romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, September 3, 2015

'गुरुजनां प्रथमं वंदे' पुस्तक उपलब्ध...

अभिलेख प्रकाशनातर्फे ''गुरुजनां प्रथमं वंदे'' या कादंबरीची पुस्तकं पुस्तकवाले डाॅट काॅम, आयडिअल-दादर, मॅजेस्टिक-शिवाजी मंदिर, पीपल्स बुक हाऊस-फोर्ट, शब्द द बुक गॅलरी- बोरिवली, बुकगंगा-पुणे, रसिक साहित्य-पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत...
           
               प्रस्तावना  : श्रीनिवास हेमाडे

मराठी व्युत्पत्ती कोशकार कृ पां. कुलकर्णी यांच्या नोंदीनुसार 'प्रस्ताव' या संज्ञेचा अर्थ शोधण्यासाठी ज्ञानदेवांपर्यंत प्रवास करावा लागतो. ज्ञानदेवांनी सांगितलेला अर्थ उपक्रम, प्रसंग (occasion) असा असून 'प्रस्तावणे' चा अनुषंगिक अर्थ 'सांगण्यास आरंभ करणे'. गेल्या काही दशकापासून 'ठराव' (resolution) हा प्रशासनीय अर्थ जोडला गेला आहे, असेही कृपां. नमूद करतात. उपोद्घात, आरंभ हे अन्य समानार्थी मराठी शब्द. Preface, Prelude, Precursor, Preamble, Prologue, Forward, Protasis, Prolusion, Prolepsis, Prolegomena, Prefix हे आणखी काही आंग्ल भाषेतील समानार्थी शब्द. या प्रत्येक शब्दाचा अर्थ नेमका निश्चित करणे शक्य आहे (पण त्या जंजाळात शिरण्याची ही जागा नव्हे). Preface, Prelude इत्यादी संज्ञा शोधनिबंध, प्रबंध इत्यादी ज्ञानक्षेत्रात (academic field) वापरले जातात आणि तेथे ते फिट बसतात.
मी येथे 'प्रस्तावना' हा शब्द Forward या अर्थाने घेत आहे. पुढे जाणे, जात राहणे, सरकवणे, विद्यमान स्थिती ओलांडून प्रगत दिशेन जाणे या अर्थाने Forward  उपयोगात येतो. या कादंबरीत जे काही वास्तव (वास्तवातील किंवा कल्पितातील) वाचकाच्या समोर येईल, त्या पलीकडे त्याने जावे, काहीएक विचार करावा; असे सूचन येथे अपेक्षित आहे.
तस्मात, ही प्रस्तावना म्हणजे या कादंबरीत काय आहे याचा गोषवारा देऊन तिचा परिचय देणे नाही. त्याचप्रमाणे समीक्षा करणेही नाही. ग्रंथ परिचय व समीक्षा यात फरक आहे, हे आपण जाणतो. या दोन्ही मूलतः स्वतंत्र साहित्यिक कृती आहेतच. ग्रंथ परिचय देण्यात समीक्षा नसते, पण समीक्षेत परीक्षणासह ग्रंथाचा, कलाकृतीचा परिचय तिच्या विविध अंगासह येतो. समीक्षा परिचयापेक्षा व्यापक असते. त्यामुळे परिचय देणे, समीक्षा करणे हाही प्रस्तावनेचा हेतू नसतो.
           प्रस्तावना म्हणजे लेखनाची जाहिरातही नसते. त्यासाठी बाजार खुला आहे.
'प्रस्तावना' हा शब्द Forward या अर्थाने घेतला तर प्रस्तावनेच्या निमित्ताने लेखकाने, कवीने, साहित्यिकाने हाताळलेला विषय वाचकासमोर आणणे, लेखनाची समकालिन उचितता आणि विद्यमान काळात तिचे महत्त्व अधोरेखित करणे, असे मी मानतो. पण येथेही  न थांबता प्रस्तुत कादंबरीच्या विषयाचा, आशयाचा आलेख पाहता ती सामाजिक वास्तव मांडणारी असल्याने त्या वास्तवाचा प्रथमपुरुषी एकवचनी वाचकाने स्वतःशी कोणते नाते आहे, याचा शोध घ्यावा, हे अपेक्षित आहे. म्हणजेच वाचन आणि मनरंजन या पलिकडे वाचकाने जाणे अपेक्षित आहे.
           लेखक म्हणून विनायक पंडितांना हा विषय सुचला, भावला. याचा अर्थ त्यांच्या अंर्तमनात कुठेतरी खोलवर त्यांना यातील भंपकपणाची जाणीव झाली. त्याचवेळी माणूस विचारापेक्षा विकारांपुढे, अंध रूढी, परंपरापुढे  झुकतो, या कटू वास्तवाची जाणीवही झाली. ती सगळी अस्वस्थता त्यांच्या लेखनातून, त्यातील उपहासात्मकतेतून पुढे येते. हे एका संवेदनशील मनाचे जाणवणे आहे. त्यांच्या या भावनेशी आपण समरस होऊ शकतो का ? हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे.
            कादंबरीचे कथानक म्हणजे धर्मभावनेचे होणारे औद्योगिकीकरण. पाच गुरुजनांनी मांडलेला जीवघेणा खेळ- गुरुपंचक ! एक आधुनिक गुरुरिसॉर्ट. 'रिसॉर्ट' म्हणजे विश्रांतीस्थळ. ही आधुनिक मूलतः पाश्चात्य-युरोपीय बाब आहे. आठवडाभर मरमर काम करून आठवड्याच्या शेवटी शरीर, मन, बुद्धि यांना विश्रांती देणे, पुढील काळासाठी त्यांना ताजेतवाने करणे हे आरोग्यविषयक सूत्र यात सामावलेले आहे. गुरुसंकुल किंवा गुरुरिसॉर्ट ही काय संकल्पना आहे?
गुरुरिसॉर्ट हे आजच्या भीषण भारतीय समाजाचे वास्तव आहे. भारतीय धर्मजीवन कसा अधिकाधिक अवनातीकडे प्रवास करीत आहे, याचे हे भेदक चित्रण आहे. ते करताना लेखक विनायक पंडित यांची आतील जाणीव त्यांच्या भाषेला उपहासाची, तिरकसपणाचा आविष्कार देते. भाषेचे अनेक नमुने प्रगट करण्यास प्रवृत्त करते.मद मोह काम या रिपुंच्या विळख्यातून बाहेर न पडलेल्या या गुर मंडळींचं सत्य रिपुग्रस्तरूपदर्शन घडवित लेखक अखेरीस लोकशाही प्रशासन, विज्ञान- तंत्रज्ञान कसं उपकारक ठरत, याचा पुरावा देतो.
हा खेळ भारतीय भूमीत घडतो. भारतीय मानसिकता प्राचीन काळापासून आगतिक आहे. भारत विज्ञानवादी देश असल्याचा, वैज्ञानिकता या मातीत असल्याचा दावा करणारी ही संस्कृती वास्तवात वैज्ञानिक वृत्ती विकसित करू शकली नाही. हे घडते, कारण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मानवी गरजेचा आपण धंदा करण्यास शिकलो आहोत ! विशेषतः १९९० नंतरच्या तथाकथित जागतिकीकरणाच्या लाटेने मुलभूत मानवी भावना बाजारू बनविल्या गेल्या. त्या कशा याचे दर्शन लेखक विनायक पंडित येथे तपशिलासह घडवितात.
संस्कृतीची विक्री करता येते का ? तिला बाजारपेठेत उभी करता येते का ? तिचा धंदा, उद्योग करता येतो का ? तसे करणे किती नैतिक आहे ? संस्कृती उद्योगाची नैतिक पातळी कोणती ? या सारखे प्रश्न उपस्थित करता येणे आवश्यक आहे, तरच आपण योग्य 'प्रस्तावना'(Forward) करीत आहोत, असे वाचकांना वाटेल, अन्यथा नाही. प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे पुढे सरकणे, योग्य दिशेने कूच करणे.
संस्कृतीची व्याख्या करता करता जगातील तत्त्ववेत्ते , विचारवंत , क्रांतिकारक, राज्यकर्ते, राजकीय तत्त्ववेत्ते थकून गेले. जगण्याची रिती असलेली संस्कृती बाजारपेठेत वस्तू म्हणून आली तर तिचे स्वरूप काय राहील ? या कृतीला संस्कृतीचे स्वरूप मानता येईल का ? मग अशी संस्कृती ही कोणती संस्कृती ?
            उत्तर शोधता येईल.
            'संस्कृती उद्योग' या संकल्पनेची मांडणी प्रथम थीओडोर अडोर्नो (१९०३ -१९६९ Theodor Ludwig Wiesengrund, Adorno)  आणि मॅक्स हॉर्कहायमेर (१८९५-१९७३ Max Horkheimer) या दोन जर्मन ज्यू समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्त्यांनी केली. जर्मनीतील फ्रॅन्कफूर्ट स्कूल (Frankfurt School) या नावाने प्रसिद्ध पावलेल्या विचारसरणीशी दोघेही निगडीत होते. समीक्षात्मक सिद्धान्त ( critical theory) हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.  
   'संस्कृती उद्योग' (The Culture Industry) हा शब्दप्रयोग त्यांनी त्यांच्या डायलेक्टीक ऑफ एनलायटेनमेन्ट (Dialectic of Enlightenment १९४४) या ग्रंथातील "दि कल्चर इंडस्ट्री : एनलायटेनमेन्ट अॅज मास डिसेप्शन" (“The Culture Industry: Enlightenment as Mass Deception”) या प्रकरणात वापरला.
'संस्कृती उद्योग' (The Culture Industry) ही संज्ञा 'अस्सल संस्कृती' (authentic culture) च्या विरोधी अर्थाने ते वापरतात. संस्कृतीचे बाजारीकरण करणे म्हणजे 'संस्कृती उद्योग'. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा काही प्रमाणात व्यापारी तत्त्वावर उपलब्ध होणे, ही समाज व्यवस्थेचे अंग होऊ शकतात. पण त्यांचे व्यापक प्रमाणावर बाजारीकरण होणे आणि शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, यासारख्या लोकशाहीने मान्य केलेल्या गरजांचे उद्योगीकरण होणे यात फरक केला पाहिजे.
       'संस्कृती उद्योग' या संकल्पनेतील 'उद्योग' चा अर्थ समजावून घेतला पाहिजे. प्रत्येक सांस्कृतिक कृतीला बाजारपेठीय मूल्य देणे, म्हणजेच ती पैसे देवून विकत घेता येईल आणि विकता येईल, अशी एक वस्तू बनविणे, हे या उद्योगाचे स्वरूप आहे. एकदा ती खरेदी-विक्रीची वस्तू बनली की तिला बाजारपेठेचे विपणन, जाहिरात, वितरण यांचे नियम लागू होतात. मग अनेक ठिकाणच्या लाखो ग्राहकांना ती उपलब्ध व्हावी, यासाठी ती एकसाची बनविली जाते. यात त्या वस्तूची मौलिकता आणि विविधता मारली जाते. MACDOLAD, KFC, PIZZAHUT, किंवा असेच काहीतरी अथवा मॉल्स ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. कोणत्याही दुकानात खरेदी केलेली वस्तू त्या कंपनीच्या अन्य कुठल्याही दुकानात कुठेही बदलता येण्याची सवलत याचा अर्थ सर्वत्र एकसाची वस्तू मिळतील, असा होतो.  
          अडोर्नोच्या मते, प्रगत भांडवलशाही हाच सामान्य जनतेविरुद्ध एक मोठा  कट आहे आणि 'संस्कृती उद्योग' (Culture Industry) हा त्याचा अनिवार्य हिस्सा आहे.
          अडोर्नो संस्कृती उद्योग आणि जनसंस्कृती यात फरक करतो. जनसंस्कृती ही साऱ्या समाजाचा सहभाग असणारी, प्रत्येक माणूस ज्याचा निर्मिक, वाहक व उपभोक्ता आहे, जो पुढच्या पिढीला आपल वारसा म्हणून संक्रमित करतो अशी असते. त्या उलट अस्सल संस्कृती अशी स्वयंमेव मूल्यवान असते. ती उत्क्रांत झालेली आहे, ती दीर्घकालीन मानवी सर्जक प्रक्रिया आहे. ती मानवी कल्पकता, जगण्याचा संघर्ष करते. धर्म, तत्त्वज्ञान निर्माण करते. ती अशी काही पूर्वनियोजित रचित नसते. जनसंस्कृती ही उत्क्रांत झालेली अवस्था आहे तर 'संस्कृती उद्योग' अनेक कृत्रिम गरजांना जन्म देतो. त्यात साधा पाव ते पिझ्झापासून धार्मिक समजला जाणारा उन्मादक अनुभव यांचा उद्योगधंदा करणारी वस्तूंच्या यादीत समावेश होतो.
कुठल्याही उद्योग धंद्याप्रमाणे संस्कृती उद्योगाचाही एकच हेतू राहतो- केवळ नफा ! म्हणजे या उद्योगाचे स्वरूप सांस्कृतिक न राहता निव्वळ आर्थिक बनते. खाणे, पिणे, कपडेलत्ते, घरे, रस्ते प्रत्येक गोष्ट विकणे आणि विकत घ्यावयास लावणे हा संस्कृतीचा उद्योग करणे असते. जी जी गोष्ट सांस्कृतिक म्हणविली जाईल ती प्रत्येक कृती, वस्तू, घटना म्हणजे सण, उत्सवासह रोजचे दैनंदिन खानपान सुद्धा विक्रीला आणणे. साध्या गप्पा मारणे ते घरचा गणपती, मंगळागौर, घटस्थापना, या साऱ्याचे सार्वजनिकरीत्या साजरे करणे, त्या करण्याची कंत्राटे घेणे हा उद्योगधंदा बनतो. मंगलाष्टकं, भटजी ते साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ लग्नाची पहिली रात्रीची तयारी यांचे कंत्राट बनते. मग त्यात एकसाचीपणा आणला जातो. अशा कार्यक्रमात, समारंभात घरच्या प्रत्येक माणसाचा, मित्र, आप्तेष्टांचा असलेला सहभाग नष्ट होतो. 'संस्कृती' या नावाने जी विविध वस्तूची दुकाने, हॉटेल्स पहिले की लक्षात येईल.  
             मानवी संस्कृतीचाच अनोखा आविष्कार असलेला 'धर्म' सुद्धा 'धंद्याच्या' विषारी विळख्यातून सुटत नाही. प्रत्येक धर्म जणू काही दुकान बनला आहे. परिणामी,
(१)धर्म ही अमूर्त मूळ भावना, त्यास जोडून येणारा धार्मिक अनुभव, धर्मविषयक ज्ञान ही बाब
     एक उत्पादन' बनते.
(२) गुरु, शिष्य ही माणसे विक्रेते बनतात.
(३) गुरुशिष्य परंपरा ही व्यवस्था विक्रीव्यवस्था बनते.
(४) मंदिरे, मशिदी, चर्च,गुरुद्वारा इत्यादी प्रार्थनास्थळे म्हणजे दुकाने बनतात.
अशा  रीतीने समग्र धर्मसंस्था हा एक उद्योगसमूह बनतो.(उदा. पीके हा चित्रपट )
माणसाची जगण्यासाठीची होणारी लढाई निरर्थक आहे, त्याऐवजी त्यांनी देवी-देवता, बाप्पा, बजरंगबली, महादेव,गुरु महाराज, योगी पुरुष, अम्मा, माताजी, बापू, तांत्रिक, मांत्रिक यांना शरण जावे, त्यांना जगणे समर्पित करावे अशी योजना 'संस्कृती उद्योगसमूहा' कडून आखली जाते. माध्यमे केवळ त्याचसाठी वापरली जातात, असे अडोर्नो स्पष्ट करतो. व्यक्तीची आणि जनसमूहाची सामाजिक जाणीव, सामाजिक नैतिकता नष्ट होऊन समाज जास्तीत जास्त अंधश्रद्धा बाळगणारा होईल, आंधळा, बहिरा, अविचारी शिष्यवर्ग तयार होईल, असे पहिले जाते. "वर्तमान समाज व्यवस्था ही एक सकारात्मक, विधायक व्यवस्था असून ती ईश्वर निर्मित आहे, ईश्वर सर्वांचा तारणहार आहे" हे ठसविण्यासाठी मधले दलाल म्हणून समस्त अण्णा बापू महाराज मंडळीची स्थापना केली जाते.        
 अडोर्नो- हॉर्कहायमेरच्या मते, संस्कृतीच्या उद्योगीकीकरणाचे माध्यम कोणते ? तर चित्रपट, रेडीओ, टीव्ही, टेलीफोन ही लोकमाध्यमे. या जनमाध्यमांनी "लोकप्रिय संस्कृतीला' (पॉप्युलर कल्चर) ला जन्म दिला. ही संस्कृती लोकांना मनोरंजनाच्या गुंगीत ठेवते आणि समाजातील खऱ्या समस्यांपासून त्यांचे परात्मीकरण करते, त्यांना निष्क्रिय बनविते. लोकांची आर्थिक परिस्थिती कशीही कितीही हलाखीची असली तरी ही जनमाध्यमे लोकांना अंधानुयायी आणि आत्मतुष्ट करून टाकते. स्वातंत्र्य, सर्जकता आणि आनंद या माणसाच्या अस्सल मानसिक गरजा असताना त्यांना मिथ्या उच्च कलांमध्ये आणि चंगळवादी भांडवली गरजांमध्ये गुरफटवून टाकते. या गरजा केवळ भांडवलशाहीच पूर्ण करू शकेल, असा खोटा विश्वास त्यांना देते.  
            हे कोण करतं ? तर जगातील विविध कंपन्या, मोठाले उद्योगसमूह. आधुनिक भांडवलशाहीचे अपत्य असणारी ही कंपनी संस्कृती हे कारस्थान करते. मोबाईल, वडापाव ते गृहनिर्माण संकुले यांचे ते जणूकाही मॉल्स उभे करतात. अडोर्नोच्या म्हणण्यांनुसार आधुनिक भांडवलाचा एकमेव हेतू संपूर्ण मानवी समाज कह्यात घेणे, त्यासाठी विविध मानव गटातील बारीकसारीक मतभेद मिटविणे, त्यांना एका समान गरजेच्या एका सूत्रात गोवणे हा आहे. गरज समान झाली की माणसाची चिकित्सक वृत्ती नाहीशी होते किंवा ती नाहीशी करणे सोपे जाते. हे काम 'संस्कृती उद्योग' नावाचा उद्योगसमूह उभारून करता येते. संस्कृती उद्योगधंद्यामधूनच 'सुखासीनतेचा उद्योग' (The leisure industry) विकसित झाला. पर्यटन, हॉटेल व्यवस्थापन हे उद्योग त्यातून आले. त्याचाच भाग म्हणून सेक्स टुरिझम आला.
            'मानवी संस्कृती' एकदा 'उद्योग' म्हणून मान्य झाली की काय घडते ? तर ती लोकांमधील मुळची संस्कृती निर्माण करण्याची नैसर्गिक अभिवृत्ती, प्रवृत्ती, इच्छा यांची हत्या होते. ते एकसाची जीवन जगू लागतात. हा नवा सर्वंकषवाद (Totalitarianism) बनतो.
          दुसरीकडे संस्कृती निर्माण करण्यावर मक्तेदारी निर्माण होते. भांडवलशाही संस्कृती उत्पादकाची जागा घेते. तीच 'संस्कृती म्हणजे काय ? " ते ठरविते. म्हणजे  जी गोष्ट सर्वांची असते ती काही मूठभरांची होते. या प्रक्रियेत संस्कृती नष्ट होऊ शकते. लोकांच्या हाती केवळ उपभोग घेणे राहाते आणि लोक मग तेच करीत राहतात. परिणामी सर्व चित्रपट, टीव्ही वरील कार्यक्रम एकसाची होतात. उत्पादनातील एकसाचीपणा हे यांचे वैशिष्ट्य बनते. परिणामी मॉल्समध्ये एकसारख्या वस्तू उपलब्ध होतात.
           'संस्कृती उद्योग' या संकल्पनेची सांगड भारतीय समाजाशी घातली तर 'आधुनिक भारतीय संस्कृती उद्योग' या नावाची नवी गोष्ट मिळते. पण यातील आधुनिक म्हणजे लोकशाहीप्रधान असे नसून 'नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाने युक्त केवळ उपभोगी समाज' असा अर्थ लावावा लागतो. वैज्ञानिक दृष्टी विकसित झालेला समाज असा अर्थ लावता येत नाही. तसे झाले असते तर विनायक पंडितांची हीच कादंबरी काय, पण अशा प्रकारे रहस्यभेद करणारी कोणतीही कादंबरी अथवा  कलाकृती निष्पन्न होण्याची वेळ आली नसती !
        भारतात भांडवलशाही आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यांचा अनोखा मिलाफ झालेला दिसून येतो. वास्तवात हिंदुत्ववादी विचारसरणीत भांडवल नावाची गोष्ट नाही. तेथे सत्ता आहे आणि ती सांस्कृतिक स्वरुपाची आहे. ज्ञान हे या सत्तेचे मुळरूप आहे आणि समग्र संस्कृती हा तिचा आविष्कार आहे. पुरुषार्थ व्यवस्था, आश्रम व्यवस्था आणि वर्ण-जाती-जमाती व्यवस्था यांचा एक अत्यंत गहिरा अंर्तनिहित तार्किक संबंध दाखविता येतो. आर्थिक भांडवल या विचारसरणीत कधीही महत्वाचे नव्हते आणि नाही. ज्या हिंदुत्ववादी घटकांना अर्थ हेच बल वाटते, ते खऱ्या अर्थाने हिंदूत्ववादी  नसतात. ज्यांची नावे आर्थिक व्यवहारांशी म्हणजे भ्रष्टाचार, गुप्त-सुप्त गुंतवणुकी, इत्यादीत जे गुंतलेले असतात, ते हिंदू असतील पण अस्सल हिंदुत्ववादी नसतात.
       पण हिंदुत्ववादी, इस्लामवादी इत्यादी धर्मगुरूंना वर्ण-जात-लिंगभेद व्यवस्थेत 'संस्कृती उद्योग' गवसला आणि कमाल हीनतम राजकारण सुरु झाले. संस्कृती हा 'उद्योग' खरे तर नफेखोरीचा धंदा (trade)  बनल्याचा परिणाम भारतात अतिभीषण झाला. एकतर,  प्राचीन  काळात विविध कारणांमुळे भयंकर प्रसिद्ध झालेली अवैदिक-वैदिक अशा दोन्ही परंपरेतील गुरु-शिष्य पद्धती, गुरुकुल रिती बदनाम झाली.  मुळात ही पद्धती वर्ण, जात, लिंगभेदानीं ग्रस्त झालेली, पक्षपाती होतीच. पण आज विसाव्या शतकात तिला थेट धंद्याचे स्वरूप दिले गेले आणि पुन्हा एकदा ती 'आहे रे नाही रे' च्या विळख्यात सापडली. दुसरीकडे, साईबाबासारखे सर्वधर्मसमभाव असणारी सुफी संतपीठे म्हणजे धार्मिक उद्योगसमूह झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र या सारख्या सणांना तर उघडपणे उद्योगाचे स्वरूप दिले गेले आहे.
          आपण हे लक्षात घेतले पाहिजे की  धर्म, धर्मभाव, धार्मिकता, धर्मसंस्था, धर्मगुरू, धर्मसंप्रदाय यांचे मुलभूत सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक कार्य पाहता आणि भूमिका लक्षात घेता धर्म भावनेने मानवी मनाची, मानवी बौद्धिकतेची, त्याच्या प्रज्ञेची रचना केली आहे. 'धर्म' ही संस्कृत किंवा देवनागरी भाषेत मांडली जाणारी वैदिक हिंदू संकल्पना आणि तिची समांतर असणारी Religion ही ग्रीक-पाश्चात्य संकल्पना   इस्लाम, ख्रिस्ती,शिंतो इत्यादी धर्म कल्पना याही आणखी इतर वैशिष्ट्यांनी सजलेल्या आहेत.
        'धर्म' या संकल्पनेचे विवेचन, विवरण, त्याचा अन्वय, मुलार्थ, लक्षार्थ या तत्त्व जंजाळात पडण्याचे येथे काही कारण नाही. तो पंडितांचा, विद्वानांचा, अभ्यासकांचा अभ्यासाचा प्रांत आहे. अर्थात अभ्यास आणि जगणे यात फरक करता येणे आणि या दोन जीवन पद्धतींना एकमेकांपासून अलग करता येणे शक्य आहे. या अभ्यासाचाच एक भाग म्हणून धर्माचे तत्त्वज्ञान ही अधिपातळीवर जाणारी आणि नेणारी अन्य एक चिंतन शाखा आहे.    
        इथे एक फरक लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. सर्वधर्म अध्ययन केंद्र आणि सर्वधर्मसंकुल या दोन भिन्न गोष्टी आहेत. तसेच धर्मातील तत्त्वज्ञान आणि धर्माचे तत्त्वज्ञान या दोन स्वतंत्र  बौद्धिक घटना आहेत. धर्मातील तत्त्वज्ञान म्हणजे त्या त्या धर्मातील तत्त्वे, जीवनरिती, त्यांचे नियंत्रण सांगणे. धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे धर्म या संकल्पनेची सर्वांगीण काटेकोर तार्किक चिकित्सा करणे. सर्वधर्म अध्ययन केंद्र ही  चिकित्सा करते तर सर्वधर्मसंकुल धर्माचे दुकान मांडते, धार्मिक दहशतवाद निर्माण करते. त्यात आणखी प्रगत टप्पा नमूद करावयाचा असेल तर धर्माचे नीतिशास्त्र  ही  बौद्धिक घटना देखील आणखी वेगळी आहे.      
            जगाकडे नसलेला एक अहिंसक उपाय भारताकडे गांधीवाद रूपाने अस्तिवात होता आणि आहे. तो स्वदेश, वीर-झारा, चक दे  इंडिया,  लगे रहो मुन्नाभाई, ओ माय गॉड,  देऊळ आणि आजचा पीके  सारख्या चित्रपटात आढळतो.
           धर्मसंकुल काय भीषण परिणाम करते, कोणता अमल चालविते, याचे चित्रण करण्यात लेखक विनायक पंडित यशस्वी झाले आहेत. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो...