romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, February 14, 2014

देवराय (२)

भाग १ इथे वाचा!
पुष्पी देवरायकडे पहात राहिली आणि हरवली... श्रावणात दिसला होता गेल्या... तो सुद्धा घाईगर्दीत... आज बर्‍याच वर्षांनी ती त्याला जवळून पहात होती... ती काही बोलणार इतक्यात, "थांब! चहा ठेवतो!" असं म्हणत तो हसत हसत उठला देखील...
त्याचं हसणं... ते नाही बदललं... रोप वाढतं, जुन होतं, त्याचा वृक्ष होतो, तो वठायलाही लागतो... पण त्याचं सत्व तेच रहातं... तसं त्याचं हसणं... पुष्पीच्या घरात शिरताना... गेली कित्येक वर्षं...
कित्येक वर्षापूर्वी पेढे वाटायला आलेला देवराय तिला उगाच आठवला... गच्च भरलेल्या अल्बममधून एखादं छायाचित्रं सहज बाहेर डोकावावं तसा... कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पास झालो म्हणून!... चाळीत जातीनं प्रत्येकाला पेढे देऊन, मोठ्याना वाकून नमस्कार करून आशिर्वाद घेत होता... कुणी अभिनंदन केलं रे केलं की याचं सुरू... "अरे मग! दिवाळीत तोंडात बोटं घातलीवती, पुष्पा आणि तिच्या मैत्रिणींनी रांगोळी बघून! सुसाट वारा असतानासुद्धा हात थरथरत नव्हता की चिमूट पसरत नव्हती इकडे तिकडे! काय पुष्पा!?"
त्याचा दणदणाटी आवाज ऐकून बाहेर येणार्‍या पुष्पाला हो हो म्हणण्यावाचून गत्यंतर नव्हतं... त्याआधी येणारं हसू तिनं महत्प्रयासानं तिनं दाबलं... आत्ताही, ते चित्र बघत असतानाही ते तिच्या चेहेर्‍यावर उमटलं...
"अरे एवढंच नाही! सगळ्या पोरींनी माझ्याच भरतकामाच्या क्लासात नाव घातलवतं उन्हाळ्याच्या सुट्टीत!"
अशी पुस्ती जोडून स्वत:च हसायला लागला. पुष्पीनं पेढा घेतला आणि विचारलं,
"देवा, मार्क किती पडले?"
"मार्काचं काय घेऊन बसलात? रिझल्ट डिक्लेअर करताना सगळ्यात आधी माझंच नाव पुकारलं बाबुरावानी!!"
"बाबु.. रा... व...?" चाळीतलं कुणीतरी गोंधळलेलं...
"प्रिन्सिपॉल रे आमचे! माझ्या पोर्टेट काढण्यावर जाम खूष आहेत हं! शिवाय-"
पुष्पी मनातल्या मनात हसली. पटकन म्हणाली, "जरा बस हं! चहा ठेवते!"
"आतच दे गं पाठवून! आणि खाजाही पाठव जिजीनी आणलेला! बर्‍याच दिवसात पाठवला नाहीत घरी!" असं म्हणत आजोबांच्या खोलीत शिरलासुद्धा...
"नमस्कार करतो आबा!"
"असू दे, असूदे... अरे पायाबिया नका पडू आता माझ्या- कोण रे... देवराय का? काय म्हणतोस बाबा?"
कपाळावरचं हाताचं पन्हाळं मिटत, कपाळ चोळत, डोळे किलकिले करत आजोबा त्याच्याकडे पहात राहिले.
’पास झालो! हे घ्या पेढे!"
"ठेव! ठेव! पुष्पे एऽऽ पुष्पेऽऽ..."
"येतेय ती चहा घेऊन!... अजून कपाळ चोळताय आबा! मी आल्यावर नेहेमी आठवण होते काय? हा हा हाऽ"
"नाही रे बाबा! असंच! सवय! वाचत होतो. भिंग लाऊनसुद्धा दुखतंच डोक्यात! तू मारलेल्या विटीमुळे नाही रे बाबा!"
"काय तापलावतात आबा तेव्हा!"
"अरे बसलीवतीच तशी! पण तू ती तीनदा उडवून हवेत टोला मारला होतास हे कळल्यावर राग गेलासुद्धा! क्रिकेटच्या जमान्यात विटीदांडूचं महत्व तेव्हाच कमी होत होतं! आता ’विटीदांडू’ असं म्हटल्यावर श्रीचा मुलगा ’व्हॉऽ पपाऽ" म्हणत बावळटासारखा तोंड बघत रहातो!!"
"हाऽहाऽहाऽ... आपण जपत रहायचं आबा! आता वेळ मिळत नाही. पूर्वी मी शिकवत होतो, मुलाना आटापाट्या, मुलींना लगोरी, सागरगोटे-"
"हो रे हो! श्लोक्सुद्धा म्हणून घ्यायचास!"
"आबा तुम्हीच मला ’भटू’ म्हणायला सुरवात केलीत!"
"म्हणजे काय! नुसते श्लोक, आर्या, पुराणातल्या गोष्टीच नाही तर दिसायचास सुद्धा अगदी भटाब्राह्‍मणासारखा! काय रे... कानावर जानवं ठेऊन बहिर्दिशेला जाताना पोरं चिडवतात का रे अजून?"
"काय लक्ष द्‍यायचं आबा! चालायचंच! संध्या करायला लागलो तेव्हा घरचे सुद्धा हसायला लागले होते!"
पुष्पी चहा करता करता ऐकत होती... तिला आठवलं... अति शुद्ध आणि स्पष्ट बोलायला सुरवात केली होती त्यानं तेव्हा ती चिडवायची, तो रागवायचा, गोरा चेहेरा लाल व्हायचा... पण जरा वेळानं स्वत:च काहीतरी बोलणं काढून, मागचं सगळं विसरून, बोलायला यायचा...
चहाचे भरलेले कप घेऊन ती आबांच्या खोलीत गेली तेव्हा दोघांच्या गप्पा ऐन रंगात यायला लागल्या होत्या... ती आत आली आणि जोरात खाकरली... नुसतं सांगितलं असतं दोघांना तर ठेव, घेतो आम्ही असं म्हणाले असते आणि जरावेळानं तिलाच हाका मारून चहा गरम करायला लावला असता...
चहा पितानाही देवरायचं तोंड चालूच होतं... रात्री झोपेतसुद्धा तो बडबडायचा म्हणे!... पुष्पी स्वत:शीच हसली आणि  स्वत:चा कप तोंडाला लाऊन खिडकीला टेकली...    (क्रमश:)  

Thursday, November 28, 2013

देवराय (१)

देवरायनं मांडी मोकळी केली. पाठ ताठ केल्यावर जरा बरं वाटलं. पायाची बोटं सुन्न झाली होती. दुखत तर होतीच. गुडघा चांगलाच सुजला होता. आसन जरासं बदलून त्यानं पुन्हा सुरवात केली. बाजूला पोस्टकार्डांचा छोटासा ढीग. हाताखालचं कोरं पोस्टकार्ड ओढून, नीट पॅडवर ठेऊन त्यानं पुन्हा लिहायला सुरवात केली: "दु:खद निधन, आमच्या मातोश्री..." मधेच त्याने आजूबाजूला बघितलं. सगळे सुस्ताऊन पडलेले. तहान लागली म्हणून दुखर्‍या पायाने उठून पार्टीशन पलिकडच्या पाण्याच्या टाकीकडे जावं तर या अस्ताव्यस्त शरीरांना ओलांडावं लागणार! तो तसाच बसून राहिला. ढोसून धाकट्याला उठवावं, पायाची बोटं त्याच्याकडून ओढून घ्यावीत तर तो आपला पालथा पडून, हात छातीजवळ मुटकून ढाराढूर! उठवलं असतं तरी, "काय च्यायला!" म्हणून तोंड आणखीनच लादीत घुसवून पडून राहिला असता...
चहाची तलफ आली तशी देवरायला रहावेना. तो सावकाश उठला, लंगडत लंगडत पार्टीशनच्या मागे आला. पाणी प्याला. चहाचं आधण ठेवलं. दोंदावर बांधलेली धोतराची लुंगी आणखी घट्ट केली. खांद्यावरच्या नॅपकीननं खसाखसा तोंड आणि आंग पुसलं. दारातून हवेची झुळूक आली तसा तो दाराच्या फळीजवळ आला. लंगडा पाय सावकाश उचलत फळी ओलांडून पॅसेजमधे आला. नॅपकीन हलवून वहाणार्‍या वार्‍याला अंगावर झेलू लागला...
सगळं कसं शांत झालेलं... सततचा एस्टीचा प्रवास, जागरणं, वाचन, विचार सगळं काही पूर्णपणे थांबल्यासारखं... आतून विचारमग्न, पण बाहेर मात्र हसरा, आनंदी, येण्याजाणार्‍याची चौकशी, मदत, गप्पागोष्टी, मस्करी करणारा... आता स्वत:लाच आतून अगदी ब्लॅंक झाल्यासारखं, निर्वात पोकळी...
तिसर्‍या चवथ्या दिवशीपासून एकेक जण भेटायला यायला लागलेला. दोन तीन दिवस गप्प असलेला फोन खणखणायला लागलेला... तसं त्याला बरं वाटलं. सांत्वन करायला लोकं यायला लागली. सांत्वन करता करता त्यांची गाडी स्वत:च्याच चिंता, अडीअडचणी, अनुभव यावर... पूर्वी त्याला गंमत वाटायची पण मग तो नेहेमीच बोलणार्‍याला उत्साहित, प्रोत्साहित करायला लागला. समोरच्याचं बोलणं ऐकून घ्यायला लागला. या- सांत्वनाच्या परिस्थितीतही तो भेटायला आलेल्याला सल्ला देऊ लागला. लोक तो घेण्यासाठीच आल्यासारखे. एरवीही आणि ह्यावेळीही... हे त्याचं नेहेमीचंच होतं. त्यात आताही काही फरक नव्हता...
चाळीतली लोकं एकमेकांशी स्पर्धा करत घरात घुसायला लागली. ही एक सुवर्णसंधी असल्यासारखी. कुणी गेल्याचं दु:ख, त्यामुळे निर्माण झालेले, होणारे किंवा सुटलेले प्रॉब्लेम्स वगैरे गौण... संधी साधायची कधी एकदा हाच विचार... तो सगळ्यांशी अगदी मनमोकळेपणाने बोलला, वागला. माणसं त्याला प्रिय. मग त्यांच्या इतर गोष्टींच्या पलिकडे तो गेलेला...
पुष्पी येऊन बसली तेव्हा देवराय दुखवट्याची कार्ड पोस्ट करायला गेला होता. कार्डाचा गठ्ठा त्याने धोंगडेच्या हातात दिला. त्याला बजावून, बजावून सांगितलं. आता यात बजावून सांगण्यासारखं काय होतं? पण कामाची पद्धत हिच. एखाद्यानं कुणालातरी पेटीत टाकायला सांगितली असती कार्डं किंवा स्वत: पेटीत सारून झाला असता मोकळा... एवढी पत्रं अर्थातच नुसत्या नातेवाईकांना नव्हतीच. त्याचा परस्परसंवादावर भयंकर विश्वास. कम्युनिकेशन... प्रत्येक गोष्टीने तो जनमनाशी संबंध दृढ करायला बघे. एखादा धोंगडे हातात गठ्ठा पडल्यावरच कपाळाला आठ्या पाडता झाला असता पण या धोंगडेला, साहेबाना आपल्याविषयी आपुलकी आहे हे माहित होतं. त्याच्या गावातल्या कित्येकाना साहेब ओळखत होते. शेवटी मोकळं हसून देवराय बाहेर पडला, नेहेमीसारखा...
पोस्टाबाहेर आल्यावर त्याला एकदम उन्हाचा तडाखा जाणवला. जाड फ्रेमच्या चष्म्याआडचे डोळे किलकिले झाले. टोपी सारखी करून तो चालायला लागला. नाक्यावरून आत वळला आणि "वाऽ वाऽ छान! छान!" असं मनातल्या मनात म्हणत, मान डोलवत चालायला लागला. समोरच्या पानाच्या टपरीशेजारी, बंद दुकानाच्या दाराला रेलून, एक हात लेंग्याच्या खिशात घालून, थोरला हवेत धूर काढत उभा होता... शेजारी चट्टेरी पट्टेरी शर्ट घातलेला मित्र, कोंबडा काढलेला, चार पाच दिवसांचा पारोसा वाटणारा, इकडे तिकडे चोरासारखा बघत, गुपित सांगत असल्यासारखा... थोरला हवेतल्या वर्तुळांकडे बघत हसतोय... "याला एकदा घेतला पाहिजे!" असा विचार देवरायच्या मनात आला आणि दुसर्‍याच क्षणी, "या सुतकात तरी नको!" म्हणून त्याने मान झटकली. दुखर्‍या पायांनी चाळीच्या लाकडी जिन्याच्या कठड्याचा आधार घेत घेत, हाशऽहुश करत पायर्‍या चढायला लागला...
मोरीत हात पाय स्वच्छ धुऊन नॅपकीनला पुसत पुसत आत आला तर पुष्पी आणि मोठी वहिनी बोलत बसलेल्या. हुऽऽश्श करत तो तिथल्याच एका स्टुलावर बसला आणि, "काय? कसं काय?" असं पुष्पीला मोठ्या आवाजात विचारत हसता झाला...
पुष्पी त्याच्याकडे पहात राहिली...     (क्रमश:)

Friday, November 15, 2013

"शुभमंगल सावधान!" एकांकिका "कृष्णलीला" कार्यक्रमात...

कृष्णलीला, कृष्णलीला, कृष्णलीला... असा गजर घरी गेले कमीत कमी सहा महिने चालला होता... हे असं पहिलंच वाक्य तुम्हाला काय सांगायचं ते सांगून गेलंच असेल... तरीही... सांगतो... हा गजर तुम्ही ओळखला तिनेच म्हणजे आमच्या अर्धांगिनीने केलेला... तिच्या नृत्यवर्गाचा कार्यक्रम... सूत्र कृष्णलीला... तर तिला आमची एक एकांकिका त्यात बसतेय हे आठवलं आणि "कृष्णलीला" आमच्याही मागे लागली...
आता ताकाला जाऊन भांडं लपवायचं काही कारण नाही आम्हाला... आम्ही वाट बघत असल्यासारखेच... अशा संधीची केव्हापासून...
तर अशी झाली "शुभमंगल सावधान!" या एकांकिकेच्या सादरीकरणाची सुरवात...
"शुभमंगल सावधान!" लिहिली खूप आधी. मराठवाड्यातल्या एका गावातल्या एका आदिवासी तरुणीचं लग्न देवळातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीशी लावलं... अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली. तिची कथा झाली. एकांकिका होईल असं नंतर कधीतरी वाटलं. मग सुनीता आणि श्रीकृष्ण असा कथेतला एकमेव प्रवेश एकांकिकेचा शेवटचा प्रवेश झाला. त्याआधीचे प्रवेश मग बांधले गेले. असं अस्मादिकानी केलं पहिल्यांदाच...
गेल्या वर्षी कन्या या लिखित, दिग्दर्शित दीर्घांकाची निर्मिती केली. यावर्षी भूमिकाही करा असा आग्रह झाला अर्धांगिनीकडून आणि आमच्या आतून तर तो होतच रहातो नेहेमी... मग जमवाजमव सुरु झाली...
ती एक मज्ज्याच असते. कलाकार निवडणं. मग त्यांनी गळणं. कुणी हो हो म्हणत अचानक कलटीची चाहूल देणं. आपण त्याना तयार करतोय असं आपल्याला वाटणं. मग नाद सोडून द्यावा लागणं. एखाद्याने घाबरून पळच काढणं इत्यादी... रिहर्सलसाठी जागा हा आणखी एक व्याप आणि ताप... असं करता करता यावेळची गंम्मत म्हणजे दोनच कलाकार उपलब्ध. त्यातले एक अस्मादिक. मग पुनर्लेखन. आशय तोच ठेवायचा. तांत्रिकता सांभाळायची. रचनेचा तोल बिघडू द्यायचा नाही... एकांकिका सोडूनच द्यायचा विचार पक्का होत चालला. पण घर आणि संच (इन मिन दोन कलाकार) यांकडून आग्रह होऊ लागला आणि अस्मादिकांना वाट सापडली पुनर्लेखनाची...
आता दोन्ही कलाकारांना पूर्णवेळ फलंदाजी... फूल फ्लेज्ड बॅटिंग... म्हणजे मेहेनत भरपूर... तीत कमी पडायचं नाही. तेवढंच एक हातातलं...
अनंत अडचणी. त्या येतातच. काही करायचं असलं तर येतातच. विचार येऊ लागला यापेक्षा भरपूर चिकित्सात्मक अभ्यास केला असता तर रोज एक पिल्लू सोडून घमासान चर्चांचे फड उभे केले असते सोशल नेटवर्कींग साईटवर तर केवढं काम झालं असतं. केवढ्याना कामाला लावलं असतं... पण काहीतरी प्रत्यक्ष करायची खाज ना? काय करणार?
संगीत, प्रकाश सगळ्यातल्या अडचणी, मोबाईल्स न उचलणं, अडलेल्याला नाडलं करुन सोडणं... सगळं नेहेमीसारखं... तसं निर्मितीतलं नवेपणही मधे मधे येऊन अडचणी वाढवणारं... शेवटच्या क्षणापर्यंत...
प्रयोगात मग नेहेमीचं थोडंसं इकडे तिकडे झालेलं सोडलं तर महत्वाची अडचण न येता पस्तीस ते चाळीस मिनिटं कधी गेली कळलं नाही...
अस्मादिक (हा शब्द या नोंदीत किती वेळा आला?.. ते तुम्ही मोजलं असेलच!) विनोदाचं धनुष्य पेलून पहिल्यांदाच. तीन भूमिका: सूत्रधार, गणा, श्रीकृष्ण. थोड्याशा वेशभूषा बदलानेच साकार होण्यासारख्या. सोबतच्या स्त्री सहकलाकाराचंही तसंच, तीन भूमिका: अप्सरा-नटी, लक्षुमी आणि सुनिता ... मी खूप वर्षांनी प्रत्यक्ष रंगमंचावर... त्या तुलनेने नवीन...
प्रेक्षकांचे अभिप्राय अंतिम. ते अजून येताहेत.
आमंत्रण बर्‍याच जणांना गेलेलं असतं. काहींच्या खर्‍याच अडचणी. काही न जमवणारे, मग काही करत नसताना ’सध्या काय चाललंय?’ असं थांबवून थांबवून विचारणारे. काही ’यानं प्रत्यक्ष काही केलं बरं का’ म्हणून हिरमुसणारे, सरसावून उगाच आपलं काहीतरी कुठेतरी दामटत बसणारे...
आपल्याला कुणी किती गंभीरपणे घेतंय हा विचार लोप पावलेला असतो प्रत्यक्ष काही करत असताना. आपलं असेल नसेल ते कौशल्य पणाला लाऊन काम पूर्ण करणं यात आनंद असतो. नक्कीच असतो...
तो या नोंदीद्वारे आपल्यापुढे सादर करतो... आभार!...
"शुभमंगल सावधान!" (एकांकिका) "अभिलेख" निर्मित, "नृत्यरंग" आयोजित 
लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित 
प्रकाशयोजना: वासुदेव साळुंके 
पार्श्वसंगीत: अरुण कानविंदे 
रंगभूषा: शशी सकपाळ, रमेश वर्दम आणि मंडळी 
वेशभूषा: वरदा पंडित 
कलाकार: प्रिया गडकरी, विनायक पंडित



Tuesday, October 29, 2013

अभिलेखच्या नाट्यविषयक उपक्रमातलं दुसरं पुष्प...

"अभिलेख" वर मनापासून भेट देणार्‍या माझ्या मित्रमैत्रिणींनो!
दिवाळी अगदी काही दिवसांवरच आली आहे. सण येतात ते आपलं रोजचं तेच ते जगणं सुसह्य करण्यासाठी. ते आपण जबाबदारीने आणि तरीही पूर्ण आनंदात साजरे करायचे असतात...
तेव्हा सर्वप्रथम ही दिवाळी तुम्हा सर्व सर्व नेटकरांना परम आनंदाची जावो अशा मन:पूर्वक शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद! तुम्ही दिलेल्या पाठबळामुळेच "अभिलेख" आजवर इतकी मजल मारु शकलं आहे....
सहचरहो! गेल्या वर्षीपासून "अभिलेख" चे नाट्यविषयक उपक्रमही चालू झाल्याचे आपण सर्वजण जाणताच.
"कन्या" या दीर्घांकाने (एक तासाचा नाट्यप्रयोग) या नाट्यविषयक उपक्रमाचा शुभारंभ झाला. गेल्या डिसेंबर महिन्यात ज्या दिवशी दिल्ली शहरात ती महाभयानक घटना घडली त्या घटनेआधीच्या संध्याकाळी "कन्या" दीर्घांक अशाच एका युवतीचं वास्तव उभं करत होता...
या दिवाळीनंतरच्या शनिवारी नऊ नोव्हेंबरला, सकाळी अकरा वाजता "अभिलेख" आणखी एक नाट्यविषयक उपक्रम अर्थात पस्तीस मिनिटांची एक एकांकिका "शुभमंगल सावधान!" सादर करत आहे. लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित.
हा कार्यक्रम "नृत्यरंग" या कथकनृत्य विषयक संस्थेने आयोजित केला असून संचालिका वरदा पंडित आणि त्यांच्या विद्यार्थिनी कथकनृत्य सादर करणार आहेत.
"कृष्णलीला" हे या कार्यक्रमाचं नाव आणि विषयही कृष्णलीला हाच.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली (पश्चिम) इथे "कृष्णलीला" सादर होईल. प्रवेशिकामूल्य रु.२००/- आणि रु. १५०/- ...
आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण... आपल्या शुभेच्छा आहेत म्हणूनच आम्ही "कृष्णलीला" सादर करत आहोत...
पुन्हा एकदा आपणा सगळ्याना मनापासून धन्यवाद!

Sunday, October 20, 2013

प्रस्थापित (७) : भाग अखेरचा...

भाग १, भाग २भाग ३, भाग ४, भाग ५ आणि भाग ६ इथे वाचा!
... प्रयोग चांगलाच रंगला... नेहेमीप्रमाणे स्त्री कलावंत नेहेमीच्या जागी चुकली. पुरुष कलाकारानं शिरीषचे लाफ्टर्स खाण्याच्या प्रयत्न केला. शिरीषने अर्थात ते चोख वसूल केले. तो कुठेही चुकला नाही. सगळं नेहेमीप्रमाणे...
पण नेहेमीप्रमाणे शिरीष प्रयोगात रंगून गेला नव्हता. कुठेतरी कायतरी चुकचुकत होतं. प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही, काहीतरी वेगळं चालू होतं, हे शिरीषसाठी नवीन होतं...
कसे आलो आपण इथे?... नोकरी करणार नाही असं घरी सांगितल्यावर वडील चिडले होते. त्यांनी सतत मनधरणी करूनही, आपण सतत नाही! नाही! असं ठाम सांगत राहिल. तुच्छतेने?... मग आई हादरली. मागचे भाऊ, बहीण वेळेआधीच धडपडू लागले. आपण ते सगळं पहात स्ट्र्गल करत राहिलो. या इंडस्ट्रीत... सतत वाक वाक वाकण्याचा?... अपमान, उपेक्षा सहन करण्याचा?...
आणि... आज काय करतो आहोत आपण? रोजंदारीवर असलेल्या कामगारासारखे नाईटच्या पाकीटाची वाट पाहात? प्रथितयश निर्मात्याला बांधून घेऊन? कुबेर आणि कर्ण असलेला तो वेळप्रसंगी करवादत नाही आपल्यावर बॉससारखा? काय करतो आहोत आपण? सोडून जातो?...
एवढं सगळं करून दुसर्‍या फळीपर्यंत आलो आपण... आपल्यापुढचा दिग्दर्शक निर्मात्याचा नातेवाईक. तो आपल्याला पोचून देईल आणखी वर? एक नंबरवर?...
लग्न करायचं नाही ठरवलं आपण... तत्व जपल्यासारखं. सांभाळल्यासारखं. लग्न न करता कुणा कुणाबरोबर राहिलो... काय झालं? नातं नवरा- बायकोसारखं... कधी मी चुकायचं कधी तिनी. कधी दोघांनी. मग पुन्हा नवीन... पण लग्नासारखंच... संसारासारखंच... वेगळं काय?...
प्रयोग संपल्यावर मग शिरीष जास्तच बैचेन झाला. विशेषत: स्वत:ला जबरदस्तीने आरशात बघताना, टिश्यू पेपरने खरवडून खरवडून मेकप काढताना... त्यासाठी स्वत:ला आरशात न्याहाळताना...
हे सगळं आज दारूत बुडवणं अशक्य आहे, जोर करून बुडवायला गेलो तर जास्तच भडकून उठेल हे लक्षात आल्यावर तो आणखी खचला...
सगळं झालं ते त्या चष्मेवाल्यामुळं... संसारी, नोकरदार, अभिनयात सो कॉल्ड यश न मिळवल्यानं लेखनात स्ट्रगल करू पहाणार्‍यामुळं... प्रामाणिक, मॅनर्स पाळणार्‍या आणि स्वाभिमान न सोडणार्‍यामुळं... हे जाणवल्यावर मग शिरीषला आपलं ग्लॅमरस भणंगपण जास्त जास्तच खुपायला लागलं...         (समाप्त)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...खरं म्हणजे कथा लिहावी, तिच्याबद्दल काही लिहित बसू नये... हा अपवाद...
या कथेला "साप्ताहिक सकाळ" च्या कथास्पर्धेत ’तिसरं बक्षिस’ मिळालं. हा अनुभव माझ्यासाठी तरी प्रचंड सुखद होता...
पहिलं म्हणजे कथा निकाल असलेल्या साप्ताहिक सकाळच्या ४ ऑक्टोबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाली. एका मित्राने ती बघितली. वाचल्याचं कळवलं. साप्ताहिकाचे अंक प्रसिद्ध तारखेच्या आधी दोनचार दिवस प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने कळल्याने, तसं काही लिहिणारा अपेक्षित करत असल्याने, आनंद झाला. तो बाजारात जाऊन दोनचार प्रती घेऊन साजरा केला... दसराच होता... हात पाय पसरून पसरलो...
आस्थापनामधून फोन... बक्षिस घ्यायला या... परगावी... मी त्यावेळी नको तितक्या अडचणीत. कुठेतरी पहिलं बक्षिस न मिळाल्याची रुखरुख असावी. अपरिहार्य कारण पुढे करून येणं शक्य नसल्याचं नम्रपणे सांगितलं. पुन्हा फोन... जाण्यायेण्याचं भाडं देतो पण बक्षिस स्विकारायला याच... लिहिणार्‍याला हा तर पराकोटीचा आनंद! भाडं दिलं नाही, देतो म्हटलं तरी लिहिणारा खूष... आता जाणं भागच...
बक्षिस समारंभ अत्यंत नेटकेपणानं आयोजित केलेला. एका प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ बाईंचं व्याख्यान. आयोजकांनी स्वागत करणं... जाताना भेटून मग जा असा आग्रह... पहिल्या रांगेतली खुर्ची... उत्तम व्याख्यान... थोड्याफार गप्पा- कारण परतण्याची घाई, दुसर्‍या दिवसाचं रुटीन...
परतताना मी बसमधे नव्हतोच... चार बोटं नव्हे चांगलाच वर... प्रतिकूल काळात खूप वाट पाहून आलेला असा सुखावह अनुभव... संबंधितांचे आभार मानावे तेवढे थोडे...
परतल्यावर दोन दिवसांनी फोन... त्याच गावातून... नावं मुद्दाम टाळतोय... प्रसिद्ध व्यक्तिचं नाव घेऊन फुशारक्या नकोत आणि प्रतिसाद न देणार्‍यांची उगाच नावानिशी दखल कशाला?... अशा मोडवर सध्या आहे... तर फोन... नाव ऐकल्यावर मी चाट! असं होतं... अपेक्षा नसताना... ते नावाजलेले नाट्यसमीक्षकही. त्याना कथा प्रचंड आवडल्याचं ते सांगतात. त्यावर उत्तम एकांकिका होईल असं सांगतात. तुम्ही तसा काही विचार केला आहे का? म्हणून मित्रत्वाच्या नात्याने विचारतात. भारावून जाणं आभार मानणं यातच मी गुंतलेला असताना ते ज्या प्रायोगिक संस्थेशी संबंधित असतात त्यातला एकाचा संपर्क क्रमांक देऊन, याना फोन करा आणि मला येऊन भेटा पुढचं काय ते बोलू असं आमंत्रणही देतात... मी सातव्या आसमानात पोचलेला... ते शांत, मृदू...
मी उत्साहाने त्या संपर्क क्रमांकावर फोन करतो... पलिकडे,  त्याला कल्पना असावी असा आणि मला कल्पना नाही असा रुक्ष आवाज... विरोधी आवाज लगेच ओळखता येतात... माझं त्याना भरभरून सांगणं... येऊ ना? म्हणून विचारणं... ते नकारघंटा हातात घेऊन बसल्यासारखे... हो ही नाही आणि नाही ही नाही... पण म्हणजे नाहीच!...
वाईट वाटतं... पण काळ जातो तसं आयरनी वगैरे आठवायला लागते...
एका नकारात्मक अनुभवावर लिहिलेली कथा. अपेक्षा घेऊन चांगली नाटकं लिहून ती कुठे होत नाहीत तर तद्दन नाटक लिहून प्रयत्न केला तर तिथे प्रतिसाद हा असा... त्यावर कथा लिहिली, त्याला बक्षिस मिळालं, त्यानंतर एका प्रथितयश नाट्यसमीक्षकाला त्यात एकांकिकेचं बीज दिसलं, ते प्रायोगिक रंगकर्मींनी नुसतं पारखण्याचंही टाळलं... असा हा अनुभव किंवा अनुभवांची शृंखला...
करत रहाणं आपल्या हातात असतं. त्यानंतर येणारा अनुभवरूपी प्रतिसाद, त्याला काही लॉजिक नसतंच... मग आपल्याला जे वाटतं ते आपण स्वत:च करायचं. आपल्याला शक्य असेल तसं. पण करायचंच... असो!      
 

Tuesday, September 24, 2013

प्रस्थापित (६)

भाग १, भाग २भाग ३, भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा!
शिरीष समोरच्या चष्मेवाल्याशी आपलं नेहेमीचं डोळ्याला डोळा न भिडवण्याचं तंत्र चालू ठेऊनच होता. त्यानं आपल्या बॅगेतला हात बाहेर काढला.
"हे बघा- ही दोन-"
"मला कल्पना आहे हो-" चष्मेवाला सौम्य हसत म्हणाला.
"बघा ना- या संहितेबरोबर असलेल्या या पत्रावरची तारीख- सहा महिने होऊन गेलेत. या आणखी दोन संहिता. आधी आता या घेऊन बसायला-"
"मला पूर्ण कल्पना आहे त्याची. माणसं बिझी असतात. तुम्ही माझं पुस्तक चाळलं का?"
"हो ना! हो! हो!" शिरीषनं ठोकून दिलं.
"मग त्याच्या मलपृष्ठावर माझा बायोडेटा आहे. मी यातच होतो हो इतके दिवस. तुमच्यासारख्या भूमिका केल्या प्रायोगिक- व्यावसायिकला- अर्थात तुमच्यासारख्या यशस्वी नसतील त्या- मला माहितेय. माणसं बिझी असतात. त्यांना अजिबात वेळ नसतो. परवा आलो तेव्हाच माझ्या लक्षात आलंय!"
अजिबात न हालता शिरीष हातातल्या संहितांकडेच बघत राहिला.
"नाही- बघा ना- आता हे ह्यानी- सहा महिने आधी-"
"आरामात हो! मला अजिबात घाई नाही. आरामात वाचा. माझं पुस्तकही सवडीने वाचा- आणि मला सतत फोन करून, सतत भेटायला येऊन त्रास द्यायला खरंच आवडत नाही. इरिटेट होतो हो समोरचा माणूस. मला कल्पना आहे!"
"नाही- काय आहे- मला जर फोन करून आठबण केली नाहीत नं तर-" शिरीषनं नेहेमीचा धोबीपछाड टाकला. फोन नाही केलास ना तर तुझंच नुकसान आहे चष्मेवाल्याऽ- तो मनात म्हणाला.
"सतत नाही करत मी फोन. बिझी माणूस वैतागतो. वाचा तुम्ही सावकाश. चला. थॅंक यू!" चष्मेवाला निघाला. मेकपमनला, व्यवस्थापकाला हात करून तो निघाला आहेहे शिरीषनं नजरेच्या कोपर्‍यातून बघितलं, पण संहिता परत बॅगेत ठेवताना बॅगेत घातलेलं डोकं त्यानं अजिबात बाहेर काढलं नाही. चष्मेवाल्याच्या थॅंक यू लाही त्याने अर्थातच प्रतिसाद दिलाच नाही. गेला *****! असं मनाशी म्हणत त्यानं खर्रकन बॅगेची चेन ओढून बंद केली. चेहेरा अतिशय शांत ठेवून.
प्रयोग एक्च्यूअली सुरू व्हायला अजून अर्धातास तरी सहज होता. ऑफिशयल पंधरा आणि वर पंधरा मिनिटं. इस्त्री करून ठेवलेले कपडे बघून ठेवणं, तोंड धुणं, गप्पा मारणं इत्यादी प्रयोगाआधीची कामं यांत्रिकपणे करत तो रंगपटात स्थिरावला. काहीतरी त्याला खुटखुटायला लागलं. ते मनाच्या मागे ढकलून तो निग्रहाने हास्यविनोद करत राहिला. शेवटी वेळ झाल्यावर आरशासमोर बसला. आज मेकपमनला थांबवून त्यानं स्वत:चा मेकप स्वत:च करायला सुरवात केली. स्वत:चा चेहेरा रंगवताना त्याला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. मगासारखं... खुटखुटल्यासारखं... कॉन्फिडन्ट वाटत नाहीए आपल्याला आज? हं!... पावणेचारशेवा प्रयोग... यंत्र झालंय आता सगळं... वाचेचं, चेहेर्‍यावरच्या रेषांचं, हातवार्‍यांचं, हातचालींचं, विनोदाच्या जागाचं, लाफ्टरसाठी थांबण्याचं... तो स्वत:शीच हसला. पूर्ण एकाग्र होऊन, मेकपकडे लक्ष देऊन खुटखुटणं विसरण्याचा प्रयत्न करू लागला...     (क्रमश:)


 

Thursday, September 19, 2013

उत्सव आणि उन्माद

शहरातल्या सर्वप्रथम स्वयंघोषित ’नवसाला पावणार्‍या राजा’ च्या कार्यकर्त्यांच्या कृतीला उन्माद हे एकच विशेषण लावता येतं. विशेषणं भोंगळपणे  लावण्याची आपली प्रथा आहे. उन्माद ही केवळ एक मनाची अवस्था म्हणून या संदर्भात विचारात न घेता ती एक मानसिक विकृती म्हणून विचारात घेतली पाहिजे.
दुसरं, केवळ 'त्या' एका मंडळाचा जाहीर निषेध वगैरे करुन. आपल्याला मोकळंही होता येणार नाहीए!
बारकाईनं बघितलं तर चातुर्यानं बनवला गेलेला एक सांगाडा दिसतो. जो आता उघडपणे मिरवला जातोय. मंडळं हे एक संघटन असतं. गल्ली पासून दिल्ली पंथावरचा कुणी एक राजकारणी किंवा राजकारणी समूह हे संघटन पध्दतशीरपणे तयार करुन राबवत असतो. तो हे कशासाठी, कुणासाठी करतो? हे आपल्याला चांगलंच माहिती असतं. मग तरीही आपण त्यात सामील का होतो? आपणा सर्वांचेच हितसंबंध इथे गुंतलेले असतात.
तो कुणी एक किंवा तो कुणी समूह आपल्याच जीवाभावाचा 'वाटणारा' कुणी असतो. वाटणारा असं म्हणण्याचं कारण स्वार्थाची घडी आली की आपल्या आपल्यातच आपली कशी लठ्ठालठ्ठी चालते याच्याशीही आपण पूर्ण परिचित असतो. तरीही आपण तिथेच का रहातो? तर माझं काम होतंय ना मग झालं तर! बाकीच्या गोष्टींशी मला काय करायचंय? ही कामं म्हणजे अंत्यविधीला न सापडणारा क्रियाकर्म करणारा मिळवून देण्यापासून कुठलंही असू शकतं. ते ते त्यावेळी नक्कीच खूप महत्वाचं असतं.

आपल्याला आपल्या जमलेल्या समूहापासून दूर व्हायचं नसतं. नवा समूह आपल्याला तयार करता येत नसतो. दुसर्‍या कोणत्याही समुहात आपल्याला सहज सामावून घेतलं जाणार नाही याबद्दल आपले आपणंच ठाम असतो. मग अंतर्विरोध सांभाळत बसणं अपरिहार्य होऊन बसतं. मग आहे ते पटवून घेण्यात आपलं हित आहे हे आपल्याला आपोआप पटतं. नाहीतर सगळं भूमंडळ हादरवून थरकाप करून टाकणार्‍या डिजेंच्या तालावर इतक्या मोठ्या मिरवणुका दिसत्याच ना.
त्या तशा दिसण्याचं आणखी एक कारण म्हणजे तरुणाईला आपल्या ताणांचं विरेचन हवं आहे. कानात खुपसायला एफ एम आहे. प्रवास सुसह्य व्हायला, त्या व्यतिरिक्त जालावरची किंवा हातातल्या आयुधात जतन केलेली चित्रफीत आहे. आख्खं आंतरजाल, मल्टिप्लेक्सेस आहेत. झालंच तर तोंडी लावायला इडियट बॉक्स आहे. तरीही... आयुष्यच इतकं कठीण आहे की...
दुसरं, राजकारणी मग तो कुठल्याही दर्जाचा असो बावा, त्याच्याशी संगनमत पाहिजेच. मागच्या पिढीतल्यांसारखा नसता मूल्यामूल्य विवेक काय कामाचा? मग दारात वर्गणी मागायला, म्हणजे डिमांड करायला येतो तो उंची कपडे घालणारा, उच्चशिक्षित, नवश्रीमंत तरुण. जो इतकेच द्यायचे हं! असा सज्जड पण प्रेमळ दमही देतो. तो आपल्यातल्याच कुणाचातरी भाऊ, मुलगा, जावई इत्यादी असतो. आपण हसतो. देतो. मग कुरकुरतो. तेवढी मोठी रक्कम आपल्याला परवडणारी नसते असं नाही. पण हल्लीच्या ’कुणी उठतो स्पॉन्सर करतो’ च्या जमान्यात वैयक्तिक वर्गणीची गरज काय? ही आर्थिक उलाढाल नक्की काय होते? ती योग्य ठिकाणी की अयोग्य? हे विचारण्याचं धाडस आपल्यात नसतं. असलं तर येऊन ’स्वत्ता हिशोब तपासून घ्या!’चं आव्हान पेलायची ताकद आपल्यात असावी लागते...
'ते' स्वयंघोषित नवस मंडळही नाही का केवढी लोकोपयोगी कामं करतं, देणग्या देतं?... पण मग ढकलाढकली, हमरातुमरी, प्रत्यक्ष पोलिसांना मारहाण आणि इतर निषिद्ध बाजूंचं काय? यालाच मूल्यामूल्य विवेक म्हणता ना? आजच्या या ग्लोबल व्यामिश्र वास्तवात असा विवेक सांभाळत बसणं परवडणारं आहे? तुम्हीच तो सांभाळत बसणार असाल नं तर मग टाकतो तुम्हालाच वाळीत !!!
आणि काय हो, तुम्ही ऐन जोशात होता तेव्हा यातच सामील होतात. या उत्सवात! आणि आज असं बोलताय?...
हो! होतो ना? तेव्हा कळत असून वळवून घेतलं नाही. आता स्वत:पुरता वळलोय. तेव्हा फक्त माझ्या भावनांचं, माझ्या ताणांचं विरेचन म्हणून काही कृती घडल्या. त्याचा पश्चाताप झालाय. तेव्हा सुटा विचार होत होता. आता एकूणात विचार करतोय. त्यामुळेच खरं तर पोटतिडकीने लिहितोय...
हे एक बरं करताय की... झालं तर मग... म्हणजे आता ते त्यांचा गरबा चालू ठेवणार. दुसरे नव्याने ते काय ते छटपूजा की काय ते काढणार आणि आम्ही नववर्षाची शोभायात्राही काढायची नाही असं तुमचं म्हणणं असेल!!! विशेषत: प्रांतीय अस्मितेचा पुरस्कार करणारा तडफदार नेता आपल्याजवळ असताना?...
बघा बुवा! तेव्हा मी सुटा सुटा विचार करत होतो. आता तीच चूक तुम्ही तर करत नाही ना?...
...तर हे असं आहे... एकूणात की काय तो विचार करत रहाण्याचं...
ते कधी कधी करत रहायला हवंच की. एरवी आहेच. आत्मरंजन... आणि जनरंजनही...