romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, March 3, 2011

राक्षस इत्यादी पुरस्कार!

मनूला सतत टाईमपास हवा असतो.माझ्यासारखं आयतं गिर्‍हाईक असल्यावर त्याला बोलत रहायची संधी मिळते.असं पकडून ठेवून बोलण्यासाठी मग तो वेगवेगळे डाव टाकतो. "तुला काय वाटतं?" असं म्हणून तो माझी मुलाखत घेतल्यासारखं करतो.मी सामान्य.असं कुणी मला विचारलं तर मी थोडाच मागे रहाणार? काळं कुत्रंसुद्धा विचारत नाही पण मनू विचारतो याचंच मला कौतुक.
"पूर्वी राक्षस पुरस्कार, दुर्योधन पुरस्कार इत्यादी दिले जात होते त्याबद्दल तुला काय वाटतं?" मनूनं नेम मारला आणि मला तो बरोब्बर लागला.खरं तर हे गढे मुर्दे उखाडणं होतं पण मला नं हल्ली हेच आवडतं.त्यासाठी मी एक चव्हाटाही जॉईन केलाय.मजा येते, खवळायला एक निमित्त मिळतं.खवळून दिलकी भडास काढून टाकली की आरोग्य (?) सुधारतं असं परवाच कुठेतरी ऐकलं.चांगलं काहीतरी ऐकलंय म्हणजे ते चव्हाट्यावरच असणार.तर ते असो.सांगायचा मुद्दा मी खवळलो, "वाईट झालं रे अगदी वाईट्ट! वाईट्टं! एवढे सगळे राक्षस, दुर्योधन आजुबाजूला नंगानाच घालत असताना ते पुरस्कार हवे होत्ये र्‍येऽऽ वेगवेगळ्या कंपन्या सिनेमा पुरस्कार काढतात, वेगवेगळे तेच ते वाटणारे कार्यक्रम करून आणि त्याच त्या लोकांना आल्टून पाल्टून पुरस्कार देऊऽऽनऽऽ तसं करता आलं असतं रेऽऽ कुणीतरी असं पाऊल पुन्हा उचलायला पायज्ये रेऽऽ" माझ्यातला सामान्य मध्यमवर्गीय खवळून, कळवळून बाहेर आला.मुलाखत घेणारा जसा कावेबाज चेहेरा करतो आणि लोक ज्याला मिष्कील म्हणतात तसा चेहेरा मनूला करावाच लागत नाही.त्याचा चेहेरा ओरिजनलीच तसा आहे.तो म्हणाला, "पण तुला असं नाही वाटत की जो कुणी आयोग असा पुरस्कार द्यायचा तो स्वत:ला ग्लोरिफाय करण्यासाठीच हे सगळं करत होता?" माझा चेहेरा पटकन्‌ कोर्‍या पाटीसारखा झाला.मी सामान्य इ.इ. असल्यामुळे तो बर्‍याच वेळा तसा होतो हे चाणाक्ष असल्यामुळे तुमच्या ध्यानात आलंच असेल.माझा कोरा चेहेरा बघून मनू म्हणाला, "म्हणजे असं की एखादी बाई आपण गर्दीत उठून दिसावं म्हणून भली मोठी लालभडक टिकली लाऊन लक्ष वेधून घेते तसं?" माझी ट्यूब पेटली.ज्ञानाचा उजेड पडल्याच्या भरात मी म्हणालो, ’हां! म्हणजे असले पुरस्कार देऊन स्वत:चंही नाव करून घ्यायचं!" मनू म्हणाला, "नाहीतर अमुकतमुक आयोग अस्तित्वात आहे हे आपल्याला माहितच नसतं, नाही का?" मुलाखतकर्त्यासमोर बसलेल्या आज्ञाधारी आणि अत्यंत गरजू मुलाखत देणार्‍यासारखं मी लगेच “हो” म्हटलं.
मनूचा टाईमपासचा हेतू आता सफल झाला होता आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला होता.“अमुक माणूस पैसे खातो पण काम करतो ना? मग पैसे खाल्ले तर काय बिघडलं?” या हल्ली खूप फेमस झालेल्या वचनाला जागून मी म्हणालो, “पुरस्कार देऊन नाव करून घेऊ देत रे! काहीतरी चांगलं केलं ना?” मनूनं अनुभवी मुलाखत घेणार्‍यासारखं पटकन् विचारलं, “कोण म्हणतं?” माझा चेहेरा पुन्हा कोरा करकरीत. “म-म्हणजे?-” मी चाचरत विचारलं. मनूनं स्पष्टं केलं, “अरे यात आपल्या सांस्कृतिक इतिहासाचं विकृतिकरण होत नाहीए का?” हगल्या पादल्या गोष्टींमुळे आपल्या महान आणि सर्वात जुन्या संस्कृतीचं असलं काही होतं असं कुणी म्हटलं की माझ्या डोक्यात कुरतडायला लागतं.“कोण म्हणतं?” मी त्राग्यानं विचारलं. “महासंघ आणि चळवळीतले कार्यकर्ते!” मनू उत्तराचा दबा धरूनच बसल्यासारखा उत्तरला.असं म्हणताना त्याचा चेहेरा फुलला.जाहिरातीतला माणूस ज्या उत्साहात ’एक बाम तीन काम!’ म्हणतो त्यालाही लाजवणारा उत्साह अशावेळी मनूच्या चेहेर्‍यावर असतो.ही माझ्यासाठी खरंतर धोक्याची खूण होती पण माझं तात्विक भान एकदा जागं झालं की कसला धोका आणि कसली खूण! “कोण हे महासंघ आणि चळवळीतले कार्यकर्ते?” आजूबाजूला कोणी ऐकत नाहीए ना हे बघूनच मी माझं मत ठामपणे मांडलं. “आत्तापर्यंत कुठे होते हे?” कुणीच ऐकत नाहीए ह्याची खात्री झाल्यामुळे माझा धीर चांगलाच चेपला. “अरे भारतातील संस्कृती संघर्षाचा इतिहास नव्याने वाचायला-शिकायला नको का?” मनूनं अगदी शांतपणे आपलं नवं प्यादं पुढे सरकवलं.हा मला नवा बंपर, नवा गुगली किंवा नवा दूसरा होता.चेहेरा कोरा करकरीत होण्याच्या पुढची पायरी चेहेर्‍यावर वेडेपणाची झाक येणं ही असावी.मी डोकं फिरल्यासारखा ओरडलो, “हे काय शिकायचं वय आहे काय? कुणी कुणी काय काय शिकवायचं? आणि आम्ही सतत शिकतच रहायचं? काय नव्याने वाचायला शिकवणार आहेस तू, ते मला समजेल असं सांग!” असं सगळं एका दमात ओरडत असताना मी आजूबाजूला बघत होतोच.कावेबाज मनूचा आवाज आणखी मुलायम झाला. “हे बघ! पुराणातले राक्षस, दैत्य, असूर हे वाईट नव्हते!” हे म्हणजे जरा अतीच होतं.मी भांडायला लागलो, “मग काय देव होते? देव होते?” मनूनं तरीही शांतपणा सोडला नाही. “अरे पूर्वीच्या काळी ब्राह्मणांनी जी चार वर्णांची व्यवस्था केली होती.त्या परंपरेचे विरोधक म्हणजे त्या वेळचे बहुजन, ज्याना त्या ब्राह्मणांनी दैत्य, असूर, राक्षस म्हणून बदनाम केलं!” मी लगेच उपरोधानं म्हटलं, “काय म्हणतोस? खरंच? मी तर समजत होतो की केवळ दुष्ट प्रवृत्ती म्हणजेच दैत्य, असूर, राक्षस वगैरे आणिऽऽ रावण हा जन्माने ब्राह्मणच होता कीऽऽ त्याला का असूर म्हटलं?... काय झालंय तुला सांगतो, ब्राह्मणांना सगळ्यांनीच दाबून टाकायचं ठरवलंय.महासंघ असो, राजकीय पक्ष असो, नाही तर असले हे दैत्य, असूर, राक्षस असे शब्द का वापरले अशी लहान मुलांच्या भांडणासारखी भाषा असो.सगळ्यांनी उठून आपण बहुजन आहोत म्हणायचं आणि ब्राह्मण ब्राह्मण असं ओरडत साप म्हणून भुई थोपटायची! काही तरी कारण काढून आग पाखडायची!” मनूचा आवाज कधी नाही तो खाली आला असं मलाच वाटलं.त्यानं पुढचा ’दूसरा’ टाकला, “हिंसा, अत्याचार, भेदभावाची मूल्यं राक्षसांनी कधीच मांडली नाहीत! उलट उच्चवर्णीयांनी या समाजात निर्माण केलेल्या वर्णवर्चस्वाला व त्यांनी मांडलेल्या विषमता, हिंसेच्या मूल्यांना राक्षसांनी विरोधच केला!” आता मात्र मला वैताग वैताग आला.मनूचा हा न समजणार्‍या भाषेचा किडा मेंदू पोखरत होता. “मनू, तुला नक्की काय म्हणायचंय? राक्षसांना बहुजन म्हणायचंय की बहुजनांना राक्षस म्हणायचंय?” मनू मला इशारा दिल्यासारखा म्हणाला, “साल्याऽऽ चोख्याच्या पायरीवर नेऊ काय तुला? चांगले फटके मिळतील!” कधी नाही ते मीही पेटून उठलो, “भडकाभडकवी करायची तर पायरीचा आधार कशाला घ्यायचा? यांचे नेते सवलती का काढू देत नाहीत? यांच्याच वस्तीत यांच्याच नेत्याला चपलांनी पडते आणि त्यालाच कालांतराने हे आपला एकमेव नेता म्हणून का मिरवतात? यांचाच ढाण्या वाघ स्वत:चंच शेपूट का हुंगतो?... केवळ एककलमी कार्यक्रम असल्यासारखा शिवराळपणा करायचा, ढोल बडवत रहायचे! कशाविरूद्ध तरी भडभडभडून ओकण्यासाठी चोखा मेळ्याला वापरायचं असतं?... ब्राह्मण्याशिवाय सगळे प्रश्नं संपले? परिस्थितीच्या रेट्याखाली जगणारा माणूस ही एकच जात या देशात बाकी राहिलीय! तुमची नैराश्य बाहेर काढायला त्यांच्यासाठी काहीतरी करा! नुसते भडभडून ओकू नका! आणि आधी हे फालतू पुरस्कार देणं थांबवा.त्यावरचे वाद थांबवा! जे झालंय त्याचं खापर कुणा एकावर फोडत रहाणं थांबवा!”
राक्षस इत्यादी पुरस्कार देणं कधीच थांबलं होतं आणि तरीही मनूचा हेतू सफल झाला होता.त्यानं वेताळासारखा पोबारा केला.महानगरातल्या चोख्याच्या पायरीवरची वाट चित्रपटसृष्टीत जाऊन रममाण झाली होती आणि कुठल्या एका कोपर्‍यातले कुणी एक रिकामटेके रडतराऊ तोंडाचा आ करून प्रसिद्धीच्या घोड्यावर बसू लागले होते…

No comments: