romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, April 2, 2012

पहिलं फोटोसेशन.. जाहिरात.. इत्यादी..

खरं तर लिहू की नको असं झालंय या पोस्टबद्दल.. असं होत नाही कधी.. या आधी ’इंद्रधनुच्या गावा’ या बालनाट्याबद्दल आणि ’झुलवा’ या नाटकाच्या प्रवासाबद्दल लिहिलं. त्याही आधी आकाशवाणी संबंधात लिहिलं होतं. या सगळ्या प्रवासाची सुरवात इथून झालेली होती.
या वाटचालीबद्दल लिहिताना मला स्वत:लाच काही गोष्टी नव्याने कळल्या. त्यावेळी मी त्या त्या घटनांमधे प्रत्यक्ष सहभागी होतो. नाही म्हणायला आता मी बर्‍यापैकी तटस्थपणे या सगळ्या प्रवासाकडे पाहू शकतोय.
मला ठाऊक आहे हे जे मी केलंय ते खूप काही नक्कीच नाही. पहिलं म्हणजे हे करत असताना मला स्वत:ला ते पूर्णपणे नवीन होतं. दुसरं म्हणजे फारसा कसला आधार नसताना, एकदम वेगळ्याच क्षेत्रात, त्यावेळी, वाटचाल करताना सहप्रवासी दोस्त खूप महत्वाचे ठरतात असा अनुभव आला. मी जे केलं त्यातून खूप मोठं म्हणता येईल असं काही अजून उभं झालं नसेल पण त्या त्या वेळी मला हे दोस्त लाभले त्यांची आठवण मनात घर करून राहिली. पूर्णपणे अनिश्चिततेच्या काळात जवळपास माझ्यासारख्याच अवस्थेत असलेल्या दोस्तांनी मला खूप आश्वस्त केलं होतं आणि ते माझ्या दृष्टीनं आजही महत्वाचं आहे.
’झुलवा’ नाटकाचा बहर ओसरला होता. खरंतर माझ्या मनात तो आजही ताजाच आहे. पण व्यवहारात बघायचं झालं तर आता पुढे काय? असा प्रश्न माझ्यासारख्या नवोदितासमोर त्यावेळी उभा होता. हा प्रश्न नवीन काही नाटक करायला मिळणं, नवीन काही शिकायला मिळणं या स्वरूपाचा होता. डोक्यात प्रायोगिक नाटक करायचं पक्कं होतं. व्यावसायिक नाटक करण्याइतकी आपली तयारी झाली आहे का याची खात्री होत नव्हती. दुसरं काहीच नाही, नाटकच करायचं असं डोक्यात पक्कं असल्यामुळे एखादं नाटक करणं चालू नसेल तर प्रचंड अस्वस्थता मनात दाटत असे. काही शक्यता पडताळल्या. त्या शक्यतांनी काही मूर्त स्वरूप घेतलं नाही. आता नव्यानं काही सुरवात करणं भाग होतं. पण ते मनातल्या मनातच रहात असे. भिडस्तपणा आडवा येत असे. ’झुलवा’ नाटकादरम्यान कधीतरी चर्चगेट स्टेशन ते एनसीपीए अश्या चालत्या बोलत्या प्रवासात ’तुझ्यासारख्या अंतर्मुख माणसानं बहिर्मुख व्हायचा प्रयत्न करणं आवश्यक आहे’ असं वामननं (वामन केंद्रेनं) प्रेमानं आणि अधिकारानं सांगितलं होतं. अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी या दोन्ही स्वभावांची सांगड घालणं कसं आवश्यक असतं हे स्पष्टीकरणही त्यासोबत होतं. ते पूर्णपणे पटणारं होतं. फक्त ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता होती. 
अशा पद्धतीने मनाची तयारी होत असताना कधीतरी चंद्रशेखर गोखले भेटला. हो! तोच तो, ’मी माझा’ हा सुप्रसिद्ध चारोळी कवितासंग्रह लिहिणारा. त्यावेळी ’मी माझा’ ची पहिली आवृत्ती प्रकाशित होत होती. मला प्रत्यक्ष शेखरकडून ’मी माझा’ ची प्रत मिळाली होती. पुढे ’मी माझा’ च्या अनेक आवृत्त्या, पुढचे अनेक भाग प्रकाशित झाले. 
मी  कविता करायला लागलो तेही शेखरच्या कविता वाचून, भारावून जाऊन.
त्यावेळी शेखर, मी, आम्ही आपापली वाट शोधत होतो. शेखर त्यावेळी मॉडेल कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होता.
साधा, सरळ स्वभाव, ऋजू व्यक्तिमत्व, वागण्याबोलण्यात मार्दव आणि हे सगळं अगदी खरं. जेन्युईन. शेखरच्या पार्ल्याच्या घरी कित्येक गप्पा झालेल्या आठवतात. शेखर हा व्यवसाय करत होता आणि तो चांगल्या अर्थाने व्यावसायिक होता. खरंतर फोटोसेशन करायचं असं माझ्या मनात नव्हतं पण शेखरनं मला ते कसं आवश्यक आहे हे समजावलं. मालिकांचं युग नुकतंच सुरू झालं होतं. चांगल्या नाटकांचा काळ चालू होताच. त्यानं आशिश सोमपुरा ची ओळख करून दिली आणि माझं पहिलं फोटोसेशन पार पडलं. शेखरनं अगदी त्याचा शर्ट मला घालायला देण्यापासून सगळी मदत केली. आशिश हा प्रथितयश फोटोग्राफर. त्यावेळी त्याची सुरवात होती. त्याच्या स्टुडिओतले त्याने काढलेले चित्रा देशमुख अर्थात नंतर झालेल्या कांचन अधिकारी आणि दुर्गा जसराज यांचे अप्रतिम फोटो अजून आठवतात. शेखरने सुरवातीला अनेक फार्मास्युटिकल ऍड्ससाठी माझं नाव सुचवलं. त्यातली एक इप्का या औषधी कंपनीची होती. यात वेगवेगळ्या वयातल्या डॉक्टरच्या वेशात माझी छायाचित्र घेतली होती. बॅरेटो नावाचा छायाचित्रकार आणि सेशन झालं होतं काचपाडा, मालाड इथल्या एका तयार होत असलेल्या सदनिकेत. त्या छायाचित्रांच्या प्रती मला संग्रहासाठी हव्या होत्या. पण अशा छायाचित्रांच्या प्रती दिल्या जात नाहीत. त्याचं ब्रोशरही बनलं असेल पण ते कदाचित खाजगी वापरासाठी असेल.
काही औषधी कंपन्यांच्या जाहिराती केल्यावर शेखरनं अपोलो टायर्सच्या जाहिरातीसाठी माझं नाव सुचवलं. जाहिरात क्षेत्रातले सुनील रानडे आणि सुप्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळे या जाहिरातीचं संयोजन करत होते. अस्मादिकांचं तेव्हा बिर्‍हाडबाजलं पाठीवर बांधलेलं. पुरेशी तयारी करताच आली नाही. त्यात अपोलो ऍंटी स्कीडटेक टायरचा ३३ अंशाचा कोन! या जाहिरातीत मी ज्या खुर्चीवर बसलोय ती त्या कोनात कललेली दिसते हा आभास नाही! तांत्रिक करामतही नाही! मी माझ्या बुटांच्या टाचांवर खुर्चीला आणि स्वत:ला तोलत ज्याम घामाघूम होत होतो आणि प्रदीप आणि सुनील माझा होसला वाढवत (?) होते. अगदी खरं सांगायचं तर मी दाणकन खाली पडेन म्हणून आणि चांगलीच फजिती होईल म्हणून माझी भीतीनं ज्याम गाळण उडाली होती त्यावेळी! शेखर एवढं करून थांबला नाही तर त्यानं त्यावेळी ’साप्ताहिक लोकप्रभा’ साठी माझी छोटीशी मुलाखतही घेतली होती! फोटोसेशन आणि जाहिरात माझ्या आयुष्यात आलं ते केवळ आणि केवळ शेखर गोखलेमुळे. संघर्षाच्या काळात एक चांगला मित्र तर मिळालाच! पुढे विनय आपटेंबरोबर ’रानभूल’ हे व्यावसायिक नाटक करत असताना त्यांच्या ’ऍडडिक्ट’ या जाहिरातसंस्थेतून एका राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत काम करायला मिळालं. ’टाटारोगोर’ या कीटकनाशकाच्या जाहिरातीत काम करायला मिळालं. ही जाहिरात जालंधर वगैरे प्रदेशात प्रामुख्याने दाखवली गेली.  पूर्वीच्या प्रसिद्ध स्ट्रॅंड सिनेमाच्या जवळ, कुलाब्याला, आरटीव्हीसी- रेडिओ टीव्ही कमर्शियल्स-  नावाची कुसुम कपूर ह्यांची जाहिरातसंस्था होती. या जाहिरातसंस्थेसाठी मला एक विडिओवॅन फिल्म करायला मिळाली. महाराष्ट्र सरकारच्या ’महाबीज’ बियाणांची प्रसिद्धी करणारी, ग्रामीण भागातल्या शेताशेतांमधून दाखवण्यासाठी बनवलेली ही विडिओवॅन फिल्म होती. पारंपारिक मराठी चित्रपटासारखीच कथा घेऊन ही फिल्म बनवली गेली होती. दिग्दर्शक होते, सुरेंद्र हुलस्वार. या जाहिरातपटात जमिनदार खलनायक मला करायला मिळाला होता. जवळजवळ आठदहा दिवस कोल्हापूरला जयप्रभा स्टूडिओ आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात याचं चित्रिकरण झालं. या जाहिरातपटाची विडिओकॅसेट मात्र मिळाली पण त्यावेळी एका पावसाळ्यात अशा कॅसेट्सची बहुदा वाट लागत असे तशी तिची वाटही लागली. 
मी शुटिंगमधे अडकलेलो आणि माझी होणारी पत्नी मुंबईत माझी वाट बघणारी.  लग्नाला महिनाभरसुद्धा उरला नव्हता..
आरटीवीसीमधे मला नेलं त्यावेळचा माझा मित्र सुरेश चांदोरकरनं. त्यानं मला रेडिओस्पॉट्ससुद्धा मिळवून दिले. त्यातला एक व्हिक्स वेपोरबचा रेडिओस्पॉट विनय आपटेंबरोबर होता. त्यात एक गाणं- जिंगल होतं. ते सुरेशनंच रचलं. त्याचं ध्वनिमुद्रण त्यानेच जमवून आणलं. सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठे ती जिंगल गायले. आमच्याकडे सगळंच तुटपुंजं होतं पण रविंद्र साठेंनी अगदी तुणतुणं जुळवण्यापासून इतकी मदत केली की त्यांचे केवळ आभारच मानले पाहिजेत! व्यावसायिकतेचा- चांगल्या व्यवासायिकतेचा हा आणखी एक अनुभव..
आरटीवीसीमधे कुमार हुलस्वार नावाचे ध्वनिमुद्रक होते. त्यानी माझ्या आवाजाचा नमुना खास ध्वनिमुद्रित करून घेतला. त्या बळावर मला हिंदी रामायणाच्या रेडिओ मालिकेत वॉईसिंग करायची संधीही मिळाली. या वाटचालीत शेखर, आशिश, सुरेश, कुमार हुलस्वार, विनय आपटे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच!
अगदी अलिकडे दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका राजकीय पक्षासाठीच्या ऍडकॅम्पेनसाठी अचानक रात्री नऊदहा वाजता बोलवलं गेलं. एक उद्योगपती सरकारच्या धोरणांबद्दल (चांगलं) बोलतो. सत्ताधारी पक्षासाठीची जाहिरात. हा अनुभव मात्र त्रासदायक होता. रात्रभर चित्रिकरण होत राहिलं. मी आणि बोलवलेला मॉब रात्रभर त्याच त्या ओळी अक्षरश: रटत राहिलो. मला इतकं रटत, बोलत ठेवलं की मध्यरात्रीनंतर कॅमेरा ऑन झाल्यावर मला काही आठवतच नाही असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालं. हे त्या रात्री बराचवेळ होत राहिलं. त्या अमुक एवढ्या सेकंदांत जाहिरातपट, निवेदन बसवण्याचा आटापिटा करत असलेला तो दिग्दर्शक बघून मला हसावं की रडावं तेच कळेनासं झालं. आयुष्यात पहिल्यांदा, कधी एकदाचं हे सगळं संपतय, असं सतत वाटत राहिलं. पुढे ही ऍड कॅंपेन- म्हणजे उद्योगपती, नोकरदार, गृहिणी, शेतकरी वगैरे असलेली ही जाहिरातमालिका, टीव्ही वाहिन्यांवर प्रकाशित झाली. माझा भाग, मला धरून काही जणांना बघायला मिळाला.. असं हे सगळं जाहिरात, फोटोसेशन जगतातलं माझं एक्सकर्शन (?) :D  
     



 

2 comments:

Shriraj said...

:) Post majedar ahe.. Mazyasathi hi navinach mahiti hoti

विनायक पंडित said...

स्वागतम! :D अगदी खरंय श्रीराज! मलाही तेव्हा हे सगळं नवीन होतं. दुसरं म्हणजे, सगळं मजेदार वृत्तीनं घ्यावं नाही? सुसह्य होण्यासाठी? :) अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार!