romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, September 21, 2010

कॉमेडी शो “सिरियल मर्डरर”

या जगात आव आणणं खूप महत्वाचं आहे.विशेषत: आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचा आव आणावाच लागतो हे आपल्या मनूला बरोब्बर पटलंय.यावेळी तो समोर आला ’टिळक’ छाप भरघोस मिशा वाढवून आणि लांब वाढलेल्या डोक्यावरच्या केसांचा पोनी बांधून.डोक्यावर उलटी टोपी.कमरेला बांधलेला पर्सवजा पाऊच.मी म्हटलं, “हे काय?” तो म्हणाला, “सिरियलचा कार्यकारी निर्माता आणि लेखकही झालोय!” मी नेहेमीप्रमाणे उडालोच.ओरडलो, “हिंदी सिरियल?” तो मग्रूरपणे म्हणाला, “नाय! मर्हाटी!” मी विचारलं, “नाव काय?” तो म्हणाला, “धिरधिरतांग- एक टांग माकडाला!” मी आणखी जोरात ओरडलो, “डब्बल नाव?- आणि त्याचा अर्थ?” मनूनं चेहेरा आणखी मग्रूर केला.मला एक शेलकी शिवी घातली.म्हणाला, “ओरडत काय सुटलाएस? सालं सिरियलला जे नाव द्यावं ते आधीच कुणीतरी रजिस्टर करून अडवलेलं!” मनूनं कमरेच्या पाऊचमधे बोटं सरकवून दोन-चार किमती पेनं काढून कुरवाळली.मी म्हटलं, “हे काय?” तो म्हणाला, “दिसत नाही?” मी विचारलं, “तुझं ते- ते- हे कुठाय?”- म्या पामराला लॅपटॉप या वस्तूचं नाव आठवेना.मनूला फुरफुरायला आयतीच संधी मिळाली.हातातली किमती पेनं नाचवत तो म्हणाला, “अरय़ेऽ ह्येच माझं साधन! याच्यावरच मी इतका-” उडतो!- असं मात्र मी मनात म्हणालो आणि माझ्या स्मरणशक्तीचं भारनियमन संपलं. “-लॅपटॉप रे! लॅपटॉप कुठेय तुझा?” केविलवाणा होऊन मी विचारलं. “झक मारत ग्येलाऽ तो असला की लेखकाचा हमाल करतात! ह्ये बरं!” तीच किमती पेनं आता कुणालातरी टोचून खुपसल्यासारखी करत मनू म्हणाला.लेखणीला तलवारीपेक्षा जास्त धार असते- मी मनातल्या मनात म्हणालो आणि आदराने त्याच्याकडे बघत राहिलो.एक जुनी म्हण आठवली.चला! सिरियलचं नाव तरी चांगलंच शोभून दिसत होतं- आव रावणाचा आणि…
शूटिंग सुरू झालंय म्हणून मी कामावर दांडीबिंडी मारून उत्साहाने बघायला गेलो.मग्रूर आव आणलेल्या मनूजवळ जाऊन उभा राहिलो.तो मिश्यांवरून हात फिरवून कार्यकारी निर्मातेपणाचा आव आणत होता.मी म्हटलं, “अरे संवाद कुठेयत सिरियलचे?” त्याने आपली मग्रूर भुवई उडवली, म्हणाला; “शॉट लागला की लिहिणार गरमागरम जिलब्या तळतात तसे!” आणि स्वत:च्या विनोदावर स्वत:च हसला.सेटवर राबणारय़ा पोरांनी हे नवीन काय म्हणून त्याच्याकडे बघितलं तर त्यांच्यावर डाफरला.
मनूनं चांगलंच नशीब काढलं होतं.हिंदीतली सुप्रसिद्ध माजी नटी निर्माती, मराठीतला वरच्या श्रेणीतला दिग्दर्शक, दोन-चार बुजुर्ग नट आणि बाकीची मनूच्या मर्जीतली पिलावळ.त्या पिलावळीला फार मोठा ब्रेक दिल्याचा आव मनू आणत होताच.एका बुजुर्ग नटाचं काम मानधनाच्या मुद्यावर मनूनं आपल्या शैलीत कापलं असावं कारण त्याच्याऐवजी आयत्यावेळी बोलवलेला एक होतकरू नट कॅरेक्टर रोलच्या पोषाखात उगाचच जीवाची उलाघाल करत उभा होता.पहिला शॉट काही अजून लागत नव्हता.
मी मनूला हळूच म्हटलं, “अरे शेकडा नव्वद सिरियल्स तोट्यात जातात म्हणून गळे काढता तुम्ही लोक.तू या सगळ्यांचे पैसे कधी आणि कसे देणार?” मनूनं त्या ’होतकरू’ वरची आपली कुत्सित नजर काढली आणि ती आणखी मग्रूर करून माझ्याकडे वळवली.खिडकीतून बाहेर खूण केली.मी खिडकीच्या बाहेर बघितलं.कंपाऊंडलगत भली मोठी करकरीत वॅगनवजा भलीमोठी मोटार.म्हणाला, “हा पेढा खा! हप्त्यानं घेतली गाडी.आजच! ’ह्या’ सगळ्यांचे पैसे ग्येल्ये काशीत!” मी तोंडात बोट घालून चूपचाप मनूचा आव आणि त्याच्या महत्वाकांक्षी सिरियलचा पहिला शॉट लागण्याची वाट बघत राहिलो.
मस्त वातावरण.मेकअपरूमधल्या गप्पा.उत्तम जेवण आणि अविरत काम.मनूनं हुकमी आव आणलेला.त्यामुळे त्याला मैत्रिणही मिळालेली.सावलीसारखी सोबत करणारी.शूटींगचा पहिला दिवस संपला आणि दोघांनीही यथार्थ, कृतार्थ झाल्याचा आव आणला.दमल्याचा आव आणला.सगळ्या युनिटनी दोघांचं कौतुक केलं.मुख्य म्हणजे तो होतकरू नटही उत्तम मिळाला पण मनू मग्रूर आव आणून त्याला तुच्छतेचीच वागणूक देत राहिला.त्याला महत्वाच्या भूमिकेसाठी बोलावूनही त्याला जाणवेल अश्या पद्धतीनं त्याला काही महत्व नाही जे जाणवून द्यायची एकही संधी मनूनं सोडली नाही.मी सहज त्याचं कौतुक केलं तर मनू फिस्कारला, “गरजेला उपयोगी पडला म्हणून काय झालं? तो आला नसता तर आज शूटिंग सुरूच झालं नसतं म्हणून त्याला घेतला!”
शूटिंगचं पहिलं सत्र संपलं आणि मनूनं आता दिग्दर्शकाचाही आव आणायला सुरवात केली.ज्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला सिरियलचा दिग्दर्शक म्हणून नेमण्यात आलं होतं त्याला बाजूला सारून मनूनं दिग्दर्शन करायला सुरवात केली.सेटवर राबणारय़ा तंत्रज्ञांना तो सहज झापू लागला.मी मनूला खाजगीत विचारलं, “सगळंच हातात घेतोएस.तुला झेपेल?” मनू माझ्यावरही डाफरला.सगळ्यांवर सतत उद्धटपणानं डाफरणं म्हणजे कार्यकारी निर्मातेपण अशी मनूची खात्री झाली होती.शिवाय फार्फार दिवसांपूर्वी हिंदीतल्या एका ’ब’ निर्मातीनं ब्लाऊज फेकून मारला होता- मनूच्या मैत्रिणीचा- मनूच्या अंगावर.असं म्हणे.मनू त्याचा तर सूड घेत नव्हता?
व्हायचं तेच झालं.सिरियल जेव्हा हवेत म्हणजे ’एयर’ वर आली तेव्हा खरय़ा दिग्दर्शकानं स्वाभिमान न सोडता काम सोडलं.मनूनं त्यालाही लेफ्टराईट घेतलं.सहाय्यक दिग्दर्शकाच्या ’दगडी चाळ’ पवित्र्यापुढे मनूचं काही चाललं नाही तिथे त्यानं लोटागंण घातलं.तंत्रज्ञांचं पोट हातावर असतं.त्यांना आजचे पैसे मिळाले नाहीत की उद्याचे आणि आजचे पैसे चोख घेतल्याशिवाय ते उद्या उगवत नाहीत.कॅमेरामन जरी मित्र असला तरी कॅमेरय़ाच्या भाड्याचा चेक वठला नाही तर कॅमेरावाला कॅमेरा दाबून ठेवतो.मनूनं त्या होतकरू नटालाही अपमानास्पद वागणूक दिलेली.त्यानंही ठेंगा दाखवला.
सिरियलमधे सतत फ्लॅशबॅक दिसायला लागले आणि बघ्यांनी ओळखलं की आता ’धिरधिरतांग’ चं काही खरं नाही.आपल्या मनूला प्रायोजकाचा आव मात्र काही केल्या आणता आला नाही! हळूहळू सगळे चिकनेचुपडे हिरोज- मनूनं जमवलेली पिलावळ- हिरमुसली, दुसरय़ा सेटवर जाऊन रूजू झाली.प्रायोजकांअभावी सिरियल बंद पडली.कसलाही आव आणता येतो.पण…
एवढ्यानं काय होतंय आव तर आणलाच पाहिजे.आणि आव आणायचा तर कमलहासनसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा.निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कार्यकारी निर्माता आणि जे जे, ज्याचा ज्याचा आव आणता येईल ते ते! आव रावणाचा आणि…
मजा म्हणजे आता टाटा सन्मान, बिर्ला सन्मानही जाहीर होऊ लागले म्हणजे मनूला सगळंच आभाळ मोकळं! या सगळ्याने मनूचा अहंगंड तरी जोपासला जाणारच.मनूला दुसरं काय हवं आहे? तो बघणारय़ा तुम्हा-आम्हालाही तुच्छच मानतो!

Friday, September 17, 2010

कॉमेडी शो- “अखेर विजय सत्याचाच!”

“आपण पेपर का वाचतो?” मनूला अधूनमधून असले तात्विक प्रश्न उभे करायची फार सवय.पुन्हा हे प्रश्न कुठल्या काळातले असतील याचा नेम नाही.गढे हुए मुर्दे खोदायची मनूची जुनी सवय.आता पेपर का वाचतो म्हणजे? माझी नेहेमीप्रमाणे गोची झालेली.मग नेहेमीप्रमाणे मनूची बारह डिब्बेकी गाडी भरधाव सुटते.तो म्हणतो, “मी सांगतो! आपण पेपर वाचतो कारण त्यात चांगल्या बातम्या असतात आणि वाईटही बातम्या असतात.चांगल्या बातम्या फारश्या नसतातच पण वाईट बातम्या आपल्याला लगेच आकर्षित करतात.त्यातही दोन प्रकार असतात बघ! एक वैयक्तिक पातळीवरची गुन्हेगारी आणि दुसरी संघटित गुन्हेगारी.वैयक्तिक पातळीवरच्या गुन्हेगारीचं एक वेळ जाऊ दे पण संघटित गुन्हेगारीचे पुन्हा दोन प्रकार असतात.चित्रपट क्षेत्रातली गुन्हेगारी आणि राजकारणातली गुन्हेगारी.राजकारणातल्या गुन्हेगारीबद्दल तू, मी नकोच बोलूया.चोथा झालाय आता.तर चित्रपट क्षेत्रातली गुन्हेगारी म्हणजे पुन्हा चित्रपटात चित्रित केली गेलेली गुन्हेगारी आणि प्रत्यक्ष चित्रकर्मींमधली गुन्हेगारी.चित्रित केलेली गुन्हेगारी फ्लॉप होऊ शकते पण ’प्रत्यक्ष’ गुन्हेगारी आजवर नेहेमीच बॉक्स ऑफिस ’हिट’ ठरली आहे.आता या चित्रपट क्षेत्रातल्या प्रत्यक्ष जीवघेण्या भांडणात दोन घटक हस्तक्षेप करू शकतात.एक म्हणजे पोलिस.दोन म्हणजे परदेशस्थ ’भाई’.जीवघेण्या भांडणातच दोन गोष्टी होतात.पहिल्याचा खून नाहीतर दुसरय़ाचा खून.कुणाचाही खून झाला की दोन गोष्टी होतात.आरोपीचा शोध किंवा आरोपी फरार.आता आरोपी फरारच झाला तर काय करणार? पण सापडला तर… तर…” मनू अडकला आणि मी जोरात उंच उडी मारली.इतका वेळ हे दोन दोनचं आख्यान ऐकून वीट आला होता पण मनू काय या दोन दोनच्या वीटा सारायचा थांबत नव्हता.तो दमला आणि सामान्य माणसाच्या न्यायपद्धतीवर असलेल्या ठाम विश्वासानं मी मनूला कोंडीत पकडलं.म्हणालो, “आरोपी सापडला तर मात्र एक आणि एकच गोष्टं होऊ शकते बाबूराव! न्यायालयात खटला उभा राहू शकतो!” असं म्हणताना माझा ऊर अभिमानानं भरून फुगला.त्याचक्षणी मनू जिवणी फा-फाकवून कुत्सित हसत म्हणाला, “पुढे?... आबुराव पुढे काय? अं?” झालं! मनूनं फुग्याला टाचणी लावली आणि मी नेहेमीप्रमाणे तऽतऽपऽप करायला लागलो.
मनूचा जोर वाढला.म्हणाला, “पुढे काय ते मी सांगतो! पुढे दोन गोष्टी होतात.एक म्हणजे तारखा लागतात तरी किंवा नुसत्याच पडतात.तारखा लागल्यावर काय होतं? साक्षीदार मरतात तरी किंवा जिवंत रहातात.साक्षीदार चुकून-माकून जिवंत राहिले तर दोन गोष्टी होतात.एक तर ते वेडे तरी होतात किंवा उलटतात तरी.साक्षीदार उलटले की वकिलांना हुरूप येतो कारण त्यांच्या हातात तुरूप येतो.गंमत म्हणजे हे वकीलही दोन प्रकारचे असतात बरं का सोन्या! एक म्हणजे सरकारी वकील.जे फक्त त्यांच्या त्या कमवलेल्या किनरय़ा आवाजात मोठमोठ्याने ओरडून प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती देत असतात ते आणि दुसरे आरोपीचे वकील.ज्यांना तू ओळखतोसच.ते भरपूर पैसे तरी कमवतात किंवा खासदार किंवा कायदेमंत्री होतात किंवा पैसा आणि मंत्रीपद दोन्ही कमवतात.न्यायदेवतेचं काय असतं तुला सांगू का मोन्या? तिच्या हातातल्या तराजूलाही दोन पारडी असतात.एक उजवं, एक डावं आणि- आणि एक योगायोग सांगू का तुला? न्यायदेवतेलाही दोन डोळे असतात.एक उजवा आणि एक-” आता या दोन दोनमुळे माझा संताप अनावर झाला.मी बेभान झालो.ओरडलो, “अरे पण न्यायदेवता आंधळी असतेऽऽ तिच्या दोन्ही डोळ्यांवर काळी पट्टी असतेऽऽ एकच!” मनूनं सावधपणानं आजुबाजूला बघितलं.नजर रोखून विचारलं, “न्यायदेवतेचा अपमान करतोयस काय रे ए भडव्या! आत टाकू?” माझी पाचावर धारण बसली.आता दोनच गोष्टी शक्य होत्या.माझ्या चड्डीचा रंग तरी बदलणार होता किंवा शेजारच्या सुलभ शौचलयात तरी जाणं भाग होतं!
माझी अशी अवस्था झाली की मनूला स्वर्ग दोन बोटं उरतो आणी मी मात्र माझी दोन बोटं जगाला दाखवून मला नक्की कुठे जायचंय ते सूचित करत असतो. “रिलॅक्स! जस्ट रिलॅक्स!” जादूगारासारखं मनू म्हणाला. “आता जरा वेगळ्या विषयावर बोलूया!” मनूचं हे ’बोलूया’ म्हणजे तोच बोलणार आणि मी ऐकणार! “काय आहे! एक तर जिवंत मुर्दे तरी उखडूया किंवा गढे हुए तरी.जिवंत उखडायचे म्हणजे स्साला अब्रुनुकसानीचा प्रश्न! तर मला सांग! फळविक्रेत्यानं काय करावं? फळं विकावी की कॅसेट कंपनी काढावी?” माझ्या हाताची दोन बोटं मगाशी ताठ झालीच होती.दोन दोनला आता इलाज नव्हता.मी माझीच दोन बोटं माझ्याच दोन नाकपुड्यांवरून फिरवून प्रश्नाचं उत्तर शोधायला लहान मुलांसमोर धरतात तशी माझ्याच तोंडासमोर धरली.त्यातलं माझं एक बोट मी माझ्याच मनात धरलं आणि ओरडलो, “कॅसेट कंपनी काढावी!” मनू खूष झाला. “अगला सवाल! ओरिजनल कॅसेटची की ड्युप्लिकेट कॅसेटची?” मी पुन्हा माझंच बोट माझ्याच मनात धरून उत्तर दिलं, “ड्युप्लिकेट कॅसेटची!” मनूनं माझ्या पाठीवर थोपटलं, “अगला सवाल! त्या कॅसेटवर कोण गाणार? ओरिजनल लता की ड्युप्लिकेट लता?” मी म्हणालो, “अर्थातच ड्युप्लिकेट लता!” “अगला सवाल! कॅसेटकिंग होणं सरळ माणसाचं काम आहे की-” मी मनूला अडवून जोरात ओरडलो, “या जगात सरळ माणूस कधीच किंग होऊ शकणार नाही!” मनू म्हणाला, “शाब्बास! बिना लाईफलाईनके आप अच्छा खेल रहे है! अगला सवाल! कॅसेट्किंगने आपल्या ठोकळ्या भावाला लोकांच्या माथी मारलं ही त्याची मोठी चूक की हिरो बनायला चाललेल्या संगीतकार जोडीला दाबलं ही त्याची मोठी चूक?” मी मोठ्ठा निरर्थक पॉज घेण्याचा प्रयत्न केला.दिलिपसाब किंवा गोखलेसरांसारखा.मग म्हणालो, “लोकांना असले ठोकळे माथ्यावर घ्यायची सवयच आहे.हल्लीच्या मालिका बघत नाहिएस का तू? त्यामुळे संगीतकार होण्यापेक्षा हिरो बनायला चाललेल्या संगीतकारांना नाराज केलं ही त्याची मोठी चूक!” मनूनं डावा हात जास्त वापरून टाळ्या वाजवल्या.मी पैसे जिंकत नव्हतो तरी मला चेव येत होता.मराठी माणसाला पैसे हातात नसतानाच जास्त चेव येत असतो.मनूनं पुढचा डाव टाकला, “कॅसेटकिंगचा खून केलाच नव्हता मग जोडीतला एक संगीतकार परदेशी का पळाला?” मी जोरात ओरडलो, “याची दोन उत्तरं आहेत! एक! अल्पसंख्याकाला या देशात न्याय मिळत नाही हे त्याला सिद्धं करायचं होतं! दोन! आपण दोषी नाही म्हणून डोळ्यातनं पाणी काढून ऊर बडवणं आपल्या इथं उरलेल्या बहुसंख्याक जोडीदाराला सहज जमेल अशी त्याची खात्री होती!” मनूचा आखरी सवाल होता, “या देशात कोणत्या दोन गोष्टी खरय़ा आहेत?” मनूनं माझं बाहुलं करून टाकलंच होतं.मी लगेच उत्तरलो, “असत्य आणि न्यायालयाच निकाल! निकाल लागल्यावर प्रति कॅसेटकिंग काय म्हणाला आठवतंय का तुला? या निकालामुळे न्यायालयांवरची त्याची श्रद्धा वाढली आहे! सामान्य माणसांपेक्षा खुनी गुन्हेगारांचा न्यायसंस्थेवरचा विश्वास वाढतोय.अखेर विजय सत्याचाच म्हणून दोन बोटं वर करून आणि गळ्यात गळे घालून विजय साजरा करणारय़ांचे फोटो फ्रेम करून घराघरात लावले पाहिजेत!” मी जास्त बोलतोय हे लक्षात आल्याबरोबर मनूने तोंडानेच हूटर वाजवला.म्हणाला, “आज के लिए बस इतनाही!”

Thursday, September 16, 2010

पहिली भूमिका!

माजी विद्यार्थी संघाच्या संमेलनात ती ग्रीक शोकांत पद्धतीची एकांकिका होणार होती.त्यातल्या चार पात्रांपैकी एक असणारय़ा माझ्या क्रिकेट खेळणारय़ा मित्राला मॅच सुरू होण्याआधी डोक्याच्या मागच्या भागावर बॅट लागल्याचं निमित्त होऊन चार-पाच टाके पडले आणि घरच्यानी त्याचं तालमीला जाणं बंद करून टाकलं.मी काय करू? मी त्याला विचारलं.तो म्हणाला, तू जा तालमीला, बस जाऊन.मी गेलो.तालिम बघणं मला आवडायला लागलं होतं.
मी गेलो तेव्हा दिग्दर्शक एकटाच हॉलमधे बसला होता.तू पाहिलीएस रिहर्सल बरोबर?- त्यानं विचारलं.मी चाचरत मान डोलावली.राहशील उभा?- त्याने विचारलं.मी म्हटलं, मी अजून कधीच- तो म्हणाला, काळजी करू नकोस.मी सांगतो तसं करायचं.चल.सुरवातीचे दोन सीन्स करूया.मी पडत धडपडत तो सांगेल तसं करून दाखवत होतो.कुठलीही कृती करताना मेल्याहून मेल्यासारखं होत होतं.असं का? करताना माझं मलाच कळत होतं मी किती वाईट करतोय.साधं हंडा उचलून डोक्यावर ठेवण्याचा हावभाव करणं मला जमत नव्हतं.एरवी त्या मुलांकडून कठोरपणे सगळं करून घेणारा दिग्दर्शक मला मात्र समजाऊन, उत्तेजन देऊन सगळं करून घेत होता.आता थांब- असं त्याने म्हटलं तेव्हा मी घामाघूम झालो होतो.आजुबाजूला बघतो तर नाटकातली इतर मुलं जमलेली.ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघताएत असं माझं मलाच वाटायला लागलं बहुतेक.आता एकांकिकेची संपूर्ण तालिम मी इतर पात्रांबरोबर केली- म्हणजे तसं करायचा प्रयत्न केला.उद्यापासून तू सगळ्यांच्या तासभर आधी यायचंस- दिग्दर्शकानं फर्मान सोडलं.मी घरी कधी आलो.घरच्यांना कधी सांगितलं.अंथरूणावर कधी पडलो.झोप लागली की लागलीच नाही.काहीच कळलं नाही.नोकरी लागली होती, माझ्या नाटकात काम करण्याच्या घरच्यांच्या विरोधाला नामोहरम करणारी एक जमेची बाजू आता माझ्याकडे होती.सकाळी उठलो.सगळं आवरलं.ऑफिसला गेलो.हे सगळं कसं पार पडत होतं मला काहीच कळत नव्हतं.
दुसरा दिवस.माझी एकट्याची रिहर्सल नावाचा तो एकाचवेळी घाबरवणारा आणि एक्साईटही करणारा प्रकार संपला.इतर पात्रं आली.दिग्दर्शक म्हणाला, आता बस आणि संपूर्ण रिहर्सल बघून घे.मी बारकाईने बघू लागलो…
ते तिघे सैरावरा धावत होते.वाट फुटेल तिथे.कुणीतरी मागे लागल्यासारखे.आपण काय करतोय हे ते तिघे संवादातून सांगत होते.संवादाचा एक पॅटर्न होता.प्रत्येक पात्राच्या वाटेला दरवेळी साधारण एक वाक्य.तिघे पाळीपाळीने आपापलं वाक्य म्हणत होते.या प्रत्येकाच्या एकेक वाक्यातून होणारय़ा त्यांच्या आपापसातल्या संवादातून त्यांची मनस्थिती, वातावरण उभं रहात होतं.धावणारे तिघे दमले.तरीही धावत राहिले.बरंच अंतर कापलं गेलं.एक काळा डगला घातलेला म्हातारा सामोरा आला.तो त्याना म्हणाला- जा! या दिशेने जा! त्याचं सगळं बोलणं ऐकून न घेताच ते धावले.तो पुढे म्हणाला, त्या तिथे आहे, तुमचा मृत्यू!
न ऐकता भरधाव धावणारे ते तिघे आता जंगलात शिरले.फक्त हावभावानेच ते जंगलात शिरल्याचं दाखवता होते.वेली, झाडं, लहान, लहान ओहोळ, टेकड्या, चिखलाचा प्रदेश असं सगळं ते ओलांडताहेत.एका जागी उभं झाड.म्हणजेच झाडासारखे हात करून पाठमोरा उभा असलेला मगासचाच तो म्हातारा.तो वळतो.झाडाचा पुन्हा म्हातारा होतो.म्हणतो, इथे उकरा!- पुन्हा वळून तो झाड होतो.
तिघे त्या जागी खणायला सुरवात करतात.बरंच खणून झाल्यावर हंडा सापडलाय.जीव तोडून, जोर लाऊन तिघांनी हंडा बाहेर काढलाय.हंडा बराच जड आहे.काय आहे यात? ते तिघे हंडा जमिनीवर रिकामा करतात तर काय? चांदीच्या मोहरा! त्याना झालेला आनंद त्यांच्या चेहेरय़ातून, डोळ्यातून, हालचालीतून ओसंडायला लागलाय.तरीही तो कशातच मावत नाहीये.
आनंद ओसरायला लागलाय कारण आता भुकेची जाणीव होऊ लागलीए.एकाला मोहरांची राखण करायला सांगून इतर दोघे जेवणाआधी पाण्याची सोय करायला पाहिजे असं म्हणून रिकामा हंडा घेऊन तिथून निघतात.
मोहरांची राखण करणारा मोहरांच्या त्या ढीगाचे तीन समान भाग करतो.मग ते तीन ढीग न्याहाळत असताना इतर दोघांचे ढीग कमी करून तो आपला ढीग वाढवायला लागतो.
पाणी आणायला निघालेले दोघे पुन्हा वेली, झाडं इत्यादीतून वाट काढत पाण्याचा ओहोळ शोधून काढतात.त्यांच्या मनात कली शिरलाय.जंगलातल्या विषारी मुळ्या ते शोधून काढतात.त्या पिळून त्यांचा रस ते हंड्यातल्या पाण्यात मिसळतात.पाण्याने भरलेला हंडा आणी चेहेरय़ावर विचित्र हास्य घेऊन ते दोघे ’त्या’ झाडाखाली मोहरांची राखण करणारय़ा आपल्या तिसरय़ा मित्राकडे निघाले आहेत…
माझ्या डोक्यात रात्रंदिवस एकच विचार.वाक्यं, हावभाव, त्यांचा क्रम.दिग्दर्शकानं बजावून सांगितलेलं.प्रत्येकानं फक्तं आपलंच वाक्य लक्षात ठेवायचं असं करायचं नाही.सगळ्यांची वाक्य लक्षात ठेवायची… लोकलट्रेनमधे, ऑफिसला जाता येता माझ्या डोक्यात तेच सगळं.प्रवासात लोक माझ्याकडे चमकून बघताएत? मी सावध.पण पुन्हा माझ्या आत ते नाटक चालूच!
रिहर्सल करायला उभा राहिलो की मला दुसरं काहीच जाणवायचं नाही.दिग्दर्शकाच्या सूचनेबरहुकूम फक्तं एकेक कृती करत रहायची.त्या त्या वेळी मी काय करत असतो हे नंतर मला आठवतसुद्धा नसे.मजा वाटत होती.आनंद होत होता.थरार जाणवू लागला.संमेलनाचा दिवस जवळ येत चालला तसं मग हळूहळू टेन्शन चढायला लागलं.मला आणि कदाचित माझ्यामुळे की काय सगळ्यानाच!

Tuesday, September 14, 2010

कॉमेडी शो- ’मी, मी आणि मी!’

आम्हा सगळ्या मित्रांना मनूनं बोलावलंय असं ऐकलं आणि आम्ही उडालोच! किंवा बेशुद्ध पडायचे बाकी राहिलो असं म्हणूया.मनू नेहेमी आमंत्रण घेतो, देत कधीच नाही. ’जानी! हम लेते है! देते नहीं!’ अशा ’राजकुमार’ थाटाचं त्याचं वागणं.
तो दिवस उजाडेपर्यंत आम्ही सगळे सैरभैर झालो होतो.प्रत्येकानं एकमेकांजवळ आणि सगळ्यांनी मनूकडे अशी चारचारदा खात्री करून घेतली.शेवटी तो दिवस आला.आम्ही सगळे मनूच्या घरी अवतरलो.
मनूच्या दिवाणखान्यात एक लाल सिंहासनवजा खुर्ची.लग्नाच्या हॉलमधे रिसेप्सशनला मांडतात तशी.जमिनीवर लांबलचक किंतान.आमच्यात मीच आपला सटरफटर.बाकींच्यापैकी एक मित्र डॉक्टर, एक इंजिनियर, एक फोटोग्राफर, एक गाणारा, एक चित्रकार, एक सैन्यातला, एक बॅंक मॅनेजर.ती लाल खुर्ची आणि ते गोणपाटाचं जाजम न्याहाळत एकमेकांकडे बराच वेळ बघत राहिलो.शेवटचा येईपर्यंत सगळे त्या गोणपाटावर बसलो आणि आतलं दार उघडून मनू आला.हसत.अप टू डेट पोषाखातला.तो आल्यावर सवयीने मी एकटाच अर्धवट उठलो आणि हे ऑफिस नाही मनू बॉस नाही हे लक्षात येऊन जीभ चावत खाली बसलो.मनू मुद्दाम माझ्या उतरलेल्या तोंडाकडे बघून कुत्सित हसला.नेहेमीप्रमाणे.तो नेहेमीप्रमाणेच हसला पण आज माझ्या असं लक्षात आलं की तो असं जिवणी फा-फाकवून हसतो तेव्हा त्याच्या वरच्या समोरच्याच दोन दातातली फट दिसते आणि तो आणखी वेडसर वाटायला लागतो.
बराच वेळ तसाच हसत सगळ्यांवरून नजर फिरवत मनू लाल खुर्चीत बसून राहिला.मग अचानक डॉक्टरकडे बघत म्हणाला, “कॅय? कॅय करताहात तुम्ही? माणसं मरताएतच ना अजून? अं? काय उपयोग एवढं शिक्षण घेऊन? एवढा पैसा खर्च करून? दवाखाना थाटून?” डॉक्टर चक्रावलाच.खरं म्हणजे मनूनं आमंत्रण देऊन बोलावलेलं.सगळ्यात आधी सगळ्यांचं स्वागत होईल अशी अपेक्षा.स्वागत झालं पण ते असं.
त्यावर डॉक्टर काही बोलणार तोच मनू मॅकेनिककडे वळला.कुठलंही बिघडलेलं यंत्र याच्या हातात दिलं की तो ते चालू करतो अशी याची ख्याती.मनू म्हणाला, “काय वर्कर? आता काय वर करताय?” त्या हॉलमधे किंतानावर बसलेले एकूणएक जण गार झाले, “कामगारच राहिलात ना शेवटी?” असं मनू पुढे म्हणाला आणि त्या मेकॅनिक मित्राचा चेहेरा तांबडालाल झाला.मी मनाशी म्हटलं आता जुंपणार.पण तोपर्यंत मनू आमच्या इंजिनियर मित्राकडे वळला.मी आमच्या मेकॅनिक मित्राकडे पाहिलं.त्यानं राग गिळला होता.एरवी तो कसलाही विधिनिषेध न बाळगणारा.लगेच कॉलर पकडणारा.तोही विचार करत असावा, मनूनं आमंत्रण देऊन बोलवलंय.आपले एकापेक्षा एक सरस मित्र इथे हजर आहेत.अशा वेळी आपण संयम पाळला पाहिजे.तोच काय आम्ही सगळेच संयम पाळत तिथे बसलो होतो.अर्थात, मूग गिळून बसलो होतो.
घरातून निघताना बायको काहीतरी खाऊन निघण्याचा आग्रह करत होती.मनूकडे काही खाणंपिणं होईल.रात्री उगाच गॅसेसची धन कशाला असा सारासार विचार करून मी तसाच निघालो.कधी नाही ते बायकोला धडा शिकवल्याचा आनंद असा मूग गिळून साजरा करावा लागत होता.पोटात आग पडली होती.मनू इथे इंजिनियर मित्रापाठोपाठ जो नजरेला पडेल त्याची बिनपाण्याने करत सुटला होता आणि सगळे अवाक होऊन पहात, ऐकत होते.संयमाची गुळणी तोंडात धरून बसले होते.
इंजिनयरला मनू म्हणाला, ब्रीज पाडता, घर पाडता, भूकंप होतो तो बरा तुमच्यापेक्षा. फोटोग्राफरला तो म्हणाला, दिसतं ते फिल्मवर उमटवता.त्यात काय विशेष? लहान पोराचं काम ते! चित्रकार मित्राला तो म्हणाला, निसर्गात एवढं सगळं आहेच.तू काय काढतोएस नवीन? डोंबल! मनू जेव्हा आमच्या सुप्रसिद्ध गाणारय़ा मित्राकडे वळला तेव्हा तर त्याने हाईटच केली! “तू फालतू गातोस! कसं गातात माहिती आहे?” असं विचारत मनूनं त्याला स्वत:च्या आवाजात गाणं ऐकवलं.जे ओरिजनली किशोरकुमारच्या आवाजात होतं.मनूच्या कापरय़ा आवाजात ते तलतचं झालं होतं.गाणं म्हणताना मनूचा चेहेरा नुकताच शेंबूड पुसायला लागलेल्या मद्दड पोरासारखा दिसायला लागला होता.मनूचा आत्मविश्वास मात्र गानकोकिळेलासुद्धा लाजवणारा होता.
पोटात डोंब उसळलेला असूनही आता काय काय होणार या विचाराने माझी उत्सुकता ताणली जात होती.आमचे सगळे प्रथितयश मित्र तोंडात मुगाची उसळ धरून गप्प बसून होते.त्यांना ही करमणूक नेहेमीपेक्षा वेगळी वाटत असावी.
गाणं म्हणून दातातली फट दाखवत तृप्त हसून झाल्यावर मनू स्वत:च्या बालपणाकडे वळला.मी पहिली अर्धी चड्डी कधी घातली.अर्धी चड्डी सोडून फुलपॅंटीत कधी आलो.पहिल्यांदा शर्ट इन केला त्या दिवशी किती तारीख होती.कुठल्या वर्षी मी पहिल्यांदा नाडीची सुरवार घातली.तिची गाठ कशी घट्टं बसली.ती कशी सोडवता आली नाही.मग त्याच वेळी कशी घाईची लागली.त्या ’घाईची’ला मी कसं तोंड दिलं.मी नोकरीची मुलाखत कशी दिली.मी लग्नं कसं केलं.पोरांना मी कशी शिस्त लावतो.माझ्याशिवाय पर्यायच नसल्यामुळे लोक कसे माझ्याकडेच पुन्हा पुन्हा येतात.तरी मी कसा त्यांच्यावर डाफरतो.माझं डाफरणं कसं विश्वविजयी आहे.माझं कौतुक करणं सगळ्यांनाच कसं अपरिहार्य आहे हे सांगताना मनूनं आमच्या लेखक मित्राला ’मनूचरित्र’ लिहिण्याचं आवाहन केलं.
पुढे मनू म्हणत होता, मी हात हलवला की वारा वहातो.मी डोळे उघडले तरच प्रकाश पडतो.मी अमूक केलं तरच पाऊस पडतो.मी तमूक केलं- आम्हा सगळ्यांचे मूग मात्र गिळून गिळूनही संपत नव्हते…

Monday, September 13, 2010

गणेशोत्सवाचा रंगमंच

सार्वजनिक गणेशोत्सवात स्थानिक कलाकारांची नाटकं व्हायची.शाळेच्या इमारत निधिसाठी होणारय़ा नाटकातले कलाकार व्यावसायिक असायचे पण वसाहतीत एरवी हिंडणा-फिरणारी आपल्यातलीच माणसं गणेशोत्सवाच्या रंगमंचावर बघणं हे एक वेगळंच अप्रूप होतं.शाळेच्या इमारतनिधिसाठी होणारय़ा उघड्या रंगमंचावर दरवर्षी होणारय़ा व्यावसायिक नाटकांतून या माध्यमाची मेक-बिलिव्हची जादू लक्षात आली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रंगमंचावरून होणारय़ा नाटकातून ही जादू आपल्या जवळपासही आहे हे लक्षात आलं.आदल्या रात्री यम म्हणून भुरळ पाडणारा नट दुसरय़ा दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे धूर सोडत ऑफिसला जाताना दिसायचा आणि आम्ही लहान मुलं तोंडात बोटं घालून त्याला पहात रहायचो.हे ग्लॅमर होतं.एक स्वप्नं.पण ते स्वप्नं आता फार दूरवरचं राहिलं नव्हतं.आपल्यात आलं होतं.
सार्वजनिक उत्सवातली नाटकं ही त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरून होणारय़ा गाजलेल्या नाटकांच्या आवृत्याच असायच्या पण आपल्यातली माणसं त्यात दिसतात ही मजा और होती.सुदैवाने आमच्या वसाहतीत प्रचंड उत्साही वातावरण होतं.दरवर्षी व्यावसायिक रंगमंचावर गाजलेलं एक तरी तीन अंकी नाटक सादर केलं जायचं.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावर एक अफलातून लेखक-नट आणि एक अफलातून नट-दिग्दर्शक फार्सचा धुमाकूळ घालत होते.ते फार्स या रंगमंचावर यशस्वीपणे सादर झाले.ऐतिहासिक नाटकांचे प्रवेश सादर झाले.प्रचंड मेहेनत घेऊन हे स्थानिक कलाकार काम करायचे.नुसतं कामच नाही तर नाटकाचे देखावे, कपडे, रंगभूषा सगळं सगळं जमवायचे.एवढी प्रचंड हौस आणि त्यात बहुतेकवेळा पाऊस! नाटक सोसायटीच्या कार्यालयात.समोर पेंडॉल.पाऊस ताडपत्र्यांमधूनही कोसळायचा आणि पाणी जमिनीवरूनही वहात बसलेल्यांच्या बुडाला लागायचं.जोराचा पाऊस आला की पडदा पाडायलाच लागायचा.पाऊस जरा थांबला की आणखी एक प्रयत्न.असे काही प्रयत्न आणि मग पाऊस कोसळतोच आहे म्हटल्यावर पडदा कायमचा बंद.कलाकार हिरमुसायचे.पण नंतर पुन्हा तालमी करून पाऊस संपल्यानंतरच्या दिवसांत पुन्हा त्याचा यशस्वी प्रयोग करायचेच करायचे.हॅट्स ऑफ टू देम!
...आणि आम्ही नाटकाची वेळ साडेनऊ तर साडेआठपासूनच रंगमंचासमोर जमिनीवर बसायला आतूर.आसनं म्हणजे भारतीय बैठक.जमिनीवर किंतान अंथरलेलं.पण ते कुणी अंथरायच्या आधीच आम्ही जाऊन बसलेले.समोरचा मरून रंगाचा पडदासुद्धा मोहक वाटायचा.तो वारय़ाने उडायचा.मग हुटिंग.तोपर्यंत पडद्याचे मधोमध सरकणारे दोन भाग असतात त्या जॉइंटवर हार घातलेला.अगदी पहिली रांग तो पडदा वर करूनही बघायची.मग कार्यकर्ते किंतान अंथरण्यासाठी यायचे.बसलेल्यांना उठवायचे.मग पुन्हा पुढची जागा पकडण्यासाठी दंगा.खटाखट टपल्या मारणं हा काही जणांचा आवडता उद्योग.मग कचकचून टपली खाणार ते पोर कावरंबावरं, रडवेलं झालं की मारणारे टगे खूष.एखादं गिर्हाईक असायचं सततच्या टपल्या खाणारं.कधी टपल्या खाणारा वैतागून मागच्या कुणालातरी आरोपी करायचा.या आरोपीनं टप्पल मारलेलीच नसायची.मग मारामारी.कार्यकर्त्यांनी हसत हसत ती सोडवायची.टगे ग्रुपचे बरेच उद्योग असायचे.पेंडॉलमधल्या या प्रेक्षागृहाच्या एका बाजूला वीज कंपनीचं स्टेशन होतं.त्या पायरय़ांवर खास मुलींसाठी जागा होती.तिथे मुली येऊन बसल्या रे बसल्या की प्रेक्षागृहातच करमणुकीचे प्रकार सुरू व्हायचे.स्थानिक कलाकारांना नेहेमीच काही न काही कारणांनी नाटक सुरू करायला उशीर व्हायचा.मग मुली स्थानापन्न झाल्या की कुणीतरी छोटासा दगड वर पेंडॉलच्या दिशेने असा भिरकवायचा की तो अलगद मुलींच्या घोळक्यात जाऊन पडेल.मग तो कुणीतरी किंवा इतर कुणीतरी ’बेडूक बेडूक’ असं ओरडायचा की झाला मुलींचा हलकल्लोळ सुरू.मग ’ते’च कुणीतरी मुलींच्या सुटकेला धावायचे.
आज टीव्ही हा लहान मुलांवर सर्वांगानं ठसा उमटवणारा घटक झालाय.वरचं सगळं वर्णन आता मागच्या पिढीत जमा झालंय.आजच्या पिढीला अशी नाटकं किंवा त्याकाळी गणेशोत्सवात होणारे पडद्यावरचे सिनेमे हे प्रकार कितपत इमॅजिन करता येतील माहित नाही.त्यात काही गंमत असेल असं त्याना वाटत असेल?
शाळेच्या मैदानावरच्या उघड्या रंगमंचावर होणारय़ा व्यावसायिक नाटकांना काय किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रंगमंचावरून होणारय़ा स्थानिक नाटकांना काय मी एक जबरदस्त कुतुहल असलेला प्रेक्षक होतो.हे सगळं प्रचंड भारून टाकणारं होतं.आमच्यातलीच चुणचुणीत मुलं किंवा ज्यांचे कुणी न कुणी स्थानिक कलावंतांच्या ओळखीतले असतील अशी मुलं स्थानिक रंगमंचावर वर्णी लाऊन यायची.कौतुक करून घ्यायची.मला त्यावेळी ही सगळी जादूच होती.आपल्याला प्रत्यक्ष त्यात काही करायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.असे जे काही चुणचुणीत, वक्तृत्व स्पर्धेत चमकणारे किंवा ओळखीतले अश्या कुणातच मी मोडत नव्हतो.फक्त आ वासून सगळं मनापासून बघत मात्र होतो.या सगळ्यापेक्षा आपण खूप लांब आहोत असं वाटल्यामुळे नाटकाचं आकर्षण वाढत होतं.चांगलं काही करणारय़ांचं अपार कौतुक वाटायचं.
मग लहानपणातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर कधीतरी अपघातानं नाटक माझ्यासमोर येऊन ठाकलं.मला त्या ग्रीक शोकांत पद्धतीच्या प्रायोगिक एकांकिकेत अभिनय करावा लागणार होता.वेळ कमी होता आणि आधीच्या कसलेल्या कलाकारांबरोबरीनं माझं काम व्हावं म्हणून माझा दिग्दर्शक धडपडत होता.मी आजपर्यंत बघितलेल्या एकूणएक नाटकांपेक्षा हे नाटक संपूर्णपणे वेगळं होतं.यात पात्रांचं बोलणं कुजबुजल्यासारखं होतं पण ही विस्पर प्रेक्षकांपर्यंत कशी पोचवायची ते दिग्दर्शक मला शिकवत होता.यात हंडा नव्हता पण तो आपण दोन हातात धरलाय.तो डोक्यावर घेतलाय.तो घेऊन तलावाकाठी गेलोय.तो भरलाय.सगळं सगळं हालचालीतून दाखवायचं होतं.मी या सगळ्यात पूर्ण गुंतून गेलो होतो.हे सगळं समोरून प्रेक्षक म्हणून कसं दिसेल याचा विचार करायला माझा दिग्दर्शक समर्थ होता.माझी भूमिका मात्र बदलली होती.मी आता प्रेक्षकाऐवजी अभिनेता झालो होतो.

Wednesday, September 8, 2010

अभिनयातून लेखनाकडे…

’अभि’नयातून ’लेख’नाकडे या प्रवासात मी काय शिकलो हे ’अभिलेख’ मालिकेत लिहायचं आहे.ह्या अनुभवांमुळे तुमचं रंजन होईल.काहींना याचा उपयोग होईल.काहींना आपलं काही शेअर होतंय असंही वाटेल.हे आत्मचरित्र नाही आणि मला कुठलेही चांगले-वाईट संदर्भ फक्त सूचित करायचे आहेत.संदर्भांपेक्षा त्यातून काय मिळालं हे मला वाटतं कुणालाही वाचायला नक्कीच आवडेल.’मनू आणि मी’ ला तुमचा प्रतिसाद अफलातून आहे आणि ’अभिनयातून लेखनाकडे’ या प्रवासाचं भवितव्य तुमच्यावरच तर अवलंबून आहे.
मुळात अभिनयात मी ठरवून आलोच नाही.विहीरीच्या काठावर बेसावधपणे उभं असताना कुणीतरी खोल पाण्यात ढकलून द्यावं तसं झालं.मराठी घरातला असल्यामुळे नाटक या माध्यमाचं आकर्षण प्रचंडच होतं पण ते स्वप्नवत होतं.अचानक ते स्वप्नंच समोर येऊन ठाकलं.
नोकरी लागली, स्वस्थता आली आणि त्याचवेळी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या प्रचंड उत्साही प्रमुखाने नाटकाच्या तालमीला येऊन बस असं सांगितलं.मी उत्साहानं जाऊन बसू लागलो.ग्रीक शोकांत प्रकारची ती एकांकिका होती.मी एरवी बघितलेल्या नाटकांपेक्षा पूर्णपणे वेगळी.एकांकिका बसत आली आणि एक अपघात झाला.तीन मुख्य पात्रांपैकी एक असलेला माझा मित्र क्रिकेटच्या मॅचच्या आधी चांगलाच जखमी झाला.तो मॅच सुरू होण्याआधीचा सराव करत होता.यष्टीरक्षक बॅटच्या दस्त्याने यष्ट्या जमिनीत ठोकत होता. एक रूपया प्रत्येकी म्हणजे दोन्ही संघ मिळून बावीस रूपये शिल्ड असलेली आमची टेनिस बॉल मॅच लवकरच चालू होणार होती.यष्टीरक्षकानं स्टंप ठोकण्यासाठी उचलेला बॅटचा दस्ता उत्तम खेळाडू असलेल्या माझ्या मित्राच्या डोक्याच्या मागच्या भागावर लागला.चांगलंच रक्त येऊ लागलं.टाके पडले.घरी बोंबाबोंब झाली आणि त्या मित्राची एकांकिकेतली रिप्लेसमेंट कोणी करायची असा आणखी एक पेच पडला.मी तालमींना सतत हजर असल्यामुळे ते माझ्यावर आलं.माझं नाटक सुरू झालं.माझ्या त्या मित्राचंही नाटक थांबलं नाही.एक संधी हुकली तरी तो या प्रवासात नुसता राहिला असंच नाही तर काही वर्षांनी त्याला राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दिग्दर्शनाचं पदकही मिळालं.
मी जेव्हा अचानक ढकलला गेलो तेव्हा अभिनयासाठी काही ’शिक्षण’ असतं हे गावीही नव्हतं.नेहेमीचं शिक्षण घेऊन पदवी घेता घेता नाकी नऊ आले होते.अचानक ढकलला गेल्यामुळे आणि मुळात सामान्य मध्यमवर्गीय असल्यामुळे यात करियर वगैरे होते हे सुद्धा विचारापलिकडचं होतं.पार्श्वभूमी नव्हतीच.अगदी रस्त्यावर झोपत नसलो तरी पावसात गळणारय़ा मंगलोरी कौलांच्या खाली असलेल्या चाळीतल्या बारा बाय अकरामधे पाच जणांचं कुटुंब होतं.हातातोंडाची गाठ नक्की पडत होती.पण हे तेव्हा माझ्यासारख्या बरय़ाच जणांच्या बाबतीत होतं.त्याचं त्यावेळी आणि आत्ताही तसं अप्रूप अजिबात नाही.नाटकात काम करणं घरी आवडत नव्हतं हा सांगायचा मुद्दा.हा काही १९४०चा सुमार नव्हता आणि आम्ही जळफळायचो घरच्यांवर.यांना भगतसिंग (?) दुसरय़ाचा घरीच जन्मावा असं वाटतं म्हणून.जुनी संगीत नाटकं, नाट्यसंगीत.एका बुजुर्ग कलाकारानं त्यावेळी रंगमंचावरून वठवलेल्या पाच पाच भूमिका आणि अनेक बायकांना फसवून कोर्टात उभं रहाण्याचं त्याचं अफलातून बेअरिंग या सगळ्याची चर्चा घरात खूप व्हायची.
शाळेच्या इमारत निधीसाठी शाळेच्या मैदानावर पेंडॉल ठोकून उघड्या रंगमंचावर व्यावसायिक नाटकं बोलवली जात.शाळेत जाणारय़ा आम्हा आठ-दहा-बारा वर्षांच्या मुलांना ही पर्वणीच असे.सोफा, लाल गादीच्या खुर्च्या, साध्या कुशनच्या खुर्च्या आणि नुसत्या लाकडी खुर्च्या अशी प्रेक्षागृहातल्या आसनांची उतरंड असे.शेवटच्या नुसत्या खुर्च्यांच्या रांगेतल्या पंधरा किंवा दहा रूपये पर नाटक मूल्य असलेल्या आठ-दहा नाटकांची फक्त दोन सीजन तिकीट घरातल्या पाच माणसांत काढण्याची ऐपत होती.हा नाट्यमहोत्सव थंडीच्या दिवसात होई.मागच्या बाजूला डोंगरांची रांग.शाली लपेटून थरथरत नाटक बघणं हे एक थ्रील होतं.व्यावसायिक नाटकाचं बंदिस्त नाट्यगृह आमच्यापेक्षा तासभर अंतरावर त्यामुळे हा महोत्सव म्हणजे एक गावच असलेल्या वसाहतीतला एक भला थोरला इव्हंट होता असं आजच्या भाषेत सांगता येईल.रोवलेले बांबू, त्यांच्यावर सुतळ्यांनी ताणून बांधलेलं किंतान होतं.आत-बाहेर करायला आसन मूल्यांप्रमाणे प्रवेशद्वारं होती पण किंतान कधीही वर करून आत-बाहेर करणं आणि फुकटेपणानंही नाटक बघणं सवयीचं होतं.
या वयात बघितलेली एक एक नाटकं मनात घर करून राहिली.रंगमंचावरचे देखावे, प्रकाशयोजना आणि विविध रंगभूषा केलेले त्यावेळी फक्त वर्तमानपत्रांतून वाचायला मिळालेले प्रथितयश कलाकार ही जादू होती.याच दरम्यान झालेल्या दूरदर्शनच्या आगमनानंतर या कलाकारांशी जवळीक झाली आणि ही जादू आणखी गडद झाली.
त्यावेळी प्रथितयश असलेल्या एका नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या व्यक्तिमत्वाच्या तद्दन व्यावसायिक नाटकानी आम्हा मुलांना चांगलीच भुरळ पाडली.दहा-बारा वर्षाचं ते वय म्हणजे कळायला नुकतीच सुरवात झालेली असते आणि त्यावेळी बघितलेलं जन्मभर लक्षात रहातं.
एक अत्यंत कुरूप असलेला डॉक्टर हे प्रमुख पात्रं असलेलं ते नाटक होतं.प्रेयसीवरचं एकतर्फी प्रेम फसलं म्हणून तिच्या मुलाचा जीव मागण्यासाठी डॉक्टर तिच्या घरात येतो तेव्हा योगायोगाने वीज गेलेली असते.बाई टॉर्च पेटवते.टॉर्चचा झोत घरभर फिरू लागतो आणि अचानक एका क्षणी त्या टॉर्चच्या प्रकाशात त्या डॉक्टरचा विद्रूप, सुळे बाहेर आलेला, हिरवा-काळा चेहेरा दिसतो.बाई जोरात किंचाळते.त्याच दृष्यावर मध्यंतर होतं.प्रेक्षागृहात बसलेल्या सगळ्या वयाच्या प्रेक्षकांच्या हृदयातून एक वीजेची लहर निघून जाते.आज विचार करताना ह्या नाटकातलं, प्रसंगातलं तद्दनपण लक्षात येतंच पण या माध्यमाची मेकबिलिव्हची, आख्या प्रेक्षागृहाला (ते उघडा रंगमंच स्वरूपाचं असल्यामुळे पूर्ण काळोखाची मदत नसताना, आजूबाजूचा कुठलातरी प्रकाश व्यत्यय आणत असताना सुद्धा) धक्का द्यायची जबरदस्त ताकद जाणवली.या माध्यमाला मी त्या वयात नकळतपणे सलाम ठोकला असला पाहिजे.
दहा-बारा वर्षाच्या वयातले ठसे आयुष्यावर परिणाम करतात.त्यावेळी या माध्यमाचे असे अनेक जबरदस्त वाटलेले ठसे नक्कीच गोळा झाले.पुढे नाटक माध्यमात यायची ती पूर्वतयारी होती…

Monday, September 6, 2010

“खेळा लोकांनो खेळा”

’जन्माष्टमीला मराठी हंड्या फोडतात आणि गुजराती सातम-आठम खेळून कमवतात!’ हा मनूचा दरवर्षीचा ज्योक.त्यानंतर त्याचं त्यावर स्वत:च हसणं.फवारा उडवून जिवणी फाकवत.मग मी पृथ्वीतलावर नव्यानेच आलोय असं समजून ’सातम-आठम’ म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री- दहिहंडीच्या आदल्या रात्री- पत्त्यांचा जुगार खेळणं’ असं एक्सप्लनेशन.
जन्माष्टमी झाली.गोपाळकाला सरला.अनेक गोविंदा भरती झाले- हॉस्पिटलात.काही ढगाला हात लाऊन आले.गेले.संघर्ष आणि संस्कृती दोन्ही लेबलं लाऊन राजकारण्यांनी गोविंदाचंही मनसोक्त भांडवल केलं.सगळ्यांना सुट्टी आणि आम्हाला मात्र नाहीच म्हणून आम्ही केजीतल्या मुलासारखे हिरमुसलो आणि दूरदर्शनला डोळे लाऊन बसलो.हल्ली महिला गोविंदा पथकंही कार्यरत झाली आहेत.
एवढ्या सगळ्यात मनूचा पत्ता नाही सरतेशेवटी काल संध्याकाळी मनूच्या गोकुळात गेलोच.चाट पडायचा बाकी राहिलो.बाहेरच्या खोलीत मनूनं ऑफिस थाटलेलं आणि आजुबाजूला हीऽऽ गर्दी! गर्दीच्या मधोमध मनू.ओळखू न येईल अश्या अवतारात.मांडीवर मातीचा मटका घेऊन बसलेला.त्याच्यासमोर लागलेली माणसांची लाईन खोलीभर अनाकोंडासारखी पसरलेली.एकेक माणूस पाचचं नवीन काढलेलं जुन्या आठ आण्यासारखं नाणं पुढे करतोय.मनूचा असिस्टंट चिठ्ठी फाडतोय, त्यावर रंगीत पेनाने मनाला येईल तो आकडा घालतोय.मनू त्या माणसापुढे मटका धरतोय आणि चिठ्ठी हातात आली म्हणून स्वर्गसुख मिळालेला तो माणूस चिठ्ठी चारचारदा कपाळाला लावतोय.देवाची पार्थना करतोय.त्या चिठ्ठीचे मुके घेतोय आणि ती चिठ्ठी जातेय मनूच्या मटक्यात.बाजूला स्टीलचं मोठं पिंप.त्यात पाच पाच रूपयांच्या नाण्यांचा खच पडतोय.मनूनं डोक्याला रंगीबेरंगी पट्टी बांधलेली.ती तो घट्टं करतोय.मग पुन्हा पुढचा माणूस, पुढचे पाच, पाच रूपये.पुढची चिठ्ठी.बाजूला भला मोठा जाड हार घातलेला बोर्ड. ’निकाल रोज रात्री १॥ वाजता! खेळा लोकांनो खेळा!!’
मला अक्षरश: मुष्कील झालं हो मनूपर्यंत पोचणं.त्या गर्दीत तुमच्या आमच्यासारखे असंख्य लोक होतेच.कॉलेजमधे जाणारी मुलं-मुली होत्या.मुलांना शाळेत पोचवणारय़ा आया होत्या.फिरते सेल्समन होते.एवढंच काय हातावर पोट असणारे मजूर, भाजीवाले, फेरीवाले… कोण नव्हतं? एका चिठ्ठीला पाच रूपये मोजणं कुणाला अशक्य होतं? या रूपयाला नवीन लोगो बहाल झालेल्या जमान्यात?
लोक दहा दहा, पंधरा पंधरा चिठ्ठया मटक्यात सोडत होते.माझ्या खिशातली पाच पाच रूपयांची नाणीही उड्या मारायला लागली.पण बायकोने त्या सगळ्यांचा नारळ आणायला सांगितले होते.कुठलासा नवस फेडायला ती नारळाचं तोरण बांधणार होती.तिच्या भीतीने मी गप झालो.
मांडीवर मटका ठेऊन आत चिठ्ठया सोडणारा मनू दमला आणि घाम पुसायला त्यानं मटका आपल्या एका शिष्याच्या मांडीवर दिला.बाजूला होऊन मनूनं ठंडा मागवला आणि मी मनूला गाठलंच.मला बघितल्यावर त्याने नेहेमीचे ते आश्चर्यचकीत भाव चेहेरय़ावर आणले आणि “ओऽहोऽहोऽहोऽऽऽ वेलकम! वेलकम!” असं जोरात ओरडला.जोडीला ते सुप्रसिद्ध जिवणी फाकवून हसणं होतंच. “भडव्याऽऽ पात पातची नाणी काढ आधी!” माझी चड्डी खेचत मनू भर गर्दीत बोंबलला.मी उगाचच कासावीस झालो.लोक शांतपणे मटक्यात चिठ्ठया सोडत होते.थंडा लवकर आला म्हणून मी वाचलो नाहीतर मनूनं मला पुरतं नागवलंच असतं.एक ग्लास थंडा पिऊन मी मनूच्याच कानात कुजबुजलो, “हे काय करतोएस तू?” मनू निर्विकारपणे डोक्याची रंगीत पट्टी सैल करत म्हणाला, “का? काय झालं?” मी त्राग्याने म्हणालो, “अरय़े हा मटका आहे मटका! कायद्याने गुन्हा आहे हा! लोकांना भीकेला लावतोएस तू!” मनू म्हणाला, कायदा कशाशी खातात माहितीए का तुला? सुजाण नागरीक आहेस ना तू? मी वेडा म्हणून हे दुकान उघडून बसलोय.हा रोखीचा शेवटचा व्यवहार आहे! लोकांच्याच पैशातून ब्लॅकबेरीची ऑर्डर दिलीए! तो आला की तो सोडणार या मटक्यात.मटका तोच! लोकांना माझ्या पायरय़ा झिजवायचीही गरज नाही मग! एसेमेस केले की झाऽलं!!” मनू एखाद्या किर्तनकार हरदासासारखा समेवर आला म्हणून मीही सरसावलो.इतक्यात मनूचा पुढचा अध्याय सुरू झालाच. “सगळं बांधून टाकल्याशिवाय मटका मांडीवर घेऊन बसणं सोप्पं वाटलं तुला? आणि हे- हे- सगळे इथे जमताएत ते भिकेला लागायला जमताएत? अरय़े यातूनच कदाचित उद्याचा जगातला सर्वात श्रीमंत माणूस निर्माण होणार, आहेस कुठे?”
मी आजुबाजूला बघितलं.मनूच्या मटक्याच्या अड्डयावरच तर उभा होतो. “अरे पण-” मनूनं मला पुढे बोलूनच दिलं नाही. “यड्या तुझ्यासारखे ऑर्डिनरी, थर्डग्रेड, सामान्य नसतात सगळे! त्याना रंगीबेरंगी स्वप्नं पडतात.त्याना महत्वाकांक्षा असतात.त्यासाठी ते धडपड करतात.तुझं स्वत:च जगाच्या खरय़ा-खोट्याचा निवाडा करण्याचं बुजगावणं टाक बाजूला! कार्यरत हो!” मी हळूच लाईनीकडे बघितलं.मटक्यात चिठ्ठया सोडण्यासाठी आता धक्काबुक्की चालू होती.
मनूनं एकदा तोंड उघडलं की ते बंद करणं ब्रह्मदेवाच्या बापाच्याही हातात नाही! “तू कष्ट करत रहा आणि लाख-दोन लाख पोराबाळांच्या हातात दे.मर! आणखी काय करणार तू?” मला रहावलं नाही.मी कळवळून म्हणालो, “अरे कॉलेजमधली पोरं पण-” मला अडवून मनू म्हणाला, “उद्याऽ त्याना नोकरय़ा देणारएस तू? पस्तीस-चाळीशीतल्या धडधाकट माणसांना व्हिआरेसचा बोनस द्यायला लागलेत आता! या पोरांना आतापासून सवय नको व्हायला? उद्या काय करणार ते? बरं! काय चोरय़ा मारय़ा करताएत का खून-मुडदे पाडताएत लोकांचे?” मी चवताळून म्हणालो, “अरय़े पण बापाचे खिसे फाडताएत ना पाच-पाच रूपयांसाठी!” मनू त्याहीपेक्षा जोरात म्हणाला, “तुझ्या बापाचे फाडताएत का? स्वत:च्याच आईबापाचे फाडताएत ना?... आता या घरी बसणारय़ा बायका.काय करणार नुसत्या बसून बसून? फाडल्या चिठ्ठया तर फायदाच आहे नं त्यांचा त्याच्यात?” मी म्हणालो, “फायदा? असा किती जणांना लागणार ते तुझा मटका?” माझा कान पकडून मनू म्हणाला, “हा बोर्ड बघ! जॅकपॉट कितीचा झालाय आता? चार कोटींचा! कुणाला मिळणार हे पैसे? सहा आकडे बरोबर जमलेल्या यातल्याच कुणाला तरी ना? का मला मिळणार आहेत? आणि प्रत्येक आकड्याला वेगळं बक्षिस आहेच की!” मी दम घ्यायला आजुबाजूला बघितलं.मनूचा एक शिष्य नाण्यांनी ओसंडलेलं ते स्टीलचं पिंप आतल्या खोलीत जाऊन ओतत होता.पुन्हा आणून लावत होता.लोक त्यात पुन्हा पैशांचा पाऊस पाडत होते.
मला आता फ्रस्ट्रेशन- नैराश्य आलं.मी त्राग्याने ओरडलो, “खेळ कसला रे याच्यात? सारखं खेळा, खेळा, लोकांनो खेळा! काय खेळ आहे याच्यात? चिठ्ठीवर नंबर.ती मटक्यात सोडायची.त्यातली एक तू रात्री दीड वाजता काढणार.एखादा झाला तर झाला करोडपती.बाकीचे होणार रोडपती.पुन्हा पुन्हा खेळून.छ्या!ऽऽ”
मनू एकदम गंभीर होऊन माझ्याकडे बघायला लागला.म्हणाला, राज्या तू खरंच तुझं डोकं तपासून घे! पैसे नसले तरी एक चिठ्ठी फाड.अरे हाच सगळ्यात मोठा खेळ! पैशाचा! नशिबाचा!” आणि आयुष्याचा! हे मात्र मी मनात म्हणालो.मनू अमिताभसारखा डावा हात पुढे करून उभा होता.
मी निकराने, काकुळतीला येऊन म्हणालो, “मनू अरे जनाची नाही निदान मनाची-” मनूनं माझा शर्ट पकडला.म्हणाला, "मराठी माणूस काहीतरी करतो तेव्हाच आडवे या रे तुम्ही! हेच मी टीव्हीवर टमाटम सिनेतारका आणून, प्रयोगशाळेतल्या भांड्यात लाह्या फोडल्यासारखे नंबर फोडले असते, एखादा जायनीज माणूस बाजूला उभा करून! तर?” अस्मितेला हात घातला गेल्यावर माझी बोलतीच बंद झाली.मान बाजूला वळवून मनू खच्चून बोंबलत होता.लोकांना बोलवत होता. “खेलो इंडिया खेलो! खेळा लोकांनो खेळा! प्ले जंटलमन प्ले! प्ले ऍंड विन! सुप्पर डुप्पर लोट्टो!!!” गर्दीनं मला ढकलून केव्हाच बाहेर काढलं होतं…