romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, April 26, 2011

गंगेत घोडं न्हालं! (’अभिलेख’२००!!)

वाचकहो! घोड्याला नदी(गंगा)पर्यंत नेता येतं पण… पुढे?... हे झालं घोड्याचं (प्रत्यक्ष घोड्याचं)! शब्दाच्या खुरांवर उड्या दामटणारा म्हणून अल्पावधीत प्रकाशात आणल्या गेलेल्या (कर्टसी: माझी बायको आणि माझा सहचर मनू) माझ्यासारख्या लेखनअश्वाचं आणि त्याच्या प्रातिभ अविष्काराचं (???) पुढे काय झालं याची उत्सुकता तुम्हाला असेलच! (?!) नसली तरी मला ते सांगण्याची उर्मी दाटून आली आहे.तुम्ही १९९ वेळा समजून घेतलंत, आजही समजून घ्याल ही अपेक्षा!
साडेसाती, पापग्रह असं कितीही म्हटलं आणि कितीही मारून मुटकून घोड्यावर बसवलं (पुन्हा घोडा आलाच!) तरी एकदा हवा लागली की वारू (वारू की घोडा?) चौखूर उधळायला वेळ लागत नाही! यालाच कानात वारं भरणं म्हणतात.माझंही तसंच झालं.
माझ्या तथाकथित बालकथा संग्रहाचं प्रकाशन व्हावं ही मनूच्या मनीची अदम्य इच्छा! त्याच्या समारंभ व्यवस्थापक होण्याच्या महत्वाकांक्षेला फुटलेले धुमारे तो माझ्यातर्फे पूर्णपणे उजळवणार होता.त्यातला एक टप्पा पूर्ण झाला.मी दिवसरात्र प्रकाशन समारंभाची स्वप्नं बघण्यात रात्रंदिवस जागू लागलो(?).
लोक रात्र वैर्‍याची आहे म्हणून जागतात, स्वत:ला राजा म्हणवून घेतात हे आ-आठवून त्या स्वप्नांच्या मध्यंतरांमधे मी स्वत:शीच खुदूखुदू हसू लागल्याचं माझं मलाच जाणवू लागलं.
सगळं कसं स्वप्नवत होतं! मी माझे मलाच चिमटे काढून काढून बेजार झालो.मनूला फोन लावला रे लावला की तो मला असंख्य नवनव्या आयडिया ऐकवायचा.प्रत्येक आयडियेआधी ’गेट आयडिया! : फ्रॉम मी!’ असा विनोद-बिनोदही करायचा.अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांची अशी नावं घ्यायचा की ज्यांना मी केवळ पेपरमधल्या फोटोंमधेच बघितलं होतं.शहराच्या मध्यभागातलं सभागृह त्यानं प्रकाशन समारंभासाठी नक्की करायला घेतलं तेव्हा माझ्या हातापायाची सगळी बोटं तोंडात होती.मनूला माझं मध्यमवर्गीय बजेट सांगून मी आधीच अवलक्षण करून घेतलं होतंच.मनूला इव्हेंट मॅनेजर होण्याचा फीवर इतका चढला की तो मला स्वखर्चाने टॅक्सीतून फिरवू लागला.टॅक्सी हे पब्लिक ट्रान्सपोर्ट याने की ’इतर’ लोकांनी प्रवास करायचं वाहन आहे हे मी त्याला परोपरीने विनवूनही तो जुमानेना.
एके दिवशी असंख्य निमंत्रितांची यादीच त्याने माझ्यासमोर टाकली.मी थरथरू लागलो.म्हटलं, “हे हे सगळे येणार आपल्या कार्यक्रमाला?” तो म्हणाला, “झक मारत!” मी लगेच विचारलं, “कसे?” तो म्हणाला, “ते माझ्याकडे लागलं! तू टेन्शन घेऊ नको!” लवकरच उभ्या आडव्या महाराष्ट्रातली या वर्षातली अत्यंत महत्वाची व्यक्ती मीच ठरणार, याबद्दल संशयही राहू नये याची पूर्ण काळजी मनू घेत होता.हात पाय लटपटत असतानाही मनूविषयीच्या अपार प्रेमाने माझं मन भरून दाटलं (!).
मीही चांगलाच सरसावलो.मग मी प्रमुख पाहुण्यांचं नाव सुचवलं की मनू त्याच्या वरच्या कुणाचं तरी नाव घेऊन मला गार करायला लागला.
प्रमुख पाहुणे, अध्यक्ष महाराज आणि कार्यक्रमाची तारीख हा लाल त्रिकोण (माफ करा नेहेमी प्रमाणे चुकीच्या जागी चुकीची उपमा येतेय पण समजून घ्याल तेव्हा…) सारखा लाल सिग्नलसारखा आडवा येऊ लागला.कधी पाहुणा आहे तर अध्यक्ष नाही.अध्यक्ष आहे तर पाहुणा नाही.दोघेही आहेत तर त्या तारखेला सभागृहच रिकामं नाही असं लाल त्रांगडं पिच्छा सोडेना.आता अगदी दर पौर्णिमेला जास्वंद वहायचा लाल तोडगा वर्षभर करावा लागणार या निर्णयाला मी येऊन पोचलो.
मनूला फोन केला की तो समजूत घालायचा.मी त्याला फोन केला की त्याचवेळी त्याला नेमका कुणातरी अतिमहत्वाच्या व्यक्तीचा फोन यायचा.इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे खायचं काम नाही हे मनोमन समजून माझ्या मनातला माझ्या मनूविषयीचा माझा आदर मनोमन दुणावला (चांगलं झालंय नै वाक्यं!).
पुस्तकाच्या प्रती हातात आल्या.ते माझ्या बायकोच्या नात्यातले लांबलांबचे प्रकाशक काका वेगवेगळे झब्बे घालून मला भे-भेटून समारंभाचं काय? असं वेगवेगळ्या झब्ब्यात आणि वेगवेगळ्या स्वरात विचारू लागले.आजपर्यंत त्यांच्या लेखकांचे प्रकाशन समारंभ त्यानी स्वत:च केलेले.प्रकाशन समारंभ आंगावर घेऊन करणारा त्यांच्या प्रकाशन आयुष्यातला मी पहिलाच!
दोन महिने होत आले पुस्तकांच्या प्रती हातात येऊन आणि प्रकाशन समारंभाचं काही ठरेना.
रात्रंदिवस जा-जागून आता माझ्या अंगात बारा हत्तींचं बळ आलं होतं! (छे! छे! तसलं काही सर्फींगबिर्फींग मी करत असल्यामुळे ते आलं असा समज करून घेऊ नका!) मी- चक्कं मी- आता पुढाकार घ्यायचं ठरवलं.असं करणारा आमच्या खानदानातला मी पहिलाच.
मी मनूला प्रत्यक्ष भेटलो.त्याला सहजासहजी उपलब्ध होऊ शकतील अशी नावं सुचवली.जे फुकटचा भाव न खाता येतील असं माझं मत होतं.पुस्तक जुनं झाल्यावर त्याचं प्रकाशन करण्यात काय हशील? “तू म्हणतोयस तर…” या बोलीवर मनूनं या पायावरचं वजन त्या पायावर घेतलं आणि लगेच तयार झाला. “हॉल फुकट मिळणार आहे.चहापाण्याचा खर्च फक्त करायचा!” असा बॉम्ब मनूनं टाकला आणि मी मनूला माझा आध्यात्मिक गुरूच करून घेतलं.मग मनूनं स्वखर्चानं थोडक्यात पोस्टर डिझाईन करून घेतलं.निमंत्रणाचं मॅटर तयार केलं.”हा येणार! तो येणार! तू अमक्याला फोन कर, मी सांगतो!” अधिकारवाणीच्या सुरात मनूचं दिशादर्शन सुरू झालं.माझ्या अपेक्षेप्रमाणे मी ज्यांना फोन करत होतो ते मला ओळखत नव्हते. “तुमचं निमंत्रण पोचलंच नाहीए हो!” “आम्हाला नं हल्ली अशा कुठल्याच कार्यक्रमाला जायला मिळत नाही!” असं इतकं कळवळून सांगत होते की त्यांच्याबद्दल अपार करूणेव्यतिरिक्त माझ्या मनात काहीच उरलं नाही.
समारंभाचा दिवस उजाडला.आमच्या घरी गुढीपाडव्यासारखं वातावरण होतं.एवढी मोठी गुढी मी उभारत होतो! पण त्या दिवशी मनूचं काय बिनसलं कुणास ठाऊक? तो माझ्यावरच डाफरायला लागला.
“पोस्टर लावलं नाहीस! त्या अमक्या तमक्याला फोन केला नाहीस!” हे सगळं खरंतर मनूनं स्वत:च स्वत:च्या अंगावर घेतलं होतं.मी ते सगळं करीन असं मी त्याला सांगूनही.तो प्रमुख पाहुण्यांना घ्यायला जाणार होता.तिथेही तो गेला नाही.फोनवरूनच त्याने त्याना यायला सांगितलं.ते आले.मनूनं फोटो काढले.मान्यवर निमंत्रित आले नाहीत.कारण एका वाहिनीवर त्यासगळ्यांची एक महत्वाची पार्टी (!) होती.काही मोजक्या मित्रांमुळे समारंभाची लाज राखली गेली.
एखादा खुसखुशीत सिनेमा चालू असावा आणि त्याला अचानक एक समांतर गंभीर किनार लागावी तसं काहीसं होत होतं.
समारंभ झाला तरी कवित्व (!) उरलंच! ’मनू फोटो कधी देतोएस?’ ह्या माझ्या लाडीक हट्टाला मनू प्रतिसादच देईना.भावनेच्या भरातून जरा बाहेर आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मनू एकूणच प्रतिसाद देणं टाळतोय! महिन्याभराने समारंभाची बातमी पेपरात आली पण ती स्थळ, काळ, वेळ टाळून आणि फोटोशिवाय.
त्यादिवसापासून आजतागायत मी मनूची प्रतीक्षा करतोय.तो मला भेटलेलाच नाही.माझं घोडं गंगेत न्हालं हो, पण मनू काही यशस्वी समारंभ व्यवस्थापक झाला नाही! काय झालं असेल त्याचं? कुठे असेल तो? काय करत असेल? माझ्यासारख्या आणखी कुणाला शोधत असेल? कुठेतरी त्याचा वास येतो, भास होतो.पुढे जाऊन शोधावं तर तो तो नसतोच.तो तुमच्या आमच्यातच आहे हे नक्की.तुम्हाला जर तो कुठे आढळला (हे जरा फारच होतंय, कल्पना आहे मला) तर मला नक्की कळवा! लेखक झालो पण मित्र गेला (हेही फार होतंय कल्पना आहे मला) असं काहीसं झालंय आणि आम्लपित्त वाढलंय त्यावर उपाय चालू आहेत सध्या!

Tuesday, April 19, 2011

मीठेमें क्या है?

अफलातून कॅच लाईन- तुमच्या मनात ठसून राहिल अशी ओळ, नेमकी दृष्यं, असले तर मोजकेच संवाद आणि?… भारतात एखादी जाहिरात लोकप्रिय व्हायला आणखी एक गोष्टं परिणामकारक ठरत आली आहे आणि ती म्हणजे भारतीय संस्कृतीतल्या वैशिष्ट्यांचा वापर.
ही जाहिरातींची जाहिरात(?) करण्यासाठी चालवलेली अनुदिनी नव्हे.जाहिराती स्वत:च इतक्या चालताएत.कित्येक करोडोंची उलाढाल त्यातून होतेय.जाहिरातींच्या मार्‍यापुढे खरंतर कंबरडं मोडतंय बघत रहाणार्‍याचं.त्यामुळे खरं तर जाहिरात निर्माण करणार्‍यांचं आव्हान आणखी वाढलं असेल.काही जाहिराती कितीही वेळा दाखवल्या तरी बघणार्‍याला रमवणार्‍या ठरताएत आणि हे आव्हान यशस्वीपणे पेलताएत.
झूझूची मालिका ही त्यातली एक.खरं तर त्यात भारतीयता वगैरे नाही पण.वेगळे(विचित्र)पण आहे.वैश्विकता आहे.आता तर तो ’रजनी’ झूझू थेट मंगळावरच पोचलाय! तो बॅग काय आवरतो, हात काय झटकतो, खोलीच्या दरवाज्याकडे म्हणून निघतो, थांबतो आणि रजनीस्टाईल थेट खिडकीतून पसार काय होतो.अप्रतिम आहे सगळं.मुळातली कल्पना अप्रतिम आहे.खरं तर धाडसीच आहे.पण एक आख्खा मौसम झूझूंनी धुमाकूळ घातल्यानंतर या मौसमातही हा झूझू आपला प्रभाव टिकवून आहे.
आपण बोलतोय ते दुसर्‍याच जाहिरातीबद्दल.’मीठेमें क्या है?’ ही ओळ असलेल्या.कॅडबरी चॉकलेटच्या.कॅडबरीचे सगळेच जाहिरात विषय लोकप्रिय राहिलेले आहेत.मीठेमें क्या है? ही खरं तर एव्हाना चावून चावून चोथा व्हावी अशी लाईन.पण भारतीयांची गोड खाण्याची आवड, जाहिरात निर्मात्यांनी समोर ठेवलेला भारतीय परंपरा, संस्कृती, एकत्र कुटुंब हा पाया आणि नेमकेपण हे सगळं या आधी बर्‍याच वेळा वापरल्या गेलेल्या या ओळीला आणखी एक नवा आयाम देऊन गेलं आहे.
निर्माते ह्या जाहिरातींच्या भागांचा क्रमही हुशारीने रचतात.बहुदा रात्रीचं असावं असं एकत्र जेवण, लहान मुलीला असलेलं चॉकलेटचं प्रचंड आकर्षण.जेवणानंतर गोड काय? घरातल्या प्रमुखानं केलेली पृच्छा.छोट्या मुलीनं चॉकलेट लपवणं, तिच्या आईनं ते तिला सगळ्यांना द्यायला सांगणं, तिचं रडणं, क्षणभर आपल्यालाही वाटणं की आता पुढे काय? आणि स्मार्ट सूनेनं आतून आणखी एक चॉकलेट डिशमधे आणून ठेवणं!
सगळ्यात प्रथम जाहिरातनिर्माता घर, एकत्र कुटुंब प्रस्थापित करतो.मग त्या थोड्याशा अवधीतच लहान मुलगी, सून, सासू, कुटुंबप्रमुख ही पात्रं प्रस्थापित होतात.चॉकलेटशी अर्थात गोड खाण्याशी त्यांचा संबंध प्रस्थापित होतो.एका मोठ्या जनघटकाला जाहिरात खिशात टाकते.
पुढच्या भागांचा पाया इथेच रचला जातो.स्मार्ट सूनबाई-गृहिणी-तरूण स्त्री हा चित्रवाणीपुढे असणारा मोठा घटक अधोरेखित झाल्यावर पुढचा भाग अनपेक्षित वळण घेतो.हा भाग रोमान्स-प्रणय ही चिरतरूण कल्पना, तरूण प्रेक्षक आणि नवरा, बायको सासू हा शाश्वत त्रिकोण हा पाया वापरतो.मग केस पुसणार्‍या तरूण विवाहितेचं नवर्‍याच्या अंगावर तुषार उडवणं, नवर्‍यानं टिपीकल ’खानेमें क्या है?’ असा नेहेमीचा प्रश्नं विचारणं, पार्श्वभागी त्याचवेळी सासूचं आगमन, निर्गमन, सूचक कटाक्ष आणि स्मित, त्या निमिषभरातच सूनेनं सासूचं अस्तित्व जाणवून ’करेला’ हा मोजकाच शब्दं वापरणं आणि मग मीठेमें... ही सम गाठल्यावर मोहक विवाहितेने तितकंच मोहक स्मित करणं.चांगल्या कलाकारांची निवड हे चांगल्या जाहिरातीच्या यशाचं आणखी एक गमक.पुढे काय? उत्सुकता वाढते.
त्यापुढे घरातल्या बाहेरून येणार्‍या तरूण घटकाचा नेहेमीचा प्रश्न पुन्हा समोर.खानेमें क्या है? समोर कोण बसलंय? फेसपॅक लावलेली बायको? की बहिण? नणंद हा एकत्र कुटुंबातला आणखी एक घटक प्रस्थापित होतोय, तिच्या टिपीकल वैशिष्ट्यानुसार.या सगळ्यामुळे विनोदनिर्मिती, उत्तम जाहिरातीतला महत्वाचा घटक.एव्हाना मालिकेचे धारावाहिक भाग बघायला चटावलेले प्रेक्षक चांगलेच गुंगुंन गेलेत.हा ही विचार, महामालिकांच्या महासामर्थ्याचा!(?) जाहिरात बनवणार्‍याने केला असेल? -आणि या जाहिरातीतलं कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण घिसपिटं असलं तरी महामालिकांसारखं टॉर्चर करणारं नाही!
जाहिरात क्षणार्धात संपणारी असते.भारंभार जाहिरातींच्या मार्‍यामुळे दर्शक हैराण झालेला.त्याचं कितपत लक्षं असेल प्रत्येक जाहिरातीकडे.उलट जाहिरात लागल्यावर तो इतर(!) महत्वाची कामं करायला तत्परतेनं उठतोच.या सगळ्यातून खिळवून ठेवणार्‍या जाहिरातींमागे इतका सगळा विचार असतो हे कळत गेलं की एक वेगळं विश्व, एक वेगळी मजा समोर येते.
... अंताला एक कलाटणी... मीठेमें क्या है? ही या जाहिरातीत संसारी प्रणयभावनेला अनुकूल म्हणून वापरली गेलेली पंचलाईन नको एवढी लोकप्रिय होऊ नये.अन्यथा सडकसख्याहरींच्या हाती आयतेच कोलीत!

Thursday, April 14, 2011

समारंभ व्यवस्थापन

मनू शेवटी समारंभ व्यवस्थापनातही शिरला.काय? समारंभ व्यवस्थापन म्हणजे काय? अहो, पूर्वी घरातली एखादी म्हातारी कोतारी बारशाची तयारी करायची आणि बारसं घडवून आणायची.पुलंच्या ’व्यक्ती आणि वल्ली’ मधला नारायण लग्नं घडवून आणायचा.याच प्रकारच्या कामाला हल्ली ’इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणतात.आता तुम्हाला कळलं असेल! इंग्लिश शब्द वापरला की आपल्याला लगेच कळतं!
हल्ली बरेच समारंभ, समारंभ व्यवस्थापक घडवून आणतात.पैसे आणि नाव कमावतात.मनू कसा मागे राहील? आणि मनू समारंभ व्यवस्थापक व्हायला कारण मी!
झालं काय मुलीला रात्री गोष्टं ऐकल्याशिवाय झोप येत नाही.मग मी तीच ती जुळवाजुळव करून नवीन नवीन गोष्टं तयार करून तिला सांगायला लागलो.ती म्हणायची, “पप्पा! या गोष्टीत कालचं ते हे होतं!” मग मी तिला प्रेमाने समजवायचो, “अग जग असतं न जग!” ती लगेच ’हो’ म्हणायची.मी पुढे म्हणायचो, “या जगात नवीन असं काहीच नसतं! सगळं तेच तेच तर असतं!” तिचा अंगठा तोंडात जाऊन ती एकाग्र व्हायची आणि हुंकार द्यायची.
बायकोला झोपताना एफएम ऐकायची सवय.तिच्या त्या अफलातून चिनी बनावटीच्या भ्रमणध्वनीवर.झोप येतेय असं वाटलं की ती तो पालथा की कसा काय तो कसाबसा करते.
एके सकाळी मनू चहाला माझ्याकडे आला.रोजची बरीच घरं संपवून तो लवकरच माझ्याकडे आल्यामुळे मी त्याचं योग्यं प्रकारे आगतस्वागत केलं.बायकोची झोप पुरी झाली नसावी किंवा ’आमची झोप पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही कसे हो चार चार दिवसांनी चहा घटळायला सकाळी सकाळी टपकता!’ असा काही अप्रत्यक्ष संदेश तिला तिच्या मनूभाऊजींना द्यायचा असावा.जे काय असेल ते.तिनं चायनीज बनावटीचा तिचा तो भ्रमणध्वनी सुरू केला आणि अचानक देववाणी ऐकू यावी तशा नको तेवढ्या गंभीर (!) आवाजात कुणा महामानवाचे अध्यात्मिक बोल कानी पडताएत असं आपलं मला वाटायला लागलं.मी हातातल्या चहाकडे आणि तोंडातल्या चहाच्या घोटाकडे पंचप्राण एकाग्र केले.चहा संपतो न संपतो तोच मनूनं माझ्या अंगावर उडीच मारली.मी निसटता चहाचा मग सावरतोय न सावरतोय तोवर तो आयपीएल जिंकल्यासारखा ओरडायला लागला, “व्वा! वा! क्या बात है!” माझी पाठ त्याच्या दणक्यानं हादरायला लागली.माझं लक्ष माझ्या बायकोकडे गेलं आणि मी ७.८ रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरून गेलो.म्हणजे बायको आता ज्या नजरेने माझ्याकडे बघतेय त्याला आदराने पहाणं असं म्हणतात? हे कधी शिकली ही? की पाठीवरच्या दणक्यानं मलाच दृष्टीभ्रम झालाय?
मनू आणि माझी बायको मग पुढच्या महत्कार्याला लागली.मला भानावर आणण्याच्या.त्यानी पुन्हा ती चिनी बनावटीच्या यंत्रातली वाणी सुरू केली. “अहो हे तुम्ही आहात! तुम्ही!” “मी?ऽऽऽऽ” कसाब, तहव्वूर की तस्सव्वूर? तोच तो कुणीतरी राणा किंवा थेट डेव्हीड हेडली या सगळ्यांनी मिळून जे अपराध केले त्यापेक्षाही भयंकर गुन्हे माझ्या नावावर नोंदल्यासारखा मी किंचाळलो.
मी मुलीला रात्री सांगितलेली ती माझ्या आवाजातली गोष्टं आहे.अनवधानाने ती भ्रमणध्वनीवर ध्वनिमुद्रित झाली आहे हे मला उभयता परीपरीने सांगत होते आणि तो गुन्हा कबूल करणं मला जमत नव्हतं.
बायको आणि मनू या दोन तगड्या व्यक्तिमत्वांनी माझा अगदी सहज मोरू केला असेल हा तुमचा होरा अगदी अचूक आहे! तसंच झालं.मला माझा गुन्हा कबूल करावा लागलाच.लगेच पुढचा गुन्हा, पुढचं कलम लागलं आणि माझा छळ सुरू झाला.अशावेळी दयेची याचना ज्याच्याजवळ मागायची तो परमेश्वरही कुठेतरी गेलेला असतो हो!
मनू आणि माझी बायको दोघांनी “आता पुस्तक! पुस्तक! पुस्तक! पुस्तक!” असा घोषा लावला आणि माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले.इतका हल्ला आणि कल्ला केला त्या दोघांनी की माझी ती गोष्टं ऐकता ऐकता शहाण्यासारखी झोपणारी मुलगी दचकून जागी झाली.कुणीतरी माझ्याबाजूने असणारं जागं झालंय म्हणून मी खूष व्हावं तर तीही, तिला काय कळलं कुणास ठाऊक दरवेशाच्या अस्वलाभोवती नाचावं तशी त्या दोघांमधे सामील होऊन माझ्याभोवती नाचू लागली.
माझी साडेसाती सुरू होण्याचा तो कुमुहुर्त असावा.पुढच्या घडामोडी पटापट घडल्या.
“आता रोज गोष्टी सांगून ह्या बालगोष्टींचं पुस्तक लिहायचंस! काय?” मनूनं बखोट धरून मला धडकीच भरवली.तो पर्यंत दुसरा शिलेदार म्हणजे माझी बायको, तिनं ताबडतोब थेट तिच्या आतेभावाच्या, चुलतभावाच्या, मावस मेव्हणीच्या, मामेकाकांना फोन केला.ते प्रकाशक होते.
साडेसातीतली कुठलीतरी अडीच वर्षं भयानक जातात म्हणे.मला नंतरचे अडीच महिने मनूनं, माझ्या बायकोनं आणि तिच्या प्रकाशक काकानं अर्थात शनि, राहू आणि केतू त्रयीनं तिन्ही बाजूनी चिणून चिणून मारून मुटकून एकदाचा एका पुस्तकाचा लेखक बनवलंच.मी लेखक झालो या आनंदापेक्षा माझी साडेसाती संपली, इतक्यातच संपली या विचाराने खुर्चीवर बसल्याबसल्या जोरात आळस द्यायला हात वर केले आणि मनूनं ते वरच्यावर पकडले. “आता प्रकाशन! प्रकाशन समारंभ करायचाच!” मी मनातल्या मनात स्वत:वर ज्याम चरफडलो, ’बघ! कालसर्प शांती करायची करायची म्हणून पुढे ढकललीस ना? भोग आता तुझ्या कर्माची फळं!’
झालं! मनूनं प्रकाशनाचं जाहीर केल्यावर कुंडलीतले यच्चयावत पापग्रह पुन्हा माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले.
आता डोकं लढवणं भाग होतं.नसलं तरी.
मी म्हणालो, “मनू! आमच्या हिला दुधी हलवा करायला सांगतो.बिल्डिंगमधल्यांना बोलवूया.तुझ्या हस्ते करून टाकू प्रकाशन!” त्यानंतर अर्धा तास मनूनं मला ’मी मध्यमवर्गीयपणा करून कसा रसातळाला जाणार आहे’, यावर लेक्चर दिलं.वर म्हणाला, “मी सगळं मॅनेज करणार! बाजारात चलती असलेले अध्यक्ष, प्रमुख पाहुणे बोलवायचे! शहरातल्या मोठ्या सभागृहात समारंभ करायचा.फोटो काढायचे.ते दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून आणायचे.अरेऽ बालसाहित्यात क्रांती केलीएस तू! ते काही नाही! ते सगळं माझ्यावर सोड! तू फक्त लाल झब्ब्याची तयारी कर!” ते सगळं ऐकलं आणि साडेसातीतले पुढचे अडीचंच काय आणखी अगणित महिने माझ्यासमोर आ वासून उभे राहिले.मला प्रचंड घेरी आली.अजून पुढचं सगळं- म्हणजे मुलीचं शिक्षण, लग्न वगैरे व्हायचं होतं म्हणून बायकोनं आणि समारंभ व्यवस्थापनाचा चान्स हुकू द्यायचा नाही म्हणून मनूनं सावरलं म्हणून नाहीतर सोफ्याची कड लागून डोक्याला पोचा तरी नक्कीच आला असता.शिवाय… तुम्ही सगळे एका होतकरू लेखकाला मुकला असता… मी धडधाकटपणे जिवंत राहिलो होतो… पुढची साडेसाती भोगण्यासाठी…

Monday, April 11, 2011

सहनिवास

उच्चभ्रू वस्तीतल्या ’अमुकतमुक’ सहनिवासांपासून सगळ्याच अर्थाने खूपच लांब.अजगरासारख्या पसरलेल्या पश्चिम रेल्वेवरचं एका जवळच्या जिल्ह्यातलं उपनगर.बावीस वर्षं उलटून गेलीएत.स्थिती आणखी आणखी वाईट.स्थानकापासून चालत वीसएक मिनिटांचं अंतर.इथे स्थित असलेल्या सहनिवासाची वार्षिक सर्वसाधारण सभा.
चाळीस सदनिकाधारकांपैकी चोवीस हजर.रहाणारे सतरा-अठराच जेमतेम.बावीस वर्षांपूर्वी काही मराठी, आपापसातल्या जातीप्रजातींचे सूक्ष्म का असेना ताणेबाणे ठेवत आणि काही गुजराती, मराठ्यांचे आणि त्यांचे नाते (?) जपत इथे सदनिकाधारक झाले.सगळे अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय.त्यातल्या दोन-पाच जणांचं भागधेय असं की त्याना त्यांची सदनिका सोडताच आलेली नाही.तिघे-चौघे अजून तिथे रहातात.पाण्याने अंत पाहिलेला.टॅंकर मा-मागवून जीव जात चाललेला ते आता एक दिवसाआड का नाही नळाचं पाणी मिळतंय एवढं सुख.
पावसात असह्य गळती.गच्चीतून, भिंतींमधून.रिकाम्या राहिलेल्या सदनिकांमधून कबुतरांनी (माणसातल्या नव्हे, खर्‍याखुर्‍या!) वस्ती केलेली.पिसं, विष्ठा यांनी माखून टाकलेल्या सदनिका न रहाणार्‍यांनी बावीस वर्षांत चार चार वेळा साफ करून बघितलेल्या.रहाणार्‍यांनी पावसाने आतून काढलेले नकाशे दिसू नयेत म्हणून लाल, पिवळे असे गडद तैलरंग सदनिकेला दिलेले.
बाहेरून तीन विंगा असलेला हा सहनिवास, रंगहीन, भेगा पडलेला.बाहेरून अद्याप रंग काय डागडुजीही केली गेलेली नाही.मागच्या बाजूच्या गटाराची अवस्था अशी की त्यामुळे सहनिवास आज न उद्या खचेलच.
एक सेक्रेटरी बावीस वर्षांपासून तिथेच राहून खिंड लढवत असलेला.ढासळणार्‍या बुरूजांची खिंड लढवत रहाणं हे एकेकाच्या आयुष्याचं ध्येय कसं काय असू शकतं? असू शकतं याचं एक कारण या सेक्रेटरीचा व्यवसाय उच्चभ्रू वस्तीतल्या सहनिवासांची कंत्राटी पद्धतीनं व्यवस्था पहाणं.आपल्या सहनिवासाला असं सोडून जाऊ नये असं त्याला वाटत असेल? मुलं मध्यपूर्वेत स्थिरस्थावर.हा इथेच.आणखी खोलात जायचं तर हा गुजराती :). त्याच्यामुळेच सहनिवास रजिस्टर्ड झालेला सहा वर्षांपूर्वी.
दोन लाख रूपये शिल्लक आणि अडीच लाख रूपये सदनिकाधारकांची थकबाकी.
अशा सहनिवासाची वार्षिक सर्वसाधारण सभा.दोन मुख्य विषय.या पावसाळ्यापासून कसा बचाव करायचा? एवढ्या मोठ्या थकबाकीचं काय? खरं तर प्रश्न पहिला आणि एकमेवच.त्या प्रश्नाचा उत्तरार्ध असलेला दुसरा प्रश्न.गच्चीच्या वॉटर प्रुफींगचं कोटेशन पाच लाख चाळीस हजार रूपये आणि इमारतीचं बाहेरून गच्चीशिवायच्या वॉटरप्रुफिंगचं आणखी तेवढंच.मिळून अकरा लाख रूपये.ते कसे उभे करायचे? काही थकबाकीतून.बाकीचे वर्गणीतून.
सभा सुरू होते.कुणीही यावं काहीही बोलावं असं सभेचं सर्वसाधारण स्वरूप.या दहा-बारा वर्षात सहनिवासातले सदनिकाधारक आणि त्यापेक्षाही भाडेकरू हे परप्रांतीय.स्पष्टं शब्दात सांगायचं तर भय्ये.आता पुन्हा हे पूर्वीच्या ’मद्राश्यां’सारखं होतंय.दक्षिणेतले सगळे मद्राशी तसं उत्तरेतले सगळे भय्ये.पण भय्ये हेच बरोबर.बिहारमधले असोत किंवा उत्तरप्रदेशमधले.झारखंड आणि उत्तरांचलातले काही ठळकपणे अजून ओळखता येत नाहीत बुवा, एक धोनी झारखंडातला सोडला तर.
तर... सभेत एक भैय्यीण उठते.तावातावाने.चेअरमन जो भैय्याच आहे, जो कंत्राटी पद्धतीने बांधकामं करतो आणि दिसतो, रहातो एखाद्या समाजविघातक प्रवृत्तीवाल्यांसारखा, त्याने सोसायटीला न विचारता त्याच्या भल्यामोठ्या गाडीसाठी सहनिवासाचंच विस्तारीकरण करून पार्कींगची शेड कशी बांधली? हा भैयीणीचा सवाल.ती लालबुंद.थरथरणारी.कुणाला बोलून न देणारी.शेड बांधायची परवानगी घेतली होती का? परवानगी घेतली असेल तर सोसायटीला त्याचं काय भाडं मिळतं? ते बाहेर पाच-पाच लाख असतं इत्यादी तिचे मुद्दे ती खोटं खपवून घेत नाही या सात्विक संतापाने जीव तोडून सांगते.तिच्याबरोबर बसलेल्या सदनिकाधारकांच्या बायकांचा संतापही अनावर होऊ लागतो.या सगळ्या पहिल्या रांगेत बसलेल्या आणखी एका भैय्यावर घसरतात.हा ही बांधकाम कंत्राटं घेणारा.त्यानं त्याच्या दुकान कम ऑफिसमधे चोरी झाली म्हणून ग्रील लावतो अशी परवानगी घेतली आणि दुकानाबाहेर शेड बांधून बाजूला भिंतीचा आडोसाही केला.एखाद्या रूमचा ऐवज तयार केला.तो गप्पं.त्याच्यावर जास्तंच आक्रमण झालं की तो सोसायटी बनण्याच्या आधी कोणी कोणी गॅलरीला ग्रील्स लावून ती झाकली त्याचे हिशोब सांगतो...
कधी एकदा हरदासाची कथा मूळ पदावर येते आणि गच्चीच्या वॉटर प्रुफिंगचा विषय निघतो.त्यावर गच्चीवर संपूर्ण पत्र्याची शेडच उभारा असा भांडणार्‍या भैयीणीचा आग्रह.टाईल्स आणि केमिकल मी स्वस्तात आणीन.लेबर दुकानाबाहेर शेड बांधणारा (वाचकांना कळावं म्हणून असा उल्लेख) भैय्या देईल असं आणखी एक सुशिक्षित भैया म्हणतो.तो आपल्या बांधवाशी त्यांच्या त्या तसल्या भाषेत संवाद करत नाही.असे नवे पर्याय येऊन आधी आलेल्या कोटेशन्सना फाटा मिळालेला.गंमत बघा हं.आधीची कोटेशन्स दिलेली आहेत बेकायदा पार्कींग बांधणार्‍या चेअरमन भैयाने.त्याच्या कुणी ’शिष्यां’ची म्हणून.
आणखी एक परप्रांतीय शिक्षक सेक्रेटरीच्या बाजूला व्यासपीठासारख्या मांडलेल्या टेबलामागे बसलेले.हे त्यांच्या बांधवांशी त्यांच्या त्या तसल्या भाषेतून संवाद साधतात.अतिशय विनम्रपणे बोलतात.सभेची सभ्यता पाळायला सांगतात.दोन बांधवांमधे जुंपली की ’आपसवामां सुलझाई लई लो हो’ असं काही त्यांच्या त्या भाषेत सांगतात आणि मेंटेनन्स का दिला नाही? असं विचारल्यावर दोन-चार महिने भाडेकरू नव्हता असं कारण सांगतात.
मूळ मुद्याच्या आणखी खोलात शिरल्यावर सभेच्या असं लक्षात येतं की एवढा खर्च करून ही एवढ्या वयाची इमारत पुनर्बांधणीत गेली तर त्या खर्चाचा काय उपयोग?
सेक्रेटरीने पुनर्बांधकामासाठी विकासक शोधण्याचा उद्योग करून पाहिलेला असतो.सहनिवास असलेल्या पंचक्रोशीत मोबाईल फोन हेच ऑफिस असलेले सगळे विकासक.समोरच्या सहनिवासाच्या पुनर्बांधणीचा अनुभव ताजा.अनेक सदनिकाधारक देशोधडीला लागलेले.जाब विचारायला गेलेल्या तरूणाचा खून.अजूनही पंचक्रोशीवर समाजविघातक पाया असलेल्या प्रवृत्तींचंच वर्चस्व.त्यातले काही राजकारणी झालेले.’मैद्याच्या पोत्यां’सारख्या वर्षानुवर्षे बसून राहिलेल्या राजकारण्यांनी त्यांना साथ दिलेली.त्यामुळे जिल्ह्याबाहेरच्या महानगरातला एकही विकासक तिथे यायला तयार नाही.
आणखी एक गंमत म्हणजे दोन राजकारणी भावांमधून विस्तवही जात नाही म्हणे! :D पण सहनिवासाच्याच आवारात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयं थाटलेली.कार्यकर्ते भूमिपुत्र.व्यवसायाच्या प्रतिक्षेत.त्यांची सोय कशी लावायची हा पक्षापुढचा महान प्रश्नं.मग आधी वाचनालय, चहा-भजीची-सिगरेट-गुटख्याची टपरी असं करत सहनिवासाच्या जागेवर अतिक्रमण.जाब विचारायला गेलेल्या एकट्या दुकट्या सदनिकाधारकाला फटकावणं.बाकीचे सावध.हे अतिक्रमण हेही विकासक पुढे न येण्याचं आणखी एक कारण.पक्षांच्या मागण्यांना कसं पुरे पडायचं हा त्यांच्यापुढचा प्रश्नं.
एकूणात, भूमिपुत्र असोत, परप्रांतीय असोत, बरेच छोटे मासे, त्याना गिळणारे मोठे मासे.उद्या विकासक जरी आला तर तो सगळ्यात मोठा मासा.
सेक्रेटरी म्हणतो उद्यापासून मी काम बघणार नाही.दुसरा कुणीही पुढे येत नाही.
देशाचं आणि देशाच्या एका कोपर्‍यातल्या सहनिवासाचं चित्र सारखंच असल्यासारखं.
हे चित्र प्रातिनिधिक आहे का? तुम्हीच ठरवा!

Saturday, April 9, 2011

स्टार माझा, ब्लॉग माझा-३ स्पर्धा_’अभिलेख’ ध्वनिचित्रमुद्रण!

’स्टार माझा’ वाहिनीच्या ’ब्लॉग माझा-३’ या स्पर्धेत आम्हा काही ब्लॉगर्सना यश मिळालं.
गेल्या २७ मार्चला स्टार माझावर झालेल्या प्रशस्तीपत्रक वितरण समारंभाचं ध्वनिचित्रमुद्रण आमचे ब्लॉगर मित्र श्री गंगाधर मुटे यांनी केलं.त्यांचे पुन्हा एकदा आभार!
या ध्वनिचित्रमुद्रणातला माझा भाग आपल्यासाठी!

संपूर्ण ध्वनिचित्रमुद्रणासाठी ब्लॉग माझा-३ ला टिचकी द्या!

Wednesday, April 6, 2011

आमचाही वर्ल्डकप!

गौरी ही माझी मावस-चुलत-मामे-आते भाची (?).
तिला माझ्याकडून हवं होतं एक स्कीट.ताज्या विषयावरचं.
ते असेल तर विनोदी हवं.गंभीर अजिबात नको!
एवढंच नाही तर ते पुरूषपात्रविरहित पाहिजे.फक्त महिला आणि महिलाच पाहिजेत त्यात!
गौरीच्या आग्रहाला पडून माझा ’मामा’ झालाय नेहेमीप्रमाणे.
गौरी ते सादर करेल तेव्हा करेल.सध्या तुम्हाला ते वाचायला काय हरकत आहे?
हो! आणि करावसं वाटलं तर मात्र पूर्वपरवानगीची अट आहे! सो लेट अस एन्जॉय!

Tuesday, April 5, 2011

आवाजचाचणी…

वेळ मिळेल तेव्हा ’माझं काय चुकलं?’ नाटकातला, मी आवाजचाचणीसाठी निवडलेला संवाद हातात घेऊन म्हणून बघत होतो.तो पाठ म्हणायचा नव्हता पण सतत सराव केल्याने त्या संवादातला अर्क जेवढा जमेल तेवढा जाणिवेत आणि मग नेणिवेत मुरावा असा प्रयत्न होता.केवळ आवाजातून नाटकातल्या पात्राच्या भावना पोचवणं सोपं नाही.नवोदिताला तर नाहीच नाही पण नेहेमीप्रमाणे प्रयत्नाअंती जे पाहिजे ते शक्य होतं ही खूणगाठ मनाशी बांधून होतो.हातातला संवाद नाटकातल्या नायकाचा आणि त्याच्या बायकोचा.यात नायक आपण आत्महत्या करणार, ती अशी अशी करणार असं तिच्याजवळ जाहीर करतो.
आकाशवाणीवरच्या नाट्यविभागाच्या आवाजचाचणीचा दिवस उजाडला.मी जवळ जवळ टेन्शनमूर्ती होऊन आकाशवाणी केंद्रावर पोहोचलो.नाट्यविभागात गेलो.त्यावेळी नाट्यविभागप्रमुख होते श्री चंद्रकांत बर्वे.नवोदिताला बोलता बोलता सहज रिलॅक्स करणारे.त्यांनी मला ध्वनिमुद्रण कक्षात नेलं.तिथं पोचता पोचता माझ्या कानावर एक अतिपरिचित पण तितकाच दैवी स्वर कानावर पडला.मी त्या दिशेने बघितलं आणि जागच्या जागेवरच उभा राहिलो.त्या श्रीमती करूणा देव होत्या.पळून जावसं वाटलं.या बाई माझी आवाजचाचणी चालू असताना इथे असणार? त्यापेक्षा… पण आतून तयार झालेल्या निश्चयाने तसं करू दिलं नाही.
माझ्याबरोबर आवाजचाचणीसाठी इतर अनेक उमेदवार होतेच.आत काय चाललंय हे केवळ उमेदवार कक्षाचं दार उघडून आत जाण्या किंवा बाहेर येण्याच्या अवधीतच दिसत, समजत, कानी पडत होतं.त्यात ’तो’ दैवी स्वर प्रत्येकवेळी साथ करत होताच.एकाबाजूने सुखावणारा आणि दुसर्‍या बाजूने तो आपल्या चाचणीच्या वेळी तिथेच असणार या वास्तवाने अंगावर काटे आणणारा.
आवाजचाचणीची माझी पाळी आली.मी आत गेलो.चंद्रकांत बर्वेंनी स्वागत केलं.माझी आणि करूणा देव या दैवी आवाजाची ओळख करून दिली.इथपर्यंत मी लटपटत होतो आणि बर्वेसरांच्या पुढच्या वाक्याने कोसळायचाच बाकी राहिलो. “तुमच्या बरोबरचं स्त्री पात्राचं भाषण देव बाई वाचणार आहेत” बर्वेसरांनी त्यांच्या समंजस आवाजात अगदी सौम्यपणे सांगितलं.इथे माझी पाचावर धारण बसायला सुरवात झाली.
त्याआधी लहानपणापासून त्यावेळी निलम प्रभू आणि आता करूणा देव म्हणून या आवाजाला जीवाचा कान करून ऐकलं होतं.लहानपणी दूरदर्शनचा संचार झालेला नव्हताच.रात्री दिवे विझवून बिछान्यावर पडलं की आई आकाशवाणीवरच्या श्रुतिका लावायची.तिला आणि त्यावेळी सगळ्याच प्रौढांना ते वेडच होतं.त्यात राष्ट्रीय नभोनाट्याचे कार्यक्रम लागत.वेगवेगळ्या केंद्रांवरची नभोनाट्यांची रूपांतरं सादर केली जात.ती तासभर अवधीची असत.
अशा कित्येक नाटकात नायिका म्हणून निलम प्रभू आणि नायक म्हणून श्री बाळ कुरतडकर यांना ऐकणं म्हणजे पर्वणी होती.त्यावेळचे ते स्टार्स होते.
असा एक तारा आता माझ्याबरोबर संवाद वाचणार होता.करूण देव बाईंनी माझ्याकडचं संवादाचं पान घेतलं.चाळलं, म्हणाल्या, “आहो हे काय? यात माझंच भाषण जास्त आहे की!” त्यांचा अप्रतिम आवाज आता मला धडकी भरवायला लागला.मी कसंबसं “नाही-तसं नाही-पुढे” असं सांगायचा प्रयत्न करत होतो.तोंडातून आवाज फुटत नव्हता.इतक्यात दैवी आवाजच शांत, समंजस स्वरात म्हणाला, “नाही हो! आहे की तुमचं पुढे! चला! करूया सुरवात? तालीम करायची की टेक करायचं?” माझी अवस्था पारव्यासारखी झालेली.तोंडातून फक्त हां, हूं, हं शिवाय काही बाहेर पडतंच नव्हतं.आता तालीम काय किंवा प्रत्यक्ष आवाजचाचणी काय, काय ते एकदा होऊन जाऊदे! असा पवित्रा मनाने घेतला.
देव बाईंनी आणि मी तालीम केली.तालीम मीच केली त्या टेक द्यावा त्यापेक्षाही अप्रतिम वाचत होत्या.मला सराव करून जमत नव्हतं ते त्यांनी नुसता संवाद एकदा चाळून सहज जमवलं होतं.
तालीम आणि आवाजचाचणीसाठीचं ध्वनिमुद्रण अर्थात टेक होत असताना असा एखादा क्षण आला की त्यावेळी असं वाटलं हा संवाद संपूच नये!
दोन-तीन टेक झाले आणि चाचणी संपली. “तुम्ही चांगलं वाचलंत हो!” बाई गंभीरपणे म्हणाल्या.माझ्या अंगावरचे काटे गळून मुठभर मांस चढायला लगेच सुरवात झाली.
बर्वेसरांचे आणि देवबाईंचे आभार मानून मी बाहेर पडलो ते तरंगतच.आता आवाजचाचणीचं काय व्हायचं ते होऊदे! आजचा दिस गोड झाला… ही एकच भावना कब्जा करून होती!
असं त्या त्या दिवसापुरतं जगलो तर काय बहार येईल नाही? असं अनेक वेळा वाटतं.
आवाजचाचणी उत्तीर्ण झाल्याचं आकाशवाणीचं पत्र आलं आणि मणिकांचन, दुग्धशर्करा इत्यादी माझ्यासमोर ठाण मांडूनच बसले.
या अनुदिनीचे आभार यासाठी की हा अनुभव पुन्हा जगता आला.कोळी बनून अनेक कोळीष्टकांमधे गुंतलेलं असताना हा पुन:प्रत्ययाचा आनंदसुद्धा मोलाचा वाटतो.