Tuesday, February 23, 2010
“सौंदर्योपासना, आरोग्य आणि सौंदर्य”
“सौंदर्योपासना, आरोग्य आणि सौंदर्य” या डॉ.सौ.विद्या जोशी लिखित पुस्तकाच्या सुरवातीला म्हटल्याप्रमाणे माणसाचं प्रथमदर्शन त्याच्याबद्दलचा पहिला ठसा उमटवणारं असतं, हेही पुस्तक मैत्रेयच्या इतर सर्व पुस्तकाप्रमाणे तसा ठसा उमटवतं.सौंदर्य ही कल्पना आपल्याकडच्या या विषयाच्या अनेक पुस्तकांमधून आजतागायत बहुतेक वेळा बाह्योपचारांवरच भर देणारी राहिली आहे.प्रस्तुत पुस्तकाच्या नावापासूनच आरोग्य हे सौंदर्याच्या नाण्याची दुसरी बाजू आहे या विचारला हात घातला आहे.हा विचार सर्वात महत्वाचा आहे!मग या अनुषंगानं आपल्या सगळ्यांचाच वजन वाढणं किंवा वजन पुरेसं न वाढणं हा महत्वाचा विषय विस्तृतपणे मांडला आहे, इतका की या संदर्भात कुठलाही संदेह हे पुस्तक वाचलं तर वाचकाच्या मनात राहू नये!
डाएट हा आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यात रोज एकदा तरी येणारा शब्द! डाएट म्हणजे उपासमार का? नव्हे, डाएट म्हणजे चौरस आहार.सगळं काही खाणं पण एका मर्यादेतच! मग नुसतं डाएट केलं की झालं का? तर नाही, त्याबरोबर नियमित व्यायाम हवा आणि हे दोन्ही आयुष्यभर सांभाळण्यासाठी हवी इच्छाशक्ती! ही मानसिक ताकद मिळवायची ध्यानधारणेतून आणि योगासनांच्या नियमित सरावातून!
असं सगळं समजावत लेखिका या सगळ्याचं विस्तृत महत्वं आपल्या मनावर बिंबवत जाते.त्यासाठी पुस्तकात येतं समतोल वजनाचं गणिती सूत्र, नक्की काय खावं काय खाऊ नये याबद्दलचा सहज समजणारा, पटणारा उहापोह, वेगवेगळी योगासनं आणि त्यांच्या कृती, त्याही योग्यं त्या आकृतींसह म्हणजेच चित्रांसह!
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण कसं असावं आणि त्यात नियमितता, आपापल्या दिनक्रमाप्रमाणे कशी आणावी हे सोप्या शब्दात जर समजलं तर आणखी काय हवं? हवं ना! तरूणींना हव्या आहेत सौंदर्यस्पर्धांतून यशस्वी होण्यासाठी उपयुक्त टीप्स! या स्पर्धा म्हणजे नुसतं सुंदर दिसण्याच्या नसतात तर स्त्रीचं सर्वोतोपरिनं समृध्दं असणं जोखणारय़ा असतात.या विषयीची प्राथमिक माहिती आणि केस, त्वचा यांची काळजी घेण्यासाठीची मिश्रणं आणि लेप यांच्या कृती असं वाचता वाचता या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या नावाची छोटीशी यादी शेवटच्या पानावर दिसते आणि आपल्याला इतकं “सुंदर” पुस्तक इतक्या लवकर संपल्याची चुटपूट लागून रहाते.मग आपण पुन्हा मागची पानं आधाशीपणानं उलटू लागतो.आपल्या मनावर जे कोरलं गेलंय ते पुन्हा शोधू लागतो.हळूहळू हे पुस्तक आपण आणखी एकदा कधी वाचून काढलं हे आपलं आपल्यालाच समजत नाही!
तुम्हाला असं पुस्तक तुमच्याकडे असल्यावाचून रहावणार नाही असं माझं मत झालंय हे पुस्तक वाचून! तुम्हाला काय वाटतं?...
“बाई म्हणून जगताना”
स्त्रीचं भागधेय असं की अगदी गर्भावस्थेपासून ते वृध्दावस्थेपर्यंत तिच्यामागचं शुक्लकाष्टं संपता संपत नाही.तिच्या बाजूने मुळी विचारच होत नाही.ती प्रेमळ, ती समजूतदार, ती त्यागाची मूर्ती म्हणून तिला हरभरय़ाच्या झाडावर चढवायचं आणि ती दुय्यम तिय्यम स्थानावर राहिल याची काळजी घ्यायची.हे सगळं कधी संपणार? स्त्रीनं युगानुयुगं असंच खितपत रहायचं का? या प्रश्नांची निश्चित, सकारात्म आणि ठाम उत्तरं हे पुस्तक देतं आणि तिथेच या पुस्तकाचं वेगळेपण सिध्दं होतं!
या पुस्तकात काय नाही? मुलगी वयात येताना तिच्यात नेमकं काय होतं, त्यावेळी तिला कसं मार्गदर्शन करायचं, ती आई झाल्यावर तिचा आहार नेमका कसा असावा की ज्यामुळे ती निरोगी आणि सडसडितही राहिल.अतिरिक्त चरबी जर साठलीच तर तिनं काय करावं, या विषयीचा वजन-उंचीचा तक्ता काय आहे, अन्नं कसं आणि किती खावं, उपासमार करण्यापेक्षा व्यायाम आणि आहार यांची योग्य सांगड कशी घालावी हे मुद्देसूदपणे पण कुठेही क्लीष्टता न आणता इथे वाचता येतं.मेनोपॉज अर्थात मासिक पाळी समाप्ती, मधूमेह या स्त्रियांना ग्रासणारय़ा महत्वाच्या समस्यांसाठी स्वतंत्र प्रकरणं या पुस्तकात समर्पकपणे मांडलेली आहेत.स्त्रीची मानसिकता, ती टिकवण्यासाठी तिनं घ्यायची काळजी, सगळ्या जगाचं करून झाल्यावरही वृध्दावस्थेत दुर्लक्षित, एकाकी झाल्यावरचा तिचा आहार तक्ता तसंच पाकक्रिया देऊन लेखिका आणखी आणखी सकारात्म होत जाते.
हे पुस्तक वाचत जाताना आणखी एक मह्त्वाची गोष्टं लक्षात येते की हे फक्त स्त्रियांनी वाचण्याचं पुस्तक नाही तर समस्त पुरूषांनी वाचण्याचं पुस्तक आहे! यातली आहार, व्यायामाची प्रकरणे त्यांच्यासाठीही माहितीपूर्ण तर होतातच पण विशेषत: शेवटच्या “महिला दिन” या प्रकरणात लेखिका स्त्रीची सद्यस्थिती आणि त्यावर योजले जाणारे, योजले जावेत असे उपाय मांडते आणि आपल्यालाही पटतं की फक्तं ८ मार्च साजरा केला की आपलं कर्तव्य संपत नाही!
या ७१ पानांमधे जो एवढा सगळा महत्वाचा ऐवज फक्तं पन्नास रूपयात आपल्या हाती लागतो तो एकदा वाचून ठेवून देण्यासारखा अजिबात नाही तर त्याची पारायणं करण्यासारखा आणि तो आपल्या कृतीत आणण्यासाठी आहे हे भान कायम ठेवून या मस्तं पुस्तकाला सामोरे जाऊया!
‘पैशाचं स्मार्ट व्यवस्थापन’
होय! मग तुम्हाला काळाचं चांगलं भान आहे असं समजायला काहीच हरकत नाही!!
मात्र त्यासाठी तुम्हाला मैत्रेय प्रकाशनाचं उदय कुलकर्णी लिखित ‘पैशाचं स्मार्ट व्यवस्थापन’ हे पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही!!!
या सर्वार्थानं स्मार्ट पुस्तकाच्या ७१ पानांमधे असा काय ठेवा दडलाय? आज फक्त ५० रूपयांची गुंतवणूक करून हे पुस्तक घेतलंत तर भविष्यात काय परतावा मिळेल याची कल्पना तुम्ही करू शकता काय? माझं सांगणं आहे, त्वरा करा! वेळ वाया घालवणं म्हणजे पुन्हा एकापरिने पैसाच वाया घालवणं नाही का?
केवढा तरी खजिना या पुस्तकात दडलाय! आणि याची सुरवात पहिल्या पानापासूनच होते.अर्पणपत्रिकेतच लेखक आपल्याला आपल्या डोळ्यावरची झापडं काढून टाकायला सांगतो.आपल्या पारंपारिक वृत्तीमधे बदल करणं इथेच अधारेखित होतं आणि आपण सरसाऊन पुढे वाचू लागतो.गुंतवणूक म्हणजे नुसती बचत नव्हे.ती शिस्तीत “स्मार्ट” पणे करायला हवी.समजून उमजून करायला हवी.तिच्यावर जास्तीत जास्त परतावा मिळेल असं बघणं हा आजच्या युगाचा मंत्र हे पुस्तक आपल्याला देतं.कुणाचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही पण निर्णय तुम्हीच घ्यायचा.त्यासाठी आपलं ज्ञान वाढवायला पाहिजे.या पुस्तकाचा शब्दाशब्दात ते दडलंय असं म्हणणं ही अतिशयोक्ती अजिबात नाही.फक्त ते तुमच्या नजरेत यायला हवं आणि त्यासाठी ते एकदा वाचून भागणार नाही तर हॅंडबुकसारखं ते तुमच्या कायम नजरेच्या टप्प्यात मात्रं तुम्ही कायम ठेवायला हवं आणि त्याचा फायदा नक्की मिळवायला हवा!
दूरध्वनीचा तुमचा प्लान योग्य आहे का हे तुम्ही तपासलंय का? विमा पॉलिसी तुम्ही डोळे झाकून घ्याल का विचारपूर्वक? शेअरबाजारात तुम्ही किती गुंतवणूक कराल आणि म्युच्युअल फंडात? या प्रश्नांची प्राथमिक पण समर्पक उत्तरं लेखक आपल्याला देतो हे या पुस्तकाचं एक प्रमुख वैशिष्ट्य!
कर्ज काढून स्वत:च्या मालकीचं घर घ्याच असा लेखकाचा आणखी एक आग्रह.तो ही स्मार्ट गुंतवणुकीचा भाग कसा हे तो सोदाहरण स्पष्टंही करतो!
...आणि ही स्मार्ट गुंतवणुकीची तत्वं आत्मसात करून तुम्ही विमा प्रतिनिधी ते गुंतवणूक सल्लागार कसे बनू शकता म्हणजेच स्वत:चा व्यवसाय हे अंतिम ध्येय कसे गाठू शकता हे त्यासाठी घ्याव्या लागणारय़ा जागरूकतांसह तो स्पष्टं करतो.
मराठी माणसाचं अंतिम ध्येय हे स्वत:चा व्यवसाय उभारणं हेच असलं पाहिजे नाही का? मग तर हे पुस्तक वाचाच आणि त्याच बरोबर शेअरबाजाराचा चढऊतार, गृहकर्जावर आयकर सवलत पुढेही कायम रहाणार आहे का? अश्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्षपूर्वक बघत रहा! अधिक स्मार्ट व्हा!!
Monday, October 26, 2009
"वसा" दिवाळी अंकातल्या माझ्या दहा कविता
Saturday, September 5, 2009
कमीने! आणि विशाल भारद्वाज जॉनर...
Friday, July 24, 2009
खेळणं
माझं
खेळणं
झालं स्वतंत्र
शोधतोय
आठवणींचा फडताळ
उसनी समज पांघरून
म्हणतो
आजपासून
फिसकारणं बंद केलं आहे
खरा बाप होण्याच्या प्रयत्नात आहे...
Monday, July 13, 2009
निळूभाऊ!
निळूभाऊ! तुमच्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू? तुमच्या व्यक्तिमत्वानं रंगमंचावर, पडद्यावर आणि त्याबाहेर भाराऊन जाणं या व्यतिरिक्त काहीच भावना मनात रहात नाही.तुमचं काम डोळेभरून फक्तं पहात रहाणं, बारकाईने पहात रहाणं एवढंच.एकदाच तुम्हाला भेटायचा योग आला तेव्हा तुम्ही सांगत होता ते नाटक बघितल्यामुळे तुम्हाला आठवलेल्या पुस्तकाबद्दल.नाटकातले तुम्ही आणि एरवी वावरणारे तुम्ही.एरवीचं तुमचं निर्व्याज हसणं, तुमचं रिलॅक्स्ड चालणं-बोलणं आणि नाटक-चित्रपटातल्या भूमिकांमधे शिरल्यानंतरचं तुमचं संमोहित करणारं वावरणं.निळूभाऊ! चांगलं, उत्तम असं संपत चाललं आहे असं काहीसं नकारात्मक मनात येत रहातं तुमच्या जाण्यानं.तुम्हाला ते कधीच आवडलं नसतं.नाट्यशिक्षण वेगळं काही नसतं तर आयुष्यभर मिळवलेल्या शिक्षणाचा तो एक भाग असतो.हे आयुष्यभराचं शिक्षण मिळवायला शाळेत जावं लागत नाही तर बरंच काही देण्याच्या मोबदल्यात ते निष्ठेने मिळवायचं असतं.तुमच्या पिढीकडून हे शिकलो आम्ही तरी खूप आहे... सततची तगमग हे चांगल्या माणसाचं भागधेय असतं... ती तगमग शांत व्हावी... तुमच्या आत्म्याला शांती लाभावी... तुमचं काम नक्कीच पुढे चालू रहाणार एवढं वचन आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला द्यावं हीच तुम्हाला श्रध्दांजली...