romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, January 10, 2011

कॉमेडी शो “काय नवीन?”

“काय नवीन?...” आज आत्ता आठवड्याभरानंतर मनू भेटला, या नव्या वर्षात.मी म्हटलं, “नवीन? काय नवीन?” मनू मला टप्पल मारत बोलला, “यड्या मलाच काय विचारतोस पुन्हा तेच! माझी रोज पार्टी चालू आहे नवीन वर्षाची!” मी म्हटलं, “रोज?” तो म्हणाला, “तू नं नेहेमी जीवाला वैतागलेलाच रहा.सगळं जग आनंदित झालंय नववर्षं आलंय म्हणून आणि तू! चिंतातूर जंतू!” असं म्हणून मनू हसला.ज्या हसण्याला मी कुत्सित म्हणतो आणि मनू ज्याला स्टायलिश म्हणतो ते हसू. “बोल! काय नवीन?” माझ्या पाठीत इरिटेटिंग धपाटा घालत मनू तोच प्रश्नं मला पुन्हा विचारत होता.मी उसळलो- उसळलो म्हणजे- आवाजानं एक वरची पट्टी पकडली फक्तं.म्हणालो, “अरे नवीन काय नवीन नवीन? काय नवीन?” मनू पुन्हा हसला- आता मी खरंच चिडायला लागलो होतो.त्याला हवं ते झालं होतं.माझं सुरू झालं. “वाण्याचं बिल वाढतंय.ते वाढतंय म्हणून मॉलमधे जावं तर क्रेडिट कार्ड वाकडंतिकडं झालं सारखं सारखं स्वाईप करून.डेबिट कार्ड स्वाईप मशिननंच गिळलं.काय नवीन? ओवरड्राफ्ट खात्यातला डेबिट बॅलन्स वाढतोय.कांद्याचा वांधा नाशिकपासून पाकिस्तानपर्यंत पसरलाय.डाळींनी पुन्हा उचल खाल्लीय.वर कृषीमंत्री म्हणतात हे असं रहाणारंच! च्यामारी त्या गुटख्याच्या! तो मात्रं सगळीकडे मिळतो! काय नवीन? कामावर जायला बाहेर पडावं तर ट्रॅफिकचे लोच्ये-सगळीकडे.वर होर्डिंगवर नॅनोचा ’आनंद’ ० पैशात देतो म्हणे गाडी! काय नवीन? एमयूटीपीची ट्रेन स्टेशनमधे शिरायला दहा मिन्टं घेते! कारण काय? मोटरमनवर अन्याय? मोनोरेल आणि हवेतून रेल्वे! काय फरक पडणार? धंदे आणि स्टॉल्स पदपथावरून भर रस्त्यांमधे आलेत आता! पाण्याचा ब्लॉक, रेल्वेचा मेगाब्लॉक, हे सेवाउद्योग ब्लॉकमधेच संपणार आणि आपल्यालाही संपवणार! शिक्षणक्षेत्रात देशव्यापी एकत्रीकरण! पोरं लॅपटॉप मागताएत शाळेत जायलाऽ अर्‍ये काय नवीन?...”
मी प्रत्येक वेळा ’काय नवीन?’ च्या समेवर येत होतो आणि दाद दिल्यासारखं मनू त्याचं ते स्टाईलिश हसू हसत होता.तो हसला की मला आणखी चेव येत होता.मी दमतोय असं दिसल्यावर त्यानं मला थांबायची खूण केली आणि म्हणाला, “साल्या तू ना सामान्यच रहा नेहेमी!” “अर्‍ये मग काय करू?” मी विचारलं.त्यावर मनू उत्तरला, “अरे काय करू म्हणून काय विचारतोस? मोठा हो.मोठा हो!” मनूचं काहीतरी वेगळंच! मी विचारलं, “मोठा हो म्हणजे?” मनू माझा मित्र होताच.आता तो माझा मार्गदर्शक व्हायला बघत होता.म्हणाला, “मला सांग! तुझ्यासमोर पाण्यानं भरलेला अर्धा ग्लास ठेवला, तर तू काय म्हणशील?” मी चटकन् म्हणालो, “पिऊन टाकीन! काय म्हणीन कशाला? घशाला आधीच कोरड पडलीय सारखं ’काय नवीन’ म्हणून!” मनू आता माझ्यासाठी तत्ववेत्ताही झाला- म्हणजे फिलॉसॉफर.मनूला तेच चांगलं जमतं.कारण त्यासाठी काही मेहेनत करावी लागत नाही.नुसती तोंडाची वाफ दवडली की झालं.तर मनू त्याच्या खास ठेवणीतल्या आवाजात माझी समजूत काढत म्हणाला, “अरे म्हणजे ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणशील की अर्धा रिकामा आहे म्हणशील?” मी वैतागलो, “अरे कसाही असला तरी ग्लास अर्धाच रहाणार ना रे? आमचं सगळंच अर्धं.आयुष्य अर्धं, स्वप्नं अर्धी, महत्वाकांक्षा अर्धी, पैसा, संपत्ती…” असं म्हणेपर्यंत मला खोकला आला.मी खोकतोय हे बघून मनू पुन्हा हसला.स्टाईलिश.म्हणाला, “अर्धवट आहेस, अर्धवट.चांगला आणि योग्य विचार कधी करणार तू?” आवंढा गिळून मी म्हणालो, “काय वाव आहे विचार करायला? आहे त्या भयाण परिस्थितीत कलमाडी नको म्हणू, राजा नको म्हणू, आदर्श नको म्हणू, ती राडिया नको म्हणू सगळ्यांनी हात धुऊन घेतलेत! आता पुन्हा बोफोर्सच्या तोफा उलटवणार आहेत म्हणे! कोणावर? सगळं शेवटी आपल्यावरच! इकडे आपोझिशनवाले टपलेले, तिकडे राज्य पातळीवरचे नेते टपलेले, पलिकडे आपला शेजारी टपलेला आणि त्याही पलिकडे ती महासत्ता!ऽऽ”
मनू पुन्हा आपल्या ठेवणीतल्या आवाजावर आला.म्हणाला, “नको त्याची काळजी करतोस बाबा तू! तू काय करणार सगळ्या गोष्टींवर? सगळ्या समस्यांवर? टीव्हीचे बघ अगणित चॅनेल्स झालेत! काय वरायटी आहे! रिअलिटी शोज आहेत, गेम शोज आहेत, सेलिब्रिटीजनी चालवलेले.रोजचे सिनेमे आहेत.महामालिका आहेत- तुझ्या भाषेत.राष्ट्रभाषेत.हव्याच असतील तर आंतरराष्ट्रीय भाषेत! करमणूक होत नसेल तर बातम्या आहेत. बातम्यांमागच्या बातम्या आहेत.हॉरर बातम्या, हॉरर शो, अत्त्याचारसुद्धा आहेत! काय नाही? आता रात्री अकरानंतर काय बघायचं हे मी तुला सांगू? तू दिवसा ऑफिसमधे आडोसा करून कंपनीच्या लॅपटॉपवर बघतोस तेच! ते झालं की मॉलमधे जा.सत्राशेसाठ आहेत या टोकापासून त्या टोकापर्यंत.तिथेच मल्टिप्लेक्सेस नाहीत? आणि घरी आल्यावर, रस्त्यात, गाडीत, लोकलमधे, इकडे आणि तिकडे तुझा भ्रमणध्वनि आहे, त्याचे इअरप्लग्ज आहेत.हाताच्या पंज्यावर मावणारं इंटरनेटवरचं मायाजाल आहे.माहिती मिळवायला कोण सांगतय तुला? यूट्यूबवर काय बघायचं हे मी तुला सांगू? तुझा शाळेत जाणारा मुलगा सांगेल तुला! सगळं झालं की किंवा सगळं व्हायच्या आधी किंवा सगळं होताना त्याच्या मधेही गप्पांचे अड्डे आहेतच कीऽऽ होऊदे ना साईटवाल्यांचा फायदाऽ तुझा काय तोटाय हे सगळं करण्यात मला सांग!...नायतर असं कर.येतोस आज पार्टीला? वर्षाखेर आणि वर्षारंभ अशी मिळून मोजून सत्ताविसावी पार्टी आहे आज! धुंद हो.नव्या वर्षाचं स्वागत कर.माझं ऐक.स्वत:ला कुरतडत बसू नकोस असा!” मी म्हणालो, “अरे मनू हा चंगळवाद झाला.सगळ्याच प्रश्नांवर, समस्यांवर सामान्य माणूस काही करू शकेल असं मुळीच नाही.पण आपण आपले, आपल्यापेक्षाही जे सामान्य आहेत त्यांचे प्रश्नं, समस्या डोळ्यांसमोर दिसत असूनही कानाडोळा करायचा? फक्तं आपलंच बघायचं? कुणीतरी सुरवात करायलाच हवी रे.आपल्या आपल्या परीनं.ती कुठल्या नवीन वर्षात करायची?... आणि तू विचारतोएस मला काय नवीन?...” मी माझ्या तंद्रीत कधी गेलो ते मलाच कळलं नाही.
तंद्री भंगल्यावर मी मनूकडे पाहिलं.तो दिसेनासा झाला होता नवीन वर्षाचं स्वागत करायच्या सत्ताविसाव्या पार्टीला आणि मी माझ्या परीनं नवीन वर्षाचं स्वागत करायचा प्रयत्न करत होतो…

No comments: