romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, March 1, 2011

आकाशवाणीशी ओळख

आईचं अचानक आलेलं दुर्धर आजारपण आणि त्यात अवघ्या तीन महिन्यात तिचा झालेला मृत्यू हा माझ्यावर, माझ्या दोन लहान बहिणींवर जबरदस्त आघात होता.आई ही अशीच आयुष्यभर आम्हाला आमच्यासाठी हक्काचीच असणार हे आम्ही मनाशी ठाम समजून आपापल्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे होतो.भलताच क्लायमॅक्स आमच्या आयुष्यात आला.एक वादळ आलं, गेलं, स्मशानशांतता तेवढी मनं व्यापून उरली.
माझ्यावरची जबाबदारी आता वाढलीय किंवा सगळं ओझं आता माझ्याच डोक्यावर आलंय असं काहीसं माझ्या मनानं घेतलं.नाटक हा छंद होता.माझ्या दृष्टीने तो माझ्या स्वत:साठी कितीही हवाहवासा वाटला तरी नुसता छंद करत रहाणं माझ्या ओझावलेल्या मनाला पटेना.
जबाबदारीची माझी व्याख्या, कल्पना काय होती?
नोकरी, नाटक यात माझ्या दिवसच काय घरी येईपर्यंत मध्यरात्र होत होती.मी घरी वेळ देणं आवश्यक होतं.माझ्या दोन बहिणी शिक्षण पूर्ण करून पुढच्या मार्गावर होत्या.त्याना नोकरी, त्यांचं स्वत:चं आयुष्य सुरू करून द्यायला हवं होतं.परिस्थिती बेताचीच होती.लष्करच्या भाकर्‍या भाजण्यापेक्षा बरीच महत्वाची कामं पडली आहेत असा ताण माझ्या मनानं घेतला.
नाटक माध्यमात काही उत्पन्न होऊ शकतं का याचा शोध त्या ताणानं आरंभला.
आकाशवाणी, मुंबई केंद्रावर जा असं मला नेमकं कुणी सुचवलं हे आता आठवत नाही पण आकाशवाणीवरच्या श्रुतिका, नभोनाट्य माझ्या आईमुळेच तेव्हा दूरदर्शन नसतानाच्या काळात रात्री जागून ऐकली होती.प्रपंच, पुन्हा प्रपंच ते आंबडगोड आणि आपली आवड, युवोवाणी इत्यादी सगळंच तेव्हा लोकप्रिय होतं.आई आवर्जून ते सगळं ऐकायची.ऐकवायची.
आवाज बरा आहे अशा प्रतिक्रिया यापूर्वी मिळालेल्या असल्यानं मी आकाशवाणी केंद्रावर जायचं ठरवलं.गेलो.कुणीतरी सुचवल्याप्रमाणे नाट्यविभाग शोधला.विभागात अजून कुणीही आलं नव्हतं.मी वाट बघत राहिलो.कुणी आलं, गेलं विभागप्रमुख कुठे आहेत कुणाला काही कल्पना नव्हती.मी रेंगाळत राहिलो.जरावेळानं विभागप्रमुख रजेवर आहेत असं कळलं.प्रयत्न थांबले असं मनाशी म्हणत मी रेंगाळत राहिलो.
माणूस स्वत:चा स्वभाव घेऊन जन्माला येतो.उणंअधिक सगळं घेऊन.भिडस्तपणा हा माझ्या स्वभावाचा भाग.अगदी लहानपणी मुखदुर्बळ म्हणून आईची बोलणी खाल्ली होती.आता ती कामाला यायची होती.मी नाट्यविभागासमोरच्या प्रशस्त मार्गिकेतून या टोकाला असलेल्या नाट्यविभागापासून मार्गिकेच्या त्या टोकापर्यंत फिरायला सुरवात केली.माझ्याच विचारात.एका फेरीत नुकतीच उन्हं आल्यामुळे उजळलेल्या मार्गिकेअखेरच्या तावदानांसमोर उभा राहून वळलो तर या टोकाच्या केबिनच्या आत लक्ष गेलं.लांबलचक केबिनच्या अगदी आत उजव्या टोकावरच्या टेबलापलिकडे एक व्यक्ती टेबलावरच्या दप्तरामधे काही नोंदी करत असावी.मी त्या गृहस्थांना ओळखलं.मी सकाळी ऑफिसला जाताना नेहेमी जी लोकल पकडायचो.त्या लोकलला तेही असायचे.त्यांचे सहप्रवासी स्थानकाच्या पश्चिमेला, मी रहात असलेल्या परिसराच्या दुसर्‍या एका टोकाला एक चित्रपट मंडळ चालवत असत.त्यासंदर्भात त्यांनी माझ्याकडे सूतोवाच केलं होतं.पण केंद्रावरच्या या केबिनमधल्या गृहस्थांची माझी नुसती तोंडओळख झाली होती.ते मला ओळखण्याची सुतराम शक्यता नव्हती.मी मनाचा हिय्या करून त्याना भेटण्याचं ठरवलं.आत गेलो.त्याना माझी ओळख, एका लोकलचा सहप्रवासी असल्याचा संदर्भ दिला.ते फारसे बोलणारे नाहीत असं त्यांच्या चेहेर्‍यावरून वाटायचं.त्यानी ’ओळखलं’ वगैरे म्हणण्याऐवजी आकाशवाणीवर कशाकरता आलात असं मनापासून विचारत बोलणंच चालू केलं.आकाशवाणीवरच्या नाट्यविभागाची आवाज चाचणी असते हे मला माहितच नव्हतं.ते त्यानी सांगितलं.ती वर्षाच्या सुरवातीला असते.अजून काही महिने बाकी आहेत अशी माहिती द्यायलाही ते विसरले नाहीत.त्यांच्या प्रतिसादाने मी सुखावलो.स्थिरावलो.
श्री.जयंत एरंडे हे ते आकाशवाणीवरचे कार्यक्रम अधिकारी.त्यांच्याकडे विज्ञानविभाग होता.एरंडेसरांचा मोठेपणा इतका की त्यानी आमच्या विज्ञानविभागासाठी काम कराल का? अशी विचारणा केली.त्यांच्या विज्ञानविभागातर्फे तज्ज्ञ वैद्यकांच्या मुलाखती प्रसारित होत असत.तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात तुम्हाला हे सहज जमेल असं त्यानी वर सुचवलंही.आपण अमुक एक मनात धरून प्रयत्न करायला जातो आणि दुसरं, अधिक वेगळं, नवा अनुभव देणारं काही आपली वाट बघत असतं.मी भारावलो.
एरंडेसरांनी मला सर्वप्रथम ऐकण्याचं यंत्र या विषयावर डॉ.वर्तक आणि त्यानंतर भाजल्यावर पाणी ओता या विषयावर डॉ.चंद्रकांत जोशी या सुप्रसिद्ध तज्ज्ञ वैद्यकांच्या मुलाखती घेण्याचं काम दिलं.त्यासाठी डॉ.वर्तकांना गोकुळदास तेजपाल इस्पितळात आणि डॉ.जोशींना त्यांच्या घरी शिवाजी पार्कला भेटायला सांगितलं.त्यांच्याशी चर्चा करून मी प्रश्नावली काढायची होती.दोघेही तज्ज्ञ ही सहृदय माणसं होती.मी पूर्णपणे नवा होतो.दोघांनी मला अभूतपूर्व असा अनुभव दिला.या दोन्ही मुलाखतींच्या कामात मला माझ्या ताणाचा, अडचणींचा पूर्ण विसर पडला होता इतकंच नाही तर एकट्यानं आपण असा एखादा प्रकल्प निभावू शकतो असा आत्मविश्वास दिला असं मला आजही इतक्या वर्षांनंतरही तो माझ्यासोबत आहे.माझ्या आकाशवाणीवरच्या प्रवासाची उत्तम सुरवात झाली होती…

4 comments:

mau said...

>>>आपण अमुक एक मनात धरून प्रयत्न करायला जातो आणि दुसरं, अधिक वेगळं, नवा अनुभव देणारं काही आपली वाट बघत असतं.छान लिहिलेत...

विनायक पंडित said...

माऊ! अभिप्रायाबद्दल आभार!

Anagha said...

कसे हळहळू मार्ग दिसत जातात नाही का? आता मागे वळून बघितलं तर वाटतं...की इथेच पोचायचं होतं...आणि त्याचीच तर तयारी चालू होती...नकळत!
:) छान लिहिलयत विनायक.

विनायक पंडित said...

:)अगदी बरोबर आभार अनघा!