romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, November 30, 2010

कॉमेडी शो “लोकांच्या सेवेसाठी…”

रविवार सकाळ.सकाळचे दहा वाजलेले.मी कधीही न मिळणारय़ा साखरझोपेत.जोरजोरात वाजणारा रिक्षाचा हॉर्न.तो कानठळ्या बसवणारा असूनही अजून मी उठत नाही म्हणून चवताळलेली बायको.असे सगळे पापग्रह राशीला एकत्र आल्यानंतर मला अंथरूण सोडावच लागलं.
खिडकीबाहेर पहातो तर नवी करकरीत रिक्षा.बाजूला उभा स्वच्छ पांढरय़ा कपड्यातला तिचा मालक कम चालक.नेव्हीमधल्या पायलट, कमांडरसारखी त्याची कॅप.दोन्ही हातांचा कर्णा करून माझ्या खिडकीच्या दिशेने त्याच्या माझ्या नावाने हाका.डोळे चोळत ते आऊट ऑफ फोकस, अंधुक दिसणारं दृष्य दिसावं म्हणून मला माझी झोप उडवावीच लागली शेवटी.
मी पुन्हा नीट पहातोय खिडकीतून तर आता कमांडर गायब.मी मनाशी म्हणतोय- अरे, हे काय दिवास्वप्न?- तर दारावर बेल.दार उघडतो तर समोर ’कमांडर’! मी (नेहेमीच्या) भांबावलेल्या चेहेरय़ाने काही विचारणार इतक्यात त्याने कॅप काढली आणि मी उडालोच! मनू!! मी आश्चर्यानं विचारलं, “हे रे काय?” जिवणी फाकवत, फवारा उडवणारं हास्य करून तो म्हणाला, “लोकांच्या सेवेसाठी!” मी म्हणालो, “सोडलीस नोकरी?” मला टप्पल मारून तो म्हणाला, “अरे नोकरी करून लोकं काय काय करतात! शिकतात.खरवस विकतात.शेअर्सची उलाढाल (!) करतात.एजन्सी चालवतात.राजकीय पक्षांचे संघटक होतात.मी रिक्षा घेतली.परप्रांतीयांना ठसन द्यायची आणखी एक संधी! चल!” असं म्हणून तो मला ओढायलाच लागला.मी माझी सुटणारी लुंगी सावरतोय.भोकाभोकांचा बनियन लपवायची धडपड करतोय हे लक्षात यायला त्याला वेळ लागला.माझ्या पार्श्वभागावर चापट मारून त्यानं मला मग आत ढकललं.मी कसाबसा शर्ट चढवला.पॅंट कमरेवर सरकवली नाही तोपर्यंत बायकोने डाव्या हातात पिशव्या आणि उजव्या हातात पैसे कोंबले.एकबाजूने मनू ओढतोच आहे.नेहेमीसारखा, कुठेलेही पर्याय नसलेला मी मनूच्या रिक्षेसमोर उभा ठाकलो.तिला घातलेला हार, लावलेले गोंडे न्याहाळतोय तोपर्यंत मनूनं मला सीटवर ढकललंच.रिक्षाच्या आत लावलेले गोंडे, झिरमिळ्या माझ्या नाकातोंडात जाऊन मी सटासटा शिंकतोय न शिंकतोय तोपर्यंत ढॅण ढॅणऽऽ ढॅण असा राक्षसी संगीताचा तुकडा माझ्या उजव्या कानात गिरमिटासारखा फिरतोय.बॅलन्स (माझा) डावीकडे केला तर डाव्या कानात गिरमिट.माझा चेहेरा आधीच केविलवाणा.आता सिनेमातल्या ए के हंगलपेक्षा बापुडवाणं होऊन मी समोर पाहिलं तर समोरच्या, मागचं ट्रॅफिक दिसावं म्हणून लावलेल्या आरशात दिसतोय मीच पण माझे ओठ लालचुटुक! डोळे फाड-फाडून पहातोय तर आरशावर नुसतेच ओठ.अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखा मी मनूच्या रिक्षाचं ते अंतरंग बघायला लागलो.बघायला काय लागलो? ते सगळं माझ्या डोक्यात, डोळ्यात आणि कुठे कुठे आपोआपच घुसत होतं म्हणा! आता संगीत आणखी वाढलं.त्यापेक्षाही वाढला त्या कुठल्याशा एफेम वरच्या, त्या आरज्ये की डीज्येचा भेसूर हिंदी कम इंग्लिश कम कुठल्याशा भाषेतला तारस्वर.मी डोळे मिटले तरी ते किलेकिलेच रहात होते.दोन्ही कानांवर गच्च हात ठेवले.मला तसं बघून मनू नेहेमीसारखा विजयोन्मादानं हसला आणि त्यानं माझं लक्षं वेधून घेतलं. “कशी आहे?” माझ्या कानाजवळ आपलं थोबाड आणून तो ओरडला.एका कानावरचा हात सोडून मी दोन बोटं जुळवली आणि ’छाऽऽन!” अशी खूण केली.मनूनं उजव्या हाताच्या तर्जनीचा- पहिल्या बोटाचा- आकडा केला.तो दोन डोळ्यांच्यामधे लावला.मग तोच आकडा ओठाजवळ नेऊन त्याचे मुके घेतले आणि वाकला.स्टार्टर हाताने वर ओढल्याबरोबर मला कानावरचे दोन्ही हात सोडून मिळेल तो आधार पकडावाच लागला नाहीतर मी रिक्षाबाहेर फेकलाच गेलो असतो.मनूची रिक्षा नुसती सुरूच झाली नव्हती तर ती हवेत जणू उडायलाच लागली.मी पिशव्या आणि पैसे गच्च मांडीत धरून बसलो.लहानपणी जत्रेत गोल गोल फिरून चक्कर आणणारय़ा घोड्यावर कसंबसं गच्च बसत होतो, जीव मुठीत धरून.त्याची आठवण येऊन मजा येत होती.हे मेरी गो राऊंड आत्ता तरी फुकट होतं.
माणसं, रस्ता, दुकानं, इतर वहानं भिरीभिरी मागे पडत होती.सोबतीला झिनच्याक एफेम.सगळंच झिंग आणणारं होतं.मला हे अभूतपूर्व स्वप्नं दाखवणारा जादूगार माझ्या पुढेच बसला होता.आरशातून माझ्याकडे आणि बाहेरच्या त्या जुलमी दुनियेकडे हसत हसत पहात पुढे पुढे जात होता.
रिक्षा पुढे येईल ते भेदत जात होती.वळणावरच्या आजीआजोबांना तिचा अंदाजच आला नाही.ते भेलकांडले.आता काय होतंय म्हणून मी वाकून पहातोय तो रिक्षा पुन्हा वळली आणि त्या आजीआजोबांचं काय झालंय हे पहाण्यापेक्षा स्वत:ला सावरण्याच्या कामात मी गुंतलो.मनूच्या चेहेरय़ावर विजयी हास्य कायम होतं.आता रिक्षा करकचून थांबली.काहीही प्रयत्न न करता मी रस्त्यावर आलो.मनूनं माझी गचांडीच पकडली, म्हणाला, “कॅय? कशी वाटली सफर?” मी पुन्हा दोन्ही बोटं घट्टं जुळवून छाऽऽन! अशी खूण केली.
एखादा डिस्कोबार असावा रिक्षांचा तसा तो रिक्षास्टॅंड होता.एका खांबावर भला मोठा युनियनचा बोर्ड.रंगीत.रिक्षांच्या तीन चार रांगा.तरी माणसं उभीच.स्टॅंडवर रिक्षा आली रे आली की तिच्याभोवती घोळका जमायचा.लहान मुलंबाळं कडेवर असलेले घामाघूम बायका-पुरूष, म्हातारे कोतारे, आजारी, अपंगांना घेऊन येणारे गरजू.सगळ्यांचे चेहेरे भिकारय़ांपेक्षा लाचार.मला कळेना पैसे द्यायची तयारी असूनही ह्यांचे चेहेरे हे असे का?
एक आजी मनूकडे आल्या.मिनिमम भाडं.मनू म्हणाला, “एरिया माहित नाही!” आजी म्हणाल्या, “कशाला चालवतोस?” मनूनं शांतपणे पुढच्या रिक्षाकडे हात केला.आजी धावल्या.
कडेवर बाळ, हातात बॅग असलेली बाई पुढे झाली.रस्त्याचं काम चालू.मनू म्हणाला, “रिक्षा उधरकी नही!” बाई म्हणाली, “फिर क्या लंडन जाओगे?” मनू हसला.म्हणाला, “हो!”
एवढ्यात एक पायानं अधू माणूस कसाबसा पुढे झाला.त्याच्या हातात पुस्तकांचा भलामोठा गठ्ठा.मनूनं मान हलवली- नाही! लंगडा म्हणाला, “का?” मनू म्हणाला, “वजन आहे!” लंगडा म्हणाला, “मग काय हत्तीवरून नेऊ?” मनू हसला.म्हणाला, “तुझी मर्जी!”
आता घोळका वाढला.मनू शांतपणे मान हलवत राहिला.
घोळक्यातून एक रागावलेला तरूण सरसावला.त्याची बहीण आजारी.तरूण मनूच्या अंगावर आला.मनूनं त्याला एक लावली.तरूण उताणा पडला.वर पहातो तो युनियनचा बोर्ड!
शेवटी एअरपोर्टचं भाडं मिळालं.मनूनं मला पुढे त्याच्याजवळ बसवलं.मी स्वप्न भासणारय़ा जत्रेत नव्यानं शिरणार होतो आणि मनूची रिक्षा लोकांच्या सेवेसाठी धावणार होती.

Tuesday, November 23, 2010

स्टार माझा ची ब्लॉग माझा-३ स्पर्धा!

स्टार माझा च्या ब्लॉग माझा-३ या स्पर्धेत भाग घेतलेल्या तसंच यश मिळवलेल्या सगळ्याच विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन!
’अभिलेख’लाही या स्पर्धेत यश मिळालंय!माझा हा ब्लॉग २००७ मधे मी सुरू केला तेव्हा मला ब्लॉग चे बी च काय पण ऑर्कुटचे ऑ, जीमेलचे जी ही माहित नव्हते.याहूवरचा माझा ईमेल आयडी बनवण्यासाठीही मला बरेच प्रयत्न करावे लागले.हे सगळं आत्ता वाचताना नक्कीच हास्यास्पद वाटेल!परिचयातलं कुणीही तसं या माध्यमाची ओळख असलेलं नव्हतं.धडपडा आणि शिका हा मंत्र आयुष्यात पहिल्यापासून मार्गदर्शक ठरलाय!ब्लॉगरवर जातानाही उलटीकडून सगळं शोधत आज जे काही इथे मांडलंय ते दिसतं आहे.तांत्रिक ज्ञान काय होतं किंवा आहे ते जाणकार ओळखतीलच.नाटक, साहित्य यांच्याशी असलेला संबंध इथेही प्रतिबिंबित होणार हे उघड आहे.तरीही यश मिळालंय याचा खूप मोठा आनंद आहे!!!
मात्र अनेक अनोळखी जे केवळ या माध्यमामुळे मित्र झाले त्या सगळ्यांनी दिलेलं प्रोत्साहन ’अभिलेख’ला इथपर्यंतची मजल मारायला कारणीभूत ठरलेलं आहे.या सगळ्या मित्रांचे अगदी अगदी आतून आभार!
मन:पूर्वक आभार स्टार माझाचे प्रसन्न जोशी यांचे आणि परिक्षक श्रीमती लीना मेहेंदळे,श्री विनोद शिरसाठ आणि श्री माधव शिरवळकर यांचे!
आपण सगळ्या मित्रांनी, तज्ज्ञांनी आणि स्टार माझाने खूप बळ दिलंय पुढची वाटचाल जोमदारपणे करण्यासाठी.मी कृतज्ञ आहे!!!
संपूर्ण निकाल पहा: http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669 या दुव्यावर!

दूरदर्शनची ओळख!

एक मध्यमवयीन ख्रिश्चन जोडपं.मूलबाळ नसलेलं.नवरा कामगार.जवळच्या जंगलात शिकारीला जाणारा.त्यात रमणारा.मूल नाही म्हणून घरातली स्त्री व्याकुळ झालेली.आणि त्याचवेळी एक गोंडस पोर जोडप्याला सापडतं.ते त्यांच्या घरात राहू लागतं.घरातली स्त्री त्याला आपलं मूलंच मानू लागते आणि अनाथाश्रमाचे ट्रस्टी येऊन तो मुलगा परदेशी दत्तक जाणार हे नक्की झाल्याचं जाहीर करतात.मुलावरून जोडप्याचे आपापसात निकराचे वाद होतात.स्त्री कोलमडून पडण्याच्या अवस्थेत आहे.मुलाला आपलं घर म्हणून हेच आणि आई म्हणून हीच हवी आहे पण… अनाथ मुलानं कुठे स्थिरावायचं हे त्या मुलाच्या मर्जीवर अवलंबून आहे की समाजातल्या तथाकथित व्यवस्थेच्या मर्जीवर?...
एकाच बीजावर अनेक ग्रुप्सनी एकांकिका रचायच्या आणि सादर करायच्या अश्या स्वरूपाची ती स्पर्धा.उपनगरातले सर्वसाधारणपणे तीन ग्रुप्स आणि इतर भागातला एखादा अश्या ग्रुप्सची शहरातल्या सगळ्याच एकांकिका स्पर्धांवर मोनोपोली असण्याचे ते दिवस.एकापेक्षा एक तगडे विषय.आज सेलिब्रिटी म्हणून सिद्ध झालेले अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ यांनी गाजवलेली ती स्पर्धा.
माझ्या आठवणीप्रमाणे आमच्या या एकांकिकेला बक्षिसं मिळाली पण आम्ही ’चोपलं’ वगैरे नाही.आमच्या दिग्दर्शकानं केलेल्या कुठल्याही एकांकिकेची दखल मात्र नेहेमीच घेतली जायची तशी ती घेतली गेली.मी त्या अधिक वरच्या वर्तुळात बुजलो होतो.माझ्या वाटणीच्या त्या दोन प्रसंगात मी काय बोललो, केलं ते मला ठार आठवलं नाही, आठवत नाही.केस आणि मिश्यांवर हेऽ पावडरचा मारा केल्यामुळे दिसत पण विचित्र असलो पाहिजे.
स्पर्धा पार पडली.आमची आमच्यातच हवं तसं यश न मिळाल्याची रूखरूख, ठूसठूस पार पडली.आणखी काही चांगलं करण्यासाठी ती निश्चितच आवश्यक असते.मी उत्तम श्रोता म्हणून वावरत होतो.ती एक भूमिका मला बरी जमते असं माझं मत आहे.
आम्हाला दूरदर्शन केंद्रावरून ती एकांकिका दूरदर्शनवर सादर करण्याचं आमंत्रण आलं!
हे आमंत्रण संस्थेला पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणार होतं.प्रमुख कलाकारांनाही चांगली ओळख त्यामुळे मिळणार होती.हा पैसा, प्रसिद्धी आजच्यासारखी नव्हती हे उघड आहे.पै पै जमवून ’activity’ करण्यारय़ा संस्थेला जे मिळेल ते खूप होतं.
एक प्रतिथयश निर्माता, दिग्दर्शक, नट त्यावेळी दूरदर्शनवर नाटकाचं खातं सांभाळत होता.आमची सगळी टीम त्याला भेटायला केंद्रावर पोचली.आमच्या एकांकिकेवर तो खूष असल्याचं दिसलं.दूरदर्शनवर सादर करण्यासारखा विषय होता म्हणून त्यानं बोलावलं असावं.तो पैसे नीट देईल का? आपण बसवलेल्या एकांकिकेत किती फेरफार होतील? हे सगळे प्रश्न निकालात निघत गेले.केंद्रावर एका हॉलसदृश्य खोलीत टीव्ही कॅमेरय़ाच्या अनुषंगाने रिहर्सल्स झाल्या.मोजकेच बदल दूरदर्शनवरच्या दिग्दर्शकाने केले.त्यावेळचं केंद्र मला वेगळंच काही आणि दिपवणारं वगैरे वाटलं तरी ते त्या अर्थानं मध्यमवर्गीयच म्हटलं पाहिजे.चकचकीतपणा फारसा कुठेच नव्हता आणि कार्यक्रमांचा दर्जा मात्र वाखाणण्यासारखा होता.लोकाभिमुख माध्यम असलं तरी ते लोकानुयायी झालेलं नव्हतं.कार्यक्रम ठरवणारे, ते कार्यक्रम तडीला नेणारे आणि त्या कार्यक्रमात सहभागी असणारे सगळेच या ना त्या नात्याने रंगभूमीशी संबंधित होते.काही तर चांगलेच जाणकार होते.दूरदर्शनचा रंग अजून पांढरा-काळाच होता पण आशय भिडणारा होता.
या माध्यमात माझी अवस्था जत्रेत हरवलेल्या पोराप्रमाणे होती.रिहर्सलला कॅमेरा या इथे असणार म्हणून दूरदर्शनवरचा दिग्दर्शक दोन्ही हात एकमेकांत गुंफून किंवा दोन्ही हातानी नागाचा फणा तयार करून दाखवायचा.कॅमेरा तिथे असला तरी त्या पोझिशनला अजिबात बघायचं नाही.रंगमंचावर काम करताना प्रेक्षकात बघायचं पण बघायचं नाही तसं काहीसं हे होतं.प्रेक्षाकांच्या डोक्यावरची एक रेषा आपल्या नजरेने पकडायची आणि ती न सोडता आपली भूमिका मांडायची.कॅमेरा माध्यमात कॅमेरय़ाच्या नक्की कुठे नजर ठेवायची हे कॅमेरा हाताळणारा दाखवायचा.एखादी गोष्टं करायची नाही असं सांगितलं की लहान मुलाचं जसं होतं तसं माझं व्हायचं.
रंगमंचावर काम करत असताना तुम्ही ती प्रेक्षकांच्या डोक्यावरची अदृष्य रेषा पकडण्यात हयगय केली तर जो काही त्रास होईल तो तुमच्या एकट्यापुरता मर्यादित असतो.कॅमेरा माध्यमात मात्र नंतर तो कार्यक्रम प्रसारित होताना असं कॅमेरय़ात बघितलेलं चटकन लक्षात येतं.मी दिलेल्या आज्ञा पाळायच्या असं ठरवलं आणि मग कॅमेरा चालू आहे याचं फारसं टेन्शन न घेता काम करायचं असं ठरवलं.अज्ञानी असताना आपण आपल्या नकळत सफाईदार होत असतो बहुतेक.आणखी एक गोष्टं माझ्या पथ्यावर पडली.रंगमंचावर माझा आवाज खरं तर बरय़ाचवेळा टेन्शनमुळे पाहिजे तेवढा स्पष्टं यायचा नाही.भूमिका म्हातारय़ाची असल्यामुळे आणि मी नवीन असल्यामुळे घोटवून घेतलेल्या बोलण्यावर आणि हातवारय़ांवर सगळी भिस्त होती.
दूरदर्शन माध्यमात हातवारय़ांची फारशी गरज असत नाही.चेहेरय़ावर मोजकेच भाव असावे लागतात.आवाज जास्तीत जास्त नेहेमीसारखा असावा लागतो.रंगमंचासारखी आवाजाची लांबवर फेक वगैरेची आवश्यकता नसते.माझ्या अज्ञानामुळे, नवखेपणामुळे आणि अर्थात अगदीच छोटी भूमिका असल्यामुळे माझं निभावलं.
टीव्हीवरचं चित्रण यशस्वीपणे पार पडलं.एकांकिकेतल्या, अर्थातच आता दूरदर्शनवरच्या या नाटकातल्या, लहान मुलाचे प्रसंग, त्याचा क्लोजअप, त्याचे डोळे अप्रतिम दिसले.चित्रण चालू असताना चित्रण आणि नंतर त्या प्रसंगाचं चित्रमुद्रण मॉनिटरवर पुन्हा बघता येणं आणि वाटल्यास पुन्हा चित्रीकरण करता येणं हा या माध्यमाचा विशेष.अर्थात हे सगळं बजेट सांभाळून.
पुन्हा एकदा माझा आनंद गगनात मावेना.एवढ्या कमी अवधीत कुठपर्यंत पोचलो वगैरे डोक्यात यायला मग वेळ लागत नाही.दूरदर्शन हे त्यावेळी सामान्य माणसाच्या दृष्टीनं खूपच लांबचं माध्यम होतं.
दूरदर्शनवर नाटक जाहीर झालं.पोटात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या.ऑफिस नंतरचा बराचसा वेळ बाहेरच जात होता.वसाहतीतल्या घरी परतायला मध्यरात्र व्हायची.पूर्वीचं कुणी भेटायचं बंद झालं होतं.नाटक दूरदर्शनवर जाहीर होण्याच्या काळात कुणी भेटलं तर त्यांचे चेहेरे बघण्यासारखे असायचे.त्याना माझा चेहेरा बघण्यासारखा वाटत असेल.काही जण मनात काय येतं ते समोरच्याला सुनवायचंच! अश्या स्वभावाचे असतात.इतरांपेक्षा तुम्ही पुढे-बिढे जाताय असं त्याना वाटायला लागलं की त्यांचे प्रतिसाद जाणवायला लागतात.आम्ही कसे इतके वर्षं घासतोय वगैरे त्यांना सांगावसं वाटतं.ते बोलूनही दाखवतात.माणसामाणसातलं नातं ओव्हरऑल कितीही चांगलं राहिलं तरी छोट्यामोठ्या गोष्टीतून एक तणावाची रेषा त्या नात्यातून सतत वहात असते.माणसाचा अपरिहार्य इगो हे या रेषेचं कारण असतं.ते वावगंही नसतं.कुणी स्थानिक बुजुर्ग मला मी सध्या काम करत असलेल्या दिग्दर्शकाच्या नावाचं विडबंन करून माझ्या पाठीमागे मला जोरजोरात हाका मारू लागला तेव्हा ती मस्करी की नक्की काय हे समजेना.टीव्हीवर येण्याचा प्रसंग माणसाच्या आयुष्यात काय एकदाच येतो, सारखासारखा मुळीच येत नाही! असा ठाम अध्यात्मिक विचारही एका नोकरदार वडिलधारय़ानं दिला.
पुढची मजा अशी की आमचं नाटक दूरदर्शनवर दोनदा जाहीर झालं आणि दोनदा ते रद्दं झालं! ते आता होतंय की नाही अशी धाकधूक मला लागली आणि आता काय होणार! (म्हणजे आता काही ते होणार नाही!) असा काहीसा भाव समोरच्या चेहेरय़ांवर दिसायला लागला…

Monday, November 15, 2010

कॉमेडी शो “सेवक”

ढाम ढाम तिडकिट तिडकिट… डोक्यात घण बसायला लागले आणि मी उठलो.घड्याळात बघतो तर अडीच.हे कधीचे अडीच? अरे ही तर रात्र! भर मध्यरात्र! गणेशोत्सव गेला, नवरात्र सरली, दिवाळी आली कधी गेली कधी? मग आता एवढ्या रात्री हा नाशिकबाजा कुणाचा? खिडकी बंद करून घेतली.नोव्हेंबर अर्धा सरत आला तरी ती बंद करायला लागत नव्हती.थंडी आता पुढच्याच वर्षी पडणार बहुतेक! तर खिडकी बंद केली.पंखा फूल्लं आहे ना? चार-चारवेळा बघितलं! ढाम ढामच्या कानठळ्या तसाच! या आवाजांची सवय कशी होत नाही आपल्याला? आणि हे डेसिबलचं क्रुसिबल मिरवणारे सगळं होऊन गेल्यावर कसे जागे होतात? तात्विक प्रश्न उभे राहिले.असले प्रश्न उभे करून काही उपयोग असतो का? माझं झोपेतंच असलेलं सुप्त मन मलाच छळायला लागलं.शेवटी खिडकी उघडून शिव्यांची लाखोली वहात (स्व त: ला च!) बाहेर डोकावलो.
मनूच्या सोसायटीतून आवाज येत होता.चार-पाच इमारतींच्या त्या सोसायटीत असंख्य हॅलोजनांच्या प्रकाशात गुलाल उधळून पोरं मनसोक्तं नाचत होती.त्यांच्या तारूण्यातल्या कैफाचा हेवा करावा तेवढा थोडाच.तेच माझ्या हातात होतं.माझा कैफ, वास्तवाचे चटके बसून बसून (ते कुठे बसले हे वेगळं सांगायला पाहिजे का?) कुठल्या कुठे नाहीसा झाला होता.छातीतल्या कफाने उचल खाल्ली.सळसळत्या तारूण्याचा तो अविष्कार डोळे फाड-फाडून बघत, कान खाजवत मी तसाच उभा राहिलो.दिग्मूढ की काय म्हणतात त्या अवस्थेत.पण आता माझ्याच काना-डोक्यातून ढाम ढाम आवाज यायला लागले.खिडकी बंद करून अंथरूणावर येऊन झोपलो तर चादरीतून, गादीतून ढाम ढाम.बाजूला सहचारिणी.तिला ढाम काय किंवा तडाम काय सगळं सारखंच.तिचं घोरणंही आता ढाम- आपलं हे- चांगलंच ठाम स्वरात चालू राहिलं.आता उजाडल्यावर मनूची खबरबात घेणं भाग होतं.
सकाळी उठून मनूच्या सोसायटीचं गेट पार करतो न करतो तोच मागून गलका ऐकू आला- साहेब आले! साहेब आले! मागे बघतो तर हीऽऽ गर्दी!
गर्दीतल्या एकानं कंपाऊंडवर ढकललंच मला आणि सिनेमातल्यासारखी एक अलिशान गाडी सोसायटीच्या आवारात उभी राहिली.एखाद्या महाकाय पक्षाचे पंख हवेत उघडावेत तशी तिची दारं वर उचलली गेली.पांढराशुभ्र हाफशर्ट, पांढरी फूलपॅंट, पांढरय़ा चपला घातलेले मनूसाहेब एका दरवाज्यातून बाहेर आले.कपाळावर भलामोठा उभा कुंकवाचा पट्टा आणि हाताला जाडजूड लाल धागे बांधून नुकतेच देवदर्शन (देव कुठला हे ज्याचं त्यानं ओळखायचं) करून आलेले.दुसरय़ा दरवाज्यातून उतरले काळ्या कपड्यातले दोघे.एके ४७ की ५१ की ५७ की काय ते घेऊन.साहेबांचा जयजयकार संपला आणि काय आश्चर्य! साहेब माझ्याकडेच झेपावले.मला मिठी मारली.कोण म्हणतं साहेब झाल्यावर साहेब जनतेला विसरतात? सुदाम्यासारखं माझ्या डोळ्यात पाणी तरारलं.माझ्या विरलेल्या पॅंटीच्या खिश्यात पोहे सापडताएत का ते मी चाचपू लागलो.
साहेब जिवणी फाकवून हसत विचारत होते, “कॅऽऽय…कसं काय? हे नेहेमीसारखं वेषांतर नाहीए हं! निवाससेवक झालोय मी निवाससेवक!”
अधिक भाबडा(?) होऊन माझ्यातल्या सुदामानं विचारलं, “म्ह-म्हणजे?”
साहेब म्हणाले, “वागाच्ये पंजे… अरय़े यड्या, आमच्या सोसाय्टीनं मला येकमुखानं निवडलंय निवाससेवक म्हणून! आता मी उद्धार करणार!”
मला उद्धार करणं म्हणजे लाखोली वहाणं हेच माहित.मी आ वासला नेहेमीप्रमाणे.
साहेब म्हणाले, “तोंड मिट.आता सगळ्या सोसाय्टीचं कल्याण!” असं म्हणून त्यांनी गाडीकडे बघितलं.म्हणाले, “कशी आहे?” मी सोसायटीकडे बघत होतो.इमारतींचा रंग उडालेला.भिंतींना भेगा.वरच्या मजल्यावर रहाणारे पावसात भिजत नसतील, स्लॅबमधून पाऊसच आत येत असेल.साहेबांनी माझं तोंड खासकन वळवलं, ओरडले, “अरे इकडे बघ! मुद्दाम सफेत गाडी घेतली, नाय तर लोक म्हणायचे काळ्या पैशाची म्हणून!” “तू-तुम्ही घेतली? माझा अडाणी प्रश्न… माझ्या डोक्यावर टप्पल मारून साहेब म्हणाले, “सामान्यच रहा तू नेहेमी.सोसायटीवाल्यांना घ्यायला लावली.नाय तर म्हणालो, कुटलीच कामं होणार नाहीत!”
मनूसाहेबांच्या भाषेत आता बरय़ापैकी रांगडेपणाही आला होता.साहेबांनी माझ्या खांद्यावरून हात घालून मला पुढे ओढलं. “चल!” म्हणाले.मधेच थांबून जयजयकार करणारय़ांना हात दाखवला.भाडोत्री मोर्चेवाल्यांसारखे हात दाखवणारेही थांबले. साहेबांचं चालू झालं, “साल्यांना एकत्र यायला नको कधी.कामं कोणी करायची यावरून नेहेमी हमरातुमरी.सोयी सगळ्या पाहिजेत.संडासची टाकी वहायला नको.पाणी वर चढवायचा पंप बिघडायला नको.चोरय़ा व्हायला नकोत.भिंतीतून, छपराच्या स्लॅबमधून गळती नको.इमारतींच्या आवारात कचरा नको.अरे म हवंय काय?” गुटख्याची पुडी करकचून फाडून तोंडात रिकामी करायला म्हणून साहेब थांबले आणि मी डाव साधला- “पण सहजासहजी घेऊन दिली त्यांनी गाडी?” साहेबांनी तोंड वर केलं. “सॅहॅजॉसॅहॉजी…” तोंडातला गुटखा जिभेने एका बाजूला करून ते पुढे म्हणाले, “त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स आणखी कठीण करून ठेवणं भाग पडलं!” मी विचारलं, “म्हणज्ये?” बावळट ध्यानाकडे बघावं तसं माझ्याकडे बघत साहेब म्हणाले, “ड्रेनेजचं काम चालू केलं, अर्धवट ठेवलं.पंप नुसता खोलूनच ठेवला.भिंतींना पराती बांधून भर दुपारी ठोकाठोक चालूच ठेवली.पण लोकांची सहनशक्ती चिकार!” असं म्हणून त्यांनी गुटख्याची पिचकारी मारली.पायरीवरच.पुढे बोलायला लागले, “मी त्यांच्यापेक्षा चिवट.शेवटी खोललेल्या ड्रेनेजच्या झाकणात एक म्हातारा पडला आणि एका बाईच्या पाठीत भिंतीवर भर दुपारी ठोकाठोक करणारय़ांची छिन्नी बसली आणि माझं काम सोप्पं झालं!”
आता मी संवाददाता झालो.म्हणालो, “मुदत किती?”
साहेब म्हणाले, “पाच वर्षं!”
मी विचारलं, “त्यानंतर?”
साहेब म्हणाले, “पुन्हा प्रॉब्लेम्स आणखी कठीण!”
“मग?” –मी विचारलं.
ते म्हणाले, “मुदतवाढ!”
“मुदतवाढीच्या टर्ममधे नवीन काय?” मी विचारलं.
ते म्हणाले, “मला नवीन फ्लॅट आणि निवाससेवक परिषदेची स्थापना!”
मी विचारलं, “त्याने काय होणार?”
ते म्हणाले, “प्रगती!”
मी दुरूस्ती केली, “निवाससेवक परिषदेच्या स्थापनेनं काय होणार?”
“तेच सांगतोय ना! निवडणूक होणं बंद!” मला मूर्खात काढत ते म्हणाले.
मी तरीही घेतला वसा सोडला नाही, विचारलं, “त्यानंतर?”
ते म्हणाले, “एक इमारत माझ्या नावावर!”
मी म्हणालो, “शाब्बास!”
ते म्हणाले, “मग आख्खी सोसाय्टी- हा सहनिवास- माझ्या मालकीचा!”
साहेब आणखीही पुढे बरंच म्हणत होते आणि मी श्वास घ्यायला जागा शोधत होतो!

Friday, November 12, 2010

’स्मरणशक्ती वाढीसाठी’ ई-बुक स्वरूपात प्रसिद्ध झालंय मित्रांनो!


माझं ’स्मरणशक्ती वाढीसाठी’ हे मैत्रेय प्रकाशननं प्रकाशित केलेलं पुस्तक ई-बुक स्वरूपात प्रसिद्ध झालंय मित्रांनो! जरूर पहा, वाचा, प्रतिक्रिया द्या!
http://www.sahityasampada.com/

Tuesday, November 9, 2010

प्रायोगिक संस्थेत प्रवेश!

एकांकिका नंबरात आली नाही तरी तिच्याबद्दल बहुतांशी रंगकर्मीच असलेल्या प्रेक्षकांनी बरं बोलणं, प्रमुख भूमिकेला बक्षिस मिळणं हे आमच्या आम्ही चाकरी करत असलेल्या आस्थापनातल्या ग्रुपसाठी खूप होतं.काही काळ आम्ही सगळेच पहिलं बक्षिस मिळाल्यासारखे तरंगत राहिलो.अश्याच माझ्या एका (नशापाणी न करता) तरंगत्या अवस्थेत एकांकिका दिग्दर्शित केलेल्या आमच्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या सहाय्यकाने आमच्या प्रायोगिक संस्थेत काम करशील का? असं मला विचारलं.तरंगणारय़ा मला वर आभाळ दोन बोटं उरल्यासारखं झालं.प्रायोगिक संस्था म्हणजे नक्की काय? मला ज्या संस्थेत बोलावलं गेलंय ती नक्की कशा पद्धतीने काम करते? तिचं सध्याच्या प्रवाहात स्थान काय? वस्तू घेण्यासाठी फिर फिर फिरून फेरिवाल्यांकडून भाव करून घेऊनच मग पाच रूपयाची का असेना ती वस्तू घेणं या स्वरूपाच्या महाभागांमधे मी कधीच मोडला जात नव्हतो.त्यामुळे असले प्रश्न माझ्या मनात आलेच नाहीत.मला जणू काही झोकून देण्यासाठी असं काही हवंच होतं.इथे झोकून देणं हे सीमीत अर्थाने आहे हे मी कबूल करतो.नोकरी ह्या दगडावर एक पाय होता.संसार ह्या दुसरय़ा दगडावर पाय ठेवायची मनीषा होतीच.रंगभूमीची काही पार्श्वभूमी असती तर कदाचित आवश्यक चोखंदळपणा आला असता.ज्याच्या याच पायरीवर नव्हे तर पुढल्या प्रत्येक पायरीवर मला उपयोग झाला असता.तरीही सीमीत अर्थाने का होईना आपल्याला त्याक्षणी आवडेल ते करून टाकणं या माझ्या स्वभावानं इतर काही नाही तरी या जगाचं रंगीबेरंगी दर्शन घडवलं.कुठल्याश्या एका कोपरय़ातल्या वसाहतीतून आलेल्या आणि कॉलेजपर्यंत वसाहतीबाहेरचं विश्वच न बघितलेल्या मला ठेचा लागल्या पण स्वत:बाहेरच्या जगाची ओळख झाली.
मी आनंदाने सहाय्यक दिग्दर्शकानं मला दिलेल्या आमंत्रणाची वार्ता आमच्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या कानावर घातली. “कुणी विचारलं तुला?” त्यानं विचारलं.मी म्हटलं, “तुमचा अमुक अमुक नावाचा सहाय्यक! मी तयार आहे तुमच्या ग्रुपमधे यायला!” बुजुर्ग म्हणाला, “त्याचा ग्रुप वेगळा.माझा वेगळा.खरं तर मला तुला माझ्या ग्रुपमधे घ्यायचं होतं! तू ताबडतोब त्याला नाही म्हणून सांग! माझ्या ग्रुपमधे यायचा निर्णय तू तुझ्या मनाने, अकलेने घेतलाएस असं त्याला सांगायचं!” मी लगेच पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून तसं त्या सहाय्यकाला सांगितलं.पुढे मला खूप प्रयत्नांनंतर समजलेल्या आणि पचनी पडलेल्या ’हिंदी इंडस्ट्री’ स्टाईलने ’दादाऽऽ’ वगैरे म्हणत सहाय्यकानं माझ्या गळ्यात हात घालून पाठीवर गोंजारून ’आम्ही सगळे एकच आहोत रे!” वगैरे समतागीत सादर केलं.
रंगभूमीसंदर्भातलं शिक्षण हे फक्त ज्याला प्रोसेनियम आर्क म्हणतात त्या रंगमंचाच्या कमानीपुरतं केवळ नाट्यविषयक थेअरीचं किंवा सादरीकरणाच्या प्रत्यक्ष प्रयत्न, अनुभवांचं असत नाही.त्या अनुषंगानं बरंच काही प्रत्यक्ष आयुष्यात शिकवलं जात असतं.दृक श्राव्य माध्यमाच्या ह्या क्षेत्रात लहानथोर माणसांकडून आजही बरंच पदरात पडतं.विशेषत: सेलेब्रेटी या सदराखाली जो बराच मोठा वर्ग आजच्या सर्वव्यापी मालिका क्षेत्रामुळे निर्माण झाला आहे त्यांच्याकडून.आजच्या मालिकांचं हे समाजाला फार मोठं योगदान आहे.
विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मला त्या बुजुर्ग दिग्दर्शकाच्या ग्रुपमधे जायला मिळणं हा मोठा योग होता.मुख्य प्रवाहाशी संबंध येणार होता.मुख्य प्रवाहात याक्षणी नक्की काय चाललंय हे बघायला मिळणार होतं.
संस्थेत आलो.ओळखी झाल्या.नवीन स्पर्धा जाहीर झाली.शोमनशीप आणि दर्जा यांचा उत्कृष्टं मिलाफ असलेली सर्जनशील स्पर्धा असा ह्या एकांकिका स्पर्धेचा बोलबाला होता.संस्थेत आल्याआल्याच भूमिका वगैरे मिळेल अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती.माझी उमेदवारी करायची तयारी होती.पण मला लगेचच्या निर्मितीत घ्यायचंच असं संस्थेच्या सर्वेसर्वा बुजुर्ग दिग्दर्शकाला वाटत असल्याचं दिसलं.ते का असावं? अशी एक चुटपुटती शंका मला चाटून गेली पण प्रत्येक बाबतीत उगाच संशयाचा घोळ घालत आपल्याच मनात डोलारा उभारण्याचा माझा स्वभाव नसावा.शिवाय समोरून आलेली संधी एकतर नाकारण्याचं, नाकारून उगाच आपण नको तेवढे स्मार्ट (खरे, तत्ववादी हे खूपच मोठे शब्द त्याऐवजी स्मार्ट) आहोत असं चित्र निर्माण करण्याचं किंवा मग त्यांनी ठरवलेलंच असेल तर आपला खरा नकार आढेवेढे स्वरूपात पुढे आणण्याचं त्याक्षणी मला जमलं नाही.भूमिका अनाथाश्रमाच्या ट्र्स्टीची होती.माझ्या आधीच संस्थेत असलेला कार्यकर्ता नट खरंच त्या भूमिकेला सर्वार्थानं योग्य होता.भूमिका दोन छोट्या प्रवेशांची होती.मीच ती करायची असं ठरलं.माझ्या चुटपुटत्या शंकेचं रूपांतर जरा मोठ्या शंकेत झालं.मी हातचा जाईन म्हणून असं झालंय?
या संदर्भात पुढे दोन प्रसंग घडले.एक, संस्थेतल्या एका वरिष्ठानं असं सांगितलं की त्याचवेळी माझ्या व्यक्तिमत्वासारखं व्यक्तिमत्व असलेला एक नट संस्था सोडून गेला होता.मी सापडल्यावर मला ग्रुम करता येईल असा विचार झाला होता.दुसरा, एका नाट्यगृहात मला एका बुजुर्ग निर्मात्या, अभिनेत्यानं ओळखलं आणि तो त्यावेळी बसवत असलेल्या नव्या व्यावसायिक नाटकातल्या अनेक तरूण भूमिकांपैकी एकासाठी त्याने मला विचारलं.हे लक्षात येताच मला जोरात हाका मारून त्याच्यापासून लांब बोलावलं गेलं.तोपर्यंत नाटक म्हणजे फक्त रिहर्सलची मेहेनत आणि प्रयोग एवढंच डोक्यात असलेल्या मला या माध्यमातल्या वेगळ्या पैलूची ओळख व्हायला सुरवात झाली होती.
रिहर्सल सुरू झाली.एखादा विषय देऊन त्यावर अनेक एकांकिका स्पर्धा स्वरूपात सादर होणार होत्या.एक मध्यमवयीन ख्रिश्चन जोडपं.मूलबाळ नसलेलं.नवरा कामगार.जवळच्या जंगलात शिकारीला जाणारा.त्यात रमणारा.मूल नाही म्हणून घरातली स्त्री व्याकुळ झालेली.आणि त्याचवेळी एक गोंडस पोर जोडप्याला सापडतं.ते त्यांच्या घरात राहू लागतं.घरातली स्त्री त्याला आपलं मूलंच मानू लागते आणि अनाथाश्रमाचे ट्रस्टी येऊन तो मुलगा परदेशी दत्तक जाणार हे नक्की झाल्याचं जाहीर करतात.मुलावरून जोडप्याचे आपापसात निकराचे वाद होतात.स्त्री कोलमडून पडण्याच्या अवस्थेत आहे.मुलाला आपलं घर म्हणून हेच आणि आई म्हणून हीच हवी आहे पण… अनाथ मुलानं कुठे स्थिरावायचं हे त्या मुलाच्या मर्जीवर अवलंबून आहे की समाजातल्या तथाकथित व्यवस्थेच्या मर्जीवर?...