romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, September 14, 2010

कॉमेडी शो- ’मी, मी आणि मी!’

आम्हा सगळ्या मित्रांना मनूनं बोलावलंय असं ऐकलं आणि आम्ही उडालोच! किंवा बेशुद्ध पडायचे बाकी राहिलो असं म्हणूया.मनू नेहेमी आमंत्रण घेतो, देत कधीच नाही. ’जानी! हम लेते है! देते नहीं!’ अशा ’राजकुमार’ थाटाचं त्याचं वागणं.
तो दिवस उजाडेपर्यंत आम्ही सगळे सैरभैर झालो होतो.प्रत्येकानं एकमेकांजवळ आणि सगळ्यांनी मनूकडे अशी चारचारदा खात्री करून घेतली.शेवटी तो दिवस आला.आम्ही सगळे मनूच्या घरी अवतरलो.
मनूच्या दिवाणखान्यात एक लाल सिंहासनवजा खुर्ची.लग्नाच्या हॉलमधे रिसेप्सशनला मांडतात तशी.जमिनीवर लांबलचक किंतान.आमच्यात मीच आपला सटरफटर.बाकींच्यापैकी एक मित्र डॉक्टर, एक इंजिनियर, एक फोटोग्राफर, एक गाणारा, एक चित्रकार, एक सैन्यातला, एक बॅंक मॅनेजर.ती लाल खुर्ची आणि ते गोणपाटाचं जाजम न्याहाळत एकमेकांकडे बराच वेळ बघत राहिलो.शेवटचा येईपर्यंत सगळे त्या गोणपाटावर बसलो आणि आतलं दार उघडून मनू आला.हसत.अप टू डेट पोषाखातला.तो आल्यावर सवयीने मी एकटाच अर्धवट उठलो आणि हे ऑफिस नाही मनू बॉस नाही हे लक्षात येऊन जीभ चावत खाली बसलो.मनू मुद्दाम माझ्या उतरलेल्या तोंडाकडे बघून कुत्सित हसला.नेहेमीप्रमाणे.तो नेहेमीप्रमाणेच हसला पण आज माझ्या असं लक्षात आलं की तो असं जिवणी फा-फाकवून हसतो तेव्हा त्याच्या वरच्या समोरच्याच दोन दातातली फट दिसते आणि तो आणखी वेडसर वाटायला लागतो.
बराच वेळ तसाच हसत सगळ्यांवरून नजर फिरवत मनू लाल खुर्चीत बसून राहिला.मग अचानक डॉक्टरकडे बघत म्हणाला, “कॅय? कॅय करताहात तुम्ही? माणसं मरताएतच ना अजून? अं? काय उपयोग एवढं शिक्षण घेऊन? एवढा पैसा खर्च करून? दवाखाना थाटून?” डॉक्टर चक्रावलाच.खरं म्हणजे मनूनं आमंत्रण देऊन बोलावलेलं.सगळ्यात आधी सगळ्यांचं स्वागत होईल अशी अपेक्षा.स्वागत झालं पण ते असं.
त्यावर डॉक्टर काही बोलणार तोच मनू मॅकेनिककडे वळला.कुठलंही बिघडलेलं यंत्र याच्या हातात दिलं की तो ते चालू करतो अशी याची ख्याती.मनू म्हणाला, “काय वर्कर? आता काय वर करताय?” त्या हॉलमधे किंतानावर बसलेले एकूणएक जण गार झाले, “कामगारच राहिलात ना शेवटी?” असं मनू पुढे म्हणाला आणि त्या मेकॅनिक मित्राचा चेहेरा तांबडालाल झाला.मी मनाशी म्हटलं आता जुंपणार.पण तोपर्यंत मनू आमच्या इंजिनियर मित्राकडे वळला.मी आमच्या मेकॅनिक मित्राकडे पाहिलं.त्यानं राग गिळला होता.एरवी तो कसलाही विधिनिषेध न बाळगणारा.लगेच कॉलर पकडणारा.तोही विचार करत असावा, मनूनं आमंत्रण देऊन बोलवलंय.आपले एकापेक्षा एक सरस मित्र इथे हजर आहेत.अशा वेळी आपण संयम पाळला पाहिजे.तोच काय आम्ही सगळेच संयम पाळत तिथे बसलो होतो.अर्थात, मूग गिळून बसलो होतो.
घरातून निघताना बायको काहीतरी खाऊन निघण्याचा आग्रह करत होती.मनूकडे काही खाणंपिणं होईल.रात्री उगाच गॅसेसची धन कशाला असा सारासार विचार करून मी तसाच निघालो.कधी नाही ते बायकोला धडा शिकवल्याचा आनंद असा मूग गिळून साजरा करावा लागत होता.पोटात आग पडली होती.मनू इथे इंजिनियर मित्रापाठोपाठ जो नजरेला पडेल त्याची बिनपाण्याने करत सुटला होता आणि सगळे अवाक होऊन पहात, ऐकत होते.संयमाची गुळणी तोंडात धरून बसले होते.
इंजिनयरला मनू म्हणाला, ब्रीज पाडता, घर पाडता, भूकंप होतो तो बरा तुमच्यापेक्षा. फोटोग्राफरला तो म्हणाला, दिसतं ते फिल्मवर उमटवता.त्यात काय विशेष? लहान पोराचं काम ते! चित्रकार मित्राला तो म्हणाला, निसर्गात एवढं सगळं आहेच.तू काय काढतोएस नवीन? डोंबल! मनू जेव्हा आमच्या सुप्रसिद्ध गाणारय़ा मित्राकडे वळला तेव्हा तर त्याने हाईटच केली! “तू फालतू गातोस! कसं गातात माहिती आहे?” असं विचारत मनूनं त्याला स्वत:च्या आवाजात गाणं ऐकवलं.जे ओरिजनली किशोरकुमारच्या आवाजात होतं.मनूच्या कापरय़ा आवाजात ते तलतचं झालं होतं.गाणं म्हणताना मनूचा चेहेरा नुकताच शेंबूड पुसायला लागलेल्या मद्दड पोरासारखा दिसायला लागला होता.मनूचा आत्मविश्वास मात्र गानकोकिळेलासुद्धा लाजवणारा होता.
पोटात डोंब उसळलेला असूनही आता काय काय होणार या विचाराने माझी उत्सुकता ताणली जात होती.आमचे सगळे प्रथितयश मित्र तोंडात मुगाची उसळ धरून गप्प बसून होते.त्यांना ही करमणूक नेहेमीपेक्षा वेगळी वाटत असावी.
गाणं म्हणून दातातली फट दाखवत तृप्त हसून झाल्यावर मनू स्वत:च्या बालपणाकडे वळला.मी पहिली अर्धी चड्डी कधी घातली.अर्धी चड्डी सोडून फुलपॅंटीत कधी आलो.पहिल्यांदा शर्ट इन केला त्या दिवशी किती तारीख होती.कुठल्या वर्षी मी पहिल्यांदा नाडीची सुरवार घातली.तिची गाठ कशी घट्टं बसली.ती कशी सोडवता आली नाही.मग त्याच वेळी कशी घाईची लागली.त्या ’घाईची’ला मी कसं तोंड दिलं.मी नोकरीची मुलाखत कशी दिली.मी लग्नं कसं केलं.पोरांना मी कशी शिस्त लावतो.माझ्याशिवाय पर्यायच नसल्यामुळे लोक कसे माझ्याकडेच पुन्हा पुन्हा येतात.तरी मी कसा त्यांच्यावर डाफरतो.माझं डाफरणं कसं विश्वविजयी आहे.माझं कौतुक करणं सगळ्यांनाच कसं अपरिहार्य आहे हे सांगताना मनूनं आमच्या लेखक मित्राला ’मनूचरित्र’ लिहिण्याचं आवाहन केलं.
पुढे मनू म्हणत होता, मी हात हलवला की वारा वहातो.मी डोळे उघडले तरच प्रकाश पडतो.मी अमूक केलं तरच पाऊस पडतो.मी तमूक केलं- आम्हा सगळ्यांचे मूग मात्र गिळून गिळूनही संपत नव्हते…

2 comments:

Anonymous said...

hi

chhan lihilayas .
ajun manu nakki kalla nahi.
pan kalech - karn to tumchya mazyat astoch.

विनायक पंडित said...

Thanks!