romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, August 20, 2011

मुंबई अ, ब ते एफएम गोल्ड, रेनबो.. (१)

एखाद्या इतिहासजमा झालेल्या गोष्टीला पुन्हा झळाळी येते ती आधुनिक तंत्रज्ञानामुळे! आणि याचं ठळक उदाहरण म्हणजे आकाशवाणी अर्थात रेडिओ! पुन्हा आलेल्या झळाळीचा दर्जा कसा, काय वगैरे हे ज्याचं त्यानं ठरवायचं.एखादी लयाला गेलेली गोष्ट नवं रूप घेऊन येते.तिचं आधीचं आणि आत्ताचं रूप यांची तुलना करू नये हेच खरं!
रेडिओ या वस्तूची ओळख लहानपणी झालेली आठवते.फिलिप्सचा छोटा काळी कॅबिनेट असलेला आणि चेहेरा गोरा पान असलेला रेडिओ घरी आला.चेहेराच.दोन बाजूला डोळे असल्यासारखी दोन गोल बटणं.एक स्टेशन्स शोधून लावण्याचं आणि दुसरं आवाज कमी जास्त करण्याचं.गोल निमपांढरय़ा बटणांच्या वरचा पृष्ठभाग काळा, म्हणून डोळे.त्या दोन बटणांच्या मधोमध लहरींची बटणं.लघुलहरी SW, मध्यम लहरी MW इत्यादी.त्यातलं मध्यमलहरींचं बटण दाबलेलंच असायचं.ही बटणं दातांसारखी दिसायची.मधला एक दात पडलेला.हा चेहेरा जेव्हा पहिल्यांदा बोलताना ऐकला तेव्हा ज्याम मजा आली.चाळीतले आजुबाजूचेही आलेले आठवतात.रेडिओ बघायला.छोट्याश्या कौलारू चाळीतल्या एका खोलीत.उभ्या जाडजूड माणसाचं रंगीत चित्रं असलेल्या फिलिप्स कंपनीच्या खोक्यावर ठेऊन त्या तंत्रज्ञानं रेडिओ कसा चालवायचा हे दाखवलं होतं.
हा रेडिओ घेतला असावा वडिलांनी मुख्यत: नाट्यसंगीत आणि त्याहीपेक्षा बातम्या ऐकण्यासाठी.आज अजूनही दूरदर्शनवरच्या सातच्या बातम्याच ते ऐकतात.रेडिओवरची जुनी सवय असल्यामुळे.जणू त्या व्यतिरिक्त वेळच्या बातम्या खरय़ा नसतातच. (आजच्या न्यूजचॅनल्सच्या युगात त्यांचं खरं असावं असं पदोपदी जाणवतं खरं!) मग बातम्या ऐकताना त्या छोट्याश्या घरात आवाज मोठा करून हाताचा पंजा उगारून (म्हणजे गप्पं बसा अशी खूण करून) मुलांना, बायकोला गप्पं बसण्याची शिक्षा. (आता ऐकू कमी येतं म्हणून मागील पानावरून पुढे चालूच!) मुंबई ब वरचे आणि दिल्ली केंद्रावरचे शरद चव्हाण, दत्ता कुलकर्णी, सदाशिव दीक्षित, कुसुम रानडे इत्यादी म्हणजे हॉट फेवरिट! जणू हे स्वत:च वाचताएत त्या बातम्या अश्या कौतुकानं हसणं.नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत ह्या संदर्भात ते कानसेनच पण आवाज मोठा करून ऐकण्याची वाईट खोड. (आता ती मुलीला लागलीए.एमटिव्ही रॉक्स का फॉक्स दणदणीत असतानाही ती आवाज आणखी मोठा करतेच करते.आम्ही आमच्या वयात विविधभारती आणि रेडिओ सिलोनचा आवाज मोठा करून आईला वात आणत असू.चालायचंच, नाही?) नाट्यसंगीत ऐकताना वरचे खालचे दात दाबून धरायचे आणि त्यातून निघणारय़ा आवाजात गुणगुणणं.आजही ते चालूच.खरय़ा दाताच्या जागी कवळी आल्यामुळे आवाजाच्या टिंबरमधे फक्त फरक.छोटा गंधर्व (चाल्द मांयझा घा घासरा : चांद माझा हा हासरा), भालचंद्र पेंढारकर (आयी तुझी आठवड येय्यत्ये: आई तुझी आठवण येते, शिवशक्तीचा अटीतटीचा ख्येळ चालला भुबदपटी त्रिगुडाच्ये ह्ये तीदच फासे दिशादिशातूल लिदादती!, शक्कर शक्कर गऊरी शक्कर!), उदयराज गोडबोले (द्येऽऽह द्येवाच्येऽऽ मऽलऽदीऽऽरऽऽ) इत्यादी.हे सांगताना ह्या दिग्गजांची टिंगल अजिबात उडवायची नाही पण सकृतदर्शनी कानावर येणारे त्यांचे स्वर ऐकून आम्हाला तोंड लपवायला लागायचं.मग पुढे कुमार गंधर्वांच्या ’कधी धुसफुसलोऽ’लाही हुकमी हसू फुटायचं.हसू फुटणं हे काही नवलाचं नव्हतं कधीच.. इथे वडिलांचं रेडिओ ऐकणं जवळ जवळ संपायचं.
वडिलांचं रेडिओ ऐकणं संपलेलं असलं तर आणि तरच आईचं रेडिओ ऐकणं सुरू व्हायचं! (आमचं रेडिओ ऐकणं अजून सुरू व्हायचं होतं) आई मंगलप्रभात लावायची आणि आमच्या शाळांची तयारी करण्यात मग्नं असायची.ते लागलं की तिला आधी कोपरय़ावरचं कार्डावरचं दूध घेऊन यायला लागायचं.मग एकसोएक मराठी भक्तिगीतं: पंढरीनाथा झडकरी आता.., बोऽऽलाऽऽ बोला बोऽऽलाऽऽ अमृत बोलाऽऽ.., रघुपती राघव गजरी गजरी.., वारियाने कुंडलं हाऽऽलेऽ.., रात्रं काळी बिलवर काळी गळा मुखे.. (पुढची चाल आठवते.शब्दं सांगाल का प्लीऽऽजऽऽ), कुमुदिनी काय जाणे, परिमळ.. काय गाणी होती राव! चुकलो! आहेत राव! अजरामर गाणी! प्रचंड ठेवा आहे हा! सुवर्णयुग सुवर्णयुग म्हणतात ते हेच! अगदी ते प्रचंड ओलावा आणि मार्दव असलेले (!) आर एन् पराडकरही आठवतात.धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची.झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची! पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशीऽ.. सगळी गाणी गायले ती फक्तं दत्तगुरूंची! हिरे, माणकं, सोनं, नाणी- नाही हे भक्तिगीत नव्हे कुठलं तर- माणिक वर्मा, लता, आशा, उषा, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, भीमसेन जोशी, रतिलाल भावसार हे आणि असे इतर अनेक.. किती नावं घ्यायची? हे केवळ तेव्हा इतकं छान होतं आणि आत्ता तसं नाही असं नाही! ते होतंच तसं! कालानुरूप असेल, परिस्थितीनुरूप असेल.. रत्नं होती एकेक! गायक, गायिका आणि संगीतकार.. सुमन कल्याणपूरांची दशरथ पुजारींनी केलेली गाणी काय अप्रतिम आहेत! किती बोलावं आणि किती सांगावं.. माझ्यापेक्षा तुमच्यातले इतर अनेक जाणकार जास्तं चांगलं सांगतील! मी आपली एक एक कळ चालू करून देतो झालं!
मग भावसरगम! अरूण दाते, सुधीर फडके, हृदयनाथ.. यशवंत देव, श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी.. मंगेश पाडगावकर, शांता शेळके.. या फुलांच्या गंधकोषी.., भेट तुझी माझी स्मरते.., ही वाट दूर जाते.., तोच चंद्रमा नभात.., अशी पाखरे येती.., वेगवेगळी फुले उमलली.. विसर प्रीत विसर गीत.. किती किती सांगू- नव्हे हे ही भावगीत नव्हे! माझी सद्य मनस्थिती! तुम्हाला हसू येईल पण ’सामना’ मधल्या मास्तर सारखं “सांगा राव सांगाऽ सांगाऽ” असं डॉ.लागूंच्या त्या विशिष्ट शैलीत मला तुम्हाला सांगावसं वाटतयं! “कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय?” मुंबई ब वरच्या त्या सुवर्णयुगाखाली दडलंय काय?
नाट्यसंगीतातला जितेंद्र अभिषेकींनी सुरू केलेला नवा अध्याय आठवतो.रामदास कामत, प्रभाकर कारेकर, प्रकाश घांग्रेकर, शरद जांभेकर, विश्वनाथ बागूल, बकुल पंडित, फैयाज, आशालता वाबगावकर आणि द ग्रेट पं.वसंतराव देशपांडे. ’बगळ्यांची माळ फुले’ आणि “कुणी जाल का? सांगाल का? ”कुमारांचं ’अजुनी रूसूनी आहे’.. हेऽऽ हेऽऽ हेऽऽ शामसुंदराऽ राजसाऽ मनमोहनाऽ विनवूनीऽऽऽ सांगते तुज.. शूरा मी वंदिले.. चांदणे शिंपित जाशी.. सांगा! सांगा! लोकहो सांगा! लवकर सांगा नाहीतर लताचं हे राहिलं आणि सुमनचं ते राहिलं म्हणाल! कृष्णा कल्ले आणि डॉ.अपर्णा मयेकरांना घेतलंच नाही म्हणाल! म्हणा! जरूर म्हणा! आहेच ते सुवर्णयुग!
मग वनिता मंडळ, आपलं माजघर.. दर रविवारी मुलांसाठी गंमत जंमत, बालदरबार.. शाळा नववीपर्यंत सकाळची आणि दहावीला नेमकी दुपारची.रेडिओनं सांगितलेली वेळ म्हणजे प्रमाणवेळ! मग बाजारभावही ऐकायचो.. पाचोरा भूमरी अमुक अमुक क्विंटल असे.. तांदळाच्या, कापसाच्या, भुईमूग या सगळ्यांचे बरेचसे तालबद्ध उच्चार असणारे बाजारभाव आपोआप तोंडात बसायचे.सकाळी अकरा वाजता कामगारसभेतली गाणी आणि शनिवारी लोकसंगीताची मेजवानी! शाहीर साबळे, शाहीर निवृत्ती पवार, शाहीर विठ्ठल उमप, श्रावण यशवंते (यो यो यो पाव्हना, सकुचा म्हेवना, तुज्याकडं बगून हस्तोय गं, कायतरी घोटाळा दिस्तोय गं!) बालकराम वरळीकर.. कामगारांची ज्याम वट होती आकाशवाणी मुंबई ब वर.संध्याकाळी साडेसहा ते सातही असायचा.(आज शरद राव कामगारांची वट सामान्यांना त्रास दे देऊन वाढवताएत.जॉर्ज फर्नांडिसरूपी ’चक्का ज्याम’ यांचे ते पट्टशिष्य!) संध्याकाळच्या कामगारसभेत ’सहज सुचलं म्हणून’ ही उद्बोधन करणारी श्रुतिकामालिका, किर्तनं, लोकसंगीत.. दुपारी वनिता मंडळात लीलावती भागवत.. रात्री कृतानेक नमस्कार हा पत्रोत्तरांचा कार्यक्रमही मनोरंजक कार्यक्रमासारखा कान देऊन ऐकला जायचा.प्रपंच, पुन्हा प्रपंच आणि नंतर आंबटगोड.. आकाशवाणीनं वैविध्य दिलं, आपला दर्जा सतत टिकवून ठेवला हे मान्य करायलाच पाहिजे.सगळ्यावर कळस म्हणजे आपली आवड, नभोनाट्यांचां राष्ट्रीय कार्यक्रम, शास्त्रीय संगीताची राष्ट्रीय संगीत सभा.. दिग्गज गायक आकाशवाणीवर गायचं म्हणजे आपला बहुमान समजायचे.नुसतं कंठसंगीत नव्हे, वाद्यसंगीतही.. सगळ्या कार्यक्रमांच्या ओळखधून (सिग्नेचर ट्यून्स?) आजही लक्षात आहेत.आपली आवडची.. युवोवाणीची.. कामगारसभेची.. वनिता मंडळाची.. हे गंमत! जय गंमत! या या या झिन च्याक झिन! झिन च्याक् झिन च्याक् झिन!- आठवतंय का गंमंत जंमत कार्यकर्माचं टायटल सॉंग? साहित्यसौरभ, भाषणं.. एक सद्य घडामोडींवर आधारित स्पॉटलाईट का अश्याच काही नावाचा कार्यक्रम होता.निवेदक कोर्टातल्या वकीलासारखा तुमच्यावर चार्ज करायचा.आठवतंय?
दहावीला असताना म्हणजे शिंग फुटतात त्या वयात आम्हाला विविध भारतीचा शोध लागला.मग शाळेत जायची प्रमाणवेळ कळण्याच्या बहाण्याने हिंदी गाण्यांचा महामूर महापूर.. अभ्यासातलं लक्ष उडालंय म्हणून शिव्या.. या आधी आणि या काळातच रेडिओ सिलोनवरचा हिंदी गाणी सुरू व्हायच्या आधीची ऐकू येणारी ’नागिन’ ची ती सुप्रसिद्धं बीन! रेडिओ सिलोनचा आवाज हवेत हेलकावे खात यायचा.ती बीन तशीच आठवते व्हॉल्यूम कमी जास्त होत लाटालाटांनी कानावर येणारी! ’बिनाका गीत माला’ म्हणजे काय? असं विचारणारा निर्बुद्धं! मूर्खं! स्टुलावर चढून वर लाकडी शेल्फवर ठेवलेल्या रेडिओला कान लाऊन जर पहिली बादान (पायदान?) दुसरी बादान.. अऊर सुननेवालोंऽऽ हां हां हांऽऽ हां! आखरी पायदानपर आज है- कौनसा गीत? हं हं हं हं.. द ग्रेट ’अमीन सायानी’ ला पर्याय होता? हो मनोहर महाजनचा होता काही काळ.पण अमीन सायानी तो अमीन सायानी! आणि सिलोन- नंतर श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनका विदेश व्यापार विभागलाही नव्हता! इकडे विविधभारती आणि मधेच कुठेतरी ऑल इंडिया रेडिओकी उर्दू सर्विस होती, मुंबई अ वर- आठवतंय का?- तरीही!!! ते काय गौडबंगाल होतं हो? विविधभारतीवरचं गाणं संपलं रे संपलं की बॅंडचा लाल काटा फिरवून उर्दू सर्विसवर आणायचा.तिथे तेच गाणं लागलेलं असायचं! असं कुणी सांगितलं म्हणून एकदोनदा प्रयत्नपूर्वक ऐकल्याचं आठवतं.खरंच होतं का हो असं? की आम्हालाच नेहेमीप्रमाणे कुणी कुणी ×× बनवलं! नेहेमीप्रमाणे!
इतक्या तन्मयतेनं अभ्यास केलात तर काहीतरी पदरात तरी पडेल अश्या शिव्या खात आम्ही आकाशवाणीवर कब्जा करू लागलो होतो.एका बाजूला फौजी भाईयों के लिए ऐकण्यासाठी कामगारसभेवर अन्याय करू लागलो.हवामहल ऐकू लागलो.बेला के फूलपर्यंत मजल गेली की शिव्यांमधला जोर वाढायचा मग आपल्या विद्यार्थीदशेची कीव यायची.दुसरीकडे रेडिओवरच्या प्रायोजित कार्यक्रमांचं युग सुरू झालं. ’कोहिनूर मिल’ ही प्रतिथयश कंपनी आहे म्हणून वडिलांनी पहिल्यांदा ’कोहिनूरऽऽ गीऽऽत..गुंजारऽऽ’ लावला होता.विनोद शर्माचा तो अनुनासिक खर्जातला विशिष्टं आवाज! ’दम मारोऽऽ दम’ पहिल्यांदा इथे ऐकलं.त्यानंतर की आधी? ’बिन्नी डबल ऑर क्विट’ असायचं.फारूख शेख तेव्हा अभिनेता झालेला नव्हता.त्याचा आवाज आणि बोलण्याची पद्धत ऐकून प्रचंड भारावल्याचं आठवतं.दर्जा म्हणजे काय, हे आपोआप अंगात भिनत जाणारा एकंदरीत तो काळच असावा.दर्जा शोधावा लागत नव्हता. ’बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्ट’ अखंड चालत आलेलाच आहे. ’क्रिकेट वुईथ विजय मर्चंट’ मधे त्याचं शेवटचं ’अरूवा’ ऐकण्यासाठी कायम शेवटपर्यंत ऐकायचं.केवळ अरूवाच नव्हे पण त्याच्या या कार्यक्रमातून होणारय़ा कॉमेंट्सला चांगलंच महत्वं होतं.ठाकरसी ग्रुप ऑफ मिल्स ही त्याची घरचीच कंपनी.पण त्याचा उपयोग इतका चांगला होत होता.तो मधेच कार्यक्रम बंद करायचा मग तो चालू रहाण्यासाठी क्रिडारसिक आर्जवं करायचे.ती मागणी मग मान्य व्हायची.
हिंदी चित्रपटांचे प्रायोजित कार्यक्रम सुरू झाले आणि आमच्या त्या वेळच्या भाषेत ’थैया’ च झाला! मला देव आनंदच्या ’वॉरंट’, मनोजकुमारच्या ’संन्यासी’ चे प्रायोजित कार्यक्रम आठवतात.रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ’शोले’ नावाच्या जीपी सिप्पी अऊर रमेश सिप्पीका अजिमुश्शान शाहाकार भेटायचा! त्याची ख्याती काय सांगू? तिच नेमकी अभ्यासाची वेळ असायची.पत्र्याच्या स्कूलबॅग्ज असायच्या.आपटून, आपापसात युद्ध खेळून पोचे आणलेल्या आणि उघडता, बंद करताना करकरणारय़ा.सगळे आवाज बंद करून, पालकांची झोप मोडू नये आणि शोले सुटू नये म्हणून ज्याम काळजी घ्यावी लागायची.अफलातून डायलॉग्ज आणि केकवर चेरी म्हणजे हं हं हं हं- हो! तोच तो! अमीऽऽन सायाऽऽनीऽऽ..
विविधभारतीवरच्या जाहिराती म्हणजे स्वतंत्र विषय आहे! टींग डॉंग्! आणि टीऽडीऽटीडीऽ टीडीऽ टॅंग! असं दोन जाहिरातींमधलं संगीत! सॉरीडॉन, हमाम, सोना सोना नया रेक्सोना, आई गं! वैतागले या केसांना! (करूणा देवांची डबल आवाजातली जाहिरात) अमीन सायानी परमेश्वरासारखा सर्वत्र व्यापून उरत असेच.चल संन्यासीऽऽ हा गाण्याच्या मुखडा कट व्हायचा आणी अमीन सायानी ’किधर?” अश्या त्याच्या त्या कमावलेल्या आवाजात विचारायचा.मग मंदिरमेऽऽ इत्यादी.जोडीला ते अजिमुश्शान शाहाकार वगैरे असायचंच! प्रॉडक्शन्सची नावंसुद्धा त्याच्यामुळे कळायची.जीपी सिप्पी-रमेश सिप्पी, मुशीर रियाज पॉडक्शन, सुलतान एहमद का धरमकांटां.. मग कारण नसताना खोजाती सूरमा पण आठवतो त्याच्या आवाजातला.अनेक वाकळं वळणं, हुंकार, हसणं देऊन कमावलेलं ग्लॅमर असलेला आवाज.जरा जास्तंच ग्लॅमरस होतंय असं वाटूनही मंत्रमुग्ध करणारा!
चांगल चाललं होतं हो! पण मग सगळं हळूहळू विरत गेलं.. नाट्यमय श्रुतिकेतलं शेवटचं संगीत विरत जाऊन एक मोठ्ठा पॉज आला.. रेडिओचं डोळे फिरवून टाकणारं भावंडं दूरदर्शन आलं होतं.. टेलिविजन.. तरीही क्रिकेटमॅच बघताना लोक टीव्हीचा व्हॉल्यूम कमी करून रेडिओवरचं धावतं वर्णन लावत होते..
कोपरय़ात पडलेल्या आकाशवाणीला कुण्णीकुण्णी विचारत नव्हतं, नसावं.. अजूनही आठवण झाली की भावनाविवश होणारे आमच्यासारखे अनेक श्रोतेही दूरदर्शनच्या महापूरात वहात गेले, बहकत गेले..
कर्तबगार कुटुंबप्रमुख वृद्धं झाल्यावर वळचणीला खोचला जावा तसं काहीसं..

4 comments:

Shriraj said...

मस्त वाटत होतं वाचताना...खरंच :)

विनायक पंडित said...

स्वागत श्रीराज! अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार!:-)

भाग्यश्री said...

विनायक, अहाहा! इतक्या प्रचंड आठवणी जाग्या झाल्या म्हणून सांगू. लहानपणी हे सगळे इतके सतत कानांवर पडलेय की मनात घट्ट रुतून बसलेय.

तुम्हांला ज्याचे बोल हवे होते ती गवळण इथेच देतेय...

विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !

बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !

मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय !

एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय !

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय !

( बुंथ --चुंबळ, गळामोती एकावळी --गळ्यातील मोत्यांचा एकपदरी हार, कांचोळी -- चोळी, कांसे कांसिली --नेसूचे लुगडे )

विनायक पंडित said...

भाग्यश्री! लिहितानाही माझ्या डोळ्यासमोर सगळं उभं राहिलं होतं.माझी आई आणि नंतर आम्ही कसं ऐकत असू ते!
’रात्र काळी घागर काळी’ तर मला आई शाळेला जायला उठवायची तेव्हा पाच मिन्टं पाच मिन्टं करत असताना ऐकलेली आठवतेय.:-)तुम्ही ही गवळण इथे अगदी इथ्यंभूत दिलीत! तुमचे मनापासून खूप खूप आभार!