं सगळं वर आलंच आहे...
करियरमधेही आम्ही प्रगती करतच होतो. देश परदेश यांतल्या सीमा आता आमच्यासारख्यांसाठी पुसट होत होत्या. आम्हा दोघांमधे चर्चा होत. त्या इंटेन्सही असत. अनेक विषय, पुस्तकं, चित्रपट, नाटकं या सगळ्यांबद्दलच्या. मी बर्‍याचदा त्यातली जास्त जाणकार व्यक्ती असायचे. अभ्या ऐकून घ्यायचा. पटलं नाही तर बोलायचा.
नवं सरकार, अणुचाचण्या, सरकारातला त्रिशंकूपणा, घोटाळे, वेगवेगळ्या पक्षांचे उदय, नवे अजेंडे हे सगळं चालू असताना आमचं प्रत्येकाचं आपापल्या कामासाठी परदेशी जाणंयेणं चालू राहिलं...
हे सगळं तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलंय. तेच ते सगळं सांगत रहाण्यात काही हशील नाही. मला पोचायच्या मुद्याकडे जाण्यासाठी मी बांधत असलेल्या साखळीच्या या कड्या आहेत...
... तर माझ्या आता असं लक्षात येतंय की हळूहळू धार्मिकता, तिच्या अंगाने होणारं राजकारण, त्याचे दूरगामी आणि मूलगामी परिणाम याबद्दल मला काही निश्चित संकेत मिळायला सुरवात झाली. भवतालातूनच. मी माझ्या परखड, फटकळ म्हणा स्वभानुसार सामाजिकरित्या, खाजगीत अभ्याबरोबर व्यक्तही होत होते. माझ्या आता असं लक्षात येतंय की धार्मिकता, राजकारण आणि धार्मिकता अशा मुद्यांवर माझं- त्याच्या भाषेतलं प्रवचन- सुरु झालं की अभ्या गप्पच बसत असे...
या त्याच्या गप्प बसण्याच्या अर्थ मला लगेच का लागला नाही? मी माझ्या व्यक्त होण्यातच मग्न होते? मी अभ्याला गृहित धरलं होतं? अभ्याला त्याचं स्टार्ट अपचं क्षेत्र सापडलंय आता तो त्यात व्यस्त होतोय, ते सगळं उभं करण्यासाठी त्याला पूर्णपणे त्यावरच केंद्रित व्हावं लागतंय... एवढीच त्याच्या बाबतीतली माझी समज राहिली?... त्याचं या विशेष इश्यूबद्दल काही वेगळं मत होतं तर ते तो मांडत का नव्हता? मला दुखवायचं नाही म्हणून? मी त्याचं मत मानणारच नाही म्हणून? की त्याचं स्वत:चं काही निश्चित धोरण चाललं होतं त्याच्या मनाच्या तळात?...
दरम्यानच्या काळात आम्ही आपापल्या क्षेत्रात जास्तीत जास्त व्यस्त होत गेलो. आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली की सततचा प्रत्यक्ष सहवास आणि वर्च्युअल सहवास यात फार काही वेगळं नाही असं आम्हाला, मला वाटायला लागलं? की अनेक वर्षांच्या सहवासामुळे एक अलिप्तपणा येऊ लागतो, फिजिकलीही आपण आपोआप अंतरानेही दूर होऊ लागतो?...
याच दरम्यान आमचा फ्लॅट झाला. दोघांनी कर्ज काढून. तोरण, हाऊस वार्मिंग इत्यादी... तेव्हाही अभ्यानं सगळं लाईटलीच घेतल्यासारखं दाखवलं?... मी लग्नाची बायको असते तर त्याचा पवित्रा वेगळा झाला असता?... आम्ही दोघं आपापल्या व्यवसायाच्या देशात आता जास्त काळ व्यतीत करत होतो...
या, यानंतरच्या काळात तुम्हाआम्हाला माहित अनेक असलेल्या घटना घडलेल्या आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा भेटत होतो तेव्हा एकमेकांच्या सहवासात मोकळे होत होतो. गप्पा, चर्चा, ग्रुप्स, मित्रमंडळी सगळं सगळं त्या त्या वेळी अतिशय नॉर्मल पद्धतीने, माझ्यामते चालू राहिलं होतं...
आमच्या दोघांतला नेमका सल अभ्यानं आधीच जाणला होता? तू तुझ्या मार्गावर मी माझ्या मार्गावर असलो, असले- तरी आपण अभंगच रहायचं असं त्यानंही ठरवलं होतं?... की त्याचं काही वेगळं धोरण आतल्याआत ठरत होतं?... तो अतिशय कनींगली ते त्याच्यापाशी ठेऊन आहे?... आणि मी मात्र सगळं खुलं ठेऊन वावरते आहे... असंच आहे सगळं?
आजच मला हे सगळं तीव्रतेने का जाणवतं आहे?... मी माझी तीव्रता व्यक्त करत सुटायचं आणि अभ्यानं ती आत वळवून ठेवायची?... गाठीला बांधून?...
बर्‍याच काही तुम्हा- आम्हाला माहित असलेल्या गोष्टी घडल्यात भोवतालात. अनेक मोठे धर्माधिष्ठीत हल्ले झालेत, दंगली झाल्यात... दंगल थांबवू शकणारा पण तसं न करणार्‍याला जेव्हा सर्वेसर्वा पद मिळतं... अनेक शिकले सवरलेले, तरुण, प्रौढ आनंदाने त्याचं गुणगान गाऊ लागतात... मला आश्चर्य वाटू लागतं... पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल साशंकता वाढू लागते... अभ्या यांच्यातलाच आहे?... तो माझा आहे म्हणून मी त्याला वेगळा मानते आहे?... बदलत चाललं आहे सगळंच? समाजसुधारकांच्या हत्या होतात... त्यांचे तपास अधांतरीच रहातात... याबद्दल अभ्याचं नक्की काय मत आहे?...
माझ्या स्वभावाप्रमाणे मी जास्त वाट पाहिलेली नाही तुम्हाला सांगते...
मी आणि अभ्या भेटतो आहोत. लवकरच. मला काही गंभीर बोलायचंय, अशा माझ्या संदेशाला अभ्यानं होकार दिलाय. हे समाज माध्यमांचे दिवस आहेत. आम्ही दोघंही समाज माध्यमातल्या साईट्सवर सतत हजर नसतो. पण तरीही कळत नकळत माझं निरीक्षण चालू असतं. समाज हा माझा जवळचा विषय. अभय, त्याचे व्यवसायातले आणि इतर मित्र यांच्या चॅट्स मला वाचायला मिळतात. व्यावसायिक म्हणून अभ्याला माझ्या शब्दात- काही प्रमाणात तरी बोटचेपं रहावं लागणार -हे मला मान्य आहे. पण... ही पण नंतरची टिंबं मी आमच्या भेटीत अभ्याकडून समजून घेणार आहे...
लग्नाशिवाय एकत्र रहात असतानाही काही गोष्टी सहन करायच्या असतात, पाळायच्या असतात. मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही केवळ नऊ ते पाच काम करुन एकत्र रहाणारे नाही. तरी एकमेकांच्या सवयी एकमेकाला आपापल्या सवयीच्या करुन घ्याव्या लागतात. ते दरवेळीच तितकं सोप्पं असत नाही. साध्या साध्या गोष्टी वेगळं होण्याच्या मार्गावर आपसूक नेऊ शकतात.
यापेक्षाही मला या संबंधात असं जाणवतं की खोलवरच्या तुमच्या मानसिकता एकमेकांशी जुळतात का? तुम्ही सहजगत्या, प्रेमाने त्या जुळवून घेता का?... खोलवरच्या मानसिकतेतून वरचे, वरवरचे सगळे विचार, कृती प्रकट होत असतात. माझी एक ठाम मानसिकता आतापर्यंत तुमच्या लक्षात आली असेल. दूरगामी सामाजिक परिणामांबद्दल मी वैयक्तिक आयुष्यातील परिणामांइतकीच दक्ष आहे... काकणभर जास्तच...
अभ्याबद्दल मला संदेह आहे... आम्ही भेटतो आहोत... त्यानंतर कदाचित आमच्या दोघांची नवी सुरवात होईल. शुभ सुरवात.
आजवर या ब्लॉगवर समाजासंबंधातले माझे विचार तुम्ही वाचलेत, प्रतिक्रिया दिल्यात. आज मी माझ्या वैयक्तिक जीवनासंबंधी पहिल्यांदाच व्यक्त होतेय... तुमच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत... मी वाट पहाते आहे...
पुढची ब्लॉगपोस्ट, तुमची उत्सुकता असेल, तर माझ्या आणि अभ्याच्या भेटीनंतर नक्की... गुडबाय...