romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label friends. Show all posts
Showing posts with label friends. Show all posts

Saturday, May 11, 2013

बेटं तर झाली... पुढे?

लहानपणी पहिल्यांदा ’माणूस नावाचे बेट’ असा उल्लेख कुठेतरी वाचला.
म्हणजे काय? हे म्हणजे काहीतरीच! असे भाव दाटले. चेहेर्‍यावर राहिले.
नंतर कधीतरी ते नाटक आहे, तेंडुलकर नावाच्या सदीच्या महानायक नाटककाराचे ते आहे हे कळलं. ते बघायचा योग आला नाही पण वाचायला मिळालं.
माणूस म्हणजे बेट झालंय हे त्यानी साठोत्तरी दशकात जाहीर केलं. दुसर्‍या महायुद्धानंतर लिहित्या झालेल्या ’नव’ कथा, कविताकारांना माणूस एकाकी आहे हे जाणवलं होतंच. सगळ्या जगभर या गोष्टी दोन्ही महायुद्धानंतरच्या उलथापालथीनंतर दृगोचर होऊ लागल्या.
ही बेटं प्रत्यक्षात बघता, अनुभवता आली नव्हती. माझ्यापर्यंत ती थेट पोचली नसावीत. खरं म्हणजे मी अशा अनुभवांपर्यंत थेट पोचलो नव्हतो असं म्हणायला पाहिजे. अनेक घटना, भावना, विचारांच्या धुक्याआड अनेक गोष्टी त्यांची त्यांची वेळ आल्यावर जाणवत, लक्षात येत असाव्यात.
हल्ली त्या प्रकर्षानं जाणवू लागल्या आहेत.
माणसं, अनेक वर्षांची सवय असलेले मित्र अचानक समोरून अनोळखी होऊन निघून जातात. मी खुळ्यासारखा बघत रहातो. हसलेला असतो, हात दाखवलेला असतो, कधी चौकशी करायला थांबलेलोही असतो. पोपट होतो. पोपट झाला की राग येतो. समोरून अचानक असा प्रतिसाद येण्यासारखं मी काहीच केलेलं नाही असा पहिला विचार येतो. मग असं का? या विचाराचा भुंगा खायला सुरवात करतो. त्याची सुई नेहेमीप्रमाणे मी स्वत:च असतो. मग स्वत:ला पोखरून पोखरून झाल्यावर लक्षात येतं, अरे! त्या तसल्या प्रतिसादाचं केंद्र तर समोर होतं! मग मी कशाला माझ्या दिमागचं दही करून घेतोय! हा झाला माझा प्रवास.
बरेचसे, जा! गेलास उडत! असे असतात. त्यांचा हेवा वाटायला लागतो. पण आत कुठेतरी वर्षानुवर्षाचे बंध तुटल्यामुळे खुपत राहतं. माझ्या दृष्टीने माझी चूक नसताना. समोरच्याने मात्र ’ठान’ लेली असते. मी असाच वागणार! त्याना आत काही खुपत नसेल? का करत असतील असं हे? न्यूनगंडातून? अहंगंडातून? प्रचंड संकटं आल्यामुळे? की परिस्थितीवश एखादा दिवा तेल आणि वात कमी कमी होऊन विझत जावा तसे विझत जात असावेत हे आतून? किंवा भडकत, मी! मी! माझं! माझं! असं करत आणखी आणखी मिळवतो आहे याची नशा चढवत असावेत हे?
गरज नाही समोरच्याची म्हणून त्याच्याशी असं वागत असावेत हे? काय असावं?
मग मी माझाही झाडा घेऊ लागतो. मी भूतकाळात नव्हतो का काही कारणानी कासव झालो होतो? आत आत मान घालून जगाशी संबंध तोडून घेत होतो. काही काळ असं वागणं शक्य असावं.
मग मला मागचे काही संबंध संपल्यासारखे नाही का वाटायला लागले. एका मोठ्या वयाच्या मित्राला विचारल्यावर तो म्हणाला होता, लहानपण एकसारखं असतं, मोठं झाल्यावर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या दिशेने वाढतो. मग समानधर्मी काहीच रहात नाही. मग बालपणीचे ते रम्य इत्यादी दिवस गतरम्येतेतच रहातात. समोरासमोर आलो की काय बोलावं तेच कळत नाही, गतरम्यताच उगाळली जात रहाते.
अलिकडे जे जाणवलंय ते थोडसं मध्यमवयीन अडचणी- middle life crisis च्या दिशेने गेल्यासारखं वाटतंय. पण ते तेवढंच नाही. कॉर्पोरेटी झगमगाटातल्या तरूणांचंही असं होतंय असं दिसतं.
एखादा स्तरच असा आहे की हे सार्वत्रिक आहे? मग सोशल नेटवर्कींग साईट्सनी ही दरी काही प्रमाणात तरी बुजवली आहे की बुजवलेली ही दरी आभासमय आहे?
मतं पटत नाहीत म्हणून, स्वभाव म्हणून अंतर राखून राहणं समजून घेता येईल. पण हे जाणवलेलं वेगळं आहे. इथे अचानक, माझ्या दृष्टीने, समोरच्याच्या दृष्टीने नियोजित असा पूर्ण बहिष्कारच व्यक्त होताना दिसतोय. अनेक वेळा तो वैयक्तिक नाही तर सार्वजनिक आहे असंही दिसतंय.
कदाचित हे असं चालूच असेल. माझं लक्ष आज तिथे वळलं असेल.
काळजी वाटते. मीही काही खूप सोशल, सदैव भेटीगाठी करत असणारा माणूस नव्हे. काही कारणांनी, काही वेळा बहिष्काराचा अवलंबही करावा लागलाय मला. काळजी आपण तसे झालोत, होऊ, ही नाही. एकूणच हे बेट प्रकरण बेटं माझ्या मनात हल्ली चांगलंच रूजून बसलंय.
दुसरीकडे वैद्यकीय सल्ला सतत हा दिला जातोय की सतत माणसं जोडा, मित्रं जोडा, माणसात रहा! तुमच्या अनेक रोगांचं मूळ तुमच्या एकटेपणात आहे.
माणूस मुळातच एकाकी आहे. कुटुंबसंस्थेत रमलेला दिसला तरी.
यातून मला जाणवलेला धडा मी घेतोच आहे.
बेटं तर झाली... पुढे? हा विचार मात्र खाऊ लागला आहे हे खरं!      

Wednesday, March 7, 2012

सर्व वाचकमित्रांना होलिकोत्सवाच्या मन:पूर्वक रंगीबेरंगी शुभेच्छा!

सर्व वाचकमित्रांना होलिकोत्सवाच्या मन:पूर्वक रंगीबेरंगी शुभेच्छा!
हास्यगाऽऽरवा २०१२ प्रकाशित झालाय मंडळी! होलिकोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला जालरंग प्रकाशनाचा विनोदी विशेषांक! जरूर वाचा आणि अभिप्राय द्या! यात प्रकाशित झालेली मनू आणि मी! या मालिकेली माझी दोन अभिवाचनंही आपल्याला ऐकता येतील! मी मी आणि मी! या इथे! आणि संघटित व्हा! या इथे!
माझी इतर अभिवाचनं ऐकायची असतील तर कृपया भेट द्या मला ऐका! या पानाला! 

Thursday, March 1, 2012

'झुलवा' चा प्रवास...

’झुलवा’ १९८७-८८ ला संगीत नाटक ऍकेडमी, दिल्ली या मान्यवर संस्थेच्या त्यावर्षीच्या राष्ट्रीय लोककला महोत्सवात सादर झालेलं नाटक! या नाटकानं त्यावर्षी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर १९८७ मधे पश्चिम विभागीय महोत्सवात ते भारत भवन, भोपाळ इथे सादर झालं. त्या विभागीय महोत्सवातून ’झुलवा’ची राष्ट्रीय महोत्सवात निवड  झाली आणि जानेवारी १९८८ मधे ’झुलवा’ दिल्लीला कमानी ऑडिटोरियम या विशाल नाट्यगृहात सादर झालं. माजी मंत्री कै. वसंत साठे त्यावेळी आवर्जून हजर होते.
मुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, प्रसिद्ध जर्मन नाट्य दिग्दर्शक फ्रीत्झ बेनिवित्झ- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.
मुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्‍या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात नाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्‍यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही! ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली!  

माझ्या या ब्लॉगवर मी या आधी झुलवा या नाटकावर लिहिलं आहेच. माझ्या आयुष्यात झुलवा नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे असे मी मानतो. मी या नाटकाच्या प्रवासात काय शिकलो नाही? लोकांनी मला काय काय शिकवलं नाही? एक समूह, ग्रुप म्हणजे काय मजा असते, ती अमुक एका वयात आपल्याला सर्वतोपरिने कशी सांभाळते, आधार देते हे खूप समाधानानं अनुभवलं. या नाटकाचे झालेले दौरे चिरस्मरणीय राहिले आहेत. या संबंधात  कलकत्त्याजवळच्या बेलूर मठबद्दल या पूर्वी लिहिलं आहे.
नेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच (!) जागरूक असायचा! एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्‍या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्‍यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं  बरंच काही एकत्र करून इफ्तार पार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.
अशा मजा, गंमती किती सांगाव्यात? रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील! रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.  
माझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी (!) करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच (!) रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला (!) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्‍याला आणखी काय हवं? आयुष्यातला सर्वोच्च क्षण!
खरी मजा तर पुढेच झाली! झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का? वर का नाही? का वरच? काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था!) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम (!) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला  होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे? मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे!’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही!’ असं खरंच कसबसं मला तिला सांगावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली!
आणि काय सांगावं महाराजा! कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला! पुढे आयुष्य सुफळ संप्रूण (!) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच! :D
झुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं! त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं? काय आधी झालं? काय नंतर?...
माझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते! पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..

      

Monday, November 7, 2011

मैत्रसंवाद

"तुझं बरंय बाबा
घट्ट उभा असतोस
निश्चल स्थितप्रज्ञासारखा
कुणाच्याही भानगडीत नाहीस
मी सुद्धा जेव्हा तुझ्याशी बोलायला, भेटायला, मस्ती करायला येतो
तेव्हाही तू ढिम्मच!
असा कसा रे तू?..
मी आक्रसलेला असतो तेव्हाही
लांबवर तू दिसतोस, तो ही तसाच
नेहेमीसारखाच. बोल ना रे ढंप्या!
तुला माहितीए त्या पाचजणींना सांभाळताना
त्यांच्याबरोबर खिदळतानाही
मी तुला कधीच विसरत नाही
स्वत:च्या बायका, त्याही, इतक्या, असूनही
मी तुझ्यासारख्या मित्राला विसरत नाही
याचे तुला काहीच वाटत नाही?..
तुला कसं सांगू?
आभाळ कोसळताना मला नाही रहावत रे!
मी दिल्यात तुला धडका किती वेळा
कबूल आहे मला!
तू तेव्हा तुटतोस, कधी कमी, कधी जास्त
कधी मागे मागे जायला लागतोस
पण माझ्या चंचलपणाला आवर तूच घालतोस!
तेव्हा माझ्या वडीलमित्रा
मी काय म्हणतो
तुला भावनाच नाहीत का?
अरे रहाटगाडगं असतंच की
कधी उचंबळायचं, कधी खवळायचं
कधी शांत तर कधी मस्ती करायची
सगळं आवश्यक असतं आयुष्यात!
आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा
आपली कर्तव्य ही तर पार पाडायचीच असतात रे प्रत्येकाला!
आभाळ कोसळताना मला का रहावत नाही
हे मी तुला सांगायला पाहिजे का?
अरे काळे नभ म्हणजे माझीच लेकरं!..
मी तुला मानतो ते यासाठी की
माझा उपसर्ग कुणाला तू पोहोचू देत नाहीस
मी उफाळल्यावर तू मला सांभाळतोस
आणि मी रोडावलो तरी
तू दूर पण ठाम उभा असतोस
माझ्यासाठी, एकटा..
मी तुला हे सगळं आज का सांगतोय माहितीए
मलाही हल्ली महत्व कळायला लागलंय
ठामपणाचं, स्थितप्रज्ञेचं, भावना काबूत ठेवण्याचं
अरे जहाजंसुद्धा केव्हा एकदा
तुझ्याजवळ येतो असं म्हणतात
तेव्हाही- स्पष्टंच सांगतो- मी जळतो तुझ्यावर
अरे, मी यांना वाहून नेतो, सांभाळतो
आणि यांना ओढ मात्र तुझीच!
पण तू आहेसच तसा हे ही मला पटतं
अरे मग व्हाय डोन्च्यू एक्सप्रेस?
तू बोलत का नाहीस? बोल!"
"बोलतो बोलतो बाबा बोलतो
फक्त तु़झ्याशीच बोलावसं वाटतं
कारण तुझ्याशिवाय मी नाही
आणि माझ्याशिवाय तू नाहीस
पण एकेकाचं आयुष्यंच असं असतं बाबा!
नाही नाही.. हा नुसता कडवटपणा नाही
एखाद्याने नुसते वास्तवाचेच चटके सहन करायचे असतात, सतत!
आणि सर्वांगानं फुलणारय़ा
दुसरय़ा एखाद्या जीवनाला बघत रहायचं असतं
जमलंच तर सांभाळायचं, मदत करायची
त्याच्याशी स्पर्धा नाही करायची
शेजारी शेजारी उभ्या असणारय़ा, हे खरं
पण धावमार्ग आणि मर्यादा
वेगवेगळ्या असणारय़ा धावपटूंमधे
असते का स्पर्धा?
आणि सगळ्यांनीच स्पर्धा करायची म्हटल्यावर
बघे कोण? टाळ्या वाजवणारे कोण?
धावून दमलेल्या खेळाडूंना विसावा पुरवणारे कोण?
आणि त्यांना शिकवणारे तरी कोण?..
हा धीरगंभीरपणा, शांतपणा, समंजसपणा, स्थितप्रज्ञा
तुला काय वाटतं, आपोआप आलंय सगळं?
हे असलं नुसतं दिसतं सगळ्यांना
पण त्या मागचं, त्या मागचं नाही बघत कुणी!
शिवाय एकेकाचा स्वभाव असतो
न बोलता आपलं काम करत रहाण्याचा
याचा अर्थ आतून तो ओला नसतो
असं काही नाही!
आतला ओलेपणा, सतत दाखवायला लागलो सगळ्यांना
तर नाही कुणाचे डोळे ओलावत
स्वत: न अनुभवलेल्या गोष्टींनी
कोण ओलावणार सांग!
हे बौद्धिक होतंय मान्य आहे मला
मी तुझा वडीलमित्र आहे म्हणून
चान्स घेतोय असंही नाही
तेव्हा, ऐक!
नशीब म्हण, ईश्वरेच्छा म्हण, दैवी शक्ती म्हण
तुझ्यासारख्यांना त्याचं पूर्ण वरदानच असतं!
तुझा मोठेपणा हाच की
इतकं चांगलं चाललेलं असूनही
तुझं माझ्याकडे लक्ष गेलं
तू मला मुक्याला बोलतं करायला लागलास..
तुझ्यासारखे  रगेल, रंगेल, दुसरय़ाना उपयोगी पडणारं
आणि यशस्वी आयुष्य जगणारे
माझ्यासारख्यांना निगेटीव्ह म्हणतात
ते पहिलं, तू तरी डोक्यातून काढून टाक
कित्येकांना वास्तव कशाशी खातात
हे आयुष्यभर जाणवत नाही-
सुमार बुद्धिमुळे म्हण किंवा बेसुमार नशीबामुळे म्हण!..
तेव्हा, आता तुला माझं रूप हळू हळू
उलगडायला लागेल..
ही लहान लहान गोजिरवाणी रूपडी, ही युगुलं, हे पेन्शनर्स
संध्याकाळी असं हे सगळं जगच
माझ्या अंगाखांद्यावर असतं
सांग ना कुणाला आनंद वाटणार नाही!
हा असा आनंदी असताना
मी काय करतो माहितीए
मी तुझ्यात माझं प्रतिबिंब न्याहाळत असतो
आंगाखांद्यावरच्या जगासकट!
कळलंय तुला हे कधी?..
तू माझ्याशी मस्ती केल्यावर
मी ढासळतो असं तू म्हणतोस
पण अरे मी तुझ्यातच थोडा थोडा
मिसळत असतो, हे नाही तू पाहिलंस!
आणि तू आखडतोस, रोडावतोस तेव्हा
-मला माहितीए, तुझ्या हातात नाहिए ते-
मी ठाम उभा तर असतोच
पण आतल्या आत तू लवकरात लवकर
माझ्याशी खेळायला यावास म्हणून
मनोमन प्रार्थना करत असतो
तुझा विरह मला डागण्या देत असतो
हे तुला समजलंय कधी?..
मला खात्री आहे तुला हे
कधीना कधी जाणवलं असेलच
कारण तुझ्या लक्षात आलंय?
मी हा असा आणि तू तसा
म्हणूनच आपली मैत्री आहे
आणि अशीच मैत्री अखंड टिकते!..
आता तुझ्या आणखीही एक लक्षात येईल
जगात अशाश्वत असं काहीच नसतं
असं म्हणतात
पण मी अभिमानाने म्हणतो आहे!
आमची मैत्री अशाश्वत आहे!
तुझ्याबरोबर फक्त मी आहे
आणि माझ्याबरोबर फक्त तू आहेस!
मैत्री ही अशी असते
हे जगाला सांगणं
मला तुझ्यामुळेच शक्य आहे!!!"