romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, March 28, 2011

आकाशवाणीवरचं ध्वनिमुद्रण

आकाशवाणीवर प्रवेश तर उत्तम झाला.ज्या दोन डॉक्टरांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या त्यानी मी नवोदित असूनही मला प्रोत्साहनच दिलं.आता मुख्य काम होणार होतं.ध्वनिमुद्रणाचं.
आकाशवाणीच्या इमारतीतल्या ध्वनिमुद्रण कक्षाकडे जाताना आणि आत शिरताना एका बाजूला अनामिक भीती आणि दुसर्‍या बाजूला नवीन काही घडतंय याची हूरहूर जाणवत होती.
ध्वनिमुद्रण कक्षाचे दोन भाग होते.एका भागात गोल टेबल.त्यावर चार ते पाच ध्वनिक्षेपक.भोवताली खुर्च्या.हा कक्ष ज्यांचं ध्वनिमुद्रण करायचं आहे त्या व्यक्तींसाठी आणि दुसरा पर्यायानं लहान आणि भल्यामोठ्या ध्वनिमुद्रण यंत्राने व्यापलेला कक्ष ध्वनिमुद्रकाचं काम करणार्‍यासाठी.
त्यावेळी ध्वनिमुद्रणात संगणकीय तंत्रज्ञान नव्हतं.ज्यांचं ध्वनिमुद्रण करायचं आहे त्याना ध्वनिमुद्रक तसंच कार्यक्रम अधिकार्‍याकडून अनेक सूचना दिल्या जात.
हातात कागदांची चळत असेल आणि ती वाचत ध्वनिमुद्रण करायचं असेल तर कागद सरकवल्याचा, फडफडवल्याचा आवाज आपल्या कानांना जाणवला नाही तरी ध्वनिक्षेपक बरोबर पकडतो.त्यावेळी हा दोष काढून टाकणं बहुदा जिकीरीच होत असावं.संगणकीय तंत्रज्ञान आल्यानंतर आपल्यासारखा माणूसही Audacity सारखं सॉफ्टवेअर वापरून नुसतं ध्वनिमुद्रणंच काय ध्वनिमुद्रण संकलनही शिकून घेऊन उत्तम पद्धतीने वापरात आणू शकतो.ध्वनिमुद्रणातल्या नको असलेल्या आवाजांची गच्छंती सहज होऊ शकते.
तेव्हा तसं नव्हतं.तुम्ही ध्वनिक्षेपकासमोर बसलात की तुमची बसण्याची ढब बदलतानाही आवाज होऊन उपयोग नसे.पायांचा टेबलाच्या खालच्या भागावर होणारा आघात, काही जणांना असते ती पाय हलवत रहायची सवय, अशा गोष्टींमुळे निर्माण होणार्‍या व्यत्ययांवर ध्वनिमुद्रण मधेच थांबवून फेरध्वनिमुद्रण करण्याशिवाय गत्त्यंतर नसे.
नवोदित आणि अनुभवी दोन्ही ध्वनिमुद्रणकर्त्यांना ध्वनिमुद्रक असलेल्या कक्षाकडे आणि ध्वनिमुद्रकाच्या उंचावून खाली आणलेल्या हाताकडे डोळे लाऊन बसावं लागे.प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी आणि एकमेकांच्या आवाजाची पट्टी जुळवणं हे धनिमुद्रकाचं पहिलं महत्वाचं काम असे.ते त्याला अचूकपणे करावं लागे.
ध्वनिक्षेपकाच्या नक्की कुठल्या बाजूला आपलं तोंड असावं हा ही नवोदित ध्वनिमुद्रणकर्त्याला जिकीरीचा व्यायाम होई.तोंडातून प, फ, भ अशा अक्षरांमुळे बाहेर पडणार्‍या श्वासाचा ’ब्लो’ ध्वनिमुद्रणात व्यत्त्यय आणतो हे सतत लक्षात ठेवावं लागे.हा दोष काढून टाकणं संगणकीय तंत्रज्ञानात पर्यायानं सहजशक्य झालं आहे.
या सगळ्या कसरती मला सुसह्य झाल्या त्या ध्वनिमुद्रक, कार्यक्रम निर्माते जयंत एरंडेसर आणि ज्यांची मुलाखत घ्यायची ते तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यामुळेच.मी वयानेही या सगळ्यांपेक्षा चांगलाच लहान होतो.जिथे टीमवर्क अर्थात समूहाने काम करायला लागतं अशा कामांत अनुभवी वरिष्ठांनी जर नवोदितांना सांभाळून घेतलं नाही तर त्या कामाचा विचका होतोच पण त्या नवोदिताला अशा वातावरणाबद्दल कायमची अढी बसते.सुदैवाने मला अनुभवी वरिष्ठांची मदत झाली.माझं त्यांच्या इतकं महत्वाचं काम नसून त्यानी माझं कौतुक केलं आणि मला या माध्यमासंबंधी मार्गदर्शनही केलं.प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण करताना तर दोन्ही डॉक्टर्सनी ती मुलाखत अगदी गप्पांसारखी रंगवली...
आता पुढचा टप्पा होता आकाशवाणी नाट्य विभागातल्या आवाजचाचणीचा.दरम्यान मी त्यासाठीचा अर्ज भरला होता.नाटकांतून अभिनय केलेला असल्यामुळे या चाचणीत मला जास्त रस होता.आवाजाची सर्वसामान्य प्रत जोखणं, म्हणजेच आवाज ध्वनिमुद्रणासाठी उपयुक्त आहे ना हे पहाणं आणि तो आकाशवाणीवरून केवळ आवाजातलं नाटक निर्माण करण्यास योग्य आहे ना ते जोखणं अशा दोन टप्प्यांवर ही चाचणी होईल असं सांगण्यात आलं होतं.
चाचणीसाठी कुठल्याही नाटकातला एक संवाद तयार करून आणायचा आणि त्याचं वाचून ध्वनिमुद्रण करायचं होतं.मी संवाद शोधायला सुरवात केली आणि शोधाअंती त्यावेळी व्यावसायिक रंगभूमीवर लोकप्रिय झालेल्या ’माझं काय चुकलं?’ या नाटकातल्या नायकाच्या एका संवादानं माझा ताबा घेतला.हे नाटक ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार श्री रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं.त्यांच्याच ’जौळ’ या कादंबरीवर आधारित.
ही एक सत्य घटना होती.मुंबईजवळ असलेल्या शहरातल्या एका उपनगरातल्या घरातली आई, मुलगा आणि सून यांचा एकत्र संसार, बायको आणि आई यांच्यामधे झालेली त्या मुलाची प्रचंड ओढाताण, जागेची अडचण, आईचं खडतर पूर्वायुष्यं आणि हट्टी स्वभाव, मुलाचा मनस्वी स्वभाव आणि शेवटी मुलाचं लोकलमधून उडी मारून आत्महत्या करणं…
आत्महत्येआधीच्या, त्या मुलाचा आणि त्याच्या बायकोचा त्या संवादानं माझा कब्जा घेतला होता.मुलाची आत्महत्येची मानसिक तयारी पूर्ण झाली आहे.’लोकलच्या दारात उभं रहायचं.अंधारा लांबलचक बोगदा आला की दाराच्या मधल्या रॉडवरचा हात अलगद सोडून द्यायचा’ इतक्या सहजपणे तो बोलतो, इतकी त्याची तयारी झाली आहे!...
हा संवाद निवडलाय म्हणजे मी भलतंच आव्हान पेलतोय का? कसं होईल ध्वनिमुद्रण? नाही झालो उत्तीर्ण तर काय? नेहेमीसारखा मी अनेक प्रश्नांना आणि त्यामुळे येणार्‍या अपरिहार्य ताणाला सामोरा जाऊ लागलो.झोप उडणं हे अशावेळी नेहेमीचं होऊन बसतं तसं बसलं…

Friday, March 25, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(९)

भाग (८) इथे वाचा.
मग निशीने ते कसलेसे जाम मनसोक्त चापले.अगदी छोट्या, हाताच्या पंजात मावणार्‍या स्टीलच्या प्लेटवर टर्राक टर्राक आवाज काढून.अधूनमधून, सुरवातीला आणि शेवटीही भय्याकडून त्याने जामचा पाक प्लेट्वर ओतून घेतला तो वेगळाच.
“अब हो गया बाबा आपका खाकर?”
“एऽऽ डालो! और डालो पाकऽ च्यायलॉऽ हमॅशॉका गिर्‍हाईक हैऽऽ”
निशीला आता परतणं भाग होतं, एरवी गोड झाल्यावर तिखटासाठी फिरावं असं त्याच्या मनात फार होतं.मरणाची भूक काही केल्या शांत होत नव्हती.
शर्टला, पॅंटला फसाफसा हात पुसत निशी नाईलाजाने परत शाखेकडे निघाला.दोन्ही हात कोपरात दुमडून पंजे आपोआप छातीजवळ आले आणि लगालगा चालतान पंजे जीव नसल्यासारखे हलत राहिले.हालचालीना आपोआप बायकीपणाची झाक आणत.
मागच्या दाराने तो तरातरा शाखेत शिरला आणि समोरच्या सोफ्यावर त्याचे सहकारी खजांची (कॅशियर्स) अनुक्रमे करकेरा आणि आंजर्लेकर अचानक ताठ झाले.
“येऽऽ आला ब् हा ××××× एऽऽनिश्याऽएऽऽआदी इकडे ये! इकडे ये!”
“थांब रे!ऽऽ पहिली कॅश टॅली करूं घेऊ दे मला!”
“एऽऽनिश्याऽ येडेऽ बजा कितनाऽ”
“तो मैं क्या करूं रे करकेर्‍या! बैठा कितना बजे? बारा बजे!”
आंजर्लेकर उठलाच.
“ये ×××ऽऽ आदी आमची कॅश घेऊन टाक्! साल्या गाडी जात्ये आमची.तुला काय तू येकटा.पोरं बाळं आहेत आम्हाला.चलचलचल!”
“एऽऽ घाई करू नकोस हं आंजर्लेकर! हां! माझी कॅश टॅली झाल्याशिवाय-”
“निश्याऽ×××ऽ लीडरको बोलूं? अबी आनेका है वो? बोल! बोलूं?”
“एऽऽ क्या करताय रे तुम? मेरा टॅली नही कुच नही! लपडा हो जायेगा तो मेरेको भरना पडेगा.सुबेसे एक तो हैरान हो गया मैं! एक तो कोई बैठनेको तैयार नही मेन कॅशमें-”
आंजर्लेकर आणखीन चवताळला.
“अर्‍ये ××××× वादले कीती? किती वादले बघ! पातला पात मिन्ट! ××× बाहेर जाऊन खातोस की ××तोस?- अर्‍ये ×××ऽ साडेतीनची गाडी पकडतो आम्ही! रोज!”
“हांऽऽ आणि काय करता? पत्ते खेळत बसता! गाडीत! उतरल्यावर स्टेशनात! घरी!”
“एऽऽतेरीऽऽनिश्याऽऽ- एऽऽ वो देक् लीडर आ गया!”
“किदर है रे किदरे? साला ×× बनाता है मेरेको?
“वो देक्... वो देक् ××... बंड्या के सामने... मस्टरपर सही कर रहा है!”
“एऽऽगोविंदऽऽ गोऽऽविंदऽ हा बघ हा निश्याऽऽ-”आंजर्लेकर ओरडून युनियन लीडर गोविंद भैसाणेला बोलवायला लागला.
लीडर गोविंद शाखेत प्रवेश करतोय असं दिसल्यावरच खालचा बंड्या टुणकन् आपल्या जागेवरून उठून बाजूला झाला होता.आधीच.काऊंटर होते त्या बाजूला उगाचच काहीतरी काम काढून.मस्टर खालच्या बंड्याच्या टेबलावर.गोविंद भैसाणे कर्मचार्‍यांचा नेता.जहाल राजकीय पक्षाचा पाठिंबा असलेली युनियन.गोविंद शहरातल्या कामगार एरियात वाढलेला.पार्श्वभूमी संशयास्पद असं म्हणायला जागा.गोविंदची कचेरीत येण्याची वेळ ही अशी.खालचा बंड्या शानपत.गोविंद सही करताना तो कशाला समोर बसतोय.
बरं काऊंटरजवळ गेल्यामुळे बंड्याचा फायदाच.नेमकी परिसरात रहाणारी दणदणीत प्रौढ कुमारिका आलेली.काऊंटरमागे उभी.बंड्या ’×××× काम’ असं नेहेमीप्रमाणे पुटपुटत काऊंटरमागे दाखल.तिच्याजवळ.जास्तीत जास्त.तिला शब्दात पकडून.हसत.ज्याला महिला अत्त्याचार विरोधी संघटना ते व्हर्बल अब्यूज का काय म्हणून निश्चित हरकत घेऊ शकतील तिथपर्यंत पोचलेला.प्रौढ कुमारिकेचं काही कळण्याच्या पलिकडे असं वागणं.ती खरंच निरागस की तसा आव आणणारी की... कळायला मार्ग नाही...
“गोऽऽविंदऽ हा बघऽऽएऽऽनिश्याऽऽएऽऽ हा नाय् बोल्तो ब् कॅश घ्यायलाऽऽ” आंजर्लेकरचं चालूच.
गोविंद आत्ता कुठे शाखेत प्रवेशलेला.नमस्कार चमत्कार, हास्य झेलत.घामाघूम.डोळे लाल.कपाळ खाली ओढून आणि बुबुळं वर करून रोखून बघण्याची सवय.आल्या आल्या तो एसी युनिटसमोर उभा राहिलेला.त्यानही भागत नाही म्हणून मग फॅनखाली.
इकडे निशीची सव्वाहात फाटलेली.अजून गोविंद भैसाणेला काही ऐकू गेलेलंच नाही!
“ए नको एऽ आंजर्लेकरऽएऽऽप्लीजऽऽ नको सांगू रे त्यालाऽऽ एऽऽ प्लीजऽऽ ओरडू नको रेऽऽ दे! दे कॅश!ऽ एऽप्लीजऽ”
आता करकेर्‍यालाही चेव चढलेला.
“एऽऽ गोईंदऽऽ ये देक् रेऽऽ ये निश्या फॉर्म भी नही भरताय अपना युनियनकाऽऽ कॅशबी नई लेताऽयऽ येऽगोईंदऽऽ...”
“ये चूप बैठ रे करकेर्‍याऽऽ तेरा बी दे कॅश येऽऽ द्येव रेऽ दोनोंका द्येव बाबाऽऽ मेरा कूच होताय होने दोऽऽ लपडा नही मंगताय बाबाऽऽ आज मार्गशीर्षका गुरवार है उपरसेऽ द्येव द्येव बाबाऽऽ एऽऽ”
निशी काकुळतीला आलेला बघून मगच त्याचे शेजारी, सहकारी खजांची ओरडायचे थांबले.खुदूखुदू हसायला लागले.वेड्यासारखे उड्या मारायला लागले.टाळ्या द्यायला, घ्यायला लागले.
खिदळत, निश्याला वर आणखी टपल्या, टिचक्या मारत, नको तिथे चिमटे काढत दोघांनी आपापली उरलेली कॅश निशीच्या डोसक्यावर आदळली.सटकले...

Tuesday, March 22, 2011

ती, तिचा शोना आणि मी!

प्रवाहाविरूद्ध (!) पोहायचं ठरवलं आणि मग लोक ऑफिसेसना पोचायला घाईगडबडीत असतात तेव्हा आम्ही घरी जायला लागलो.अधिकृतपणे एवढंच सांगू शकतो यार! महानगरातल्या अतिमहत्वाच्या लोकलस्थानकाकडे जायचं.लोकल पकडायची.ती बडा फास्टच असते.झोपून जायचं.त्यादिवशी तिनं आणि अर्थात तिच्या निरूपद्रवी शोनानं माझी झोप उडवली.लोकल सुरू झाली माझे नेत्रं अर्धोन्मिलीत वगैरे झाले (राजा रविवर्माच्या चित्रांचे होतात तसे) आणि समोरच्या विंडोत एक युगुल येऊन बसलं.बसल्याबसल्या तिनं लगेच त्याचा हात हातात घेतला.त्यांची कुजबूज चालू झाली आहे हे बघून मी डोळे मिटले.डोळे, कान टवकारणं अशावेळी प्रशस्त वाटत नाही.

“असं नाई करायचं शोनाऽऽ”स्वर जरा वरच्या पट्टीतला होता आणि माझी समाधी भंगली.च्याआयला या शोनाच्याऽ आता या वेळी काय केलं यानेऽ– माझा आत्मा अस्वस्थ झाला.माझे डोळे अजून मिटलेलेच होते.पण त्या वाक्यानं डोळेही डळमळीत व्हायला लागले.तसलं काही कोणताही शोना अशा या वेळी करायचा नाही याची खात्री वाटत होती.अजूनही हे महानगर देशाच्या राजधानीपेक्षा सुरक्षित आहे.मी मनाला बजावत होतो.

“असं करता बाबा तुमीऽऽ असं नाई करायचंऽ पपा असं कदीच करत नाईऽऽत”
अरे बापरे! माझं मन आता माझ्या डोळ्यांच्या झापडांशी झटू लागलं पण सद्सद्विवेक (की सतसद्विवेक?) म्हणाला, एकदम खाडकन् उघडू नकोस झापडं! बरं दिसत नाही ते चारचौघात! नशीब! माझ्या मनानं ते ऐकलं.नायतर नेमकं ते बंडाच्या सीमारेषेवर असतं अशावेळी.आधी अर्धजागृत आणि मग जागृत मनानं डोळे उघडले.अंत:चक्षू (!) मगासपासून जागे होतेच.
समोर ती.गोरी, नकटी, मेकप केलेली.जीन्स, टॉप वर स्टोल घेतलेला.आपल्या असंख्य नाजूक, बारीऽऽक अंगठ्या घातलेल्या हाताची करंगळी त्याच्यासमोर धरत होती.
“आमी नाई बाबाऽऽ असं करता तुमीऽऽ”
तो माझ्यासारखा असावा.त्यानं छातीशी घडी घातलेल्या हातांतून उजवा हात खाड्कन सोडवला आणि गरबा खेळणारे रांगडे टिपरी जशी दाण्कन् आपटतात तशी स्वत:ची करंगळी तिच्या करंगळीवर आपटली.तिनं त्याच्याकडे असं काय बघितलंय म्हणता! तिचे गाल मेकपने आधीच आरक्त वगैरे होतेच.डोळे असे काय रोखले होते तिनं! त्यानं तिच्याकडे बघितलंच नाही.पुन्हा तलवार म्यान करावी तसा त्याने उजवा हात दोन्ही हातांच्या छातीवर असलेल्या घडीत पूर्ववत घुसवला.मला तिची दया आली.ती विंडोतून बाहेर बघत आपल्या दु:खाला वाट वगैरे करून देत असावी.मी माझ्या झोपेला वाट करून देण्यासाठी डोळे मिटले.समाधी लागली.कुजबूज पूर्ववत सुरू झालीए हे माझ्या अंत:चक्षूंनी मी न विचारताही मला सांगितलं.

“माज्या बायकोला कोण असं काय बोल्ललं ना तर मी ऐकून नाय घ्येणार!”
“असं नाही शोना! मी असं कसं वागीन!”
“नाय आपल्याला आवडत.आपण आदीच काय ते व्येवस्थित वागतो!”
“मला माहिती नाहीए का शोना! माझी खात्री नाहीए तुम्हाला!”
आता या ’तुम्हाला’ नं माझी झोप उडवली.आजवर मी शोना म्हणजे अरेतुरेतला समजत होतो.मनानं विवेकाबिवेकाचं न जुमानता खाड्कन् डोळे उघडले.मग विवेकानंही उघडले.विवेक मला थेट तिच्याकडे, शोनाकडे (शोनांकडे-आदरार्थी) बघू देत नव्हता.जराश्यानं मी विवेकाला चुकवलं.समोर नजर वळवली.समोरच्या आघाडीवर शांतता होती.शोनाच्या हाताची छातीवरची घडी सुटली होती.त्याचा एक हात तिच्या हातात होता.ती खिडकीबाहेर बघत होती.तिचा चेहेराच समंजस असल्यासारखा.तो गंभीर.तोही खिडकीबाहेर बघू लागला.

“पपाना समजतंय.आपण भेटतो ते!”
तिनं अभिप्रायार्थ त्याच्याकडे बघितलं तो घुम्यासारखा.तसाच.
“पाणी भरताना विचारत होते.कुट्ये जायची घाई चाललीए?”
“तू काय सांगितलं?”तो रूक्ष.तिच्याकडेही न बघता.
“सांगितलं मैत्रिणीकडे जाते.शोना! तुम्ही रागवू नका! आता ठरल्यासारखंच आहे आपलं पण असं पपाना दुकवायला मला आवडत नाही.आईला सगळं माहितीए” तिनं त्याच्याकडे बघितलं.त्याची नजर जराशी हलल्यासारखी.तिच्याकडे न बघता आता त्याच्या हात तिच्या खांद्यावर गेला.तिचा चेहेरा आनंदला.कुजबूज सुरू होणार! मला विवेकानं इशारा केला.मी गपकन् डोळे मिटले.शहाण्या मुलासारखे.

“शोना! हे तुमी बरं नाई केलंत हां!”
माझा जीव कळवळला.आता या शोनांनी काय केलं? एकदा कोपच्यात घ्यायला पायजे याना!
“मी येवडी धावत पळत आले स्टेशनला.तुमी थांबलाच नाईत?”
“मी पात मिन्टं वाट बगतो कुणाची पण! त्याच्यापुडे नाय् बगत! सरळ कल्टी खातो!”
“आसं नाई करायचं शोना! वाट बगायची! मी क्लासला गेले होते ना! धावत पळत निघाले.स्टेशनला हीऽऽ गर्दी.वाट मिळत नव्हती!”
“किती वातता पोचली?”
“शोना साडेपाच-सहा वाजले असतील!”
“टाईम कितीचा ठरला होता?”
“पाच!”
“म?”

पुन्हा शांतता झाली.कदाचित माझ्या झोपेने मला वेढून टाकलं असेल.गचागच हादरे बसले आणि मी ओळखलं नेहेमीसारखे रूळ बदलत गाडी माझ्या स्थानकावर पोहोचते आहे.मी उठलो.उठताना अनवधानानं माझे डोळे ती आणि तिच्या शोनांकडे वळवले.त्यांचं स्थानक अजून यायचं होतं.काहीतरी कुजबूज चालू होतीच.मी उतरणार्‍या गर्दीच्या पाठीवर हात ठेवला.गर्दीनं मला उतरवलं.बाहेर सगळं तसंच होतं.चढणारी गर्दी.इतस्तत: धावणारी गर्दी.ठॉक् ठॉक् करणारे बुटपॉलिशवाले.लाल, पिवळी, निळी सरबतं विकणारे कॅन्टिनवाले...वर्षानुवर्षं सगळं तसंच रहात आलेलं आहे...

Friday, March 18, 2011

हास्यगाऽऽरवा २०११: अल्पसंख्याकांचा देश!

हास्यगाssरवा २०११
सगळ्या मित्रमैत्रिणींना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! जालरंग प्रकाशनाचा "हास्यगाऽऽरवा २०११" होळी विशेषांक प्रकाशित झालाय.लेख, किस्से, वात्रटीका असं बरंच विनोदी साहित्य असलेला! माझ्या लेखाचा दुवा खाली दिलाय आणि त्याखाली संपूर्ण लेख दिलाय:)

हास्यगाऽऽरवा २०११: अल्पसंख्याकांचा देश!

मनू म्हणजे सतत बदलणारा प्राणी.प्राणी म्हटलं की त्याला राग येतो.मग मी त्याला म्हणतो माणूसप्राणी.तो खूश होतो आणि पुन्हा बदलतो.
मी सामान्य असल्यामुळे काहीही बदललं की मी कासावीस होत असतो.अशावेळी मनू माझी परिक्षाच घेत असतो.जीवघेणी परिक्षा! या वेळची परिक्षा जास्तच जीवघेणी होती.
आपला देश हा अल्पसंख्याकांचा देश आहे काय? मी नेहेमीच गोंधळलेला असतो म्हणून तुम्हाला विचारतोय! देशातले बहुसंख्य कायम झोपलेलेच दिसतात.कुठल्याही अर्थानं घ्या! जात, पात, धर्म इत्यादीतल्या विविधतेने नटलेला आपला देश.देशातले अल्पसंख्याक नेहेमीच आग्रही असतात.नसले तर आपले नेते त्याना तसं बनवतात.त्यांना लाखो सवलती, कायदे देतात आणि निवडून देतात.आपल्या मनूसारखा चाणाक्ष माणूसप्राणी या सगळ्याचा फायदा न घेता तरच नवल.
त्याचं या वेळचं बदलणं माझ्या अंगावर मात्र काटा आणणारं होतं!
मनूवर माझं बारीक लक्ष असतं.काही दिवस त्यानं सभ्य माणसासारखं शर्ट-पॅण्ट घालणं सोडून दिलं- सोडून दिलं म्हणजे अगदी ’तसं’ नाही.पण त्याऐवजी तो रंगीबेरंगी कुरते, सलवारी, जाकिटं घालायला लागला.गळ्यात घट्टं बसणारी नाडी.त्यात भयंकर रंगाचा बदामाच्या आकाराचा खडा.जाकीटावर सोनेरी वेलबुट्टी.इथपर्यंत ठीक होतं.त्यानं केसही वाढवले.हा मुद्दाही आक्षेप घेण्यासारखा नव्हता.पण तो जेव्हा लचकत मुरडत चालायला लागला तेव्हा मी जरा सावध झालो.मग एकदा मी त्याला ब्युटीपार्लर अर्थात एका स्त्री सौंदर्यप्रसाधनगृहातून बाहेर पडताना बघितलं.प्रत्येक क्षणी माझ्या काळजाचा ठोका चुकत होता.
मला त्याला भेटायचं धाडस होईना आणि तो मला सारखा भेटायला लागला.मुद्दाम भर रस्त्यात थांबवायला लागला.त्याचं बोलणं लाडीगोडीचं.काही सांगताना तो मुद्दाम माझ्या दंडावर, गालावर चापटी मारायचा.रोखून बघायचा आणि मग मी कॉन्शस (भयचकित) झाल्यावर हसायचा.हसणं तसंच होतं.जिवणी फा-फाकवून लाचार.पण त्याचे ते विभ्रम (म्हणजे चाळे) बघून-नव्हे सहन करून- मी सुन्नं होत होतो.त्याची काळजी वाटून त्याला चार शब्द सुनवावेत म्हणून मी तयारी करायचो पण त्याच्या कोरलेल्या भुवया, चेहेर्‍यावरचा हलका मेकअप, ओठावरची लाली बघून माझ्या तोंडून शब्दच फुटायचे नाहीत.
बरं, आता फक्त आमच्या दोघांमधेच त्याचं हे वागणं राहिलं नव्हतं.मनू मला भर रस्त्यात गाठायचा आणि लोक आमच्याकडे टकामका पहात रहायचे.मला अंगावर पाल चढल्यासारखं व्हायचं.एकदा तर त्याने माझ्या शर्टाच्या बटणांनाच हात घातला.मला धरणीनं पोटात घ्यावं असं वाटायला लागलं आणि गर्दीतून एक हाक ऐकू आली, “एऽऽ छगऽऽन” त्यावर मनू त्या माणसाकडे बघून माशी हाकलल्यासारखं करून लाडीक आवाजात चित्कारला, “यूऽऽ नॉटीऽऽ” … मी, तुम्हाला सांगतो, जीव घेऊन धूम ठोकली.त्यानंतर मनू केव्हाही समोरून येताना दिसला की मी सरळ पतली गली पकडून तिथून सटकत होतो.
बैचेन मात्र होतो.मनूचं हे काय झालं होतं? देशात चाललेल्या सगळ्याच गोष्टी माझ्यासारख्याच्या हाताबाहेरच असतात.अशा गोष्टी नुसत्या बघूनच मी हबकतो.दर वेळी मनूला हक्कानं काही तरी उमज पाडायचा केविलवाणा प्रयत्न तरी करायचो.या वेळी मी हतबल झालो होतो.डोळ्याचं भुस्काट पडायचं बाकी होतं.
बरं! मनूचा पाठलाग करून त्याच्यावर नजर ठेवायची म्हणजे नस्ती आफत! मनूला लागलेल्या रोगासारखे हे रोग साथीचे असावेत.हळूहळू मनू घोळक्यात दिसू लागला.त्याच्यासारखे बायलट केशभूषा, वेशभूषा केलेले पुरूष आणि पुरूषी दिसणार्‍या मुली.खरं म्हणजे बाई कोण, पुरूष कोण हे ओळखणं कठीणच होतं.शपथेवर सांगण्यासारखं तर नव्हतंच.एक मुलगा, एक मुलगी गळ्यात गळे घालून चाललेत म्हणून कौतुकानं बघावं तर तोंडावर आपटायची पाळी.हे सगळे मिळून नक्की काय करतात म्हणून दिव्याच्या खांबाआडून मी जेम्स बॉंडगिरी करायला गेलो.स्वत:वर जरा जास्तच खूश होतो आणि मला बेमुदत पडायची बाकी राहिली! मला घेराव पडला.असंख्य ’ते’ किंवा ’त्या’ आणि मी एकटा.“बघता काय? सामील व्हा!” असा सगळ्यांचा आग्रह.कुणीतरी दोन-चार थपडा दिलेल्या परवडल्या पण हे-नाही- ह्या सगळ्या? ईऽऽऽऽ कशीबशी हातापाया पडून मी माझी सुटका करून घेतली आणि कानाला खडा लावला (कानाला! कानाच्या पाळीला नव्हे! तो ते-त्या लावत होते!).या असल्या लफड्या-लोच्यामधे अडकलो तर आहे ते सुद्धा गमवायची पाळी! पंधरा दिवस घराबाहेर पडलोच नाही.स्वप्नातसुद्धा दचकून जागा होत होतो!
पुढे एक दिवस कुठून तरी येताना एका उद्यानात सभा चाललेली दिसली.बघतो तर सगळे तेच! आय एम सॉरी! त्याच! ते की त्या? च्यायला काय म्हणायचं यांना? मनू तावातावाने सभेपुढे भाषण करत होता.स्टेजवर रंगीबेरंगी कापडी फलक, ’सम समा संयोग सभा’! त्या खाली चार ’एस’ एकमेकांत गुंतलेले! उद्यानभर सगळे तेच! नेहेमीची बहुसंख्य लहान मुलं, म्हातारे-कोतारे, तरूण जोडपी गेटच्या बाहेर ताटकळत! उद्यानातल्या प्रत्येक झाडावर एकेक बोर्ड! आम्हाला न्याय द्या! आमच्या मागण्या मान्य करा! कायदा बदला! आम्हाला स्वातंत्र्य द्या! कोण कुणाबरोबर रहाणार हे तुम्ही कोण ठरवणार? आम्हाला सुखानं जगू द्या!... मनू संतापानं लालेलाल झालेला.मग जोरजोरात घोषणा घुमायला लागल्या.उद्यानाबाहेर पोलिसांचं कडं.हेल्मेटधारी.जाळ्या घेतलेले.दंडुका, रायफली घेतलेले.ते गेटबाहेर ताटकळणार्‍या म्हातार्‍या कोतार्‍यांना, लहान मुलांना, तरूण जोडप्यांना अजिबात आत सोडत नव्हते.बहुसंख्याना आज उद्यानात प्रवेश नव्हता.तसा प्रयत्न करणार्‍याला फटकावले जात होते.मी तिथून निघालो.साठ-सत्तर वर्षांपूर्वी मिठाचा सत्त्याग्रह, कायदेभंगाची चळवळ, विदेशीची होळी. चले जाव, भारत छोडो! असं बरंच काही होतं.आज आपण स्वतंत्र आहोत पण ते चार ’एस’ स्वतंत्र नाहीत.आज ते अल्पसंख्याक आहेत.त्यांनी आवाज उठवलाच पाहिजे.
मग एके दिवशी बातम्या लावल्या.देशाची अजून किती वाट लागलीय हे अधूनमधून बघणं गरजेचं असतं.टीव्हीवर मनू! मी दाणकन् उडालो.पत्रकार परिषदेतला मनू तावातावाने मुलाखत देत होता.अडला की बाजूचे चार एस् त्याला प्रॉम्ट करत होते, ’लवकरच लैंगिक अल्पसंख्याकांचं देशव्यापी अभियान चालू होणार!’ असा संदेश सगळ्या वाहिन्यांवरून झूम आऊट, झूम इन होत राहिला…
मग वाहिन्यांवरचं हे ’अल्पसंख्याक अभियान’ बघायची मला चटकच लागली.म्हणजे, वाहिन्यांवरचं इतर काही सतत बघण्याची नेहेमीची चटक बाजूला सारून मी या चटकेला सर्वोच्च प्राथमिकता दिली असं म्हणूया हवं तर!
आणि रसिकहो! ते एकमेकांत गुंतलेले चार एस् जिंकले.त्यांचा विजय झाला.पर्यायानं आपल्या लोकशाहीला आणखी एका कोंदणाचा लाभ झाला! आणि याचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला! पण…
आपला मनू स्वत:च्या अल्पसंख्याकपणाचा फायदा घेऊन केंद्रातल्या नेहेमीच्या डळमळत्या सरकारात शिरणार आणि समाजकल्याण खात्याचं मंत्रीपद पटकावणार याबद्दलही माझी खात्री झाली!

Wednesday, March 16, 2011

प्रेमाचा आधार

माणूस आयुष्यभर फक्त प्रेमाच्या अवतीभोवती असतो का? अनेक गोष्टी त्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात.लहानपणी खेळ असतो. हळूहळू विचारशक्ती तयार होऊ लागते. जगाचं ज्ञान होत असतं.ध्येयं निर्माण होतात.प्रत्येक पातळीवर संघर्ष करावा लागतो.मानसिक, शारीरिक, आत्मिक विकास अपरिहार्यपणे होत असतो.या सगळ्यानी तयार होणार्‍या माणूसपणाच्या पायाशी प्रेमाचा आधार असावा लागतो, त्याशिवाय सगळं फोल असतं.
प्रेम हुरहूर लावतं, प्रेमाचं वादळ अनेक अडथळे पार करायला लावून माणसाला समंजस बनवतं.
या प्रवासातली मजा अशी असते की ’मी’ पणातून प्रेम उत्पन्न होतं, दोघांचं प्रेम हा सहअनुभव होतो.त्यातून तिसरा जन्माला आल्यानंतर प्रेमच पालकत्वाचं रूप घेतं.ज्याच्या किंवा जिच्या बरोबर सहजीवन जगायचं, तो किंवा ती आपल्यासाठी मित्र असतात, तत्वज्ञ असतात, मार्गदर्शक असतात.
स्त्री-पुरूष या विरूद्ध लिंगी आकर्षणातून जन्म घेणारं प्रेम आपली व्याप्ती वाढवत असतं.अनेक व्यापात गुंतलेला माणूस निवृत्तीकडे झुकतो.ही सगळ्या पातळ्यांवरची निवृत्ती असते.आयुष्यभर वाढवून ठेवलेल्या व्यापामुळे नवर्‍याला बायकोकडे खर्‍या अर्थाने बघण्याची फुरसतच झालेली नसते.खरा अर्थ त्याला कदाचित आता कळायला लागलेला असतो.त्याचवेळी कदाचित तिची रजोनिवृत्ती होत असते.तिच्या आयुष्यातला अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा काळ आलेला असतो.दोघांना वेगवेगळ्या कारणाने एकिकडे एकटेपणाची चाहूल लागत असते आणि त्याचवेळी सहजीवनाचा खरा अर्थ कळायला लागतो.आता सहजीवनाची गरज अपरिहार्य होऊ लागते.मुलांचं पालकांवर अवलंबणं संपून त्यांचं स्वतंत्र आयुष्य आकार घ्यायला लागतं.घरातली स्त्री अजून घरातल्या व्यवहारांत, नातवंडांत गर्क असते.निवृत्तीला आलेल्या, निवृत्त झालेल्या पुरूषासमोर काळ आ वासून उभा राहू लागतो.एकटेपणा ग्रासतो.तो आधार चाचपायला लागतो.अनेक दिव्यांमधून गेलेली त्याची स्त्री त्याला जपत असते.हळूहळू समोर दिसायला लागणार्‍या मृत्यूच्या छायेने हे दोन्ही जीव एकमेकाना अगदी घट्टं धरून ठेवायला लागतात.आयुष्यात कधी नव्हे तो एकमेकांचा आधार यावेळी जाणवायला लागतो.भूतकाळातले अनेक प्रसंग, भविष्यातली अनिश्चितता यांनी वर्तमानकाळ कातर होत असतो.आनंदी जोडपी तरीही एकमेकांच्या साथीने, प्रसंगी रूसत, भांडत, प्रेमाने जगत असतात.इतरांना ही करमणूक असते.तरीही या शेवटच्या प्रवासात एकमेकांच्या आधाराने चाललेलं सहजीवन हे भाग्याचंच म्हटलं पाहिजे.या वयातलेही अनेक आघात पचवण्याचं सामर्थ्य या सहजीवनात एकमेकांच्या प्रेमाच्या आधारानेच शक्य होतं.
दोघांमधला कुणीही एक निघून जाणं असह्य करणारं असतं.प्रेमाची महती या आधी कळलेली नसेल तर ती आता कळूनही उपयोग नसतो.
अजूनही लग्न न करता एकटे राहिलेले दाखवत नसले, मानत नसले तरी पश्चातापाने पोळत असतात.माणसाला गोष्टी मनात दाबून ठेवायची खोड हसते.वरवर हसायची सवय तो करून घेतो.मनात दाबून ठेवलेल्या असंख्य गोष्टी जेव्हा गंभीर स्वरूप घेऊन बाहेर पडू लागतात तेव्हा या गोष्टींची स्पष्ट जाणीव त्याला, इतरांना होते.पन्नाशीनंतरच्या या कालखंडात आधार ही अपरिहार्य गरज असते.तो प्रेमाचा असेल तर सगळंच सुसह्य होतं.तहान लागल्यावर विहीर खणायला घ्यायच्या मानवी स्वभावाला अनुसरून या वयात तो अनेक गोष्टींत, नात्यांत, अनेक माणसांत, पाळीव जनावरांत प्रेम शोधू लागतो.प्रेमाची खोली त्याला आता दिसू लागते, कळू लागते.नारळाच्या आतल्या गोड पाण्या-खोबर्‍याप्रमाणे किंवा फणसाच्या आतल्या गर्‍याप्रमाणे माणसातलं प्रेम आता उफाळून येतं.
आता तो घेण्याचा विचार सोडून देतो.प्रेम देत, वाटत सुटतो.
सगळेच म्हातारे किंवा म्हातार्‍या अशा असतातच असं नाही.काहींच्या स्वभावानं इतकं उग्र रूप धारण केलेलं असतं की शेवटपर्यंत त्याना प्रेमाचा पाझर फुटतच नाही.एकांतात किंवा विशिष्ट व्यक्तीकडे तो कधी ना कधी मात्र फुटत असतो.
नातवंडांवरचं या आजी-आजोबांचं प्रेम दुधावरच्या साईसारखं असतं असं म्हणतात.नातवंडं, शेजारी, संपर्कात येणारी माणसं यांवर माया करणं लग्नाशिवाय राहिलेले, जोडीदार सोडून गेलेले यांनाही चुकत नाही.प्रेम हे सगळ्यांवर करण्याची गोष्ट आहे, ते सर्वव्यापी आहे याची जाण सर्वसाधारणपणे या वयात व्हायला लागते.सगळ्यांनाच ती येते असं नाही.माणसाच्या माणूसपणाला अनेक कंगोरे आहेत.त्याचं महत्व त्यातच तर आहे.
या वयातला सर्वसाधारण माणूस परमेश्वरावर प्रेम करायला लागतो.या आधी तो ते करत आलेला असतोच पण ते हे हवं, ते हवं यासाठी असतं.आता त्याला निरपेक्ष प्रेमाची महती कळायला लागते.जिला दुसर्‍या शब्दात तो भक्ती असं म्हणतो.
अध्यात्म असा बोजड शब्द वापरून तो त्याच्याही मागे लागतो.पण त्याच्याही मुळाशी काय असतं? निरपेक्ष प्रेम.
परमेश्वर, भक्ती असं म्हटल्यावर अजूनही ज्यांच्या अंगावर काटा येतो ते ’अज्ञात व्यवस्थेचं कोडं’ उलगडण्याच्या प्रयत्नाला आणखी जोमाने लागतात.मानवी जीवनाला परिपूर्णता येऊ नये यासाठी प्रयत्न करणारी अज्ञात व्यवस्था म्हणून अखेर परमेश्वरालाच नकारात्मक का होईला मान्यता देतात.त्या अज्ञात व्यवस्थेचं कोडं आजतागायत कोणालाही उकललेलं नाही, उकलण्याची शक्यता दुरापास्त आहे.सामान्य माणसाच्या तर आवाक्याबाहेरची ती गोष्ट आहे.आपल्याला सर्वार्थानं बळ देणारी एक शक्ती आहे असं सामान्य माणूस मानतो.त्या शक्तीवर निरपेक्ष प्रेम म्हणजे भक्ती करण्यात उरलेलं आयुष्य घालवणं त्याच्या हातात उरतं.
सामान्य माणसाला आयुष्यातल्या अनेक अवस्थांमधला प्रेमाचा आधार घेत जगणं अपरिहार्य असतं.सरतेशेवटी आपल्याजवळ असलेल्या प्रेमाच्या न संपणार्‍या साठ्याचं वितरण करत रहाणं त्याला सहज शक्य असतं.त्यानं देऊ केलेला हा प्रेमाचा आधारच त्याच्या पश्चात अमर रहाणार असतो.अनेकांचं जीवन फुलवत रहाणार असतो.

Sunday, March 6, 2011

माझं नवीन पुस्तक "सुदृढ नातेसंबंधासाठी..."

Front_Sudrudh Back_Sudrudhरसिक वाचक मित्रमैत्रिणींनो! माझं नवं छोटसं पुस्तक प्रसिद्धं झालंय!
“सुदृढ नातेसंबंधासाठी...”
“मैत्रेय प्रकाशन, मुंबई”या प्रकाशन संस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे आणखी एक पुस्तक.
“आपल्या आयुष्यात येणारे नातेसंबंध अनेक प्रकारचे आहेत.पाल्यानं पालकांशी कसं वागायचं की ज्यामुळे त्यांचे नातेसंबंध सुदृढ होतील? आपल्या शेजार्‍यांशी आपण कसं वागायचं? आपल्या मैत्रीतली नाती आपण कशी दृढ करायची? नातेवाईकांशी असलेले नातेसंबंध समृद्ध कसे करायचे? आपला प्रिय मित्र (बॉय फ्रेंड) किंवा आपली प्रिय मैत्रिण (गर्ल फ्रेंड) यांच्याशी सशक्त नातेसंबंध कसे निर्माण करायचे? नवर्‍यानं बायकोशी आणि बायकोनं नवर्‍याशी कसं वागायचं? आपल्या मुलांशी म्हणजेच पाल्यांशी कसं वागायचं? पाल्य लहान मूल असताना नातं कसं जोपासायचं आणि तेच पाल्य मोठं झाल्यावर त्याच्याशी कसं रिलेट व्हायचं?” हे सांगण्याचा प्रयत्न यात केला गेलाय.आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात असं एखादं हॅंडबुक असावं, जे केव्हाही सहज संदर्भासाठी उपलब्ध असावं, आयुष्य समृद्धं होण्यासाठी आवश्यक असावं हे पटल्यामुळेच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे ८४ पानं आणि किंमत आहे रू.७०/- फक्तं.

या आधीची माझी प्रकाशित पुस्तकं आहेत: आवर्त हे नाटक, पुलाखालून बरंच ही लघुकादंबरी आणि स्मरणशक्ती वाढीसाठी हे स्वयंविकास पुस्तक.

आणि ई-पुस्तकं आहेत: मी झाड संध्याकाळ हा कवितासंग्रह,संघटन आणि पुलाखालून बरंच ही नाटकं.नंदन ही चित्रपट संहिता...
आपल्या प्रतिसादामुळेच हे सगळं शक्य झालंय.
आपल्या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार!

Saturday, March 5, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(८)

निशीच्या केबिनमधला कॅशने भरलेला ड्रॉवर रिकामा झाला रे झाला की ऑफीसर दार ठोठावून तो पुन्हा भरत होता किंवा शेजारचा रसीदी रोखपाल (रिसिविंग कॅशियर) त्याच्याकडे जमा झालेल्या साठ्यातून गड्ड्यावर गड्ड्या फेकत होता.
समोरचे कस्टमर्स... खेकटे, म्हातारे, पेन्शनर्स, प्रोफेसनल्स, सुशिक्षित अडाणी, बिझिनेसमन, त्यांचे मेसेंजर्स... भांडखोर, आचरट, संभावित... बोलत रहाणारे, वेळ खाणारे... इथे मशिनचा लॉग ऑऊट... मग लॉग इनची झकमारी... पुन्हापुन्हा...
... या रोखीच्या आदानप्रदानाने प्रचंड गरगरायला लागल्यावर निशीने डोळ्यावरचा सोडावॉटर काढून ठेवला.स्पंजपॉटची अडचण होत होती.सवय नव्हतीच.बोटावरची थुंकी पुरेशी होती... ती या बोटावरची त्या बोटावर करता येत नाही याचं वैषम्य साजरं करायची ही वेळ नव्हती...
... किती जास्त जातील... कुणाला कमी जातील... कमी दिले तरी बांबू... जास्त दिले तरी बांबू... दिले म्हणजे चुकून गेले तर... संध्याकाळी टॅली होईल न कॅश?... दे चार चारदा मोजून... साले समोरून आत डोकावून बघतात वेळ लागला की... हलकटासारखे काहीतरी बोलतात... चढ चढ चढतात... भांडण केलं की झालं लपडं... आधी झालेलं नसलं तर भांडण झाल्यावर आलेल्या रागातून, गेलेल्या एकाग्रतेमुळे होईल लपडं... शॉर्टकॅशचं... सुपे, सुपे, सुपे, सुपे... राम, राम, हरे, हरे... शिव, शिव... ओऊंम नम:... भिऊ नकोस, ते पाठीशी आहेत... तूच तुझ्या आयुष्याचा चित्रकार...
... बिझीनेस अवर्स संपल्यानंतरही बराच वेळाने समोरची लाईन संपली आज.आज निशी जेवायलाही उठू शकला नाही.जेवायला काय, एक नंबरलासुद्धा!...
निशी जणू चेकच खाऊन संपवतोय हे बघून बाजूच्या अर्धापेमेंट, अर्धारिसिटवाल्या आंजर्लेकरनं पेमेंट केलंच नाही फक्त कॅश स्विकारण्याचं धोरण ठेवलं.तिसरा कॅशियर करकेरा नुसती कॅश स्विकारण्यासाठी बॅंकेने नेमला होताच.आंजर्लेकर-करकेरा जोडी प्रत्येकी एक तास आल्टून पाल्टून जेवायला जाऊन आली.आपापलं काम आवरत निशीकडे बघत हसत बसून राहिली...
समोर खिडकीवर कुणी नाही हे बघून निशीनं खाली घातलेली मान वर केली तेव्हा त्याला चक्कर आल्यासारखं झालं.मग त्यानं सोडावॉटर पुन्हा डोळ्यावर चढवला आणि आपल्या ओटीपोटात जोरात कळ आल्याचं त्याच्या लक्षात आलं.मग त्या उंच मनोर्‍यासारख्या खुर्चीतून उतरण्याचा प्रयत्न त्याने चालू केला आणि आपल्या मांड्या जाम झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.आळस झटकण्यासाठी त्याने दोन्ही हात वर केले.दोन्ही हाताचे कोपरे, एका हाताने शेजार्‍याकडून लागतील तशा गड्ड्या घेऊन घेऊन आणि दुसर्‍या हाताने कॉम्प्युटरवर मारलेले चेक्स व्हेरिफिकेशनसाठी दुसर्‍या बाजूला बसलेल्या ऑफिसरला देऊन देऊन आणि परत घेऊन घेऊन पूर्णपणे निकामी झाले असल्याचं त्याच्या लक्षात आलं.पुन्हा आळसासाठी वर ताणलेले हात झटकन् खाली आणावे लागले कारण ओटीपोटातली न थांबणारी कळ.त्यासाठी ओटीपोट दाबणे.ओटीपोट जास्तच दाबले तर होसपाईप इथेच फुटण्याची भीती.कॅश केबिनमधेच.म्हणजे बंड्या आणि पर्यायाने सगळे ××××× पिच्चरमधे आलेच.
निशी धडपडला.पण ड्रॉवर, केबिन पूर्ण लॉक झाल्याची खात्री करून ओटीपोटाला पकडूनच त्याने टॉयलेटकडे धूम ठोकली.पूर्णपणे मोकळा होताना त्याचा लागलेला श्वास पूर्ववत झाला.
बेसिनच्या नळाखाली जेमेतेम हात धरल्यासारखं करून मग तो तडक शाखेच्या बाहेर पळत सुटला.कुणाच्याही ससेमिर्‍याला दाद न देता.
शाखेच्या मागच्या गल्लीत आला.तपकीरी-काळ्या लांबट गुलाबजामचं का कालाजामचं भलं मोठं हिंडालियमचं ताट बघून त्याची लाळ अनावर झाली.वेताच्या छड्या एकत्रं बांधून तयार केलेल्या उभ्या डमरूच्या आकाराच्या स्टॅंडवर ताट ठेऊन भय्या उभा होता.ते ताट निशीच्या डोळ्यासमोरून हलेना.काय करावं या नादात बराच वेळ रेंगाळल्यानंतर तो दचकला.आज मार्गशीर्षातला गुरूवार.बापरे! उपास सोडायचा.आईबाबांना.आपण खाल्ली इडली.नेहेमीप्रमाणे.वाजले किती?... साडेचार! बापरे! इथेच?... खिशात हात घालून चुळबुळत, खाजवत, घोटाळत रहाणं टळत नव्हतं... त्यात जामवाला भय्या सतत काहीतरी बोलून खायला प्रोव्होक करत होता... नेहेमीप्रमाणे... भय्या कधीच हरायचा नाही...
आधी घरी फोन करून म्हाताराम्हातारीला उशीर होईल म्हणून सांगावं की आधी खाऊन घ्यावं... मरणाची भूक लागलीये... उपास करणं जमत नाही... घरच्याना वाटतं उपास करतो मुलगा... त्याना काय सांगायची कॅशमधे बसण्याची त्रांगडी... काय करावं... छ्या:ऽऽ... शेवटी देवाला सगळं कळतं!... ह्यां!... पण आईबाबांना फोन... च्यायलाऽऽ मरूदेऽऽ आधी खाऊ... ओ भय्याऽऽ च्यायलाऽ द्येव दोन प्लेटऽऽ ओऽऽ अबी उदर किदर देखताय बाबाऽऽ द्येवऽऽ इदरऽऽ
आज भय्याची चांगलीच सरशी होणार होती...

Thursday, March 3, 2011

राक्षस इत्यादी पुरस्कार!

मनूला सतत टाईमपास हवा असतो.माझ्यासारखं आयतं गिर्‍हाईक असल्यावर त्याला बोलत रहायची संधी मिळते.असं पकडून ठेवून बोलण्यासाठी मग तो वेगवेगळे डाव टाकतो. "तुला काय वाटतं?" असं म्हणून तो माझी मुलाखत घेतल्यासारखं करतो.मी सामान्य.असं कुणी मला विचारलं तर मी थोडाच मागे रहाणार? काळं कुत्रंसुद्धा विचारत नाही पण मनू विचारतो याचंच मला कौतुक.
"पूर्वी राक्षस पुरस्कार, दुर्योधन पुरस्कार इत्यादी दिले जात होते त्याबद्दल तुला काय वाटतं?" मनूनं नेम मारला आणि मला तो बरोब्बर लागला.खरं तर हे गढे मुर्दे उखाडणं होतं पण मला नं हल्ली हेच आवडतं.त्यासाठी मी एक चव्हाटाही जॉईन केलाय.मजा येते, खवळायला एक निमित्त मिळतं.खवळून दिलकी भडास काढून टाकली की आरोग्य (?) सुधारतं असं परवाच कुठेतरी ऐकलं.चांगलं काहीतरी ऐकलंय म्हणजे ते चव्हाट्यावरच असणार.तर ते असो.सांगायचा मुद्दा मी खवळलो, "वाईट झालं रे अगदी वाईट्ट! वाईट्टं! एवढे सगळे राक्षस, दुर्योधन आजुबाजूला नंगानाच घालत असताना ते पुरस्कार हवे होत्ये र्‍येऽऽ वेगवेगळ्या कंपन्या सिनेमा पुरस्कार काढतात, वेगवेगळे तेच ते वाटणारे कार्यक्रम करून आणि त्याच त्या लोकांना आल्टून पाल्टून पुरस्कार देऊऽऽनऽऽ तसं करता आलं असतं रेऽऽ कुणीतरी असं पाऊल पुन्हा उचलायला पायज्ये रेऽऽ" माझ्यातला सामान्य मध्यमवर्गीय खवळून, कळवळून बाहेर आला.मुलाखत घेणारा जसा कावेबाज चेहेरा करतो आणि लोक ज्याला मिष्कील म्हणतात तसा चेहेरा मनूला करावाच लागत नाही.त्याचा चेहेरा ओरिजनलीच तसा आहे.तो म्हणाला, "पण तुला असं नाही वाटत की जो कुणी आयोग असा पुरस्कार द्यायचा तो स्वत:ला ग्लोरिफाय करण्यासाठीच हे सगळं करत होता?" माझा चेहेरा पटकन्‌ कोर्‍या पाटीसारखा झाला.मी सामान्य इ.इ. असल्यामुळे तो बर्‍याच वेळा तसा होतो हे चाणाक्ष असल्यामुळे तुमच्या ध्यानात आलंच असेल.माझा कोरा चेहेरा बघून मनू म्हणाला, "म्हणजे असं की एखादी बाई आपण गर्दीत उठून दिसावं म्हणून भली मोठी लालभडक टिकली लाऊन लक्ष वेधून घेते तसं?" माझी ट्यूब पेटली.ज्ञानाचा उजेड पडल्याच्या भरात मी म्हणालो, ’हां! म्हणजे असले पुरस्कार देऊन स्वत:चंही नाव करून घ्यायचं!" मनू म्हणाला, "नाहीतर अमुकतमुक आयोग अस्तित्वात आहे हे आपल्याला माहितच नसतं, नाही का?" मुलाखतकर्त्यासमोर बसलेल्या आज्ञाधारी आणि अत्यंत गरजू मुलाखत देणार्‍यासारखं मी लगेच “हो” म्हटलं.
मनूचा टाईमपासचा हेतू आता सफल झाला होता आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला होता.“अमुक माणूस पैसे खातो पण काम करतो ना? मग पैसे खाल्ले तर काय बिघडलं?” या हल्ली खूप फेमस झालेल्या वचनाला जागून मी म्हणालो, “पुरस्कार देऊन नाव करून घेऊ देत रे! काहीतरी चांगलं केलं ना?” मनूनं अनुभवी मुलाखत घेणार्‍यासारखं पटकन् विचारलं, “कोण म्हणतं?” माझा चेहेरा पुन्हा कोरा करकरीत. “म-म्हणजे?-” मी चाचरत विचारलं. मनूनं स्पष्टं केलं, “अरे यात आपल्या सांस्कृतिक इतिहासाचं विकृतिकरण होत नाहीए का?” हगल्या पादल्या गोष्टींमुळे आपल्या महान आणि सर्वात जुन्या संस्कृतीचं असलं काही होतं असं कुणी म्हटलं की माझ्या डोक्यात कुरतडायला लागतं.“कोण म्हणतं?” मी त्राग्यानं विचारलं. “महासंघ आणि चळवळीतले कार्यकर्ते!” मनू उत्तराचा दबा धरूनच बसल्यासारखा उत्तरला.असं म्हणताना त्याचा चेहेरा फुलला.जाहिरातीतला माणूस ज्या उत्साहात ’एक बाम तीन काम!’ म्हणतो त्यालाही लाजवणारा उत्साह अशावेळी मनूच्या चेहेर्‍यावर असतो.ही माझ्यासाठी खरंतर धोक्याची खूण होती पण माझं तात्विक भान एकदा जागं झालं की कसला धोका आणि कसली खूण! “कोण हे महासंघ आणि चळवळीतले कार्यकर्ते?” आजूबाजूला कोणी ऐकत नाहीए ना हे बघूनच मी माझं मत ठामपणे मांडलं. “आत्तापर्यंत कुठे होते हे?” कुणीच ऐकत नाहीए ह्याची खात्री झाल्यामुळे माझा धीर चांगलाच चेपला. “अरे भारतातील संस्कृती संघर्षाचा इतिहास नव्याने वाचायला-शिकायला नको का?” मनूनं अगदी शांतपणे आपलं नवं प्यादं पुढे सरकवलं.हा मला नवा बंपर, नवा गुगली किंवा नवा दूसरा होता.चेहेरा कोरा करकरीत होण्याच्या पुढची पायरी चेहेर्‍यावर वेडेपणाची झाक येणं ही असावी.मी डोकं फिरल्यासारखा ओरडलो, “हे काय शिकायचं वय आहे काय? कुणी कुणी काय काय शिकवायचं? आणि आम्ही सतत शिकतच रहायचं? काय नव्याने वाचायला शिकवणार आहेस तू, ते मला समजेल असं सांग!” असं सगळं एका दमात ओरडत असताना मी आजूबाजूला बघत होतोच.कावेबाज मनूचा आवाज आणखी मुलायम झाला. “हे बघ! पुराणातले राक्षस, दैत्य, असूर हे वाईट नव्हते!” हे म्हणजे जरा अतीच होतं.मी भांडायला लागलो, “मग काय देव होते? देव होते?” मनूनं तरीही शांतपणा सोडला नाही. “अरे पूर्वीच्या काळी ब्राह्मणांनी जी चार वर्णांची व्यवस्था केली होती.त्या परंपरेचे विरोधक म्हणजे त्या वेळचे बहुजन, ज्याना त्या ब्राह्मणांनी दैत्य, असूर, राक्षस म्हणून बदनाम केलं!” मी लगेच उपरोधानं म्हटलं, “काय म्हणतोस? खरंच? मी तर समजत होतो की केवळ दुष्ट प्रवृत्ती म्हणजेच दैत्य, असूर, राक्षस वगैरे आणिऽऽ रावण हा जन्माने ब्राह्मणच होता कीऽऽ त्याला का असूर म्हटलं?... काय झालंय तुला सांगतो, ब्राह्मणांना सगळ्यांनीच दाबून टाकायचं ठरवलंय.महासंघ असो, राजकीय पक्ष असो, नाही तर असले हे दैत्य, असूर, राक्षस असे शब्द का वापरले अशी लहान मुलांच्या भांडणासारखी भाषा असो.सगळ्यांनी उठून आपण बहुजन आहोत म्हणायचं आणि ब्राह्मण ब्राह्मण असं ओरडत साप म्हणून भुई थोपटायची! काही तरी कारण काढून आग पाखडायची!” मनूचा आवाज कधी नाही तो खाली आला असं मलाच वाटलं.त्यानं पुढचा ’दूसरा’ टाकला, “हिंसा, अत्याचार, भेदभावाची मूल्यं राक्षसांनी कधीच मांडली नाहीत! उलट उच्चवर्णीयांनी या समाजात निर्माण केलेल्या वर्णवर्चस्वाला व त्यांनी मांडलेल्या विषमता, हिंसेच्या मूल्यांना राक्षसांनी विरोधच केला!” आता मात्र मला वैताग वैताग आला.मनूचा हा न समजणार्‍या भाषेचा किडा मेंदू पोखरत होता. “मनू, तुला नक्की काय म्हणायचंय? राक्षसांना बहुजन म्हणायचंय की बहुजनांना राक्षस म्हणायचंय?” मनू मला इशारा दिल्यासारखा म्हणाला, “साल्याऽऽ चोख्याच्या पायरीवर नेऊ काय तुला? चांगले फटके मिळतील!” कधी नाही ते मीही पेटून उठलो, “भडकाभडकवी करायची तर पायरीचा आधार कशाला घ्यायचा? यांचे नेते सवलती का काढू देत नाहीत? यांच्याच वस्तीत यांच्याच नेत्याला चपलांनी पडते आणि त्यालाच कालांतराने हे आपला एकमेव नेता म्हणून का मिरवतात? यांचाच ढाण्या वाघ स्वत:चंच शेपूट का हुंगतो?... केवळ एककलमी कार्यक्रम असल्यासारखा शिवराळपणा करायचा, ढोल बडवत रहायचे! कशाविरूद्ध तरी भडभडभडून ओकण्यासाठी चोखा मेळ्याला वापरायचं असतं?... ब्राह्मण्याशिवाय सगळे प्रश्नं संपले? परिस्थितीच्या रेट्याखाली जगणारा माणूस ही एकच जात या देशात बाकी राहिलीय! तुमची नैराश्य बाहेर काढायला त्यांच्यासाठी काहीतरी करा! नुसते भडभडून ओकू नका! आणि आधी हे फालतू पुरस्कार देणं थांबवा.त्यावरचे वाद थांबवा! जे झालंय त्याचं खापर कुणा एकावर फोडत रहाणं थांबवा!”
राक्षस इत्यादी पुरस्कार देणं कधीच थांबलं होतं आणि तरीही मनूचा हेतू सफल झाला होता.त्यानं वेताळासारखा पोबारा केला.महानगरातल्या चोख्याच्या पायरीवरची वाट चित्रपटसृष्टीत जाऊन रममाण झाली होती आणि कुठल्या एका कोपर्‍यातले कुणी एक रिकामटेके रडतराऊ तोंडाचा आ करून प्रसिद्धीच्या घोड्यावर बसू लागले होते…

Tuesday, March 1, 2011

आकाशवाणीशी ओळख

आईचं अचानक आलेलं दुर्धर आजारपण आणि त्यात अवघ्या तीन महिन्यात तिचा झालेला मृत्यू हा माझ्यावर, माझ्या दोन लहान बहिणींवर जबरदस्त आघात होता.आई ही अशीच आयुष्यभर आम्हाला आमच्यासाठी हक्काचीच असणार हे आम्ही मनाशी ठाम समजून आपापल्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे होतो.भलताच क्लायमॅक्स आमच्या आयुष्यात आला.एक वादळ आलं, गेलं, स्मशानशांतता तेवढी मनं व्यापून उरली.
माझ्यावरची जबाबदारी आता वाढलीय किंवा सगळं ओझं आता माझ्याच डोक्यावर आलंय असं काहीसं माझ्या मनानं घेतलं.नाटक हा छंद होता.माझ्या दृष्टीने तो माझ्या स्वत:साठी कितीही हवाहवासा वाटला तरी नुसता छंद करत रहाणं माझ्या ओझावलेल्या मनाला पटेना.
जबाबदारीची माझी व्याख्या, कल्पना काय होती?
नोकरी, नाटक यात माझ्या दिवसच काय घरी येईपर्यंत मध्यरात्र होत होती.मी घरी वेळ देणं आवश्यक होतं.माझ्या दोन बहिणी शिक्षण पूर्ण करून पुढच्या मार्गावर होत्या.त्याना नोकरी, त्यांचं स्वत:चं आयुष्य सुरू करून द्यायला हवं होतं.परिस्थिती बेताचीच होती.लष्करच्या भाकर्‍या भाजण्यापेक्षा बरीच महत्वाची कामं पडली आहेत असा ताण माझ्या मनानं घेतला.
नाटक माध्यमात काही उत्पन्न होऊ शकतं का याचा शोध त्या ताणानं आरंभला.
आकाशवाणी, मुंबई केंद्रावर जा असं मला नेमकं कुणी सुचवलं हे आता आठवत नाही पण आकाशवाणीवरच्या श्रुतिका, नभोनाट्य माझ्या आईमुळेच तेव्हा दूरदर्शन नसतानाच्या काळात रात्री जागून ऐकली होती.प्रपंच, पुन्हा प्रपंच ते आंबडगोड आणि आपली आवड, युवोवाणी इत्यादी सगळंच तेव्हा लोकप्रिय होतं.आई आवर्जून ते सगळं ऐकायची.ऐकवायची.
आवाज बरा आहे अशा प्रतिक्रिया यापूर्वी मिळालेल्या असल्यानं मी आकाशवाणी केंद्रावर जायचं ठरवलं.गेलो.कुणीतरी सुचवल्याप्रमाणे नाट्यविभाग शोधला.विभागात अजून कुणीही आलं नव्हतं.मी वाट बघत राहिलो.कुणी आलं, गेलं विभागप्रमुख कुठे आहेत कुणाला काही कल्पना नव्हती.मी रेंगाळत राहिलो.जरावेळानं विभागप्रमुख रजेवर आहेत असं कळलं.प्रयत्न थांबले असं मनाशी म्हणत मी रेंगाळत राहिलो.
माणूस स्वत:चा स्वभाव घेऊन जन्माला येतो.उणंअधिक सगळं घेऊन.भिडस्तपणा हा माझ्या स्वभावाचा भाग.अगदी लहानपणी मुखदुर्बळ म्हणून आईची बोलणी खाल्ली होती.आता ती कामाला यायची होती.मी नाट्यविभागासमोरच्या प्रशस्त मार्गिकेतून या टोकाला असलेल्या नाट्यविभागापासून मार्गिकेच्या त्या टोकापर्यंत फिरायला सुरवात केली.माझ्याच विचारात.एका फेरीत नुकतीच उन्हं आल्यामुळे उजळलेल्या मार्गिकेअखेरच्या तावदानांसमोर उभा राहून वळलो तर या टोकाच्या केबिनच्या आत लक्ष गेलं.लांबलचक केबिनच्या अगदी आत उजव्या टोकावरच्या टेबलापलिकडे एक व्यक्ती टेबलावरच्या दप्तरामधे काही नोंदी करत असावी.मी त्या गृहस्थांना ओळखलं.मी सकाळी ऑफिसला जाताना नेहेमी जी लोकल पकडायचो.त्या लोकलला तेही असायचे.त्यांचे सहप्रवासी स्थानकाच्या पश्चिमेला, मी रहात असलेल्या परिसराच्या दुसर्‍या एका टोकाला एक चित्रपट मंडळ चालवत असत.त्यासंदर्भात त्यांनी माझ्याकडे सूतोवाच केलं होतं.पण केंद्रावरच्या या केबिनमधल्या गृहस्थांची माझी नुसती तोंडओळख झाली होती.ते मला ओळखण्याची सुतराम शक्यता नव्हती.मी मनाचा हिय्या करून त्याना भेटण्याचं ठरवलं.आत गेलो.त्याना माझी ओळख, एका लोकलचा सहप्रवासी असल्याचा संदर्भ दिला.ते फारसे बोलणारे नाहीत असं त्यांच्या चेहेर्‍यावरून वाटायचं.त्यानी ’ओळखलं’ वगैरे म्हणण्याऐवजी आकाशवाणीवर कशाकरता आलात असं मनापासून विचारत बोलणंच चालू केलं.आकाशवाणीवरच्या नाट्यविभागाची आवाज चाचणी असते हे मला माहितच नव्हतं.ते त्यानी सांगितलं.ती वर्षाच्या सुरवातीला असते.अजून काही महिने बाकी आहेत अशी माहिती द्यायलाही ते विसरले नाहीत.त्यांच्या प्रतिसादाने मी सुखावलो.स्थिरावलो.
श्री.जयंत एरंडे हे ते आकाशवाणीवरचे कार्यक्रम अधिकारी.त्यांच्याकडे विज्ञानविभाग होता.एरंडेसरांचा मोठेपणा इतका की त्यानी आमच्या विज्ञानविभागासाठी काम कराल का? अशी विचारणा केली.त्यांच्या विज्ञानविभागातर्फे तज्ज्ञ वैद्यकांच्या मुलाखती प्रसारित होत असत.तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात तुम्हाला हे सहज जमेल असं त्यानी वर सुचवलंही.आपण अमुक एक मनात धरून प्रयत्न करायला जातो आणि दुसरं, अधिक वेगळं, नवा अनुभव देणारं काही आपली वाट बघत असतं.मी भारावलो.
एरंडेसरांनी मला सर्वप्रथम ऐकण्याचं यंत्र या विषयावर डॉ.वर्तक आणि त्यानंतर भाजल्यावर पाणी ओता या विषयावर डॉ.चंद्रकांत जोशी या सुप्रसिद्ध तज्ज्ञ वैद्यकांच्या मुलाखती घेण्याचं काम दिलं.त्यासाठी डॉ.वर्तकांना गोकुळदास तेजपाल इस्पितळात आणि डॉ.जोशींना त्यांच्या घरी शिवाजी पार्कला भेटायला सांगितलं.त्यांच्याशी चर्चा करून मी प्रश्नावली काढायची होती.दोघेही तज्ज्ञ ही सहृदय माणसं होती.मी पूर्णपणे नवा होतो.दोघांनी मला अभूतपूर्व असा अनुभव दिला.या दोन्ही मुलाखतींच्या कामात मला माझ्या ताणाचा, अडचणींचा पूर्ण विसर पडला होता इतकंच नाही तर एकट्यानं आपण असा एखादा प्रकल्प निभावू शकतो असा आत्मविश्वास दिला असं मला आजही इतक्या वर्षांनंतरही तो माझ्यासोबत आहे.माझ्या आकाशवाणीवरच्या प्रवासाची उत्तम सुरवात झाली होती…