romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, February 27, 2011

समंजस प्रेम!

स्त्री-पुरूषांमधले नाजूक भावबंध किंवा नैसर्गिक आकर्षणातून त्या दोघांनी एकत्र येणं म्हणजे प्रेम असा सार्वत्रिक समज आहे.स्त्री-पुरूष वयात येत असताना त्यांना या प्रेमाची चाहूल लागते.मनात प्रेमाची हुरहूर निर्माण होते.या ना त्या प्रकारे प्रत्यक्ष प्रेमभावनेची अनुभूती घेणं ही त्यापुढची पायरी.हे प्रेम सर्वस्व व्यापून टाकणारं ठरतं.प्रेमाचं वादळ समोर ठाण मांडून उभं रहातं.गंमत म्हणजे परिस्थितीवश किंवा स्वत:हून ठरवून माणूस या प्रेमापासून वंचित राहिला तरीही हे वादळ ठाण मांडून रहातंच.
सहसा प्रेमाचं लग्नात रूपांतर होतं पण लग्न न करता प्रेम करत रहाणं, लग्नाशिवाय नवरा-बायकोच्या प्रेमाने एकत्र रहाणं हे पर्यायही अवलंबले जातात.दोघांनी उरलेलं आयुष्य अविवाहित राहून किंवा परस्परांच्या अधिकृत जोडीदाराशी संसार करत असतानाही एकमेकातला प्रेमाचा धागा टिकवून ठेवणं ही तारेवरची कसरत होते.प्लेटोनिक लव्ह असं या प्रेमाचं लोकप्रिय नाव.
माणसं आपापल्या स्वभावधर्माप्रमाणे आपापल्या प्रेमसंबंधात वागत असतात.स्त्री-पुरूषांमधल्या फार पुढे गेलेल्या प्रेमात शारीरिक आकर्षणाचा भाग नाकारता येत नाही.लग्नाने अशा संबंधाला अधिकृत मान्यता मिळते.लग्न न करता आणि शारीरिक आकर्षणावर मात करत परस्परातला प्रेमाचा धागा तरीही टिकवून ठेवणं म्हणजे माणसाच्या परिपक्वतेची एक प्रकारे कसोटीच.
प्रेम हे एकमेकाच्या मनात घर करून राहिलेलं असतं.सतत करत रहाणं यासारखी ही गोष्टं नसते.
लग्न करून प्रेमावर अधिकृत मान्यतेची मोहोर उठवणं सहसा चुकत नाही.जे प्रेम न करता विवाहबद्ध होतात, अर्थात ठरवून लग्न करतात त्यांचा प्रेमाचा अध्याय लग्नानंतर सुरू होतो.आमचा प्रेमविवाह नाही तर विवाहानंतरचं प्रेम आहे! असं हे अभिमानाने सांगतात.आधी प्रेमाची हुरहूर, मग वादळ, मग लग्न या प्रवासात हे वादळ लग्नानंतरही चालू रहातं.सहजीवनाचा धागा आधाराला घेऊन ह्या वादळावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू होतात.समंजसपणा काही एकदमच येत नाही.त्यासाठी अनेक परिक्षांमधून जाणं अपरिहार्य ठरतं.काही वेळा या अग्निपरिक्षाही असू शकतात.सगळ्या अंगाने दोन जीव एकत्र आल्यावर एकमेकांच्या सवयी, स्वभाव यांची खरी जाण येते.एकमेकांच्या स्वभावधर्मानुसार जुळवून घेणं यात प्रेमाची कसोटी लागते.लहान लहान गोष्टी जुळवून घेणंही कधीकधी जीवघेणं होऊन बसतं.सतत एकत्र राहिल्यामुळे घर्षण वाढत रहातं.
दोघांपैकी कुणी एकानं फक्त स्वत:चाच विचार करून चालत नाही.प्रेम ही भावनाच सहभागाची आहे.बर्‍याच गोष्टी समजायला सोप्या असतात.कळतं पण वळतंच असं नाही.माणसाच्या विचार करण्यात, बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात अंतर रहातं.मग मागच्या काही पिढ्यामंधे होत होतं तसं कुणीतरी एकानं (स्त्रीनं?) पड खाऊन हे प्रेम (!) वाचवावं लागतं.
वैवाहिक आयुष्यात लैंगिकदृष्ट्या एकमेकांशी अनुरूप होत रहाणं ही परिणामकारक गोष्टं असते.प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सगळा डोलारा याच गोष्टीवर अवलंबून असतो.जोडप्यांचे आपसातले उत्तम लैंगिक संबंध अनेक तणावांवर मात करू शकतात.तसंच आपसातल्या अनेक तणावांवर योग्यं उत्तरं शोधायचा सतत प्रयत्न करून माणूस प्रेम या भावनेचा शारीरिक, भावनिक परमोच्च बिंदू गाठू शकतो.शरीर आणि मन या गोष्टी वेगळ्या रहातच नाहीत.
मग मुलं होतात.त्याना सांभाळणं, वाढवणं, त्यांच्या संदर्भातले निर्णय घेणं ही त्यापुढची परिक्षा.दोघांच्या प्रेमाला फुटलेला हा अंकुर दोघांच्या प्रेमाची व्याप्ती वाढवतो.आता आईवडलांमधला विसंवाद आणखी एका आयुष्याला मारक ठरू शकतो किंवा आईबापांमधलं प्रेम त्या मुलाला सोन्यासारखं आयुष्य जगायला बळ देऊ शकतं.मुलं मोठी होऊ लागतात.एकमेकांच्या सततच्या सहजीवनामुळे जोडप्याच्या शारीरिक, भावनिक संबंधात एकसुरीपणा यायला लागतो.तो घालवणं पुन्हा एकमेकाच्याच हाती असतं.खरं प्रेम या एकसुरीपणावरही मात करतं.
फक्त नवरा-बायको हेच नातं असलेल्या संबंधात हळूहळू नवरा-बायको हे नातं लोप पावून दोघे एकमेकांचे मित्र होतात, एकमेकांचे पालक होतात.प्रेम म्हणजे फक्त प्रेमच, भांडण नाहीच असं नसतं.उलट भांडणातूनच प्रेम अधिक वाढतं.मनुष्यस्वभाव किंवा परस्परसंबंध यांचा एक आलेख असतो.तो वर-खाली होत असतो.त्यातही उत्पत्ती, स्थिती, लय असं चक्र असतंच.
आता एकमेकाचं वागणं, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं एकमेकांच्या अंगवळणी पडतं.आपल्याला जमत नाही ते आपल्या जोडीदाराला चांगलंच जमतं हे लक्षात यायला लागतं.’मी’ पणाची जागा ’आपण’ने घेतली जाते.दोघांची मिळून जी शक्ती निर्माण होते त्याचा प्रत्यय यायला लागतो.
सर्वसाधारणपणे तिशी ते पन्नाशीतला हा प्रवास.
काही अजून एकटे राहिलेले किंवा या प्रवासात एकटे झालेले असतात.ते मग स्वत:ला नोकरीत, व्यवसायात, सामाजिक कार्यात, छंदात स्वत:ला पूर्णपणे झोकून देतात.झोकून देण्याचा प्रयत्न करतात असं म्हणावं लागतं कारण कितीही झालं तरी, कुणी कबूल करो वा न करो, सहजीवनाची पोकळी रहातेच.
एक संबंध जोडला.त्यातली जादू संपली की दुसरा जोडला.असं करूनही जगता येतं.पण त्याला प्रेम म्हणता येत नाही.प्रेमभावनेतली अखंडता त्यात नसते.
काही जोडपी नाईलाजाचं सहजीवन जगत असतात.कुठल्याही कारणाने असेल किंवा कुठल्यातरी कारणासाठी असेल.सहजीवनाचा जाच व्हायला लागतो.प्रेमाची आडकाठी व्हायला लागली की आयुष्याला अर्थ उरत नाही.माणूस मुळात एकटा असतो.सहजीवन हा त्याच्या आयुष्याचा आधार.तो खिळखिळा झाल्यावर किंवा नाहीसाच झाल्यावर तो एकाकी होतो.आयुष्य खेचत रहाणं हेच भागधेय उरतं.
नुसतंच नर आणि मादी म्हणून जगता येतं की! पण मग माणूस आणि जनावर यात फरक काय?
समंजस प्रेमाची महती ही अशी असते.मुलं-बाळं मोठी होतात.घरट्यात थांबेनाशी होतात.पन्नाशीपर्यंत करियरची धावाधाव शांत होते.आता एकमेकाला आधार असतो तो फक्त प्रेमाचाच!

Friday, February 25, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(७)

आधी ड्रॉवर उघडू? की स्पंजपॉटमधला स्पंज ओला करायला देऊ? की स्टॅंपवरची तारीख बदलू? की कॅश सबसिडरी नोटबुक उघडून त्यात १, २, ३ असे नंबर टाकून ठेऊ? की दार वाजवणार्‍या ऑफिसरकडून कॅश इन हॅंड मोजून घेऊ?... काय नक्की करावं आधी हे न सुचून मुख्य रोखपालाचा अधिभार अचानक सोपवला गेलेला निशी बावचळून गेला.
त्या तशा अवस्थेतच त्याचं लक्षं समोर गेलं.समोरच्या काचेतून पलिकडे.पलिकडे जनता उभी होती.प्राणिसंग्रहालयात नव्यानेच दाखल झालेल्या, आधी कधीही न पाहिलेल्या, बबून नावाच्या माकडाकडे बघत रहावं तशी निशीकडे बघत.त्याचं लक्षं जनतेकडे गेल्याबरोबर एकच ओरडा सुरू झाला.त्या कालव्यातूनच निशीचं पेमेंटचं धुमशान सुरू झालं...
निशीच्या समोरच बॅंकेने सहाय्यार्थ दिलेलं कॉम्प्युटर टर्मिनल.निशी दचकला.आणखी एकदा.आयलाऽऽ दोन-तीन वर्षं झाली पेमेंट काऊंटरला बसून.ढकल ढकल ढकललं बसणं.आता?...
सबसिडरीबुकमधे नंबर लिहिणं वगैरे आता बादच.आता??... गेल्या वर्षभरात सगळ्यांनी मिळून ×× लावल्यामुळे आणि संगणक कमी असल्यामुळे एकदोनदाच संगणक वाट्याला आलेला.मशिन चालू करण्यापासून तयारी...
चालू करायचं बटण कुठलं? हे... आणि... हे असावं... अजून नाही चालू झालं... साली दोन बटणं की तीन... एऽऽ आंजर्लेकरऽऽएऽऽ...एऽऽ करकेराऽऽएऽऽकदमऽऽतू तरीऽऽ... साले कोणी लक्ष देत नाहीत... हाक मारली की हसतात... हे असेल का तिसरं बटण?... दाबूया?... दाबूया की नको?...
समोर उभ्या जनतेमधे कोलाहल माजत चालला आणि दुग्ध्यात पडलेल्या निशीला ते तिसरं बटण दाबावंच लागलं.
... हं... झालं चालू च्यामारी... आता... लॉग इन नेम... हं... आता हं पासवर्ड... आयला आपला पासवर्ड...हंऽहात तिच्याऽऽ... हा नाही?... मग?... हंऽऽहांऽतऽ...
निशीला पासवर्ड आठवेना.आठवलेला पासवर्ड मशिन घेईना.आता शेवटची संधी.ही साधली नाही तर लफडं.मग खालचा बंड्या.त्याच्या शिव्या.बडबड.नको तिथे चिमटे.आणि सगळ्यांचं हसणं.समोर जनता आता प्रक्षुब्ध होऊ लागलेली.निशीनं डोळे मिटून सुपेचं स्मरणं केलं.की बोर्डवरच्या सात-आठ तरी कीज उडून हातात येतील एवढ्या जोरात तो बडवून निशीनं शेवटचा प्रयत्न केला आणि कशी कुणास ठाऊक मशिनला दया आली.
तोपर्यंत समोरच्या काचेखालच्या फटीतून चार पाच हात सरसावले.चेक्स असलेले.
अरेरेरे!... हे काय करत बसलो आपण?... आधी टोकन द्यायला पाहिजे होतं!... छ्याऽऽ प्रत्येकाला टोकन देऊन आधी वाटेला लावलं असतं... छ्या:ऽऽ टोकन स्टॅंड कुठेय? एऽऽकदमऽऽएऽऽ टोकन स्टॅंड कुठेऽऽ-
“आरं एऽऽ निश्याऽऽ भाड्याऽऽ टोकनं कसली द्येत बसलाईस तुज्या कर्माचीऽऽ घ्ये घ्ये च्येक! ड्येबिट कर आन् हान् कॅश च्यामारीऽऽ एऽऽ”बंड्या बाहेर होताच जनतेच्या लाईनजवळ.बंड्याच्या ओरडण्यावर लाईनीतले बहुतेक हसले.
आता काय हसण्यासारखं होतं त्यात? निशी आणखी कावराबावरा झाला.काही न सुचून चुळबुळू लागला.आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी जुलमाने घोड्यावर बसवल्यासारखा गर्दीकडे पाहू लागला.
जनता आता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत होती.
पर्याय नव्हता.गत्यंतर तर नव्हतंच.
चेक घ्यायचा.बघायचा.कॉम्प्युटरवर अकांऊटला मारायचा.ड्रॉवरमधून कॅश उचलायची.चेक घे.बघ.गड्डी फेक.नोट कर.चेक घे.बघ.नोटा सरकव.नोट कर.ते करत असताना कॉम्प्युटरवर लक्ष ठेव.लॉग आऊट होऊ नये म्हणून.झाला तर पुन्हा दोन दोन पासवर्ड... मार.. मशिन चालू कर...
गड्डी कुठली फेकतोएस? पन्नासची की शंभरची? की पन्नासच्या जागी शंभरची?... पाचशे... हजार...बापरे! आज मरणार! छ्या:ऽऽ
आज काही धडगत नाही आपली! हा विचार निशीचा पिच्छा सोडत नव्हता.मग नोटांवरचे गंधी आपल्यालाच बघून हसताएत असं त्याला जाणवायला लागलं...

Monday, January 24, 2011

भलताच क्लायमॅक्स आणि नाटक

भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला! माझी आई आता काही दिवसांचीच सोबती आहे हा विचार गिधाडासारखा माझ्या मानगुटीवर स्वार झाला.माझं काय? आईवरच्या जबाबदार्‍या आता माझ्यावर आल्या, त्या कशा निभावू? अनेक ताण ठाण मांडून बसले.मी काय काय करणार होतो? माझ्या हातात किती गोष्टी आहेत? मी स्वत:विषयीच्या अवाजवी सहानुभूतीमधे गुंतवून घेऊ लागलोय स्वत:ला? अनेक विचार तेव्हा आणि नंतर कितीतरी काळ माझ्या मनाचा कब्जा घेऊन बसले.
आई तीन महिनेच जगली.अतिशय सुरक्षित वातावरणात जगलेल्या मला या तीन महिन्यात जगानं स्वत:चं नवं आणि क्लेशदायक रूप दाखवलं.हे जग आपल्या घरातूनच सुरू होतं ही पराकोटीची वेदना होती.घरातल्या एखाद्या मत्यूसंदर्भात माझ्यासकट इतर सगळेच संबंधित कसे प्रतिक्रीय होतात ते बघून मी खचत चाललो.
आई गेल्यानंतर वर्षभर मी रिता होतो.सुनंसुनं रितेपण म्हणजे एक वेडाच्या सीमेवरचा प्रवास वाटायला लागतो.
आई गेली आणि तिनं ज्या बिछान्यावर शेवटचे दिवस काढले त्या बिछान्यावर खोलीच्या दाराकडे पाठ करून मी अर्धवट वाचून बाजूला टाकून दिलेलं ’अभिनयसाधना’ वाचून संपवलं. कॉन्स्टटिन स्तॅनिस्लॅवस्की या रशियन रंगकर्मीच्या An Actor Prepares या इंग्रजी भाषांतरीत पुस्तकाचा के.नारायण काळे ह्या जुन्याजाणत्या रंगभूमी अभ्यासक, पटकथालेखकाने केलेला मराठी अनुवाद.मी कधीतरी उत्साहाने तो मिळवला होता.यातले पायदिवे-footlights, डोयदिवे-spots अशा मला माहित असलेल्या इंग्रजी शब्दांच्या मराठी अनुवादाने मी बिचकलो.नटानं नाटक आणि त्याची विविध अंग हा अभ्यास करताना शिजवलेल्या टर्की कोंबड्याचे वेगवेगळे तुकडे आणि संपूर्ण शिजवलेल्या कोंबडा असं उदाहरण वाचून मी बाचकलो.माझ्याकडून ते पुस्तक कधी बाजूला पडलं मला समजलं नाही.यातले शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी, त्यांनी एकमेकांना विचारलेले प्रश्नं, विद्यार्थ्यांना सरावासाठी मिळालेला प्रत्यक्ष रंगमंच, नेपथ्य, शिक्षकानी विद्यार्थ्यांना कृती करायला लावून, कल्पनाबीज विस्तारीत- improvisations करायला लावून शिकवलेली नाट्यमाध्यमातली तत्वं हे सगळं सगळं माझ्या दृष्टीने खूप लांबचं होतं.पुस्तकात रस वाटता वाटता ते दूर लोटलं जाई.ते कधी बाजूला पडलं समजलंच नाही.
आईच्या जाण्यानंतरच्या ’दिवसां’ मधे मी ते झपाट्यात वाचून संपवलं.मी पुस्तकात पूर्ण एकाग्र झालो होतो.मला त्यावेळी वेगळ्याच कुठल्यातरी पण मला बांधून टाकणार्‍या विश्वात स्वत:ला गुंतवून घ्यायचं होतं.माझ्या संदर्भात हे विश्व नाटक या माध्यमाचं होतं.
नंतर कधीतरी मी Bulding A Character स्तॅनिस्लावस्की ह्यांच्या मूळ रशियन लेखनाच्या इंग्रजी अनुवादाचा के.नारायण काळे यांनी केलेला मराठी अनुवाद ’भूमिकाशिल्प’ हे पुस्तक मिळवलं.या दोन पुस्तकांची मी पारायणं करत होतो.माझं अत्यंत सुरक्षित आयुष्य त्या घटनेने असुरक्षित झालंय असं वारंवार जाणवत होतं.ही असुरक्षितता वेढून टाकत होती.मी लोकल प्रवासातसुद्धा या पुस्तकांमधली टिपणं काढत होतो.
त्याही नंतर मला स्तॅनिस्लॅवस्की या थोर रंगकर्मीच्या रशियन लेखनाची इंग्रजी भाषांतरं सापडली. ‘An Actor Prepares’, ‘Bulding A Character’ आणि Creating A Role इंग्रजी वाचनाचा सराव नसताना मी या पुस्तकांशीही झटू लागलो.ही पुस्तकं इंग्रजीतून वाचताना मजा येत होती अर्थात मी त्यातल्या दोन पुस्तकांचे मराठी अनुवाद वाचले होते ही माझ्या दृष्टीने जमेची बाजू होती.
नाटकासारखी रंगमंचावर प्रत्यक्ष सादर करण्याची कृती पुस्तकं वाचून कितपत साध्य होते हा रंगकर्मींमधे चर्चिला जाणारा महत्वाचा प्रश्नं आहे हे मला कालांतराने समजलं.मी माझ्या पद्धतीने नाटकाविषयी जे जे काही मिळत होतं ते मिळवत होतो आणि अभ्यासण्याचा प्रयत्नं करत होतो.
पुन्हा प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करायला मिळणार नाही असं मला त्या घटनेनंतरच्या काही दिवसा-महिन्यांमधे ठाम वाटत होतं.दुसरीकडे भविष्यातले खर्चं डोळ्यासमोर दिसत होते.
माझ्याबरोबरचे मित्र, सहकारी शेअर्समधे पैसे गुंतवत होते.प्रमोशनसाठी जीव तोडून प्रयत्न करत होते.त्यांची लग्नं होत होती.संसार थाटले जात होते.ते कधीच मार्गाला लागले होते.सेटल झाले होते.
नाटकाच्या अभ्यासाबरोबर काही उत्पन्नही मिळायला पाहिजे असं माझ्या मनाने याच दिवसात घेतलं.नाटक माध्यमाशी संबंधित एका वेगळ्या माध्यमाकडे वळायचं माझ्या मनानं घेतलं.यात कदाचित माझा वेळ वाचणार होता.आई असताना घरादाराचा विचार न करता नाटकच डोक्यात होतं.तसं पूर्णपणे गुंतून रहाणं यापुढे कितपत शक्य आहे? हा विचार बळावला आणि मी या नव्या माध्यमाकडे वळलो.

Thursday, January 20, 2011

प्रेमाचं वादळ!...

Cyclone Warning ... [33/P365]कोवळ्या वयातली मुलं लैंगिक आकर्षणाला बळी पडली किंवा प्रेमातल्या नैराश्याने खचली तर आयुष्यभर असह्य ताणाखाली वावरतात.अशा वेळी त्यांच्या भोवतालचं वातावरण, घर, विशेषत: त्यांचे आईबाप फार मोठी भूमिका बजावत असतात.घरातलं भावनिक अस्थैर्य, आईवडलांमधला विसंवाद मुलाचा भावनिक पाया खिळखिळा करतात.त्यातच बाप आणि मुलगी किंवा आई आणि मुलगा या अतिमहत्वाच्या नात्यांमधे जरूरीपेक्षा जास्त तणाव असला तर ते मूल आधीच भावनिक ताण अनुभवत असतं.या परिस्थितीत या ना त्या कारणाने येणारं प्रेमातलं नैराश्य किंवा लैंगिक आकर्षणाला बळी पडणं फारच क्लेशकारक ठरू शकतं.
शाळेतून कॉलेजमधे जाताना आणि त्यानंतर नोकरी-व्यवसायात शिरताना माणसातल्या सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं.प्रेम या विषयात अनेक नवनवीन जाणिवा व्हायला लागतात.प्रथमदर्शनी प्रेम आणि पहिलं प्रेम यांच्या रोमांचकारी अनुभवाचं हे सर्वसाधारण वय म्हटलं पाहिजे.हिंदी सिनेमानं हा अनुभव आणखी रोमांचकारी बनवून टाकला.उदा. ’मेरे मेहेबूब’ ह्या सिनेमातली ती सुप्रसिद्धं आणि नंतर अनेकांनी अनेक रांगोळ्या घातलेली नायक-नायिकेची प्रथम भेट, ते अनवधानाने एकमेकांना धडकणं, ती पुस्तकं पडणं, त्यानं ती गोळा करणं, सगळं एकमेकांच्या नजरेत बांधलेल्या नजरा न सोडवता... काय? गेलात नं समाधीत?...
प्रथमदर्शनी प्रेमातून हटकून प्रेमाचं बस्तान बसण्याची कल्पना तशी वास्तवाला धरून मात्र नाही. ’पहिलं प्रेम’ हा मात्र माणसाच्या आयुष्यातला फार मोठा अनुभव.ज्यांचं पहिलं प्रेम यशस्वी होतं ते सुदैवी.अर्थात, प्रेमात यशस्वी होणं हा फार लांबचा पल्ला असतो.ते लग्नात परिणत होणं हा त्यातला पहिला टप्पा मानला जातो.
मागच्या पिढीत प्रेमविवाह हेच एक अप्रूप होतं तेव्हा पहिल्या आणि जराश्या आकर्षणाने झालेले विवाह नंतर खूप क्लेशदायी झालेले आढळले.प्रेमविवाहाबद्दल एक नको तेवढी रोमांचक कल्पना बाळगल्यामुळे हे झालं असावं.प्रेमविवाह अजून समाजात मुरले नसावेत.आजच्या पिढीत सर्वसाधारण अनुरुपता, शिक्षणक्रमातला समानधागा, समान करियर अशा मार्गाने एका अर्थाने कॅलक्युलेटेड (हिशोबी) प्रेमविवाह होतात.कालानुसार हे सुसंगत असावं.तरी प्रेम ही भावना त्यातही आपला प्रभाव दाखवल्याशिवाय रहात नाही.Love Love Loveआपल्याला आवडणारं माणूस छोट्या छोट्या गोष्टींतून आपली काळजी करतंय, आपल्याबद्दल त्याला खास काही वाटतंय असे अर्थ लावणं, मग ते खरे ठरणं, दोन्ही बाजूंना त्यांची संपूर्ण जाणीव होणं... यानंतरचा प्रवास स्वप्नातून जाणारा असतो!.रोजचं अर्थहीन आयुष्य चटकन्‌ रोमांचकारी वाटायला लागतं.मग एकमेकाला जपणं, एकमेकांचे हट्टं पुरवणं असं करता करता रूसवे-फुगवे, लटकी भांडणे, अबोला धरणं या मार्गांनी प्रेमाचं वादळ माणसाच्या आयुष्यात प्रवेश करतं.त्याला दिशा देणं या दोन्ही प्रेमिकांच्या हातात असतं.
निवडीची उलथापालथ करत रहाणं हा काही माणसांचा स्वभाव असतो.ठरवून प्रेमात पडता येत नाही हे त्याना मान्य नसतं.त्यांना कुणी आवडतच नाही.माणसातले दोष शोधत रहाणं, स्वत:बद्दलच्या अवाजवी कल्पना आणि प्रेमसंबंधातून अवाजवी अपेक्षा बाळगणं अशा वृत्तीमुळं ती प्रवाहापासून अलग पडतात.एखादा किंवा एखादी खूपच भिडस्त असते.समोरून आवाहन करणारं प्रेमही अशांना त्यांच्या कोषातून बाहेर काढू शकत नाही.काहींच्या बाबतीत प्रेमाचे योगच नसतात.प्रेम जुळण्यात सतत काहीतरी विघ्नं निर्माण होत रहाणं, उगाच गैरसमजच होणं, व्यावहारिक अडचणीत गुंतून प्रेमसंबंधासाठी अवकाशच न मिळणं अशा गोष्टींमुळे ते प्रेमापासून वंचित रहातात.हळूहळू अनावर होत जाणारं लैंगिक आकर्षण भुकेच्या स्वरूपात समोर उभं राहू लागतं.प्रेम आहे तरी वादळ, नाही तरी वादळ अशी परिस्थिती निर्माण होते.
समवयस्कांमधे प्रेम निर्माण होणं सहज असतं.कधीकधी आपल्यापेक्षा जास्त वयाची, वयात खूप अंतर असलेली व्यक्ती आवडायला लागते आणि तो समाजाच्या कुतूहलाचा विषय बनतो.यातल्या लहान भागीदाराच्या प्रेमाची गणती बालिश प्रेमात (काफ लव्ह) होऊन ते फारसं गंभीरपणे न घेण्यासारखं असतं असा सर्वसाधारण समज असतो.तर जास्त वयाचा जोडीदार पावलोपावली आपण करायला जातोय ते योग्य की अयोग्य या संभ्रमात पडायला लागतो.दोघंही एकमेकात इतकी गुंतलेली असतात की बाहेर पडणं दोघांनाही कठीण होऊन बसतं.लहान भागीदार कोवळ्या वयातला असेल तर त्याच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारी परिस्थितीच जणू त्याच्यासमोर उभी रहाते.संबंधातला जास्त वयाचा भागीदार जर विवाहित असेल तर फारच अडचणीचा मामला होतो.अशा विवाहबाह्य प्रेमातून अनेक माणसं दु:खी होऊ शकतात."killing love #2"
प्रेम कधीकधी जे राक्षसी रूप घेतं ती वादळाची परिसीमा ठरते.वर्गात शिरून किंवा भर रस्त्यात रॉकेल ओतून पेटवून देणं, तुकडे करून फेकून देणं, भररस्त्यात भरदिवसा सपासप वार करून बदला घेणं हे केवळ राक्षसच करू शकतात.त्यांना प्रेमिक वगैरे म्हणणं हा प्रेम या शब्दाचा अपमान होईल.याच्या बरोब्बर विरूद्ध असतं ते ’प्लेटोनिक लव्ह’.कुठलंही लैंगिक आकर्षण नसलेलं, निरपेक्ष असलेलं प्रेम.पृथ्वी सूर्याभोवती किंवा चंद्र पृथ्वीभोवती फिरत राहिलेले आहेत अनंतकाळ तसं.
स्त्री-पुरूषांमधे निखळ मैत्री असू शकत नाही असं नाहीच.पण त्या दोघांत प्रेम निर्माण झालं तर त्यात लैंगिक आकर्षणाचा भाग नसतो हे पटणारं नाही.मुळात स्त्री-पुरूषात मैत्री व प्रेम यात फार पुसटशी रेषा आहे.
प्रेम जमतं आणि मग पुढचे निर्णय घेणं महत्वाचं ठरतं.त्यासाठी प्रेमाच्या धुंदीतून बाहेर यावं लागतं.त्या धुंदीत ही माणसं जास्तीत जास्त निकट येतात.एकमेकांच्या सवयी, दोष, एकमेकांना गृहीत धरणं, एकमेकांकडून अपेक्षा ठेवणं आणि त्यानंतर ’जेलसी’.आपल्याला आवडणारं माणूस फक्तं आपलंच ही ’पॅशन’.आपल्याच माणसावर बारीक नजर ठेवणं, त्यानं सतत आपल्याच अंकित असावं अशी अपेक्षा बाळगून त्याला जखडून ठेवल्यासारखं करणं, तो किंवा ती सतत आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असा समज (गैर) करून घेणं.तसं त्यानं करू नये असा ह धरणं असे प्रकार वादळात आणणारे ठरतात.sahara108प्रेमाचा एक मार्ग विवाहाकडे जातो.किंवा आजच्या युगात ’लिव इन’ कडे जातो.तसं झालं तर प्रेमातून काहीतरी निष्पन्न तरी होतं.तसं नसेल तर आणखीनच खोल भोवर्‍यात अडकणं चुकत नाही.’विशी ते तिशी’ हा माणसाच्या आयुष्याचा कालखंड या ना त्या कारणाने माणसाला प्रेमात बैचेन करणारा असतो.भावनिक वादळं उठवणारा असतो.सारासार विचार करून काहीएक निर्णय घ्यावे लागतात.माणसाच्या आयुष्यातलं प्रेम त्यामुळे समंजस होत जाणार असतं!

Monday, January 17, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(६)

निशीच्या खांद्यावर मजबूत हाताची पकड पडली.बंड्या त्याच्या खुर्चीच्या पाठीवर आपला दुसरा हात ठेऊन उभा होता.एकशे एकाव्यांदा दचकून निशीने समोरच्या काळ्या काचेत बघितलं.खालचा बंड्याऽऽ... म्हणजे आता कंबक्तीच...angry red-faced guy
“काय करतूस?”
“का-काय- काही नाही-काही नाही!”
“भडव्याऽऽ यून किती टाईम झाला.. ××× करत काय बसलाईस?”
“कु-कुठे-कुठे-काही नाही!”
“त्येच ×××लं म्हन्तो मी.. त्या समूर..पाववाल्या आन् त्या काळ्या काकडीच्या गप्पा ऐकतूस व्हय?”
“ना- नाही हं साहेब.. अजिबात नाही-नाही”
“मला सांगतुईस व्हय रं भाडखाऊ.. आज ××लेत व्हय मला?... चल!”
“कु-कुठे-कुठे? कुठे?”निशीला घाम फुटून श्वास लागला होता.
“आऽरं चाऽलऽ ऊठ!”
“ये-येतो साहेब- पण-कु-कु-”
“कोंबडं हैस व्हय रं! कुकुकु- चल च्यामायला कॅशमदी! मेनला.पेमेंटमदीऽऽ”
“मे-मेन कॅश!- स-स-साहेब-साहेब-
खालच्या बंड्यानं आपली पकड मजबूत ठेवली नसती तर निशी दाणकन् खाली जमिनीवरच आपटला असता.आता जागेवरून हलणं भागच होतं.निशीनं मनातल्या मनात सुपेचं स्मरण केलं.अडीअडचणीला निशी सुपेकडे जायचा.सुपे पत्रिका बघून, हात बघून शंकानिरसन करायचा.उपाय सुचवायचा.जप मनातल्या मनात चालू केल्यावर निशीला सुचलं.आपले प्रयत्नं सोडता कामा नयेत.उठता उठता थुंकी आवरत तो म्हणाला,
“सा-सा-साहेब-पण टोकेकर-”
“तो भडवा सायेब झालाय आज! ऑफिसरची एक्टिंग हे त्येला!”
“स- साहेब पण मिसाळ-”
“तुला भड्व्या कोन कोन सिनियर हाय त्ये बरूबर म्हाईत! मिसाळ ब्येनं बस्लंय तुज्या आदीच कांपुटरवर! तुज्या मायला तुजं ध्यान त्या पाववाल्याकडं आन् काळ्या काकडीकडं-”
“पण-साहेब-भा- भाई-”
“त्याच्या आयला लागला ×× त्याच्या- तू चलतुस का लाऊ तुला पन-”
“आ- आलो-साहेब- जरा- टॉयलेट-”
“जा मूत भडव्या आन म् येऽऽ”असं म्हणून खालचा बंड्या भर चौकात खदखदा हसावं तसा ग्राऊंडफ्लोअरवरच्या त्या हॉलच्या मधोमध उभा राहून हसला.कोपरय़ातून वीरकर आणि इतर शिपाई बंधूंचा प्रतिध्वनी मागोमाग आलाच.निशीऽऽ निशीऽऽ असं ओरडून कर्मचारीगणही त्यात सामील झाला.
टॉयलेटमधे शिरला तेव्हा निशीचे धाबे दणाणले होते.किंवा धाबे दणाणल्यामुळे त्याला टॉयलेटकडे यावं लागलं होतं.मोकळा होता होता तो झाल्याप्रकाराची संगती लावू लागला.
आज मार्गशीर्षातला गुरूवार.नेमका मार्गशीर्षातला पहिला दिवस.नेमका.कधी नव्हे तो.गेला आठवडाभर लोकांची गटारी.काल मोहरम की ईद की काय ती सुटी.परवा लाईट नव्हते म्हणून सगळे कामं टाकून गूल.नेमका डिसेंबरचा पहिला आठवडा.पहिला आठवडा म्हणजे कॅशमधे तोबा गर्दी.ही पर्वणी साधून नेहेमीप्रमाणे रहाटेने मारलेली दांडी.मेन कॅश काऊंटरवरच्या.पेमेंट करणारय़ा.लाखांमधे...
भाईला बसायला सांगितलं तर- कोण रहाटे? कुठली कॅश? कुठला काऊंटर? असं विचारून खडबडलेल्या चेहेरय़ावर इतके अनभिज्ञ भाव आणेल की आजूबाजूचे सगळे नुकतेच अलिबागहून आलेले आहेत.आणि निर्लज्ज उर्मट चेहेरय़ाने हसत बघत राहील.
परब कळव्याहून, इतक्या लांबून येतो म्हणजे उपकारच.त्याला नेमके जुलाब होत असतील किंवा थंडी भरून आलेली असेल. ’असं पहिल्यांदाच झालं!’ असंही तो नेहेमीप्रमाणे म्हणेल.
दिलीपला नेमकी लंचअवरमधे साखरपुड्याचे फोटो काढायची ऑर्डर असेल.आपण राष्ट्रपतींचे फोटो काढायला जाणार असल्याच्या थाटात तो ते सांगेल.
’ऑन द स्पॉट’ कॅशवरून डाका, दरोडा, लाख, खाक अशा शब्दांचा वाक्यात उपयोग करून भलत्याच अर्थाची म्हण बनवेल.ती खदाखदा हसून किंवा चिडून कानठळ्या बसवणारय़ा आवाजात सुनवत राहील.पर्यायानं बंड्या थंडा होईल.
उत्तम शिंदे कॅश वरून यॅस, फॅस असं काहीतरी जुळवून ज्योक तयार करेल.तो सांगताना दहादा विसरेल.हे सगळं करताना तो सतत तोंड पसरून स्वत:च आपल्या ज्योकवर हसत बसेल.इतका हसेल की समोरचा गप बसेल.
मनू मुत्तमवार, ’कॅशमधे बस!’ या मार्गावरची गाडी भलत्याच मार्गावर घेऊन जाईल.तोंड पाडून, एरंडेल प्यालासारखं हसून, नको तेवढं इंग्रजी बोलून, प्रमाणाबाहेर विनम्र होऊन, अनेक चित्रंविचित्रं स्थानकांवरच अडकून राहील.
जयदेव मिसाळ कामात फास्ट.फास्ट म्हणजे त्याच्यासारखा तोच.असं त्याचं मत.केसांवरून हात फिरवत सगळ्यांच्या आधी येऊन, रिकामी जागा हेरून, अलाऊन्स साधून त्यानं एव्हाना, म्हणजे तासाभरात सगळं काम संपवत आणलेलं असेल.त्याला कसं उठवणार?
कबनुरकर, सावंत, काळे पोरंबाळंवाल्या बाया म्हणून बादच!blue in the face
रहाता राहिले टोकेकर.त्याना ऑफिशिएटिंग.एक्टिंग.
म्हणजे मग...
टॉयलेटमधे मोकळं होता होता निशी इथपर्यंत आला आणि पुन्हा दचकला.कितव्यांदा कुणास ठाऊक.च्यायलाऽऽ... पळालं पाहिजे लवकर कॅश केबिनमधे नाही तर बंड्याचे चिमटे...
कितव्यांदा कुणास ठाऊक निशीने धूम ठोकली आणि तो लॅचशी खडखड करून, झपकन् बंद-उघड होणारय़ा दाराशी झटापट करून कॅश डिपार्टमेंटमधल्या मेन पेमेंट काऊंटर केबिनमधे शिरला.प्रमाणाबाहेर उंच असलेल्या खुर्चीवर चढून बसताना एखाद्या मनोरय़ावर चढावं तसा श्वास त्याला लागला...

Saturday, January 15, 2011

कॉमेडी शो “पोस्टातली गोष्टं! ”

मनू फक्तं मलाच भेटतो असं नाही.आपल्या सगळ्यांनाच तो पावलोपावली भेटतो हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल.आपणच कधी ’मनू’ होतो का? हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न!
काही वर्षांपूर्वी मला मनू पोस्टातल्या एजंटच्या रूपात भेटला.अतिशय दीनवाणा, लाचार, चाचरत चाचरत बोलणारा, अत्यंत गरजू असा.Cartoon Nerd/Geek Illustration
आयुष्यात आपल्याला आयकर (इन्कमटॅक्स) भरावा लागतो या कल्पनेनेच मी प्रचंड भारावून जातो दोस्तांनो दर वर्षी.आपण भरायचे आणि ’त्यांनी’ खायचे.सामान्य माणूस आणखी कशाने भारावणार? असा मी प्रचंड भारावून माझ्याच मनोराज्यात दंग झालेला असताना मनू समोर आला.मगाशी म्हटलं त्या स्वरूपात.१ रूपयाला ७ रूपये पोस्टाच्या राष्ट्रीय बचत योजनेत टाकून सर्टिफिकीट मिळवा आणि १ रूपयाही वाचवा.माझा आनंद गगनात मावेना.एक रूपया वाचणार वर सर्टिफीकीट.सामान्य माणसाला सर्टिफिकीटाचं- मग ते कसलंही असो- काय मोल असतं तुम्हाला तर माहितीच आहे.मी कर्ज काढून टॅक्स वाचवला.पाच हजार वाचवण्यासाठी पस्तीस हजार गुंतवले.मनूला त्यावर एक टक्का कमिशन.त्यातलं काहीतरी तो मला देणार.त्यानं मला काहीच दिलं नाही.मी सामान्य आणि मनू मराठी माणूस, त्यातून गरजू, म्हटलं जाऊ दे! दरम्यान माझ्या असं लक्षात आलं, मनूनं ज्या पोस्टाची नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स दिली होती ते मला खूप लांब होतं.मी पुन्हा मनूला गाठलं नाही.त्यानंतर दरवर्षीचे व्यवहार मी स्वत:च माझ्या जवळच्या पोस्टातून करायला लागलो.
सात वर्षं सरली.मनूनं दिलेल्या सर्टिफिकीटांची मुदत संपत आली.मी माझ्या त्या जवळच्या पोस्टात गेलो आणि याच पोस्टातून मला त्या दूरच्या पोस्टातल्या सर्टिफिकीटांचे पैसे मिळावेत असा अर्ज महिनाभर आधीच नेऊन दिला.कुठल्याही पोस्टातल्या एनएससीजचे पैसे दुसर्‍या कुठल्याही पोस्टातून मिळायची सोय तेव्हा तरी होती.
साठ हजाराच्या आसपास रक्कम मिळणार.त्यातून चालू वर्षाचा टॅक्स भरायचा.पैसे मिळणार असं कळल्यावर घर आणि घरातले महत्वाचे खर्च लगेच डोकं वर काढतात.आपल्या श्रमाचे आपण गुंतवलेले पैसे!
मुदत उलटून गेली तरी माझ्या जवळच्या पोस्टात त्या दूरच्या पोस्टातून परवानगी आली नाही.मी अस्वस्थ होऊन आणखी दोन स्मरणपत्रं पाठवली.३१ मार्च ही तारीख जवळ आली तशी मला मनूला गाठल्याशिवाय पर्याय राहिला नाही.सुरवातीलाच मला मनूला गाठता आलं असतं पण मग मनूनं मला त्या एजंटी काव्यानं जबरदस्ती त्याच्याकडेच पैसे गुंतवणं भाग पाडलं असतं. ’पैसे देतो पण इतके गुंतव’ असे दमबाजीचे प्रकार प्रत्यक्ष पोस्टाच्या खिडक्यांवर चालतात असं मी ऐकलं होतं.
मनूला फोनवर गाठलं आणि सात वर्षांपूर्वीच्या लाचार मनूचं रूपांतर कशात झालंय हे समजलं. “आता वेळ नाही.माझ्याकडे पहिल्यांदा का नाही आलास? आता पैसे १ एप्रिल नंतर!” लोक एप्रिल फूल करतात ते मला माहित होतं.मनू मला एप्रिलनंतरही फूल करायला निघाला होता.त्यानं अडवणूक चालूच ठेवली. “तुझा अर्ज त्या पोस्टात मिळालाच नाही.मिळाला असेल तर पोस्टमास्तरनं तो दाबला (कशासाठी?) असेल.” असं उद्धटपणे बोलायला लागला.त्या पोस्टात फोन केला तर मास्तर चहा प्यायला गेलेले.माझा अर्जं, त्यानंतरची चार स्मरणपत्रं काही काही मिळालेलं नाही! इतके दिवस मी लोकांची पत्रं एकमेकाना मिळत नाहीत असं ऐकलं होतं.पोस्टातली पत्रं खात्यातल्या खात्यात एकमेकाना मिळत नाहीत? डोक्याचा गोविंदा झाला आणि कळलं हे इतकं सरळ नाही.
शेवटचे चार दिवस उरले.हातात पैसा नाही.आपला पैसा अडवून ठेवलेला.हकनाक.दोन रात्री झोप लागली नाही.
तिसर्‍याच दिवशी पहाटे जाग आली.सामान्य, सरळ वाटेने जाणार्‍या माणसाला देव म्हणा, सुप्तमन म्हणा मदत करतं असं म्हणतात.टेलिफोन डिरेक्टरीच्या मागच्या बाजूला विविध सरकारी खात्यातल्या वरिष्ठांचे फॅक्स नंबरस् दिलेले असतात असा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.उठलो.चीफ पोस्ट मास्तर जनरल पासून खालपर्यंत असे सहा फॅक्स केले.फॅक्सने तुमची लेखी कंप्लेंट जाते.आश्चर्य म्हणजे संध्याकाळपर्यंत खातं चक्कं हललं! एका वरिष्ठाचा मला- मला फोन आला.पैसे रोख तयार आहेत.घेऊन जा.वीस हजारांवर पैसे रोख देता येत नाहीत असा नियम असूनसुद्धा!
सामान्य माणूस नुसतीच टीका करतो.नकारात्मक चित्रं रंगवतो.सहसा पेटून उठत नाही.पण कधी काळी पेटला तर हट्टालाच पेटतो.
मी पुन्हा मनूला फोन केला.२९ मार्च.त्याची अरेरावी अजून संपली नव्हती.मी त्याला ठासून सांगितलं पैसे तूच आणून द्यायचे.पोस्टमास्तरला फोन केला.तो म्हणाला, “मनूला पुन्हा पुन्हा येण्या- जाण्याचा त्रास (!) नको.सर्टिफिकीटं सह्या करून तयारच ठेवा.मी मनूला पैसे घेऊनच पाठवतो!”
३० मार्च.मनूच्या नाकी नऊ आलेले.सगळीकडून पैसे जमवून भरण्याची त्याची एजंटगिरीची घाई उद्याच्या ३१ मार्चमुळे टोकाला आलेली.त्यात मी धोबीपछाड टाकलेला.चिडून म्हणाला, “मला दुसर्‍या पोस्टात पैसे भरायला जायचंय.किती वाजेपर्यंत पैसे घेतात महित्येय का?” मी फोनवर जोरात ओरडलो, “पोस्टात काय चालतं हे सगळं मला माहित झालंय! तू पैसे घेऊन येतोस की नाही ते सांग!” मनूनं फोन डिसकनेक्ट केला.कुठल्या तोंडानं तो मला भेटणार!
३१ मार्च उजाडला.मनूच्या कृपेमुळे मला अखेर त्या लांबच्या पोस्टात जावं लागलंच.Mr. van Rooy  Cartoon by Shonaमास्तर मिशांना पीळ भरत माझी वाटच बघत होते.३१ मार्च होता तरी मिशीला पीळ भरून झाल्यावर ते हाताची घडी घालून बसले होते.माझ्याकडे बघत त्यांचं ते गुलछबू हसणं.रंगेलपणे हॅ हॅ हॅ हॅ करत माझं त्यांनी स्वागत केलं.पैसे चोख काढून ठेवलेले.नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही याचा अर्थ मला कळला.आपल्याकडेही ताकद असते याचा प्रत्यय आला.दुसर्‍या मिन्टाला माझे पैसे अखेर माझ्या हातात पडले.तरीही, वरून बांबू मिळूनही तो गुलछबू मास्तर जणू काही झालंच नाही असा हसून मला चहा पाजायला बघत होता.तुमचा अर्ज अजून सापडत नाही हो- असं ठाम निर्लज्जपणे सांगत होता.
मनू त्या पोस्टातला रेग्युलर एजंट.त्याला कमिशन मिळतं.तो मास्तरला कमिशन देऊन आपल्याकडे न येणारे पैसे अडवतो.अडवून पैसे आपल्याकडे गुंतवून घ्यायचे.नाही मिळाले तर अडवायचे आणि सामान्य माणसाला म्हणायचं आता बस बोंबलत! हा या दोघा मराठी माणसांचा डाव लक्षात यायला आता मला शेंबड्या पोराचीही गरज नव्हती.माझ्यावर मात्र ’वरून’ खरंच कृपा झाली होती!
या प्रकारची कृपा माझ्यावर नंतरही झालेली आहे दोस्तांनो! त्यानंतर विमा आणि नंतर एका खाजगी बॅंकेच्या एटीएम व्यवहारासंदर्भात! खरंच! अजिबात भिऊ नका! हे सेवा उद्योग आपल्या पाठीशी निश्चित उभे आहेत!
Post Office in Fort

Friday, January 14, 2011

प्रेम: एक हुरहूर

Falling
माणूस आणि प्रेम यांचं नातं अतूट आहे.माणूस आपली परिस्थिती, भोवताल, आलेली वेळ, काळ, वाढणारं वय या सगळ्या आणि इतर कितीतरी परिमाणांमधून प्रेमाच्या अनेक छटा अनुभवतो.अनेक वेळा प्रेम होतंय हे समजेपर्यंत प्रेमाची जादू संपून गेलेली असते.माणसाला प्रेम करून घ्यायला खूप आवडतं.ते दिल्यानं वाढतं हे त्याच्या लक्षात येत नाही.निर्मळ प्रेमाचा ओघवता स्त्रोत असणारे म्हणूनच या जगात महान ठरतात.
प्रेमाबद्दल सतत इतकं सांगून झाल्यावरही अजून काही सांगायचं उरतंच.प्रेम नक्की काय आहे? माणूस अजून शोध घेतोच आहे.एवढा प्रगत झालेला असूनही प्रेम या शब्दाची व्याख्या करणं त्याच्या आटोक्याबाहेरचं राहिलं आहे.
सर्वसाधारणपणे ’प्रेम’ म्हटल्यावर स्त्री-पुरूषांमधले नाजूक भावबंध हेच त्याचं रूप डोळ्यांसमोर येतं.अनेक हिंदी सिनेमांनी, कथा-कादंबर्‍यांनी कवितांनी प्रेमाला सतत खतपाणी घातलेलं आहे.खरंच! प्रेमाचा हा एवढा भाग जरी विचारात घेतला तरी त्याचा पसारा बघून चकीत व्हायला होतं.स्त्री-पुरूषांमधलं प्रेम हे बाप-लेक, आई-मुलगा, आजी-नातू अश्या नात्यांमधलंही असतं पण आपल्याला प्रेम म्हटल्यावर सहजपणे दिसतं ते स्त्री-पुरूषामधलं आकर्षण.नैसर्गिकरित्या हे आकर्षण निर्माण होतं, वाढतं, खुंटतंसुद्धा.हे प्रेम म्हणजे केवळ लैंगिक आकर्षण असतं असं नाही.
In Love
पुरूषात जे आहे ते स्त्रीत नाही आणि स्त्रीत जे आहे ते पुरूषात नाही.नैसर्गिकरित्याच पूर्णपणे परस्परावलंबी असे हे जीव आहेत.त्यामुळे ’प्रेमबिम सब झूठ आहे’, ’आपल्याला प्रेम वगैरे काही ठाऊक नाही’ असं म्हणणारे लोकांपेक्षा स्वत:लाच फसवत आलेले आहेत.प्रेमात नैराश्य आल्यानंतर काही काळ असं वाटणं स्वाभाविक आहे.दुर्दैवाने ज्यांच्या वाट्याला मात्र सतत प्रेमातल्या दु:खाचीच बाजू आली आलीय किंवा हेकेखोरपणे, आपल्या स्वभावाला मुरड न घालता आल्यामुळे जे सतत या दैवी देणगीपासून लांबच राहिलेत त्यांच्याएवढं दु:खी या जगात कोणीच नसेल.
पैसा, मानमरातब, दर्जा असं काहीही नसलं तरी एक वेळ चालेल, पण प्रेम नाही, ते देण्या-घेण्याची पात्रता नाही म्हणजे माणसाकडे काहीच नाही.
माणूस वयात येतो आणि त्याला प्रेमाची हुरहूर लागते.मुली मुलांकडे बघितल्यावर उगीच कॉन्शस होतात.मुलं आजुबाजूला एखादी जरी मुलगी असेल तर उगाच आपण स्मार्ट असल्याचं दाखवतात.आजकाल मुलं-मुली अधिक मोकळेपणानं मिसळतात.तो मोकळेपणा निखळ मैत्रीचाही असतो.मोकळेपणाने दुसरंच टोक गाठलंय की काय असंही काही वेळा जाणवतं.
पूर्वी एकमेकांना अहो-जाहो करणं, वर्गात मुलामुलींना वेगवेगळं बसवणं किंवा सरळ सरळ मुला-मुलींच्या वेगवेगळ्या शाळा काढल्या गेल्या.एकत्र शिक्षणपद्धतीत वर्गात गप्पा वाढतात म्हणून एक मुलगा, एक मुलगी एका बाकावर बसवण्याची शिक्षा (?) दिली जायची.मग एकाचवेळी नकोनकोसं आणि हवंहवसं वातावरण तयार व्हायचं.आज मोकळेपणानं एखादी मुलगी एका मुलाला तू मला आवडतोस असं म्हणू शकते.तो आवडतो म्हणजे लगेच झालं असंही नसतं.आज मैत्रीचा धागा दिसतो तो पूर्वी लुप्त होता.मैत्री आहे असं सांगणंसुद्धा ईऽऽऽ असा प्रकार होता.The child like look, Indiaविरूद्ध लिंगाच्या व्यक्तीशी मैत्री करावीशी वाटणे ही हुरहूरीची सुरवात.मजा म्हणजे पूर्वीपासून आजतागायत सगळेच जण या स्थितीतून गेलेले असतात आणि तरीही बारा-तेरा वर्षाच्या मुला-मुलीसंदर्भात निखळ असं जरी काही दिसलं तरी प्रत्येक माणसातले आई-बाप लगेच जागे होतात.काय ही पोरं! काय यांचं वय! अभ्यास करायच्या वयात हे काय?... पण हे वयच तसं असतं.प्रेमानं आपली जादू दाखवायला सुरवात केलेली असते.हे प्रेम अर्थात असं लगेच जुळतं असंही नाही.कुठेही गेल्यावर, कुणीही आवडल्यावर हुरहुरणं, तिचं किंवा त्याचं आपल्याकडे लक्ष आहे का नाही ते बघणं, असेल तर ते आणखी वेधून घेणं, हसणं, बोलणं, चेष्टामस्करी करणं इथपर्यंत या वयात प्रेमाची मजल असते.शाळा-कॉलेजातला ’अभ्यास’ नावाच महाप्रचंड राक्षस हे वय, ही हुरहूर गिळण्याच्या पवित्र्यात नेहेमीच असतो.या राक्षसाला वळसा घालून किंवा त्याला खाकोटीला मारून पुढे जाणारेही असतात.पण प्रेम लगेच सापडत नाही.काही काळ हुरहूरीचा जो सिलसिला चालू रहातो त्याला ’क्रॉसवायर्स’ असं म्हटलं जातं.आपल्याला जो किंवा जी आवडत असते, ती-तो आपल्याकडे ढुंकूनही बघत नसतात.ज्यांना-जिला आपण आवडत असतो त्यांचा पिच्छा सोडवणं यात आपल्याला नाकेनऊ येत असतात.
Torn
या वयातल्या प्रेमाची व्याप्ती दिसणं, हुशार असणं किंवा स्मार्ट दिसणं, बोलणं, मनापासून मदत करणं आणि ग्रुपमधल्यांनी चिडवणं किंवा डिवचणं यापुरती असते.मग डेट्स, भ्रमणध्वनि किंवा शक्य असेल तर चॅटवर तासनतास घालवणं.रूसवे फुगवे, आणा-भाका घेणं, पुढच्या आयुष्याचे बेत (!) ठरवणं इथपर्यंत सगळं ठीक असतं.हा एक प्रकारचा भातुकलीचा खेळ असतो.तो अतिशय सच्चा असतो.पण आयुष्यात त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आहे याचं भान तेव्हा नसतं.स्वभावानुसार जवळ आलेले हे प्रेमी अतिजवळकीने परस्परांमधले दोष कळून वेगळेही होतात.पण नैराश्य रहातं आणि या वयातलं हे नैराश्य आयुष्यावर फार मोठा आघात करू शकतं.दोन जीवांनी या वयात प्रेमात पडून हा असा प्रवास पूर्ण केल्यावर माणसामाणसांत जागे झालेले आई-बाप खरे असतात असं अशावेळी वाटायला लागतं.हे आई-बाप आणखी प्रकर्षाने खरे वाटतात, जेव्हा ही कोवळ्या वयातली मुलं लैंगिक आकर्षणाला बळी पडतात.आता प्रेमाच्या वादळाला सुरवात झालेली असते!...
Nouméa, 13 janvier 2011, Vania