romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, March 18, 2011

हास्यगाऽऽरवा २०११: अल्पसंख्याकांचा देश!

हास्यगाssरवा २०११
सगळ्या मित्रमैत्रिणींना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! जालरंग प्रकाशनाचा "हास्यगाऽऽरवा २०११" होळी विशेषांक प्रकाशित झालाय.लेख, किस्से, वात्रटीका असं बरंच विनोदी साहित्य असलेला! माझ्या लेखाचा दुवा खाली दिलाय आणि त्याखाली संपूर्ण लेख दिलाय:)

हास्यगाऽऽरवा २०११: अल्पसंख्याकांचा देश!

मनू म्हणजे सतत बदलणारा प्राणी.प्राणी म्हटलं की त्याला राग येतो.मग मी त्याला म्हणतो माणूसप्राणी.तो खूश होतो आणि पुन्हा बदलतो.
मी सामान्य असल्यामुळे काहीही बदललं की मी कासावीस होत असतो.अशावेळी मनू माझी परिक्षाच घेत असतो.जीवघेणी परिक्षा! या वेळची परिक्षा जास्तच जीवघेणी होती.
आपला देश हा अल्पसंख्याकांचा देश आहे काय? मी नेहेमीच गोंधळलेला असतो म्हणून तुम्हाला विचारतोय! देशातले बहुसंख्य कायम झोपलेलेच दिसतात.कुठल्याही अर्थानं घ्या! जात, पात, धर्म इत्यादीतल्या विविधतेने नटलेला आपला देश.देशातले अल्पसंख्याक नेहेमीच आग्रही असतात.नसले तर आपले नेते त्याना तसं बनवतात.त्यांना लाखो सवलती, कायदे देतात आणि निवडून देतात.आपल्या मनूसारखा चाणाक्ष माणूसप्राणी या सगळ्याचा फायदा न घेता तरच नवल.
त्याचं या वेळचं बदलणं माझ्या अंगावर मात्र काटा आणणारं होतं!
मनूवर माझं बारीक लक्ष असतं.काही दिवस त्यानं सभ्य माणसासारखं शर्ट-पॅण्ट घालणं सोडून दिलं- सोडून दिलं म्हणजे अगदी ’तसं’ नाही.पण त्याऐवजी तो रंगीबेरंगी कुरते, सलवारी, जाकिटं घालायला लागला.गळ्यात घट्टं बसणारी नाडी.त्यात भयंकर रंगाचा बदामाच्या आकाराचा खडा.जाकीटावर सोनेरी वेलबुट्टी.इथपर्यंत ठीक होतं.त्यानं केसही वाढवले.हा मुद्दाही आक्षेप घेण्यासारखा नव्हता.पण तो जेव्हा लचकत मुरडत चालायला लागला तेव्हा मी जरा सावध झालो.मग एकदा मी त्याला ब्युटीपार्लर अर्थात एका स्त्री सौंदर्यप्रसाधनगृहातून बाहेर पडताना बघितलं.प्रत्येक क्षणी माझ्या काळजाचा ठोका चुकत होता.
मला त्याला भेटायचं धाडस होईना आणि तो मला सारखा भेटायला लागला.मुद्दाम भर रस्त्यात थांबवायला लागला.त्याचं बोलणं लाडीगोडीचं.काही सांगताना तो मुद्दाम माझ्या दंडावर, गालावर चापटी मारायचा.रोखून बघायचा आणि मग मी कॉन्शस (भयचकित) झाल्यावर हसायचा.हसणं तसंच होतं.जिवणी फा-फाकवून लाचार.पण त्याचे ते विभ्रम (म्हणजे चाळे) बघून-नव्हे सहन करून- मी सुन्नं होत होतो.त्याची काळजी वाटून त्याला चार शब्द सुनवावेत म्हणून मी तयारी करायचो पण त्याच्या कोरलेल्या भुवया, चेहेर्‍यावरचा हलका मेकअप, ओठावरची लाली बघून माझ्या तोंडून शब्दच फुटायचे नाहीत.
बरं, आता फक्त आमच्या दोघांमधेच त्याचं हे वागणं राहिलं नव्हतं.मनू मला भर रस्त्यात गाठायचा आणि लोक आमच्याकडे टकामका पहात रहायचे.मला अंगावर पाल चढल्यासारखं व्हायचं.एकदा तर त्याने माझ्या शर्टाच्या बटणांनाच हात घातला.मला धरणीनं पोटात घ्यावं असं वाटायला लागलं आणि गर्दीतून एक हाक ऐकू आली, “एऽऽ छगऽऽन” त्यावर मनू त्या माणसाकडे बघून माशी हाकलल्यासारखं करून लाडीक आवाजात चित्कारला, “यूऽऽ नॉटीऽऽ” … मी, तुम्हाला सांगतो, जीव घेऊन धूम ठोकली.त्यानंतर मनू केव्हाही समोरून येताना दिसला की मी सरळ पतली गली पकडून तिथून सटकत होतो.
बैचेन मात्र होतो.मनूचं हे काय झालं होतं? देशात चाललेल्या सगळ्याच गोष्टी माझ्यासारख्याच्या हाताबाहेरच असतात.अशा गोष्टी नुसत्या बघूनच मी हबकतो.दर वेळी मनूला हक्कानं काही तरी उमज पाडायचा केविलवाणा प्रयत्न तरी करायचो.या वेळी मी हतबल झालो होतो.डोळ्याचं भुस्काट पडायचं बाकी होतं.
बरं! मनूचा पाठलाग करून त्याच्यावर नजर ठेवायची म्हणजे नस्ती आफत! मनूला लागलेल्या रोगासारखे हे रोग साथीचे असावेत.हळूहळू मनू घोळक्यात दिसू लागला.त्याच्यासारखे बायलट केशभूषा, वेशभूषा केलेले पुरूष आणि पुरूषी दिसणार्‍या मुली.खरं म्हणजे बाई कोण, पुरूष कोण हे ओळखणं कठीणच होतं.शपथेवर सांगण्यासारखं तर नव्हतंच.एक मुलगा, एक मुलगी गळ्यात गळे घालून चाललेत म्हणून कौतुकानं बघावं तर तोंडावर आपटायची पाळी.हे सगळे मिळून नक्की काय करतात म्हणून दिव्याच्या खांबाआडून मी जेम्स बॉंडगिरी करायला गेलो.स्वत:वर जरा जास्तच खूश होतो आणि मला बेमुदत पडायची बाकी राहिली! मला घेराव पडला.असंख्य ’ते’ किंवा ’त्या’ आणि मी एकटा.“बघता काय? सामील व्हा!” असा सगळ्यांचा आग्रह.कुणीतरी दोन-चार थपडा दिलेल्या परवडल्या पण हे-नाही- ह्या सगळ्या? ईऽऽऽऽ कशीबशी हातापाया पडून मी माझी सुटका करून घेतली आणि कानाला खडा लावला (कानाला! कानाच्या पाळीला नव्हे! तो ते-त्या लावत होते!).या असल्या लफड्या-लोच्यामधे अडकलो तर आहे ते सुद्धा गमवायची पाळी! पंधरा दिवस घराबाहेर पडलोच नाही.स्वप्नातसुद्धा दचकून जागा होत होतो!
पुढे एक दिवस कुठून तरी येताना एका उद्यानात सभा चाललेली दिसली.बघतो तर सगळे तेच! आय एम सॉरी! त्याच! ते की त्या? च्यायला काय म्हणायचं यांना? मनू तावातावाने सभेपुढे भाषण करत होता.स्टेजवर रंगीबेरंगी कापडी फलक, ’सम समा संयोग सभा’! त्या खाली चार ’एस’ एकमेकांत गुंतलेले! उद्यानभर सगळे तेच! नेहेमीची बहुसंख्य लहान मुलं, म्हातारे-कोतारे, तरूण जोडपी गेटच्या बाहेर ताटकळत! उद्यानातल्या प्रत्येक झाडावर एकेक बोर्ड! आम्हाला न्याय द्या! आमच्या मागण्या मान्य करा! कायदा बदला! आम्हाला स्वातंत्र्य द्या! कोण कुणाबरोबर रहाणार हे तुम्ही कोण ठरवणार? आम्हाला सुखानं जगू द्या!... मनू संतापानं लालेलाल झालेला.मग जोरजोरात घोषणा घुमायला लागल्या.उद्यानाबाहेर पोलिसांचं कडं.हेल्मेटधारी.जाळ्या घेतलेले.दंडुका, रायफली घेतलेले.ते गेटबाहेर ताटकळणार्‍या म्हातार्‍या कोतार्‍यांना, लहान मुलांना, तरूण जोडप्यांना अजिबात आत सोडत नव्हते.बहुसंख्याना आज उद्यानात प्रवेश नव्हता.तसा प्रयत्न करणार्‍याला फटकावले जात होते.मी तिथून निघालो.साठ-सत्तर वर्षांपूर्वी मिठाचा सत्त्याग्रह, कायदेभंगाची चळवळ, विदेशीची होळी. चले जाव, भारत छोडो! असं बरंच काही होतं.आज आपण स्वतंत्र आहोत पण ते चार ’एस’ स्वतंत्र नाहीत.आज ते अल्पसंख्याक आहेत.त्यांनी आवाज उठवलाच पाहिजे.
मग एके दिवशी बातम्या लावल्या.देशाची अजून किती वाट लागलीय हे अधूनमधून बघणं गरजेचं असतं.टीव्हीवर मनू! मी दाणकन् उडालो.पत्रकार परिषदेतला मनू तावातावाने मुलाखत देत होता.अडला की बाजूचे चार एस् त्याला प्रॉम्ट करत होते, ’लवकरच लैंगिक अल्पसंख्याकांचं देशव्यापी अभियान चालू होणार!’ असा संदेश सगळ्या वाहिन्यांवरून झूम आऊट, झूम इन होत राहिला…
मग वाहिन्यांवरचं हे ’अल्पसंख्याक अभियान’ बघायची मला चटकच लागली.म्हणजे, वाहिन्यांवरचं इतर काही सतत बघण्याची नेहेमीची चटक बाजूला सारून मी या चटकेला सर्वोच्च प्राथमिकता दिली असं म्हणूया हवं तर!
आणि रसिकहो! ते एकमेकांत गुंतलेले चार एस् जिंकले.त्यांचा विजय झाला.पर्यायानं आपल्या लोकशाहीला आणखी एका कोंदणाचा लाभ झाला! आणि याचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला! पण…
आपला मनू स्वत:च्या अल्पसंख्याकपणाचा फायदा घेऊन केंद्रातल्या नेहेमीच्या डळमळत्या सरकारात शिरणार आणि समाजकल्याण खात्याचं मंत्रीपद पटकावणार याबद्दलही माझी खात्री झाली!

No comments: