romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, October 29, 2013

अभिलेखच्या नाट्यविषयक उपक्रमातलं दुसरं पुष्प...

"अभिलेख" वर मनापासून भेट देणार्‍या माझ्या मित्रमैत्रिणींनो!
दिवाळी अगदी काही दिवसांवरच आली आहे. सण येतात ते आपलं रोजचं तेच ते जगणं सुसह्य करण्यासाठी. ते आपण जबाबदारीने आणि तरीही पूर्ण आनंदात साजरे करायचे असतात...
तेव्हा सर्वप्रथम ही दिवाळी तुम्हा सर्व सर्व नेटकरांना परम आनंदाची जावो अशा मन:पूर्वक शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद! तुम्ही दिलेल्या पाठबळामुळेच "अभिलेख" आजवर इतकी मजल मारु शकलं आहे....
सहचरहो! गेल्या वर्षीपासून "अभिलेख" चे नाट्यविषयक उपक्रमही चालू झाल्याचे आपण सर्वजण जाणताच.
"कन्या" या दीर्घांकाने (एक तासाचा नाट्यप्रयोग) या नाट्यविषयक उपक्रमाचा शुभारंभ झाला. गेल्या डिसेंबर महिन्यात ज्या दिवशी दिल्ली शहरात ती महाभयानक घटना घडली त्या घटनेआधीच्या संध्याकाळी "कन्या" दीर्घांक अशाच एका युवतीचं वास्तव उभं करत होता...
या दिवाळीनंतरच्या शनिवारी नऊ नोव्हेंबरला, सकाळी अकरा वाजता "अभिलेख" आणखी एक नाट्यविषयक उपक्रम अर्थात पस्तीस मिनिटांची एक एकांकिका "शुभमंगल सावधान!" सादर करत आहे. लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित.
हा कार्यक्रम "नृत्यरंग" या कथकनृत्य विषयक संस्थेने आयोजित केला असून संचालिका वरदा पंडित आणि त्यांच्या विद्यार्थिनी कथकनृत्य सादर करणार आहेत.
"कृष्णलीला" हे या कार्यक्रमाचं नाव आणि विषयही कृष्णलीला हाच.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली (पश्चिम) इथे "कृष्णलीला" सादर होईल. प्रवेशिकामूल्य रु.२००/- आणि रु. १५०/- ...
आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण... आपल्या शुभेच्छा आहेत म्हणूनच आम्ही "कृष्णलीला" सादर करत आहोत...
पुन्हा एकदा आपणा सगळ्याना मनापासून धन्यवाद!

Sunday, October 20, 2013

प्रस्थापित (७) : भाग अखेरचा...

भाग १, भाग २भाग ३, भाग ४, भाग ५ आणि भाग ६ इथे वाचा!
... प्रयोग चांगलाच रंगला... नेहेमीप्रमाणे स्त्री कलावंत नेहेमीच्या जागी चुकली. पुरुष कलाकारानं शिरीषचे लाफ्टर्स खाण्याच्या प्रयत्न केला. शिरीषने अर्थात ते चोख वसूल केले. तो कुठेही चुकला नाही. सगळं नेहेमीप्रमाणे...
पण नेहेमीप्रमाणे शिरीष प्रयोगात रंगून गेला नव्हता. कुठेतरी कायतरी चुकचुकत होतं. प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही, काहीतरी वेगळं चालू होतं, हे शिरीषसाठी नवीन होतं...
कसे आलो आपण इथे?... नोकरी करणार नाही असं घरी सांगितल्यावर वडील चिडले होते. त्यांनी सतत मनधरणी करूनही, आपण सतत नाही! नाही! असं ठाम सांगत राहिल. तुच्छतेने?... मग आई हादरली. मागचे भाऊ, बहीण वेळेआधीच धडपडू लागले. आपण ते सगळं पहात स्ट्र्गल करत राहिलो. या इंडस्ट्रीत... सतत वाक वाक वाकण्याचा?... अपमान, उपेक्षा सहन करण्याचा?...
आणि... आज काय करतो आहोत आपण? रोजंदारीवर असलेल्या कामगारासारखे नाईटच्या पाकीटाची वाट पाहात? प्रथितयश निर्मात्याला बांधून घेऊन? कुबेर आणि कर्ण असलेला तो वेळप्रसंगी करवादत नाही आपल्यावर बॉससारखा? काय करतो आहोत आपण? सोडून जातो?...
एवढं सगळं करून दुसर्‍या फळीपर्यंत आलो आपण... आपल्यापुढचा दिग्दर्शक निर्मात्याचा नातेवाईक. तो आपल्याला पोचून देईल आणखी वर? एक नंबरवर?...
लग्न करायचं नाही ठरवलं आपण... तत्व जपल्यासारखं. सांभाळल्यासारखं. लग्न न करता कुणा कुणाबरोबर राहिलो... काय झालं? नातं नवरा- बायकोसारखं... कधी मी चुकायचं कधी तिनी. कधी दोघांनी. मग पुन्हा नवीन... पण लग्नासारखंच... संसारासारखंच... वेगळं काय?...
प्रयोग संपल्यावर मग शिरीष जास्तच बैचेन झाला. विशेषत: स्वत:ला जबरदस्तीने आरशात बघताना, टिश्यू पेपरने खरवडून खरवडून मेकप काढताना... त्यासाठी स्वत:ला आरशात न्याहाळताना...
हे सगळं आज दारूत बुडवणं अशक्य आहे, जोर करून बुडवायला गेलो तर जास्तच भडकून उठेल हे लक्षात आल्यावर तो आणखी खचला...
सगळं झालं ते त्या चष्मेवाल्यामुळं... संसारी, नोकरदार, अभिनयात सो कॉल्ड यश न मिळवल्यानं लेखनात स्ट्रगल करू पहाणार्‍यामुळं... प्रामाणिक, मॅनर्स पाळणार्‍या आणि स्वाभिमान न सोडणार्‍यामुळं... हे जाणवल्यावर मग शिरीषला आपलं ग्लॅमरस भणंगपण जास्त जास्तच खुपायला लागलं...         (समाप्त)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...खरं म्हणजे कथा लिहावी, तिच्याबद्दल काही लिहित बसू नये... हा अपवाद...
या कथेला "साप्ताहिक सकाळ" च्या कथास्पर्धेत ’तिसरं बक्षिस’ मिळालं. हा अनुभव माझ्यासाठी तरी प्रचंड सुखद होता...
पहिलं म्हणजे कथा निकाल असलेल्या साप्ताहिक सकाळच्या ४ ऑक्टोबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाली. एका मित्राने ती बघितली. वाचल्याचं कळवलं. साप्ताहिकाचे अंक प्रसिद्ध तारखेच्या आधी दोनचार दिवस प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने कळल्याने, तसं काही लिहिणारा अपेक्षित करत असल्याने, आनंद झाला. तो बाजारात जाऊन दोनचार प्रती घेऊन साजरा केला... दसराच होता... हात पाय पसरून पसरलो...
आस्थापनामधून फोन... बक्षिस घ्यायला या... परगावी... मी त्यावेळी नको तितक्या अडचणीत. कुठेतरी पहिलं बक्षिस न मिळाल्याची रुखरुख असावी. अपरिहार्य कारण पुढे करून येणं शक्य नसल्याचं नम्रपणे सांगितलं. पुन्हा फोन... जाण्यायेण्याचं भाडं देतो पण बक्षिस स्विकारायला याच... लिहिणार्‍याला हा तर पराकोटीचा आनंद! भाडं दिलं नाही, देतो म्हटलं तरी लिहिणारा खूष... आता जाणं भागच...
बक्षिस समारंभ अत्यंत नेटकेपणानं आयोजित केलेला. एका प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ बाईंचं व्याख्यान. आयोजकांनी स्वागत करणं... जाताना भेटून मग जा असा आग्रह... पहिल्या रांगेतली खुर्ची... उत्तम व्याख्यान... थोड्याफार गप्पा- कारण परतण्याची घाई, दुसर्‍या दिवसाचं रुटीन...
परतताना मी बसमधे नव्हतोच... चार बोटं नव्हे चांगलाच वर... प्रतिकूल काळात खूप वाट पाहून आलेला असा सुखावह अनुभव... संबंधितांचे आभार मानावे तेवढे थोडे...
परतल्यावर दोन दिवसांनी फोन... त्याच गावातून... नावं मुद्दाम टाळतोय... प्रसिद्ध व्यक्तिचं नाव घेऊन फुशारक्या नकोत आणि प्रतिसाद न देणार्‍यांची उगाच नावानिशी दखल कशाला?... अशा मोडवर सध्या आहे... तर फोन... नाव ऐकल्यावर मी चाट! असं होतं... अपेक्षा नसताना... ते नावाजलेले नाट्यसमीक्षकही. त्याना कथा प्रचंड आवडल्याचं ते सांगतात. त्यावर उत्तम एकांकिका होईल असं सांगतात. तुम्ही तसा काही विचार केला आहे का? म्हणून मित्रत्वाच्या नात्याने विचारतात. भारावून जाणं आभार मानणं यातच मी गुंतलेला असताना ते ज्या प्रायोगिक संस्थेशी संबंधित असतात त्यातला एकाचा संपर्क क्रमांक देऊन, याना फोन करा आणि मला येऊन भेटा पुढचं काय ते बोलू असं आमंत्रणही देतात... मी सातव्या आसमानात पोचलेला... ते शांत, मृदू...
मी उत्साहाने त्या संपर्क क्रमांकावर फोन करतो... पलिकडे,  त्याला कल्पना असावी असा आणि मला कल्पना नाही असा रुक्ष आवाज... विरोधी आवाज लगेच ओळखता येतात... माझं त्याना भरभरून सांगणं... येऊ ना? म्हणून विचारणं... ते नकारघंटा हातात घेऊन बसल्यासारखे... हो ही नाही आणि नाही ही नाही... पण म्हणजे नाहीच!...
वाईट वाटतं... पण काळ जातो तसं आयरनी वगैरे आठवायला लागते...
एका नकारात्मक अनुभवावर लिहिलेली कथा. अपेक्षा घेऊन चांगली नाटकं लिहून ती कुठे होत नाहीत तर तद्दन नाटक लिहून प्रयत्न केला तर तिथे प्रतिसाद हा असा... त्यावर कथा लिहिली, त्याला बक्षिस मिळालं, त्यानंतर एका प्रथितयश नाट्यसमीक्षकाला त्यात एकांकिकेचं बीज दिसलं, ते प्रायोगिक रंगकर्मींनी नुसतं पारखण्याचंही टाळलं... असा हा अनुभव किंवा अनुभवांची शृंखला...
करत रहाणं आपल्या हातात असतं. त्यानंतर येणारा अनुभवरूपी प्रतिसाद, त्याला काही लॉजिक नसतंच... मग आपल्याला जे वाटतं ते आपण स्वत:च करायचं. आपल्याला शक्य असेल तसं. पण करायचंच... असो!