romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, January 26, 2015

एकटेपणा, अवकाश, कला, मैत्र... इत्यादी इत्यादी...

लहान मुलाला झोप आल्याचं कळत नाही. ते त्रासतं, त्रासवतं, कंटाळतं, ओरडा खातं. पालकालाही अनेक वेळा समजत नाही, ते असं का करतं?
आता एकेकट्या मुलांची कुटुंब अनेक आहेत. किमान दोन मुलं असावीत या विचाराला जोडपी पुन्हा लागली अाहेत. बरोबर कुणी असणं महत्वाचं वाटतं. सहवास, सह अनुभूती, एकमेकाला सहभागी करुन घेण्याची वृत्ती. मिळून काही करण्याची उर्मी महत्वाची अाहे...
जाणत्या माणसाला अनेकदा खुटखुटत रहातं. लहान मुुलाची बैचेनी... किर्केगोर- किर्केयोर, नित्शे माणसाच्या एकटेपणाचं तत्वज्ञान मांडतात. फ्राॅईड म्हणतो, कामप्रेरणा आणि मोठं होण्याची इच्छा सतत मानवी मनाचा कब्जा घेऊन रहातात.
हल्ली मुलांना निरनिराळ्या क्लासना घातलं जातं. व्यक्तिमत्वविकासासाठी... कला, खेळ, ज्ञान... हे सगळं शिकवण्याची घाऊक केंद्रं तयार आहेत... त्यातून काही चांगलं, काही वाईट निश्चित घडत रहाणार...
संगणक, आंतरजाल, भ्रमणध्वनी, लॅपटाॅप, टॅब... हात जोडून उभंच आहे...
बाजूलाच पोकळीही आहे... ती वाढते आहे असं निरीक्षक म्हणताहेत...
कितीही काही केलंत तरी पोकळी अविभाज्य आहे. ती कशी भरायची हा निर्णय ज्याचा, त्याचा... विचारवंत, स्वयंविकास शिकवणारे तज्ज्ञ या दिशेने सांगू पहाताहेत...
निर्णय घ्यायला लागणं ही माणसामागे लागलेली एक ब्याद आहे, निर्णय घ्यायला लागणं पेक्षा निर्णयापश्चात घडणार्‍या परिणामांची जबाबदारी घ्यायला घेणं...
मग धर्म, कला, खेळ... इत्यादीत मानवी इतिकर्तव्य शोधायचं... कुणी कसं, कुणी कसं...
स्वातंत्र्य ही आणखी एक ब्याद... त्याचं काय करायचं?... विचार बंद करता येतात? झापडबंद रहाता येतं?... मग अातून नाही नाही ते कढ येतात, त्यांचं काय करायचं?...
झोकून द्यायचं स्वत:ला आयुष्याच्या प्रवाहात?... ते कधी न कधी करावंच लागतं!... पालकांचं वाढतं सुरक्षाकवच अंतिम समृद्धपणे जगण्याच्या आड येतं का? समृद्धी म्हणजे नेमकं काय?...
मग पूर्वी एका अर्थानं नाळ तोडून जगात टाकलं जात होतं; परिस्थितीमुळं, जाणीवपूर्वक, नाईलाजानं, जन्मदात्यांच्या परस्पर असामंजस्यामुळं, प्रत्यक्ष किंवा लाक्षणिक... ते सुदृढ जगण्याला पर्यायानं उपकारक ठरत होतं का?... परिणाम करणारे विविध घटक काही ठाम विधानं करु देतात की नाहीच?...
हा सगळा पट डोक्यात सुरु झाला तो दोन मित्रांच्या आठवणीमुळं. मित्र म्हणायचे तर समवयस्क नव्हेत. मी भिडस्त म्हणजे चुचकारल्याशिवाय कुण्याच्या अध्यातमध्यात नाही. एकदा मध्यात आलो की वहावणार... ज्याचा, त्याचा स्वभाव. तर ह्या मित्रांनी ज्ञात नव्हतं त्याचा परिचय करुन दिला. चित्रं, गाणं, नेपथ्य, साहित्य, व्यसन जडेल अशा गोष्टी...
वास्तव्य आहे ते शहरात असलं तरी गावासारखं. हद्दीला नदी. त्या नदीपलिकडं नेलं या महाभागांनी. नदीपलिकडं जाणं म्हणजे सर्वार्थानं. मग अलिकडच्या कशातच मन रमत नसल्यासारखं. मोठ्ठी दरी... अपसमज, गैरसमज... त्यांचीही सवय...
दोन्ही मित्रं वेगवेगळ्या पार्श्वभूमीतले. माझं वर्तुळ मर्यादित.
कुठल्याही नव्या क्षेत्रात गेलं की समवयस्क, शिक्षक, मित्र... अशी वेगवेगळ्या तर्‍हेची नाती जडतात. अनुभवी, हाताला धरुन अमुक दिशेने नेणारा जवळचा होतो. मैत्रीची त्याची ओढ आपल्यापेक्षा त्याला जास्त प्रसंगी. त्यानं आपण सुखावून दबलेलो. तो हे दबलेपणही नाहीसं करतो आणि संस्कारांची दालनं उघडत जातो, शिक्षकाचा अविर्भाव न आणता.
असे गतायुष्यातले दोन मित्र चटकन् आठवले...
कालांतराने त्यांच्यातले आपल्याला वाटणारे दोषही जाणवले. आपल्यातही त्याना काही दोष जाणवले असतील हा विचार मनातच आला नाही...
खूप काही असून ते तसे विस्मृतीतच गेले... ते का? याचं ढोबळ मूल्यमापन केलं मनाशी... स्वस्थ झालो आपल्या मार्गावर... जैसे थे राहिलं नातं...
वय वाढत जातं तशी भिडस्त माणसं आणखी आणखी आत्मकेंद्रित होत जातात?...
मग खुटखुटत रहातं... ते का हे समजत नाही, लहान मुलासारखं... नकळत समजतं... मग संबंध जोडायची धडपड चालू होते... ते रक्तात नसल्यामुळे ती पाहिजे तशी जमत नाही...
आजुबाजूला व्हर्च्युएलिटी वाढलेली... तिथले संबंध हाडामांसाचे वाटतात? असतात?...
गतायुष्यात योगायोगाने मिळालेल्या समूहाची आठवण प्रकर्षाने होते. अनेक प्रकारची नाती तिथे जमली होती हे जाणवतं. सगळं सहज होतं. अनेक तरंगणारी ओंडकी योगायोगाने एकत्र अाली... आपापली वेळ झाल्यावर अलग विलग झाली...
एकटं अपरिहार्य अस्तित्व आणि सोबतीची आस. फुटकळ सोबत असली तरी समूहाच्या सोबतीची आस... सोबत, सोबतच सोबत, सोबतीचं अजीर्ण... मग सोबतीशीचीच झुंज... हेच आयुष्य... रुटिन होणं अाणि ते प्रयत्नपूर्वक तोडत नव्या अनुभवाकडे झेपावणं यात कुठेतरी काही हाती लागत असावं... समृद्धपण?...

No comments: