romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, February 28, 2012

बालनाट्याच्या गावा जावे..

सुरवातीलाच स्पष्ट करतो, जरा गंमत म्हणूनच बघा या प्रकाराकडे. म्हणजे एखादं लहान मूल बघतं ना त्या नजरेने. विषय अर्थातच खूप खूप वर्षापूर्वी सादर केलेल्या बालनाट्याचा आहे. बालनाट्य म्हटलं तरी ते लहान मुलांसाठीचं नाटक म्हणून कमी महत्वाचं मानता येत नाही हे मलाही या बालनाट्यात सहभागी होताना समजलं. लहान मुलाना सहज समजावं, त्यांची मस्तपैकी करमणूक व्हावी आणि त्यानंतर त्याना त्यातून काही (शिकायला) मिळावं असा सर्वसाधारण उद्देश या नाटकांमागे असतो. मी ज्या नाटकाबद्दल बोलतोय तो काळ पंचवीस वर्षापूर्वीचा आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आणि त्याही आधी बालनाट्यांची, सकस बालनाट्यांची रेलचेल होती. अनेक मान्यवर लेखक खास मुलांसाठी म्हणून नाटकं लिहित होते. बालांसाठी, बालकुमारांसाठी असे वेगवेगळे विषय असलेली ही नाटकं असत होती. अगदी सहज तोंडावर येणारी नावं म्हणजे रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर ही. इतर अनेक संस्थाही आपापल्या परीने उत्साहानं ही नाटकं करत होत्याच. नाटक क्षेत्राचं आर्थिक गणित एकूण कधीच समाधानकारक राहिलेलं नाही. तेव्हा त्यावेळीही ही मंडळी अशी नाटकं कशी करत असतील त्यांचं त्यानाच माहित! अशा सर्वांना मनापासून सलाम! प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती स्थिती आणि लय अपरिहार्य असते. मी अभिनेता म्हणून वावरत असलेल्या संस्थेचा तो स्थितीचा काळ असावा. मुंबईत तेव्हा एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटकं, राज्य नाट्यस्पर्धा आणि अर्थातच व्यावसायिक नाटकं यांचा एक सशक्त प्रवाह जोमानं वहात होता. अनेक वर्षांनंतर अलिकडच्या काही वर्षांमधे तो पुन्हा नव्या जोमानं, ताकदीनं आलेला दिसतो. त्याचं कौतुक मराठी माणसाला असणारच! त्यानाही सलाम!
कुठल्याही क्षेत्रामधे सतत भर पडत रहाणं आणि ती सशक्त असणं महत्वाचं असतं. रंगभूमीच्या बाबतीत एकांकिका, दीर्घांक, प्रायोगिक आणि हौशी नाटकं त्यानंतर व्यावसायिक नाटकं असा प्रवास सर्व रंगकर्मींच्या मनात सर्वसाधारणपणे असतोच. आमच्या संस्थेने थोडसं पुढचं पाऊल टाकायचं असं ठरवून ’इंद्रधनूच्या गावा’ हे बालनाट्य सादर करायचं ठरवलं आणि एक आख्खं नाटक करायला मिळणार म्हणून आम्ही आनंदित झालो नाही तरच नवल. त्याच्या वर्तमानपत्रात आलेल्या अभिप्रायांची कात्रणं या पोस्टमधे दिसताएत. एका विशिष्ट जागी संस्थेच्या नाटक- एकांकिकांच्या तालमी चालायच्या. त्या जागेसमोरचा रस्ता ओलांडला की एक प्रतिथयश वसाहत होती. काही सहकारी जे स्थानिक होते त्यानी त्या वसाहतीतली जवळ जवळ वीस एक मुलं जमवली. त्या सगळ्यांच्या पालकांची परवानगी काढायला सगळा संस्थेतला वर्ग घरोघर गेला. वसाहत मोठी होती आणि मुलं चुणचुणीत होती. सगळी अर्थातच नवीन. संस्थेतले कलाकार आणि ही मुलं अशा संचात हे नाटक बसणार होतं, सादर होणार होतं. परिसराजवळच असलेल्या एका नावाजलेल्या आणि जुन्या शाळेतले एक कलाशिक्षक बालनाट्य प्रकाराशी संबंधित होते. त्यानी हे नाटक लिहिलं.

त्याकाळातलीही ती हुशार मुलं. ज्याना लहान मुलांच्या ’किलबिल’ कार्यक्रमापेक्षा फिल्मी गाण्यांचा ’चित्रहार’ जास्त आवडणारा. ती आवड लक्षात घेऊन सॅंतॉक्लॉज या मुलांना चित्रहारसाठी एकत्र करतो. मुलांना चिऊकाऊची गोष्टं दाखवली जाते. मग शेतकरी मालक, हट्टी मालकीण आणि त्यांची गाय आणि म्हैस यांची गोष्टं. ज्यात नेहेमीच मालकाच्या उलट बोलणार्‍या, कृती करणार्‍या आणि चुकीचं वागणार्‍या हट्टी मालकीणीला  मालक कसा धडा शिकवतो ते दाखवलं जातं. सरतेशेवटी एकलव्याची परंपरागत गोष्टं सांगितली जाते. हुशार मुलांना एकलव्याचा पराभव अजिबात आवडत नाही मग मुलंच एकत्र येऊन ज्युडो-कराटेच्या (हे प्रकार त्यावेळी चांगलेच लोकप्रिय होत होते) सहाय्याने एकलव्याच्या गोष्टीला न्याय देऊन ती दाखवायला लावतात अशी वेगळी थीम या नाटकात बांधली होती. सोबत नाच, गाणी अगदी इंद्रधनू प्रकाशात सादर केली गेली. वयानं मोठ्या कलाकारांपेक्षा लहान मुलंच बाजी मारून जातात असं यावेळीही अर्थातच लक्षात आलंच.
या नाटकात मला मालक मालकीणीच्या गोष्टीत शेतकरी मालकाची भूमिका मिळाली. गावरान बाजाची भाषा लहानपणी कानावर पडलेली असल्यामुळं तो भाग जमला होता. गोष्टं विनोदी ढंगानं सांगितली होती. बोलण्यातून आणि हालचालीतून विनोद कसा व्यक्तं करायचा याचं शिक्षण पहिल्यांदा इथे मिळालं. जेमतेम दोन वर्षाचा अनुभव- मधल्या एक वर्षात आत्यंतिक अडचणीमुळे काहीच करता आलेलं नव्हतं. एक सुन्नपण आणि शून्यत्व आलेलं. या नाटकानं मनस्वास्थ्य सुधारायला मदत झाली. मोठी संधी मिळाली. बरंच नवं शिकायला मिळालं. दिग्दर्शकाबरोबरचं ट्यूनिंग काय असतं याचा अनुभव आला. ग्रामीण माणसाची, शेतकर्‍याची एक विशिष्ट चाल असते. एका तालमीत माझं लक्ष एकाग्र नसावं. ’तू शेतकरी नाहिएस आता, काय झालंय?’ असं दिग्दर्शकानं सांगितल्यावर आपण शेतकर्‍यासारखं चालत नाही आहोत. आताची आपली मोठी मूव्ह तशी झाली नाही हे लक्षात आलं. मग ती चाल चांगलीच लक्षात राहिली. बाकी, गाय आणि म्हैस (मानवी कलाकारांनी सादर केलेल्या) यांच्याबरोबर एक लाईव्ह गाणं काही अस्मादिकांना झेपलं नाही. गाण्याच्या नावानं आनंदच होता आणि नाचवजा हालचाली बर्‍या म्हणाव्यात तर त्यांची गाणं लाईव्ह म्हणण्यामुळं वाट लागत होती. मग ध्वनिमुद्रित गाण्यावर निभवावं लागलं. तेही बर्‍याच अंशी कसबसं निभवलं. सरावानं जमलं. मुंबईतल्या चिखलवाडी गणेशोत्सवाच्या मंचावर मी आधी एन्ट्री घेणार तर माझ्या म्हशीनं मलाच विंगेत ढकलून माझ्या आधी चुकीची एन्ट्री घ्यायचा प्रयत्न केला आणि  मी अक्षरश: पावसाळातल्या त्या चिखलात, स्टेजच्या जवळ, खाली जमिनीवर; पार्श्वभागावर आपटून उलटाच झालो. तसाच कुणीतरी मला हात दिला आणि पार्श्वभाग, टोपी इत्यादीचा चिखल मिरवत पुढचं नाटक निभवलं. कात्रणं तुम्ही बघता आहातच. त्यात फोटोसेशनसाठी पोज देणं आपल्या दृष्टीनं उत्साहाचं असतं आणि बघणार्‍यांच्या दृष्टीनं चांगलं, चांगलंच मनोरंजक असतं.
हे नाटक उभं रहाण्यासाठी संस्थेनं वेगवेगळ्या खाजगी आस्थापनांमधे स्पॉन्सरशिप मागण्याचा प्रयत्न करून पाहिला. पत्रक घेऊन आम्ही कार्यकर्ते अशा आस्थापनांमधे ओळखी काढून प्रयत्न करत राहिलो. प्रतिसाद अल्प आणि प्रयत्न केल्याचं समाधान जास्त असं या बाबतीत नेहेमीसारखं घडलं.
दोन अवांतर गोष्टी या संदर्भातल्या म्हणजे, या नाटकाचे लेखक, चांगल्या ओळखीचे झालेले. गप्पा मारणारे. चांगले हट्टेकट्टे. अगदी तरूण नव्हे पण प्रौढ. मनमिळाऊ. या नाटकानंतर काही काळाने त्याना अचानक दुर्धर आजार झाला. ते इतके बारीक झाले की तुम्हाला काय झालंय म्हणून विचारल्याशिवाय कुणालाच राहवत नसे. सैरभैर झाला बिचारा माणूस. कालांतराने निधन पावला. त्यांची आठवण आज प्रकर्षाने येते.
दुसरं म्हणजे या नाटकात नृत्य, जुडो-कराटे शिकवणारा, मदत करणारा आणि हे सगळं आपला छोटासा व्यवसाय सांभाळून करणारा, त्यावेळी अरे-तुरे करत असू तो; मधे एकदा अचानक पेपरात दिसू लागला. तो खूप मोठा योगी झालाय. त्याचं स्वत:च्या नावाचं फाऊंडेशन आहे. त्या फाऊंडेशनची सेमिनार्स आयोजित होतात. पुरस्कार जाहीर होतात. माणसं कुठल्या कुठे जाऊन पोचतात. इतकी, की हीच ती? असा प्रश्न पडतो. त्यांचा हा प्रवास कसा झाला असेल याची उत्सुकता दाटून रहाते.. असो! खाली आहेत वर दिलेल्या कात्रणांचे संपूर्ण अंश..                                                                            

Sunday, February 26, 2012

वाचकसंख्या ३००००! सर्वांचे आभार!

नमस्कार वाचकहो! ’अभिलेख’ या माझ्या ब्लॉग अर्थात जालनिशीने वाचकसंख्या ३०००० हा महत्वाचा टप्पा ओलांडला आहे! आपले आभार! आभार!! आभार!!!
’अभिलेख’ ची सुरवात झाली १३ फेब्रुवारी २००८ या दिवशी! चार वर्षं उलटून गेली. एवढ्या काळात खरंतर अनेकांनी हा टप्पा आधीच पार केलाय. काही तर लाखाच्या आणि त्यापुढच्या घरात गेलेत. त्यामुळे अप्रूप नाही पण तीस हजारचा पहिला टप्पा पार केल्याचं समाधान जरूर आहे! ही सुरवात आहे. कशी झाली सुरवात?
तुम्ही म्हणाल झालं स्मरणरंजन सुरू! स्मरणरंजनात रमण्याबद्दल अनेक प्रवाह आणि प्रवाद आहेत. आपल्याला बुवा आवडतं त्यात रमण्यात आणि रमतो तर रमतो असं कबूल करायलाही आवडतं.
’अभिनयातून लेखनाकडे’ असा ’अभिलेख’ चा अर्थ मला अभिप्रेत आहे. केवळ रोजच्या जगण्यामधनं मी बाहेर पडलो ते अपघातानं अभिनय करायला लागल्यामुळं. लिखाणाचं बीज आत कुठेतरी होतं. ते माझ्या आईमुळेच पडलं असा माझा ठाम विश्वास आहे. संघर्ष करणं आणि त्यातून बाहेर पडणं असं चक्र माणसाच्या आयुष्यात सतत चालूच असतं. पुढे एक टप्पा असा आला की एका गर्द काळोख्या काळात अचानक कविताच फुटून बाहेर येऊ लागल्या. त्या कविता गोष्टरूप होताएत असं माझ्या लक्षात यायला लागलं. मग कथा- जशा जमतील तशा लिहिणं सुरू झालं.
दुसर्‍या बाजूला, साधारण दहा-एक वर्षाचा अभिनयाचा अनुभव असेल म्हणून म्हणा, कथेत संवाद येऊ लागले. मग कथा लिहिण्यापेक्षा नाटक लिहिणं जास्त सोपं (?) असं काहीतरी मनानं घेतलं आणि नाटक लिहिलं, ते चांगलं वाटलं म्हणून राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धेला पाठवलं. तिथे ते पहिलं आलं. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेला ते पात्र ठरलं आणि प्रकाशित झालं! ते नाटक म्हणजे आवर्त!
हे नाटक लिहिताना किंवा या लेखनाचं पुनर्लेखन करताना असं लक्षात आलं कि पुन्हा पुन्हा लिहिणं फार जिकीरीचं काम आहे आणि आता संगणकाशिवाय पर्याय नाही. पण संगणक घेणं परवडत नाही अशी परिस्थिती. लिखाण चालूच राहिलं. मुद्रित माध्यमात ते छापून येण्यासाठी प्रयत्न चालू झाले. मुद्रित माध्यमातही परिचयाचं कुणीच नव्हतं, नाट्यमाध्यमात तरी कुठे कोण होतं? नियतकालिकांमधे लेख छापून येऊ लागले, दिवाळी अंकात कथा  येऊ लागल्या. पुलाखालून बरंच... ही छोटी कादंबरीही प्रकाशित झाली. पुनर्लेखनाचं कसं तरी जमवावं लागत होतं किंवा मग एकटाकी लिहूनच त्याचं काय ते करावं लागत होतं. छापून आणण्यातलं परावलंबनही जाणवत होतं.
मग एके दिवशी तडक कर्ज घेऊन संगणक घेतला! हा क्रांतीकारी निर्णय असावा! :)
घेतला खरा पण तो चालवायचा कसा माहित नव्हतं. मराठी फॉन्ट्स कसा मिळवायचा माहित नव्हतं. तो सर्वत्र दिसण्यासाठी युनिकोड पद्धतीचा असावा लागतो हे माहित नव्हतं. एवढंच काय माझा पहिला मेल आयडी मी एका जुजबी ओळखीच्याला बोलावून करवून घेतला. तो बिचारा माझा मित्र झाला आणि त्यानं आयडी तयार केला, तो कसा करायचा ते दाखवलं. मग झुंज सुरू झाली. आधी सीडॅकचं iLEAP मिळालं! झुंज पराकोटीला गेली. मग शिवाजी फॉन्ट एका भावानं शोधून दिला आणि टाईप करणं सुसह्य झालं.
माझ्या कविता लोकांसमोर यावात असं खूप मनापासून वाटत होतं. एकतर त्या अतिसंघर्षाच्या काळात झाल्या होत्या आणि त्या बर्‍या आहेत असं मला वाटत होतं, तसे अभिप्रायही इतरांकडून मिळाले होते. ते कसं करायचं?
मग नेटवर शोधताना सुषमा करंदीकर या नाशिकच्या ब्लॉगर बाईंचा पाचोळा हा कवितांना वाहिलेला ब्लॉग सापडला. ब्लॉगचं झालेलं हे पहिलं दर्शन. हे असं करता येतं तर! मग अभ्यास सुरू झाला. उलट उलट जात, शोधत बराहा हे सॉफ्टवेअर एकदाचं मिळालं आणि मग सुटलोच!
..मध्यंतरी कुणीतरी- आता कुणीतरी म्हणजे कुणी जाणकारच असणार म्हणा- ब्लॉगची क्रमवारी की काय ती लावली. त्यात त्याने म्हणे कविता, कथा इत्यादी म्हणजे- ललितलेखनाचे ब्लॉगच वर्ज्य ठरवले म्हणे! अशी क्रमवारी-ब्रिमवारी लावण्याचा अधिकार कोण कुणाला देतो? आणि तो अमुक वर्ज्य, तमुक त्यज्य असं कसं काय ठरवतो? असा प्रश्न पडला. विचार करता असं उत्तर सापडलं की ब्लॉग किंवा आंतरजाल हे असं माध्यम आहे की इथे ’सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे!’ ह्या उक्तीप्रमाणे काहीसं आहे. अर्थात मी ब्लॉग लिहितो म्हणजे काही चळवळ करतोय असं म्हणण्याचं धाडस मी अजिबात करणार नाही पण मी हेच लिहितो कविता, कथा, लेख, नाटक वगैरे. मग माझ्या ब्लॉगवर तेच दिसणार. दुसरं असं आहे की माणूस आला की व्यक्त करणं आलं. व्यक्तं करणं आलं की गोष्टं आलीच. बघा पटतंय का, पण प्रत्यक्ष संवाद, लेखन आणि इतर माध्यमातून कुणीतरी कसलीतरी गोष्टंच एकमेकाला सांगतो की! असो! निंदा अथवा वंदा आमचा आपला सुचेल ते लिहिण्याचा धंदा! अर्थातच ’अभ्यासोनि प्रकटावे!’ हे आम्ही विसरणार नाही!
ज्याचा त्याचा पिंड असतो. ज्याचा त्याचा वाचकवर्ग असतो. कुणी एकाच विषयावर लिहितं. तेच बरोबर असं सांगतं. माझ्यासारख्या अनेकांना माणसं, त्यांचे स्वभाव, मन, नाटक, चित्रपट असं आवडतं. माझ्या आत आणि माझ्या सभोवताली काय चाललंय याकडे बघायला आणि जमेल तसं व्यक्तं व्हायला आवडतं. मी ते करतो. विषयाचं अमुकच असं बंधन नाही. असो!
या प्रवासातला आणखी एक टप्पा म्हणजे ’अभिलेख’ ची स्टार माझ्या वाहिनीच्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेत झालेली निवड! या निवडीनं मला ब्लॉगर मित्रमैत्रिणी दिल्या. त्यातल्या काहींनी त्याआधी ’अभिलेख’ वर येऊन माझा हुरूप वाढवला होताच. मग आंतरजालावरच्या विशेषांकांतून लिहिता आलं. देवकाकांनी ध्वनिमुद्रणाचं तंत्र शिकवलं... शिकण्याचा प्रवास चालू राहिला. हा प्रवास असाच चालू राहो! असं आज अगदी मनापासून वाटतं. सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वाचकांनी ’अभिलेख’ ला भेट दिली. अभिप्राय देणार्‍यांचे आभार. असं लक्षात येतं की अभिप्राय न देताही अनेक वाचक इथे येत असतात. नेमानं वाचत असतात. त्या सर्वांचे, सर्वांचे मनापासून आभार! सरतेशेवटी मला हवं ते, हवं तेव्हा, व्यक्तं करू देण्याचं स्वातंत्र्य आणि त्याच बरोबरीनं येणार्‍या जबाबदारीचं भानही देणार्‍या या माध्यमाचे शतश: आभार! धन्यवाद!


Friday, February 24, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (५)

भाग ४ इथे वाचा!
गौरीची ऑफिसला जायची गडबड सुरू झालीय. स्वैपाकघरातून येऊन गडबडीने आपला टिफिन पर्समधे ठेवते. बेडरूममधे येते आणि आरशासमोर केस विंचरू लागते. शांताबाई लगबगीने स्वैपाकघरातून बाहेर येतात आणि जराश्या थांबून बाहेर जायला निघाल्याएत. गौरीला चाहूल लागते आणि ती कानोसा घेतेय तोपर्यंत शांताबाईंनी दरवाजा उघडलाय आणि दारातच बाहेरून येणारा महेश त्याना आडवा आलाय आणि दचकलाय.
"क- काय गं आई? तू- तू निघालीस?"
घराबाहेर पडत शांताबाईंनी ’हो’ असं पुटपुटत मान डोलावलीय.
"अगं प-पण तुला काल मी-"
"अरे, मारूतीला निघालेय!"
"मा- मारूतीला? न- नक्की ना? की-"
शांताबाई वळून हसताएत, "अरे असं काय करतोस? काल ठरलंय नं आपलं? चल!"
लगबगीने निघून गेल्याएत. महेश त्यांच्याकडे पहात राहिलाय. मग अचानक पुन्हा दचकतो.
"अरे!ऽऽ सोन्या मारूतीला नाही न गेली ही पुण्याच्या?"
घरात आलाय आणि अस्वस्थ झालाय, "आयला टेन्शन टेन्शन! काय करायचं? कसं-"
"काय रे रडला नाही ना अंकित?"
"को- कोण?"
"अरे मी गौरी- अंकितला सोडायला गेला होतास ना शाळेत?"
"हो! आयला! काय करायचं काही कळत नाही!" वळून शांताबाई गेलेल्या दिशेने पहात राहिलाय.
"काय रे काय?"
"आई गेली ना?"
गौरीनं हंबरडा फोडायचाच बाकी ठेवलाय, "गेऽऽल्याऽऽ"
"अगं- अगं- तशी नाही गं गेली माझी आई! गौरी तू म्हणजे-"
"पुण्याला ना? तेच म्हणतेय मी! गेल्याना! गेल्याना शेवटी? एवढं समजाऊनसुद्धा! आता काय करायचं रे!.. अरे बापरे! दऽहाऽ वाजले म्हणजे माझं मॅटर्निटी कन्सेशनही संपलंय आजच्या दिवसाचं! आज गेलंच पाहिजे ऑफिसला! सरप्राईझ इन्स्पेक्शन आहे आज असं सांगून ठेवलंय सायबांनी काल! काय पण वेळ साधली आईंनीऽऽ तू पण न महेश-"
"जरा ऐक माझं! एवढी पॅनिक होऊ नकोस! जरा शांतपणे विचार कर!"
गौरीला धीर धरवत नाहिए, सारखी घड्याळात पाहतेय.
"ते काय करायचं ते तू कर! नाहीतरी डोकं फक्त तुलाच दिलंय देवानं. मी निघते! निघते मी! संध्याकाळी आल्यावर बघू काय करायचं ते!.. वेळेला काही उपयोग नाही! बहाणा काय तर म्हणे मारूतीला जाते-"
चरफडत गौरी ऑफिसला निघालीए.
"सावकाश! सावकाश गौरी! धावतपळत जाऊ नकोस! रिक्शा कर, रिक्शावाला यायला तयार असेल तर! नसेल तर भांडू नकोस त्याच्याशी! गेला खड्ड्यात म्हणाबं! गेली! गेली! धावू नको म्हणतो नेहेमी तर धावलीच! च्यक.."
तरीही लगबगीने बाहेर येऊन तिला टाटा करतो. वळून पुन्हा घरात येणार इतक्यात समोरून कडलेकाका आलेत. त्यांचं घर शेजारीच. त्या पाळणाघरातून मुलांचे चित्रविचित्र आवाज आणि निमाचं त्या मुलांवर ओरडणं यानी कळस गाठलाय. कडलेकाकांच्या हातात जड पिशव्या, खांद्यावर जड पिशव्या. महेश त्याना बघितलं न बघितलं करतच घरात जायच्या प्रयत्नात आहे आणि कडले नेहेमीप्रमाणे त्याला अडकवण्याच्या प्रयत्नात.
"फिऽऽश.. फिऽऽश.. महेश!ऽ मऽऽहेश!ऽऽ"
महेशला त्याना बघून शेवटी हसणं भागच पडतं. तो पाळणाघराकडे पहात रहातो.
"काय कडलेकाका? आख्खा बाजार खरेदी केलात. आज काय वर्धापनदिन आहे काय?"
"कुणाचा? माझा? हुऽऽश्श!"
"तुमचा नाही हो तुमचा नाही-"
"आमच्या निमूचा?"
"निमू? होऽहोऽहोऽ मिसेस कडले? नाही! नाही! तुमच्या पाळणाघराचा हो म्हणतोय मी! बरीच गर्दी झालेली दिसतेय!" आत डोकवायला लागतो.
"वर्धापनदिन? हुऽऽश्श!"
"हो!"
"काय उपयोग?"
"का? का? का?"
"हुऽऽ- एक मिनिट! हे जरा खाली ठेऊ का?" हाताखांद्यावरच्या पिशव्या खाली ठेवू लागलेएत.
"कडलेकाका हमाल करायचा एखादा!"
"अगं आई गं!.. केलाय की!" महेश शोधू लागतो.
"कुठेय?"
कडले स्वत:च्या छातीवर हात ठेवतात, "हा काय!"
"तुम्ही?"
 कडले अवघडलेला हात घराच्या दिशेने वळवताएत,  "तो माल! हा हमाल!"
"गर्दी खूप होती दोन दिवस! बर्‍याच ऍडमिशन झालेल्या दिसताएत!"
"चिक्कार! पाळणाघर म्हणजे धर्मशाळा झाल्याएत अलिकडे! त्यात आमची निमा दिसायला छान!-"
"हो!"
"अगदी लगेच हो म्हणालास!.. परवा शेवटी नाक्यावर बोर्डच लावून आलो! हाऊसफुल्ल म्हणून!"
"चांगलाय की! बिझनेस चांगला चाललाय!"
"उपयोग काय?"
"आता काय झालं?"
"पोटाला मूल नाही हो आमच्या!"
"अहो होईल! धीर धरावा माणसानं!"
"अजून?" कडले आपल्या टकलावरून हात फिरवत राहिलेएत.
"ही सगळी मुलं तुमचीच की नाहीतरी! आं?"
"हो! जरा वेळानं म्हणशील त्यांचे बापही तुमचेच!"
"अहो ते त्यांचे!" बोलता बोलता महेशनं पाळणाघराकडे हात केलाय.
"क- कुणाच्ये?"
"त्या मुलांचेच हो असं काय करता!"
".. अंकुडीला कधी पाठवतोएस?"
"कुठे?"
"अरे आमच्या घरी!"
"कशाला?"
"अरे आमच्या पाळणाघरी म्हणतोय मी! आता ठेवायलाच लागणार तुला!"
"का? का?"
"कॅ? कॅ? अरे हा रिकामजी म्हणजे हेर आहे सोसायटीतला! पक्का! सगळे हेअर उडालेले असले तरी! अभिनंदन!"
"कशाबद्दल?"
कडलेकाका चेकाळलेएत, "काल संध्याकाळी गौरीला सांभाळून आणल्याबद्दल! काय हे महेश! दुसर्‍यांदा बाबा होणार तू! दुसर्‍यांदा! आमचं आपलं नुस्तं पाळणाघर! त्यात पाळणा नाहीच!.. ते जाऊ दे!.. मग? काय करतोस?"
"अहो असं काय करताय? आई- आई- आई आहे ना माझी! तिला असलं काही-"
"कुठेय?"
"क- क- कुठे- कुठे म्हणजे?- दे- देवळात गेलीए ती मारूतीच्या!"
"सोन्या मारूतीच्या ना! पुण्याच्या-"
"तु- तुम्हाला पण सांगितलं तिनी? बापरे! म्हणजे आत्ता जी गेली ती-" कडले हसत राहिलेत.
"आत्ता, आत्ता देवळातच गेल्याएत त्या! समोरच्या! बघितलं न मी त्याना आत्ता!"
"हुऽऽश्श!"
"पण उद्याचं काय?"
"उद्या? म्हणजे उद्या जाणार आहे ती?"
"अरे उद्या म्हणजे- उद्या, परवा, तेरवा कधी तरी जाणारच त्या!"
"नाही! नाही! आम्ही तिला जाऊ देणार नाही!"
"अरे! काय जबरदस्ती करणार आहात? त्यापेक्षा मी काय म्हणतो-"
"काय?"
"अंकितला ठेव ना आमच्याकडे!" खाजगीत कुजबुजल्यासारखं करत अंगचटीला येऊ लागतात.
महेश तसाच कुजबुजतो, "नको! तुमचं हाऊसफुल्ल झालंय आधीच!"
"ते मी बघतो रे! ठेव ना!"
"मला अंकितला कुठेही ठेवायचं नाही तुम्ही-"
"अंकुडी माझी लाडकी आहे रे ती! आमच्याकडे ठेऊन तर बघ!"  
"नाही! नाही!"
"असं काय करतोस रे?"
"काका! ही तुमची पटवापटवी दुसर्‍या कुणाकडे तरी करा! माझ्याजवळ नको! मी अंकितला कुठेही ठेवणार नाही!.. अरे बापरे साडेदहा वाजून गेले इथेच! आज पुन्हा लेटमार्क! म्हणजे एक सीएल गेली!.. याऽऽयला या सोंगाच्या नादी लागून-"
"मऽहेऽश! अरे घराची चावी तरी दे!"
"कशाला?.. घरात नाहिए अंकित आत्ता!"
"अरे तुझी आई आ येईल ना देवळातून!"
"हो च्यायला लक्षातच नाही आलं! ही घ्या!"
संधी साधून कडले महेशचा हातच पकडतात, "अंकितचं काय करतोस?"
"अहो सोडाऽ सोडाऽ सोडा हो! हल्ली लोक काय वाट्टेल तो विचार करतात! सोडा!.. अंकितचं नं करतो न मी करतो- मी करतोऽऽ-"
"ठेवतोस न? ठेवतोस न आमच्याकडे?"
कसाबसा स्वत:ला सोडवून घेत निघतो, " आयलाऽ यांचं काही खरं नाहिए! अंकितला पोलिस प्रोटेक्शनमधेच ठेवायला लागणार आता!.. काका! काका! काका!ऽऽ"
"तुला मीच वाचवणार रे पुतण्या आताऽ बोल!"
"काकाऽ आई आली की तेवढी चावी द्या तिलाऽ"
" हो हो द्येतो रेऽऽ.. हुऽऽश्श! चला! आधी हे सामान ठेवतो घरी.. आणि मग ही चावी.."
एकेक पिशवी पुन्हा आंगाखांद्यावर चढवतात आणि आपल्या घराच्या, पाळणाघराच्या पायर्‍या चढू लागतात...  (क्रमश:)

Saturday, February 18, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (४)

भाग ३ इथे वाचा
महेश तरातरा आत गेलेल्या आईकडे पहातोय, "गौरूऽऽ आई चिडते! चिडतेय आई! आल्यापासून मी एक बघतोय गौरूऽऽ-" आता गौरी वैतागलीये, "काय रे महेश?" महेश नेहेमीसारखा कात्रीत सापडलेला, "आता तुला काय झालं चिडायला?" "महेश अरेऽ तुला कितीवेळा सांगितलंय मला पाहिजे तर हाक मारू नकोस! पण हे गौरू काय?" महेश नेहेमीसारखाच, "काय?"
"गावातल्या तुमच्या त्या गोठ्यात गेल्यासारखं वाटतं अगदी!"
"अगं गोठ्यात कुठली जातेस? आईकडे बघ!"
"कुणाच्या?"
"आता कुणाच्या! माझ्या!"
"काय बघू?"
"अगं आपली ’ही’ बातमी कळल्यावर ती खूष नाही झाली!"
"नेहेमीचच!" गौरी केसांच्या पिना सोडून केस मोकळे करत आरश्यात बघतेय.
"काय?"
"अरे चेहेराच तसा असतो त्यांचा नेहेमी!.. असा!" गौरी शांताबाईंची नक्कल करायची संधी साधतेच.
"एऽऽ तसं काय नाहीये हं गौरील्ला!"
"काय रे महेश! आता गोरीला काय?"
"आईचा चेहेरा ’असा’ काय! आणि तुझा?"
"तो ’ह्या’च्या मुळे झालाय रे!" गौरीनं अगदी सटली आपल्या वाढलेल्या पोटाकडे कटाक्ष टाकलाय.
"कशामुळे? अं?ऽऽऽ"
"काय रे हे?ऽ शी:ऽऽ मह्यू!" गौरी लाडीकपणे महेशचा हात हातात घेते.
"हाऽ हाऽऽ हाऽ मह्यू! आत्ता?ऽऽ"
"हॉऽ हॉऽ हॉऽऽ ऑत्तॉ!.. आता विसरा ते! .. मी काय म्हणते-"
"काय?"
"आपल्या दोघानाही दुसरं मूल हवं होतं!"
महेशनं गौरीचं हात हातात घेतलाय, "हो नं!"
"अंकितही खूप एकटा एकटा असतो हल्ली! खूप हट्टी झालाय तो! दोन मुलं हवीतच!"
"अगं दोन काय? मेरा बस चले तो मैं-"
"बस! बस! बस! आता बस! पुढे सगळं कसं पार पडणार आहे त्याचं टेन्शन आलंय मला आत्ताच!"
"अगं टेन्शन कशाला घेतेएस? बघ कसा फुलासारखा जपतो तुला!"
गौरी हसते.
"काय झालं हसायला?"
"ते दिसलंच मघाशी बाहेरून येताना! ह ह ह.. काही महिन्यानी उचलून घेऊनच नेशील आणि आणशील!.. हा हा.."
"दाखवू! दाखवू कसं ते!" तो तिला उचलायला जातो.
"एऽऽ नको! नको! नको रे! तुला एक सांगितलं कि तुझं- नकोऽऽ-"
शांताबाईंची त्या दोघांवर नजर असल्यासारख्या त्यांच्या हाका सुरू झाल्याएत.
"गौरीऽऽ महेशऽऽ चला!ऽऽ झालंय का तुमचं?"
दोघेही हसत हसत बेडरूमबाहेर पडून स्वैपाकघरात शिरतात. समोर शांताबाई मान वळवून उभ्या.
"चला! जेवून घ्या लवकर!"
गौरीला शांताबाईचा मूड जाणवलाय. ती महेशकडे सहेतुक पहातेय.
"आई.. तुम्ही नाही घेणार जेवून?"
"गुरूवारी रात्री मी कधी जेवते का?"
"अगं असं काय करतेस गौरी? गुरूवारी रात्री आई कधी जेवते का? चार केळी, दोन सफरचंदं, तीन संत्री आणि ग्लासभर दूध नाही का घेत ती-"
शांताबाई वैतागलेल्या, " महेऽऽऽश-"
"नाही आई! अगं गौरी विसरली असेल! अगं, आज आम्ही डॉक्टरकडे जाऊन आल्यापासून ती-"
"महेश! सकाळी सातची एशियाड कितीला येते?" शांताबाई थेट निर्वाणीलाच जाऊन पोचल्याएत.
"असं काय करतेस आई! सातलाच!.. पुण्याहून उमेशकडून कुणी येणार आहे?"
"मी जाणार आहे!"
शांताबाईंच्या या पवित्र्यानं महेश-गौरी दोघेही हैराण. दोघेही ’कुठे?ऽऽ’ म्हणून किंचाळताएत.
शांताबाई आता शांत झालेल्या, " पुण्याला! सातची एशियाड स्टॅंडवर कितीला लागते ते सांग!"
"अगं पण अशी अचानक कशी जातेएस तू पुण्याला?"
"एशियाडने!"
"ते कळलं गं पण-"
"मला जायचंय, माझं एक महत्वाचं काम-"
"ठीक आहे! परत कधी येणार आहात आई?" आता गौरीही चार्ज्ड झालेली.
"येणारच नाहिए!"
महेश हादरलेला, "अगं का? का आई? काय झालं?"
"आमचं काही चुकलं का आई?"
"गौरी तू अंकितला बघ! आत जेवतोय तो!"
"ते बघते मी! पण आई तुम्ही एकदम अश्या-"
त्याचवेळी अंकित ताटावरून उठलाय, " आज्जीऽ ममाऽऽ शी आलीऽऽ"
महेश वैतागलाय, " नेहेमीचंच आहे! नेहेमीचंच आहे! जेवताना याला शी लागणार म्हणजे लाग-"
"चल! चल! आत चल!" गौरी अंकितला  घेऊन आत जाते. महेशला एकट्याला आता किल्ला लढवावा लागतोय.
"अगं पण आई, उमेशकडून काही निरोप आलाय का?"
"नाही!"
"मग?.. अगं आई काही स्पष्टं बोललीस तर मला समजेल तरी की-"
"मला कंटाळा आलाय इथे!"
’हात्तिच्याऽऽ एवढंच ना! एक काम करतो! जुन्या हिंदी सिनेमांच्या सीडीज आणतो उद्याच! अं? हं! मग?"
"एक गोष्टं ऐकत नाही अंकित!"
"अगं लहान आहे तो! आत्ता कुठे सात वर्षाचा झालाय- आणि मी ओरडीन हं ओरडीन त्याला आता आला की!"
"आज कडीच लावली त्याने!"
"कुठली?"
"रिकामजीच्या घराची!"
"हा हा हाऽऽ कोण कडले काका? हा हा हा.. म्हणून तू पुण्याला जातेएस?"
"महेश मला झेपत नाही आता सगळं!"
"अगं असं काय करतेएस आई? तूच म्हणालीस नं मी सांभाळीन अंकितला! त्याला दुसर्‍या कुणाजवळ ठेवायचं नाही! पाळणाघरात तर नाहीच नाही! आणि आता तूच-"
"तू आपला मला सोड उद्या सकाळी मी जाते आपली पुण्या-"
"असं करू नकोस आई! तू कायमची गेलीस की सगळा घोटाळा होईल! मला आणि गौरीला थोडा वेळ तरी दे! अगं शेजारी बघतेस नं तू? बघतेस नं? तिथे, त्या पाळणाघरात, ठेऊ अंकितला? तू असताना? असा घोटाळा करू नकोस तू ऐक माझं-"
"तुम्ही करा घोटाळे!"
"का- काय केलं आम्ही?"
"ते आता मी सांगू? हे बघ महेश, एकट्या अंकितला सांभाळता सांभाळता मला नाके नऊ आलेत आणि आता हे दुसरं! तेही लहान बाळ!- तू असं कर! आत्ता असते ना एशियाड? किती वाजता असते शेवटची?"
"अगं असं काय करतेस आई माझं ऐक तू-"
शांताबाई खिडकीतून वाकत ओरडायलाच लागल्यात, "रिक्षाऽऽ रिक्षाऽऽ"
"अगं आई असं काय करतेस? इकडे ये! इकडे ये! तू माझं जरा ऐक मी-"
महेश आईची मनधरणी करतोय आणि आई ऐकायला तयारच नाही असा सिलसिला आता सुरू झालाय. तो संपतच नाहिए... (क्रमश:)

Saturday, February 11, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (३)

भाग २ इथे वाचा!
जावडेकरांच्या घरात, हॉलमधे, अंकित टीव्ही बघतोय. शांताबाई स्वैपाकघरात. महेश आणि गौरी सोसायटीच्या गेटमधून आत येताहेत. गौरी तशी ठीकठाकच दिसतेय पण महेश तिला नको तेवढं सांभाळत घेऊन येतोय, “हं! सावकाश! हळू! हळू चल!” गौरी सॉलिड लाजतेय, “ईऽऽश्श काय हे महेश! आख्खी सोसायटी बघतेय!”
“बघू दे! बघू दे! माझ्याच बायकोला धरलंय मी! तू, गौरी चालण्याकडे लक्ष दे! सावकाश! सोसायटीवाल्यांचं बघतो मी! हं!”
तरीही गौरी लाजतेय, “अरे पण- शी:”
“नव्या नवरीसारखी लाजतेएस हं अगदी!”
“तू करतोएसच तसं!”
महेश आवाज चढवतो, “आता काय केलं मी?”
“गप रे! शी बाबा!”
“हं! चला बाबा- आपलं हे- आई! पायरय़ा आहेत पुढे! हळू-”
महेशचा पायच पायरीवरून सरकतो, “अगं आई गं!”
गौरी त्याला धरते पण तिला हसू आवरत नाही.
“आईऽऽ- हं हस तू हस लगेच!”
“मग काय करू? मला सावकाश सावकाश चालायला सांगतोस आणि तू-”
महेश पाय चोळतोय, “बेल वाजव! बेल वाजव!”
गौरी हसत हसत बेल वाजवते. आत, हॉलमधे टीव्ही बघणारा अंकित डिस्टर्ब झालाय.
“एऽऽ आज्येऽऽ इस्त्रीवाला आला बघऽऽ”
महेश बाहेर खूष आहे, “आईला अगदी सरप्राईज आहे हं!”
गौरीला ते काय, ते कळत नाहिए, “काय रे काय काय?”
महेश कपाळाला हात लावतो, “आता, काऽऽय?”
तेवढ्यात शांताबाईंनी दार उघडलंय, “काय रे झालंय काय? कपाळाला हात लावलाएस?”
महेश झपकन कपाळावरचा हात काढतो, “क- कुठे- काही नाही! काही नाही!”
पुन्हा गौरीला धरतो, “चल सावकाश! हळू! हळू चल!”
शांताबाईंचा चेहेरा त्रासिक, “हीला काय झालंय आणखी?”
आता अंकितही पुढे झालाय, “ममा ममा काय झालं? काय झालं तुला?”
महेश लाडात, “अंकिऽऽत त्रास द्यायचा नाही ममाला आता!”
गौरी ’ईऽऽश्श!” करून पुन्हा सॉलिड लाजतेय आणि शांताबाई बारकाईने तिच्याकडे पहाताएत.
“चला! हं! गौरी पाया पड बघू आईच्या!”
“म- माझ्या???”
गौरी आणखी लाजत बेडरूमच्या दिशेने पळते.
“हऽऽहऽऽ लाजतेय आई ती लाजतेय! लाजतेय ती!.. मी आलोच हं आलोच!”
महेशही बेडरूमच्या दिशेने बघत गौरी पाठोपाठ धावत सुटतो.
“आजी! मी पण जाऊ?”
“मी नाही म्हणाले तर थांबणार आहेस?”
’येऽऽ’ असं ओरडत अंकितही त्यांच्या मागोमाग धावतो.
“जा तू!.. आई लाजतेय आणि बाप घोड्यासारखा धावतोय! काय जगावेगळंच एकेक! मी चौथ्या वेळेला गरोदर राहिले, तर आमचे हे लाजले होते!” हैराण झालेल्या शांताबाई कपाळाला हात लावत स्वैपाकघरात निघून जातात…

बेडरूममधे अंकित खूप एक्साईट झालाय, नाचतोय; “पपा काय झालं? काय झालं? काय झालं?”
“अरे नाचणं थांबव अंकित! आपल्या ममाला किनई बरं नाहिये!”
“पण पपा ती तर लाजतेय!”
“अरे बरं नाहिए म्हणून!”
“हॅट हॅट! बाळ होणारे तिला! हो किनई गं ममी?”
गौरी चकीत होऊन महेशकडे बघतेय, “अरेऽऽ अंकू!.. पण तुला कसं कळलं हे?”
“पण तुझं पोट तर छोटूसंच आहे अजून!”
आता महेश चकीत, “ अरे अंकित-”
“त्या ’बडी बहू’ सिरियलमधे नाही का तो टकलू असाच हळूहळू घेऊन येत असतो त्या बाईला! पण ती त्याची बायको नसतेच आणि.. तिचं पोट तर-”
तोपर्यंत शांताबाई स्वैपाकघराच्या दारात आल्याएत, “अंकिऽऽत! एऽऽअंकित! चल! जेवायला चल!”
अंकितचं त्यांच्याकडे लक्ष नाही, “अशी अशी चालत असते ती-”
“अंऽऽकितऽऽ”
शांताबाईंच्या दुसरय़ा हाकेने महेश सावध झालाय, “चला! चला! चला! अंकुबाळ जेऊन घ्या हं आता तुम्ही! खूप जेवलं नं-”
“काय होतं? पोट मोठं होतं!”
महेशला स्वत:च्याच तोंडावर हात ठेवणं भाग पडतं, “अरे!.. नाही! खूप जेवलं नं की खूप अक्कल येते! आम्हाला दिसतेय ती! खूऽऽपऽऽ चला!”
शांताबाई फणकारय़ात आहेत, “तुमचं झालं की तुम्ही या!”
महेशच्या ते लक्षात येतं, “काय?”
शांताबाई आता चिडल्याच आहेत, “लवकर जेऊन घ्या!” तरातरा स्वैपाकघरात निघून जातात..
(क्रमश:)