romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, June 2, 2012

एक बाग...

एक मंदिर ह्या, या आधीच्या लेखांकानंतर एक बाग हा लेखांक अगदी अपरिहार्य. असं माझ्या मनात होतं. दोन्ही लेखांकातला अवकाश मात्र चांगलाच लांबला. तर.. ही एक बाग त्या एका मंदिरा पासून अगदी हाकेच्या अंतरावर. तिथे प्रत्यक्ष गेल्यावर हा, या दोन स्थळांच्या जवळीकीचा योगायोग जरा स्तिमितच करतो. मग एक सूक्ष्म विचार येतो अमृतसर या शहराच्या भागधेयाचा.

एक बाग..  एक मंदिर.. 
एक धर्म.. एक स्वातंत्र्य.. 
आणि बाकी इतिहास.. 
कशाचा?... सामान्यांच्या संहाराचा??..

धर्मयुद्धाचा किंवा स्वातंत्र्ययुद्धाचा एखादा महत्वाचा तुकडा असलेल्या घटना. जालियांवाला बागेतला जनरल डायरचा हैदोस असेल किंवा ऑपरेशन ब्ल्यू स्टार असेल. या घटना परिस्थितीचा अपरिहार्य परिपाक असतात. एकूण इतिहासात अशा घटनांची कमी नाही. या दोन्ही घटनांची तुलना करायची का? तेही या लेखांकाचं लक्ष्य नाही. पण जाणवणारं साम्यही नाकारता येत नाही. विशेषत: सामान्यांचा संहार. सगळ्याच दृष्टिनं होणारा. त्रासदायक होऊ लागतो. ते अमुक एका ध्येयाच्या मार्गावरचं बलिदान जरूर ठरत असेल. त्याचं दु:ख बोचत रहातं खरं..
जालियांवाला बागेच्या कमानीतून प्रवेश करतानाच ते ठळकपणे जाणवू लागतं. सुरवातीच्या मार्गिकेत आहेत त्या नरसंहारी इतिहासाचे पुरावे. इथे फोटो काढायला मज्जाव आहे. जालियांवाला बागेतला नरसंहार, पेटून होळी झालेलं शहर, नागरिकाला जवळ जवळ नग्न करून त्याच्या पार्श्वभागावर ब्रिटीश सैनिकांचे उठत असलेले कोरडे, भर रस्त्यातली फाशी अशा कृष्णधवल छायाचित्रांच्या मोठ्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत. जुनी पत्रं आहेत. हरामखोर ब्रिटीश अधिकार्‍यांची, सरकारची. तसंच स्वातंत्र्य सैनिकांचे, नेत्यांचे लेख आहेत जुन्या वर्तमानपत्रांमधले. स्कॅन इमेजेस लॅमिनेट करून दर्शवलेल्या स्वरूपात. पुस्तकात वाचलेल्या इतिहासापेक्षा या प्रतिमांमधून दिसणारा इतिहास अंगावर काटा आणतो. रक्त खरंच पेटवतो. त्या छोट्या, अंधार्‍या मार्गिकेत तयार झालेल्या प्रदर्शन स्वरूपातल्या सभागृहात आपण उजवीकडून डावीकडे कधी फिरत गेलो ते कळत नाही. एवढा मोठा पल्ला पार पाडताना श्वास रोखलेला रहातो. आपण गांधीजींचं निवेदन वाचतो. जनरल डायरचं त्या घटनेच्या कितीतरी नंतरचं ’शक्य असतं तर अजून माणसं मारली असती!’ असलं पराकोटीचं राक्षसी वक्तव्य वाचतो. त्याचा म्हातारा झालेला फोटो- स्कॅन प्रतिमा- बघतो. सरतेशेवटी क्रांतिकारी उधमसिंगाचा फोटो आणि त्याचं कार्य वाचतो. हिंसेला अखेर हिंसेनंच प्रत्त्युत्तर द्यावं लागतं हे ऐतिहासिक सत्य डोळ्यासमोर उभं रहातं. मग मनात एका बाजूला सुभाषबाबू उभे रहातात. एका बाजूला गांधी...
आजवर अनाम असलेले अनेक क्रांतिकारी इथे नावानिशी आणि प्रतिमांनिशी आपल्या चक्षूंसमोर उभे केलेले आहेत. एकादोघांची तर अंत्यदर्शनं आहेत. या एवढ्याशा अंधार्‍या मार्गिकेत माझ्यासारखे अनेक सामान्य अचंबित होतात, भेदरतात, राष्ट्रप्रेमाने भारून जातात, ब्रिटीश सत्तेबद्दल आणि पर्यायाने शोषणकर्त्यांविरूद्धचा पराकोटीचा तिरस्कार मनात भरून रहातो. बरोबरीने आत्ममग्न व्हायला होतं. आजूबाजूला गर्दी आणि आपण स्वत:च्या आत अगदी खोलवर पोचलेलो असतो. 
मनाचं खरंच काही खरं नसतं. त्या मार्गिकेतून पाय निघत नसतो आणि कुठेतरी गोध्रा दंगलीतला तो डोळ्यात पंचप्राण आणि अश्रू आलेला, हात जोडून भीक मागणारा, जखमी दंगलग्रस्त अगदी क्षणभरासाठी का होईना डोळ्यासमोरून तरळून जातो..
मागून रेटा चालू होतो. स्थलदर्शन पूर्ण व्हायचं असतं. अंधार्‍या मार्गिकेतून आता पुढे जाण्याची सूचना होत असते. मूळात बाग नसलेली एक बाग. जालियांवाला बाग. वस्तीतल्या काही घरांमधली मोकळी अंगणवजा जागा. ज्यात वस्तीकर या ना त्या सभेसाठी जमायचे.
आज एक प्रदर्शनस्थळ म्हणून उभ्या केल्या गेलेल्या प्रकाशमान हिरव्यागार बागेकडे आपण प्रस्थान करतो. अंधार्‍या मार्गिकेतून उन्हानं चांगल्याच उजळून निघालेल्या हिरव्याकंच बगिच्याकडे. एरवी सरकारी अखत्यारीतल्या स्थळांचं काही खरं नाही असं आपण म्हणतो. पण इथे रचनाच अशी झाली आहे- ती हेतूपूर्वक केली असेल असं वाटत नाही- की पाताळलोकातून भूलोकात यावं आणि आशेच्या किरणांवर स्वार होऊ लागावं तसं काहीसं होऊ लागतं. भविष्यात चांगल्या गोष्टीही असतात याची ग्वाही देणारी ही रचना वाटते खरी. हे सगळं माणूससापेक्षही असतं. त्या त्यावेळच्या आपापल्या भावना, स्थळांचे ते ते अर्थ लावत असतात.
खरंतर भरवस्तीतली ही बाग. पण यात खार भेटते, सुंदर पक्षी सुद्धा भेटतात. बागेच्या भोवतालात उभ्या असलेल्या विटांच्या भिंतीतली त्यावेळच्या अमानुष गोळीबाराची छिद्रं लक्ष वेधून घेतात. ती रेखांकीत केलेली आहेत. बागेचं प्रवेशद्वार रोखून केलेल्या या गोळीबाराचा लांबलचक पल्ला जाणवतो. अमानुष हिंसेच्या त्या अप्रत्यक्ष दर्शनानं पुन्हा मन पेटून उठतं.
 तोपर्यंत आपण त्या शहीदी कुव्याजवळ आलेलो असतो. गोळीबार सुरू झाल्यानंतर काय काय होईल या भीतीने अनेक महिलांनी आपापल्या मुलींसकट, बाळांसकट या कुव्यात उड्या ठोकल्या!
अलिकडचा.. रहावत नाही.. पण संदर्भ मनात जागून जातो.. अलिकडच्या एका दंगली जळीतात विशिष्ट धर्माच्या गरोदर महिलेवर बलात्कार करून तिचा गर्भ बाहेर काढून तो भाल्याच्या का तलवारीच्या पात्यावर टोचून मिरवला गेला होता.. वृत्तपत्रांच्या भाषेत इथे कथित महिला, कथित घटना इत्यादी म्हणायचं! आणि मिरवणार्‍यांना काय म्हणायचं? कथित राक्षस, कथित धर्मांध? आणि तो कथित की कसला पराकोटीचा धर्मांधी अविष्कार कुणा एका असहाय्य गरीब मातेवर? त्या महिलेला असला एखादा कुऑं जवळ करता आला असता तर किती बरं झालं असतं असं वाटलं नसेल?
जालियांवाला हत्याकांडातल्या हुतात्म्यांचं स्मारक आणि सरतेशेवटी एका खाजगी आस्थापनानं, स्वत:च्या जाहिरातीसाठी का होईना तेवत ठेवलेली अखंड अमरज्योति दिसते..
निघायची वेळ झालेली असते. मनातलं सगळं झाडून टाकून आपण पुन्हा एकदा हिरव्यागार, पशुपक्षी असलेल्या, उत्तम हुतात्मा स्मारक आणि प्रतिकात्मक ज्योत असलेल्या बागेवर नजर फिरवतो...
सुरवातीच्या त्या अंधार्‍या मार्गिकेतून आल्यामुळे असेल, नंतरची ही बाग आणखीनच उजळलेली वाटू लागते..
दुसर्‍या दिवशीचा कार्यक्रम आठवू लागतो.. अमृतसर शहराचं भागधेय पुन्हा एकदा जाणवतं. शहरापासून फक्त पस्तीस किलोमीटरवर आहे अत्तारी गाव. भारताच्या सीमेवरचं शेवटचं गाव आणि मग अत्तारी-वाघा बॉर्डर.
कुंडलीवर विश्वास असेल आणि शहराचीही एखादी कुंडली असत असेल तर अमृतसर शहराची कुंडली एकदा तपासून बघायला हवी..    

        

Monday, May 21, 2012

एक मंदिर..

एक मंदिर
शहराच्या मध्यभागातलं.. तळ्याच्या पार्श्वभूमीवरचं.. त्याची रचना करतानाच सगळं लक्षात घेऊन रचना केलेली.. प्रवेश कमानीतून आत शिरतानाच मंदिराचं लांबवर दिसणं.. स्वच्छ तळं.. पांढर्‍या शुभ्र इमारतींचा भोवताल.. केवढा मोठा परिसर.. तो सतत तसाच शुभ्र ठेवणारे सतत राबते स्वयंसेवक.. ध्वनिक्षेपक चालू पण ते प्रसारित करतात फक्त गायली जाणारी संयत सुरातली भजनं.. गर्दी पण नकोसा रेटा नाही. रांगेत सारं व्यवस्थित. आपलेच लोक रांगेत गजबज करणारे (पुण्याबिण्याकडच्या भक्तीणी?) बराच वेळ वाट बघून एक वृद्ध भक्त सरदारजी त्याच्या मागे उभ्या असलेल्या तरूणाला मला सांगायला सांगतो, त्या नको तिथे नको त्या गप्पा मारून शांततेचा भंग करणार्‍याना कृपया गप्प बसायला सांगा. आम्ही खूप लांबून दर्शन घ्यायला आलो आहोत. महिलांना ते सांगितल्यावर त्या चिडीचूप. अमृतसरच्या स्वर्णमंदिर अर्थात हरमंदिरसाहिबचं पहिलंच दर्शन प्रचंड सुखावणारं. प्रवेश घेतानाचीच वहातं पाणी असलेली कृत्रिम घळ. त्यात पाय बुडवून त्यापुढच्या लांबलचक हिरव्या काटेरी पायपुसण्यावर पाय पुसून कमानीत शिरायचं. तरीही पायाला राहिलेल्या पाण्याने अस्वच्छ होणार्‍या संगमरवरी पायर्‍या तत्परतेने पुसणारे सेवक/सेविका. कमानीतल्या उतरत्या पायर्‍यांवरून समोर लांब दिसणारं, तळ्यातलंच वाटणारं लोभसवाणं स्वर्णमंदिर. लांबलचक रांग तरीही शिस्तीत उभी राहिलेली जनता. कानावर पडणारं भक्तिरसपूर्ण गायन. वाटेत, मंदिरात, आत कुठेही कुणाच्या तसबिरी नाहीत, हे ह्यानं दिलं, ते त्यानं असा जिथे तिथे असणारा उल्लेख नाही. मला सगळ्यात आवडलेलं वैशिष्ट्य शीखपंथाचं ते म्हणजे त्यांचा सर्वेसर्वा गुरूग्रंथसाहिब! विविध शीखगुरूंनी संपादित केलेला ग्रंथ सर्वोच्चपूजनाचं स्थान ठरणं यातच केवढी सूचकता आहे, नाही? कुठल्याही गुरूची तसबीर, त्याच्या जीवितकार्याचा तपशील मंदिरात कुठेही दिसत नाही याची त्याला जोड! खरंच नतमस्तक व्हावसं वाटलं. तळमजल्यावरची समाधी, वरच्या मजल्यावरचा भलाथोरला गुरूग्रंथसाहिब आणि त्याशेजारचं अकाल तख्त याखेरीज लंगर इत्यादी प्रत्यक्ष बघायला मिळालं नाही.
आत शिरल्यावर एक कचकच, एक सलसुद्धा मनाला बोचत होता. तो होता ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा! कारणं काहीही असोत अशा पवित्र ठिकाणी प्रचंड नरसंहार झाला. त्यातून आणि काय काय उद्भवत गेलं.. खूप वाईट वाटलं..
आज बघताना सारं चित्र कसं छान दिसतंय पण अकाली-निरंकारींमधल्या दंगली आणि खलिस्तान चळवळीने घेतलेलं उग्र रूपही यामागे आहे ह्याचा विचार अस्वस्थ करतो. धर्म म्हटला की त्याचा अतिरेक करायचाच असं काहीतरी आपल्या देशाचं विधीलिखित आहे का?  

Saturday, May 12, 2012

अमृतसरीयां दी हॅट्टी!

हे शीर्षक मात्र वेगळेपणासाठी दिलंय हे सुरवातीलाच कबूल करतो! :) म्हणजे लिहायचंय अमृतसरबद्दलच. शिवाय हट्टी की हॅट्टी (Hatti) याबद्दल साशंक आहे. ती शंकाही कुणी दुरूस्त केल्यास स्वागत. इथली हट्टी पंजाबीतली आहे हं मराठीतली नव्हे. मराठीतल्या हट्टीशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही. (असं मीच आपलं माझ्या मनात म्हणतो! :D) पंजाबीतली हॅट्टी किंवा हट्टी म्हणजे दुकान. पंजाबी भाषा खरंतर अजिबात कळत नाही पण दुकानांवरचे गुरमुखीतले फलक बारकाईने बघितल्यावर ते हॅट्टी असावं असं वाटलं. प्रदेशातल्या बर्‍याच दुकानांवर ’बब्बी दी हॅट्टी’, ’अमृतसरीयां दी हॅट्टी’, ’खन्ने दी हॅट्टी’ अशी नावं किंवा उपनावं आढळतात. हट्टी- हॅट्टी मधे काय बरोबर ते जाणकार सांगतीलच. पण मी इथे केवळ दुकानांबद्दल नाही सांगणार. अमृतसर बाय रोड किंवा रस्तामार्गे अमृतसर असा थोडासा अनुभव घ्यायला मिळाला त्याबद्दल सांगेन.
प्रवासवर्णन या प्रकाराचं काय करायचं हे तुमचं एव्हाना ठरलं असेलच. म्हणजे ज्याला कुणाला वाचावसं वाटतं, वाटत नाही किंवा मधे एका सार्वजनिक संस्थळावरच्या चावडीवर प्रवासवर्णन इत्यादीवर साफच काट मारून तात्विक (?) इत्यादी वादसंवाद करून नेमकं भाषाविषयक ज्ञान वाढवण्यावर भर देण्याची सल्लावजा सूचना दिली गेली तसे तुम्ही असाल; जसे असाल त्याप्रमाणे या, वाचा, प्रतिसाद द्या. आपणा सर्वांचंच इथे स्वागत आहे! आज मात्र निदान सुरवात तरी आम्ही आलो, पोचलो, विसावलो इत्यादी पद्धतीची, ठोकळेवजा प्रवासवर्णनात असते तशीच असणार, हेही आधीच जाहीर करतो! :) ठोकळेवजा अनुभव, ठोकळेवजा भाषा, ठोकळेबद्ध की काही भाषा अभिव्यक्ती असं सगळं काहीतरीही त्या ’तात्विक’ इत्यादीतलं असणार हे तुम्ही ओळखलं असेलच. एखाद्या भाषावृद्धीविषयक (तात्विक) चर्चेमुळे एखाद्या ब्लॉगर म्हणवून घेणार्‍याच्या असलेल्या डोक्याला चालना मिळते ती अशी! असो! :D आपण चाललो होतो अमृतसरच्या रस्त्याने. तात्विक इत्यादी वळण सध्या घेण्यापेक्षा स्वभावधर्माप्रमाणे सरळच जाऊ. काय?
दुसरं म्हणजे या लेखांकात चित्रं वगैरे असतीलच असं नाही. असतील तर कमी असतील. नाहीतर आपली स्वत:ची स्टाईलछाप चित्रं वगैरे टाकतात बॉ! असा आणखी गोड न भासणारा इत्यादी गैरसमज!.. तरीही असो! अमृतसर!
दिल्लीच्या हजरत निजामुद्दिन (हे जरा धाडसानंच लिहितोय कारण सुरवाती सुरवातीला ह वरून जी सुरवात करायचो ती पहिल्या शब्दातली उरलेली तीन अक्षरं आणि पुढच्या शब्दातला नि गाळून थेट पुढेच जायचो. मग जो उच्चार व्हायचा तो चारचौघात होणं अप्रस्तुत. तोंडात मारल्यासारखं होतं हो. भाषा जीभेवरही चांगली खेळली पाहिजे असाही (तात्विक?) उपदेश मिळाला. तेव्हा कुठे हे लिहिणं जमलंय.)
तर हजरत निजामुद्दिन रेल्वेस्थानकावरून टॅक्सी करायची की रिक्षा? नक्की कशात लुटणार नाहीत किंवा कमी लुटतील हा तिढा महत्प्रयासानं सोडवून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचणं मग तिथल्या  वेटिंगरूममधे जागा मिळवणं, राखणं, सामान राखणं- आपलं आणि क्वचित दुसर्‍याचंही- आणि पुढल्या गाडीची वाऽऽट पहात रहाणं असा स्वत:चाच पार ’गोदो’ करून घेतल्यावर दिल्ली-अमृतसर शताब्दीनं कब्जा घेतला. रेल्वेचे आभार मानावे असं वाटलं. सुंदर आणि प्रशस्त डबे, नाश्ताजेवणाची उत्तम आणि तत्पर सोय, नशीबाच्या साथीमुळे सहप्रवासीही जवळजवळ उत्तम. कुर्सीयान असूनही अमृतसरपर्यंतचा प्रवास छानच झाला. शीतल वातानुकुलतेची साथ होतीच. भल्यामोठ्या टिंटेड खिडक्यांच्या काचांमधून प्रदेशाचा फील :) इत्यादी घ्यायलाही सुरवात झाली. सोबतीला लुधियाना, जालंधर इत्यादी दरम्यानच्या स्थानविशेषांबद्दलची ध्वनिमुद्रित माहिती रेल्वेद्वारे प्रसारित केली जात होती. रेल्वेचा एकूण उपक्रम खरंच आवडला.
हो हो हो अजून अमृतसर बाय रोड- रस्तामार्गे अमृतसर बाकी आहे- लक्षात आहे माझ्या!
अमृतसरला म्हणजे अमृतसर रेल्वेस्थानकावर सर आले होते. प्रवासी कंपनीचे प्रतिनिधी (हे प्रतिनिधी म्हणणं म्हणजे खरंतर ठोकळेबद्ध. मला म्हणायचंय टूर एस्कॉर्ट, व्यवस्थापक असे सर्वेसर्वा) तर सर दोन होते. दोघांनी पटापटा सामान उचलायलाच सुरवात केली. दौरा संपेपर्यंत हे आणि त्यांचे असिस्टंट्स- सहाय्यक कुणाही प्रवाशाला त्याचं सामान उचलू देत नाहीत. त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच! मग टेंपो ट्रॅव्हलर. रस्ताप्रवास सुरू! रात्रीचे पावणेअकराबिकरा झाल्यामुळे काही स्पष्ट होत नव्हतं. बरं मात्र वाटत होतं. बघता बघता गाडी भल्यामोठ्या राष्ट्रीय महामार्गावर आली आणि शेतजमीनीसारख्या गवताळ जमिनीवर अंतराअंतराने बांधलेल्या टूमदार बंगल्यांकडे खडकाळ रस्त्यावरून खडखडत निघाली. हॉटेलवर पोचली.
दुसर्‍या दिवशीच्या नाश्त्याच्या वेळी हॉटेल मालकांची ओळख करून देण्यात आली. चाळीशीचे, उमदे पंजाबी गृहस्थ. हिंदी- इंग्रजी चक्कं पंजाबी ढंगाने न बोलणारे, उच्चशिक्षित. गेल्या चार पिढ्यांचा धंद्याचा इतिहास. हे वाट वाकडी करून वेगळ्या धंद्यात. बोलायला लागले. बोलणं मात्रं जरा अतिशयोक्तीपूर्ण (पंजाबी ढंगाचं?) जरा नाटकीय वळणं असलेलं.
ज्या राष्ट्रीय महामार्गावरून आत आलो तो महामार्ग म्हणजे अगदी पूर्वीचा शेर शाह सुरी मार्ग आणि त्यानंतरचा ग्रॅंड ट्रंक रोड आणि सध्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १! त्याचा डौलही तसाच. प्रशस्त मार्गिका. ज्या ज्यावेळी आम्ही तिथून गेलो तेव्हा फारशी वर्दळ नाही. त्यामुळे सुसाट वेगानं पळणारी वहानं. पार अफगाणिस्तानातून इथे सुकामेवा इत्यादी येतो. भारत पाकिस्तान व्यापार या हमरस्त्यावरूनच चालतो. दिल्ली-लाहोर बससेवा इथूनच मार्गस्थ होते हे वेगळं सांगायला नको. आमचं हॉटेल अमृतसर शहरापासून ७ किलोमीटरवर आणि हॉटेलपासून वाघा बॉर्डर फक्त ३५ किलोमीटरवर. पाकिस्तान फक्त पाऊण तासावर! वाघा बॉर्डरमधलं वाघा पाकिस्तानातलं, अत्तारी आपल्याकडचं. या प्रशस्त मार्गिकांवरून दोन्ही देशांमधल्या रेषेपर्यंत जाताना बंगले इत्यादी मागे पडायला लागतात. सैनिकी वसाहतींद्वारे सैनिकी मालकीचा प्रदेश सुरू होतो. हळूहळू फक्त गवताळ पठार उरतं आणि मग भारताचं प्रवेशद्वार- खरं गेटवे ऑफ इंडिया- दिसायला लागतं. हॉटेलमालकानं तितक्यात तुमचं मुंबईचं ताज समोरचं गेटवे खरं गेटवे ऑफ इंडिया नव्हेच अशी पंजाबी चिमटावजा मल्लीनाथी केलीच.
नंतरचं रस्तामार्गे अमृतसर होतं शहरात सुवर्णमंदिर, जालियांवाला बागेकडे नेणारं. पहिल्याच प्रवासात या स्थळांवर पोहोचण्याचीच उत्सुकता जास्त होती. धाब्याची, नुसत्या विटांच्या भिंतींची आणि लांबलचक उंच कंपाऊडवॉल रचनेची एकसंध, कुलुपबंद व्हावीत अशी घरं ही या प्रदेशातली खसियत. खूपच वर जाणार्‍या तापमानापासून बचाव करण्यासाठी भिंतीना गिलावा- प्लॅस्टरिंग केलं जात नाही. पण गढीसारखी कुलुपबंदता ठळकपणे दिसणारी. त्याचं आणखीही काही कारण असेल?
ऑटोमोबाईल धंद्यासंदर्भातली दुकानं, गॅरेजेसही भरपूर. मुंबईत ग्रॅंटरोड वगैरे भागात सरदारजी आणि त्यांची ऑटोमोबाईलची  दुकानं दिसतात तशी अमृतसरमधेही दिसतात. स्वर्णमंदिराच्या- हरमिंदरसाहिबच्या स्थानमहात्म्यामुळे अकाली, निरंकारी अशा पंथांचे, वेगवेगळ्या पोषाख-पटक्यामुळे ओळखता येणारे सरदार भरपूर. आपण इतरच वेगळे आणि उठून दिसणारे इतके सरदार आजूबाजूला...
नंतरचा अमृतसरकडे येणार रस्ताप्रवास हा दौरा संपता संपतानाचा. मन थोडसं शांत, थोडी हूरहूर दौरा संपल्याची, आम्हाला टेन्शन- सांगितलेलं ’तात्काळ’ आरक्षण झालंय ते आजचं नव्हे उद्याचं. आणखी एक दिवस- कॉम्प्लीमेंटरी स्टे दिलेला असला तरी -कसा घालवायचा अशा मनस्थितीतलं.
अमृतसरकडे येताना लागणारं पठाणकोट. पठाणकोट हे मध्यवर्ती स्थान. पंजाब, हिमाचल आणि जम्मू काश्मीर अशी तीन राज्यं भेटण्याचं ठिकाण. नुरपूर, बटाला, धारिवाल (बहुदा माणिकचंद गुटख्याच्या मालकाचं गाव!) अशी मस्त गावं लागतात. गावातले छोटे रस्ते. त्यात तुंबणारं हटवादी ट्रॅफिक आणि ह्याच्या, त्याच्या नावाच्या हॅट्ट्या! :D भरपूर भाज्याफळं घेऊन बसलेले विक्रेते...
मग शेतं लागतात.. गव्हाची. पार क्षितिजापर्यंत पोचलेली. पिकून पिवळीजर्द झालेली. काही शेतांमधे समृद्ध पंजाबी शेतकर्‍यांनी कापणीयंत्र लावलेली. शेत कापून एका बाजूला पडलेलं, गव्हाच्या दाण्यांची रास दुसर्‍या बाजूला. जवळ गव्हांची पोती भरून तयार होत असलेली...

मग आणखी बरंच अंतर कापून आल्यावर लागणारी मंडई. गव्हाचं भलमोठं भांडार, कोठार; पोतीबंद! पोत्यांचा खच. त्यावर अलिकडे सुरू झालेल्या संध्याकाळच्या पावसाचं सावट. मंडईच्या प्रवेशद्वाराबाहेर खचाखच ओसंडून वहाणारी पोती भरलेले भलेमोठे ट्रक्स. रांगेत उभे राहून ताटकळणारे. प्रचंड गहू पिकलाय राज्यात. त्यादिवशीचा (२७ एप्रिल) भाव, टेंपोट्रॅवलरचा धाडसी चालक गुरनामनं सांगितलेला, १३५०/- रूपये क्विंटल! गाडीतल्या मध्यमवर्गीयांचा आपापल्या शहरातल्या गव्हाच्या भावाचा हिशोब चालू. परखडपणे सांगायचं तर सडून जावा इतका गहू पिकतो आणि तरी कित्त्येक पोटं उपाशी रहातात हे आपल्या देशाचं परंपरागत दुर्दैव. राजकारण्यांच्या खुर्च्या घट्टं. सडू दे काही होऊ दे! राजकारनी निवांत!  इथे मात्र असो! असं अजिबात म्हणणार नाही! नाही म्हणजे नाही!
शेवटचा दिवस. हॉटेलमालकानं त्याच्या नव्हे पण जवळच्या दुसर्‍या हॉटेलमधे केलेली सोय. प्रत्येक गोष्टं आपण विचारल्यावर कळत असते. समोरून काहीही स्पष्टं केलं जात नाही. हा जवळ जवळ नेहेमीचा अनुभव. सगळीचकडचा. काही विचारायला गेल्यावर कळतं की या हॉटेलात फक्त दुपारी एक वाजेपर्यंतचीच सोय. परतीची रेल्वे रात्री साडेनऊनंतरची. मग कॉम्प्लीमेंटरी स्टे, नाश्ता, जेवण याबरोबर कंपल्सरी दुपारी १ ते रात्री कमीतकमी ८ वाजेपर्यंत उघड्यावर! टाईमपास करणं भाग. मग? मग अमृतसर बाय रोड! दुसरं काय?
ठरवलेली ऑटो. तिचा मालक लखविंदर. तो जाड रस्सीला बांधलेली विटी ऑटोच्या सीटखाली खुपसतो. तो ऑटोचा स्टार्टर. रस्सी जोर लाऊन डोक्याच्यावर खेचल्यावर ऑटो घुर्रर घुर्रर्रर करत चालू होते. तसाच आवाज करत मार्गस्थ होते. तिचा वेग इतका की ती मार्गस्थ झालीए की जागेवरच घुरघुरतेय हे कळायला वेळ आणि संयम आवश्यक. संयम एकूणच आवश्यक. संयम नेम म्हणून पाळणार्‍याला संयम जास्तच आवश्यक! लखविंदरचा चेहेरा तो गप्प बसलेला असला की बोलक्या बाहुल्यांच्या खेळात असलेल्या सरदारजीसारखा. डिट्टो. बोलायला, हसायला लागला की नॉर्मल.
तो चारशे रूपयात आम्हाला अमृतसर फिरवणार आणि रात्री रेल्वेस्थानकावर सोडणार. अमृतसरमधे तो आम्हाला  तिथलं कपडा मार्केट- कतरा जैमेल सिंघ (Katra Jaimal Singh) आणि तिथला अल्फा वन मॉल इथे नेणार. आमच्या गृहमंत्री अजून मिणमिणती शॉपिंग आशा बाळगून. कतरा जैमेल सिंघवर त्याने सोडल्यावर आम्ही पायी फिरायला सुरवात केली. मार्केट म्हणावं तर मुंबईसारख्या शहराच्या तुलनेत दोन गल्ल्या क्रॉफर्ड मार्केटच्या. परिसर अगदी जुनाट लूक असलेला. शनिवार दुपार असूनही दुकानात गिर्‍हाईक नाही म्हणजे नाही. विशेष वैविध्य नाही. भावात फारशी तफावत नाही. मुख्य म्हणजे बार्गेनिंग जवळजवळ नाहीच. मग हरमिंदरसाहेब- स्वर्णमंदिराजवळ. तिथेही एका दुकानात आधी खरेदी केलेली तेवढच बरं दुकान- हॅट्टी. बाकी... इतर हॅट्ट्यांमधे बसलेले सरदार मालक मात्र समृद्ध अवस्थेतले आणि गिर्‍हाईकांची वानवा किंवा तेच वास्तव असेल. आपण बघताना सगळीकडे आपल्या शहराशी तुलना करणार...
त्यात पाऊस. मग भरपेट लस्सी आणि एक मोजडीजोड यावर समाधान.
अल्फा वन मॉल म्हणजे आत गेल्यावर मुंबई काय आणि अमरतसर काय? मॉलसंस्कृतीची आपल्याला आदत झालीए. आत गेल्यावर खरेदी करायचं बंधन नाही. चेकींग असलं तरी आत गेल्यावर हटकणारं कुणी नाही. उत्तम वातानुकूलन. आत प्रदर्शनीय असं सगळंच. सगळंच. त्यातही यातलं एक दालन वेगळं. जुन्या रचनेतल्या प्राचीन वस्तू, कपड्यांचं. किंमती फक्त बघायच्या... प्रदर्शनीयता कायम.
त्याच संकुलात मग तळघरात हायपरसिटी. आणखी एका बाजूला शॉपर्स स्टॉप असं सगळं. इथेही गिर्‍हाईक नाहीच. वेळ दुपारी तीन-चारची असेल म्हणून असेल. आपल्या शहरात तरी दिवसा कितपत गिर्‍हाईक मॉल्समधे...
असं हे रस्तामार्गे अमृतसर. शेवटचा प्रवास रेल्वेस्थानकाकडे. लखविंदर भलत्याच रस्त्याने नेतोय. पण बरं वाटतंय. लखविंदर पाच ते आठ हा वेळ कुठेतरी घालवून परत आलाय. त्याचे पैसे अजून देणं बाकी आहे. हॉटेलमालकानं दुपारी फक्त १ पर्यंतचा कॉम्प्लीमेंटरी स्टे, नाश्ता, जेवणच देणार असा जवळजवळ दम दिला होता. पण संध्याकाळी त्यानं चहा पाजलाय. त्यावर कळस म्हणजे रात्रीचं जेवण वेगवेगळ्या कागदी ड्ब्यांमधे पॅक करून दिलंय, त्याचे पैसे देऊ करूनही न घेता! दुपारी मालकीणबाईनं हक्कानं आईस्क्रिम खिलवलं होतंच. अशा सगळ्या पंजाबी बेसूमार आतिथ्याच्या कौतुकमय गोष्टी आमच्या डोक्यात आणि तोंडावर आहेत. हॉटेलमालकानं ’तात्काळ’ तिकीट आरक्षणाची झालेली चूक भरून काढलीय आणि आपलं, आपल्या धंद्याचं, आपल्या प्रांताचं गुडविल आमच्या मनात कायम राखलंय...
हे झालं रस्तामार्गे अमृतसर! अजून बरंच सांगायचं आहे दोस्तानो! हेही बरंच झालं म्हणा म्हणता म्हणता!
भेटत राहूच! :)                   
(या आधीच्या सिरसी, कर्नाटक दौर्‍याच्या पोस्ट्स इथे जरूर पहा!) 

Tuesday, May 8, 2012

नॉरबुलिंगका (Norbulingka)

नॉरबुलिंगका! काय आहे नॉरबुलिंगका? केवळ एक विचित्र शीर्षक द्यायचं म्हणून दिलंय नॉरबुलिंगका? नाही! अलिकडेच अमृतसर, धर्मशाला, डलहौसी असा दौरा झाला. अर्थातच स्थलदर्शन, रहाटगाडग्यापासून आराम इत्यादीसाठी. १८ एप्रिलला प्रस्थान आणि ३० एप्रिलच्या पहाटे परत. मग नेहेमीप्रमाणे ते सांगावं असं वाटलं. अमुक गाडी पकडून आधी इथे पोचलो. मुक्काम केला. ज्येवलो. झोपलो. सकाळी उठलो. स्थळदर्शनासाठी... असं दैनंदिनीवजा लिहावं असं वाटेना. मुळात होतं काय की कितीही झाली तरी अशी भेट ही धावती भेट होते. त्यात ती पर्यटनसंस्थेबरोबर केली तर आखीव रेखीव होते. तसं होण्यात काही न्यून आहे असं अजिबात नाही पण थोड्या कालावधीत अमुक एका प्रदेशाचा ’फील’- निश्चित अंदाज येत नाही. निश्चित अंदाज असा शब्द मुद्दाम वापरतोय कारण अमुक एका प्रदेशाबद्दल एक वेगळं मत तयार निश्चित होतं पण तेच अंतिम असं मानता येत नाही. दुसरी शक्यता अशा प्रदेशातून पायी भटकंती करण्याची. न ठरवता भ्रमण करण्याची. ती आळशीपणामुळे आणि अर्थातच अनेक व्यवहार्य कारणामुळे अजमावली जात नाही. तसं न करताही कधी कधी अचानक एक वेगळं स्थळ समोर येऊन उभं ठाकतं. भारून टाकतं. त्यात शिरल्यावर सगळं सगळं विसरून गुंग व्हायला होतं. मला वाटतं स्थळ उत्तम असल्याचं हे मुख्य परिमाण आहे. तर नॉरबुलिंगका... ’इथे आणखी एक मॉनेस्ट्री- बौद्धमठ आहे. खरं तर साईटसीईंगमधे अंतर्भूत नाही पण अधूनमधून वेळेच्या उपलब्धीनुसार पर्यटकांना आम्ही इथे आणत असतो’ असं आमच्याबरोबरचे दौरा व्यवस्थापक, मार्गदर्शक इत्यादी अनेक भूमिकांमधे लीलया आणि यशस्वी संचार करणारे म्हणाले तेव्हा आम्ही नुकताच नॉरबुलिंगका मधे प्रवेश केलेला होता...  आत शिरताना मार्गदर्शकाची वाक्य कानावर पडत होती आणि समोर चढत्या पातळीवरचं एक शिल्प दृगोचर होत होतं. चित्रपटातल्या एखाद्या झूमसारखं. होय, मला आशियाई चित्रपटात पाहिलेल्या थायलंड देशाच्या एका प्रवेशिकेची आठवण झाली. दगडांची नक्षी करत नेऊन एक एक पायरी तयार करत चढत जाणार्‍या पायर्‍या. त्या दगडांच्या सांध्यातून, पायर्‍यांच्या कोपर्‍याकोपर्‍यांतून रूजवलेली फुलझाडांची झुडपं. त्यावर फुललेली छोटी छोटी फुलं. दगडांच्या सांध्यांमधे मातीचंच लिंपण असावं. त्यामुळे त्या रचनेला एक भूतकालीन रम्यतेचं स्वरूप आलेलं... पुन्हा या सगळ्याला किनार होती पाण्याच्या ओहळाची. कृत्रिमरित्या खेळवलेला ओहोळ. ओहोळाचा खरं तर परिघ. मधेच तो ओहोळ एका डबक्यात सोडून दिलेला. छोटसं पण देखणं डबकं. त्यात नुकत्याच सुरू झालेल्या संध्याकाळच्या पावसामुळे आलेलं गढुळपण. त्यात दिसणारे सोडलेले मासे... सगळं रचलेलं तरीही त्यात नैसर्गिकपण आणलेली उत्स्फूर्तता. नैसर्गिक वेडेवाकडेपणा... मला पुन्हा तो थायलंडचा चित्रपट आठवू लागलेला. त्यात अशा पद्धतीच्या मठाचा आतला परिसर कॅमेर्‍यानं व्यवस्थित दाखवलेला... मी इथे वर पाहिलं. राजवाड्यासारखी रचना असलेला तो वाडा.. वाडाच म्हणालो मी मनात. मग भूतकाळातल्या माझ्या आजोळच्या वाड्यात, भोवतालात असलेल्या हौदावर, त्यातल्या गढूळ पाण्यातल्या माशांवर.. फिरून आलो. सगळं खूप जवळचं वाटायला लागलं... वारंवार लक्ष जायला लागलं सोन्याच्या मुलामा दिलेल्या त्या वाड्यावरच्या नक्षीकामावर..
वाड्याच्या जवळ गेलो. आतल्या मखमली लालभडक भिंती, मखमली लालभडक भलेमोठे- पूर्वीच्या वाड्यांना असत तसे दरवाजे.. त्यावरची सोन्याच्या मुलाम्याची नक्षी... आणि केंद्रभागात भला मोठा सोनेरी बुद्ध... अर्धपुतळा स्वरूपातला... उंचच उंच... इथली रचना थोडीशी चर्चच्या केंद्रस्थानी असते तशी. बुद्धापर्यंत पुन्हा पातळ्या. लाल रंगाचं आवरण घातलेल्या पायर्‍या. एका पायरीवर सद्य दलाई लामांचं छायाचित्र... खूपच छान वाटत होतं.. एखाद्या वातावरणाने आपल्याला आपल्या आठवणीतली चित्र दिसायला लागली तर ते वातावरण आणखीनच भावतं का?... असेल. पण बघत रहावं, इथून हलूच नये असं वाटणारं ते वातावरण... प्रसन्न करणारं...
काही धर्मस्थळं म्युझियमसारखी वाटतात तसं इथे वाटलं नाही. रचना केली आहे हे कळूनही नैसर्गिकतेचा प्रत्त्यय देणारं असं काही.. आपोआप पावलं रेंगाळली. शेजारी तिबेटियन डॉल्स म्युझियम आहे. तिथे चला. अशी सूचना आल्यावर उत्सुकतेने तिथेही डोकावलो.चीनमधे त्रास झालेल्या तिबेटी नागरिकांना भारताने आश्रय दिला. त्या तिबेटी नागरिकांनी धर्मशाला या हिमाचल प्रदेशातल्या भागात आपल्या संपूर्ण संस्कृतीचं दर्शन घडवणारी दालनं उघडली. त्यातलं हे एक. या बाहुल्यांच्या घरात तिबेट प्रांतातल्या वेगवेगळ्या जातींच्या, प्रजातींच्या, टोळ्यांच्या चालिरिती, त्यांच्यात साजरे होणारे समारंभ, त्यांची हत्त्यारे इत्यादींच्या देखण्या प्रतिकृती सादर केल्या आहेत. काचेच्या प्रकाशमान पेट्यात ठेवलेल्या गुहेसारख्या अंधार्‍या लांबलचक भुयारासारख्या सभागृहात या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. या बघायला विशेषत: वृद्ध तिबेटी पर्यटक येतात आणि भारावून पुन्हा पुन्हा हे बाहुल्यांचं घर न्याहाळत रहातात. त्यांच्या डोळ्यात किंचित पाणी आहे की काय असं त्या निर्माण केलेल्या गूढ अंधारात त्यांच्याकडे बघताना चाटून गेलं. आपल्या प्रदेशातून हाकललं जाणं. काही स्वरूपातलं स्थैर्य मिळणं आणि तरीही मातृभूमीपासून हिरावलं गेल्याचा सल. या ज्येष्ठ नागरिकांच्या देहेबोलीतून जाणवतो. वृद्धत्वाच्या परिमाणामुळे तो अधिकच गडद होत असावा.
इथल्या तिबेटी निर्वासितांना भारत सरकारनं खूप प्रमाणात सवलती दिल्या आहेत. क्वचित इतक्या की भोवतालचे भारतीय त्यानं नाराज होतात. तिबेटी निर्वासितांना मतदानाचा हक्क नाही. हे निर्वासित ’भटाला दिली ओसरी’ सारखे इथे रहातात. यांनी निर्मिलेल्या पुस्तकांमधे भारत सरकारबद्दलचा रोष वाईट पद्धतीनं बाहेर आलेला आहे. त्याना भारत सरकारही आपल्यावर अन्याय करतं आहे असं वाटतंय. अशी मतं इथे कानावर आली. चीन सरकारनं त्यांच्यावर अन्याय केलाच आहे. त्याचे फलक विशेषत: मॅकलोडगंज इथे दिसतात. मॅकलोडगंज इथे बौद्धमठ आहे. तो विशेष प्रसिद्ध आहे. या मठाजवळ सद्य दलाई लामांचं निवासस्थान आहे. तो दलाई लामांचा मठ म्हणून ओळखला जातो. परदेशी चलनातल्या भरपूर देणग्या मिळवणारा हा मठ आहे. मला स्वत:ला तो जास्त म्युझीयमसारखा वाटला. त्याविषयी पुन्हा कधीतरी...  
नॉरबुलिंगका संदर्भातली आणखी काही चित्रं!
पहिलं चित्र आहे फिरत्या दंडगोलांच्या रांगेचं. सोनेरी मुलामा असलेल्या दंडगोलांवरून हात फिरवत मंत्रसदृष्य जप करणं हा बौद्धमठात येणार्‍या भक्तांचा महत्वाचा उपचार. 
दुसरं चित्र आहे अंतर्गत सजावटीच्या नमुन्याचं.
तिसरं चित्र आहे मखमली, सोनेरी नक्षीकाम असलेल्या दरवाज्याचं.
चौथं चित्र आवाराचं आणि पाचवं आहे विशाल बुद्धाचं!

 
    (या आधीच्या सिरसी, कर्नाटक दौर्‍याच्या पोस्ट्स इथे जरूर पहा!)

Thursday, April 12, 2012

या व्यवस्थितपणाचं काय करायचं?

या व्यवस्थितपणाचं करायचं काय?... हा प्रश्न कधी नव्हत ते उभा राहिला समोर. प्रश्न उभे रहातात समोर ते आपण ते उभे करतो म्हणून. संवेदना कुठेतरी काम करत असतात. त्या नसल्या तर... त्या कुणाला नसतात असं होतं का? परिस्थिती, प्राथमिकता यावर अमुक एका विषयासंदर्भातल्या संवेदना अवलंबून असतात. संवेदनापर्यंत ठीक असतं पण त्यापुढचं अतिसंवेदनशीलपण, मग हळवेपण कितपत योग्य? संवेदनांच्या या चढत्या भाजणीवर पुन्हा त्या त्या माणसाचं सर्जनही अवलंबून. व्यवस्थितपणाचं करायचं काय?... हा मूळ प्रश्न या लेखांकातला.
हा प्रश्न पडला आणि मी नेहेमीप्रमाणे विरूद्ध बाजूला झोल मारला. ’एवढा व्यवस्थितपणा करायचाय काय?’वाले जे आहेत त्यांचं बरोब्बर आहे असं मला प्रकर्षानं वाटायला लागलं. असं म्हणणारे बरेच जण अव्यवस्थितपणाला व्यवहार मानणारे होते.
तू व्यवस्थितपणे कशाला वागतोस? त्यांच्या प्रश्नांची बंदूक मी स्वत:वर रोखून धरली. असं मी नेहेमी किंवा बर्‍याच वेळा म्हणूया, करतो. मी व्यवस्थितपणे वागतो कारण ’तू व्यवस्थित आहेस!’ असं म्हटलेलं मला आवडतं. हे मत मला कितीही नाकारावं लागलं तरी शेवटी स्वत:शी कबूल करावं लागलं.
आता तू लहान का मूल आहेस? मी स्वत:ला विचारलं. अजून तुला कुणी तुझं कौतुक करावं असं वाटतं? तेही व्यवस्थितपणासारख्या गोष्टीचं? या वस्तूची जगात काय किंमत राहिली आहे याचा अदमास तू घेतला आहेस का? की नेहेमीप्रमाणे मला जे आवडतं ते मी करणारंच असा तुझा हट्ट आहे?
मला व्यवस्थितपणा आवडतो म्हणून मी व्यवस्थित असायचा प्रयत्न करतो. मला स्वत:चा बचाव करायला आणखी एक ढाल मिळाली. तुला काय आवडतं आणि काय नाही याला कोण भीक घालतं?- लगेच आतलं जे दुसरं मन, आतला आवाज वगैरे जे काही असतं त्यानं पलटवार केला... मग मला हेही प्रयत्नपूर्वक स्वत:शी कबूल करावं लागलं की, खरंच! जो तो ज्याला त्याला काय आवडतं याचा विचार करतो. दुसर्‍याला काय आवडतं याचा विचार जो तो कितपत करतो? मी स्वत: असा विचार कितपत करतो?
व्यवस्थित असणं माझ्या स्वभावात आहे! मी आणखी एक ढाल, आणखी एक बचाव, आणखी एक स्वत:च स्वत:च्या डोक्यावर खोवलेला तुरा बाहेर काढला... ठीकय नं मग? तसा स्वभाव असणं किंवा तसं स्वभावात असणं  म्हणजे काही विशेष गोष्टं नाही. वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती जगभर असतात. अमुक एक पणा तुझ्यात आहे म्हणजे तू काही राजा इंद्र किंवा सिकंदर नाही झालास!
मला नाही आवडत अव्यवस्थित असणं! मला चीड आहे, घृणा आहे अव्यवस्थितपणाची!... माझं आर्ग्युमेंटेटिव की काय, कसलं म्हणतात ते, बुद्धिगम्य मन (?) इत्यादी जागं होऊन त्यानं आता नकारात्मक बचावाची लाईन पकडली आहे का? याचा आता मला अंदाज घ्यावा लागला. आधी स्वत:ला छळून घ्यायचं आणि मग प्रतिकारात्मक लढाई इत्यादीसाठी कंबर कसायचा प्रयत्न करायचा असा काही माझ्या मन इत्यादी वस्तूचा सेटप असावा...
पण व्यवस्थित असून तू काय एवढं घोडं मारलं आहेस? सालं.. ते बुद्धिगम्य वगैरे हार मानायलाच तयार होत नाही का?... मी काहीही घोडं वगैरे मारलेलं नाही व्यवस्थित असण्याचा अवलंब करून असं मग मला स्वत:शी प्रामाणिकपणे कबूल करावं लागलं.
माझ्यावर संस्कार आहेत तसे! असा आणखी एक पवित्रा मला मिळाला... तसे अनेक संस्कार आहेत तुझ्यावर! सगळे जपलेस तू आजतागायत? पाळलेस? साधा श्रावण पाळताना दमछाक होते तुझी!... मी स्वत:शी मूक होऊ लागायच्या प्रवासाची ही सुरवात असावी...
काय व्यवस्थितपणा व्यवस्थितपणा व्यवस्थितपणा लावलायस मगासपासून? आतल्या कोपर्‍यातलं आणखी एक भूछत्र चांगलंच कासावीस झालं! कशासाठी करायचा व्यवस्थितपणा? परिपूर्ण होण्यासाठी? परिपूर्ण असतं का कुणी? या जगात कुठली गोष्टं परिपूर्ण आहे? परिपूर्णतेच्या वाट्याला गेलेले रहाटगाडग्याचे दास झालेत कायमचे! रूटीनमधे अडकून अडकून मशिनं झालीएत त्यांची?... हे भूछत्र चांगलंच क्रांतिकारी इत्यादी असावं.
त्यापेक्षा मस्त असावं! आपल्याला पाहिजे ते करावं! आपल्याला आनंद मिळतो ते करावं! दुसर्‍याचा काहीच विचार करू नये! झाला अव्यवस्थितपणा तर व्यवस्थित असणारे करतील तो व्यवस्थित!
आणखी कशासाठी व्यवस्थित रहातोस तू? तुला अमुक एक चांगला मोबदला मिळतो. त्या मोबदल्याशी कृतज्ञ रहावं म्हणून व्यवस्थित रहातोस तू? म्हणजे... आपण आपल्याकडचं मॅक्झिमम ते द्यायचं. मोबदला मिळतोय त्यापेक्षा जास्त द्यायचं. असलं काही व्यवस्थापन इत्यादी तज्ज्ञानी, गुरूंनी सांगितलेलं खूळ आहे तुझ्या टाळक्यात? असं काही नसतं रे! आलेली जबाबदारी आली अंगावर घेतली शिंगावर असं म्हणून एकदाची पार पाडून भिरकावून द्यायची! तू व्यवस्थितपणा करून तुला मिळालेली बिदागी सेम आणि आ.अं.घे.शिं. म्हणून भिरकावून दिलेल्यालाही बिदागी सेम! पुन्हा मी व्यवस्थित म्हणून तू आत्मविश्वास इत्यादी कमवायच्या मागे लागणार! भिरकावून देणारे बघ कसे मिळून मिसळून असतात. त्याना माहित असतं रे माणूस स्खलनशील आहे! किती उड्या मारणार तू? कुठवर? कधी न कधी सगळं अव्यवस्थित होणार, असणार, रहाणारच की नाही?... की तुझं आपलं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच!... आतल्या कोपर्‍यातलं क्रांतिकारी भूछत्र आता चांगलंच फार्मात आलेलं दिसलं...
शेवटी हे लक्षात ठेव! व्यवस्थित व्यवस्थित करत तुझं सगळं अतिव्यवस्थितपणा कडे झुकायला लागतं! अतिव्यवस्थितपणा! लक्षात घे! त्यानं काय होतं? तू स्वत:ला निर्माणकर्ता वगैरे समजायला लागतोस. एक फसवं समाधान मनात घेऊन जगत रहातोस.
अतिव्यवस्थितपणा आणि अव्यवस्थितपणा यात एक ’ति’चा फरक आहे बघ! त्या क्रांतिकारी इत्यादीनं मला फुटकळ वाटणारी एक कोटीही केली जाता जाता आणि ते मागील पानावरून की अंकावरून पुढे चालूच राहिलं...

अव्यवस्थितपणात एक संधी दडलेली असते राजा! तुझ्या अमलाबाहेरची! व्यवस्थितपणा करून तू तुझा एकछत्री वगैरे अंमल प्रस्थापित करायला जातोस. ते कळत असेल, नकळत असेल. स्वत:चा कंट्रोल वगैरे समोरच्या कामावर प्रस्थापित करून सत्ता वगैरे मिळवल्याच्या आनंदात रहायला जातोस. पण जगात तुझ्या अंमलाबाहेरचंच खूप असतं. ते तुझ्या जराश्या किंवा चांगल्याच अव्यवस्थितपणात मिसळलं तर तू करत असलेल्या कामाला वेगळंच डायमेन्शन नाही का मिळणार? ते तू मिळवणार की व्यवस्थितपणाला बांधून घेऊन अंतिमत: कंटाळ्याचा सोबती होत रहाणार?
हे च्यायला चांगलंच गर्रकन फिरलंय की बाप्पा! मी स्वत:शी म्हणालो.
मग काय करतोस?... तो क्रांतिकारी की कसला तो कोपरा आता हात धुवून मागे लागलाय...    
          

Saturday, April 7, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (११)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १० आणि त्यानंतर... 
महेशची अवस्था अत्यंत दारूण झालीए. अंकित महेशचा सेलफोन घेऊन घरभर पळत सुटलाय. अंकितनं आता महेशला ब्लॅकमेल करायला सुरवात केलीए. महेशची झोप पार उडालीए आणि त्याला अंकितच्या मागे पळत सुटण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही!
"अर्‍ये- अर्‍ये थांब- थांब-"
"मोनाला सांगता काय?"
"नाही- नाही रे माझ्या सोना- सोन्या!"
"मी दिवटा काय?"
"नाही रे कुलदीपका नाही!"
"आम्ही उध्वस्त केलंय तुम्हाला, काय?"
"नाही नाही रे मस्त मस्त- यायलारे- मस्त आहात तुम्ही दोघं- तू आणि तुझी आई- असं म्हणायचं होतं मला. हात जोडतो बाबा तुला- तुझ्या आईला यातलं काही सांगू नकोस- प्लीऽऽज- काय मागशील ते देईन पण आवर- तुझ्या भावना आवर- आवर भावना!"
अंकित आता महेशला दरडावू लागलाय.
"मगाशी मोना म्हणाला होतात ना? आता भावना काय?"
"अब मुझे कुछ नही होना- सच्चीमें- मापी करो-"
"मग... मागाल ते द्यायचं!"
महेशला आता मान डोलवण्याशिवाय पर्याय नाही.
"हं! आईस्क्रिम... पिझ्झा... बर्गर... टॉयगन... कार... सेलफोन... होंडासिटी... टोयोटा... सॅन्ट्रो... एसेलवर्ल्ड... बिग बझार..."
प्रत्येक वेळी महेश पेंगत मान डोलवत रहातो.
"खाना.. खजाना.. सोना.. मोना.. मोना.. मोना.." अंकित आता फिदीफिदी हसत काय वाट्टेल ते बडबडू लागलाय.
"घे बाबा तुला काय घ्यायचं ते घेना- पण मला सोड-"
अंकित आता खो खो हसू लागलाय. महेशचा सेलफोन वाजू लागलाय आणि महेश पुन्हा झोपेच्या आधीन होऊन बडबडू लागलाय.
"मोना- मोना- आता तू का बरं पुन्हा पुन्हा फोन करकरून त्रास देते आहेस? तू सुद्धा मला सोड- एकटं रहायचंय मला-"
महेशची अवस्था वेड्या माणसासारखी होऊ लागलीए. त्याला बघून अंकित कपाळावर हात मारतो.
"आयशप्पत! यांचं टाळकं सरकलं वाटतं... हॅलोऽऽ- हॅ- हॅ-लॉऽऽ- ओऽऽ बोला नाऽऽ ऍंऽ ऍंऽ हां- थांबा- प्लीज वेऽऽट! वेऽऽट प्लीऽऽज!"
धावत महेशकडे येतो. त्याच्याकडे बघतच रहातो. महेश स्वत:शीच पुटपुटतोय.
"च्यक च्यक च्यक... आधी बरे होते.. कामातून गेली केस! च्यक च्यक.. मोना काय, सोना काय, भावना काय- ममा येऊदे मग बरोब्बर करतो तुम्हाला-"
महेश आता झोपेत वेगळ्याच दिशेला बघत बडबडू लागलाय.
"मोना अगं कोण आहे? कोण आहे फोनवर?- मला फसवू नकोस. मी जागाए.. अजिबात झोपेत नाही- आऽआऽआईगंऽऽ मोना-मोना-बोलना-गप का मोना- बोल ना!"
"ओऽऽ पपाऽऽ मोनाबिना कुणी नाईएऽ इथेऽ- मोना- कोना- टोना- फोना- अरे हो! हा फोना- आपलं हा फोनए तुमच्यासाठी- पपा- डॅडी- बाबाऽऽ येडे झाले माज्ये बाबाऽऽ पपाऽऽऽऽ"
महेश त्या भोकाडाने जरासा सावध झालाय.
"ये रेड्याऽऽ रडतोस काय माझ्या नावानं- गळा काढून! अजून आहे मी जिवंत! गेलेलो नाही! वर!- झोपतोय नुसता!- घरी दिवसपाळी आणि ऑफिसात रात्रपाळी करून करून! जीव जायची पाळी आलीए आता!- पण गेलेला नाहीए अजून!... अर्‍ये गप! गऽऽप!"
महेश अंकितच्या तोंडावर हात ठेवतोय आणि त्याचवेळी अंकित ’तुमचा फोन’ तुमचा फोन’ असं ओरडायला जातोय.
:अर्‍ये- अर्‍ये- चावतोस काय कारट्या-" महेश आपला हाय चोळतोय.
"मग काय करू? तुमचा फोनए फोनए असं सांगतोय तर तुम्ही माझंच तोंड-"
"द्ये! द्ये इकड्ये!... कोण ए? काय ए? ऑं? काय ए? काय चाललंय काय? ऑं? काय वेळाकाळाचं भान आहे की नाही? ऑं? काय काय काय? वर मलाच विचारताय काय?- काऽऽऽय? अहोऽऽ मी तुम्हाला विचारतोय काय? का- काय- काय म्हणजे?- आं- आं- हां हां आपलं ते हे- हां! काय समजतं की नाही तुम्हाला? कधीही फोन करता? अहो इथे काय काय झालंय!- नाही ऐका तुम्ही- तुम्ही- तुम्हाला ऐकायलाच लागेल- नाही मी फोन सोडणारच नाही तोपर्यंत!"
अंकितनं कपाळावर- पुन्हा- हात मारून घेतलाय.
"अहोऽऽ माझी आई गेली- सासू गेली- ऑं? अहोऽ गेली म्हणजे तशी नाही हो - पळून गेली- गेल्या- च्यक च्यक च्यक... कुणाबरोबर नाही होऽऽ- म्हणजे झालंय काय- मला मुलगी झाली- मुलगी! मुलगी!- मुलगा?- अहो‍ऽ मुलगा होताच आधी, असं काय करता?.. तर.. दोघांना कुणी सांभाळायचं- च्यक च्यक.. दोघांना म्हणजे त्या दोघींना नव्हे होऽ आईला आणि सासूला नव्हे! मुलांना! मु लां ना! हां! मुलांना कुणी सांभाळायचं म्हणून पळून गेल्या त्याऽ- मुलांना घेऊन?- हे कुणी सांगितलं तुम्हालाऽऽ मी? - यायला कोण यडचॅप बोलतोय पलिकडून-"
अंकित आता कपाळावर हात मारून घेऊन दमलाय, "अहोऽऽ मला काय विचारताऽऽयऽ त्यानाच विचारा नाऽऽ"
"अहोऽऽ मला सांगाल काऽऽ मी कुणाशी बोलतोयऽऽ ऑं? ऑं? तुम्हाला काहीच समजत नाहिएऽ -अहोऽ मगऽ तुम्हीऽ माझ्याशीऽ का बोलत राह्यलाय मगासपासूनऽऽ हां हूं का करत बसलाय माझ्या बोलण्यावर? ऑं? तुम्हाला- तुम्हाला मराठीही कळत नाही!- अहोऽ मग काय सूड उगवताय माझ्यावर हां हूं करूऽऽन!- मऽऽग?.. हे शहाण्यासारखं झालं की वेड्यासारखं- हां हां!- ये श्यान्येजैसा हुवा की पागलजैसा- म्येरेको बोलोऽऽ- क्या? कोनसा?... परपरांतीय लालनपालन बालन संघ!- हे काय आहे?.. काय आहे म्हणजे नाव आहे की गाणं आहे?.. ऑं? येऽऽ क्या करताय क्या तुम- तुमारा ये- ये- बालन लालन पालन- ऑं? क्या बोलताय?- मैंने? कबी?ऽऽ- ऑं- ऑं- हां हां- मेरी बायकोने! आपलं हे बीबीने- बीबीने- हां हां!- म्येरे बीबीने फोन किया होगा आपकोऽऽ- मैईं? मैईं बीबी का मकबरा- आपलं ह्ये नवरा- नवरा- आदमी- मरद- यायलारे- हां हां- बच्च्येका बाप- पिता- हां हां तो- तो- हां- घरमेंच दोनो बच्चेकू- हां- घरमेच संभालनेका! हां रे हां- आंग्गाश्शीऽऽ क्या बराब्बार बॉलताय रे बाबाऽऽ हां हां वहीच! उसके वास्तेच फोन किया आपकोऽ- ऑं? फिर बोलोऽ किसको भेजताय? ऑं? टी मंजू?... हां टी मंजू! कोन है कोन? अहो म्हंज्ये- औरत या मरद? हां! हां! किदरका है? - आरे मेरा मतलब है साऊथका- यूपी या बिहार- नक्की किदरका- हां हां- हां साब!... मापी करना हम वो सुरवातमें आपको- हां-हां-हां- मंगताय उतना लो पैसा बाबा- हमारे आंगनमें झाड है पैसेका- हां हां- आता ठेव बाबा ठेव- ऑं- द्येव भ्येज द्येव बाबा मंजू टी- या टी मंजू कोन हय उसको! जल्दी जल्दी हांऽऽ हां! हांऽऽऽ... हाऽ हाऽ हाऽ हाऽ"
"पपाऽऽ काय झालं काऽऽय?"
"अर्‍ये बछड्याऽऽ टी मंजू येणारेय टी मंजूऽऽ तुम्हाला सांभाळायलाऽऽ"
"याऽऽ येऽऽ पपाऽऽ"
त्याचवेळी पाळण्यातली अवनी जोरजोरात रडू लागलीय आणि दोघे तिच्या दिशेने धावत सुटलेत...     क्रमश:     


 

Monday, April 2, 2012

पहिलं फोटोसेशन.. जाहिरात.. इत्यादी..

खरं तर लिहू की नको असं झालंय या पोस्टबद्दल.. असं होत नाही कधी.. या आधी ’इंद्रधनुच्या गावा’ या बालनाट्याबद्दल आणि ’झुलवा’ या नाटकाच्या प्रवासाबद्दल लिहिलं. त्याही आधी आकाशवाणी संबंधात लिहिलं होतं. या सगळ्या प्रवासाची सुरवात इथून झालेली होती.
या वाटचालीबद्दल लिहिताना मला स्वत:लाच काही गोष्टी नव्याने कळल्या. त्यावेळी मी त्या त्या घटनांमधे प्रत्यक्ष सहभागी होतो. नाही म्हणायला आता मी बर्‍यापैकी तटस्थपणे या सगळ्या प्रवासाकडे पाहू शकतोय.
मला ठाऊक आहे हे जे मी केलंय ते खूप काही नक्कीच नाही. पहिलं म्हणजे हे करत असताना मला स्वत:ला ते पूर्णपणे नवीन होतं. दुसरं म्हणजे फारसा कसला आधार नसताना, एकदम वेगळ्याच क्षेत्रात, त्यावेळी, वाटचाल करताना सहप्रवासी दोस्त खूप महत्वाचे ठरतात असा अनुभव आला. मी जे केलं त्यातून खूप मोठं म्हणता येईल असं काही अजून उभं झालं नसेल पण त्या त्या वेळी मला हे दोस्त लाभले त्यांची आठवण मनात घर करून राहिली. पूर्णपणे अनिश्चिततेच्या काळात जवळपास माझ्यासारख्याच अवस्थेत असलेल्या दोस्तांनी मला खूप आश्वस्त केलं होतं आणि ते माझ्या दृष्टीनं आजही महत्वाचं आहे.
’झुलवा’ नाटकाचा बहर ओसरला होता. खरंतर माझ्या मनात तो आजही ताजाच आहे. पण व्यवहारात बघायचं झालं तर आता पुढे काय? असा प्रश्न माझ्यासारख्या नवोदितासमोर त्यावेळी उभा होता. हा प्रश्न नवीन काही नाटक करायला मिळणं, नवीन काही शिकायला मिळणं या स्वरूपाचा होता. डोक्यात प्रायोगिक नाटक करायचं पक्कं होतं. व्यावसायिक नाटक करण्याइतकी आपली तयारी झाली आहे का याची खात्री होत नव्हती. दुसरं काहीच नाही, नाटकच करायचं असं डोक्यात पक्कं असल्यामुळे एखादं नाटक करणं चालू नसेल तर प्रचंड अस्वस्थता मनात दाटत असे. काही शक्यता पडताळल्या. त्या शक्यतांनी काही मूर्त स्वरूप घेतलं नाही. आता नव्यानं काही सुरवात करणं भाग होतं. पण ते मनातल्या मनातच रहात असे. भिडस्तपणा आडवा येत असे. ’झुलवा’ नाटकादरम्यान कधीतरी चर्चगेट स्टेशन ते एनसीपीए अश्या चालत्या बोलत्या प्रवासात ’तुझ्यासारख्या अंतर्मुख माणसानं बहिर्मुख व्हायचा प्रयत्न करणं आवश्यक आहे’ असं वामननं (वामन केंद्रेनं) प्रेमानं आणि अधिकारानं सांगितलं होतं. अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी या दोन्ही स्वभावांची सांगड घालणं कसं आवश्यक असतं हे स्पष्टीकरणही त्यासोबत होतं. ते पूर्णपणे पटणारं होतं. फक्त ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता होती. 
अशा पद्धतीने मनाची तयारी होत असताना कधीतरी चंद्रशेखर गोखले भेटला. हो! तोच तो, ’मी माझा’ हा सुप्रसिद्ध चारोळी कवितासंग्रह लिहिणारा. त्यावेळी ’मी माझा’ ची पहिली आवृत्ती प्रकाशित होत होती. मला प्रत्यक्ष शेखरकडून ’मी माझा’ ची प्रत मिळाली होती. पुढे ’मी माझा’ च्या अनेक आवृत्त्या, पुढचे अनेक भाग प्रकाशित झाले. 
मी  कविता करायला लागलो तेही शेखरच्या कविता वाचून, भारावून जाऊन.
त्यावेळी शेखर, मी, आम्ही आपापली वाट शोधत होतो. शेखर त्यावेळी मॉडेल कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होता.
साधा, सरळ स्वभाव, ऋजू व्यक्तिमत्व, वागण्याबोलण्यात मार्दव आणि हे सगळं अगदी खरं. जेन्युईन. शेखरच्या पार्ल्याच्या घरी कित्येक गप्पा झालेल्या आठवतात. शेखर हा व्यवसाय करत होता आणि तो चांगल्या अर्थाने व्यावसायिक होता. खरंतर फोटोसेशन करायचं असं माझ्या मनात नव्हतं पण शेखरनं मला ते कसं आवश्यक आहे हे समजावलं. मालिकांचं युग नुकतंच सुरू झालं होतं. चांगल्या नाटकांचा काळ चालू होताच. त्यानं आशिश सोमपुरा ची ओळख करून दिली आणि माझं पहिलं फोटोसेशन पार पडलं. शेखरनं अगदी त्याचा शर्ट मला घालायला देण्यापासून सगळी मदत केली. आशिश हा प्रथितयश फोटोग्राफर. त्यावेळी त्याची सुरवात होती. त्याच्या स्टुडिओतले त्याने काढलेले चित्रा देशमुख अर्थात नंतर झालेल्या कांचन अधिकारी आणि दुर्गा जसराज यांचे अप्रतिम फोटो अजून आठवतात. शेखरने सुरवातीला अनेक फार्मास्युटिकल ऍड्ससाठी माझं नाव सुचवलं. त्यातली एक इप्का या औषधी कंपनीची होती. यात वेगवेगळ्या वयातल्या डॉक्टरच्या वेशात माझी छायाचित्र घेतली होती. बॅरेटो नावाचा छायाचित्रकार आणि सेशन झालं होतं काचपाडा, मालाड इथल्या एका तयार होत असलेल्या सदनिकेत. त्या छायाचित्रांच्या प्रती मला संग्रहासाठी हव्या होत्या. पण अशा छायाचित्रांच्या प्रती दिल्या जात नाहीत. त्याचं ब्रोशरही बनलं असेल पण ते कदाचित खाजगी वापरासाठी असेल.
काही औषधी कंपन्यांच्या जाहिराती केल्यावर शेखरनं अपोलो टायर्सच्या जाहिरातीसाठी माझं नाव सुचवलं. जाहिरात क्षेत्रातले सुनील रानडे आणि सुप्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळे या जाहिरातीचं संयोजन करत होते. अस्मादिकांचं तेव्हा बिर्‍हाडबाजलं पाठीवर बांधलेलं. पुरेशी तयारी करताच आली नाही. त्यात अपोलो ऍंटी स्कीडटेक टायरचा ३३ अंशाचा कोन! या जाहिरातीत मी ज्या खुर्चीवर बसलोय ती त्या कोनात कललेली दिसते हा आभास नाही! तांत्रिक करामतही नाही! मी माझ्या बुटांच्या टाचांवर खुर्चीला आणि स्वत:ला तोलत ज्याम घामाघूम होत होतो आणि प्रदीप आणि सुनील माझा होसला वाढवत (?) होते. अगदी खरं सांगायचं तर मी दाणकन खाली पडेन म्हणून आणि चांगलीच फजिती होईल म्हणून माझी भीतीनं ज्याम गाळण उडाली होती त्यावेळी! शेखर एवढं करून थांबला नाही तर त्यानं त्यावेळी ’साप्ताहिक लोकप्रभा’ साठी माझी छोटीशी मुलाखतही घेतली होती! फोटोसेशन आणि जाहिरात माझ्या आयुष्यात आलं ते केवळ आणि केवळ शेखर गोखलेमुळे. संघर्षाच्या काळात एक चांगला मित्र तर मिळालाच! पुढे विनय आपटेंबरोबर ’रानभूल’ हे व्यावसायिक नाटक करत असताना त्यांच्या ’ऍडडिक्ट’ या जाहिरातसंस्थेतून एका राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत काम करायला मिळालं. ’टाटारोगोर’ या कीटकनाशकाच्या जाहिरातीत काम करायला मिळालं. ही जाहिरात जालंधर वगैरे प्रदेशात प्रामुख्याने दाखवली गेली.  पूर्वीच्या प्रसिद्ध स्ट्रॅंड सिनेमाच्या जवळ, कुलाब्याला, आरटीव्हीसी- रेडिओ टीव्ही कमर्शियल्स-  नावाची कुसुम कपूर ह्यांची जाहिरातसंस्था होती. या जाहिरातसंस्थेसाठी मला एक विडिओवॅन फिल्म करायला मिळाली. महाराष्ट्र सरकारच्या ’महाबीज’ बियाणांची प्रसिद्धी करणारी, ग्रामीण भागातल्या शेताशेतांमधून दाखवण्यासाठी बनवलेली ही विडिओवॅन फिल्म होती. पारंपारिक मराठी चित्रपटासारखीच कथा घेऊन ही फिल्म बनवली गेली होती. दिग्दर्शक होते, सुरेंद्र हुलस्वार. या जाहिरातपटात जमिनदार खलनायक मला करायला मिळाला होता. जवळजवळ आठदहा दिवस कोल्हापूरला जयप्रभा स्टूडिओ आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात याचं चित्रिकरण झालं. या जाहिरातपटाची विडिओकॅसेट मात्र मिळाली पण त्यावेळी एका पावसाळ्यात अशा कॅसेट्सची बहुदा वाट लागत असे तशी तिची वाटही लागली. 
मी शुटिंगमधे अडकलेलो आणि माझी होणारी पत्नी मुंबईत माझी वाट बघणारी.  लग्नाला महिनाभरसुद्धा उरला नव्हता..
आरटीवीसीमधे मला नेलं त्यावेळचा माझा मित्र सुरेश चांदोरकरनं. त्यानं मला रेडिओस्पॉट्ससुद्धा मिळवून दिले. त्यातला एक व्हिक्स वेपोरबचा रेडिओस्पॉट विनय आपटेंबरोबर होता. त्यात एक गाणं- जिंगल होतं. ते सुरेशनंच रचलं. त्याचं ध्वनिमुद्रण त्यानेच जमवून आणलं. सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठे ती जिंगल गायले. आमच्याकडे सगळंच तुटपुंजं होतं पण रविंद्र साठेंनी अगदी तुणतुणं जुळवण्यापासून इतकी मदत केली की त्यांचे केवळ आभारच मानले पाहिजेत! व्यावसायिकतेचा- चांगल्या व्यवासायिकतेचा हा आणखी एक अनुभव..
आरटीवीसीमधे कुमार हुलस्वार नावाचे ध्वनिमुद्रक होते. त्यानी माझ्या आवाजाचा नमुना खास ध्वनिमुद्रित करून घेतला. त्या बळावर मला हिंदी रामायणाच्या रेडिओ मालिकेत वॉईसिंग करायची संधीही मिळाली. या वाटचालीत शेखर, आशिश, सुरेश, कुमार हुलस्वार, विनय आपटे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच!
अगदी अलिकडे दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका राजकीय पक्षासाठीच्या ऍडकॅम्पेनसाठी अचानक रात्री नऊदहा वाजता बोलवलं गेलं. एक उद्योगपती सरकारच्या धोरणांबद्दल (चांगलं) बोलतो. सत्ताधारी पक्षासाठीची जाहिरात. हा अनुभव मात्र त्रासदायक होता. रात्रभर चित्रिकरण होत राहिलं. मी आणि बोलवलेला मॉब रात्रभर त्याच त्या ओळी अक्षरश: रटत राहिलो. मला इतकं रटत, बोलत ठेवलं की मध्यरात्रीनंतर कॅमेरा ऑन झाल्यावर मला काही आठवतच नाही असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालं. हे त्या रात्री बराचवेळ होत राहिलं. त्या अमुक एवढ्या सेकंदांत जाहिरातपट, निवेदन बसवण्याचा आटापिटा करत असलेला तो दिग्दर्शक बघून मला हसावं की रडावं तेच कळेनासं झालं. आयुष्यात पहिल्यांदा, कधी एकदाचं हे सगळं संपतय, असं सतत वाटत राहिलं. पुढे ही ऍड कॅंपेन- म्हणजे उद्योगपती, नोकरदार, गृहिणी, शेतकरी वगैरे असलेली ही जाहिरातमालिका, टीव्ही वाहिन्यांवर प्रकाशित झाली. माझा भाग, मला धरून काही जणांना बघायला मिळाला.. असं हे सगळं जाहिरात, फोटोसेशन जगतातलं माझं एक्सकर्शन (?) :D