romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, October 25, 2008

आर्त_“मुक्तसंवाद” दिवाळी’०८ अंक_माझ्या कथेचा काही भाग…

चला बाई!…आज एवढ्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची…यथासांग सगळं पार पडतंय!शेजारणी चिडवत होत्या सारख्या…मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे!...मुलगा काय, मूल झालं हेच केवढं मोठं सुख!...मग मागितलेलं मिळालं म्हटल्यावर व्रताचं उद्यापन…त्याच्या ह्या जेवणावळी.जास्तीत जास्त माणूस जेवून जायला हवं!...काही कमी पडता उपयोगी नाही!महादेवानं काही कमी पडू दिलं नाहीये मग-

माई कुणी बैरागी आलेत दारावर.ते-

अगं, बोलाव, बोलाव नं त्याना आत!दारात कशाला तिष्ठवलंस?बोलाव!

माई ते आधी तुम्हाला भेटायचं म्हणतात

मला... बरं… हे घे!हे पात्र आत देऊन ये बरं तू!

दारात दोन बैरागी.एक प्रौढ, पांढऱ्या मिश्या, पांढऱ्या जटा, दोन्ही वयापेक्षा लवकरच पिकलेल्या.कपाळावर भस्माचे पट्टे.गंधसुध्दा.नजर, रागीट, आडमुठी.दुसरा पोरगेलासा.तो हसला.निरागस.हसणं तसंच चेहेऱ्यावर, त्यामुळे वेडगळ वाटणारं.चेहेऱ्यावर सतत वाहणारा घाम.तो म्हणाला, बाई, माई, ताई, आई-भिक्षा! आणी स्वत:च ठसका बसल्यासारखा हसला.आभिप्रायार्थ बरोबरच्या प्रौढ बैराग्याकडे नजर टाकली.प्रौढ तसाच एकटक, निर्विकार, ऑलप्रूफ नजर.कोऱ्या कापडाच्या चिध्यांसारखा फाटत जाणारा त्याचा स्वर, आम्हाला हवी ती भिक्षा मिळेल?

महाराज, आज घरात काही कमी नाही! आज महाव्रताची सांगता-

बाई पुन्हा विचारतोय, आम्हाला हवी ती भिक्षा-

जरूर महाराज, आज्ञा व्हावी!

मुसळ आणा!

महाराज, मु-

उखळ कुठे आहे?

महा-हे काय…चलावं…स्वयंपाकगृहाकडे चलावं!

दुसरा, तो तरूण बैरागी हसतोय तसाच-मघासारखा.त्याच्याकडे पाहिल्यावर ‘तुम्हाला काही कळणार नाहीगंमत आहे आमची!’ अश्या अर्थाचं हसणं…पांचट… ह्या बैराग्याना काय हवंय?...

चल रे, चल स्वैपाकघरात!

बाईऽऽऽमाझ्या मुलाला नेतोय हा आत?स्वयंपाकघरात?...आई गंऽऽऽत्या हसणाऱ्या, घामेजलेल्या तरूण बैराग्याने माझ्या मुलाला उचललंय आणि-आणि-आणि-

ती जागी झाली.धडपडतच.तो पत्र्याच्या खुर्चीत बसलाय.तांब्याच्या मोठ्या भांड्यातून पाणी पितोय.तिच्याकडे बघून हसला.हसणं कमीच.कुणाची फजिती झाली तरच.एरवी…घाईघाईत तिनं सगळं उरकलं.तशीच मोरीत शिरली.दरवाजा लावला.थंडगार पाणी रोजच्यासारखं डोक्यावर ओतून घेतल्यावरच ती तयार झाली-दिनक्रमासाठी…आंघोळबिंघोळ आटपून त्याचंही सुरू झालेलं साग्रसंगीत…ठाण मांडून…खोलीच्या मध्यभागीच…लोकरी आसनावर…अरविंद माहोम…अथम सोमो कृतम सोमो…सोमाय नम:… मैत्र मैत्र वान भवती…मैत्र मैत्र…    

Tuesday, October 21, 2008

माझं आजोळचं घर

आपण अगदी लहान असतानाच्या आपल्या स्मृती तीव्र असतात.मी आता राहतो त्या घराचा कोपरा न कोपरा एकांतात बसून आठवायला गेलो तर मला कण न कण आठवेलंच याची खात्री नाही पण माझ्या लहानपणातलं माझं आजोळचं घर मी आजही खडानखडा सांगू शकतो.कोल्हापूर हे तेव्हा गावात जमा होतं.घरात वीज आली नव्हती.कंदील, चिमण्या असा सगळा प्रकार होता.स्वयंपाकघरात चूल होती, तिला लाकडाचं जळण लागे, गोवरय़ाही लागत.पाणी तापवायचा तांब्याचा बंब होता त्यातही लाकडी ढलप्या, शेण्या, भुईमुगाच्या शेंगांची फोलं सारावी लागत.पहाटे परसातल्या एका पत्र्यावर थाप मारून बाप्या गवळी आजीला आवाज देई. होय, तोच म्हशीचं ताजं, धारोष्ण दूध त्याच्या कासंडीतून किंवा थेट तुम्ही दिलेलं भांडं म्हशीच्या आचळांना लाऊन तुम्हाला दूध घालत असे.जो आता कुठल्यातरी कॉर्नरवर प्रदर्शनात मांडल्यासारखा दिसतो.वाडा म्हणवल्या जाणाऱ्या पण तितक्या भव्य नसलेल्या एका वास्तूत आजोळचं बिऱ्हाड होतं.लाकडी रंगहीन दाराची चौकट.एका दरवाज्यावर तीन लोखंडी लंबगोल आकाराच्या कड्यांची साखळी.दरवाजा हलला की खळ्ळ असा आवाज करणारी.दरवाज्यावरच्या आडव्या पट्ट्यांवर पितळी बिल्ले ठोकलेले.दरवाजा आतून बंद केल्यावर त्याला सुरक्षिततेसाठी भला मोठा आडवा लाकडी अडणा खांदा लाऊन उजवीकडून डावीकडे सरकवायला लागणारा.मग सोपा.त्यावर कायम आजोबांचं बस्तान.त्यांचा पाठ टेकून बसायचा तक्क्या.समोर उतरतं शिशवी लाकडाचं डेस्क, लिखाणासाठी.कोपऱ्यावरच्या खुंटीवर त्यांचा डोक्यावरून काढलेला आणि तसाच वर्तुळाकार आकार असलेला स्वछं पांढरा रूमाल.त्याखाली त्यांचा कॉटनचा कोट.गुढघे पुढ्यात उभे ठेऊन, तक्क्याला टेकून बसलेले आणि जाजमावर दोन्ही हातांचे तळवे फिरवत, थापटत स्तोत्र म्हणत, गुणगुणत विसावलेले आजोबा-दादा.त्यांची पांघरायची हिरवी जाड लोकरीची ढाबळी.तशीच आणखी एक लाल रंगाची ढाबळी माझ्या अंगावर घालून मला त्यांच्याशेजारी झोपवणारे.झोपवण्याआधी सज्जन माणसाघरचा पोपट आणि दुर्जनाघरचा पोपट ही गोष्टं.संस्कारांचं महत्व सांगणारी.(याबरोबरच धर्म हा मुद्दा इथूनच मनावर ठसवणारी) दादांनी स्वत:च्या, माझ्या डोक्यावर चोळून चोळून लावलेलं स्वस्तिक हेअर ऑईल.लालभडक रंगाचं,उग्र सुगंध असलेलं,मोठ्या लाटांसारख्या नक्षीच्या बाटलीतलं.त्यावेळचा माझा एक लाल कोट आठवतो.कोटाच्या तळाशी दोन खिशे.त्यावर पोपट विणलेले.रात्री कंदील लाऊन समोर बसलं की सारवलेल्या भिंतींवर स्वत:चीच मोठी दिसणारी,घाबरवणारी सावली.शेणाने सारवलेल्या स्वच्छं सपाट भिंती.सोप्याची जमिनही अधून मधून, फोफडे निघताहेत असं दिसलं की सारवून घेतलेली.सारवायची बहुतेकवेळा आजीनंच.अख्खं घरच सारवायचं.दारासमोर सपाट, नंतर एक लेव्हल असलेला भला मोठा सोपा.त्यानंतरचं काळोखी माजघर, नंतरचं स्वैपाकघर.मागचं परसदार.सोप्यालगतच्या लाकडी जिन्याने वर गेल्यावर लागणारी तीन खणांची माडी.हे भाड्याचं घर!... बहुदा आजीनंच,कुणाची न कुणाची मदत घेऊन शेणानं सारवायचं… अनेकजण अजूनही गावांमधून अश्या वातावरणात रहात असतील.माझं पुढचं सगळं आयुष्य महानगरात गेलं.दोन्ही वातावरणांमधली तफावत सतत चांगलीच जाणवत रहाणारी…     

Sunday, October 5, 2008

देवीचं दर्शन

रामाचं देऊळ, रामाच्या सोप्यावरचे पुराणिकबुवा आणि श्रोते, समोरचा पार, कार्तिकेयाचं देऊळ, त्यानंतरची देवळांची रांग, घाटी दरवाजा, त्या बाहेरचा परिसर हे सगळं हिंडत, अनुभवत असताना लक्ष असायचं त्या संकुलाच्या मध्यभागी.रामाचं देऊळ ते घाटी दरवाजा हा त्या संकुल परिसराचा अगदी छोटासा भाग.संकुलालाच चार दरवाजे, म्हणजेच कमानी.मध्यभागी असलेल्या अंबाबाईच्या देवळामुळे हे ठिकाण ओळखलं जातं.संकुल वगैरे हा अलिकडचा शब्द.अंबाईला (मधला एक बा सायलंट) जाऊन यितो- हा स्थानिक सार्वजनिक उदगार.दिवस सुरू झाल्यानंतरचा.माझ्या आजोळातलं पहिलं घर महाद्वार रोडच्या वांगाया बॉळात.(स्थानिक बोलण्यात च्या मधला च सायलंट आणि बो चा बॉ झालेला) त्यामुळे महाद्वारातून येताना, गुलछडी, मोगरा, सोनचाफा अश्या फुलांचे वास घेत असतानाच टाचा ऊ-ऊंचाऊन देवीचं थेट दर्शन.भक्तांना साक्षात्कारासारखा अनुभव देणारी देवळाची रचना.संक्रातीला देवीच्या चेहेरय़ावर उन्हाची तिरीप पडते तेव्हा किरणोत्सव.अशी देवळाची रचना प्राचीन काळी कशी साधली असेल?... महाद्वारातून दर्शन झाल्यावर लगेच आत जायची ओढ.मुलांना गरूड मंडपात जायची ओढ.गरूड मंडपात पळापळीसारखे खेळ.याच गरूड मंडपात निजामपुरकरबुवा(थोरले, धाकले), वठारकरबुवा यांचे किर्तन सप्ताह.मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी गेल्यावर नुसता घरी काय बसून रहातोस म्हणून आजीनं या सप्ताहांना लहानपणी ढकलून पाठवलेलं.हे सगळं आठवलं ’शब्दछटा’ हा आपल्याच लिखाणावरचा एकपात्री कार्यक्रम करण्याची योजना आखल्याचं धाडस केलं आणि लोकसत्तामधे त्याबद्दल राईटअप आला त्या दिवशी मी नेमका देवळात आणि मित्राचा फोन… पुराण, प्रवचनं ऐकणं, किर्तन ऐकणं हे सगळं नंतर आयुष्यात आलेल्या नाटक, साहित्य या गोष्टींची पार्श्वभूमी होती.माझ्या आजोळी, आजीच्या रेट्यामुळे ती माझ्यापर्यंत पोहोचली.गरूड मंडपात गाण्याच्या मैफिलीसुध्दा.कोल्हापूर हे कलापूर.नामवंत गायक गरूड मंडपात, देवीच्या समोर, गणपतीच्या पुढ्यात, संगमरवरी कासव आहे त्या देवळात यायच्या पायरय़ांसमोर, आपली उपासना करतात.उपासना.कार्यक्रम नव्हे… पायरय़ा चढल्यावर आधी गणपतीचं दर्शन आणि त्या गणपतीला प्रदक्षिणा घालताना, बरोबर गणपतीच्या मागच्या कमानीच्या टोकावर डोकं ठेऊन पुन्हा अंबाबाईचं दर्शन.पुढे येऊन मग “त्या” कासवाला हात लाऊन नमस्कार.(आतापर्यंत हा असा नमस्कार का करायचा हे वडिलधारय़ांनी सांगितलेलं विसरायला झालंय.)हे सगळं करत असताना देवीवरची नजर हटत नाही हा एक चमत्कार.पुन्हा देवळाच्या रचनेतला?... पुढे सरकताना “चला चला” या खाकी कपड्यातल्या पहारेकरी वजा माणसाच्या घश्यात मुसळ घातल्यासारख्या आवाजाबरोबर गाभारय़ाआधीचा अंधार सुरू झालेला.काळ्या शार दगडातले नक्षीदार गार गार स्पर्श असणारे खांब.अखंड रचनाच कशी केली असेल असा अचंबा सतत - या खांबांना जोडणारी आडवी रचना, मुलांना सहज चालता, पळता येईल अशी.वाढता अंधार आणि गाभारा जवळ येतोय.देवीकडेच जायचं.पण मधेच डाव्या, उजव्या बाजूच्या सरस्वती, महाकाली या दोघींचं दर्शन अनिवार्य.त्यापैकी एकिकडे जाताना मधे श्रीचक्र, जमिनीवरच्या काळ्या दगडात कोरलेला यंत्राचा चौकोन.त्यावर सततचा अभिषेक.यंत्राच्या नक्षीत जमून राहिलेलं पाणी, दूध, फुलं, तांदूळ.त्यातलं उजव्या हाताच्या अनामिकेच्या टोकाला लागून जे येईल ते नाकाच्या वर आणि दोन्ही डोळ्यांच्या मधे असलेल्या खड्ड्याला लावायचं.सरस्वती, महाकाली यांच्या काळ्याशार, रोखून बघतील असे डोळे असणारय़ा मूर्ती.त्यांचं दर्शन झाल्यावर अंधारात पुन्हा अंबाबाईच्या गाभारय़ाजवळ,तिथे जय आणि विजय हे -राक्षस (इति: वडीलधारे) भीती दाखवणारे.त्यांचा एक एक हात समोर पसरल्यासारखा. प्रवेश करताना आडवा, जाडजूड, लांबलचक, खाली न बघता ओलांडताच न देणारा सोनियाचा उंबरा!तिथून जोरदार घंटानाद करून आत आल्यावर देवी आणि फक्त देवी!तिचं मनसोक्त दर्शन.पुन्हा चला चला चा मुसळ घातलेला जोरदार गजर, फुर्रर्रर्र शिट्या.अंबाबाईचा त्यावेळी चांगलाच भीतीदायक वाटणारा, न संपणारा प्रदक्षिणामार्ग.तो सुरू होतानाच येणारा अंगारय़ाचा भाजका, लगेच तोंडात टाकावा असा वाटणारा वास सर्वत्रं.वाटेत भींतींवर लिहिलेलं महालक्ष्मीस्तोत्रं.कुंकवानं भरलेल्या भक्तांच्या डोकं टेकवण्याच्या जागा.प्रदक्षणा कधी पूर्ण झाली कळलंच नाही!तीर्थाची धार उजव्या हाताच्या ओंजळीत.हाताची ओली चिमूट दगडी अंगारापात्रात.मग तीच अनुक्रमे कपाळावर आणि तोंडात.देवीचं दर्शन पूर्ण.परतीची पावलं जड… प्रचंड देवभोळेपणा संस्कारक्षम वयातच बिंबवणारी आपली संस्कृती?... हे माझ्या आयुष्यातल्या श्रींमंत अनुभवांचं एक संचित! माझं आजोळ माझ्या आठवणीत येताना फक्त स्मरणरंजन करत नाही, माझ्या मुळांकडे नेऊन मला विचार करायला लावतं… नवरात्रं सुरू झालं आहे, मला आंबाबाईच्या देवळाचे वेध लागले आहेत…

Saturday, September 27, 2008

पुलाखालून बरंच, प्रकाशित कादंबरी, अक्षर मानव, पुणे (०२०-६५२२९२७६)


उड्डाणपूल आणि आम्ही
आमच्या जवळच्या महामार्गावर उड्डाणपूल होणार अशी बातमी आली आणि कितीही स्थितप्रज्ञ असलो तरी आमचा आनंद गगनात मावेना.आमच्यातल्या पायी चालणाऱ्यांची महामार्ग ओलांडतानाची कसरत, सर्कस बंद होणार म्हणून ते खुश झाले.आमच्यातले सौंदर्यवादी, महामार्गाच्या त्या परिसराला एक वेगळंच आर्किटेक्चरल परिमाण मिळणार म्हणून खुश झाले.गाडीवाले आता सुखद प्रवास, वाहतूक कोंडी नाही, या विचारानं पावलोपावली होणाऱ्या मानसिक कोंडीवर विजय प्राप्त करू लागले.आपल्याकडे पॉझिटिव्ह विचारसरणी नाहीच! उशीरा का होईना या शहरावरचं ओझं कमी करणारी योजना कार्यान्वित होतेय तर त्यात बिब्बे घालणारे अनेक.मग वाहनांची संख्याच कशी बेसुमार वाढेल, प्रदुषणच कसं वाढेल, खर्च किती होईल, कर्जं कशी फेडणार, काय गरज आहे या अव्यवहारी योजनेची, त्यापेक्षा हे शहर आता मरायला टेकलंय, त्याला जगवण्यासाठी इतर अनेक अधिक महत्वाच्या उपाययोजना करायच्या तर… अशी राळ उडवली गेली.राळ नाही तर काय?शहराची दोन वेगवेगळ्या दिशांची टोकं क्षणार्धात एकमेकाला मिळणार ते कुठेच गेलं!मंत्री हटले नाहीत, सरकार हटलं नाही, थोडा काळ, “मी असं विधान करतो, मग तू असं विधान कर, त्यावर-” असा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचा सामोपचाराचा हुतुतू झाला.पण एकूणच, उड्डाणपूल झालेच पाहिजेत आणि तेही आत्ताच यावर सगळ्यांचं एकमत झालं.मंडळाच्या हसऱ्या जाहिरातीत सगळे नेते एकसारखे दिसत होते आणि हसत होते.मंडळही नुसतं नव्हतं, “महा” होतं.एवढं सगळं झालं तरी आम्हाला या प्रकाराची पुरेशी झिंग अजून आली नव्हती.झिंग नाही तर मग मजाच नाही!किती नेते, उपनेते, गटप्रमुख, उपप्रमुख, विभाग असतात राजकारणात!उड्डाणपुलांचे उदघाटन समारंभ सुरू झाले आणि तेव्हाच आम्हाला ही माहिती झाली.अज्ञानात सुख असतं असं कोण म्हणतं?तर झिंग.आमच्या जवळच्या त्या महामार्गावर सिमेंटच्या पोत्यांचे ट्रक आले, सळ्या आल्या, विटा आल्या, गर्डर्स आले.सिमेंट मिक्सिंगची ती अवाढव्य मशिन्स आली, इतकंच नव्हे तर शेकड्यानं कंत्राटी कामगार दिसायला लागले.एका उड्डाणपुलाच्या कामात किती दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना रोजगार मिळणार होता!काहींचं म्हणणं हे कामगार परप्रांतीय आहेत.मग काय करणार?कंत्राटदार माणसं कुठून आणणार?खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा स्वप्रांतीयांचा बाणा!असोअसो!आम्ही या सगळ्या प्रकाराची झिंग पुरेपुर अनुभवायला लागलो होतो हे नक्कीच बिनमहत्वाचं नव्हतं…
(संपादित अंश)

Sunday, September 21, 2008

घाटी दरवाजा

कोपऱ्यात, अंधारात असलेल्या त्या कार्तिकेयाच्या देवळाबद्दल अढी मात्र कायम राहिली.कोपऱ्याबाहेर उजव्या दिशेला पसरलेली छोट्या देवळांची रांग.शेजारी शेजारी असलेल्या दुकानांसारखी.पुढे खरंच अश्या गाळ्यांमधून पेढे, फुटाणे, बत्तासे, साखरफुटाणे, हळदीकुंकू, गंध, उदबत्त्या, नारळ, ओटीचं साहित्य विकणारी दुकानं.कार्तिकेयाच्या देवळानंतरची ही रांग घाटी दरवाज्यापर्यंत.दरवाज्याअलिकडच्या रिकाम्या कमानीत देवीचा भला मोठा रथ "पार्क" केलेला.त्याला झोंबणारी, वरपर्यंत चढणारी मुलं.घाटी दरवाज्याजवळ असलेल्या त्या गाळावजा देवळांच्या भल्या मोठया एकचएक लांबलचक ओटीवर बसलेल्या बायका, मुलं, बायकांचे हास्याविनोद, खेळणारी मुलं.या ओटीच्या घाटी दरवाज्याजवळच्या टोकाला कोपऱ्यात सुरू होणाऱ्या आणि दरवाज्याच्या माथ्यावरच्या भल्यामोठया घंटेपर्यंत पोहोचवणाऱ्या दगडी पायऱ्या.वर मोठी घंटा असलेली भव्य कमान असलेला म्हणून हा घाटी दरवाजा,आम्हाला घरच्यांनी वर या घंटेपर्यंत कधीच पोहोचू दिलं नाही पण कित्येक मुलं जायची.आजी त्यांना वांड म्हणायची.अगदीच रागावलेली असली की उंडगी म्हणायची.ही भली मोठी घंटा-घाट वाजलेली मी प्रत्यक्ष कधीच पाहिली नाही.भल्या पहाटे काकडआरती होण्याआधी तिचा आवाज कधीतरी ऐकला आणि त्यापेक्षा जास्त ऐकले ते परिसरात त्या पहिल्या घाटेशी निगडीत वाक्प्रचार.घाटी दरवाज्याच्या कमानीत दोन दुकानं.समोरसमोर.पूजाविधिंसाठी साधनं, देवांच्या तसबिरी, प्रसाद वगैरेंची.इथे आलं की बाहेर काय आहे याची उत्सुकता.बाहेर एक देऊळ.त्या देवळासमोर लोखंडाची जाळी लाऊन बंद केलेली विहीर.त्यात कासव.या विहीरीचीही पूजा.देऊळ शुभ्र पांढरं.चुना लाऊन रंगवलेलं.त्या देवळाच्या भिंतीत १फूट बाय १फूट असेल अशी शंकरपाळ्यांचा आकारांची भोकं असलेली जाळी.ही जाळी, देवळाच्या दरवाजाची कडा, कळसाकडे जाणाऱ्या पायऱ्यांसारख्या रचनेच्या प्रत्येक कोपऱ्यावर असलेले छोटे दगडी चौकोन, कळसाआधीचं घुमट आणि कळसाचं टोक हे सगळं शेंदरी.देवळावरची ही शुभ्र आणि शेंदरी रंगसंगती ठसठशीत, उठून दिसणारी.या देवळाच्या आगेमागेही एक छोटसं देऊळ.ही देवळं कायम बंद असल्यासारखी.आत कधीच जाता आलं नाही.

Saturday, September 13, 2008

देवळाची भीती...

पुढे कितीही मंदिरं बघितली तरी माझ्या आजोळच्या राममंदिराची मजा काही औरच.पुजारी भरपूर तीर्थ द्यायचे.त्यात पंचामृत आणि थंड पाणी.ते पिऊन उजवा हात मोठ्या माणसांसारखा केसांवरून फिरवायचा.तरीही हात ओला राहिला तर मग चड्डीला.राम,लक्ष्मण,सीतेकडे बघत बघत(पुन्हा एकदा) घंटांकडे जायचं.त्या चार-पाच घंटांमधली खणखणीत वाजेल अशी डेरेदार गट्टूचा टोल असलेली घंटा निवडायची.उड्या मा-मारून ती वाजवायची.ती वाजली की निघताना मोठ्या माणसांप्रमाणे छातीशी हात जोडून किंवा साष्टांग नमस्कार.रामाच्या देवळातनं चटकन पाय बाहेर निघायचा नाही पण बाहेर जाणंही हवंच असायचं.मग पुन्हा रामाच्या सोप्यात…सगळी मंडळी तल्लीन.बुवा तल्लीन.बुवांच्या आवाजाची पट्टी वर चढलेली.आता तो सोपा उतरावा असं वाटायला लागायचं.त्याचवेळी त्या सोप्याच्या अर्ध्या भिंतीच्या पलिकडे आई,मावशी कुणीतरी दिसायच्या.रामाचा सोपा आणि तो वडाचा भला मोठा पार यांच्या मधून वाट निघायची.या वाटेने रामाच्या देवळाच्या उजव्या बाजूला गेलं की अनेक छोट्या देवळांची रांग लागायची.या रांगेअलिकडे एक अंधारा बोळवजा कोपरा.आई-मावशीला बघून मी लगेच त्यांच्याकडे धावलो की त्या मला त्या कोपरय़ातल्या बोळवजा अंधारात एक देऊळ होतं तिथे पिटाळायच्या.मला आत जायला भीती वाटायची आणि त्या सारख्या जा!दर्शन घेऊन ये! असा आग्रह करायचा.मी म्हणायचो तुम्हीही या! त्या म्हणायच्या बायकांनी तिथे जायचं नसतं.मुलींनीही नाही…कोपरय़ातल्या त्या अंधारात दोन-तीन देवळं.एकमेकाला लागून.अंधारात जटा वाढवलेले,भस्माचे पट्टे ओढलेले,काळे काळे साधू!मी आत जायला जाम तयार नसायचो.त्यांचा आग्रह चालूच.माझी अवस्था बघून त्यांचं मला हसणं,माझी खिल्ली उडवणं.अंधार,साधू,बायकांना बंदी असलं कसलं देऊळ?...गणपतीच्या मोठ्या भावाच्या, कार्तिकेयाच्या त्या देवळाबद्दल मनात भीती राहिली.भीतीमुळे अढी.देवानं असला कसला निश्चय करायचा?स्त्रीचं तोंड न बघण्याचा?त्यानं बघायचं नाही म्हणून बायकांना बंदी?...डोक्यात प्रश्न चालू व्हायचे…

Thursday, September 11, 2008

रामाचं देऊळ

मी शहाण्या मुलासारखा त्या गोष्टीतल्या… गोष्टीकडे एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचो पण माझ्या नजरेचं एक अग्र आजीच्या दिशेने असायचं.हळूहळू आजीची उजवी मांडी उभी व्हायची आणि डावी मांडी आडवी.तिचं लक्ष पुराणाकडे.मग हळूच तिचा हात,हाताचं कोपर आडव्या मांडीवर रूतायचं.हाताच्या पाच सुरकुतलेल्या पण मांसल बोटात तिचा गोबरा चेहेरा टेकायचा.गोबरय़ा गालावर तर्जनी रूतली की डाव्या गालातला चेंडू नाहीसा व्हायचा.उजव्या गालातला चेंडू डब्बल!मजा वाटायची.आजी स्थिर झाली की जरावेळाने मजा संपायची.मग पुन्हा इकडे तिकडे…रामाचं देऊळ हे त्या संकुलातलं अगदी अलिकडचं,चकचकीत,लख्ख!जुनाट असं काहीही नाही.फरशी चकचकीत राखाडी रंगाची,गुळगुळीत.तिच्यावर हात फिरवत तसाच बसायचो.मग खूपच कंटाळा याय लागायचा.रामाच्या देवळातलं तीर्थ प्यावसं वाटायला लागायचं.उडी मारून घंटा वाजवावी असा फारच मोह व्हायला लागायचा.मी आजीच्या गालातल्या त्या डब्बल चेंडूकडे बघत बघत हळूच उठायचो.आज्जी गुंग.मी हळूच आत देवळात जायचो.रामाच्या देवळात आवडण्यासारखं खूप होतं.पहिलं म्हणजे लखलखीत प्रकाश.अंधार अजिबात नाही.मुख्य म्हणजे राम,लक्ष्मण,सीता यांच्या पांढरय़ाशुभ्र संगमरवरी मूर्ती.बघतच बसाव्यात अश्या.टक लावून पाहिलं की त्या हसताहेत असं वाटायचं.त्यांची नेहेमी बदलत रहाणारी रेशमी वस्त्रं!रेशमाचे गर्द लाल,निळे,जांभळे,पिवळे,हिरवे असे रंग त्या शुभ्र मूर्तींना खुलून दिसणारे.दृष्टं लागण्यासारखे.राम लक्ष्मणाच्या खांद्यावरचे धनुष्यबाण,सीतेचे दागिने,पुढ्यात हात जोडून बसलेला मारूती.असं देऊळ कुठेच असणार नाही असं मी पैजेवर सांगायचो.ठाकुरद्वारचं गोराराम मंदिर बघेपर्यंत…