romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, October 12, 2010

कॉमेडी शो ’मतदारराजा!’

या वेळी मी मनूला लगेच ओळखलं.नेहेमी वेगवेगळी सोंगं काढून मला उल्लू बनवणं हे त्याचं कामच झालं होतं.या वेळी पांढरेधोप कपडे घालून तो दारात उभा राहिला.डोक्यावर गांधीटोपी घातलेला.दोन्ही हात जोडून.मला म्हणाला, “मी उभा आहे!” – “ते दिसतंच आहे!” मी म्हणालो आणि खवचट हसलो.त्याचं ते फवारे उडवून हसणं, जिवणी फा-फाकवणं, वा-वाकून कृत्रिम अभिवादन करणं, तोंडावर दुनियेभरची लाचारी आणणं हे सगळं नसतानाही मी त्याला ओळखलं म्हणून मनातल्या मनात मी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.
तो पुन्हा म्हणाला, “मी उभा आहे!” मी म्हणालो, “च्यायला मग बस की! आज काय पहिल्यांदाच आलाएस?” – “मला वेळ नाहिए बसायला, मी उभा आहे!” तो म्हणाला.मी मनूकडे निरखून बघितलं.अजिबात कुत्सितपणा नव्हता त्याच्या बोलण्यात.मीच जरा तिरकस झालो.म्हणालो, “काय? कुठलं घोडं मारायला जायचंय आज?” मनू आणखी गंभीर झाला.म्हणाला, “राज्या, ही चेष्टेची वेळ नाहिए.बरीच कामं पडलीएत.महापालिकेची निवडणूक लढवणं म्हणजे घोडं मारायला जाणं नव्हे.तुझ्यासारखा सुजाण मतदार जर असा बोलायला लागला-” मी उडालोच! म्हणालो, “थांब! थांब! थांब मनू! काय म्हणालास? तुला तिकीट मिळालं शेवटी? कुणी दिलं? कुणी दिलं सांग मनू? सांग!” सिनेमातल्या बालनटानं हिरोच्या हाताला हिसके मारावेत तसे मी मनूच्या हाताला मारू लागलो.सिनेमातल्या निर्विकार ’मनमोहन कृष्ण’ने डोळे आणखी निर्विकार (?) करत नजर वळवत पुटपुटावं तसं मनू पुटपुटला, “कठीण आहे! या महानगरातली जनता प्रौढ झालीए असं मला वाटत होतं.मनूचे ते डोळे माझ्याकडे वळले आणि मनू बोलू लागला, “अरे कुणाकडून तिकीटं घ्यायची? सगळे राजकिय पक्ष कसे आहेत?” मी उदगारलो, “सगळे एकजात एका माळेचे मणी!” मनू म्हणाला, “आहेत ना? त्यांनी काय भलं केलंय?” माझ्यातला मतदारराजा आता चवताळलाच, “गटारीत टाकलं रे महापालिकेच्या.ते ही अंडरग्राऊंड!” मी म्हणालो.मनूनं विचारलं, “पोरांना खेळायला ग्राऊंड्स आहेत?” मी विचारलं, “अंडरग्राऊंड?” मनू समजूतदारपणे म्हणाला, “नाही रे राजा, प्लेग्राऊंड!” माझ्यातली सद्सद का कसली विवेकबुद्धी आता जागृतच झाली.मी तडफडून म्हणालो, “नाही रे सगळी मैदानं बिल्डर्सच्या घश्यात घातली.हेच नगरसेवक.हेच बांधकामव्यावसायिक.आता आमची पोरं सतत त्या टीव्हीच्या डोक्यावर तरी बसतात किंवा आमच्या तरी!” मनूनं विचारलं, “बरं अत्यावश्यक सेवांचं काय?” मी करवादलो, “अरे सेवा कसल्या? मेवा खायला कुठून कुठून जमा झालीएत सगळी!” मनूनं विचारलं, “कुठून?” मी म्हटलं, “उमेदवारांची यादी बघ यावेळची! अर्ध्याच्या वर परप्रांतीय आहेत! अर्धे उमेदवार पूर्वी असलेल्या नगरसेवकांचे पित्ते आहेत.बायका-मुलं, आया, बहिणी आहेत.जवळजवळ सगळ्यांचं विभागातलं कार्य म्हणजे विभागात रहाणं, तिथेच धंदा करणं, आनंदमेळे भरवणं, वेगवेगळ्या उत्सवांना लोकांकडून देणग्या वसूल करून ते प्रायोजित करणं, झेंडे लावणं, मोठमोठी कामं केली म्हणून बोर्डावर लिहून स्वत:चंच अभिनंदन करणं.त्या बोर्डाला शंभर रूपयांच्या नोटांचा हार घालणं, ’आमचं नेतृत्व’ म्हणून दाखलेबाज चेहेरय़ांच्या पिलावळीनं दादा-भाऊ-साहेबांसकट आपलेही फोटो फ्लेक्सबोर्डांवर झळकवणं, भिंती रंगवणं, हॅंडबिलं वाटणं.हे यांचं सामाजिक काम?” मी मनूलाच लांबलचक प्रश्न विचारला.
मनूनं माझ्या थरथरत्या खांद्याला थोपटलं आणि शांतपणे म्हणाला, “कुणी बदलायचं हे चित्रं?” मी पटकन विचारलं, “कुठलं?” मनू म्हणाला, “अरे असं काय करतोस? हे असं नुसतं बोलून पेटून उठणं सोपं असतं राजा.दर निवडणुकीला असा शाब्दिक पेटून उठतोसच तू.पण तुझ्या हातातच खरी शक्ती आहे बाबा!” मी माझ्या दोन्ही हातांकडे बघायला लागलो! मनू म्हणाला, “हे आहे! प्रत्येक शब्दाचा शब्दश: अर्थ घेतोस तू!” मी गोंधळून मनूकडे बघितलं.त्यानं माझा हात हातात घेऊन पालथा केला.पहिल्या बोटाच्या नखावर दाबत म्हणाला, “इथे फक्त एक शाईचा ठिपका उमटून घ्यायचा.हिच तुझी शक्ती!” मी कळवळून म्हणालो, “अरे नेहेमी उमटवलाय रे! लांबलचक लाईनीत उभं राहून.कुठल्याही पक्षाचा चहा, वडापाव, पुरीभाजी न खाता.आपल्याला हवं तसं सत्याचं राज्य यावं म्हणून.या एकाच हक्कानं आपलं आयुष्य आपल्याला बदलता येईल नाही तर काहीच नाही.फक्त अंधार.एवढी जाणीव ठेऊन.पण भलभलतेच निकाल लागतात रे! वडापाव, पुरीभाजीच काय, दारूसकट सगळंच देणारे निवडून येतात.निवडून आले की आम्हा सामान्य माणसांना ते काय लक्षात ठेवतात? अरय़े महापालिकेसारख्या निवडणुकीच्या निकालाला लगेच चाकू-सुरे निघतात.हे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणार काय रे सभागृहात बसून?” मला पुढे बोलवेचना.मनूच्याही डोळ्यात पाणी तरारलं.आज हे सगळं काही नवीनच होतं.
मनूनंच मला धरून खुर्चीवर बसवलं.शेजारी तो बसला.समजूतदार आवाजात म्हणायला लागला, “राजा, झालं ते झालं.अरे आपण, तू आणि मी मिळूनच हे सगळं बदलू शकतो.फक्त आपला विश्वास पाहिजे.स्वत:वर.एकमेकांवर.आणि विश्वास पाहिजे हे सगळं एक दिवस बदलणारच आहे या गोष्टीवर!” माझ्या खांद्यावर हात दाबत तो म्हणाला, “हे बघ! मी अपक्ष म्हणून उभा रहातोय.स्वखर्चानं.माझी निशाणी आहे आकाश.मोकळं आकाश! तेव्हा तू डोळे पूस आणि मला-” मनूचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच माझा आनंद गगनात मावेनासा झाला.मी हाताची मूठ वर करून जोरात ओरडलो, “ताई माई आक्काऽऽ मोकळ्या आभाळावर-” माझी मूठ वरच राहिली.कुणीतरी घट्टं पकडून ठेवलेली.मी हिसके मारायला लागलो.शेवटी जागा झालो.लोकल ट्रेनमधे होतो.कामावरून घरी परतताना झोप लागली होती.शेजारी बसलेला मनू माझी मूठ धरून उठवत मला म्हणत होता, “अशी स्वप्नं बघायची सोडून द्ये राज्या, नायतर येडा होशील!”
मी खरंच येड्यासारखा मनूच्या चेहेरय़ाकडे बघत राहिलो.मला सत्य काय स्वप्नं काय काहीच समजत नव्हतं!

3 comments:

THEPROPHET said...

जबरदस्त!
एकदम वेगळ्याच रितीनं व्यक्त केलीत सर्वसामान्यांच्या मनातली खदखद!

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

manulaa sagital kaa he? :?

विनायक पंडित said...

Thanks!सगळं मनूच माझ्याकडून वदवून घेतोय हो!मी त्याला काही सांगायला तो वाव देतो का सांगा? हा हा हा हा...