romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, October 4, 2010

कॉमेडी शो “सहकारी पतपेढी अमर्यादित!”

असं काही असलं की मनू सर्वात आधी माझ्याकडे येतो.आधी न हसता म्हणतो, “तू मला लकी आहेस रे! तुझ्यापासून सुरवात म्हणजे माझी भरभराट!” मग जिवणी फाकवून हसत म्हणतो, “अतिशय साधा आहेस रे तू! सुरवात तुझ्यापासूनच!” अतिशय साधा म्हणजे मनूच्या भाषेत बावळट हे मला पक्कं माहित असतं पण प्रत्येक वेळी तो डाव साधतोच.या वेळीही अतिशय साधा म्हणून त्याने एका अर्जावर माझी सही घेतलीच.
मनूच्या पुढाकाराने गल्लीत सहकारी पतपेढी चालू करायचं ठरलं.ठरलं म्हणजे काय मनूनंच ठरवलं.रोजच्या झकाझकीत असली झेंगटं करायला वेळ कुणाला आहे? असं मी मनातल्या मनात म्हणालो पण मनू मनकवडा आहे.त्यानं माझ्या डोक्यात टप्पल मारली आणि म्हणाला, “झेंगट! पतपेढीला, या सहकारी पतपेढीला झेंगट म्हणतोस?” अशी सुरवात करून मला जांभई येऊन माझी मान सारखी कलायला लागेपर्यंत भलमोठं लेक्चर दिलं.सहकारी चळवळीबद्दलचं.मनूचं बोलणं सुरू झालं की घड्याळाचे काटेही संथ होतात.मला पूर्णपणे पिळल्याशिवाय तो थांबत नाही.फारच थोड्या काळात तो सहकार महर्षी होणार याबद्दल माझ्या काय, गल्लीतल्या कुणाच्याच मनात आता संदेह राहिला नाही.मी सही केल्यावर प्रत्येकानं त्या पतपेढीच्या अर्जावर सही केली.
’चळवळ सहकारी पतपेढी मर्यादित’ असं डॅशिंग नाव मनूनं शोधून काढलं आणि एका बुजुर्ग गल्लेकरय़ाच्या हातून मुहुर्ताचा नारळ फुटला.पटापट प्रत्येकानं खातं उघडलं.मनू पैसे मोजत राहिला.सहा महिने झाले आणि मनूनं प्रत्येक खात्यावर व्याज तर दिलंच पण आम्हा प्रत्येकाला बोलावून, आहेर देतात तसं, एक हात पुसायचा टॉवेल आणि बॉलपेनही दिलं.आम्हा सभासद मंडळींचा आनंद गगनात मावेना.अजूनही आम्ही त्याच टॉवेलनं हात पुसतो.बॉलपेनं आम्ही तेव्हाच शोकेसमधे ठेवली.
वर्षं झालं तेव्हा मनूनं गांधी जयंतीला स्थानिक नगरसेवकाच्या हस्ते सत्यनारायण पूजा घातली.दोन वर्षं झाली तेव्हा विनोबा जयंतीला गृहराज्यमंत्री आणि तीन वर्षं झाली तेव्हा जयप्रकाश नारायण जयंतीला डायरेक्ट महसूल मंत्र्यांनाच बोलावलं.एव्हाना चांगला महसूल गोळा झाल्यामुळं ’चळवळ’चं आणि मनूचं दोघांचंही चांगलंच नाव झालं होतं.
मनू सरकारदरबारी मांडीला मांडी लावून बसायला लागला.त्याच्याबरोबर चार्टर्ड अकाऊंटंट्सचं एक आख्खं पथक असायच.सभासद पतपेढीला खजिना समजायला लागले.व्याजाची मलई खाऊन शांत झोप लागत होती.बाकी झकाझकीचं सगळं मनू बघत होता.सभासदांनी सगळे अधिकार मनूच्या हातात दिले.मनू बोले आणि ’चळवळ’ हाले अशी परिस्थिती होती.
मग मनूनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.’फायनान्स अनलिमिटेड’ नावाची आणखी एक कंपनी काढली.लोकांना घरासाठी कर्ज देणारी.गल्लीतले आम्ही घरात रहातच होतो.कुठल्याही माईच्या लालमधे नवीन जागा घेण्यासाठी ताकद कुठून येणार? कर्ज घेतलं तरी ते फेडावंच लागणार.सामान्य असल्यामुळे आम्हाला ते फेडल्याशिवाय चैन पडणार नाही.मग घ्याच कशाला ते! गल्लीतल्या लोकांसाठी स्थापन झालेल्या पतपेढीतले पैसे या नवीन कंपनीत फिरवले जावेत ही मनूची आयडिया.त्याचा आम्हाला काय फायदा होणार होता? भाजीवाल्याशी एक-दोन रूपयांसाठी घासाघाशी करणारे आम्ही, आमची पतपेढी मनूच्या घशात सारून रिकामे झाले होतो.एवढ्या तेवढ्यावरून एकमेकाशी अरे ला कारे करणारय़ा एकाही शहाण्याने या व्यवहारात काही गैर आहे असं म्हटलंच नाही.मनू तोपर्यंत एका मजबूत राजकारणी पक्षाच्या कमिटीमधे जाऊन बसला.
एके दिवशी अचानक पतपेढीत मरणाची गर्दी झाली.ती बघितल्यावर मग आमची धावाधाव सुरू झाली.लोक पटापट पैसे काढून घेण्याच्या खटपटीत होते.कुणी कुणाला काय झालंय ते सांगत नव्हता.’माझे’ पैसे मिळाल्याशी मतलब.पतपेढी बुडणार हे आता गुपित राहिलं नाही.’कुणाचेही पैसे बुडणार नाहीत’ असा फलक पतपेढीच्या दारात लागला आणि आम्हाला कळलं पतपेढी बुडाली.
एक मात्र झालं.कधी नाही ते आमच्या गल्लीचं नाव पेपरात आलं.कधी नाही ते मनूचा घारय़ा डोळ्याचा, दाढी वाढवलेला फोटो पेपरच्या पहिल्या पानावर झळकला.मनूच्या कारकिर्दीतली ही केवढी मोठी अचिव्हमेंट.जेमतेम गल्लीला माहीत होता तो तो एकदम दिल्लीपासून जागतिक बॅंकेपर्यंत सगळ्याना माहिती झाला.पतपेढी बुडवण्यासाठी त्याने नक्की काय केलं ते आमच्या कुणाच्या नक्की ध्यानात आलं नाही पण त्यानं आमचे पैसे खाल्ले.आम्ही दिवसरात्र डोक्याला हात लावून बसू लागलो.चुकून झोप लागली तर दचकून जागे होऊन आपापसात चर्चा तेवढ्या करत राहिलो.आमच्या हातात आणखी काय होतं? मनूच्या हातात बेड्या पडाव्यात असं मात्र मनापासून वाटत होतं.मनूविरूद्ध साक्ष द्यायला सांगितली असती तर प्रत्येकानं तोंडात मिठाची गुळणी धरली असती.पैसेही नकोत आणि कोर्टाची पायरही चढायला नको!
सगळीकडे बभाल झाल्यावर नाईलाजाने विरूद्ध पक्षाने आमच्या या पतपेढीचा प्रॉब्लेम ताणून धरला.सत्तारूढ पक्षाला नाईलाजाने कृती करणं भाग पडलं.मोठ्या थाटामाटात मनूच्या अटकेचं नाटक पार पडलं.मनूच्या समर्थकांनी यावेळी वाटेत येईल त्याला वार्ताहर, प्रेस फोटोग्राफरपासून रस्त्यावरचा भाजीवाला आणि कामावर चाललेल्या आमच्या गल्लीतल्याच काही जणांना यथेच्छ बुकललं आणि मनूवरची आपली निष्ठा प्रकट केली.
त्यानंतर मग नाटकाचे इतर प्रवेश सुरू झाले.अटकपूर्व जामीन, मनूला प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमधे भरती करणं, मग दोन वर्षांनी खटल्याची तारीख पडणं, साक्षीदारांच्या साक्षी, त्यांचं उलटणं, सत्तारूढ आणि विरोधी यांची ’तू मार मी रडल्यासारखं करतो’ अशी लुटुपुटुची युद्धे, सहकारक्षेत्र बजबजलेले आहे काय? यावर मान्यवरांचे परिसंवाद.आम्ही त्यात इतके गुंतून गेलो की आपले पैसे आता काशीत गेलेत याचं भानही राहिलं नाही.
यथावकाश मनूची ’निर्दोष’ सुटका झाली तेव्हा आमचेच काही गल्लीकर त्याच्या स्वागताला गेले.
आता मनू बाजूच्याच गल्लीत नवी पतपेढी उघडणार आहे.
तो आला की तुम्ही नक्की अर्ज भरणार याची मला खात्री आहे.
पतपेढ्या मर्यादित असल्या तरी आपला त्यांच्यावरचा विश्वास अमर्यादित आहे हे नक्की!

1 comment:

Dewan-Ghewan said...

Lekh chaan aahe. patpedhi kashi chalte kalale.

dhanyawad.

http://mnbasarkar.blogspot.com